Tuesday 28 October 2014

एक क्षण !!



आयुष्यातला एक क्षण अलगद निसटला

सुटला, आणि पुढ्यात येउन बसला

म्हंटला …

काय फरक पडतोय एक क्षण चुकल्याने

त्याच त्या भावनांना क्षणभर मुकल्याने ??


तुही घे विश्रांती एकाच क्षणाची

होऊन दे जरा शांती मनाची


क्षण हा क्षणाने वाहून जाईल

क्षणभर जरी विसावून जाईल

दुसऱ्याच क्षणात शिरशील तू

वेडे, मला विसरशील तू


नव्याने पुन्हा जगायला शिक

विसरून मला जगाला जिंक

बघेन तुला याच धर्तीवर

यशवान होतांना कीर्तीवर


मी हळहळले, मुसमुसले

हात धरून क्षणाला... म्हणाले


क्षणा

आयुष्य क्षणांनी जगतेय मी

सारेच क्षण ओंजळीत वेचतेय मी

क्षणात सारे विखरून जाईन

तू गेलास तर सारेच विस्कटून जाईन


क्षणा …. मी क्षण क्षण साठणार आहे

जगण्याचं गणित मांडणार आहे.

आयुष्याचा क्षणही भागला तरी

जगणंच माझं थांबणार आहे .


(c) रश्मी / ५ जून २०१४





(प्रस्तुत मुक्तछंदातले काव्य मासिकात प्रकाशित झाले असून कावियीत्रीच्या नावे कॉपीराईट आहे.)

Friday 10 October 2014

डॉ श्रीधर शनवारे :- एक व्रतस्थ कवी !






एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देण्यास महत्वपूर्ण ठरले आहे. यांच्या वाड्मयीन प्रवासातले ठळक टप्पे बारकाईने न्याहाळले तर त्यांच्या लिखाणाला प्रतिभेचे अनेकविध पंख फुटलेले दिसतात. वैदर्भीय रसिकांना अभिमान बाळगण्यास महत्वपूर्ण कारण ठरलेल्या या कविमनाच्या साहित्यिकाच्या वाण्ग्मयीन प्रवासाचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.


या संवेदनशील साहित्यिकाचा जन्म ५ आक्टोबर १९३५ रोजी अमरावती जिल्ह्यातल्या' साहूर' येथे झाला. मात्र शिक्षण अन नौकरीच्या निमित्त्याने नंतर च्या काळात ते नागपुरात स्थायिक झाले. ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले आणि मराठी विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाले. गेल्या चार दशकांपासून त्यांचे साहित्य सृजन अव्याहत चालू होते.


‘‘उन्हंउतरणी सुरू होईल आता,

पण वाती भिजलेल्या नसतील,

धुपारतीची वेळ होईल लवकर अन्

माझ्याजवळ फुले जमलेली नसतील,’’



असं म्हणत सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ‘उन्हंउतरणी’ या संग्रहातून त्यांनी कवितेच्या क्षेत्रात पदार्पण केलं.… …

साठोत्तरी मराठी काव्यविश्‍वातील डॉ. श्रीधर शनवारे हे ज्येष्ठ कवी होते. लेखकाच्या जाणीवेत आणि नेणीवेत एखाद्या विषयासंबंधी अधिकाधिक चिंतनाने कसकसे परिवर्तन होत गेले याचे प्रतिबिंब त्याच्या साहित्यात दिसते. त्यांची वाण्ग्मयीन अभिरुची अनेक विषयात व्यापून राहिलेली आहे कविता, बाल-किशोर कविता, नाटक, प्रवासवर्णन, समीक्षा, मराठी व्याकरण, प्रबंध अशा अनेकविध अंगांनी त्यांचे साहित्यसृजन निरंतर प्रवाहित राहिले . पण विविध क्षेत्रातले लेखन त्यांनी केले असले तरी त्यांचा व्यासंग हा कवितेच्या गावचाच. समकालीन अनेक प्रतिभावंत कवी नावारूपाला येत असतांना डॉ. श्रीधर शनवारे यांनी स्वतःचे वेगळेपण जपत त्यांच्या काव्य चाहत्यांच्या आणि समीक्षकांच्याही नजरेत चिंतनशील कवी असा लौकिक प्राप्त केला. सूक्ष्म निरीक्षणशक्ती व चिंतनाची पक्की मांड त्यांची शक्तिस्थानं होती. त्यांच्या अनेक कवितांमधून त्यांची प्रतिभा बोलती झाली आणि आजही त्यांच्या अनेकविध पुस्तकांमधून त्यांची वाण्ग्मयीन गुणवत्ता सिद्ध झालेली आहे. 1960 नंतर मराठी कवितांना आयाम देणाऱ्या कवींमध्ये श्रीधर शनवारे यांचा समावेश आहे. विदर्भातील आध्यात्मिक, वैचारिक कवींच्या परंपरेतील ते कवी होते. त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये 'उन्हउतरणी', 'आतून बंद बेट', 'तळे संध्याकाळचे', ' ‘तीन ओळींची कविता’, 'थांग अथांग तळे' आणि ‘सर्वा’ असे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. या व्यतिरिक्त ‘राक्षसांचे वाडे’ हा बाल-किशोर कवितांचा संग्रह, श्री शरत्‌चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘रामेर सुमोती’ या कथेचा अनुवाद, ‘अतूट’ या शीर्षकाने नाट्याविष्कार, हिन्दीतील प्रख्यात साहित्यिक ‘प्रेमचंद’ यांचा निवडक कथांचा अनुवाद, मराठीतील समर्थ ‘कथाकार वामन चोरघडे’ हा समीक्षाग्रंथ, ‘अभिनव मराठी व्याकरण’ हा व्याकरणावरील ग्रंथ, ‘कोलंबसाची इंडिया’ आणि ‘पायावर चक्र’ ही अप्रतिम प्रवासवर्णने अशा विविध रूपांनी त्यांच्या प्रतिभा वृक्षाला बहर आलेला आहे. साहित्य क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे विदर्भाच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचे कलादालन समृद्ध होण्यास मदत झाली. विशेषत: मराठी कवितेतील त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल नागपूर येथील कृषी विकास प्रतिष्ठानाच्या वतीने त्यांना ‘विदर्भ गौरव’ हा अत्यंत सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या ’सरवा' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार, ’कोलंबसाची इंडिया’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाला नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा ‘गाडगेबाबा स्मृती पुरस्कार’ याव्यतिरिक्त प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ’सूर्योदय काव्य पुरस्कार’ आणि विविध साहित्य प्रकाराला अनेकविध सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत.


डॉ श्रीधर शनवारे हे एक विकासशील कवी होते त्यांच्या लिखाणात 'अनुभवाची अंतर्मुखता' आहे त्यांच्या साहित्यातून प्रतिमासृष्टी, अभिव्यक्तीतील मनमोकळेपणा आणि आत्मविश्वास या साऱ्यातून एक प्रथामिक जोम व्यक्त होतांना दिसतो. निसर्ग आणि मानवी जीवनमूल्यांविषयी निस्सीम निष्ठा असणा-या या कवीच्या कवितेत अपूर्णतेनं खंतावणारं मन दिसत राहायचं. श्रीधर शनवारे यांनी पूर्वसूरींचे अनुकरण न करता, समकालीनांमध्ये न रमता, कोणत्याही वाद-संप्रदायात न अडकता शांतपणे काव्यलेखन करून कवितेची एक देखणी पाऊलवाट निर्माण केली. म्हणूनच त्यांच्या साहित्यावर अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी 'प्रबंध' आणि 'शोधनिबंध' सादर केले आहेत . त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत आणि अनेक ग्रंथांची प्रकाशने त्यांच्या हस्ते झाली आहेत. त्यांच्यावर जवळपास शंभर एक समीक्षा लेख प्रसिद्ध झाले आहेत.

त्यांचा स्वभाव काहीसा आत्ममग्न होता, ते अत्यंत शांत आणि संयमी होते. एक चारित्र्यसंपन्न, सदाचारी, सतत कार्यमग्न असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या हयातीत त्यांनी साहित्य सृजन केलेच पण अनेक समृद्ध विद्यार्थी घडवले. त्यांच्या हयातीत मिळणारा कोणताही पुरस्कार योग्य ठिकाणी दान करण्याचा संकल्प त्यांनी केला होता यातून त्यांच्या निरपेक्ष, हळव्या स्वभावाचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

वांग्मय प्रेमी अन काव्यरसिकांसाठी ढीगभर मेजवानी ठेऊन, शब्दांची आगळी धून पाठी सोडून डॉ श्रीधर शनवारे २८ ऑक्टोबर २०१३ रोजी साहित्यविश्वात एक पोकळी निर्माण करून निघून गेलेत. साठोत्तरी मराठी काव्य विश्वातला तळपता सूर्य अस्ताला गेला. एका कवीची शेवटची ओळ संपली. त्यांच्याच शब्दात उर्धृत करायचे म्हंटले तर


"अंतिम ओळ
तुटण्याशी जोडलेली;
खोडता खोडता उरलेली
उरता उरता
सरलेली"


उन्ह-उतरणी संपली आणि अज्ञाताचा शोध घेताघेता एक आतून बंद बेट काळाच्या अथांग सागरात मावळून गेले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या शब्दातून अन कवितेतून अजरामर आहेत.





(दिनांक २५ ऑक्ट २०१४ रोजी 'सकाळ' वृत्तपत्रातील फास्टट्रॅक पानावर प्रकाशित लेख )

Monday 6 October 2014

लव कि जिहाद ?





लव जिहाद -
मागल्या काही महिन्यांपासून प्रचंड उहापोह होणारा विषय चावून चावून चोथा झालेला पण अजूनही चर्वित चर्वण सुरूच असलेला. चर्चा, वाद, संवाद आणि काय काय पण अजूनही विषयाला खरा संदर्भ न लाभलेला  गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात कथित ‘लव्ह जिहाद’वर चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ’ बोर्डाचे उपाध्यक्ष आणि शिया धर्मगुरु कल्बे सादिक यांनी वाराणसीत बोलताना ‘जो मुस्लिम लव्ह जिहाद करत असेल त्याला ठार मारायला हवं’ असं वक्तव्य केलं आणि सर्व देशात जरथंड झालेल्या धार्मिक चर्चेला पुन्हा तोंड फुटलं. पण प्रश्न निर्माण होतो तो हा कि कुठून पेव फुटलं या विषयाला आणि किती सत्यता आहे त्यात ? 

ब्रिटनमध्ये गेल्या दोन तीन वर्षात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आणि यात मुख्यत: मिड्लंडमध्ये - रोचडेल नंतर ऑक्सफर्ड व नुकतेच रोदरहम मध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी पुरुष आणि गट यात सामील असल्याचे निदर्शनात आले तसेच ब्रिटीश गोऱ्या मुली यांचे सॉफ्ट टार्गेट ठरतात . त्यांच्या जाळ्यात सहज फसतात. …. यामागे बरीच सामाजिक कारणे आहेत - पाकिस्तानी पुरुषांचे आकर्षण हा खरा मुद्दा नहिये. बहुतेक शाळकरी मुली विस्कळीत कुटुंबातून आलेल्या, सिगारेट, ड्रग्स आणि दारूच्या व्यसनाधीन असलेल्या अशा आहेत. तिथल्या संस्कृतीचा तो एक भाग आहे परंतु त्याचा परिणाम म्हणजे पैशांसाठी, एका दारूच्या बाटलीसाठी यातील कोणाही बरोबर त्या जात असत. हे प्रकरण गंभीर होऊ लागले तसे प्रशासन जागे झाले. यावर  सखोल चौकशी झाली आणि समोर आलेले वास्तव कल्पनेपेक्षा भयानक असल्याचे जाणवले.  अगदी पद्धतशीरपणे आधी एका बॉयफ्रेंड शी संबंध आणि त्यातून पुढे त्यान्चे लैंगिक शोषण अशी साखळी. पाकिस्तानी पुरुष गोऱ्या मुलींना कस्पटासमान लेखून त्यांचे शोषण केल्याच्या संघटीत घटना शंभर टक्के खऱ्या होत्या. स्त्रिया - मुली त्याही दुसऱ्या समाजाच्या ह्या उपभोग्य आणि दासीसमान हा टोळीकाळचा समज आणि स्वभाव बदललेला दिसत नाही . मिद्लंड आणि एकूणच ब्रिटनमध्ये वाढणाऱ्या अश्या घटनेला उग्र स्वरूप प्राप्त झाले इथल्या शासनाने दखल घ्यायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या पातळीवर कामही सुरु आहे. ऑक्सफर्ड प्रकरणातल्या १३ जणांना शिक्षा झाली. जिथे जिथे या घटना घडल्या तिथल्या पोलिस आणि child protection मधील उच्च अधिकारी बडतर्फ केले गेले. याबरोबरच सामाजिक पातळीवर अजूनही प्रयत्न चालू आहेत. या विषयाला खरी वाचा फुटली ती इथूनच.


भारतात लव जिहादची पहिली लाट उसळली ती केरळात. एकूण ६००० मुली गायब झाल्याची बातमी होती. सुब्रम्हणीयन स्वामीच्या भाषणातील संदर्भ खरे मानल्यास २००८-०९ मध्ये केरळ न्यायालयात स्थानीक हिंदुत्ववाद्यानी धाव घेतली. न्यायालयाने लव जिहाद प्रकरण खरच असते का याची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मल्याळी पोलिसांनी जिवाचे रान करत शोधमोहीम व तपास यंत्रणा राबवीली. सरते शेवटी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेली कागद पत्रे हेच सांगतात की हे लव जिहाद निव्वळ अफवा असून हिंदुत्ववाद्यांनी संगठना बळकट करण्यासाठी वापरलेले एक तंत्र आहे. ‘दि व्हॉईस फॉर जस्टिस’ या चेन्नईस्थित मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी काम करणार्‍या अ-राजकीय नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने केरळमधील हिंदू घरातील मुली गायब होण्याच्या घटनांवर आधारित बातम्या, जन्मभूमी तसेच मल्याळम मनोरमा या प्रतिष्ठित नियतकालिकात वारंवार प्रकाशित झाल्यानंतर या बातम्यांच्या आधारे ‘लव जिहाद’चा अभ्यास करायचे ठरवले. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून, देशाच्या सार्वभौमत्वाला असलेला धोका लक्षात घेऊन ‘व्हॉईस ऑफ जस्टिस’ने या प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली. या समिती मधे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुरेंद्र भार्गव यांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या 7 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये भटके विमुक्त परिषदेच्या अध्यक्षा प्रा. सुवर्णा रावळ यांचा समावेश होता. आंतरारष्ट्रीय पातळीवर मुलींच्या Human Trafficking मध्ये दरवर्षी भारतातून पुरवठा होणाऱ्या मुलींची संख्या वाढतच आहे हि  अतिशय गंभीर समस्या असूनही ते समजून घ्यायला, नियंत्रण घालायला ना तर आपल्याकडे पुरेसे कायदे, ना यंत्रणा.

लव जिहादची आवई उठविणाऱ्या काही संस्था कट्टर हिंदुत्ववादी आहेत हे नाकारता येत नाही. नुकतंच कर्नाटक पोलिसानी त्यांचा अहवाल सादर करत लव  जिहाद प्रकरण सपशेल फेटाळले आहे. पण त्याच बरोबर कर्नाटक पोलिसांनी हे सुद्धा मान्य केले की मागच्या पाच वर्षात २३० हिंदू मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तपासाअंती यातल्या १५० मुलींनी धर्म बदलवून मुस्लीमांशी लग्न केल्याचे आढळले. पण वरील विवाह निव्वळ प्रेम विवाह असून त्याचा लव जिहादशी कोणताही संबंध नाहि. पण हिंदुत्ववादी मात्र याच आकड्यांकडे बोट दाखवत "हा बघा लव जिहाद" अशी अरोळी फोडतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पण तरीही अजूनही विचार पडतो हिंसा आणि नकारात्मक घटनांचा प्रवाह कधी कधी एखाद्या विशिष्ट समाजाकडून होत असलेला का दिसत असावा कि तशी निव्वळ आरोळी ठोकली जाते हा अभ्यासाचा विषय असला तरी त्यामागे काही करणे असू शकतात. दक्षिण आशियायी समाजात एकूणच स्त्रिया आणि मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा आहे.  दहा बारा वर्षात आर्थिक प्रगतीसाठी स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. बहुतांशी तरुण असलेला हा वर्ग आणि या आधी वसलेला आता ५०-६० त असलेला, दुसऱ्या महायुद्धानंतर कामगार म्हणून आलेली आधीची पिढी यात कमालीचे अंतर आहे. कौटुंबिक हिंसा आणि वाढता धार्मिक कट्टरपणा ही सर्वच समाजात - श्रीलंकन, भारतीय ( पंजाबी, गुजराती, दक्षिणात्य ), पाकिस्तानी आणि बांगलादेशी समाजात पाहायला  मिळतो .आणि इस्लामिक मुलतत्ववादाला तर एक जागतिक परिमाण आहे आणि त्याचे प्रतिबिंब इथल्या कट्टर मुस्लिम समाजात प्रकर्षाने दिसते.

समस्या अनेक आहेत विशेषतः  होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण मागल्या काही वर्षात सर्वच भागात सर्वच समाजात वाढल्या असल्याचे आता दृष्य स्वरुपात जाणवू लागले आहे. बलात्कार, स्त्री भृणहत्या आणि आता लव जिहाद इतकंच नाहीतर हरवणाऱ्या, बेपत्ता होणाऱ्या मुलींमधील निम्म्याच्यावर मुली वेश्याव्यवसायात विकल्या जातात. पुढे त्यांचे काय होते हे तर पूर्ण वेगळंच प्रकरण ठरेल. प्रश्न नुसत्याच लव जिहाद चा नाहीच आहे समस्या अनेक आहेत आणि त्या धर्मांच्या वेष्टणाने झाकून चालणाऱ्या सुद्धा नाहीयेत. आजही आणि अजूनही भारतात ग्रामीण किंवा शहरी भागात आपापल्या जात पंचायती आणि समुदाय यांची अगदी घट्ट पकड लग्न आणि नातेसंबंधांवर आहे. त्यामुळे मुलगी किंवा बाई कुटुंब आणि त्या पलीकडे त्या त्या समुदायाची संपत्ती असेच समजले जाते. ज्यांनी कुणी या जाती -पातीच्या कुंपणापलीकडे जावून आपापले लग्न किंवा नात्याचे निर्णय घेतले त्यांना थोड्या फार प्रमाणावर समाजाचा रोष स्वीकारावाच लागतो, त्यांच्या कुटुंबीयांनातर अनेक काळ अनेक प्रकारचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष छळ सोसावे लागतात. जात, उपजात, पोटजात असे सर्व धर्मात आहेत आणि अगदी हिरीरीने आपापल्या समाजातल्या मुलींच्या फक्त रक्षणाच्या नावाखाली त्यांच्यावर पूर्ण लक्ष ठेवून असतात. समस्या धर्म, जातीपातीचा पण नाहीये. त्यातले नीतीनियम अक्षरशः स्त्रियांवर लादल्या जातात हा सुद्धा नाही आहे. प्रश्न स्त्रिया आणि मुलींच्या स्वातंत्र्याचा मुख्यत: निर्णय स्वातंत्र्याचा आहे. प्रश्न मुळातच पुरुषप्रधान संस्कृती आणि स्त्रियांना समुदायाची संपत्ती मानण्याचा आहे. स्त्री, मुलगी म्हणून ती स्वतः तिचे निर्णय घेऊ शकते, किंवा तसे करण्यासाठी तिने सक्षम व्हावे - ही मान्यता गेल्या ३०-३५ वर्षात मुख्यत: मध्यमवर्गीय, शिक्षित समाजात दिसून येत असली तरी अजूनही स्वतंत्रपणे आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य ही आपल्या धर्म आणि समुदायाच्या कक्षेतच कुंपणाच्या आत आणि जे कोणी या पलीकडे जाउन आपले जोडीदार निवडतात तिथेही नवऱ्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक रितीरिवाजांचा प्रभाव दैनदिन जीवनात स्त्रियांना स्वीकारावा लागतो. 

हो बदल हवेतच कठोर का होईना बदल हवेत समाजाच्या बदलत चाललेल्या धार्मिक संकल्पनेच्या बदलाखातर बदल हवेत. त्यासाठी आधी सर्वांचे एकमत होणे गरजेचे आहे. हे विचार काल्पनिक वाटत असले तरी निदान प्रयत्न करता येऊ शकतातच ना. जात धर्म, स्त्री पुरुष आणि अनेक भेदाभेद सोडून नको त्या गोष्टींचा नसता अभिमान सोडून राष्ट्रीयता राष्ट्रप्रेम जागृत होणे आता काळाची गरज आहे.    



(टीप : प्रस्तुत लेख दैनिक सकाळ च्या फास्टट्रॅक पानावर प्रकाशित झाला आहे )

Monday 11 August 2014

सोशल मिडीया आणि आमच्या अस्मिता !!


प्रत्येक तंत्रज्ञानाचा शोध हा गरजेतून लावला जातो. जगणे सोपे व्हावे हा खरा उद्देश. उर्जेची बचत, वेळेची बचत आणि कमी श्रमात अधिक कार्य या गरजा लक्षात घेता त्यासाठी लागणारी सोय म्हणून नवनवीन शोध लावले जातात आणि त्यानुसार नवनवीन तंत्रज्ञान आमच्या दिमतीला तयार होत असतात. आजचे युग म्हणजे 'सोशल मिडिया'चे युग. आजची पिढी या स्वप्नील विश्वात पुरती डुंबून गेली आहे. इलेक्ट्रॉनिक जगातली हि एक नवीच कम्युनिटी तयार झाली आहे. इथेंच सगळं जग आणि हेच आमचं जगणं असं काहीसं होऊन बसलं आहे. सोशल मीडियाच्या भिंतीत गाडून घेतोय आपण सर्व स्वतःला, न दिसणारा पिंजराच पण इतकं गुरफटले जातोय कि     आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाने वाहवत जातोय ह्याचं भानही उरलेलं नाही. मागल्या काही दिवसात जे काही घडलं, घडतंय ते पाहता खरतर काळजीपोटी भीतीच वाटू लागली आहे.

तळागाळाला गेलेलं राजकारण, दुषित होत चाललेलं समाजकारण आणि विकृत ध्येयानं वखवखलेला अन त्यासाठी कुठल्याही स्तराला जायला तयार असणारा, वैचारिक घाणीनं माखलेला एक विशिष्ट समाज. सोशल मीडियावर आपल्या वागण्याची, भाबड्या भावना, बिनबुडाच्या अस्मिता अश्या मूर्खपणाच्या वागण्याची दखल घेत असतो आणि आपण आहारी गेलो आहोत हे ताडून त्याचा फायदा उचलून राजकारणासाठी, कुठल्यातरी स्वार्थासाठी उपयोग करवून घेत असतो, आणि हे आपल्या गावीही नसते. सोशल मिडीयावर आपण व्यक्त केलेल्या भावना, हिरीरीने मांडलेले वाद विवाद , जाती-धर्म ह्यांचा आपल्याला वाटणारा सन्मान किंवा तिटकारा, कधी भाषेच्या कधी प्रांताच्या अचानक जागृत झालेल्या अस्मिता, अन्यायाची अत्याचाराची चीड जे जे काही विचार आपण आत्मीयतेने लिहितो आणि तळमळीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगासमोर मांडतो त्याच आपल्या भावनांचा, त्यातून उद्भवणाऱ्या संवेदनांचा, बौद्धिक विचारांचा हि कारस्थानी लोकं सोयीस्करपणे उपयोग करवून घेतात. आपण कुठेतरी कुणाच्या तरी दुष्ट कार्यात नकळत वापरले जातो आहोत ह्याची जाणीव होते तोपर्यंत आपण परिणाम भोगून पुरते पोळून निघालेलो असतो.


गेले कित्तेक दिवस सोशल मीडियावर आपल्या भावनांचा बाजार मंडल जातोय. जात-धर्माच्या अस्मिता  अधिक चिवट करण्याचा प्रयत्न होतो आहे. भाषा, प्रांताच्या, परंपरा, अध्यात्माच्या बिनबुडाच्या चर्चा इथे रंगतात. देशप्रेमाच्या बिनकृतीच्या पताका लहारावल्या जातात एवढेच नाही तर राजकारणातल्या आपल्या मतांचे-विचारांचे प्रदर्शन चव्हाट्यावर मांडले जाते. पडद्यामागचा करता करविता फक्त दोऱ्या हलवत असतो आपण कठपुतळ्या ठरतो, व्यक्त होत होतच अभिव्यक्ती हक्काचे आंदोलनं छेडतो....   नक्की काय चालू आहे हे? आणि कशासाठी ? का करतोय आपण हे सगळं, नेमकं काय साध्य करू इच्छित आहोत? आपल्याच परंपरा आणि आपल्याच पुराण पुरुषांना, ऐतिहासिक महात्म्यांना आपल्याच संस्कारांना आणि संस्कृतीला संपूर्ण जगासमोर आपणच चुकीचं सिद्ध करायचं म्हणजे आपण फार बुद्धिवादी किंवा विचारवंत सिद्ध होऊ असं काही वाटत असेल काय ह्या नव्याच जन्मू घातलेल्या 'कम्युनिटी'ला… पण मग स्वतःला बुद्धिवादी सिद्ध करतांना स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेऊन मुर्खच तर सिद्ध होताहोत ना आपण ….


आमच्या महान पुरुषांच्या पुतळ्याचा तुकडा पडला अशी पोस्ट वाचली कि आमचे राष्ट्रप्रेम उफाळून येते, शतकांपासून आमच्या प्रेरणास्थान ठरलेल्या राष्ट्र सुधारकांच्या विचारांवर कुणीतरी बोट उचलतं आणि आम्ही तुटून पडतो. आमचे हृदयस्थानं, प्रेरणास्थळं आमच्या भक्ती-भावना-अस्मिता, श्रद्धा इतक्या तकलादू आहेत कि जरा कोणी बोट लावावे, फुंकर घालावी आणि त्या डळमळीत व्हाव्या? अशा गोष्टीने महानता कमी   होण्याइतके आमचे महापुरुषं खुजे नसतात, खरतर खुजे असतात ते अंध अनुयायी, त्यांचा विश्वास. त्यांच्या या अशा अंधश्रद्धाळू डगमगत्या विचारांमुळेच त्यांना हवे तसे वापरून घेणे सोपे असते, आगीची एक चिंगारी आमच्या आतला संतापाचा भडका जागृत करण्यास पुरेसा ठरतो. याचाच गैरफायदा समाजकंटक घेतात. कुणीतरी कसल्याश्या हेतूने जळकी काडी लावून देतो आणि आम्ही धार्मिक तिढे, दंगलीचे प्रयत्न, बस फोडणे, जाळ -पोळ करत सुटतो. आत्ता आत्ता तर याही पुढे जाऊन पुण्यात कुठल्याश्या “हिंदूसेनेकडून” एका मुस्लिम तरूणाची मारहाण करून हत्या केल्याची बातमी आली. सगळंच विषण्ण आणि सुन्न करणारं. खरंच आपल्याकडे दुसरे मार्ग नाहीत काय ? न्यायाच्या किंवा नैतिकतेच्या मार्गाने प्रश्न सोडवताच येणार नाहीयेत काय ? प्रत्येकवेळी दंडुक किंवा तलवारी घेऊनच बाहेर पडायला हवं? आणि असं करण्याने प्रश्न सुटताहेत कि अधिक वाढत जाताहेत, हे न समजण्याइतपत भाबडे झालोत का आपण? ज्याने धुराळा उडवून दिला असतो तो घरात गारव्यात बसलेला असतो आणि आपण त्याच्या अंगुलीनिर्देशावर नकळत आपल्याच आयुष्याची अशी धूळधाण करायला बेतलेले असतो. पुण्यातल्या तरूणाच्या मृत्यूनंतर १४ मुलांना अटक झालेली. चौदाही मुलांच्या नावावर क्रिमिनल रेकॉर्ड चढले. यापुढे नोकरी मिळवताना, शिक्षण घेताना, व्यवसायासाठी कर्ज घेताना प्रत्येक पावलाला हे क्रिमिनल रेकॉर्ड नावाला चिकटणार. यदाकदाचित शिक्षा झालीच तर आयुष्यचं संपलं. आणि खरतर अश्या गुन्ह्यांना शिक्षा तर व्हायलाच हवी.


असा हा उन्मादक उत्साह आपण आपल्या खऱ्या जीवनात चांगल्या कामासाठी का दाखवत नाही? काहीतरी नष्ट करण्यापेक्षा निर्मितीसाठी. तोडण्यापेक्षा जुळवण्यासाठी किंवा स्वतःच्याच उन्नतीसाठी. सोशल मिडिया म्हणजे काही आयुष्य नव्हे तिथे घडलेल्या घडामोडी म्हणजे खरे जीवन नव्हे ते नुसतेच चर्वितचर्वण आहे. इथल्या चर्चांनी आयुष्य सावरत नाही इथल्या स्टेटसने पोट भरत नाही. आपल्या आयुष्याची राखरांगोळी अश्या फुटकळ माध्यमामुळे होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.


आज संपूर्ण जगभरात १25 कोटी युजर्स फेसबुकवर आहेत. ह्यापैकी बराच मोठा आकडा भारताच्या खात्यात आहे. पण भारतातले जवळ जवळ १५ % अकाउंट फसवे आहेत फेक अकौंटचे सर्वात जास्त युजर्स भारतात आहेत असे एका सर्वेक्षणात म्हंटले गेले आहे. गैरप्रकार करण्यासाठी आणि गैरफायदा घेण्यासाठीच अशी दुय्यम खाती उघडली जातात यात दुमत नाही. सोशल मिडीयाच्या आहारी गेलेली आजची तरुण पिढी यांचे भक्ष ठरते आणि वास्तविक आयुष्य आणि भासमान जगातला फरक विसरणारी हि विशिष्ट कम्युनिटी यात बळी पडते. जाणकारांच्या मते सोशल मिडीयाचा गैरवापर हि एक वाईट प्रवृत्ती आहे ती ओळखून समजून प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे आहे.

Thursday 31 July 2014

स्केटिंग वरून विश्वविक्रमी झेप !!

















" आज कुछ तुफानी करते है " किंवा मग "डर के आगे जीत है " तसे पाहिले तर नुसत्या जाहिराती; पण अगदी शब्दशः असे वागणारे आणि विक्रमी दौड मारणारे आपल्यातच कुठेतरी दडलेले असतात...गरज असते नजर उचलून बघण्याची....हल्लीच नागपूरच्या इंडियन स्केटिंग अकादमीच्या २३ चम्पिअन्सने पायाला चाक बांधून म्हणजेच स्केटिंग वरून कन्याकुमारी ते नागपूर प्रत्यक्षात २००० किलोमीटरचा प्रवास पार पाडला....केवळ अकरा दिवसात हा प्रवास यशस्वीपणे पार पाडणाऱ्या या चमूच्या विक्रमाची नोंद आता जागतिक स्तरावरील 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' आणि 'इंडिया बुक' मध्ये करण्यात येणार आहे....

विश्वविक्रम घडवून आणणाऱ्या या विक्रमवीरांचा साहसी प्रवास कसा घडला..कोणकोणत्या टप्प्यातून...कोणत्या संकटातून यांना तावून सुलाखून निघावं लागलं, कश्या स्वरूपाच्या अडचणींना तोंड द्याव लागलं याचाच आढावा घ्यायला मी या चमुंना भेटले..यांना भेटणे म्हणजे खरच एक पर्वणी होती. वय वर्ष ११ ते २५ वयोगटातली हि मंडळी त्यांचे अनुभव मांडतांना प्रचंड उत्साही होते...त्यांचे थरारक अनुभव त्यांच्याच भारावून जाणारया शब्दात ऐकणे सुद्धा जणू थरारच होता जो मी अनुभवत होते ...अनेक घटना मन हादरवून टाकणाऱ्या मेंदू सुन्न करणाऱ्या...काही दुखद तर काही आनंदून सोडणाऱ्या...या प्रवासात या मुलांचे किरकोळ अपघात झाले, शारीरिक इजा झाल्यात, मानसिक दडपण आले, अनेक संकट आ वासून उभे होते...या सर्वांतून यांना पार जाव लागलं पण कौतुकाची बाब म्हणजे हि मुल कुठल्याच क्षणी खचली नाहीत...आताही त्यांच्या बोलण्यात त्यांनी केलेल्या साहसी कृत्याच्या अभिमानाची झळक जाणवत नव्हती तर जाणवत होता तो त्यांचा ओथम्बुन वाहणारा आनंद....

या विक्रमी मोहिमेचे सूत्रधार होते इंडियन स्केटिंग अकादमीचे कोच श्री गजेंद्र बनसोड..गजेंद्र बनसोड हे मागल्या अनेक वर्षांपासून मुलांना स्केटिंग चे नवनवे टेक्निक शिकवण्यात गुंतले आहेत..या मुलांसोबत मिळून काहीतरी नवीन करून दाखवण्याचे अनेक प्रयत्न त्यांनी या आधी सुद्धा केले आहेत..पण यावेळी काहीतरी 'धाडसी' अविश्वसनीय अस करून दाखवायचं यांच्या मनात होतं आणि 'चाह है तो राह है' या उक्ती नुसार मार्ग सापडत गेले...कुठल्याश्या एका प्रसंगात नागपूर महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्री दयाशंकर तिवारी यांचेशी भेट झाली...योगायोगाने स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंती निमित्त्य काहीतरी वेगळे करायचे मानस यांच्या मनात देखील होते..तसे त्यांनी बोलून दाखवले...स्वामी विवेकानंदाची समाधीस्थळ असणारे कन्याकुमारी या पवित्र स्थळापासून ते आपल्या नागपूर पर्यंतचा प्रवास स्केटिंग वरून करायचा अशी कल्पना गजेंद्र बनसोड यांनी मांडली आणि संपूर्ण कार्यक्रमाची जवाबदारी स्वीकारून दयाशंकर तिवारी आणि त्यांची टीम संपूर्ण तयारीनिशी सोबतीला उभे राहिले...

ते क्षण आठवून गजेंद्र बनसोड म्हणतात "हे सगळं जुळून आल तो क्षण आनंदाचा होता पण हरकून जाऊन चालणार नव्हतं..आणखी बरीच काम होती बरेच चालेन्जेस होते, लोकांचे टोमणे सुरु झाले होते..कुणालाही या मोहिमेच्या यशस्वीतेवर विश्वास नव्हता..मला अनेकांनी मुर्खात काढले..पण मला हे चाल्लेंज स्वीकारून यशस्वी करूनच दाखवायचे होते आणि त्यासाठी कुठल्याही अग्निदिव्याला सामोरे जावे लागले असते तरी आता मी त्याला तयार होतो" मग सुरु झाली रोज १५० ते २०० किलोमीटर ची प्रवासी प्रक्टिस...मुलांची स्ट्रेन्थ वाढावी म्हणून पालकांचे प्रयत्न सुद्धा सुरु होतेच...प्रक्टिस बरोबरच काही मुख्य जबाबदारया सुद्धा पारखून घ्यायच्या होत्या त्यासाठी म्हणून मग दयाशंकर तिवारी गजेंद्र बनसोड आणि काही पालकांची एक चमू मार्ग निश्चिती, थांबे, जेवणाची सोय, संरक्षणाची माध्यमे, परवानगी या सर्व तयारी करण्यास कन्याकुमारीला जाउन आले...मनाशी खुणगाठ पक्की असल्याने आता सर्व अडचणींना दूर सारून सगळ निट ठरलं होतं...पण अजूनही एक मुख्य अडचण होती ती म्हणजे पालकांचा विश्वास संपादन आणि या मोहिमेशी जुळलेल्या त्या साहसी बहाद्दूर मुलांचे मनोबल खचू न देणे...हे प्रयत्न पूर्वक करत राहावे लागले...त्यातही एका खेळाडूचा या दरम्यान अपघात झाला त्याच्या हाताला इजा झाली आणि त्याचे येणे टळले..अश्याही प्रतिकूल परिस्थितीमधून इतर मुलांना मानसिक स्थैर्य देत मोहिमेसाठी तयार केले गेले....

शेवटी तो दिवस उगवला...२३ विक्रमवीर, श्री दयाशंकर तिवारी आणि त्यांची टीम, पालकव्रुंद, डॉक्टर्स आणि कॅटरिंग असा एकूण ५५ जणांचा ताफा बाय रोड कन्याकुमारीला पोचला...संरक्षणाच्या दृष्टीने मुलांबरोबर प्रवास करता यावा म्हणून काही पालकांच्या दुचाकी गाड्या ट्रान्सपोर्ट ने पुढे पाठवण्यात आल्या होत्या...एक तारखेला पोचून रात्रभर्याच्या विश्रांती नंतर लगेच दुसरे दिवशी म्हणजे दिनांक २ जानेवारी २०१3 रोजी सकाळी ८ वाजता कन्याकुमारीच्या (तामिळनाडू) मंदिरासमोरून आमदारांनी हिरवी झेंडी देताच विश्वविक्रमाच्या दिशेने पहिले पाउल टाकत वैदर्भीय झेंडा रोवण्यास उत्सुक होत सुरुवात झाली....पहिल्या दिवसाचा अनुभव सांगतांना स्वप्नील समर्थ हरखून जात सांगतो.."पहिल्या दिवशी कशाचाही अंदाज नव्हता..कुठलीही पर्वा न करता स्केटिंग करत पुढे जात राहायचं एवढच आमच्या ध्यानात होतं..५०किलोमीटर चा पहिला पाडाव पार झाल्यावर आमच्या लक्षात आले समुद्रसपाटीच्या तप्त उन्हाची सवय नसल्यामुळे सगळ्याच स्केटर ची हाता पायाची कातडी चक्क सोलून निघाली होती....चेहेरे काळवंडले होते,आणि अतिशय वेदना सहन करायला लागल्या होत्या पण त्यावरही खचून न जाता आम्ही सोल्युशन शोधले आणि पुढे निघालो"

या विक्रमवीरांच्या चमूत प्रणय, सौरभ, चैतन्य हे ११-१२ वर्ष वयाचे चिमुकले होते आणि वैष्णवी देवल नावाची एकमेव मुलगी ती सुद्धा १२ वर्षाची..हि लहान मंडळी असूनही यांचे मनोबल मात्र वाखण्याजोगे होते...गोल्ड मेडलीस्ट आकाश साठवणे सांगतो "प्रवासात प्रचंड गरम वारा होता विरुध्द दिशेने वाहणारा, मागे ओढणारा, गती वाढू देण्यास अडसर निर्माण करणारा पण आमच्या सर्वांचाच उत्साह या सर्वांना पुरून उरणारा होता" पालकही सांगू लागले..या प्रवासात बरीच लोकं भेटलीत..कित्येक गावातून, शहरांमधून, राज्यांतून प्रवास अविरत चालूच होता..लोक स्तिमित होऊन बघत होते, मदतीला म्हणून विचारात होते, त्यांचा आनंद बघण्यासारखा असायचा..कोणी गाड्यांवर उभे राहून फोटो शूट करायचे तर कोणी घरापर्यंत चला म्हणून आग्रह धरायचे..एका ठिकाणी एका उत्साही व्यक्तीने तर चक्क या धावत्या मुलांना नोटा वाटल्या.. चारुदत्त आणि लालसिंग म्हणाले "वेगवेगळ्या राज्यातून प्रवास घडतांना देखील आम्हाला कधीही भाषेचा अडसर जाणवला नाही भेटणाऱ्या सगळ्यांच्या भावना इतक्या उत्कट होत्या कि हृदयापासून हृदयापर्यंत आपसूक पोचत होते"

काही अनुभव तर अनाकलनीय आहेत हेद्राबाद मध्ये प्रवेश झाला आणि लक्षात आले कि भडकावू भाषण प्रकरणात अकबरुद्दिन ओवैसी यांना अटक करण्यात आली होती आणि म्हणून त्या संपूर्ण परिसरात तणाव होता पोलिस बंदोबस्त, दंगे, जाळपोळ आणि बरेच काही..याच वेळेस निर्मल येथून प्रवास करायचा होता सगळेच चिंतेने ग्रासले होते...काहीही अपरिमित घडू नये म्हणून काळजीत पडले होते पण स्केटर्स येताच साऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले, सगळीकडे आनंद पसरला आणि क्षणात तणावपूर्ण वातावरण निवळले गेले... याक्षणात जाती-धर्म असे बिनबुडाचे भेदच संपले होते.

प्रत्येक गाव शहराच्या सीमेवर यांचे स्वागत केले गेले यांना अक्षरशः डोक्यावर घेतले भरभरून प्रेम यांच्या झोळीत टाकत गेले..आणि म्हणूनच पुढच्या प्रवासासाठीची उर्जा आपसूकच साठत गेली...या स्केटर्स बरोबर पालकांच्या दुचाकी पण प्रवास करत होत्या..दुसर्या बाजूने पाहिले तर या पालकांनी सुद्धा दुचाकीने २००० किलोमीटरचा प्रवासी विक्रमच पार पाडला आहे..सोबत काही स्त्री-पालक त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार सर्वांच्याच काळजीत मग्न होत्या मुलांना एनर्जी ड्रिंक बनवून दे तर त्यांच्या जखमांवर मलम पट्टी करू दे त्यासाठी सतत सज्ज राहिल्या..... मोठ्या मुलांनी लहानांची काळजी घेतली तर लहानांनी मोठ्यांना प्रेमाचा आधार दिला या सर्वांतून एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं तेच खरतर लाख मोलाचं आहे....नागपूर महानगर पालिकेने या कामी दिलेले सहकार्य तर विसरता येण्या जोगेच नाही.....

अश्यापद्धतीने २ जानेवारी ते ११ जानेवारी असा दहा दिवसांचा हा चाकांवरचा विश्वविक्रमी प्रवास फुलांच्या वर्षावात, रंगीत प्रकाशाच्या झोतात आणि नागपूर करांच्या प्रेमळ सहवासात गांधीबागेत येउन यशस्वीपणे पूर्ण झाला....त्यानंतर अनेक सत्कार, अवार्ड, बक्षिसं आणि विक्रमाच्या नोंदी होत राहिले पुढेही होत राहतील पण प्रवासा दरम्यान घेतलेले अनुभव, लुटलेला आनंद, आणि विविध प्रांतीय विविध भाषिक लोकांशी जुळलेले बंध अनमोल आहेत आणि हृदयाच्या कुपीत सदैव जपून ठेवले जातील. असे भारलेले वाक्य शेवटच्या क्षणी सर्वच पालक आणि खेळाडूंनी काढले...

संपूर्ण भारतात अजूनही एवढ्या धाडसाची विश्वविक्रमी मोहीम राबव्ण्यासाठीचे प्रयत्न कोणीही केलेले नव्हते गजेंद्र बनसोड यांनी हे पहिले पाउल उचलले आणि असा हा साहसी विक्रम वैदर्भीय गुणाच्या आपल्या नागपुरी मुलांनी करून दाखवला...यांची शारीरिक- मानसिक तयारी करवून घेणारे यांचे कोच, त्यांचे मनोबल जपणारे आणि त्यांच्या पाठी उभे असणारे त्यांचे पालक आणि यांच्यावर विश्वास दाखवून त्यांचे गुण ओळखून त्यांना सहकार्य देणारी नागपूर महानगर पालिका आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व साहसी विक्रमवीर या सर्वांचेच आपणा सर्वांच्या वतीने कौतुक मिश्रित अभिनंदन .....








सहभागी खेळाडू :-
१) स्वप्नील समर्थ २) आकाश साठवणे ३) चारुदत्त बांते ४) महेश लोणारे ५) वैष्णवी देवल
६) अमित इंगळे ७) लालसिंग यादव ८) प्रणय अहेर ९)सौरभ दवे १०) नितीश कुमार ११) पवन दंदे
१२) परेश भांडारकर १३) राहुल निखारे १४) सागर चावडे १५) परेश चौहान १६) आदित्य परमार
१७) दिपक चौहान १८) धीरज चावडे १९) विशाल बांगरे २०) चैतन्य देशमुख २१) सैयद असलम अली
२२) क्रिष्णा राठे







(वरील बातमी दैनिक सकाळच्या युवा पानावर प्रकाशित झाली आहे )






Friday 18 July 2014

आत्मपरीक्षण



खरतर आता म्हणता येईल काळ खूप पुढे गेलाय.… पुढे??…. कि दूर?
सामाजिक अडचणी समस्या कधी नव्हत्या हो? होत्याच ...पूर्वीही होत्या आजही आहेत, पण समस्येकडे पाहण्याचे दृष्टीकोन आणि समस्यांना तोंड देण्याच्या आपल्या पद्धती प्रचंड बदलल्यात. खरतर समस्यांची वर्गवारी करण्यातच आपण चुकतोय कुठेतरी. शिक्षणाची टक्केवारी भलेही वाढत जात असेल परंतु आमची बुद्धिवादी समजूतदारीची संकल्पना फारच संकुचित होत चालली आहे. जाणीव बोथट होत चाललेल्या आहेत. आपल्याला जगण्यासाठी काय महत्वाचे आहे हे अजूनही आम्हाला कळलेले नाही. आम्हाला काय हवंय हे आम्हाला माहितीच नाही. पिढ्यान पिढ्या धर्म, जाती, श्रद्धा आणि त्यातून फोफावणारा विसंगतवाद या काही गोष्टी एका बोचक्यात बांधून बिंबवण्यात आल्या मनावर आणि आम्ही सुद्धा ते बोचकं आमच्या शेंड्याला बांधून घासत ओढत चालत आहोत. आमच्या आदल्या पिढीने ते आमच्या शेंड्याला बांधले आम्ही पुढच्या पिढीच्या शेंड्याला बांधू. पण आमच्या मागच्या पिढीचे अन आमच्या पिढीचे तरी काय बर भलं झालय यातून हे थांबून विचार करण्याची सद्सद विवेक बुद्धी ना आधी होती न आज अजून कुणाला सुचलेली आहे.

'धर्म' हा एकच शब्द अनेकांचे मुडदे पाडण्यास भारी. तथाकथित सनातनी असू दे नाहीतर 'सेक्युलरिज्म' ची टिमकी वाजवणारे सांप्रदायिक बुरखाधारी... दोघांचाही हेतू एकच धर्माच्या नावावर वाटण्या.....
आणि आम्ही काय करतो?
आम्ही वाटले जातो, कापले जातो, छाटले-जाळले जातो आणि मग आमच्या मुडद्यांचे पण धार्मिक राजकारण केले जाते. आशचर्य तर हे आहे कि हे आपण बेमालूम पने होऊ देत असतो. करणारही काय म्हणा यामागेही दडपलेली काही कारणे आहेच…. महत्वाची कारणे
धर्माला .. किंबहूना दंभिकतेला मिळालेली राजकीय प्रतिष्ठा


- कायद्याची भीती नसणे
- समाजातली उदासीनता

या पूर्वीही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारे समाज सुधारक घडलेच कि, त्यांना विरोधही व्हायचा दगड मारले जायचे, चिखलफेक व्हायचा पण विरोध खचितच गोळ्या झाडून व्हायचा आज स्वतःला सुशिक्षित बुद्धिवादी समजणारा समाज वैचारिक विरोधासाठी यांची वैचारिक क्षमता किंवा बुद्धिमत्ता इतकी कमी पडावी कि त्यासाठी हत्यारांचा आसरा घ्यावा लागावा आणि वरून धर्माच्या नावाने उदोउदो…. अहो कोणत्या धर्माची शिकवण आहे हि? कोणता धर्म जीव घेऊन धर्म निभवा असे शिकवतो?
म्हणजेच न आम्ही धड आमचा धर्म पाळू शकतोय ना माणुसकी… मग कशासाठी आलोय आपण इथे?

थोडं थांबून विचार करूया …. आपण काय करतोय?
आपल्या आई बहिणींची अब्रू गाजर उचलून खावे इतकी स्वस्थ झाली आहे
रोजच्या आवश्यक जीवनाला लागणाऱ्या आपल्या मुलभुत गरजा मात्र आवाक्याबाहेर महाग... आणि आपण अजूनही गप्प बसलो आहोत.
आमच्या मतांसाठी आम्हालाच वेठीस धरले जाते आमचे राजकारण खेळले जाते … आम्ही गप्प.
आमचे हवे तसे वैचारिक मागासीकरण केले जाते किंवा सहेतुक त्यापासून दूर ठेवले जाते … आम्ही स्वतःस सुशिक्षित म्हणवून घेणारे मुग गिळून गप्प च असतो.
आमच्या कष्टाच्या पैशांचे काळ्यात विलीनीकरण होते, भ्रष्टाचार होतो आम्ही थंड
आमचे देश बांधव सीमेवर बळी पडतात …. आणि आम्ही …

आणि मग कधीतरी अचानक धर्माच्या नावावर कोणीतरी एखादे वाक्य बोलून जातात आणि सुन्न पडलेल्या आमच्या सर्व जाणीवा, इतर वेळी झोपलेला आत्मसन्मान, वैचारिक अभिमान खडखडून जागा होतो.

हो … धर्माचा नशाच काही और असतो … नाही?.

कुणाच्या उपाशी पोटापेक्षाही गरजेचा , जीवापेक्षाही महान, एखाद्याच्या दुखापेक्षाही मोठा.

आमच्या पानातली भाकरी ओढणार्याला आम्ही माफ करतो, आमच्या पोरींची अब्रू लुटणाऱ्या नराधमांसाठी फक्त शाब्दिक मार पण आमच्या धर्मावर केवळ बोट ठेवला तो संपला ….

काय हवंय आपल्याला? कशासाठी आलोय आपण इथे? आपल्या खर्या गरजा खर्या मागण्या काय आहे, एकदा या सर्वांवर पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे….आत्मपरीक्षण …बुद्धीला मनाला पटत नाही ते नाही करणार हा एक संकल्प घेऊया … मी,माझं नि माझ्यासाठी ही वृत्ती जरा दूर सारुया. धर्मांधतेच्या खोल अंधारातून अलगद बाहेर पडून आपल्या खऱ्या गरजांसाठी तेवढ्याच पोटतिडकीने लढता येईल का? थोडा प्रयत्न तरी करूया.... स्वतःसाठी नाही तर निदान आपल्या पुढल्या पिढीसाठी तरी सुधारणेला जरा वाव ठेऊया, पटतंय का बघा








Wednesday 16 July 2014

पाऊस मन ..

खरं सांगू पाऊस मला नको नको वाटतो
तुझी आठवण होऊन पुन्हा डोळ्यामध्ये दाटतो
पावसाचं हे असंच असतं तुझ्यासारखाच वागतो
दिवसा स्वप्नी रमतो आणि रात्र रात्र जागतो.. 

पाऊस पाऊस होतं मन, झिरपत राहतो डोळ्यातून
आतून भिजलं असलं तरी, चेहेऱ्यावरती कोवळं उन
जुन्या काही सरी होत्या मनात आभाळ भरून
वाहता वाहता वाहून गेल्या, गेले दिवस सरून

पुन्हा फिरून उजाडतं डोळे होतात कोरडे ठाण
ओल्या सुक्या वेलीवरचं गळतं पुन्हा एकच पान
ओठातल्या शब्दांनाही मिळत नाही तुझे कान
पाऊस पाऊस म्हणत म्हणत, सुकत जातं सारं रान

खरं सांगू पाऊस मला आता भिजवत नाही
चांदण ओले स्पर्श सुद्धा रात्री निजवत नाही
गंध भरल्या फुलांनीही हृदय उमलत नाही
पावसा तू नकोच येऊ, तुझं येण सोसवत नाही

तुझं येणं सोसवत नाही !!!

नर आणि मादी नाही त्यापलीकडचा माणूस घडवूया...!!!



स्त्रियांच्या अनुषंगाने पाहिले तर सध्या सामाजिक वातावरण अतिशय गढूळ झालेले दिसत आहे...नुसते बघत राहून बदलाची अपेक्षा करत बसने; परिस्थिती सध्या यापलीकडे वळसा घालून पोचलेली आहे. आता बदल अनिर्वार्य आहे यापुढे एकतर आपण आपल्या आवडीचा मार्ग बदल म्हणून निवडायचा आहे किंवा परिस्थिती तिच्या अनुषंगाने आपल्याला बदलायला भाग पाडेल.... अजूनही वेळ आहे, अजूनही जरुरी नाही परिस्थितीच्या ओघानेच वाहवत गेले पाहिजे. दुसरा कुठला तरी जास्त चांगला आणि सामाजिक परिस्थितीला पोषक असा ऑप्शन असेल तर कठीण आणि दूरचा असला तरी आवर्जून तो मार्ग निवडायला हवा. प्रत्येकवेळी आपल्या पुरता सोपा मार्ग तात्पुरता सोयीचा असू शकतो पण पुढे हीच सोय मोठ्या प्रमाणात गैरसोय घेऊन येईल आणि मग परत परिस्थितीचा पालट आपल्यालाच परवडणारा राहणार नाही.....


मला अजूनही आठवतं ....वर्षभरापूर्वी मुंबईला लोकल ने प्रवास करतांना एक गोड चिमुकली तिच्या आई कडे गजरा हवा म्हणून हट्ट करत होती. तसे तिच्या आईने डोळे वटारले. पुढे पैंजण,ब्रेसलेट विकणारी आली तशी चीमुक्लीची वळवळ परत सुरु झाली हे सर्व बघून मी जरा हसले तशी तिची आई सांगू लागली ...पहा ना कॉन्वेंट मधे मुलीना बांगड़या, गजरे, मेंदी, पैंजण अलाऊ करत नाहित, कानातलेपण अगदि छोटेसे सोन्याचे चालतात....सोन्याचे कानातले 2,3 वेळा कोणीतरी काढुन घेतले...कोणावरही विश्वास ठेवावा वाटत नाही अगदी पाळणाघरातल्या लोकांवर पण नाही,.तिला कामवालीने स्कूलबस मध्ये बसवले की कामवालीला लगेच मला ऑफिस ला फोन करुन सांगायला लावते,,मुलीला मी अजिबात न लाजता आपलं शरीर, पुरुषांच्या नजरा, लोकांचे अनावश्यक स्पर्श, गैरफायदा कसा घेतला जाऊ शकतो सारं सांगितलंय, शाळेचा शिपाई, बस चा ड्राइवर, आजुबाजुचे दादा, चाँकलेट देणारे काका … सारं सारं समजावलं !. एक सांगु.. अगदि तिला एकटं असतांना मी तीच्या वडिलांसोबत सुद्धा एकटं सोडत नाही .माणसाच्या मनाचा काय भरोसा? भीती वाटते सारखी, तिला दिवसभर मी नसते म्हणुन कराटे क्लास, डान्स क्लास, स्केटिंग, स्विमिंग अश्या ठिकाणी बिझी ठेवते. कामावरुन येऊन मी तासभर तिच्यासोबत खेळतें,! मुलीची जात आहे जपलं पाहिजे ! हल्ली खुप काळजी वाटते" एवढ़यात तिचं स्टेशन आलं आणि ती उतरली.....ट्रेन धावू लागली आणि माझे विचारचक्र सुद्धा गती घेऊ लागले..चिमुकलीचा तो निरागस चेहेरा डोळ्यासमोरून हलत नव्हता ..किती कठीण आहे हे सगळं. मलाच कळेना काय करावं. त्या मुलीला जपणाऱया आईचं कौतुक करावं की त्या झाकोळलेल्या कळीची दया करावी.... या 8 वर्षाच्या अपुऱया वयात आपल्याच लोकांबद्दल, आजू-बाजूच्या परिसराबद्दल पर्यायाने जगाबद्दल किती अविश्वास पेरला जातोयं! त्या चिमुकल्या वयात खेळायला- बागडायला संपूर्ण अवकाश मोकळं असायला हवं खरतर ...सगळीकडून लाड होणारे वय, कुठेही जगाचे हेवे-दावे न समजणारे वय...शंका, भीती, चूक-अचूक कसलाही नामशेष मनात राहायला जागा आहेच कुठे या चीटूकल्या मनात ...आणि सामाजिक वातावरण गढूळ झालंय यात त्या निरागस जीवाचा काय दोष?

पण... पोरीसाठी जीव तुटणाऱ्या त्या आईचा तरी काय दोष??

मुलीची अब्रू हि तिच्या शरीराच्या एका छोट्या भागावर अवलंबून आहे असे मानणारा आपला समाज...आणि जन्मभर त्याचीच काळजी करत सुटलेला पण त्या शरीरात असलेल्या मनाचं काय? शरीर स्पर्शाने बाटले तरी मनावर जन्म भरयाचा परिणाम होणारच असतो.....फक्त 'स्पर्शामुळे' नाही तर हि समाजमान्य बाब नाही आता समाज काय म्हणेल आपल्याला हिनवेल या भीतीपोटी पण शरीराला स्पर्श होऊ नये म्हणून त्यासाठी जपणूक होतांनाही मनावर परिणाम होत आहेच ना...क्षणाक्षणाला ते तुटते आहे, दुखते आहे, मोकळं राहायला आनंदी राहायला झुरते आहेच ना??..... ...मग परिस्थिती गढूळ झालीय म्हणून एका निश्चल-निष्पाप जीवाला कोंडून ठेवणे, दाबून ठेवणे हा उपाय आहे काय?...कोणीतरी बाहेर मुलीच्या मनाचे तुकडे करू नये म्हणून आपणच तिच्या मनाला वेगळ्या मार्गाने मारत नाहीयोत का?? आणि हे सर्व अगदी जन्मापासून ..का तर मुलगी आहे म्हणून....हा मार्ग आपण का स्वीकारला?? या समस्येच्या उत्तरादाखल दुसरे कोणतेच ऑप्शन दुसरे मार्ग नाहीच आहेत का ?? कि आपल्यालाच हा मार्ग जास्त सोयीचा वाटतो?


समस्या अनेक आहेत, तसे आपल्या मनात साठलेले प्रश्न देखील अनेक आहेत....पण नुसते प्रश्न उपस्थित करून कसे चालेल...प्रश्न निर्माण झाला आहे तर उत्तर शोधायलाच हवे...प्रत्येक पिढी सामोरचे प्रश्न वेगळे असतात आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती सुद्धा वेगवेगळी ...शेजारच्या घरी मुलगी दुखावली किंवा शेजारच्या मुलाने कुणाची तरी मुलगी दुखावली तर 'मला काय त्याचे' हे कुठल्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही किंवा स्वयंकेंद्री झाल्याने लागलेल्या आगेतून आपण आपले घर बचावले एवढीच भावना उपयोगाची नाही आग पसरणार असेल तर त्याची झळ तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत पोचणारच....आसपासच्या घटनांचे आपल्यापासून अलिप्त राहणे सुद्धा आपल्याला झेपणारे नाही...तेव्हा वेळीच जागे झालेले बरे...प्रश्नांची उत्तर शोधायला किंवा पर्याय म्हणून तरी एक नवी पिढी उभी करायला हवी आणि जशी प्रत्येक स्त्री एक संसार उभा करते तसे तिने पोषक समाज घडवून आणायला हाथभार लावायला हवा ....प्रत्येक घरात शिवाजी जन्माला यावा अस वाटत असेल तर प्रत्येक आईला आधी जिजाऊ म्हणून जन्म घ्यावा लागेल...


स्त्री हि जन्मदात्री आहे. जन्मदात्री म्हणजे नर किंवा मादी जन्म देणारी नाही, तर नर किंवा मादीच्या माध्यमातून 'माणूस' जन्माला घालणारी. संस्काराचं बीज पेरून पोषक, समंजस पिढी घडवणारी....स्त्री ने मनाशी ठरवले तर काय नाही होणार ? पदराला गाठ बांधून पदर खोचून तयार होन्याचीच काय ती वाट आहे.......मुलगी मुलगा भेद न करता एकमेकांबद्दल आदर, बाहेरील शारीरिक आवरण बघून आकर्षित होऊ नका तर त्या आवरणाच्या आतल्या खर्या माणुसरुपी मनाला आकर्षित व्हा, त्यावर प्रेम करा हि पहिली शिकवण आपण आपल्या घरून मुलांना देऊया ...मुलीकडे 'वासना' या दृष्टीकोनाने बघणाऱ्या आपल्या पुढल्या पिढीतला 'पुरुषी दृष्टीकोन' चेंज करायचा पूर्ण प्रयत्न करूया एवढेच नाही तर मुलगा हा निव्वळ बलात्कारी किंवा दृष्ट असतो असेही नाही त्याच्या हृदयात देखील बापासारखे आणि भावासारखे निर्मळ एक मन असते हे मुलींना समजून सांगूया...उद्याच्या तरुण पिढीच्या प्रेम आणि मैत्रीच्या व्याख्या बदलण्यास मदत करूया. शरीराच्या पलीकडे मन जुळणे आणि नाती टिकवणे हाच खरा सौख्याचा गाभा आहे हे या पिढीत ठासून भविष्यासाठी पेरणी करता येईल असे काहीतरी करून दाखवण्याची वेळ आता आलेली आहे .....चला सख्यांनो नर आणि मादी नाही त्यापलीकडचा माणूस घडवूया...



स्त्री प्रवास .... एक अनुत्तरीत प्रश्न !!

 स्त्री प्रवास … कुठून सुरु झाला हा प्रवास? माझंच जगणं मला जगू द्या, ते असे ओरबाडून संपवू नका, यासाठी तळमळीने मागणी करण्याचा प्रवास? कधी ठासून, कधी रडून, कधी ओरडून तर कधी मंचावर उभे राहून ताठ मानेने …तरीही मुसमुसतच विचारतेय ती.   
स्त्री म्हणून होणारे अत्याचार माहिती आहे साऱ्यांना, दिसतंय ते पण कुठे संपेल, अंत आहे का ह्याचा … आणि शेवटी मिळेल का तिचं तिला हक्काचं जिनं ?… या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाचकडे नाही. …. ते वर्षानुवर्ष अनुत्तरीतच. 

महाभारतातली पाच पांडवांची बायको द्रौपदी, रामायण मधल्या रामाची आई कौसल्या, बायको सीता, लक्ष्मणाची बायको उर्मिला, किंवा मग रावणाची बायको मंदोदरी  …. आई गांधारी किंवा कौरवांच्या बायका तरी सुखी होत्या का हो ? देवकी -यशोदा कि मग राधा…. मीरा तरी ? 
हे सगळं पुराण समजून सोडून दिले तरी मग इतिहास तरी मागे आहे का ? सावित्री बाई फुले, अहिल्या होळकर …. आत्ताच्या सिंधुताई सपकाळ? 
आजही प्रवास सुरूच आहे. त्याला अंतच नाही. क्लारा झेटकिन ते ऑंग सान सू कि ,झाशीची राणी तेअफगान ची मीना केश्वार कंवल , माया त्यागी ते ज्योतीसिंग पांडे, अजूनही वाट बिकटच आहे. आजही स्त्री लढतेच आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी, जगण्यासाठी … 

आजही 'युसुफ्जाई मलाला' अंगावर गोळ्या झेलते. मारणारा तिचं वय बघत नाही तिचे म्हणणे समजून तर दूर ऐकूनही घेत नाही. ती फक्त स्त्री आहे आणि स्त्रियांसाठी आवाज उचलतेय एवढंच पुरे …तिचा जीव घ्यायला … पण ती तगली- जगली अजून लढतेय …. बलात्कार पिडीत 'अरुणा शानबाग' गेल्या ३७ वर्षांपासून मानसिक, शारीरिक सर्वच स्तरावर खचून गेलीय पण धुकधुकी आहे अजून जीवात एवढंच काय ते शिल्लक  …तिचा आरोपी जेल मधून सुटून रुजलाय परत समाजात, संसार थाटलाय त्यानं…. पण हि रोज मरून जगते आहे. मरण येत नाही तोवर जिवंत राहणार आहे. अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचल्यावर समोर असलेले जगणे मरणप्राय आहे म्हणून दया मृत्यु मागणारी 'सोनाली मुखर्जी'…. कुरूप चेहेरा लपवत तडफडत जगतेच आहे … ती काय किंवा मग लष्कराचे अनिर्बंध अधिकार कमी करा म्हणून गेली तेरा वर्षे उपोषणावर असणारी अन्न नाकारणारी तरीही अजूनही अन्यायाला बळी पडणारी 'इरोम शर्मिला' काय. …'तस्लिमा नसरीन' सारखी गाजलेली लेखिका सुद्धा देशोधडीला लागते … वर्षानुवर्ष जीव मुठीत घेऊन इथे तिथे लपत पळत राहते …. 

'फुलन देवी' चा कित्तेक दशका आधीचा बलात्कार असू दे कि आजची 'निर्भया'…. तंदूर मध्ये जाळली गेलेली नैना साहनी किंवा मग शिवानी भटनागर, प्रियदर्शनी मट्टू, जेसिका लाल किंवा आरुषी तलवार ……… गर्भाशयातच भ्रूण हत्या, बलात्कार, ऑनर किलिंग, अ‍ॅसिड अटेक, हुंडाबळी आणि काय काय …. जन्मापासून ते मरेपर्यंत भीत भीत जगतांना निदान एका दिवसाचं भयमुक्त जगणं शोधू पाहणारी कालची स्त्री आणि आजचीही स्त्री … 

शेतात राबणारी गरीब, कार्यालयात सेवा देणारी उच्च शिक्षित, घरात खेळणारी चिमुरडी, शाळेत-महाविद्यालयात जाणाऱ्या युवा…. रस्त्यात, बस मध्ये, ट्रेन मध्ये, शाळेत, शेजारी, कार्यालयात, सासरी, माहेरी आपल्या माणसांत, परक्यांमध्ये कुठेतरी निर्धास्त, नि:संदेह, निर्विवाद जाऊ शकेल. न अडखळता मोकळा श्वास घेऊ शकेल अशी परिस्थिती आहे का अजून ? एवढ्या वर्षांपासून नाहीच अजून …पण का ? 
हिंदू, मुस्लिम, इसाई धर्म कुठलाही असू दे … भारत, अफगान, अमेरिका, पाकिस्तान देश कोणताही असू दे …. दंगे होऊ दे, आर्थिक संकट येऊ दे, महायुद्धे होऊ दे , धर्मयुद्ध होऊ दे सर्वात आधी बळी पडते ती 'स्त्री' जात.

काय होईल व्यासपीठ देऊन …. भाषण करून, प्रश्न मांडून ? काय होईल मागण्या करून ?
वर्षानुवर्ष ह्याच समस्या आहेत …. ह्याच अडचणी आहेत …कालही तिची जगण्याची तगमग होतीच आजही आहे. कधीतरी परिस्थिती बदलेल म्हणून तिने अशाही सोडलेली नाही. …….

आजही स्त्रिया स्वप्न बघतात त्या आदर्श समाजाची …. जेव्हा स्त्रियांना शरीरापलीकडे एक भावना म्हणून बघायची आणि आदराने वागवायची बुद्धी आपल्या समाजात रुजेल. स्त्रियांचा आदर, त्यांचा आत्मसम्मान जेव्हा मना-मनातून आपसूक जपला जाइल. हि जागा, हे वातावरण आणि इथल्या प्रत्येक गोष्टीवर तिचाही समान वाटा असेल.  आणि असा आंतरिक बदल जेव्हा घडेल, तेंव्हा महिलांचा आदर करण्यासाठी वर्षातला एखादा विशिष्ट दिवस साजरा करण्याची गरजही उरणार नाही.



(प्रस्तुत ललित २३ sept १४ रोजी दैनिक सकाळच्या fast track पानावर प्रकाशित झाले आहे)  


Sunday 6 July 2014

२४/७ ऑनलाईन



पिढी दर पिढी बदलत जाणारे विचार, वृत्ती, बुद्धीमत्ता ....कधी कधी अचंभित करणारे असतात . पूर्वी Generation gap मध्ये खरच Gap असायच. मग त्यातले बदल सुद्धा साहजिक आणि समजण्यासारखे होते ....पण हल्ली जस जशी टेक्नोलॉजी अपडेट होत जाते तस तशी आत्ताच येऊन गेलेली मागची टेक्नोलोजी मागच्या पिढी सारखी गणली जाते ....अगदी आत्ता आत्ता च आमच्या पिढीला कम्प्युटर पिढी म्हणून 'हुश्शार' असे काहीसे संबोधन मिळाले तेव्हा ऐकून अशी कॉलर वर यायची....पण आजच्या कोलेज मुलांना पाहून कम्प्युटर युग सुद्धा खूप मागे पडले असे वाटू लागले.....आजचे युग हे 'सोशल नेट्वर्किंग' चे. २४/७ एकमेकांशी जुळून राहण्याचे. खूप नशीबवान आहेत आजच्या पिढीतली मुलं खरतर . नुसते कम्प्युटर युग नाही तर आजच्या पिढीने तंत्रज्ञानातील अत्युच्च मजल गाठलेले सगळे टेक्निक्स डोळ्यासमोर पाहिलेत, बदल अनुभवलेत आणि प्रत्यक्षात त्या सर्वांचा उपयोग करून घेतला ......कोणतेही बदल हे चांगल्या उद्देशाने घडून आलेले असतात...सर्व प्रथम नजरेसमोर असते ती एकमेव मानव जात आणि तिची सोय. पूर्वी बदल सोयीसाठी व्हायचे. नवीन इंन्वेन्षण सुद्धा सोयीसाठी केले जायचे....आजही तसेच आहे खरतर, पण बदल झालाय तो आपल्या मानसिकतेत..गरज किंवा सोय यापेक्षा जास्त भौतिक सुख, मज्जा, आणि देखावा या गोष्टींनी आपल्या मानसिकतेची कमाल जागा व्यापून धरली आहे....भौतिक सुख मिळवणं किंवा एन्जोय, लग्जरी या गोष्टी चुकीच्या आहेत असे माझे अजिब्बात म्हणणे नाही.....मात्र आयुष्य हे फक्त याचसाठी आहे असे समजणे मात्र चुकीचे.

आजच्या पिढीला मिळालेल्या सर्व सुखसोयी या त्यांच्या गरज पूर्ततेसाठी आहेत....खरतर गरजेपेक्षा जास्तच आहे त्याचा उपयोग सोयीसाठी व्हावा हि किमान अपेक्षा....पण होतं काय कि प्रत्येक गोष्टीकडे सुखवस्तू आणि मज्जा म्हणून बघण्याचा आपला दृष्टीकोन कधीतरी आपल्यालाच भारी पडू शकतो हि दूरदृष्टी मात्र दूर दूर पर्यंत नसणारी हि आजची पिढी. आपल्याला लक्षात न येणाऱ्या काही गोष्टी सहज चालता बोलता लक्षात आणून देण्याच्या छोट्याश्या प्रयत्नात इथे काही उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करते.


आज सगळ्यात जवळच वाटणारं काही असेल ते आहे 'सोशल नेटवर्क साईट्स'. जवळच्या-दूरच्या मित्रांशी जुळून राहायचं उत्तम साधन, व्यक्त व्हायला एक सर्वोत्तम Platform...रोजच्या घडामोडी सांगायला आणि मित्रांच्या घडामोडी जाणून घ्यायचे जवळचे ठिकाण. इथे रडता येतं-हसता येतं ..रुसवा-फुगवा आणता येतो आणि घालवता देखील येतो...माहितीची देवाण घेवाण, तुमच्या अंगी असलेल्या कलात्मक गुणांचे प्रदर्शन देखील येथे करता येते. तुम्ही आहात तसे इथे दिसू शकता किंवा यापेक्षा वेगळे देखील...दिवसातला किती काळ काय काय करता याचं सगळं गणित आपल्या कळत-नकळत इथे उमटत असतं ....आपल्या खऱ्या आवडी-निवडी, आपली भाषा शैली, आणि सगळ्यात ठळक उभारून बाहेर पडते ते आपले विचार आणि आपला स्वभाव......हे सगळं कळत असतं आपल्याला पण इथे कोणाला कशाची काळजी नाही.....सगळं कसं बिंदास...हे सगळं घडत असतांना आपलं भविष्य घडवायची आपली कसरत देखील चालू असते....शिक्षण, त्यासाठी कोलेज क्लासेस , रात्र रात्र जागून केलेला अभ्यास, दूर दूर धावत पळत पूर्ण केलेले क्लासेस, टेस्ट, एक्जाम, सन-उत्सव त्याग करून हि सर्व खटाटोप असते भविष्याच्या तरतुदीची...भविष्याची तरतूद सफल ठरली तर आयुष्य सुखाचं जाणार असतं .....हि जाणीव मनात ठाण धरून असते....ते स्वप्न, ती आकांक्षा फोल ठरू नये म्हणून वाटेल ते करायला तयार असलेले आपण .....कधीतरी असेच एखाद्या intarview ला जातो, महत्वाची आहे हि नौकरी मिळाली तर आयुष्य बदलणार सगळी स्वप्न पूर्ण होणार असे सगळे दिवास्वप्न डोळ्यात साठवून आपण खुर्चीत बसतो आणि …आणि …

उत्तर देण्याची गरजच पडत नाही.… आपली मुलाखत घेण्यास समोर बसलेल्या महोदयांना आपल्या बद्दल इंथभुत माहिती आहे.  तुम्हाला सतत फिरायला आवडतं, मागल्या वर्षीचे दोन विषय निघायला त्रास झालेला, अमका कि तमका विषय साला डोक्यातच शिरत नाही, आठवड्यात कितींदा पिक्चर बघता, सलमानसाठी किंवा कटरिना साठी रात्रंदिवस झुरता, वडिलांशी खटका उडाला, कामाचा अभ्यासाचा प्रचंड कंटाळा येतो. रिलेशनशिप स्टेटस सतत बदलता दिवसातले २४/७ ओन्लाइन असता अगदी अर्ध्या रात्री सुद्धा… हुश्श्…


अस सगळं माहिती असणाऱ्याने तुम्हाला का म्हणून नौकरी वर ठेवावं ?? नाहीच ठेवणार तो  … सगळ्या स्वप्नांची क्षणार्धात राख झाली ना? कुठून बरे कळले हे सर्व त्यांना …. जादू बिदू येते कि काय? उम्म्म्म्ह ,,,, तुम्ही स्वतःच सांगितलय ते त्यांना अगदी स्पष्ट किंवा जरा जास्तच लाउड.….

सोशल नेटवर्क वर आपण वावरत असतांना आपले सगळे सिक्रेट्स उघड करून ठेवत असतांना आपल्या भावितव्याचे भान असायला हवे. लग्न ठरतांना सुद्धा आपले सोशल नेट्वर्किंग तपासले जाऊ शकते. नौकरी आणि लग्न हा जन्माचाच प्रश्न असतो. आणि तुटपुंज्या, थिल्लर सोशल नेट्वर्किंग सारख्या टाईमपास साईट मुळे यावर परिणाम होऊ नये हि काळजी घेतली गेलीच पाहिजे. …शेवटी आयुष्य म्हणजे वर्च्युवल जग नव्हे आपल्या आयुष्याचे सुख दुःख प्रत्यक्षच समोर वाढलेले दिसणार आहेत आणि ते तसेच प्रत्यक्ष फेसही करावे लागणार आहेत …तेव्हा जरा विसावू या वळणावर आणि विचार करूया थोडं भान राखूनच आयुष्याला पुढे जाऊ या. पटतंय का बघा ……




(प्रस्तुत लेख सकाळ वृत्तपत्राच्या 'युवा' या विशेष पानावर प्रकाशित झाला आहे)


शाणु ....!!

'हेल्लो … श्रेयस, श्रेयस मी … मी बोलतेय  …श्रावणी, हे बघ फोन ठेऊ नकोस प्लीज '

'…… हम्म   '

'अरे तनुल बद्दल काही कळलं का ? हेलो …ह … ह … हेलो श्रेयस'

श्रावणी पुन्हा मुसमुसू लागली ' सांगा रे कुणीतरी काहीतरी मला… माझ्या एवढ्याश्या गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा नका देऊ मला'
बराच वेळ कॉट वर बसून पायात डोकं खुपसून हुंदके देत रडत राहिली  … काही वेळ गेला असेल … जरा भानावर आली

 तोंडावर उतरलेले केस मनगटाने मागे सारले, तळव्याने डोळे पुसले, नाकावारुन उलटा हात फिरवला आणि परत लगबगीने ती तनुलचा नंबर डायल करू लागली. फोन कानाला लावला आणि वाजणारा फोन उचलला जाईल ह्याची ती डोळे बंद करून वाट बघू लागली. पण नो रिप्लाय.  
तिने नंबर रिडायल केला 'आणि उजवा पाय जागीच हलवत 'तनुल प्लीज रे प्लीज एकदा फोन उचल, शपथ आहे तुला, उचल रे नको जीव घेउस' पुटपुटू लागली. पण काहीच उपयोग झाला नाही.  डोळ्यातून पुन्हा आसवं ओघळू लागले.
भरलेल्या डोळ्याने पुसट दिसणाऱ्या नावांच्या यादीत ती आणखी एक नाव शोधू लागली. नाव दिसताच तिने नंबर डायल केला समोरून फोन उचलल्याचे लक्षात येताच ती आवाज सावरत बोलु लागली

 ' रावी हे बघ ऐक एकदा माझे…हे बघ मला राहवत नाहीये गं , तू तरी समजून घे, अक्खी रात्र पालटली आता दुपार झालीय पण तनुल चा काहीच पत्ता नाही… काहीतर बोल गं '

 ' हे बघ श्रावणी या विषयाला काहीच अर्थ नाहीये आता … जे व्हायचं ते होऊन गेलंय'

 ' अस नको म्हणूस ना ग … प्लीज … माझ्यासाठी एकदा तू … हेलो हेलो … रावी… हेलो रावी'

ती पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. हातातला फोन तिने बेड वर फेकून दिला … रडत रडत खाली बसली आणि भिंती लगत डोकं मागे टेकून शून्यात ध्यान लावून बसून राहिली तशीच कितीतरी वेळ … डोळ्यातून अश्रू वाहत राहिले तसेच .डोळे सताड उघडे …

दरवाजा वाजला … तिची पापणी सुद्धा हलली नाही… दरवाजा जोरजोरात वाजू लागला. ती नाही हलली जागची

आईने आवाज दिला बराच अन बाहेर ये अशी ताकीद देऊ लागली….

विजेच्या ताकदीने श्रावणी उठली जागची…  झपझप पावले टाकत दाराजवळ आली, झर्रकन हात कडी जवळ नेत कडी उघडली आणि हवेच्या गतीने दार उघडलं  …. आई भयचकित होऊन दारात उभी होती. श्रावणीने लालेलाल अश्या भरल्या डोळ्याने काळीज चिरत जाणारी करारी पण रागीट नजर टाकली आईवर …. काही सेकंद तसेच खिळलेले …. आणि आईला काही कळायच्या आत तिने तेच दार प्रचंड वेगाने भिरकावले बंद करण्याकडे …. खाडड  असा आवाज झाला आणि ते पुन्हा त्याच वेगाने सुरु होण्याआधी तिने दुसऱ्या हाताने लगेच कडी लावून घेतली. दाराच्या पलीकडल्या आईची काय मनःस्थिती झाली असेल ह्याची जणू तिला जराही पर्वा नव्हती.

जेवढ्या वेगाने गेली तेवढ्याच संथपणे ती हुंदके देत कॉट जवळ आली. विखुरलेले केस हाताने वर करून तिने फोन उचलला आणि पुन्हा श्रेयस ला फोन लावला. फोन उचलला गेला हे कळताच ती रडतच बोलू लागली

 'श्रेयस ऐक रे एकदा फोन ठेवू नकोस … प्लीज जीव जाईल माझा '
 'काय बोलायचं शिल्लक ठेव्लायेस श्रावणी ? आणि का ऐकायचं तुझं? कोण आहेस तू ?'
'श्रेयस अरे मी मैत्रीण आहे तुझी निदान आजपर्यंत मैत्रीच्या खातर तरी …'
 'मैत्री~ ~ मैत्री …. तू बोल्तेयेस हे श्रावणी ?'
 'श्रेयस अरे चुकले रे मी, माझा नाईलाज झालेला आई- बाबांसमोर, त्यांच्या बोलण्यात आले. त्यांचा त्यांच्या त्या सो कॉल्ड समाजाचा विचार केला ,…. आणि … आणि '
'आणि तनुल ला चक्क तुझ्या घरच्या लोकांसमोर अपमानित केलंस, तुझ्या आईने नको नको ते काय काय घालून पाडून नाही बोलून घेतलं त्याला….  आणि तू … तू गप्प होतीस ? घरच्यांनी अपमानित केलं म्हणून नाही ग तो दुखावला … तुझं वागणं … तुझं वागणं दुखावून गेलं त्याला, जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, जिच्याशिवाय काहीही सुचायचं नाही त्याला तुझ्या सुखासाठी, चैनीसाठी पैसा हवाय त्याला म्हणून नौकरी साठी धडपडत राहिला तो … तीच जगण्याचं एकमात्र माध्यम असणारी त्याची जिवलग त्याला ऐन वेळेवर निघून जा सांगते?? मी माझ्या पालकांच्या शब्दाबाहेर नाही अस बोलते…. तुझा माझा संबंध नाही यापुढे … मला विसरून जा म्हणते?? …. कसं , कसं जमलं गं हे सर्व तुला? '

 'श्रेयस अरे मला कळलंच नाही रे हे सर्व कसं घडून गेलं, मी घाबरले होते… त्याच्या जीवाला काही नको व्हायला होतं मला …  मला वाटलं तनुल सावरेल स्वतःला … पण काल संध्याकाळी हे सगळं घडल्यापासूनच त्याचा काहीच पता नाहीये, तो फोनही उचलत नाहीये, त्याच्याशिवाय जगण्याचे हे काही तास मी मरण यातना सहन करतेय…. माझा तनुल मला परत कर रे … सांग एकदा तो कुठे आहे ? सुखरूप आहे तो बोल एकदा … एकदाच हवं तर'

'अगं जा~~ गं, तुझ्या कुठल्याच शब्दांवर आता विश्वास ठेवावा वाटत नाही…. फक्त तनुलचंच नाही माझं अन ओवीचहि मन तोडलंय तू… तनुल चे अश्रू बघवले नाही आम्हाला त्याला एकांत हवा होता म्हणूनच त्याला तसेच सोडून निघून आलोय आम्ही सकाळी तृष्णेवरून …. त्यानंतर तर त्याने आमचाही फोन उचलला नाहीये. …… हेल्लो … ह … हेल्लो श्रावणी'

श्रावणी ने फोन ठेवला होता … तिला आता निव्वळ तृष्णा दिसत होती. अंगावरल्या घरच्याच कुर्त्यावर तिने नुसताच स्कार्फ ओढून घेतला, खोलीच्या दाराबाहेर पडतांना टेबल वरच्या गाडीची किल्ली उचलुन घेतली आणि 'कुठे निघालीस' अस विचारणाऱ्या आईच्या एकही शब्दाला उत्तर न देता धावतच घराबाहेर पडली.

'तृष्णा'  तनुल-श्रावणीचा आवडता स्पोट. एका चौकोर तलावाच्या मध्यभागी हिरवाई असणारी बाग, छोटेखानी बेटंच जणू … तिथल्या पुलावरील तालावाशेजारच्या झाडांच्या सावलीतल्या दगडांवर बसायला फार आवडायचं तनुल ला…श्रावणी ची वाट बघत आणि ती उशीरा आल्यावरही न रागावता तिचा हात हातात घेऊन तासान तास  बसायचा तो तिथे.

 तो पूल ते एकावर एक रचलेले दगड श्रावणीच्या डोळ्यासमोर गिरक्या घेऊ लागले.  १५ KM दूर … पण श्रावणी च्या डोळ्यांना आणि गाडीच्या चाकांना आज वेग लागला होता. दोघांनाही काही केल्या थांबता येईना…. तृष्णेवर  पोचायला लागेल तेवढा संपूर्ण वेळ तिच्या भरलेल्या डोळ्यासमोर तनुल दिसत राहिला, आपल्या चेहेर्यावर एक स्मित दिसावं म्हणून धडपडणारा तनुल…. सालस -समंजस-हुशार तनुल, मित्रांमधला लाडका तनुल … आई-बाबांनी एवढा अपमान केल्यावरही एका शब्दानेही त्यांना उलट न बोलणारा तनुल …. मी आई बाबांचं ऐकायचं ठरवलंय अस सांगितल्यावर मौन झालेला आणि दुखावला गेलेला तनुल.'

ती तृष्णेवर पोचली तेव्हा संध्याकाळ व्हायला आली होती. दिवसभर तापलेलं उन्ह उतरणीला आलेलं. पश्चिमेला जरा जरा तांबड फुटलं होतं. आणि तृष्णे वरून वाहणाऱ्या वाऱ्यांत जरा गारवा जाणवत होता…या कशातही लक्ष नसणाऱ्या श्रावणी चे डोळे फक्त तनुल ला शोधत होते. मिळेल त्या जागेवर गाडी पार्क करून ती धावतंच आत शिरली. पुलापर्यंत जायला आणखी पाच मिनिट लागणार होते. तेवढा त्राणही आता तिच्यात उरला नव्हता. ती पोचली पुलावर तिची नजर भिरभिर शोधत राहिली तनुल ला …. पण नाही … नाही दिसला तनुल. नजर जाइल तिथपर्यंत शोध घेऊन झाला आणि श्रावणीचे उरले सुरले सगळेच धैर्य खचले. ती गुढग्यांवर मट्टकन  खाली बसली …. आणि 'तनुल~~ ' अशी आर्त हाक घालून हुंदके देऊन रडू लागली. वातावरणात प्रचंड शांतता, पाण्यावरून वाहणाऱ्या हवेचा हलकासा हुंकार आणि हुंदक्याचा आवाज ……….

……… शाणु

श्रावणी च्या कानावर शब्द पडलेत तिने मान उचलली …. पुढ्यात तनुल उभा होता. त्याला बघून ती अधिकच हुंदके देऊन रडू लागली.

तनुलच्या डोळ्यातूनही टपकन थेंब ओघळला गालावर …. त्याने दोन्ही हात पुढे केले अन भरल्या डोळ्याने स्मित दिले तिला …

क्षणाचाही विलंब न करता श्रावणी धावतच कुशीत शिरली त्याच्या …….                

Thursday 19 June 2014

पटतंय का बघा ....

पर्वा पर्यंत प्रणव दवाखान्यात भरती होता...अवघ्या १०-१२ वर्षांचा असेल...सायकलीने घरी येत असतांना कुण्या तरुणीने भरधाव गाडीने सायकलीला कट लावला प्रणव रस्त्यावर पडला आणि पायावरून मागाहून येणाऱ्या कारचे चाक गेले ...'मल्टीपल फ़्रेक्चर' झाले आणि हा चिमुकला महिन्यांपर्यंत दुखणे सहन करत राहिला....काही महिन्यात प्लास्टर निघाले पण जन्माचे दुखणे मात्र पाठी लागून राहिले....श्वेता मुलाच्या शाळेतून 'पालक शिक्षक मिटिंग' करून परत येत होती , मेन रोड वरून शंभर एक पावलांच्या अंतराने आत तीच घर. पूर्ण घरापर्यंत ऑटो नेण्यापेक्षा इथेच उतरू म्हणजे तेवढच आपलं चालणं होत. म्हणून रोडवरच उतरली आणि घराच्या दिशेने चालू लागली. मागून येणाऱ्या भरधाव बाइक ने एवढ्या जोरात धडक दिली कि श्वेता उंच उडून कितीतरी दूर फेकली गेली...काय होतंय हे समजायच्या आत अंशतः शुध्द हरपली. जाग आली तेव्हा घोळका भोवती जमा होता. धडक कोणी आणि कशी दिली हे समजण्याची तिची मानसिकताच नव्हती....तिला दवाखान्यात नेले  तेव्हा तिच्या डोक्यात ब्लडक्लोट्स झाले होते आणि चेहेऱ्यापर्यंत रक्त उतरले होते..शरीराला प्रचंड मूक घाव होते...घरातल्या सर्व जवाबदार्या सांभाळणारी आणि लहान मुल असणारी श्वेता यानंतर जवळ जवळ ४ महिने डोक्याच्या  आणि शरीराच्या  मरणप्राय वेदना सहन करत राहिली.  आणि तिच्या सोबतीने तिची चिमुकली सुद्धा  सफर होत राहिली......
अनुराग वयवर्ष १८ च्या घरात, सरळ मार्गाने वागणारा ..परीक्षेच्या तयारीसाठी संपूर्ण वर्ष मरमर करत अभ्यास करणारा अनुराग ..संध्याकाळी क्लासवरून घरी निघालेला...सकाळ पासून उपाशी, पोटात भुकेने कावळे ओरडत होतेत.. तसे आईला फोन करून सांगितले होते... .. आई सुद्धा घरी आतुरतेने वाट पाहत होतीच .....कुणाच्या तरी क्षणिक आनंदाखातर भरधाव वेगात घेऊन जाणार्या आणि मस्तीच्या धुंदीत सिग्नल तोडून पळू पाहणाऱ्या बाइकच्या आवाक्यात आला...अतिशय हुशार आणि भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारा अनुराग तीन महिने कोमा मध्ये होता..अनेक ठिकाणची हाड तुटलेली..अनेक लाइफ़ सेविंग ऑपरेशन नंतर अनुराग जीवाने वाचला पण त्याचा स्मृतीभश झाला..आजही अनुराग नीट बोलू शकत नाही आपण बोललेले त्याला कळत नाही, क्षणात आपली माणसं तो ओळखतो तर क्षणात तीच लोक अनोळखी असल्या सारखा वागतो...त्याच्या अभ्यासच आणि भविष्याच काय झाल असेल हे तर वेगळे सांगणेच नको....
आताच परवा परवा शंकर नगर मध्ये दोन तरुणांना आपल्या चारचाकी गाडीखाली तुडवणारया दोन तरुणी कदाचित बेल वर सुटून घरी पालकांसोबत परत नॉर्मल आयुष्य जगू लागल्या असतील  पण त्या दोन तरुणांच्या घरचे मात्र कायमचे त्यांच्या अपत्यांना मुकले...त्यांचे दुःख बोलून दाखवण्या इतके सोप्पे तर नक्कीच नाही...
वर्षभरापूर्वी असेच दहा दिवसा पूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा दोन चाकी गाडीखाली येउन मृत्यू झाला...पोरगा जीवाने गेला आणि नवे स्वप्न डोळ्यात साठवून आलेल्या त्या नव्या नवरीवर काय आघात झाले असेल कल्पना सुद्धा करवत नाही.....शाळेतून परत येणाऱ्या ६-८ वर्षीय दोन सक्ख्या बहिण-भावांना गाडीने धडक देऊन त्यांचा अंत आणणाऱ्या त्या इसमाला खरच काहीच वाटत नसेल का आज...त्या दोघांचे आई-वडील मात्र कसे दिवस रेटत असेल विचार सुद्धा भयंकर वाटतात.....
कस असतं ना....कुणाच्या तरी मस्तीसाठी, क्षणभर दाखवू पाहणाऱ्या स्टाईल साठी किंवा मग क्षणभर होणार्या विलंबासाठी कोणता दुसरा जीव कायमचा लाचार,अपंग होतो..वेदनेच्या गर्तात जन्मभर डुंबून जातो, त्यांच्या भविष्याचे स्वप्न धुळीला मिळतात किंवा काही कायमचे आपल्या माणसांपासून दूर निघून जातात......छोट्याश्या मस्तीने त्या चालकाला तरी काय मिळवून दिले ना?? अश्या प्रसंगानंतर कुणीही स्वस्थ, शांत जीवन जगू शकत असेल काय ?...
मित्रांनो...आपल्या आई-वडिलांनी महेनतीच्या पैशात आपल्याला घेऊन दिलेली वाहने आपल्या सोयीसाठी आहेत....कोलेजला, क्लासेस ला, कामावर जातांना आपल्याला त्रास होऊ नये हा त्यांचा उद्देश...पण आपण कुठेतरी भावनाशुन्य होऊन वागू लागतो, वेगळेपणा दाखवायला, स्टाइल म्हणून किंवा इम्प्रेशन टाकायला आपण जे करतोय त्याने कुण्या चिमुकल्याचा..एखाद्या आईचा किंवा कुणाच्या एकुलत्या अपत्याला जीव गमवावा लागावा हि अतिशय दयनीय, निंदनीय आणि दुखद घटना आहे...अशी घटना आपल्या हाताने घडावी??..आपण सुद्धा अशा घटनेनंतर सुखाने जगू शकत नाही.....म्हणूनच आपण काळजी घेतली पाहिजे...आपले तारुण्य, अंगात असलेल्या कला आणि स्टाइल चांगल्या कामासाठी वापरावी पण ज्यात कुणाचे नुकसान होणार असेल...कुणाला वेदना मिळणार असतील अश्या देखाव्यात काहीही मोठेपणा नाही हे समजून घेतले पाहिजे ....
तुमची इतरांबद्दलची संवेदनशीलता, नम्रता, प्रेमळ स्वभाव आणि केअरिंग असणेच तुमचे वेगळेपण सिध्द करते ...हे असे असणे म्हणजेच तुम्ही नुसते वेगळे नाहीतर चांगले सुद्धा आहात आणि यातूनच इतरांवर इम्प्रेशन पडत असतं ....चांगुलपणाचे इम्प्रेशन लास्टलॉंग ठरत असतं ...तेव्हा स्टाइलीश होण्यापेक्षा केअरिंग होऊया ...सुपरफास्ट होण्यापेक्षा संवेदनशील आणि नम्र होऊया.....अस वागणंच  आपलं वेगळेपण आणि आपले संस्कार सिध्द करतील आणि समाजात होणारे अपघात किंवा इतर अनेक चुकीच्या गोष्टींचा पायंडा न बसता चांगल्या संस्कारित गोष्टींचे बीज रोपण आपल्या तरुणांच्या हातून घडत राहील........मोठे लोक सांगतात ते ऐकतांना समजून न घेतल्यास ते समजण्यासाठी एखादा अनुभव घडून यावा असे घडणे हिताचे नाही....हे आपल्या हाताने घडणे किंवा मग आपल्याच बाबतीत घडणे दोन्ही बाजूने दुखदच आहे....तेव्हा या वळणावर थांबून जरा विचार करूया आणि आत्ता याक्षणापासून समजून उमजून वागूया.........   


(सकाळ 'युवा' च्या विदर्भ आवृत्तीत दि. ०१ एप्रिल १४ ला प्रकाशित माझा लेख) 

मोठ्ठ होण …. म्हणजे !!



शेजारच्या घरी गेले दोन दिवस तणाव दिसत होता…शुभम पण जरा फुगलेलाच होता रोज मजल्यावर खेळायचा तो कालपासून दिसलाच नाही … काय होतंय कळत नव्हते पण विचारणार कसे ?…. रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या घरात आवाज वाढला. शुभम च्या आईचा रडायचा आवाज येत होता आणि त्याच्या बाबांची त्याला आणि त्याच्या आईला उद्देशून बडबड सुरु होती…. असे कधीही यापूर्वी त्यांच्या घरी झाले नव्हते… माझा धीर सुटलाच जेव्हा शुभम धाडकन दरवाजा आदळून घराबाहेर पडला आणि तंनतनत  एवढ्या रात्री घरातून चालता होऊ लागला … नेमकं काय होतंय हे विचारायला मी त्यांच्या दरवाजावर थाप देणारच होते तोच शुभम बाहेर पडतांना दिसला आणि त्याच्या मागाहून त्याची आई डोळ्यात अश्रू घेऊन…शुभम तनफनत निघून जाणार तोच मी त्याचा हात धरला आणि त्याच्या आईकडे प्रश्नार्थक नजर टाकली…. 'अग बघ न हा कस वागतोय आमच्याशी …. काल पासून जेवला सुद्धा नाहीये ' एवढच बोलून त्यांनी डोळ्याला ओढणी लावली….
मी नजेरेनेच वहिनींना शांत होण्यास सांगितले आणि शुभम चा हात धरून माझ्या घरात घेऊन आले …. आतून दार लावून घेतले…. शुभम अजूनही रागाने संन होता माझ्या इशाऱ्यावर तो बसला सोफ्यावर काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हताच, मी पाणी आणले तो नाही म्हणाला तरी प्यायला सांगितले…. पाणी पिउन थोडा शांत झाला पण बोलायला तयार नव्हता …. 'काय खातोस? जेवलास का? का जेवला नाहीस? तुझ्या आवडीची पनीर भुर्जी केलीये जेवणार का?' अश्या साध्या साध्या बोलण्या नंतर शुभम जरा नॉर्मल झाल्याचे जाणवले…. त्याने थोड खाउन घेतले आणि धीर सोडून मी विषयाला हात घातलाच….

शुभम ने यंदा दहावीची परीक्षा दिली होती पुढल्या वर्षात कुठल्या क्षेत्रात पाउल टाकायचे, कोणत्या कॉलेजला जायचे हि सर्व आपल्या आईबाबांचे टेन्शन्स असे समजणारा शुभम…. त्याला स्मार्ट फोन सारखा लेटेस्ट अड्वांस फोन हवाय म्हणून दोन दिवसांपासून हट्टाला पेटला होता …. एवढ्या लहान वयात हे सर्व नको नाहीतर त्याचे अभ्यासातून लक्ष कमी होईल म्हणून मुलांचे असे लाड पुरवायचे नाही इति शुभम चे बाबा …. आणि आई दोन्ही बाजूने कोंडी झाल्याने भ्रमात अडकलेली ……

'अरे पण शुभम स्मार्ट फोन वगैरे हवाय कशाला रे एवढ्यात… तुला आता पुढे वेळ तरी कितीसा मिळणार? .... क्लासेस, कॉलेज आणि अभ्यास खूप काही असेल करायला फोन हवा पण सध्या साधा फोन वापर वेळ आली कि देतील रे बाबा स्वतःच घेऊन ' इति अस्मादिक
शुभम ' असं कसं म्हणतेस माझ्या सर्व मित्रांकडे महागडे फोन आहेत शिवाय आईपाड, घरी पर्सनल लापी हे सगळं वेगळं…माझाकडे साधा स्मार्टफोन असू नये …. मी मोठा झालोय आता कधीपर्यंत मोठ्यांचच ऐकायचं ?'

'मी मोठा झालोय … किती काळ मोठ्यांचच ऐकायचं?" त्याच्या या प्रश्नाने मी जरा स्तिमितच झाले...
मोठे होण्याच्या या मुलांच्या कल्पना किती भ्रामक आहेत …
मोठे होणे म्हणजे फक्त मनासारख्या वस्तू बाळगणे, हक्क गाजवणे, मोठ्यांचे ऐकायचेच नाही किंवा मग रागराग करणे एवढाच होतो ?
मोठेपणाला आलेल्या जवाबदार्या, निभावायला लागणारे कर्तव्य, वागण्यातला मेचुअर पणा हे काहीच यांच्या लेखी महत्वाचे नाही ?

आमच्याच सोसायटीची श्रुती तिचाही नूर वेगळाच होता…. मोकळे केस, घुटण्यापर्यंत स्कर्ट हाताशी गाडी आणि सतत मोबाइल
ला चिकटून आईने जरा काही सांगायला गेले कि 'तुला यातलं काय कळतंय… तू तुझ काम कर… मी आता लहान राहिलेले नाही मला कळतं मी काय करायला हवं ते ' असा सूर …. वेळी अवेळी मित्र-मैत्रिणींचे फोन … मुलगी घरात असूनही आई सतत एकटी पडलेली आणि मुलगी घरात एकटी बसलेली असली तरी सतत फ्रेंड्स ने घेरलेली ……

कपड्यांवर आक्षेप घेऊ नये म्हंटले तरी कपड्यांमधून आलेल्या कल्चर वर वागण्यावर आक्षेप आहेच ना ? आणि का असू नये …. आपण अश्या युगाची, अश्या संस्कृतीची कल्पना तरी केली होती का ?….  कुठे जात आहोत आपण?? विकासाकडे, प्रगतीकडे कि पुन्यांदा अधःपतनाकडे …. प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर,त्यांच्या जीवनशैलीवर तोपर्यंत कुठलीही तक्रार उठू शकत नाही जोपर्यंत ती मर्यादेच्या अखत्यारीत असेल… यात युवा पिढीही आलीच …. आता प्रश्न हा पडतो कि मर्यादा आखल्या आहेत कुणी ? माणसांनीच ना ? मग ते म्हणाले तसेच का वागावे ?

नाही मर्यादा या सहजासहजी कुणीतरी आले आणि आखल्या अस झालेलं नसतं वर्षानुवर्ष आलेले अनुभव त्यातल्या अडचणी चुकीचे परिणाम आणि त्यातून भोगाव्या लागलेल्या शिक्षा हे पाहता आपोआप पडत गेलेला पायंडा असतो …. आणि हाच पायंडा बरोबर आहे हे सांगणारे अनेक जिवंत, अनुभवी उदाहरणे आपल्या अवती-भोवती बघायला मिळतात. ….
हे आजच्या तुमच्या आमच्या पिढीने समजून घ्यायलाच हवे... 

आपल्या पालकत्वाचा अधिकार न गाजवता व्यापक दृष्टीने समाजाकडे बघण्याची वेळ आली आहे … आजच्या काळानुरूप मुलांच्या गरजा ओळखून पण चांगल्या वाईटाची ओळख योग्य वेळी योग्य वयात मुलांना व्हावी यासाठी पालकांनी दृष्टीकोन बदलावा आणि बऱ्या - वाईटाची, योग्य - अयोग्यतेचि समज परिपक्व व्हावी यासाठी मुलांनी देखील त्यांच्या दृष्टीकोनाची बाजू पालटून पहावी …. अपटूडेट राहन्यासाठी निव्वळ भंपक कपडे अन वस्तू कारणीभूत नसतात त्यासाठी त्या लेवल ची समज अन एडजस्टमेंट करण्याचे कसब अंगी भिनले पाहिजे …

Maturity maturity म्हणतात ती दिखाव्याने येत नाही त्यासाठी समजदारी आणि बुद्धीचा योग्य ताळमेळ हवाच …. पण त्याही आधी पाल्य आणि पालकांमध्ये संबंधांचा योग्य ताळमेळ असणारा पूल बांधायला हवा …एकमेकांपर्यंत पोचणारा …त्यापलीकडे पार न करता येणारा …. नाही का ??    



(सकाळ 'युवा' च्या विदर्भ आवृत्तीत दि. २२ जुलै १३ ला प्रकाशित लेख  )

Tuesday 17 June 2014

लग्न :- सर्वांग सुंदर सहप्रवास


लग्न म्हणजे दोन जीवांचा दोन मनांचा दोन परिवारांचा आनंद सोहळा. दोन संस्कृतींना एकत्र एका धाग्यात बांधू पाहणारी समाजाने निर्माण केलेली व्यवस्था. लग्न दोन भिन्न विचारधारांना सामंजस्याने एकाच वाटेवरून चालायला लावणारी आयुष्याची पायवाट. हिंदू संस्कृतीप्रमाणे सोळा संस्कारातील एक संस्कार.  स्त्रीपुरूषांमध्यें कायदेशीर प्रकारानें पतिपत्नीचें नातें निर्माण करून त्यांच्यामधील शारीरिक, धार्मिक व नैतिक संबंध निश्चित करणारी पध्दति म्हणजे विवाह होय. विवाहानंतर दोन लोकं एकत्र येतात एकत्र जगू लागतात त्यातून कुटुंब तयार होतं आणि समाजाचा प्रवाह अखंड रीतीनें वाहता राहण्यास मदत होते. पण म्हणून लग्न म्हणजे काही निव्वळ सामाजिक आणि शारीरक अनुबंध मात्र नाहीये. विवाह म्हणजे निव्वळ स्वप्नील, सुंदर,रम्य आयुष्य नाही प्रत्येक मनुष्यात उणीवा आहेत कुणीही परिपूर्ण नाही आणि या उणीवा समजून घेऊन एकमेकांच्या अपुर्णत्वाला आपल्या गुणांनी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे हीच लग्नाची खरी सुंदरता.  विवाहानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्या अनुषंगाने ग्रहण करावयाची समजदारी 'लग्नसंस्थेचा' हा मुख्य गाभा आहे. वरवरचं रंग-रूप, पैसा श्रीमंती या सर्वांनी संपूर्ण आयुष्य सुखमय होऊ शकत नाही. आयुष्याला हवी असते ती अंगीभूत गुणांची संपत्ती संस्काराची शिदोरी ती भरून असेल तर कृत्रिम आणि तात्पुरत्या सुखाचा हंडा स्वबळावर भरायला वेळ लागत नाही. म्हणून लग्नाच्या मंडपात आधी या गुणांना पारखून घेणे महत्वाचे आहे.       

 कधीतरी प्रत्येकाला लग्न करायचंच असतं तसा अलिखित नियमच आहे जगायचा इथे . मग कुणाबरोबर तरी जीवन घालवायचेच असेल आणि त्या व्यक्तीच्या गुण-दोषाबरोबर जगायचेच असेल तर ते गुण आणि दोष पारखून घेऊन का निवडू नये ? कुठल्या तरी दोषांबरोबर तडजोड करायचीच असेल तर ते असे असावेत ज्यामुळे अगदीच संपूर्ण आयुष्यावर फरक पडणार नाही. किंवा असे गुण स्वीकारू नयेत जे काही दिवसात संपुष्टात येणार असतील. आणि मग आयुष्यभर पस्तावण्याची वेळ येईल. एखादा व्यक्ती  फार श्रीमंत नसेल, फार देखणा नसेल तरीही आयुष्य चालू शकेल पण देखणं असूनही चरित्र्यशिल नसेल, व्यसनी असेल तर मात्र त्या तात्पुरत्या टिकणाऱ्या गुणांशी आयुष्य निभावणं कठीण होऊन बसतं. 

असं म्हणतात लग्न जुळवतांना मुलाचा खिसा पहिला जातो आणि मुलीचा चेहेरा. पण हे जरा विनोदीच नाहीये काय ? मुलाच्या खिशात आज असणारा पैसा आणि मुलीच्या चेहेर्यावर आज दिसणारं सौंदर्य चिरकाळ आहे ह्याची काय शाश्वती ? उद्या मुलाचा पगार वाढत जाणार आणि मुलीचे सौंदर्य ढळत, किंवा कदाचित अगदी ह्याच्या उलटही घडू शकेन,  मग पुढे काय ?? मग काय बघावं तर 'अंगात रग' असणारा पुरुष जो कधीही कुठेही गेला तरी निदान आयुष्यात कधीही रस्त्यावर येऊ देणार नाही, दोन वेळचं जेवण मिळत नाहीये निदान अशी वेळ, अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही.अगदी काहीही झाले तरी पुरुषी आधार बनून पूर्ण साथ देईल. आणि पुरुषानं स्त्री मध्ये काय बघावं तर 'समाधान' कमी जास्त कुठल्याही परिस्थितीत स्वतः तग धरून उभी राहून सोबत करणारी अन परिवार सावरून घेणारी अशी जीवनसंगिनी. 

 याबरोबर दोघांचेही शिक्षण महत्वाचे. आपल्या देशात मुलं नौकरी मिळावी आणि त्या नौकरीच्या भरवशावर चांगली मुलगी मिळावी म्हणून शिकतात तर मुली चांगली नौकरी करणारा, शिकलेला मुलगा मिळावा म्हणून शिकतात. खरच शिक्षणाचं एवढंच मोल आहे, एवढंच औचित्य ?? शिक्षण स्वतःकरता घ्यायचं आहे स्वतःला अधिकाधिक प्रगल्भ बनवण्यासाठी आणि झालंच तर पुढे आपल्या हातून घडणाऱ्या नव्या पिढीला वैचारिक आणि बौद्धिक दृष्टीकोन देता यावा या उद्देशाने शिक्षण घेतलं तर शिक्षण घेतल्याचे उद्देश कधीच संपुष्टात येणार नाही औचित्य संपणार नाही. घेतलेलं ज्ञान सतत स्वतःस आणि पर्यायाने समाजास कामी येत राहील किंबहुना वाढीस लागत राहील.     

विवाह जुळल्यानंतर घरातली मोठी मंडळी अनेक कामांच्या तयारीला लागतात. विवाह किती धुमधडाक्यात करायचा, किती किती आणि कोणा कोणाला बोलवायचं, लग्नाचा हॉल, दागिने , मुला-मुलीचा कपडा, डेकोरेशन सगळंच कसं उंची आणि तोलामोलाचं असावं, जेवणाचे पदार्थ किती जास्तीत जास्त आणि वेरायटी असावेत हे आणि काय काय पण या सर्वांवर वेळ आणि पैसा घालवतांना हीच मोठी मंडळी मुलांचे पुढले आयुष्य कसे चांगले जावे, त्यांनी एकमेकांना किती आणि कसे समजून घ्यावे, आल्याच अडचणी तर त्यांना कसे सामोरे जावे? एकदिवसाच्या धुमधडाक्याच्या पलीकडे आयुष्य एकमेकांसमवेत जास्तीत जास्त सुखी आणि आनंदी करण्यास काय प्रयत्न करावेत आणि त्याहीपलीकडे लग्न ग्रेसफुली कसे टिकवावे या सर्व बाबी बोहल्यावर उभ्या मुला मुलींना सांगण्यास पुढे होऊ धजतात काय ?? या सर्व गोष्टींचा जरा थांबून विचार करायला हवा नुसतेच लग्न लावून देऊन मोकळे होता येत नाही. जबाबदारीने जबाबदारी निभावायला शिकवणे हि सर्वात महत्वाची जबाबदारी दुर्लक्षित राहू नये यासाठी प्रयत्न केले जायलाच हवे. 

सरते शेवटी काय तर विवाहात उपस्थित इतर सर्व मातृतुल्य पितृतुल्य आणि मित्र मंडळी हे शुभेच्छा अन सदिच्छा देण्यासाठीच आलेले असतात. उभयंतानी आता पुढील आयुष्यात अतिशय आनंदपूर्ण सहजीवन घालवावं हा एकमेव उद्देश सर्वांच्याच मनात असतो त्या सदिच्छा मनात साठवून आणि या संपूर्ण आनंदाचा ठेवा कुपीत घेऊन वर-वधूंनी नवं आयुष्याची आनंदाने सुरुवात करावी स्वत्व जपूनही जोडीदार आणि परिवार यांच्यात संपूर्ण एकांगी होऊन एकत्र जीवनाला नवा आयाम द्यावा… दोघांच्या मध्ये कुठेही अहं भावना न येऊ देता अहंकार आणि स्वार्थ यांना दूर दूर पर्यंत स्थान न देता सहजीवन सुखकर करण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत राहायचा. विवाह म्हणजे एका दिवसाचा उत्साही उत्सव नाही तर आयुष्यभरयाचा सर्वांग सुंदर सहप्रवास आहे. या प्रवासाठी उत्सुक असणाऱ्या किंवा निघू घातलेल्या सर्व प्रवास्यांना मनःपूर्वक शुभेच्छा .   


(सार्वजनिक विवाह संस्थेच्या नागपूर आवृत्तीतून प्रकाशित लेख)

मेरा कुछ सामान …काही गुलजारमय लम्हे !




मेरा कुछ सामान …काही गुलजारमय लम्हे !


स्वतःच्या खऱ्या नावाला सार्थ करून दाखवणारे कमीच असतात, नाही? पण नसतात असे नव्हेच…. सम्पूर्ण सिंह कालरा जन्म १८ ऑगस्ट १९३६ ज्यांना आपण गुलजार नावाने ओळखतो. त्यांचा जन्म अविभाजित भारताच्या पंजाब मधील झेलम जिल्ह्यातील 'दिना' गावचा जे आता पाकिस्तानात आहे. अनेक पुरस्कारांचे, सन्मानांचे मानकरी ….गुलजार यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्याही मोठी आहे. पद्गमभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. शिवाय तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार व चौदा वेळा फिल्मफेअर पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आले . म्हणूनच म्हणावेसे वाटते, तुम्ही तुमच्या नावाला जागलात गुलझारजी, सार्थ करून दाखवलंत….  तुम्हाला 'दादासाहेब फाळके अवार्ड' जाहीर झाला तो क्षणही किती महत्वाचा होता, प्रत्येकाचंं मन पुन्हा गुलजार गुलजार झालं वातावरण गुलजारमय होऊन ओठ गुणगुणायला लागले होते. तुमचे नाव जरी घेतले तरी प्रत्येकाला त्यांचे त्यांचे ते भारावलेले दिवस आठवतात आणि मन स्वप्नील दुनियेत रममाण होत जातं. एखाद्याची जादू तनामनावर राज्य करतेय 'जाने कीस सदि से'… तुम्हाला ऑस्कर मिळाला त्याचाही आनंद झाला होताच पण आपल्या देशातला हा सर्वोच्च अवार्ड आपल्या आवडत्या कलाकाराला मिळावा यातला आनंद शब्दातीत आहे.

मानवी भावभावनांचे स्पंदन त्यांच्या लेखणीतून असे काही उतरते कि "सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो... प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो..हमने देखी है उन आंखों कि महेकती खुशबू" सुंदर कल्पना आणि सुरेख शब्दांची मेजवानी वर्षानुवर्ष अनुभवून आताशा गुलजार देशाच्या नसानसात भिनले होते, नाही भिनले आहेत आणि तसेच भिनले राहतील आणि असाच हृदयस्पर्शी मनोरंजनाचा तोहफा देऊन जगणे सोपे सुंदर करण्यास मदत करत राहतील. त्यांच्या शब्दात रंग आहे, गंध आहे, त्यांच्या शब्दांचे बादल बनतात, शब्दांतून तितलियां उडतात, प्रेयसीला ते गुलमोहर संबोधतात तर कधी फुल. गुलजार लिहित नाहीत ते जाणीवा जागृत करतात. एखाद्या व्यक्तीने काय काय करावं प्रत्येकाच्या मर्यादा असतातच हो, पण काहींना विशिष्ट शक्तींच प्राप्त असावी का ? कविता, कथा, दिग्दर्शन, गीत लेखन, गझल आणि हो 'खराशे'सारख्या नाट्यसंहितादेखील लिहाव्या हा चमत्कारच नाहीये का? त्यांनी दिलेला हा प्रचंड मोठा सुंदर खजिना आपल्याला अनेक कठीण मार्गातून मार्गक्रमण करतांना साथ देत आलाय, मरगळलेल्या मनाला पुन्हा फुलवून जगण्यासाठी बाध्य करत आलाय.

'जाने क्या सोचकर नही गुजरा, एक पल रातभर नही गुजरा' , ' दिल धुंडता है फिर वही फुरसत के रात दिन' किंवा मग'कहीं किसी रोज यूं भी होता, हमारी हालत तुम्हारी होती,जो रात हमने गुजारी मरके वो रात तुमने गुजारी होती
बडी वफा से …'
प्रत्येकाच्या मनातली अस्वस्थता अशी स्पष्ट शब्दात मांडायचे कसब असू दे किंवा मग साधारण माणसांची काल्पनिक स्वप्न सत्यात उतरवावे असे हृदयस्पर्शी गीत गुलजारची लेखणी तुमच्या आमच्या मनातल्या वाटेने प्रवास करत असावी किंवा मग तुमच्या आमच्या विचारांच्या शाईने भरली जात असावी इतकी ती आपली वाटते.

दिल दर्द का टुकड़ा है, पत्थर की डाली सी है
एक अँधा कुवा हैं या, एक बंद गली सी है
एक छोटा लम्हा हैं , जो ख़त्म नहीं होता
मैं लाख जलाता हूँ, वो भस्म नहीं होता



माचिस फिल्म चे हे गाणे 'छोड़ आए हम वो गलियाँ'  एकेकाळी प्रचंड गाजलेले. आजही मनाचा ठाव घेते. आणि अश्या सोडून दिलेल्या अनेक घटना मग आठवत राहतात. त्यांच्या शब्दात जादूच तशी आहे. 'चांद' हि गुलजार साहेबांची लाडकी उपमा त्यांच्या बऱ्याच गीतात तो कुठूनतरी झाकून बघतांना दिसतो, जाणवतो. अनेकांनी तर गुलजार आणि चांद असे समीकरणच असल्याचे संबोधिले आहे. चंद्राशी हे गुलजार चे नाते इतके जवळचे कि चांद म्हणजे लज्जा, चांद म्हणजे दिवा, चांद म्हणजे आत्मीयता आणि चांद म्हणजेच गीत सुद्धा….

'बदली हटा के चंदा, चुपकेसे झांके चंदा...'

जसे 'चांद' शी नाते तसे पाण्याशीही
'खामोश सा अफसाना पानी पे लिखा होगा, ना तुमने कहा होगा ना हमने सुना होगा' हे गीत असू दे किंवा मग जगजीत सिंग सारखा मित्र गमावल्यानंतर लिहिलेला शायराना अंदाज.

'आदमी बुलबुला है पानी का
और पानी की बहती सतह पर टूटता भी है, डूबता भी है,
फिर उभरता है, फिर से बहता है,
न समंदर निगल सका इसको, न तवारीख़ तोड़ पाई है,
वक्त की मौज पर सदा बहता'



आहह! काय ते शब्द आणि कसल्या त्या प्रतिमा आणि उपमा फिल्मी गैरफिल्मी गझल, नज्म नाही तर 'कजरारे कजरारे' किंवा 'नमक इश्क का' सारखे आयटम सॉंग अगदी त्यांनी लिहिलेल्या त्या विशिष्ट जाहिराती सुद्धा त्यांनीच लिहाव्यात इतरांचे कामच नाही, काम सोडाच कम्पेरिझनच नाही. प्रत्येक नव्या कामातले नाविन्य आणि स्वतःचे वेगळेपण त्यांनी ठायी ठायी जपले आहे. आणि दिग्दर्शनाबद्दल तरी काय बोलावे एकसे बढकर एक संहिता माचिस, हुतुतू, आंधी, मौसम, अचानक, अंगूर, लेकीन, मेरे अपने, खुशबू, किनारा जेवढी नावं तेवढे विविध विषय तशी हाताळणी आणि म्हणूनच त्यांचा प्रत्येक सिनेमा गर्दी बाहेरचा ठरतो आणि पाहणाऱ्यांच्या आठवणीत जाउन विसावतो. त्यांच कुठलंही गीत नसावं तुम्ही आम्ही ऐकले नाहीये एकदा नाही अनेकदा. काही गाणी तर अजरामर गटातलीच ' मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' या गाण्याने तर सगळे रेकॉर्ड तोडले असावे इतके ते वाजले आणि गाजले. सगळ्याच पिढीला स्पर्श करणारे.

'एक सौ सोलह चांद की राते
एक तुम्हारे कांधे का तील...
गिली मेहंदी कि खुशबू
झूटमुट के शिकवे कुछ...!'


हृषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी, बासू भट्टाचार्य या दिग्दर्शकांपासून ...सलील चौधरी, जयदेव, हेमंत कुमार, खय्याम आणि सर्वांत लाडका त्यांचा 'पंचम' आर. डी. बर्मन...यांच्याशी गीतकार म्हणून जमलेली जोडी...आत्ता तीच केमिस्ट्री नवा संगीतकार ए. आर. रहमान आणि विशाल भारद्वाज सोबतही आहे त्यांची. त्यांच्या शब्दांना वेळेचे, काळाचे बंधन नाही. पिढीशी जुळवून घेण्यासाठी धडपड करावी लागत नाही. त्या शब्दातच एक रुहानी ताकद आहे, पाण्यासारखे सगळ्यात मिसळून जाण्याची जादू आहे.

गुलजार साब तुमच्याबद्दल आणखी काय काय बोलावे आणि किती किती, तुम्ही म्हणजे निव्वळ वेड आहात आणि या वेडात जगायची सवय झालीये आताशा. तुम्ही असेच लिहित राहा आणि आमचे आयुष्य अधिक सुखद समृद्ध करत राहा ही सदिच्छा. आमचे जगणे जास्त सोपे अन सुंदर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आम्हाला फार आभिमान आहे तुमचा.

(जुलै 2016 च्या 'एफसी रोड' या डिजिटल मासिकात प्रकाशित लेख) 

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...