संघर्ष, स्वाभिमान आणि मानवतेच्या वाटा - तृतीयपंथी समुदाय
आपण आपल्याच विश्वात इतके मश्गुल असतो की या दुनियेत आपल्यासारखीच दिसणारी; पण नियतीनं वेगळा बेत आखला म्हणून संघर्षमय आणि नाईलाजास्तव सामान्यांपेक्षा वेगळं आयुष्य जगण्यास भाग असणारी अनेक माणसे आहेत याकडे आपले लक्षही नसते किंवा लक्ष असले तरी अंगाला-मनाला काहीही लावून न घेता बिनदिक्कत झापडे पांघरून आपल्याला निघून जाता येते. पण अशी झापडं सगळ्यांनाच लावता येत नाही; अगदी त्यांनाही नाही ज्यांना स्वतःच मदतीची गरज असते; आपलीच झोळी फाटली असतांना ती उरलेली लक्तरं घेऊन इतर गरजुंच्या मदतीसाठी पुढे येतात. नागपूर शहराच्या वर्दळीमध्ये अनेक समाजघटक आपापल्या संघर्षांसह जगत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा, पण दुर्लक्षित समाजघटक म्हणजे तृतीयपंथी समुदाय. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेले हे लोक आजही स्वतःच्या अस्तित्वासाठी, सन्मानासाठी आणि समान हक्कांसाठी झुंज देत आहेत. आपल्या समाजाने स्त्री आणि पुरुष अशा दोन ठराविक चौकटी उभ्या केल्या; मात्र त्या चौकटीत न मावणाऱ्या तृतीयपंथीयांकडे अनेकदा संशय आणि उपेक्षेच्या नजरेने पाहिले गेले. शिक्षण, नोकरी, निवारा आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत हक्कांसाठीही त्यांना सतत सं...