Thursday 21 September 2017

मला ना एकदा नदी व्हायचंय..!!







मला ना एकदा नदी व्हायचंय.. !!


प्रवाही. अवखळ तरीही निस्सीह, शांत. संयमी..जन्मापासून हजारो मैल प्रवास करत न थकता न दमता चैतन्याचे तुषार उडवत.. मार्गात येणाऱ्या मोह माया त्यागत.. एखाद्या ऋषीकन्येचा संयत तेजस्वी भाव लेवून, जुनाच वेष धारूण, वेग आवेगही पांघरून. एकाच दिशेनं, जुन्याच वळणानं लयबद्ध ताल धरत, डोंगर दर्या कपारी पार करत, एखाद्या रणरागिणीप्रमाणे खोल दरीत स्वतःला झोकून देऊनही पुन्हा निश्चयाने कणखर होणारी. अविश्रांत धावत प्रवाहात स्वतःला सामावून घेत अधीक प्रगल्भ होत असोशीनं वाहत राहणारी. सदैव त्याच जागी भेटुनही तीथे न साठणारी रोज दिसणारी तरीही नवी भासणारी..लावण्य सुंदरी...भर दिवसा तळपत्या सुर्याची किरणं आत आत शोषून घेणारी..संध्याकाळी तांबड्यात न्हावून निघणारी अन चंद्राची शितल काया अंगभर लपेटून दिवसभराचा दाह शमवून घेणारी..पिढ्यांच्या रितीभाती..प्रथा परंपरांना मोठ्या मनानं पोटात घालून मायेचा डोंगर पेलणारी..गर्भातल्या जिवांना अंगाखांद्यावर खेळवत.. जागवणारी-जगवणारी ममतामयी मानीनी..सर्व विश्वाचा रंग तिच्यात येऊन मिसळूनही ती तीचा रंग मात्र बदलत नाही. रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा म्हणत ती नित्य नवे गीत गात जाते. मोठ्या दिमाखात डौलात खुळखुळ करत वाहत राहते.


ती कुणाचसाठी थांबत नाही.. ऋतू बदलतात, काळ बदलतो..पिढ्या न पिढ्या ती अखंड अविरत पुढे पुढे धावत राहते निरंतर.. तीच्या प्रवाहात येतो तो तीचा होतो..ती सामावून घेते स्वतःत सगळ्यांना..तिचा एकसुरात-एकलयीत येणार आवाज अध्यात्मिक तादात्मतेची अनुभूती देणारा. जणू वर्षानुवर्षे साधना करणारी एखादी तपस्विनी मंत्रोचारात मग्न आहे. हेच अध्यात्माचे तेज अंगांगावर लेवून.. ओजस्वी, निर्मळ, शीतल काया लपेटून तारुण्याने मुसमुसलेली, ताजीतवानी तरीही मातृत्वाचा शेला चढवून प्रवासाचा टप्पा गाठत मार्गक्रमण करणारी.

तीच्या मार्गातील गाववेशीतल्या, प्राणी-पक्षांची, पांथस्थाची तृष्णा भागवणारी, रानोवनी..कडीकपारी मळा फुलवत नेणारी सर्जनशीलतेच्या सर्व सिमा लांघून मायेच्या शिडकाव्यानं गरिबाचं शेत समृद्ध करित झुलणारी..कुठलाही अभीनिवेश न आणता सृजन करणारी ..जीवनदायिनी..


मला ना एकदा नदी व्हायचंय....सागराला भेटण्याच्या असोशीने मजल दरमजल प्रवास करत, हजारो मैलाची झुंज. संघर्ष पेलत शिणलेली, रापलेली, सोललेली काया विरघळून टाकायचीय. दमला भागला जीव मुठीत घेऊन शेवटच्या आवेगानं सागराच्या कुशीत स्वतःला झोकून द्यायचंय.स्वतःचं अस्तित्व पेरत आले तरी त्याच्यात सामावून हरवून जायचंय, होती नव्हती ओळख पुसून टाकून, प्रवासातल्या सगळ्या जखमांच्या दुखऱ्या खपल्या आणि अंगावर गोंदलेल्या अनुभवाच्या कथा विसर्जित करून उरलेले अस्तित्व विरून जाईपर्यंत त्याच्या अंतःकरणात तल्लीन व्हायचंय..सरीतेचा सागर व्हायचंय ..

मला ना एकदा नदी व्हायचंय.... !!


रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com

२१/०९/२०१७

Tuesday 19 September 2017

आतल्यामास्तरीणबाई ... पत्र - 3

#आतल्यामास्तरीणबाई
आतल्या मास्तरीण बाई - रश्मी पदवाड मदनकर
पत्र - 3
होऊन जाऊ दे ..
परवा दुपारी फोन आला मावशींचा, म्हणाली 'अगं पुरणपोळी केलीय, आवडते ना तुला, म्हणून खास फोन केला. संध्याकाळी ये जेवायला'. मी बाहेरगावी होते. नाही येऊ शकणार बोलले तिला. त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली. पण फोन ठेवतांना ती जरा नाराजीतच म्हणाली 'बघ तुला कळत नाहीये तू अत्यंत चविष्ट अस काहीतरी मिस करतेय.' मी निव्वळ हसले. मावशी स्वयंपाक छानच करते हे नाकारता येणारच नाही, पण आज तिला मला बोलवावं का वाटलं बरं, स्वतःचच असं कौतुक करावं वाटलं. खरच पन्नास वर्षांच्या आयुष्यातील या वेळी तिने केलेलं पुरण सर्वोत्कृष्ट असेल? की उगाच मग स्वतःचीच पाठ थोपटणं ....
अरेरेरे हे एवढं आलंच मनात अन मास्तरीण बाई जाग्या झाल्या ....
**********************************
सोन्या
आयुष्य जगतांना आपण अनेक आवडत्या गोष्टी वेचत पुढे जात असतो. पाहिलेल्या, रुचलेल्या, स्पर्शलेल्या बाबी अंगात भिनवत असतो. एखाद्याचे अंगीभूत गुण नाही आत्मसात करता आले तरी त्यांच निदान तोंडभरून कौतुक करीत असतो. एखाद्या छंदाने नाद नाहीच सोडला तर ते मिळवायला, आत्मसात करायला आयुष्याचा कित्तेक काळ खर्ची घालतो. स्वतःला त्या त्या तंत्रात फिट बसवायला, परफेक्ट व्हायला मग जीवाचे रान करतो. कधीतरी पोचतो तिथवर. इतके कष्ट करून मिळवलेल्या आपल्याच एखाद्या गुणाचं आपण स्वतःच कौतुक केलं तर तो गुन्हा का ठरावा?
तुला आठवतं, मागल्या महिन्यात एका सांगीतिक कार्यक्रमात गेलेलो आपण. गायिका एकेक बंदिश गात होती. आणि आपण आरोह, अवरोह, पकड, आलापात धुंद होत होतो. तिनं असं काही तिच्या स्वरात, आवाजात गुंतवून ठेवलं कि कशा कशाचंच भान नव्हतं. प्रत्येक आलापाला तोंडून 'वाह' बाहेर पडायचं आणि ते अगदी सहज घडायचं. कौतुक करायची वेळ आलीच तर कुठला तुकडा वगळावा आणि कुठल्याचे तोंडभरून कौतुक करावे हा प्रश्नच पडला असता..नाही?. गाणी संपली आणि गायिकेला व्यासपीठावर बोलण्याचे आमंत्रण आले. शेवटच्या संबोधनात तिनं तिच्याच घेतलेल्या कुठल्याश्याय गीताच्या विशिष्ट आलापाचं मनमोकळं कौतुक केलं आणि तू अवाक झालीस ... का? तिन गायलेलं तिनं आवडून घ्यायचं नाही असा नियमबियम आहे की काय गं?
आपण एखाद्या कलेचा आस्वाद घेतांना त्याच्या कलेची इतर कलाकारांशी तुलना करीत असतो...परंतु कलाकार स्वतः त्याच्या कलेची तुलना हीत्याच्याच आधीच्या निर्मितीशी करीत असतो.....ज्या दिवशी त्याला त्याच्या पूर्वीच्या सर्व सादरीकरणाहून एखाद्या क्षणी उत्तुंग आनंद, समाधानाची जाणीव होते त्यावेळी त्याने त्याच्या नजरेतल्या त्या उत्कृष्ट कलाकृतीला 'वाह' दिलीच तर त्यात गैर काय?
एखादा क्षण त्या कलाकाराच्या गुणांची परीक्षा घेणारा ठरतो गज़लकाराचा शेर, कवितेचा काव्यार्थ, लेखकाचा अन्वयार्थ आणि चित्रकाराला अभिप्रेत भावार्थ हा उत्तम रीतीने रसिकांपर्यंत पोहचला पाहिजे हा मुख्य उद्देश असतो. रसिकांच्या दृष्टीने कलेचे सादरीकरण व्हावे हा ध्यास असतो अनेकदा हि परीक्षा त्याने यशस्वीपणे पार केलेली असते. पण स्वानंदाचा, आत्मतृप्तीचा एखादाच क्षण उद्भवतो तो क्षण आत्तापर्यंतच्या सर्व क्षणांच्याही दोन पावले पुढे झेपावलेला असतो...आत्मिक समाधानाची अनुभूती प्राप्त होते.
आतापर्यंतच्या कालावधीत आपल्याच कलागुणांची आपल्याच तुलनेतली उत्कृष्टता आपण आत्ताच गाठू शकलो आहोत हे त्या कलाकाराशिवाय कुणाला बरे माहित असणार ...एखादा आलाप आळवतांना त्याचे हरपलेले भान किंवा लागलेली तंद्री आपण बघू शकतो, अनुभवू शकत नाही....एखाद्या चित्रकाराला एखादे चित्र काढतांना आलेली आनंदाची परिमिती आपल्या उघड्या डोळ्यांना दिसणाऱ्या दृष्याहून वेगळी, कल्पनेच्या पलीकडची असू शकते. कुणीतरी बनवलेला एखादा पदार्थ, एखादं काव्य, एखादी कथा त्यांच्या त्यांच्या लेखी त्यांच्या त्यांच्या आयुष्याचा मुकुटमणी ठरतोच. त्या पदार्थाहून चविष्ट, त्या चीत्राहून सुंदर आणि त्या गीताहून श्रवणीय इतरांना बरच काही मिळेल एरवी, तुलनेने फार उल्लेखनीयही वाटणार नाही कारण आपण फक्त पदार्थ चाखलाय, चित्र पाहिलंय, गाणं ऐकलंय पण ज्यांनी ते प्रत्यक्ष प्रसवलय, सृजन केलंय, अनुभवलंय त्यांना येणारी अनुभूती काही और आहे. त्या क्षणाची प्रचीती खास आहे. आणि म्हणून तो क्षण कौतुकास पात्रही आहे.
मग अश्या आत्मिक तृप्तीच्या अनुभूतीची परिमिती गाठलेल्या त्या खास वेळेचं आपण स्वतःच मनभरून कौतुक केलंच तर बिघडलंय कुठं ??
होऊन जाऊ दे ...

तुझ्याच
आतल्यामास्तरीणबाई

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...