Wednesday 30 October 2019


 स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो तोवर  
आरसा हवा हवा वाटत असला, तरी 
प्रकाशाच्या सान्निध्यात आल्यावर 
 प्रतिबिंबित करणारा लखलख कवडसा 
डोळ्यांना अडसर वाटू लागतो ..तसा 
फिरवून घेतो आपण चेहेरा ..

अगदी आहे तशीच दिसणारी माणसे 
हवी हवी वाटतात..पण  
इतरांच्या सान्निध्यात आल्यावर 
 प्रतिबिंबित काय करतात यावर ठरतात 
त्यांचे हवे असणे नको असणे .. 

रश्मी पदवाड मदनकर.


Sunday 20 October 2019

मध्यरात्रीच्या पलिकडे
पहाट होण्याआधी
अंधार उजेडाच्या चिंतेआड
सत्या असत्याच्या भ्रमाबाहेर
नाश अविनाशाच्या मिती सोडून
सुखा दुःखाच्या आशा खोडून
जाणीव नेणीवेचे ठेवून भान

गाडली असतीस माझी नाळ ... आई ..

तर ..

तर.. उदासीतमस्वी जरा आत्मघाती
आयुष्याचा सुर्य उगवण्याआत
पाचवीला पुजलेल्या करंट्या जिन्याची
परिटघडी मोडून, वाढून ठेवलेल्या निग्रही प्रतारणा
संभ्रमाच्या, अस्वस्थतेच्या फेसाळून येणा-या लाटा
सटवाईच्या पदरी पुन्हा बांधून
परतवून लावता आल्या असत्या मलाही
रात्रीच्याच अंधारात सगळा अंधार उपसून
ओतून देता आला असता ... आणि

आणि

मध्यरात्रीच्या पलिकडे
पहाट होण्याआधी
अंधार उजेडाच्या चिंतेआड
सत्या असत्याच्या भ्रमाबाहेर
नाश अविनाशाच्या मिती सोडून
सुखा दुःखाच्या आशा खोडून
जाणीव नेणीवेचे ठेवून भान

नव्या जगण्याचा नवा उजेड
पांघरून घेतला असता मी  ... आई .. !

पांघरून घेतला असता मी आई !!






- रश्मी पदवाड मदनकर


Saturday 19 October 2019

डॉ श्रीधर शनवारे :- एक व्रतस्थ कवी !



एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देण्यास महत्वपूर्ण ठरले आहे. यांच्या वाड्मयीन प्रवासातले ठळक टप्पे बारकाईने न्याहाळले तर त्यांच्या लिखाणाला प्रतिभेचे अनेकविध पंख फुटलेले दिसतात. वैदर्भीय रसिकांना अभिमान बाळगण्यास महत्वपूर्ण कारण ठरलेल्या या कविमनाच्या साहित्यिकाच्या वाण्ग्मयीन प्रवासाचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

या संवेदनशील साहित्यिकाचा जन्म ५ आक्टोबर १९३५ रोजी अमरावती जिल्ह्यातल्या' साहूर' येथे झाला. मात्र शिक्षण अन नौकरीच्या निमित्त्याने नंतर च्या काळात ते नागपुरात स्थायिक झाले. ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले आणि मराठी विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाले. गेल्या चार दशकांपासून त्यांचे साहित्य सृजन अव्याहत चालू होते.

‘‘उन्हंउतरणी सुरू होईल आता,
पण वाती भिजलेल्या नसतील,
धुपारतीची वेळ होईल लवकर अन्
माझ्याजवळ फुले जमलेली नसतील,’’

असं म्हणत सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ‘उन्हंउतरणी’ या संग्रहातून त्यांनी कवितेच्या क्षेत्रात पदार्पण केलं.… …

साठोत्तरी मराठी काव्यविश्‍वातील डॉ. श्रीधर शनवारे हे ज्येष्ठ कवी होते. लेखकाच्या जाणीवेत आणि नेणीवेत एखाद्या विषयासंबंधी अधिकाधिक चिंतनाने कसकसे परिवर्तन होत गेले याचे प्रतिबिंब त्याच्या साहित्यात दिसते. त्यांची वाण्ग्मयीन अभिरुची अनेक विषयात व्यापून राहिलेली आहे कविता, बाल-किशोर कविता, नाटक, प्रवासवर्णन, समीक्षा, मराठी व्याकरण, प्रबंध अशा अनेकविध अंगांनी त्यांचे साहित्यसृजन निरंतर प्रवाहित राहिले . पण विविध क्षेत्रातले लेखन त्यांनी केले असले तरी त्यांचा व्यासंग हा कवितेच्या गावचाच. समकालीन अनेक प्रतिभावंत कवी नावारूपाला येत असतांना डॉ. श्रीधर शनवारे यांनी स्वतःचे वेगळेपण जपत त्यांच्या काव्य चाहत्यांच्या आणि समीक्षकांच्याही नजरेत चिंतनशील कवी असा लौकिक प्राप्त केला. सूक्ष्म निरीक्षणशक्ती व चिंतनाची पक्की मांड त्यांची शक्तिस्थानं होती. त्यांच्या अनेक कवितांमधून त्यांची प्रतिभा बोलती झाली आणि आजही त्यांच्या अनेकविध पुस्तकांमधून त्यांची वाण्ग्मयीन गुणवत्ता सिद्ध झालेली आहे. 1960 नंतर मराठी कवितांना आयाम देणाऱ्या कवींमध्ये श्रीधर शनवारे यांचा समावेश आहे. विदर्भातील आध्यात्मिक, वैचारिक कवींच्या परंपरेतील ते कवी होते. त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये 'उन्हउतरणी', 'आतून बंद बेट', 'तळे संध्याकाळचे', ' ‘तीन ओळींची कविता’, 'थांग अथांग तळे' आणि ‘सर्वा’ असे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. या व्यतिरिक्त ‘राक्षसांचे वाडे’ हा बाल-किशोर कवितांचा संग्रह, श्री शरत्‌चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘रामेर सुमोती’ या कथेचा अनुवाद, ‘अतूट’ या शीर्षकाने नाट्याविष्कार, हिन्दीतील प्रख्यात साहित्यिक ‘प्रेमचंद’ यांचा निवडक कथांचा अनुवाद, मराठीतील समर्थ ‘कथाकार वामन चोरघडे’ हा समीक्षाग्रंथ, ‘अभिनव मराठी व्याकरण’ हा व्याकरणावरील ग्रंथ, ‘कोलंबसाची इंडिया’ आणि ‘पायावर चक्र’ ही अप्रतिम प्रवासवर्णने अशा विविध रूपांनी त्यांच्या प्रतिभा वृक्षाला बहर आलेला आहे. साहित्य क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे विदर्भाच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचे कलादालन समृद्ध होण्यास मदत झाली. विशेषत: मराठी कवितेतील त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल नागपूर येथील कृषी विकास प्रतिष्ठानाच्या वतीने त्यांना ‘विदर्भ गौरव’ हा अत्यंत सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या ’सरवा' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार, ’कोलंबसाची इंडिया’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाला नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा ‘गाडगेबाबा स्मृती पुरस्कार’ याव्यतिरिक्त प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ’सूर्योदय काव्य पुरस्कार’ आणि विविध साहित्य प्रकाराला अनेकविध सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

डॉ श्रीधर शनवारे हे एक विकासशील कवी होते त्यांच्या लिखाणात 'अनुभवाची अंतर्मुखता' आहे त्यांच्या साहित्यातून प्रतिमासृष्टी, अभिव्यक्तीतील मनमोकळेपणा आणि आत्मविश्वास या साऱ्यातून एक प्रथामिक जोम व्यक्त होतांना दिसतो. निसर्ग आणि मानवी जीवनमूल्यांविषयी निस्सीम निष्ठा असणा-या या कवीच्या कवितेत अपूर्णतेनं खंतावणारं मन दिसत राहायचं. श्रीधर शनवारे यांनी पूर्वसूरींचे अनुकरण न करता, समकालीनांमध्ये न रमता, कोणत्याही वाद-संप्रदायात न अडकता शांतपणे काव्यलेखन करून कवितेची एक देखणी पाऊलवाट निर्माण केली. म्हणूनच त्यांच्या साहित्यावर अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी 'प्रबंध' आणि 'शोधनिबंध' सादर केले आहेत . त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत आणि अनेक ग्रंथांची प्रकाशने त्यांच्या हस्ते झाली आहेत. त्यांच्यावर जवळपास शंभर एक समीक्षा लेख प्रसिद्ध झाले आहेत.

त्यांचा स्वभाव काहीसा आत्ममग्न होता, ते अत्यंत शांत आणि संयमी होते. एक चारित्र्यसंपन्न, सदाचारी, सतत कार्यमग्न असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या हयातीत त्यांनी साहित्य सृजन केलेच पण अनेक समृद्ध विद्यार्थी घडवले. त्यांच्या हयातीत मिळणारा कोणताही पुरस्कार योग्य ठिकाणी दान करण्याचा संकल्प त्यांनी केला होता यातून त्यांच्या निरपेक्ष, हळव्या स्वभावाचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

वांग्मय प्रेमी अन काव्यरसिकांसाठी ढीगभर मेजवानी ठेऊन, शब्दांची आगळी धून पाठी सोडून डॉ श्रीधर शनवारे २८ ऑक्टोबर २०१३ रोजी साहित्यविश्वात एक पोकळी निर्माण करून निघून गेलेत. साठोत्तरी मराठी काव्य विश्वातला तळपता सूर्य अस्ताला गेला. एका कवीची शेवटची ओळ संपली. त्यांच्याच शब्दात उर्धृत करायचे म्हंटले तर

"अंतिम ओळ
तुटण्याशी जोडलेली;
खोडता खोडता उरलेली
उरता उरता
सरलेली"

उन्ह-उतरणी संपली आणि अज्ञाताचा शोध घेताघेता एक आतून बंद बेट काळाच्या अथांग सागरात मावळून गेले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या शब्दातून अन कवितेतून अजरामर आहेत


- रश्मी पदवाड मदनकर

Monday 7 October 2019

'फ्रायडे फॉर फ्युचर' - ग्रेटाची ग्रेट चळवळ


तिने खरतर शाळेत असायला हवे होते.. खेळण्याबागडण्याच्या वयात जणू घराला आग लागली आहे आणि आपण सर्वांनी जागे होऊन ती विझवायला आता याक्षणी प्रयत्न करायला हवे असे तळमळीने सांगत फिरते आहे. कोण आहे ती?





गस्ट २०१८ पासून “स्कूल स्ट्राइक फॉर क्लाइमेट” नावाने आंदोलनाला जन्म देऊन ते फक्त प्रांत, राज्य, देशात नाही तर जगभर पसरत जाणाऱ्या क्रांतीचे रूप घेतलेल्या जलवायू परिवर्तनाच्या विरोध चळवळीला हल्लीच पुन्हा एकदा मूर्त रूप आले, ते ग्रेटाच्या 'हाऊ डेअर यु ?' असं जगातील पुढाऱ्यांना ठणकावून विचारणाऱ्या यूएनमधील भाषणामुळे. पर्यावरण संरक्षणाचा हेतू पुढे ठेवून ''फ्राइडेज फार फ्यूचर'' ही आंदोलनाची मालिका ग्रेटानं चालू केली होती जी जगातील 100 हून अधिक शहरांमध्ये पसरत गेली. ही मोहीम अजूनही निरंतर चालू आहे. स्वीडनमध्ये जन्मलेली ही किशोरी जगातील पर्यावरण रक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षाला एक नवीन आयाम देणारी सगळ्यात अल्पवयीन कार्यकर्ती ठरली आहे. तिला वाटते की बेजबाबदार राजकारणी आणि उद्योगांमुळे ही धरती प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी जे काही प्रयत्न केले जायला हवे ते होत नाहीये. हे जग ही धरती जलवायू प्रदूषणापासून वाचवण्याची लढाई काही विशिष्ट लोकांचीच नाही तर या एका कारणासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. नवीन पिढीला आम्ही काय देऊ शकतो, तर.. पूर्वजांकडून मिळाल्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी जगण्यायोग्य, जलवायू प्रदूषणमुक्त पृथ्वी सोडू याची हमी आम्ही त्यांना द्यायला हवी असे तिचे म्हणणे आहे..फक्त १६ वर्षाच्या अल्पायुत जलवायू परिवर्तनाबाबत काळजी बाळगत त्या विरोधात उभे होऊन जगभर खळबळ माजवून देणाऱ्या स्वीडनच्या या इटुकल्या क्रन्तिकारीचे नाव आहे ग्रेटा थॅनबर्ग. यावर्षी ग्रेटा यांना प्रतिष्ठित अ‍ॅम्नेस्टी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिची आंदोलनाची तीव्रता बघून प्रेरित होऊन हे लोण जगभर पसरत चालले आहे. तिला ‘युनो’ मध्येच नव्हे, तर अनेक ठिकाणी बोलायला बोलावलं जात आहे.

नेमके काय झाले होते ...

ऑगस्ट 2018 मध्ये एकदा ग्रेटाने कार्बन उत्सर्जन आणि त्यामुळे होणारी तापमानवाढ या संदर्भातला एक व्हिडीओ इंटरनेटवर पाहिला आणि तिच्यावर त्याचा खूप परिणाम झाला. लवकरच यावर काहीतरी करण्यात आले नाही तर ह्याचा अत्यंत विपरीत परिणाम या धर्तीवर होईल व ती जगण्यायोग्य राहणार नाही, स्वीडन सरकारने कार्बन उत्सर्जन कमी करावे यासाठी प्रयत्न करावे असे तिला वाटू लागले. त्याच काळात स्वीडनमध्ये राष्ट्रीय निवडणुका होणार होत्या तेव्हा ग्रेटाने शाळेत जाणे बंद केले. त्याऐवजी, संसदेच्या बाहेर बसून जीवघेण्या हवामान बदलाच्या विरोधात एल्गार पुकारला. सुरुवातीला ती एकटी होती पण तिने धैर्य न गमावता आपला निषेध सुरू ठेवला, हळूहळू तिचा आवाज लोकांपर्यंत पोचू लागला. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, बेल्जियममधील मुले या क्रांतीमध्ये सामील झाली, यूकेमध्ये शाळेतली मुले रस्त्यावर उतरली. या सगळ्यांच्या हातात फळी होती ज्यात असे लिहिले होते की 'आपण आपले काम प्रामाणिकपणे कराल तेव्हाच आम्ही आमचे गृहकार्य पूर्ण करू'. तेव्हापासून दर शुक्रवारी शाळेसमोर निदर्शने करीत हवामान बदलाच्या विरोधात हजारो विद्यार्थी आपापल्या देशातच नाहीतर संपूर्ण जगभरात योग्य ती पावले उचलावी अशी मागणी करत प्रदर्शन करीत आहेत. आतापर्यंत जगातील 100 हून अधिक देशांतील एक हजाराहून अधिक धरणे ग्रेटाच्या समर्थनार्थ झाले आहेत. या चळवळीमुळे युरोपच्या निसर्गासाठी कार्य करणाऱ्या संघटनांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले जात आहे. युरोपमधील बर्‍याच देशांनी त्यांच्या हवामान बदलाच्या धोरणात चळवळीच्या दबावाखाली मोठ्या सुधारणा करायला सुरुवात केली आहे.




स्कॉटिश तत्त्ववेत्ता डेव्हिड ह्यूम यांनी १७३९ मध्ये लिहिले होते कि ''लोकप्रतिनिधिक सरकारांची सुरूवात करण्यात आली कारण माणूस आपल्या संकुचित विचारांमुळे स्वार्थापलीकडे पाहू शकत नाही, तो त्याच्या वर्तमानकालीन लाभांमध्ये आणि लोभांमध्ये गुरफटून असतो, तो भविष्याबाबत दूरदृष्टी ठेवू शकत नाही'' त्यांचे मानाने होते कि सरकारी संस्था, संसदीय परंपरा आणि लोकप्रतिनिधी आपल्या स्वार्थाला आळा घालतील आणि समाजाला दूरदृष्टी देण्यासाठी काम करतील. पण आजच्या जगभरातील राजकीय वातावरणावर नजर टाकली तर परिस्थिती अगदी विपरित असल्याचे लक्षात येते. कोणताही पुढारी भविष्यातील पिढीच्या भवितव्याबद्दल विचार करतांना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्यात देशांचे स्वतःचे हितसंबंध बाधा बनताना दिसतात. डेव्हिड ह्यूमला लोकशाहीकडून असलेली आशा स्पष्टपणे भंग झालेली दिसते आहे. अश्या परिस्थितीत काहीतरी जादू घडेल अशी वाट न बघता प्रत्येकाला पुढाकार घ्यावा लागेल. सुरुवात कोणीतरी करायला हवी आहेच पण प्रत्येकाला अचंभित आणि आकर्षित करणारी गोष्ट हि आहे कि हे आंदोलन कुठल्या नावाजलेल्या बुद्धिवाद्यांनी नव्हे तर एका ‘अस्पर्जर सिंड्रोम’ने आजारी असणाऱ्या किशोरवयीन बालिकेने छेडले आहे. हा स्वमग्नतेसारखा आजार आहे, अस्पर्जर सिंड्रोमने ग्रसित माणसे एखाद्या विशिष्ट विषयांबद्दल खूपच चिंतित होतात. ते त्या विषयांना अत्यंत गांभीर्याने घेतात आणि त्याच त्याच गोष्टींसाठी आग्रह लावून धरतात..असे लोक सहसा सामाजिक संवाद कमी करतात. पण ह्याच कारणामुळे ग्रेटा ला तिचे विचार सतत लावून धरणे ते लक्ष विचलित न होऊ देता लोकांपर्यंत पोचवणे शक्य झाले आहे. संपूर्ण जगातलेच पुढारी परिवर्तन घडवून आणण्यात फेल ठरले आहेत असे तिला वाटते, ती यूएसमध्ये अडीच लाख लोकांच्या गर्दीसमोर उभी राहून पुढाऱ्यांना उद्देशून एक प्रश्न विचारते '' जर तुमचे घर ढासळायला लागले तर तीन आपत्कालीन बैठकी आणि हवामान आणि पर्यावरणाच्या विघटना संदर्भात चमू बोलावून आपत्कालीन शिखर परिषद घेत तुम्ही बसणार आहात का ?" तापमानवाढीमुळे संपूर्ण जगच संकटाच्या सावटाखाली आले आहे, याचे परिणाम आपण भोगत असतांना यावर तात्काळ उपाययोजना व्हायला हवेत असे तिला वाटते. ती तिच्या एका भाषणात जनतेला संबोधून म्हणते '' तुम्ही तुमच्या मुलांवर अत्यंत प्रेम असल्याचा आव आणता, पण त्यांचे भविष्य आता त्यांच्या डोळ्यादेखत संकटात घालता आहात'' आपले आपल्या माणसांवर प्रेम असेल तर जलवायू परिवर्तनासंबंधी योग्य उपाययोजना आपणच शोधून काढली पाहिजे. त्याचबरोबर सगळ्या देशांनी पॅरिस ठरावानुसार कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी केलेच पाहिजे, हे ती जगाला ठासून सांगते आहे.




ग्रेटासारख्या किशोरीला पर्यावरणाचे जे महत्व समजले आहे त्यासाठी जगभरातील किशोर, तरुणवर्ग तिच्या सोबतीला उभे राहत आहेत. आपणही निदान आपल्या हिस्स्याचे कर्तव्य पार पाडत पर्यावरणाला घटक ठरतील अश्या गोष्टी नाकारून पर्यावरणासाठी पूरक गोष्टींचा स्वीकार करायला हवा...निदान इतके योगदान शुभेच्छांसह तिच्या चळवळीला आपण देऊच शकतो... नाही?



- रश्मी पदवाड मदनकर

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...