Friday 26 June 2020

काळीजहाक ..



भवतालच्या परिघातून घुमत येते एखादी काळीजहाक
आणि ..दिगंतात दुमदुमू लागते दर्दस्त अंतर्लय
अंतर्यामातील वीणेच्या तारेवर रणकंदते एखादी झंकार
आणि वाजू लागते अम्लान वेदनेची स्निग्ध तार
प्राणाच्या समेवर राग चंद्रकंस छेडला जातो..
आणि संथागारातील मर्मतळातून ..
आकांतून बाहेर पडतात अव्यक्त आत्मप्रलय

नको असतात हाका, हाका त्रास देतात
काळजावर कोरलेल्या अनेक डोळ्यांच्या खळातून
आक्रंदत पाझरू लागतात ऋतुगर्द आठवणींचे जीवनलय..
जसे पाषाणाचे हृदय भेदत जखमांच्या भेगांतून बाहेर येऊ पाहतात
काळ्याभोर ढेकळांचे कवच फोडणारे गर्दकोवळे कोंब ...






रश्मी -
२६/०६/२०

Wednesday 24 June 2020

नरो वा कुंजरो वा !



माणूस हा फार चक्रम प्राणी आहे.. प्रत्येक मानवी प्रवृत्ती गुणदोषांनी भरलेली असते हे तो मान्य करतो. आपल्या माणसांना गुण-दोषांसह स्वीकारावे हेही पटवून देतो,  स्वतःला मात्र कधीच जोखायला जात नाही,  किंवा स्वतःच्या बाबतीत माणूस अत्यंत सहिष्णू वगैरे असतो आणि इतरांकडूनही त्याची तशीच वागण्याची अपेक्षा असते. ..मात्र वास्तवात इतरांकडे पाहताना स्वतःचा दृष्टिकोन मात्र अत्यंत एकसुरी राखतो. दुसऱ्यांकडे पाहतांना तो प्रचंड जजमेंटल वगैरे होतो. पुढला एकतर अगदीच देव हवा असतो किंवा टोकाचा दानव. आपण कितीही प्रगल्भ झालो तरी आपण हे मान्य करायला तयारच नसतो की, माणूस चांगला का वाईट हे आपण कधीच ठरवू शकत नाही. माणूस ज्या वेळी जसा वागतो ते त्या त्यावेळी घडणाऱ्या परिस्थितीमुळे ..आणि परिस्थितीमुळे माणूस जसा वागतो तो तसा असतोच असे नाही ...ते वागणे तात्पुरते असते तेवढ्या परिस्थितीपुरते. आपण नेहमी फक्त माणसातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवावा.

आल्फ्रेड हिचकॉकच्या एका चित्रपटात एक दृश्य होतं ज्यात एक मवाली एका पादचाऱ्याच्या खिशातल्या तुटपुंज्या पैशांसाठी त्याचा निर्घृण खून करतो, त्याच्या अंगावरल्या, खिशातल्या वस्तू ओरबाडून घेऊन शांत चालू लागतो......पुढे गेल्यावर त्याला एक आंधळी म्हातारी कशी बशी रस्ता क्रॉस करण्याच्या प्रयत्नात दिसते..तर धावत जाऊन तो तिला रस्ता क्रॉस करायला मदत करतो. हे सगळं अवघ्या पाच मिनिटात घडतं आणि हे सगळं पाहणारा लांबवर उभा असलेला सिनेमातला माणूस किंवा आपण प्रेक्षकही बुचकळ्यात पडतो की यातला नेमका खरा माणूस कोणता?? खून करणारा की म्हातारीला मदत करणारा??

रॉबिनहूड नावाचं एक मिथ आहे... श्रीमंतांकडून संपत्ती लुटून ती गरीबांमध्ये वितरण करणारा एक लोकप्रिय लोकनायक म्हणजे रॉबिनहूड. या संकल्पनेवर जगभरातील सगळ्या भाषांमध्ये चित्रपट बनवले गेले. असे ऐकिवात आहे कि एकेकाळी अंडरवर्ल्डचा डॉन असणाऱ्या हाजी मस्तानीची रॉबिनहूड सारखी प्रतिमा होती. श्रीमंत, व्यावसायिक, बॉलिवूड कलावंतांमध्ये त्याची दहशत होती. अनेक असंवैधानिक अन्यायी कामे तो करीत होता म्हणून एका वर्गासाठी गुन्हेगार आणि क्रूर होता.. मात्र त्या शहरातील गरिबांसाठी मात्र तो एक देवच होता..दोन्ही बाजू नीट अभ्यासला कि हा व्यक्ती नेमका होता कोण ? ह्यास व्हिलन म्हणावे का हिरो हा मोठा प्रश्न समोर आ वासून उभा राहतो. प्रत्येक माणसांत चांगल्या आणि वाईट गोष्टी वास करून असतात. कोणत्या वेळी कोणती गोष्ट बाहेर पडेल आणि दर्शन देईल हे सांगणे मुश्कील आहे. इतरांचे राहो बाजूला ... ज्याचे त्याला देखील हे नक्की सांगता येणार नाही... त्यामुळेच फक्त एखाद्या कृतिवरून व्यक्ति जोखणे चुकीचे ठरते.. पण मानवी स्वभाव असा आहे की आपण वाईट गोष्टीवर चटकन विश्वास ठेवतो आणि एखाद्या व्यक्तिची एखादी वाईट कृति त्याच्या आधीच्या सगळ्या चांगल्या गोष्टी धुळीस मिळवते आणि आपण त्या व्यक्तिला वाईट किंवा चुकीचे संबोधू लागतो ..

खरतर परिस्थितीला दोष देऊन केलेल्या किंवा करीत असलेल्या चुकीच्या क्रियेचे समर्थन नाहीये हे. परिस्थिती म्हणजे दारू नव्हे जिच्या आहारी जाऊन माणूस विपरीत कृती करतो. दोन्ही ठिकाणी हे क्षम्य नाही. कृती माणूस करतो आणि दोष परिस्थितीला? संधी माणूस घालवतो आणि दोष नशीबाला? खरतर हे असे व्हायला नको .. वारंवार घटना घडत असतील तर ती प्रवृत्तीच आहे असे म्हणता येईल, परिस्थितीला बळी पडणारा पण माणूस आणि परिस्थिती निर्माण करणारा पण माणूसच, एक उदाहरण आठवत, महाभारताच्या युद्धात ज्या वेळी 'अश्वत्थामा' नावाचा हत्ती मारला जातो आणि द्रोणांची युधिष्ठिराला विचारणा होते की, 'अश्वत्थामा मृत्युमुखी पडलाय  हे खरे आहे का?' तेंव्हा नेहमी सत्य बोलणारा म्हणून प्रचिती असणारा धर्मराज युधिष्टिर 'हो' असेच म्हणतो, नंतर तो 'नरो वा कुंजरो वा' असे पुटपुटतो अशी कथा आहे... वास्तविक ज्यांच्या सोबत कृष्ण-सखा, सारथी आणि मार्गदर्शक होता त्यांचा विजय अटळ होता ... तरीही परिस्थितीला वश होऊन खोटे बोलण्याचा मोह त्यांना आवरला नाही, तरी ही अशी बुद्धी व्हावी हे कशाचे लक्षण आहे? ..... ... हे परिस्थितीला शरण जाणेच नव्हे का? खरतर असेही होता काम नये.

Kurukshetra War - Day 16 - Indus.heartstrings

एकाच्या परिस्थितीला दुसरा माणूस कारण ठरतो आणि हे कारण ठरण्यामागे सुद्धा कुठलीतरी परिस्थिती कारणीभूत  ठरलेली असते, प्रत्येकवेळी परिस्थितीला दोष देत बसणे बरे नसले तरी कधीतरी हातून घडून गेलेल्या भल्या-बुऱ्या गोष्टी समजून घेता येतातच.. माफही करता येतात. पण यामागे त्या व्यक्तीला झालेल्या चुकीची जाणीव असणे आणि त्यातून हेतुपुरस्सर प्रयत्नपूर्वक बाहेर पडण्याची इच्छाशक्ती मात्र असायला हवी असते. कारण परिस्थिती ही अनेक कारणांची परिणती असते. ती अचानक वरुन पडत नाही किंवा अचानक निर्माण होत नाही. माणूस आपल्या कर्माने त्यात ओढला जातो, बाहेर यायची किल्ली मात्र त्याच्याकडेच असते... ती त्याने प्रयत्नपूर्वक वापरायला मात्र हवी असते.

- रश्मी पदवाड मदनकर

Friday 5 June 2020

जेव्हा माझ्या खिडकीशी
चंद्र सलगी करेल
तुझ्या गोड आठवांनी
आसमंतही भरेल

रात्र उशाशी येऊन
तुझे गुपीत सांगेल
चित्त बेभान होईल
मनामध्ये काहुरेल

असे आतुरेल मन
कड डोळ्यांची भिजेल
चाचपडेन मी शेज
भ्रम भोपळा फुटेल

तुझी वाट मी पाहते
मन माझं अलवार
ध्यास तुला भेटण्याचा
जीव होई हळुवार

चल लावू ये मोगरा
आपुल्या या अंगणात
गंधाळल्या सोबतीचा
गंध वाहू दे घरात

टाळीला थाळीची आस - भाग ४ (अंतिम)

लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - प्रकरण 1




आपण आपल्याच विश्वात इतके मश्गुल असतो की या दुनियेत आपल्यासारखीच दिसणारी पण फक्त नियतीनं वेगळा बेत आखला म्हणून संघर्षमय आणि नाईलाजास्तव सामान्य माणसापेक्षा वेगळं आयुष्य जगण्यास भाग असणारी अनेक माणसे आहेत याकडे आपले लक्षही नसते किंवा लक्ष असले तरी अंगाला मनाला काहीही लावून न घेता बिनदिक्कत झापडे पांघरून आपल्याला निघून जाता येतं. पण अशी झापडं सगळ्यांनाच लावता येत नाही अगदी त्यांनाही नाही ज्यांना स्वतःच मदतीची गरज असतांना.. आपलीच झोळी फाटली असतांना देखील ती उरलेली लख्तरं घेऊन इतर गरजुंच्या मदतीसाठी पुढे येतात. म्हणूनच राणीची कमाल वाटते, कामाचा अकाल पडलेल्या कोरोनाच्या काळात स्वतःचे पोट भरत नसताना, उपजीविकेचे माध्यम लॉकडाऊन होऊन बंद पडलेले असतांना दावणीला बांधून ठेवलेली तुटपुंजी सेविंग देखील काढून ती गरीबांमध्ये अन्नदान करत सुटते ....

Image may contain: 2 people, people standing


लॉक डाऊन सुरुवातीचा हा काळ होता, अचानक संकट ओढवल्याने अनेक माणसे हवालदिल झालीत. कुणाची नोकरी गेली, अनेकांचा छोटा मोठा व्यवसाय होता तो बंद पडला, रोजंदारीवर जाणाऱ्यांची मजुरी मिळणे बंद झाले, दोन वेळ खाण्याचेही वांदे व्हायला लागले. हा काळ किती लांबणार आहे हे कुणालाच माहिती नव्हते .. म्हणून खरतर अनेकजण गाठीशी बांधून ठेवलेला खडकू खडकू जपत होते. पण राणी किंग ने असा विचार न करता आता या क्षणी उपाशी असणाऱ्यांचे पॉट भरणे गरजेचे आहे हे पहिले आणि पदरात बांधून ठेवलेला बचतीचा पैसा त्यात लावला. आता तो पैसा संपलाय आणि नव्या कमाईसाठी घराबाहेर पडायचे मार्ग बंद आहेत. अश्यात त्यांनाच आता शासनाकडे मदत मागायची वेळ येऊन ठाकली आहे.

जशी परिस्थिती इतर मजुरीवर कमावत्या हातांची तशीच परिस्थिती या तृतीयपंथीयांची देखील .. कारण ही देखील हातावर कमावून खाणारीच माणसेच आहेत. मी सहज विचारले मग काय करताहात सध्या कशी चालतेय उपजीविका ? ह्या प्रश्नाचे उत्तर देतांना राणी भावुक होत सांगू लागल्या ''ताई आम्हाला कोणी नोकरीपाणी देत नाही, महत्प्रयासाने एखाद्याला मिळालीच तर लोकं टोमणे मारून, चिडवून, शारीरिक छेडछाड करत खूप छळवणूक करतात अखेर तिथून बाहेरच पडावे लागते, आम्ही टाकलेले व्यवसाय स्वतःला साळसूद समजणारी लोकं खपवून घेत नाहीत.. आमचे आशीर्वाद मिळावे म्हणून धडपडणाऱ्या कित्तेक दुतोंडी लोकांना आमच्या हातचे खाणेपिणे देखील चालत नाही. सध्या लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या घरी होणारी शुभकार्ये देखील बंद आहेत त्यामुळे उपजीविकेची सगळी दारेच बंद पडली आहेत'' त्यांचे उत्तर ऐकतांना सहज मी बोलून गेले 'होय ट्रेन बसेस मधून फिरून मिळणारे थोडेथोडके पैसे देखील बंद असतील ना गाड्याच बंद असल्याने'' त्यावर राणीचे स्पष्ट खंबीर उत्तर होते ते आपल्या सगळ्यांनीच ऐकणे गरजेचे आहे. ती म्हणाली '' ट्रेन बसेस किंवा दुकानांमध्ये अनेकदा घुसून, अंगाला हात लावून धमकीवजा वाईट शब्द वापरत, बळजबरीने पैसा मागणारा वर्ग आमचा नाही, त्यातले अनेक जण या मार्गाने मिळणाऱ्या पैशांच्या हव्यासापायी साडीचोळी नेसून हे काम करीत असतात. आमचं दुःख एवढाच आहे कि ह्यांच्या अश्या वागण्याने आम्ही बदनाम होतो आणि समाजात आमच्याबद्दल अविश्वास निर्माण होतो'' तिच्या उत्तराने मी अवाक होते कारण अशी बळजबरी करणारे अनेक तृतीयपंथी मी मुंबईच्या लोकलमध्ये, ट्रेनने प्रवास करतांना बघायचे आणि माझ्याही मनात ह्यांच्याबद्दल ही समज होतीच.

राणीसारख्या इतर अनेक समजूतदार किन्नरांच्या नेतृत्वात चालू असलेल्या आंदोलनांमुळे आताशा ह्यांच्या अनेक मागण्या हळूहळू पूर्ण होऊ लागल्या आहेत, मतदान करण्यासारखे-निवडणूक लढवता येण्यासारखे अनेक हक्क देखील प्रदान करण्यात येऊ लागले आहेत. पण तरीही ही फक्त सुरुवातच आहे आणि अजून खूप मोठा पल्डा त्यांना गाठायचा आहे. लॉकडाऊन काळात त्यांच्या उपजीविकेसाठी, किंवा तात्पुरती तरी मदत मिळावी या मागणीकरिता राणी किंगचा एक बाईट रेकॉर्ड करून ही बातमी शासनापर्यंत पोचावी आणि तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्या या शुभेच्छा देऊन आम्ही बाहेर पडलो.... पण खरतर अजूनही बाहेर पडलेलोच नाही. राणी किंगला भेटणे ही एक पर्वणी ठरली. अनेक गैरसमज दूर झाले अनेक समज कायम झाले, किती माहिती मिळाली, घटना कळल्या किस्से ऐकले हे सगळं प्रगल्भ करणारे अनुभव होते शिवाय ह्यांच्यातलया माणुसकीचा झरा वाहता ठेवणाऱ्या.. संस्कारित संवेदनशील माणसांची ओळख झाली ही जमेची बाजू.

त्यांचीही माणसे शिकून सवरून नोकरी करत सन्मानाने जगावी ही राणीची इच्छा लवकरच पूर्ण व्हावी .. 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या तिच्या रिंगटोनचे शब्द खऱ्या आयुष्यात खरे उतरावे, आणि ती करीत असलेल्या
सगळ्या चांगल्या कामांना भरभरून यश मिळावे या शुभेंच्छा या सीरिजच्या आणि तुम्हा सगळ्यांच्या अभिप्रायाच्या माध्यमातून त्यांना पोचवुया ...


रश्मी पदवाड मदनकर









Monday 1 June 2020

टाळीला थाळीची आस - भाग ३

#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - प्रकरण 1

४ जून २०१९ ची घटना, या घटनेने संपूर्ण नागपूरचा किन्नर समाज हादरला होता. किन्नर समाजात नावारूपाला येणाऱ्या .. शहरात बऱ्यापैकी ओळख निर्माण झालेल्या आणि भविष्यात समाजाची पुढारी म्हणून आशा असणाऱ्या चमचम गजभियेचा भरदुपारी प्राणघातक हल्ला करून खून करण्यात आला होता. तृतीय पंथियांचा त्यावेळचा सेनापती म्हणजे गुरु मानला जाणारा उत्तम बाबा तपन याने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील आणि किन्नरांची अपेक्षित उदयोन्मुख सेनापती तृतीयपंथी चमचम गजभियेची कळमनातील कामना नगरात तिच्या घरात घुसून हत्या केली होती. खरतर तृतीयपंथीयांमध्ये वर्चस्वासाठीचा आपापसातला संघर्ष हा काही नवीन विषय नाही. सर्वाधिकार असणारी गादी मिळवून नेतृत्व करण्याची इच्छा इथे अनेक जण बाळगून असतात.. त्यातून चालणारी गटबाजी, कुरघोड्या, राजकारण हे नेहमीचेच. आपल्यावर कोणी हावी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त किन्नर आपल्या गोटात राखून शक्तिप्रदर्शनाने नेतृत्व गाजवण्याचा प्रयत्न हे प्रस्थापित आणि इच्छुक पुढारी करीत राहतात. त्यातून परस्परांवर हल्ले, हाणामाऱ्या, एकमेकांना धमक्या देणे इत्यादी राजरोसपणे घडत राहतं. पोलिसांनाही सतत या प्रकरणांचा शहानिशा करावा लागतो. तत्कालीन सेनापती उत्तम बाबाच्या डोक्यातही वर्चस्वाची हवा होती .. इतर किन्नरांबरोबर दुष्टपणे वागण्याच्या, अत्याचाराच्या अनेक कथा पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ लागल्या होत्या. त्यातून गट पडायला लागली होती, माणसे वाटली जात  होतीत, उत्तमबाबाची ताकद कमी होऊ लागली होतीच पण पैशांचे गल्ल्यात येण्याचे प्रमाणही आता कमी झाले होते.. उत्तमबाबा विरोधात उभे राहण्याचे धाडस करणाऱ्या चमचमच्या गोटात जाणाऱ्या किन्नरांची संख्या वाढत होती, आणि हुकूमशाही नाकारायला, कष्टाचे पैसे त्याच्या गल्ल्यात द्यायला चमचमने ठामपणे नाकारायला सुरुवात केली होती ...

तृतीयपंथीवर पहिल्यांदाच सार्वजनिक ...

कोण होती चमचम - 
पूर्वाश्रमीचा प्रवीण प्रकाश गजभिये उर्फ 'किन्नर चमचम गजभिये' ही अतिशय देखणी आकर्षक व्यक्तिमत्वाची होती. किन्नर करीत असलेल्या सगळ्या प्रकारच्या कामात तिला सर्वात जास्त मागणी असायची, लोकप्रियताही बऱ्यापैकी वाढत होती.. तिला मुहबोली किंमत देखील मिळायची .. मात्र प्रयत्नांनी कष्टांनी काम मिळवून त्यातून कमावलेला सगळा पैसा उत्तमबाबाच्या हवाली करावा लागायचा. हे हळूहळू चमचमच्या जीवावर यायला लागले आणि तिने त्याला टाळायला सुरुवात केली.. चमचमच्या वाढत्या लोकप्रियतेला भाळलेले आणि उत्तमबाबाला कंटाळलेले इतर अनेक तृतीयपंथी देखील मग मार्ग बदलू लागले... ह्याचा वचपा काढत एक दिवस उत्तमबाबाने त्याच्या इतर साथीदारांसह काटा काढून टाकण्याच्या दृष्टीनेच चमचमवर हल्ला चढवला..तिच्याच राहत्या घरी घुसून या टोळीने तिच्या डोक्यावर चेहेऱ्यावर धारदार शस्त्राने अनेक वार केलेत, तीला गंभीर जखमी केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिली, आणि त्यातूनच दोन दिवसाने कामठी मार्गावरील एका प्रायव्हेट हॉस्पिटलला तिचा मृत्यू झाला. 

nagpur-third-gender-uttambaba-kinner-chamcham-fight-for-head945
 
ही घटना तृतीय पंथीयांसाठी हादरवणारी होती, प्रचंड तणाव निर्माण झाला.. उत्तमबाबांच्या अत्याचाराची सीमा पार झाली होती त्याला शिक्षा होण्यासाठी आता तृतीयपंथींना पुढे येणे गरजेचे होऊन बसले होते. कारण तसेही ह्यांना हक्काचे जगणे असू देत नाहीतर न्याय मिळणे इतके सहज साध्य कुठे आहे, त्यासाठी पुन्हा संघर्ष आलाच. चमचमला न्याय मिळवून द्यायला पुन्हा राणी किंग पुढे आल्यात.. उत्तमबाबांच्या त्वरित अटकेसाठी पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी असो किंवा नंतर त्याला कडक शिक्षा व्हावी म्हणून अनेक स्तरावरची आंदोलनं .. पुढे कोर्टातली धावपळ अशी चमचमच्या न्यायाची लढाई राणी लढत राहिली...आजही हे चालू आहे. या संघर्षातून आणि लढाईतून तृतीयपंथीयांनी संघटना असावी हा विचार उदयास आला आणि 'किन्नर विकास बहुद्देशीय सामाजिक संस्था' निर्माण करण्यात आली. या संस्थेच्या अध्यक्षपदाचा कारभार आज राणी किंग सांभाळत आहेत. या माध्यमातून  किन्नरांसाठी अनेक चांगली कामे करण्याचा मानस असल्याचे राणी किंग वारंवार बोलून दाखवतात ....
शेवटच्या भागात बघूया कोरोना वायरस लॉकडाऊन काळात तृतीय पंथीयांच्या जीविकेवर झालेला परिणाम आणि याही काळात राणी किंग निभावत असलेली माणुसकी ...

रश्मी पदवाड मदनकर 

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...