Posts

Showing posts from January, 2021

दहा मिनिटे ..

 सतत तुझा पाठलाग....  सतत वाट पाहणं  तू कधी येणार आहेस? दहा मिनिटानंतर....पण कोणत्या? अनेक शतकं लोटून जातात तुझी वाट पाहण्यात तरीही तू येत नाहीस पुढल्या कुठल्याच दहा मिनिटात तुझ्यासाठी मी फक्त एक 'आठवण' चौकटीसारखी  तू आतल्या प्रतिमा बदलत राहतोस वेगवेगळ्या अस्तित्वाच्या..  दहा मिनिटे ही अशी युगप्रवर्तक परिवर्तीत होऊ शकली असती.... दहा मिनिटांसाठी तू 'मी' आणि मी 'तू' झाले असते केवळ दहाच मिनिटे तू बघितली असती माझी वाट आणि अनेक युग जगला असतास माझ्या विरहात आणि इतके करून तू निव्वळ  'आठवण' म्हणूनच उरला असता..  तुझ्या या बेपर्वाह प्रतिभाशाली वागण्याची मी ही झाले असते साक्षी  आणि वेदना माझ्या मनीच्या तुलाही भोगता आल्या असत्या   .... देशील का तू ही दहा मिनिटं ......दोघेच जगूया ही दहा मिनिटं अशी अनेक युगाच्या गर्भात दडलेली सगळी दहा मिनिटं येऊ शकतील आपल्या वाट्याला..... एकमेकांच्या जगण्याला .. कुणाच्याही पाठ्लागाशिवाय..... देशील का?......... सांग दहाच मिनिटांसाठी येशील का??
Image
 आभाळाशी नाते माझे धरतीशी बंध सारे मेघ होते बरसते गार ओले होते वारे वाऱ्यावर झुलते मी ऊन घेते लपेटून माती अंगी लिंपुनीया घेते गंध समेटून बोरी बाभळीची लेक काट्या फुलात फिरते रानीवनी जीव वसे  झाडावेलीत डोलते डोळी तळा साठवते  धुंद धुक्याशी बोलते  अंगोपांगी पानोपानी  दव होते पाझरते  संध्याकाळी क्षितिजाशी मत्त होते तेजाळते पाश सारे सोडवून मौन होते मावळते. रश्मी प म ..
 खुप गहिवरून हाक दिली तरी  चंद्राला नसतं देणंघेणं.. तो मग्न असतो त्याच्या दुनियेत  काळ्या सावळ्या ढगात  अनंत चांदण्यांच्या गराड्यात..  कधी पौर्णिमा होण्यात, कधी अमावस होण्यात सहज चमकून येण्यात, बरंच गहाळ होण्यात.  ती टिकून असते तीथेच, थिजून असते जागीच  वर्षानुवर्षे वाट पाहत.. एका कटाक्षासाठी.. एकेका हाकेसाठी.. न ढळणारी‌ धृव बनून ...

जयवंत काकडे ‌- व्यंगचित्रकार

Image
 #भेटलेलीमाणसे -७ हे आहेत जयवंत काकडे ‌- अनेक वर्षांपासून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यंगचित्रकार, लेखक  असलेल्या जयवंतजींचे व्यंगचित्र यंदाच्या आपल्या 'अनलाॅक' दिवाळीअंकात प्रकाशित केले होते, म्हणून जेव्हा वरोराला जाणं झालं आणि त्यांना प्रत्यक्ष भेटायचा विषय निघाला तेव्हा रात्री उशिर होत असतानाही दहा मिनीटं भेटायचच ठरलं.. दहा मिनीटांचा तासभर कसा झाला ते मात्र कळलंच नाही, पण त्यांना भेटून-बोलून जे समाधान मिळालं त्याला तोडच नाही... त्यांच्याबद्दल जे काही ऐकून वाचून होते त्यावरून माझ्या मनातली त्यांची छबी फार वेगळी होती.. त्यांना प्रत्यक्ष पाहीलं तेव्हा कितीतरी दशकं रसिकांचे मनोरंजन करणारे..एका एका कार्टुनमधुन मोठा आशय मांडत, वैचारिक खाद्य पुरवणारे. महाराष्ट्रभर स्वतःचे लाखो-करोडो चाहते निर्माण केलेला एखादा कलावंत इतका साधा इतका जमिनीवरचा असेल असं वाटलंच नाही. आजवर फक्त ऐकून होते पण 'साधी राहणी उच्च विचार' मी त्या दिवशी ह्याची देही ह्याची डोळा अनुभवले.  एखाद्या जुन्या आधारवडासारखा जुना-जर्जर पण खंबीर ठाम उभा असलेला वाडा. आजी-आजोबांनी गोष्टी सांगताना कल्पनेत दिसतो...
 मौन म्हणजे उणीव, उणीव शब्दांची  जशी उजेडाची उणीव अंधार म्हणजे  अंधारात नसतात पण 'सावल्या' दिसतात उजेडात  उजेडात दिसणारी सावली अंधारासारखीच...काळीकभिन्न  तश्या सावल्या असतील का शब्दांना ? शब्दांना मौनाच्या सावल्या … शांतसुन्न !!  रश्मी..