Thursday 30 June 2016

शिंग फुंकिले रणी

हिला आंदोलन म्हंटले कि डोळ्यासमोर चितारते ती संघर्ष करणारी, विरोध करीत धरणे देणारी, निदर्शने, उपोषण करणारी महिला. खरेतर रोजच्या जीवनातही  प्रत्येकीचा वेगळा लढा सुरु असतो. आयुष्यभर तगमग करत जगण्याचा संघर्ष सुरूच असतो: पण त्यासाठी ती आंदोलने करीत नाही. धरणे देत नाही किंवा निदर्शनेही करीत नाही, म्हणून बरेचदा तिचा आक्रोश चौकटीपार पोचत नाही. 'जीवना हि तुझी मिजास किती' असे म्हणत सहन करत ती जगत राहते. अशी हि जगातील निम्म्या लोकसंख्येची शोकांतिका. पण आता जग बदलाची नांदी होऊ घातली आहे. एकीकडे भ्रूणहत्या, हुंडाबळी, बलात्कारासारख्या समस्या ..महिलांच्या जगण्याच्या अधिकारावरही प्रश्न निर्माण करणाऱ्या, वर्चस्व गाजवणाऱ्या... नरविविक्षित समाजातील अनेक विकृतींना तोंड देतांना तिला सोसाव्या लागलेल्या वेदना, करावा लागणार संघर्ष आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सतत लढतांना होणारी घालमेल. अश्या अनेक नकारात्मक बाबी ... त्यासाठी निर्माण केलेले नकारात्मक वातावरण... तर दुसरीकडे महिलांच्या तंबूत आता सकारात्मक निर्णयक्षमतेचे, सर्वक्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन मिळालेल्या यशाचे, शिक्षणाने आलेल्या ज्ञानातून प्रगल्भ वैचारिक अभिव्यक्तीचे वारे वाहू लागले आहेत. तिला तिच्या अधिकारांची जाणीव होऊन ते मिळवण्यासाठी जरा डगमगतच पण स्वेच्छेने ती लढते आहे. स्वतःसाठी कणखरपणे उभी राहते आहे. समाजात त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. हि जमेचीच तर बाजू आहे.

मागल्या वर्षीपासून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंचा प्रस्थापित रूढींवरचा एल्गार गाजतोय. शनिशिंगणापूर, शबरीमाला, हाजीअली दर्गाह अश्या अनेक धार्मिकस्थळी महिलांना विनाअट प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन छेडले आणि सगळीकडे वाद-विवादाचे पडसाद उमटले. हा विवाद सुरु असतानाच राजस्थानच्या दोन मुस्लिम महिलांनी त्या प्रदेशातील पहिल्या 'महिला काझी' असल्याचा दावा केला आणि उलेमांमध्ये विरोधाचा धुराळा पेटवून दिला. जहाँ आरा आणि अफरोज नावाच्या या दोन महिला मुंबईहून दोन वर्षांचे 'काझी' संबंधीचे प्रशिक्षण घेऊन आल्यात आणि आता त्यांना निकाह, तलाक, मेहेर यांसारख्या परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी अधिकार हवे आहेत.

भारतीय मुस्लिम समाजाचा परंपरागत चेहेरा आता बदलताना दिसतो आहे.  या समाजातील महिलाही त्यांच्या हक्कांसाठी पुढाकार घेऊ लागल्या आहेत. याची सुरुवात झाली ३ ते ५ ऑगस्ट २००७ रोजी पुण्यात झालेल्या एका राष्ट्रस्तरीय बैठकीत. हि बैठक भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाची बैठक होती. मुस्लिम महिलांचे असे पडद्याबाहेर येऊन उघड उघड संघटन प्रस्थापित करण्याची हि पहिलीच वेळ होती. देशभरातील सुमारे ३० मुस्लिम महिला प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होत्या. विविध राज्यांमधून या बैठकीला पाठिंबा मिळाला आणि आजमितीस त्याची सदस्य संख्या वेगाने वाढते आहे. या आंदोलनानंतर मुस्लिम महिलांचे धाडस वाढले, युगानुयुगे जखडलेल्या बेड्या गळून पडू लागल्या, लादलेली बंधने झुगारली जाऊ लागली आणि अन्यायाला वाचा फुटू लागली.
यानंतर या संघटनेने घडवून आणलेले काही बदल दखलपात्र ठरले.

> मुस्लिम महिला आंदोलनानंतर राजस्थानमधील ५ हजार मदरसे सांभाळण्याची जबाबदारी पहिल्यांदाच मदर्स बोर्डच्या चेअरपर्सन मेहरुन्निसा टांकयांना देण्यात आली.
> वक्फ बोर्डात पहिल्यांदाच एमएलए नसीम नावाच्या मुस्लिम महिलेला सामील करण्यात आले. मुस्लिम कायदेविषयक संशोधन करतांना कमिटीत निदान दोन महिला सदस्य असणे अनिर्वार्य असल्याचा नियम पहिल्यांदाच पारित झाला.
>  भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या सदस्यांनी एकमताने महिलांच्या अधिकारासाठी मसुदा तयार केलाय, त्याला कायदेशीर दर्जा देण्यासाठी मुस्लिम महिलांची मोहीम अजूनही चालू आहे.
> याच संघटनेने हल्लीच देशभर मोहीम राबवली. तीन तलाक कायद्याविरुद्ध ४,७१० मुस्लिम महिलांची मत नोंदणी केली. या मोहिमेद्वारे 'मुस्लिम पर्सनल लॉ' मध्ये सुधारणा करण्यासाठी संघटना प्रयत्नरत आहे. याचे पडसाद संपूर्ण देशात पसरून त्यांच्या हक्कांबद्दल आता खुल्या व्यासपीठांवर चर्चा होऊ लागली आहे.


भारतीय मुस्लिम स्त्रीचा लढा असूदेत किंवा देशभरातील कुठल्याही धर्म-पंथातील महिलेचा : एक लक्षात घेणे आवश्यक आहे कि, हा लढा पुरुषांविरुद्धचा नाही, प्रथा-परंपरांविरुद्धही नाही. तिचा लढा बुरखा आणि तलाक यांच्या पलीकडचा कायदेशीर हक्कांचा आहे तसा तो तिच्या जन्मजात मिळालेल्या नागरिकत्वाचा, मानवी हक्कांचा आणि अस्तित्वाचा आहे आणि त्याची आत्मप्रतिष्ठा जपण्याचा देखील आहे. आज संघटित झालेल्या महिला एकजुटीने कार्य करीत प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होतांना दिसताहेत. आत्मविश्वासाने याच समाजात स्वाभिमानाच्या पाऊलखुणा उमटवत अनेक यशोगाथा साकारताहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येक टप्प्यांवर स्त्रियांच्या प्रश्नांचा पुनर्विचार होऊन त्यावर सारासार चर्चा घडून समाजमनही बदलू लागले आहे, हीच पुढल्या पिढीसाठी सुखाची नांदी आहे. प्रत्येक जीवितांना सामान अधिकार असणाऱ्या आदर्श समाजाची स्वप्ने पाहणाऱ्या नागरिकांसाठी हि समाधानाची बाब आहे.




(नागपूरच्या दैनिक सकाळ मध्ये दर बुधवारी प्रकाशित होणाऱ्या 'मी' पुरवणीत प्रकाशित झालेला लेख)

Wednesday 29 June 2016

मेरे घर आना जिंदगी ...




तो उपाशीच निघून गेलाय म्हणून दिवसभर तिचं मन लागलं नाही. आपण फार दुखावलं त्याला विचार करून तिच्या मेंदूचा भुगा झाला होता.

तिची संध्याकाळही तशीच धुरकट होत गेली. अक्ख्खा दिवस ओघळता गेला बाहेर आकाशी मेघ दाटलेले अन इकडे मनात मळभ, डोळ्यात ओल साठली राहिली दिवसभर. अश्रूंचा पाऊस कोसळत राहिला. कालरात्री त्याचं अन तिचं असं भांडण झालं. तो सकाळी न बोलताच निघून गेला. निघून जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघतच राहिली. त्यानं एकदाही पाठी वळून पाहिलं नाही. 'रात्रभर माझी अवस्था काय झाली असेल ह्याच्याशी ह्याला कसलेही देणेघेणे नाही' तिला हुंदका आवरला नाही अन मग सगळंच ओसंडून वाहू लागलं. 'माझ्या भावनांची किंमतच नाही याच्या लेखी' तिला पुन्हा भळभळून आले.

काल प्रसंगच तसा घडला होता ..

त्याला आवडते म्हणून कित्तेक दिवसांनी तिने हातभर मेहेंदी लावली होती. स्वतःच्या हातांकडे अन त्या गडद रंगलेल्या मेहेंदीने खुललेल्या सौंदर्यास बघून तिलाच कसलं अप्रूप वाटत होतं. सकाळी ती कुठली कुठली कारणे शोधून त्याच्या पुढे पुढे करत राहिली पण तो त्याच्या टॅबमध्ये तोंड खुपसून बसलेला. कामात प्रचंड मश्गुल झालेला.
मग तिने शक्कल लढवली. .. तिला मोगरा आठवला ...

मोगरा त्याला कित्ती आवडायचा... लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातले ते मोहमयी गंधाळलेले दिवस आठवले. तिच्या लांब केसांत माळलेला मोगरा पाहून तो वेडावून जायचा. कित्तेक वेळ तिच्या जवळ जवळ करत असायचा, तिच्या केसात मान घालून मोगऱ्याच्या गंधान धुंद व्हायचा .... तिला आठवलं, चेहेऱ्यावर खट्याळ स्मित आलं. धावत अंगणात जाऊन ओंजळभर मोगऱ्याची फुले ती घेऊन आली. छनछन करत आत येऊन त्याच्या पुढ्यात उभी झाली अन मेहेंदीने रंगलेली मोगऱ्याची ओंजळ त्याच्या पुढ्यात धरली. त्याने वर न बघताच त्यातली दोन फुले वेचली, नाकाशी नेली हुंगली अन पुढ्यात ठेवलेल्या टी-पॉयवर ठेवून दिली. ती
फारच हिरमुसली, उदास झाली. मेहेंदी भरल्या हाताकडे कटाक्ष टाकला आणि वळून जायला लागली तेवढ्यात त्याने आवाज दिला.
'मने'

'आह्ह ! त्यानं बघितलंय'

तिच्या गालात हसू खुललं.‌. ती वळली ...

तो म्हणाला

"अगं ऐक ना, आपली आता यावेळची ही २५ लाखांची बिजनेस डील पूर्ण झाली ना की आपण मोठी गाडी घेऊया मस्त प्रशस्त आपल्या स्टेटसला शोभेल अशी...त्याचेच फोटो बघतोय .. कसली साली सुंदर कार आहे बघ .."

तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं... त्याच्या २५ लाखाच्या स्वप्नात तिचे २५ रुपयांचे सत्य विरून गेले होते. मनभर पसरलेला आनंद करपून निघाला होता आणि त्याला जाणीवही नव्हती. तिने टी-पॉयवर ठेवलेल्या फुलांना हाताने चुरगाळून फेकून दिले अन ती रडतच निघून गेली. अर्ध्यारात्री कधीतरी त्याने तिच्या अंगावर हात ठेवला अन तिचा बांधच फुटला.

"मला विकलं तर कित्ती पैसे मिळतील रे... तेवढ्या पैशात तुझ्या स्टेटसला शोभेल अशी कार येईल का?"

तिने ओघळत्या आसवासह प्रश्न केला अन तोही चिडलाच ..

"आता आता कुठे यश मिळायला लागलंय खुपतंय का ग तुला?? बघवत नाहीये का??"

तिला बोलले ते शब्द अन मग सारेच विस्कटले. संपूर्ण रात्र गडद अधिक गडद होत गेली.

******************************

ती तशी स्वप्नाळू. आयुष्याच्या लहान लहान गोष्टींमध्ये सुख शोधणारी. प्रेम हाच जगण्याचा आत्मा समजणारी. 'तो' म्हणजेच तिचं सारं विश्व. त्याच्यासोबत हातात हात घेऊन आली तेव्हा संसाराचे किती किती स्वप्न पाहिले होते तिने. राजाराणीचा संसार. त्यानं कमावून आणलेल्या चार आन्यातही संसार थाटू एक भाकरी मिळाली तरी वाटून खाऊ पण दोघात अंतर येता कामा नये. प्रेमात गळती होता नये. नंतरही कित्तेक अडचणी आल्या, संकट ठाण मांडून बसले पण तिचे सगळे वागणे सगळ्या क्रिया प्रतिक्रिया त्याच्यासाठीच असायच्या. त्याच्याच अवती-भवति तिचं आयुष्य फिरायचं. त्याचं मात्र वेगळं होतं. तिला मिळवायला जितकी धडपड त्याने केली होती ती मिळताच ती संपली. टार्गेट पूर्ण झाले होते. त्यानंतर त्याचा प्रवास सुरु झाला तो पैसा, प्रेस्टिज आणि प्रोग्रेस मागे धावण्याचा. पुढली सगळी धडपड मोठा माणूस होण्याची. त्याच्या मोठमोठ्या स्वप्नात तिची छोटी छोटी स्वप्न झाकोळली गेली. पण तरीही ती खुश होती, संसार सांभाळत जपत जगत होती. थोडा पैसा मिळाला कि संपेल आपली हि जगण्याची तगमग ती स्वतःला समजवायची. पण थोडा पैसा आला कि सुरु व्हायचा प्रवास दुसरे टार्गेट पूर्ण करण्याचा. त्याचा प्रवास श्रीमंतीकडे आणखी पुढे आणखी पुढे न संपणारा ....आणि तिचा प्रवास मात्र संपला होता ती थिजली होती जागीच त्याची वाट पाहण्यात. सकाळी जाऊन संध्याकाळी परत आलेला नवरा येऊनही परत यायचाच नाही तो मनाने तिथेच असायचा कामाच्या भाउगर्दीत, पैशांच्या हिंदोळ्यावर झुले घेत. त्याच्याच आसपास वावरणारं तिचं अस्तित्व तर कित्तेकवेळा त्याला जाणवायचंही नाही. खरतर त्याच्या लेखी या सगळ्याचं महत्वही नव्हतच. तिच्या लेखी सुख पैशान मिळणार नव्हतच. ते तिथेच पडलं होतं घरात त्यांच्या शयनकक्षेच्या कोपऱ्यात खितपत.... दुर्लक्षित.

दाराची बेल वाजली तिची विचारांची तंद्री भंगली, अंधारलं होतं सगळीकडे.... 'बापरे, अक्खा दिवस असाच निघून गेलाय ...विचारात' तिने लगबगीने डोळे पुसले. दिवे लावले अन ती दार उघडायला धावली.. दाराजवळ जाउन उंच श्वास घेतला स्वतःला सावरलं अन दार उघडले .... पुढ्यात तो उभा होता तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्याकडे बघत, लाल झालेले डोळे त्याचीही अवस्था दिवसभर तिच्यासारखीच असल्याचे सांगत होते. तो सुखरूप होता न कळत तिच्या मनात समाधानाची कळ पसरली ... थोडं संकोचतच ती वळली अन आत आली. त्याच्यासाठी काहीतरी खायला करावं म्हणून स्वयंपाक घरात गेली. दोन पाच मिनिटे गेली असतील त्याचा स्पर्श जाणवला तिला. तिच्या लांब सडक केसांत तो मोगऱ्याचा गजरा माळत होता. तिचे डोळे भरून आले. त्याने तिला डायनिंगच्या खुर्चीवर बसवले. तिचे मेहेंदीने रंगलेले दोन्ही हात हातात घेतले. ते डोळ्याला लावले अन स्वतःचा चेहेरा त्या हातांनी झाकून घेत उर भरून श्वासात तो गंध भरून घेतला. ती हे सगळं अवाक होऊन बघत होती .... त्याने शेजारच्या खुर्चीतली पळसाची फुले उचलली अन तिच्या ओंजळीत ठेवली. पळसाची फुले बघताच तिचे सगळे अवसान गळून पडले. ती हमसून हमसून रडू लागली ......... हि पळसाची फुले तिच्या आवडीची. लग्नाआधी ती दोघं भेटायची त्या स्थळी असलेल्या एका झाडाला येणारी ..शहरापासून २५ किमी दूर असलेले. तो तिथे जाउन आलाय आपल्या विरहात तोही तितकाच व्याकूळ होता हे लक्षात आले तिच्या अन रडतच तिने मिठी मारली त्याला .... पळसाच्या केसरी रंगात गैरसमजाचे सगळे रंग उडून गेले होते. अन मोगऱ्यासारखी दोघांचीही मनं शुभ्र गंधमय होऊन फुलून आली होती ....

आणि तिच्या मनात अमृता प्रीतमच्या ओळी रुंजी घालू लागल्या

जिंदगी के उन अर्थो के नाम _ जो पेडों के पत्तों की तरह चुपचाप उगते हैं और झड जाते है!!!!
दूर कुठेतरी रेडिओ वाजत होता ....

मेरे घर आना ... आना जिंदगी .... जिंदगी

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण





'मन' तसे पाहिले तर छोटासा दोनाक्षरी शब्द. पण आयुष्याच्या आठवणी, कित्तेक घटना, कुठकुठली स्वप्नं, आणि कित्तेक गुपितं ते आपल्या इतकुश्या कुपीत दडवून ठेवत असतं. मन दिसत नाही पण असतं. मनाला स्पर्श करता येत नाही पण पाहिलेल्या अनुभवलेल्या कित्तेक गोष्टी मनाला स्पर्शून जातात. भावनेच्या आहारी जाऊन आपण चुकतो अनेकदा पण मनाला धारेवर धरता येत नाही. मन मात्र कधीही अन कुठेही आपल्याला चिमटीत धरू शकतो. म्हणूनच म्हणतात ना 'मन मनास उमजत नाही, काही केल्या समजत नाही' पण मनात आहे ते मिळवणं किंवा मनासारखे घडतांना बघणं किती आनंददायक असतं. म्हणजे मन हसतं, मन रुसत, मन खट्याळही असतं. समर्थ रामदास स्वामींनी मनाला उद्देशून मनाचे श्लोक लिहिले. त्यांनी मनाला अचपळ, नाठाळ, अनावर अशा किती प्रकारांनी संबोधले. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 'मन हे राम जाले'  म्हणजेच संत अन महापुरुषांनाही मनाचे माहात्म्य मान्यच होते. मानसोपचार आपल्याकडे फार महत्त्वाचे मानलेले आहेत. मानसपूजा खरी पूजा मानली जाते. मनासारखं वागावं, स्वच्छंदी मनानं जगावं हा आजच्या तरुण पिढीचा दृष्टिकोन आहे. मन जिंकणे, मनीमानसी नसणे, अचपळ मन असे अनेक वाक्प्रचार रोजच्या बोलण्याचा भाग आहे.

असे हे मन नसतेच तर जगणे किती यंत्रयावत झाले असते ना. त्याला दुःख नसते, सुख नसते, आवडी निवडी नसत्या तर काय केले असते आपण? चंचलता हा मनाचा स्वभाव आहे़. वाऱ्या पेक्षाही वेगवान आणि पाऱ्यापेक्षाही धरायला कठीण असलेलं मन,  पण जगण्याचा खरा आत्मा आहे. तेव्हा त्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. मनाचं स्वास्थ्य प्रत्येकाने जपलंच पाहिजे मनःस्वास्थ्य बिघडणं कुठल्याही इतर रोगांहून वाईट असतं. प्रत्येकाच्या मनःस्वास्थ्याशीच समाजस्वास्थ्य जुळलेले असते. समाजातील प्रत्येकाची सुदृढ मनःस्थिती ही सर्वोच्च महत्त्वाची आहे. त्यासाठी सकारात्मकता बाळगावी. आनंदी राहावे. आवडेल ते करावे. छंद जोपासावे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि हे करीत असतांना मार्गक्रमण करतांना त्या प्रवासाचाही आनंद घ्यावा.

रश्मी / २९/०६/२०१६


('दैनिक सकाळ' च्या 'मी' पुरवणीत प्रकाशित झालेला लेख )









Monday 6 June 2016

पाव शतकाचा 'आक्रोश'




माणूस आपला आहे कि परका, मित्र आहे कि वैरी हा विषयच नसतो बरेचदा. तुम्ही स्त्री म्हणून जन्म घेतला असेल तर तुमच्या सुरक्षिततेची जबाबदारी सर्वस्वी तुमची असते. तुमच्या पुढ्यात उभा असणारा पुरुष  तुमच्या कितीही विश्वासातला वाटत असला तरी त्याच्यातला नर कधी जागा होईल आणि तुम्ही मादी आहात म्हणून तो तुमच्यातल्या स्त्रीचा चुराडा करत माणुसकीला काळिमा फासेल याचा नेम नाही. नवं वर्षाच्या उत्सवात पुरुषांच्या घोळक्यात आब्रू वाचवत पळत सुटणाऱ्या मुली काय किंवा मोनिका घुरडे, आयआयटीएन स्वाथी किंवा पुण्यात इन्फोसिसच्या रसीलाची हत्या काय अशी अनेक उदाहरणे आपण रोज रोज बघत असतो. हल्लीच दिल्लीत झालेली घटना सगळ्यांच्याच स्मृतीपटलावर ताजी आहे. ओळखीच्या मुलाने घरी सोडून देण्याच्या निमित्ताने मुलीला मित्राच्या फ्लॅटवर नेऊन स्वतःसकट इतर ४ मित्रांच्या हवाली केले. पहाटेच्या सुमारास तिने जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारली आणि घडली घटना पोलिसांना सांगितली. माध्यमांनी ती देशभर प्रसारित केली. अनेकदा जवळचा मित्रच 'ती' च्या परवानगी शिवाय तिच्यावर त्याच्या इच्छा थोपवतो, ती नाही म्हणत असतांनाही त्या पूर्ण करून घेतो. 'नाही म्हणजे नाहीच असतं, नाही शब्दाचा अर्थ नाही असाच होतो' याच अर्थाचा अमिताभ बच्चनचा 'पिंक' सिनेमा देखील 70MM वर आला आणि प्रचंड गाजला. पण आजही स्त्रीची मर्जी, तिची इच्छा तिची परवानगी हा फार गांभीर्याने घेण्याचा विषय मानला जातच नाही. तिला सुदैवच गृहीत धरल्या जाते आहे. पण आज हा विषय जेव्हा महत्वाचा वाटून त्यावर चित्रपट बनताहेत किंवा चर्चा झडताहेत याची सुरुवात मात्र केटी नावाच्या युवतीने २५ वर्षांपूर्वीच केली होती. त्यासाठी तिला दीर्घकाळ लढा द्यावा लागला ...तिच्याच संघर्षाची हि कथा.

३ जून १९९१ हा दिवस विशेष दिवस म्हणून कायद्यात कोरला गेला त्याला कारण ठरली केटी कोएस्तनर नावाची १८ वर्षीय तरुणी. त्यावेळी केटी या नवंमहाविद्यालयीन विद्यार्थिनीचा फोटो 'टाईम्स' मासिकाच्या कवर पेजवर प्रसिद्ध झाला होता, हे पहिल्यांदाच घडले आणि संपूर्ण अमेरिकेत चर्चेला पेव फुटले. केटीवर बलात्कार झाला होता, तिला न्याय हवा होता इतकेच नाही तर त्यासाठी तिने स्वतःच एल्गार पुकारला होता. तिच्या समर्थकांच्या आणि त्याहून अधिक विरोधकांच्या फौजा तयार झाल्या. प्रचंड उहापोह, कोलाहल ... आणि पहिल्यांदाच 'डेट रेप' संकल्पना अस्तित्वात आली.

केटी प्रथमच कॉलेजला जायला लागली होती. पहिल्या काही दिवसातच तिची भेट आकर्षक व्यक्तिमत्वाच्या एका तरुणाशी झाली, हळूहळू ओळख मैत्रीत बदलली. एका रात्री कॉलेज पिकनिकच्या दरम्यान रात्री जेवणानंतर वेळ घालवण्यासाठी केटी अन तो तरुण रूममध्ये एकटे गाणी ऐकून डान्स करीत असतांना त्याने तिच्यावर बळजबरी केली. केटीने विरोध करूनही तो केटीला समजावण्याचा अन शांत करण्याचा, मनावण्याचा प्रयत्न करीत राहिला, आणि शेवटी तिचा नकार न जुमानता केटीचा बलात्कार झाला. या घटनेला आज २५ वर्ष झाली.  या प्रसंगाची आठवण करतांना हळवी होत केटी म्हणते ''लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी मी जे सुंदर स्वप्न मनःपटलावर जपून ठेवले होते त्याचा त्या हॉटेलच्या खोलीतल्या जमिनीवरच्या गुलाबी कार्पेटवर चुराडा झाला होता. माझ्या शरीरासकट माझ्या भावनांचा, आत्म्याचाही बलात्कार झाला होता'

केटी लगेच दुसऱ्या दिवशी हेल्थ सेंटरला गेली पण तिच्यावर घडलेला प्रसंग ऐकूनही तिला निव्वळ झोपेच्या गोळ्या देऊन परत पाठवले गेले. तिथल्या अधिकाऱ्यांना-डॉक्टरांना तिने पुनर्विचाराचा सल्ला दिला पण सर्व व्यर्थ. तिच्या वडिलांनीही तिलाच दोष दिला ''तू एकट्या मुलासह त्या खोलीत गेली नसतीस तर तुझ्याबरोबर असं वाईट कृत्य कधीच झालं नसतं'' वडिलांचे हे शब्द तिच्या मनावर अधिक घाव करून गेले....आपल्याला हा लढा एकटीने लढावं लागणार आहे याची तिला प्रकर्षाने जाणीव झाली. मात्र तिने हार मानली नाही, न्यायालयातही तिच्यावरच ताशेरे ओढले गेले, लाजिरवाणे आरोप झाले. ''बळजबरी होत असतांना त्याला पूर्ण ताकदिनीशी विरोध करून बलात्काऱ्यास थांबवायला हवे होते असे बिनबुडाचे सल्ले तिला भर कोर्टात देण्यात आले. तिच्या मागणीवर क्रिया करून तिच्या बलात्काऱ्यास कॉलेजच्या त्या सत्रासाठी बेदखल करण्याआधी तिच्या महाविद्यालयाने तिला तिच्या आरोपीशी सौहार्दाने घेऊन जुळवून घेण्याचा हास्यास्पद सल्ला देखील दिला. केटीसाठी हे सगळंच खूप मनःस्ताप देणारे होते. तिच्यावर झालेल्या अन्यायापेक्षाही बलात्काऱ्याबद्दल सगळ्यांना माया दाटून येते आहे आणि उलट तिलाच चुकीचे ठरवले जाते आहे हे तिच्या त्यावेळच्या कोवळ्या वयातल्या आकलनशक्तीच्या आणि सहनशक्तीच्याही पलीकडचे होते.

शेवटचा उपाय म्हणून अंततः केटीने लोकल वृत्तपत्रांना पत्र लिहिली आणि महाविद्यालयीन कॅम्पस मधून आंदोलनं सुरु केली. तिची बातमी हळूहळू राज्यस्तरीय मुद्दा ठरू लागली, माध्यमातून बुद्धिवंतांच्या चर्चा झडू लागल्या. पण त्यातल्या बऱ्याच या केटीच्याच विरोधातल्या होत्या. तरुण वर्गातही तिचेच विरोधक जास्त होते विरोधाची सीमा म्हणजे जवळ जवळ २००० विद्यार्थ्यांनी केटी विरुद्ध याचिका दायर केली. त्या सर्वांनी केटी खोटं बोलत असल्याचे याचिकेत म्हंटले होते. पुढे तिचा लढा अधिक तीव्रतेने चालत राहिला. पुढे तिचे म्हणणे, तिचा संघर्ष लोकांना हळूहळू कळू लागला. केटीने पुन्हा एकदा अमेरिकन लोकांचा विश्वास संपादन केला होता.

 या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाली आहे. केटीच्या या पहिल्या-वहिल्या ''डेट रेप'' केस नंतर अश्या घटनेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला. आज केटी बलात्काराने पिडीत महिलांसाठी समुपदेशनाचे कार्य करीत आहे आणि जनजागृती करत गरजूंसाठी मोफत वकिलीही करते आहे. ती म्हणते ' महिलेच्या परवानगीशिवाय तिच्या इच्छेविरुद्ध केलेले शरीरसंबंध बलात्कारच आहेत. तिच्या मर्जीचा, तिच्या भावनेचा मान राखलाच जायला हवा.'' केटीने जे काही भोगलंय ते पुढे कधीही इतर कुठल्या स्त्रीला भोगावे लागू नये म्हणून केटीचे प्रयत्न अजूनही सुरुच आहेत.

   

रश्मी पदवाड मदनकर / 06 jun 2016 

(१५ जून २०१६ ला  'सकाळ' च्या ''मी'' पुरवणीत प्रकाशित )

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...