Monday 24 May 2021

प्रगल्भ जाणिवांचा अविष्कारी संग्रह 'उन्हात घर माझे'



नितीन भट यांना मी प्रत्यक्ष व्यासपिठावरून ऐकलंय. त्यांच्या गझलांतील आशय अर्थात गझलियत, त्यातील अंतर्भाव आणि त्यांचे आकर्षक सादरीकरण सगळंच प्रगल्भ जाणिवांतून अवगत झालेले असल्याचे लक्षात आल्यावाचून राहत नाही. एकाच माध्यमांचे प्रवासी असल्याने पुढे वाढत गेलेल्या ओळखीतून त्यांचे संवेदनशील असलेले माणुसपण देखील पुढ्यात येत राहीले. अश्या जाणून असलेल्या कवीमित्राचा अत्यंत देखणा आणि वाचनीय असा 'उन्हात घर माझे' नावाचा गझल-कविता संग्रह हातात आला तेव्हा आनंद होणं सहाजीकच होतं. पुस्तकाचे ओढ लावणारे आकर्षक शिर्षक, साधेच पण देखणे मुखपृष्ठ, त्यावर लिहिलेली कोरीव सुंदर शब्दरचना आणि कवीची आत्ममग्न छबी. बघताक्षणीच एक सुंदर वाचनमेजवानी आपल्याला मिळणार आहे हे लक्षात आले. हातात आॅलरेडी दोन पुस्तकं वाचायची असल्याने 'उन्हात घर माझे' वाचायला जरा उशीर झाला पण वाचायला हातात घेतला तेव्हा अधाशासारखे एका बैठकीत वाचून काढला. त्यानंतर आजारपण आल्यानं लिहायचं मात्र राहीलंच, पण हा संग्रह स्वस्थ बसू देत नव्हता यावर लिहायचंय ही अस्वस्थता सतत छळत राहीली.
 
पुस्तकातल्या लक्ष वेधून घेणाऱ्या बाबी म्हणजे पुस्तकाला लाभलेल्या दिग्गजांच्या प्रस्तावना. गायक-संगीतकार सलिल कुलकर्णी, गझलनवाज भिमराव पांचाळे यांच्या शब्दांनी नटलेला.. याबद्दल विशेष वाटले ते म्हणजे नुसतीच औपचारिकता म्हणून नाही तर या प्रस्तावनेतील शब्दाशब्दात जिव्हाळ्याचा ओलावा जाणवतो. त्यानंतर सुरू होतो तो थेट वाचकांच्या मनाचा ताबा घेणाऱ्या गझल कवितांचा धुंद करणारा प्रवास..
 
त्यातल्या एका गझलेतील हा शेर -
कारणे नाहीत आता द्यायला माझ्याकडे
आणि विश्वासासही आहेत गेलेले तडे
एकतर नाही जिव्हाळ्याचा गिलावा‌ राहीला
त्यात पडले कोरड्या काही मनाचे पोपडे

बोथट झालेल्या संवेदनेच्या काळात, आरोप-प्रत्यारोपांची बीजे कविता गझलेत शिरण्याच्या काळात हळव्या कातर गझल‌ व कविता लिहीणारे नितीन म्हणूनच या सगळ्या कंपूशाहीपासून दुर व फार वेगळे जाणवतात. त्यांच्या संग्रहातील काही गझल खरोखरच वाचकांना मोहित करतात,विचारांना प्रवृत्त करतात..

एका गझलमध्ये ते म्हणतात...
जळतो चितेत माझा मृतदेह चंदनाचा
बघ मंद मंद त्याचा दरवळ सुटेल आता

आणखी एक मतला मला आवडलेला ...
जो जिवाचा खास झाला
तो गळ्याचा फास झाला

नितीन यांच्या प्रतिभेचा स्पर्श‌ झालेल्या काही चिंतनशील गझला रसिक वाचकांना देखील अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. ते म्हणतात ...
गणे इतके शाश्वत ठेवा
हर एक इच्छा जगवत ठेवा
वैऱ्याच्या रात्री निजताना
फक्त उशाशी करवत ठेवा

या संग्रहातील अनेक गझल परीस्थितीतून पाझरणाऱ्या खंतानुभुतीच्या शब्दशिल्पातून अवतरीत झालेल्या असाव्या असा साक्षात्कार होतो इतक्या त्या भावोत्कट उतरल्या आहेत. की,
 
झाला सुरू धरेचा उलटा प्रवास आता
माणूस माणसाचा घेईल घास आता
ठरवून पाश सगळे तोडून टाकतो मी
जो काय व्हायचा तो होईल त्रास आता

आणखी हा दोन ओळींचा श़ेर बघा ..
आपुलकीचे सोंग आणता येते मित्रा
प्रेम, जिव्हाळा, माया, ममता उपजत असते.

नितीन यांच्या गझलेचे सामाजिक विषय पाहिले म्हणजे लक्षात येते, की हा माणूस नुसते कोरडे कवित्व गाजविणारा नसून विस्कटलेल्या आणि ढासळत्या सामाजिक परिस्थितीत फोफावणाऱ्या विकृतींना पायबंद बसावा, या समाजाचा पुरुषार्थ जागृत व्हावा आणि त्या अनुषंगाने कणखर स्पष्ट होत जाणारे त्यांचे शब्द कुठलाही मुलाहीजा न बाळगता आहे त्या धारेत वार करतात ...
 
ते म्हणतात..
खोट्या कथानकांचे पोथीपुराण बदला
ठरवून भेद करते ते संविधान बदला
माणूस जात जंगल ताब्यात घेत आहे
निष्पाप श्वापदांनो तुम्हीच रान बदला !

संस्कारमुल्य आणि जाणिवमुल्य जपणाऱ्या या एकंदरीतच सगळ्या गझलेतून व्यासंग, चिकित्सक-अभ्यासू वृत्ती, साधारण माणसाच्या जगण्याचे कंगोरे गोळा करत, उद्भवणाऱ्या सामाजिक परिस्थितीचे अवमुल्यन करण्याची त्यातील वेदना आणि आनंद वेचून त्यांना सुरेख शंब्दांच्या कोंदणात रचण्याची क्षमता नितीन भट यांच्यात आहे हे त्यांनी या गझलसंग्रहाद्वारा दाखवून दिले आहे.

एक उत्कृष्ट आणि कविता व गझलप्रेमींच्या संग्राह्य असावेच असे हे मला आवडलेले पुस्तक आहे.

*********
संग्रहाचे नाव - उन्हात घर माझे
लेखक - नितीन भट
प्रकाशक - मेधा पब्लिशिंग हाऊस, अमरावती
किंमत - १२०/- रू फक्त
संपर्क - ९८५०९५१८१४


- रश्मी पदवाड मदनकर





Monday 17 May 2021

लाॅक-अनलाॅक



दारं खिडक्या पक्क्या बंद केलेल्या खोलीत किंवा खूप गर्दी असणाऱ्या ठिकाणी एक मिनिटही राहता न येणं, जीव गुदमरणं हा एक प्रकारचा फोबीया आहे. क्लाॅस्ट्रोफोबीया (Claustrophobia) असं त्यांचं नाव आहे. माझ्या आईला ही समस्या असल्याचे आम्हाला लहानपणापासून माहीत आहे. तिच्या लहानपणी एकदा कोणीतरी गमतीने तिला बाथरूममध्ये लाॅक केले होते आणि त्याच अवस्थेत अनेक तास अडकल्यानं नंतर तिला हे विचित्र भीती वाटायचं प्रकरण सुरू झालं. ती claustrophobic असं कळलं. घरात सगळे दारं खिडक्या बंद असणं किंवा बंद एसी कारमधून प्रवास केल्यानं तिचा श्र्वास कोंडल्यासारखा होतो. ती आमच्यासोबत कोणत्याही थिएटरलादेखील सिनेमा पाहायला येऊ शकत नाही. एकदोनदा आम्ही प्रयत्न केला पण अर्ध्या तासातच तिचा जीव गुदमरू लागल्याने आम्हाला चित्रपट अर्धवट सोडून निघून यावं लागलं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे गेले अनेक दिवस आम्ही राहतोय त्या एरीयात घराच्या चारही बाजूंनी कोरोना पेशंट वाढलेले, भारतीय म्हणून आपल्या जगण्यात मुरलेल्या सार्वजनिक, सांस्कृतिक नियमांनुसार अजूनही आम्हाला विलगीकरणाचं महत्त्व न समजल्याने, पटत नसल्याने किंवा शेजारी पॉझिटीव्ह पेशंटच्या बिंदास फिरण्याच्या वृत्तीने त्रस्त होऊन एकेक बाजू बंद करत, हळूहळू घरातल्या सगळ्या दारं खिडक्या आम्हाला बंद‌ करून घ्याव्या लागल्यात. इतकं करूनही घरात कोरोना‌ शिरलाच. एकामागे एक सगळे सदस्य संक्रमित झाले आणि गेला महिनाभर आम्ही स्वतःला चक्क डांबून घेतले. या महिन्याभरात मनात येणाऱ्या अनेक गोष्टींचा हा आढावा.

लाॅकडाऊन, आयसोलेशन, क्वारंटाईन हे पूर्वी कधीही न ऐकलेले शब्द आज आपल्या जगण्यातला महत्त्वाचा भाग ठरताहेत. पुर्वी कुणात न मिसळणारा, कुणाला न भेटणारा, स्वतःच्या कोषात राहणाऱ्याला एकलकोंडा-घरघुशा म्हणून चिडवले जायचे, आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे ट्रोल केलं जाई. स्वतःला अनेक दिवस घरात कोंडून घेणाऱ्याला वेडाही ठरवले जाई. पण आज परिस्थिती इतकी उलट झालीये की अशीच माणसे खरी शहाणी आणि माणसाळलेली माणसं मात्र ठार वेडी भासू लागली आहेत. आतबाहेर, उजेडअंधार, चांगले वाईट आणि विशेष म्हणजे पाॅझिटीव्ह-निगेटीव्ह सगळ्यांचेच संदर्भ पार बदलून गेल्यासारखे वाटताहेत.

कवयित्री इंदिरा संत एका कोंडमारा झालेल्या क्षणी, अश्याच हतबल अवस्थेबद्दल एका कवितेत लिहितात
'अंधाराने कडे घातले
घराभोवती,
जळधारांनी झडप घातली
कौलारावर.
एकाकीपण आले पसरत
दिशादिशांतुन
घेरायास्तव...
एकटीच मी
पडते निपचित मिटून डोळे.'

आजच्या घडीला अशीच मनोवस्था प्रत्येकाची झालीये जणू.
 
२०१८ च्या जून जुलै महिन्यात असेल नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी वाचावे म्हणून एखाद्या चांगल्या इंग्रजी नाॅवेलच्या शोधात होते... सिव्हील लाईनच्या क्राॅसवर्डला फिरताना २५० पानांचं मेलेनी जुस्टेन(Melanie Joosten) लिखित 'बर्लिन सिंड्रोम' नावाचं नाॅवेल हातात आलं. तिथेच बसून त्यात जवळजवळ अर्धा तास गुंग झाले होते. किंमत होती १२०० रू. विकत घेण्याचा मोह जरा टाळलाच, पण त्यातून मन निघेना, मग एकदा या पुस्तकासाठीच गुगल सर्च करताना याच नाॅवेलवरून बनवलेला याच शिर्षकाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध असल्याचे दिसले आणि झपाटून एका रात्रीत तो शोधून काढला आणि पाहिला. पुस्तक वाचण्याची भूक तर शमली होती पण या चित्रपटाने पुन्हा कितीतरी प्रश्र्न मनात कोरले आणि अस्वस्थतेच्या लाटेवर आणून सोडले.




२०१७ फेबृवारी महिन्यात रीलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केट शाॅर्टलॅंड नावाच्या महिलेने केले आहे. ऑस्ट्रेलियाहून जर्मनीच्या राजधानीत म्हणजे बर्लिन शहरात मुशाफिरी करायला आलेली एक तरूण फोटोग्राफर क्लेअर (टेरेसा पाल्मर). क्लेअर एकटीच फिरत असताना तिची भेट एका इंग्रजीच्या शिक्षकाशी होते. पुस्तक वाचन, पेंटींग आणि फोटोग्राफी सारख्या समान आवडीनिवडी असल्याने त्यांच्यात चटकन मैत्री होते. एवढ्या मोठ्या अनोळखी शहरात ॲन्डीच्या (मॅक्स रीमेल्ट) मैत्रीपूर्ण आणि सभ्य वागणुकीमुळे तसेच मदत करण्याच्या वृत्तीमुळे क्लेअरचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसतो आणि एका रात्री ॲन्डीच्या निमंत्रणावर ती बिंदास त्याच्या घरी जाते... एक सुंदर स्वप्निल अशी रात्र ते एकमेकांसोबत घालवतात. दुसऱ्या दिवशी ॲन्डी त्याच्या कामावर निघून जातो. क्लेअर परत जायला निघते तेव्हा तिला लक्षात येतं की, मेनडोअर बाहेरून लाॅक आहे. आधी तिला याचं गांभिर्य लक्षात येत नाही. ॲन्डी परत येतो तेव्हा हसत लाडातच त्याला विचारते पण नंतर घरातली एकूण एक खिडकीसुद्धा विचित्र पद्धतीने लाॅक असल्याचे ती पाहते, तिच्या फोनमधलं सिम आणि तिची सगळी कागदपत्रंदेखील गहाळ झाल्याचे तिच्या लक्षात येते आणि ती घाबरते. पुढे सुरू होतो शहरातल्या विराण ठिकाणी संपूर्ण रिकाम्या ईमारतीतल्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या टाळेबंद फ्लॅटमधून एका विकृत शिक्षकाच्या तावडीतून स्वतःला सोडवून घेण्याचे, त्याचे अत्याचार सहन करत जिवाच्या आकांताने बाहेर पडण्यासाठीचा संघर्ष... क्लेअरला त्या घरात जेरबंदी झालेले बघता बघता आपलाही जीव घाबराघुबरा करणारा हा चित्रपट.

जगण्यासाठी आपल्या अवतीभवती माणसं असणं गरजेचं असतं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. माणसाला माणूस दिसत राहणं, त्यांच्या असण्याची जाणीव, स्पर्श, शब्द, एकमेकांची काळजी- प्रेम हे श्वासांइतकेच महत्त्वपूर्ण आहे. माणूस एकटा जगू शकत नाही हे २००० साली आलेल्या 'कास्ट अवे' चित्रपटातून राॅबर्ट झेमेकिस या दिग्दर्शकानं आणि चित्रपटातला चक नोलन म्हणजे टाॅम हॅंक्स या अभिनेत्याने उत्तम निर्मितीतून आणि उत्कृष्ट अभिनयातून अत्यंत प्रखरपणे दाखवून दिले होते. परिस्थितीवश होऊन एका एकाकी बेटावर जाऊन अडकलेल्या आणि तिथून जिवंत बाहेर पडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे हा चित्रपट. सोबतीला कोणीतरी आहे या भ्रमातूनही जगण्याची उर्जा मिळत राहावी म्हणून एका तुटक्या-फाटक्या फुटबाॅलवर रक्ताने चेहरा आखतो आणि त्याला नाव देतो 'विलसन'. आणि येताजाता चक्क या फुटबॉल चेहेऱ्याच्या विलसनशी मित्राप्रमाणे बोलत राहतो, त्याला सल्ला विचारतो, त्याच्यावर रागावतो, फुरगटतो हा पार्ट या अमेरीकन सर्वायवल ड्रामा असलेल्या सुपरहिट चित्रपटाचा आजही 'साईन मार्क' म्हणजे मोस्ट मेमरेबल भाग आहे.




मागल्या वर्षी याच दिवसांमध्ये अनुराग कश्यप निर्मित 'ट्रॅप्ड' चित्रपट पाहण्यात आला होता काहीच दिवसांआधी फेसबुकने ती मेमरी अचानक पुढ्यात आणली आणि पुन्हा एकदा सगळं भरभर डोळ्यासमोरून गेलं. किती रीलेट झाले म्हणून सांगू. कारणे काहीही असू देत, परीस्थितीच अशी निर्माण होते की एक व्यक्ती काही कारणास्तव संपूर्ण रिकाम्या असलेल्या एका उंच इमारतींच्या तेराव्या मजल्यावरील बेकायदेशीरपणे घेतलेल्या एका ब्लाॅकमध्ये लाॅक होतो. म्हणजे स्वतःच्याच चुकीने स्वतःला अडकवून घेतो, टाळेबंद होतो आणि तो इतक्या वाईट पद्धतीने अडकतो की त्याची जिवंत राहण्यासाठीची धडपड, तगमग, संघर्ष सुरू होतो. उंदरासारख्या प्राण्याला घाबरण्यापासून ते उंदीर पकडून खाण्यापर्यंत ते मानसिक संतुलन गमावण्याच्या दारात उभं राहूनही फक्त बाहेर पडण्याची धडपड, हा संघर्ष करायला स्वतःला जिवंत ठेवण्याची तगमग, असहायता, हतबलता आपण पाहता पाहता अनुभवतो आहे असं वाटू लागतं. कल्पनाच किती भयावह आहे. हे नुसतं पाहणंदेखील सुन्न करणारं आहे. अमित जोशींना ही कथा कशी सुचली असेल? आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी इतकं चपखल निर्देशन कसं घडवून आणलं असेल याचं अप्रुप वाटल्याशिवाय राहत नाही. आणि मग बेस्ट एशियन फिल्मचा पुरस्कार या चित्रपटाला प्राप्त झालाय याची उचित कारणमीमांसा पटते. राजकुमार राव म्हणजे चित्रपटातला शौर्य या एकमेव व्यक्तिरेखेभोवती घडलेल्या थरारक घटनांचा हा स्मृतीत घट्ट बसणारा चित्रपट...

 




याच धरतीवरच्या काही हलवून सोडणाऱ्या सत्य घटनाही आठवतात. २०११ सालची एक घटना आठवते आहे. बरोबर दहा वर्षांपूर्वी दिल्लीनजीकच्या नोयडा येथील ही घटना खूप वायरल झाली होती. अनुराधा बहल (वय ४२ वर्ष) आणि सोनाली बहल (वय ३८ वर्ष) या उच्च शिक्षित बहिणींनी वडलांच्या मृत्यूनंतर सात महिने स्वतःला घरात डांबून घेतले होते. सलग सात महिने त्या घराबाहेर पडल्या नव्हत्याच पण बाहेरूनही कोणाला घरात येऊ दिले नव्हते. त्या काय खातात कश्या जगतात हे फार मोठे कोडेच होते. त्यांना बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती. त्यानंतर त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले जिथे मोठ्या बहिणीचा मृत्यू झाला. अशीच पंजाबमधील धार्मिक दंगलींना घाबरून एका आईने मुलगा आणि मुलीला घेऊन सलग १६ वर्ष स्वतःला घरात बंद करून घेतले होते. त्यांना २०१४ मध्ये कोर्टाच्या मदतीने महत्प्रयासाने पोलीसांनी बाहेर काढले होते. दुसरी घटना नुकतीच वाचनात आली होती गुजरातमध्ये दोन भाऊ आणि एक बहिण तिघेही उच्च शिक्षित.. आईच्या मृत्यूनंतर सलग दहावर्ष त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते. त्यांची सुटका अत्यंत हलाखीच्या, दयनीय स्थितीत वडीलांच्या विनंतीवरून नुकतंच एका एनजीओ द्वारा करण्यात आली. हे असे प्रसंग म्हणजे मानसिक कमकुवत असणारी माणसेच करतात असे आपण आजवर म्हणत-समजत आलो आहे आणि ते काही अंशी खरेही तर होते. पण आज मात्र आपल्यासमोर उद्भवलेले संकट आपल्याला या विकृतावस्थेचीच मोडतोड करून नव्यानं व्याख्या करायला सांगताहेत. पूर्वीचे सगळे संदर्भ, सगळी उदाहरणं संशोधनाच्या कामी निकामी होऊन नवीन गृहितकं मांडायला भाग पाडताहेत. कालची सकारात्मकता आज नकारात्मक ठरतेय तर कालचा मुर्खपणा आजची समजदारी. एका व्हायरसनं जगाचा इतिहास, भूगोल उलथवून लावलाय तो जागेवर येईल तेव्हा जगण्याची गणितं, विज्ञान आणि जीवशास्त्राचे रसायन आणि सूत्रं कदाचित बदललेली असतील... आणि माणसाचे हवेत उंच उडालेले पाय जमिनीवर येऊन नव्याने शिकलेले जगणे पुनश्च आरंभ करतील..कोणी सांगावे ... नाही ? 

गीतकार राहिब मैत्रेय म्हणतात ना..
कुदरत से खिलवाड़ है , जुर्म बहुत संगीन ।
यह सिखला कर जाएगा, कोविड नाइनटीन ॥



©रश्मी पदवाड मदनकर

(दि. १८ में २०२१ महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात प्रकाशित लेख)




Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...