Tuesday 26 May 2020

टाळीला थाळीची आस - भाग 2

#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा -



सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्या .. आणि राणी किंग ह्यांनी सध्या चालू असलेल्या लॉकडाऊन काळातल्या तृतीयपंथीयांच्या उपजीविकेच्या समस्यांवर बोट ठेवले. ह्यांच्या मागण्या आणि समस्या ह्याबद्दल उहापोह करण्याआधी जाणून घेऊया राणी किंग आहेत कोण ?

जात-पात-धर्म, स्त्री-पुरुष समानता अश्या अनेक हक्कांसाठी लढतांना किंवा त्यावर उर भरून बोलतांना आपण केवढे संवेदनशील होत असतो. मात्र ह्याच धर्तीवर जगणारे, मानवाच्या गर्भातूनच जन्म घेतलेले आपल्यासारखे जीव केवळ लैंगिक भिन्नतेमुळे उपेक्षित राहतात आणि नंतर संपूर्ण आयुष्यच केवळ हक्काचं जिणं जगण्यासाठी म्हणून झटत राहतात,  हे किती अन्यायकारक आहे हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अश्यातलेच .. एखादा अक्खा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी पिढी दर पिढी वर्षानुवर्षे केवळ रुढिवादातून चालत आलेल्या तुमच्या आमच्या अंधश्रद्धेच्या जोखडावर पाय रोवून टाळी वाजवत नाचत धडपडत हे दळभद्री आयुष्य जगत राहतो आणि सभ्यतेचा, समानतेचा, पुढारीपणाचा आणि समाजसेवेचा मुखवटा चढवून फिरणाऱ्यांना त्याचे वैषम्य वाटू नये किंवा त्याच्या बदलासाठी फारसे ठळक प्रयत्न होऊ नये हे फार दुःखद आहे.

ह्याच उपेक्षित तृतीय पंथीय समाजाच्या उत्थानासाठी किन्नर राणी ढवळे मागल्या अनेक वर्षांपासून लढतायेत. स्वतःच्या चांगुलपणावर आणि संस्कारावर ठाम विश्वास असणाऱ्या राणी म्हणतात 'ताली बाजाकर और एक रुपये का सीक्का देकर हम कबतक जिते रहेंगे, अपने लिये नहीं तो कमसे कम हमारी आनेवाले पिढी के लिये हमें मान सन्मान वाला जिंदगी छोडकर जाना चाहिये' तुकाराम महाराज म्हणतात ना 'जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' कोणताही दुटप्पीपणा ढोंग न करता बोलनं आणि वागणं यात सुसंगती ठेवणार्या व्यक्ती बद्दल आदर बाळगावा म्हणूनच राणीचे काम बघितल्यानंतर आपसूक तिच्याबद्दल आदराची भावना निर्माण होते. तृतीय पंथीयांनी चांगले शिक्षण घ्यावे, शिकलेल्या सक्षम असलेल्या तृतीय पंथीयांना सरकारने रोजगार द्यावा, समाजात मान निर्माण होईल अशी त्यांनी वागणूक ठेवावी .. फक्त आपल्याच कम्युनिटीच्या नव्हे तर समाजातील प्रत्येक माणसांच्या गरजेला कामी यावे, अन्यायासाठी लढा द्यावा तेवढेच संकटात गरजेच्या वेळी एकमेकांसाठी धावून जावे ही राणीची मानसिकता आहे.

ती आजवर कोणत्याही संस्थेच्या भरवशावर न राहता स्वबळावर या कम्युनिटीसाठी त्यांच्या हक्कांसाठी लढा देत आली. त्यांच्या शिक्षणासाठी, रोजगार मिळवण्यासाठी, अनेक बाबतीत त्यांना समानतेचा अधिकार मिळण्यासाठी, त्यांना अपमानाचा सामना करावा लागू नये म्हणून शहरात स्वतंत्र शौचालय बांधून द्या यासाठी किंवा चुकीची कामे करावी लागू नये म्हणून व्यवसाय प्रशिक्षण किंवा निर्मिती करण्यासाठी शासनाने मदत द्यावी यासाठी राणी तिच्या साथीदारांसह पुढाऱ्यांपासून शासनदरबारापर्यंत पायपीट करत, निवेदन देत, आंदोलन करत फिरत असते.




राणीचे काम इतक्यावर संपत नाहीं. समाजातील कोणत्याही घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ती ठामपणे उभी राहते तिच्या नेटवर्कच्या माध्यमातून मदत पोचवते. कुठल्याश्या विधवेला सासरहून मिळवून दिलेला हक्क, कोणत्या सुनेची सासरच्या जाचातून केलेली सुटका, एखाद्या म्हातारीला मुलगा-सुनेच्या अत्याचारापासून वाचवून प्रदान केलेली सुरक्षा, कुणाला मरणाच्या दारातून परत आणले किंवा कुना गरजवंताला पैशांची केलेली मदत अश्या एक ना अनेक कहाण्या तिच्या पदरात बांधलेल्या सापडत राहतात.

पुढल्या भागात पाहूया एका किन्नरच्या हत्येसाठी आपल्याच समाजातील त्या दृष्ट माणसांच्या विरोधात उभे राहण्याचे राणीचे धारिष्ट्य ..





©रश्मी पदवाड मदनकर




Monday 25 May 2020

टाळीला थाळीची आस - 1



#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा -


हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे''



आपण फोन केल्यावर ही सुरेख रिंगटोन कानावर पडते. ती ऐकतानाच त्यांच्याबद्दलचा पूर्वाग्रह आपोआप गळाल्यासारखा वाटू लागतो स्क्रीनवर 'राणी किंग' नाव झळकत असते.. राणी किन्नर (राणी ढवळे) फोन उचलतात. 'हा बोलो दीदी' अश्या अत्यंत नम्र आवाजात आपली विचारणा होते . बातमीसाठी भेटायचंय सांगीतल्यावर दोघींच्याही सहमतीने सोयीने भेटीची वेळ आणि ठिकाण ठरते.. खरतर नाही म्हंटले तरी जरा दबकतच आपण वेळेत जाऊन पोचतो, दिलेल्या पत्त्यावर पण जरा बाहेरच रस्त्याच्या कडेला झाडाखाली उभे राहतो, थोडी वाट पाहावी लागते .. तेवढ्याच वेळात मनात बरेच विचार येऊन जातात. तृतीय पंथीयांना असे पाहिले बोललो असलो तरी स्वतः त्यांच्या राहत्या जागी जाऊन प्रत्यक्ष भेटून बोलायची ही आपली पहिलीच तर वेळ असते.

१५-२० मिनिटांचा वेळ जातो आणि राणी किंग त्यांच्या इतर ४ साथीदारांसह गाडीतून उतरतात. आपण अचंभित बघत राहतो .. अतिशय साधा वेष साधी लिंबू रंगाची सुती साडी एखाद्या घरंदाज बाईसारखा खांद्यावरून पदर घेतलेला. उतरताच चेहेऱ्यावर स्मित आणि एक हात छातीवर ठेवून जरा शरीर वाकवून आम्हाला केलेले वंदन. आणि हातानेच 'या' म्हणत त्या पुढे चालू लागतात. आपण बेमालूमपणे त्यांच्या पाठी चालू लागतो. आपल्या कल्पनेतली कुठलीही खून त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसत नाही. कुठलाही भडक मेकअप नाही, शरीराला उगाचच दिलेले लटके-झटके नाही, चालण्यात लचक नाही कि चेहेऱ्यावर अगाऊ भाव नाहीत..एखाद्या मानी स्त्री प्रमाणे काखेत पर्स लटकावून खांद्यावरचा पदर नीट सांभाळत साधेपणाने त्यांचे चालणे दिसत राहते .. आपल्या कल्पनेतले अनेक मनोरे अजून ढासळणार असतात.. पूर्वग्रह पुसला जाणार असतो.

एका तीन मजली क्वार्टर सदृश इमारतीतल्या पहिल्या मजल्यावर आपण येऊन पोचतो.. ही तुमच्या आमच्या सारखीच मध्यम वर्गीय सभ्य लोकांची सोसायटी असल्याचे लक्षात येते. इमारतीत आणखीही बरेच कुटुंब यांच्यासह गुण्यागोविंदाने राहत असल्याचे कळते. आपण आत येताच आपल्या हातावर सॅनिटायझर दिले जाते.. सगळ्यांनी मास्क देखील लावले असतात. त्यांच्या घरात त्यांचा वावर अगदी आपल्यासारखा सहज साधा.. नीटनेटकं लावलेलं घर, घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिव्या फुलांनी सजवलेलं देवघर.. दाराला तोरण पडदे.. आणि माणूस म्हणून आवडणाऱ्या सॉफ्ट टॉईज सारख्या अनेक गोष्टी... आपल्याला विषयाला हात घालायचा असतो, राणी रोशनीला थंड भरलेले ग्लास आणायला सांगते 'दीदी आप धूप में घुमकर आई हो पहिले थंडा पी लो, बाते तो क्या होती रहेंगी' रोशनी गोड स्मित करत थंड आणायला आत जाते आणि मला उगाचच दारात आलेल्याला पाणीही न विचारणारा सभ्य समाज डोळ्यापुढे येऊन आठवत राहतो ...

हातात दिलेल्या कोल्ड ड्रिंकचा घोट पीत मी थेट प्रश्नाला हात घालते ''आपको यहा के लोग तक्लीफ नही देते ?? '' राणी हलके स्मित करत शांत स्वरात उत्तर देते ''नही देते दीदी, आपुन अच्छे तो अपने लिये सारा जमाना अच्छा है. अपने से किसी को तक्लीफ नही तो अपने को लोग काहे को तक्लीफ देंगे' .. आपण तिच्याकडे बघत राहतो.. समाजाने टाकून दिलेले किंवा सतत हिनवले गेलेले हे लोक, अजूनही किती आशावाद ठेवून जगत असतात.
क्रमशः

कोण आहेत राणी किंग वाचा पुढील भागात ..

©रश्मी पदवाड मदनकर


Image may contain: 2 people, people standing and indoor

Wednesday 13 May 2020

मन बेबंद .. !



घर .. आंगण .. बाजार .. कार्यालये .. शहर लॉकडाऊन .. ...

शेजारी .. सहकारी .. गणगोत .. मित्र मंडळी ..होम क्वारंटाईन

सगळं सामसूम .. कडेकोट बंदोबस्तात

आता कोणी कोणाला भेटत नाही. भेटल्यावर हसण्यातून-डोळ्यातून दाटून आलेला आनंद आता दिसत नाही. विश्वासाचा स्पर्श म्हणून कोणी हातात हात घेत नाहीत. आधाराची थाप आणि कौतुकाची शाबासकीही देत नाहीत. डोक्यावर आशीर्वादाचा हात कोणी ठेवत नाही आणि मित्र मैत्रिणी भेटल्यावर कोणी आवेगपूर्ण मिठीही मारत नाहीत.

परवा आठवला तो पावसानं सगळा संसार उधळून लावल्यावर कवी कुसुमाग्रजांना भेटायला आलेला तोच तो कोणी.., दारात दूर उभा राहिला एक शब्दही न बोलता
कसे म्हणावे '‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला'' एकटेपणा आता सगळ्यांच्याच पदरी पडलेला नाही का.
'पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा' इतकेही शब्द फुटेनात.. पाठीवर हात मागायचा तरी कसा ? सोशल डीस्टंसिग पाळायला हवे.

''पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे''


इंदिरा बाईंना कोणी सांगावं की येऊ द्यात निदान तेवढं तरी.. तेवढ्याने काही लागण होणार नाही. पण जगण्याला जरा निमित्त मिळत राहील. अहो सगळंच बंद केलं तर जगायचं तरी कसं?
इतकेही मिळणार नसेल तर सुरेश भटांच्या गजलेतील एका शेराप्रमाणे गत होईल
''नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते''


नुसतेच भासमय जगणे ??
या भासांवर निभावून नेणे कधीपर्यंत ? किती वाट पाहावी किती सहावे विरह .. सुधीर मोघेंना ही अवस्था बरोबर कळली होती बहुदा ..
'मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास ॥'


अश्या एकांतात इंदिरा संतांना देखील आठवणी दाटून येतात .. गहिवरते मन. क्षणक्षण पुढ्यात येऊन उभा राहतो आणि जीवाची तगमग तगमग होत राहते. स्वतःशीच पुटपुटत त्या विचारतात सख्याला
"ऐक जरा ना"
कौलारांतुन थेंब ठिबकला
ओठावरती
"ऐक जरा ना... एक आठवण.
ज्येष्ठामधल्या - त्या रात्रीच्या
पहिल्या प्रहरी,
अनपेक्षितसे
तया कोंडले जळधारांनी
तुझ्याचपाशी.
उठला जेव्हा बंद कराया
उघडी खिडकी,
कसे म्हणाला..
मीच ऐकले शब्द तयाचे...
'या डोळ्यांची करील चोरी
वीज चोरटी
हेच मला भय."


 कसली हृद्य आठवण.. पण वास्तव सुटतंय का हातातून ? आठवणीतच जगायला भाग पाडतंय. आठवणींचा कल्लोळ मनात धुमाकूळ घालतोय, पण उपाय काय स्वतःला क्वारंटाईन करून घेण्याशिवाय पर्याय तरी काय .. इंदिरा संत हतबल होतात. जीवाचा कोंडमारा सहन होत नाही आणि मग त्या भरभर कागदावर ओळी उतरवतात
"अंधाराने कडे घातले
घराभोवती;
जळधारांनी झडप घातली
कौलारावर.
एकाकीपण आले पसरत
दिशादिशांतुन
घेरायास्तव...
एकटीच मी
पडते निपचित मिटून डोळे."


केवढा हा जीवाचा आकांत केवढी कासावीशी. अश्या जगण्याचा तिढा कधी सुटायचा.. किती वाट पाहायची? आजूबाजूला एवढे मळभ दाटून आले असतांना, मनाला कसे आणि काय समजवायचे. इंदिरा संतांच्या मानसारखीच शांताबाईंची अवस्था झाली असावी का ? त्यांनी इतक्या आर्त भावना कश्या बरं उतरवल्या होत्या.
''घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया
दुःखाचीही अशी लागते अनवट माया
आक्रसताना जग भवतीचे इवले झाले
इवले झाले आणि मजला घेरित आले''


तसे शांताबाई या निराशेतून बाहेर यायला सांगतात तेव्हा त्यांचे शब्द खूप धीरही देतात. कणखरपणे उभे राहायला हवे, तसेच जसे हजार आपदा येऊन आदळल्या तरी निसर्ग निराशेच्या गर्तेत जात नाही. कोलमडून पडल्यावरही नवी पालवी फुटते नवा बहर येतो. त्या म्हणतात मनाचा हिरवा बहर ओसरल्यासारखा वाटत असेल तर जरा खिडकीतून डोकवावे बाहेर, या निराशेतही आशेचे अनेक फुलोरे फुलून आले असतात तिथे -

"तसे वॄक्ष अजूनही बहरतात
फुलांनी गच्च डवरतात
हृदयतळातून फुटतात अंकुर, झुलतात पाने,
एका अज्ञात आकाशात
शुभ्र शुभ्र भरारी घेतात
गातातही पाखरे तिच्या आवडीचे एकुलते गाणे."


हे मन फार हटखोर असतं नाही ? काही केल्या ऐकत नाही ..
मनाला नाही का लॉकडाऊन करता येत ? न हलता-डुलता, कुठेच न जाता, कुणाचीच आठवण न काढता, दूर दूर जाऊन कुणालाच न भेटता गप्प बसायचं 'डिस्टंसिंग राखायचं' असं नाही का सांगता येत ... सांगता आलं असतं .. मनाला क्वारंटाईन करता आलं असतं तर किती बरं झालं असतं ... नाही ?

©रश्मी पदवाड मदनकर

Friday 8 May 2020

झूम जब तक धड़कनों में जान है ...



याद रख जीवन के पल हैं चार... सीख ले हर पल में जीना यार.. मरने से पहले जीना सीख ले !!


कोणीतरी येऊन आपल्या कानाखाली बंदूक लावावी आणि सांगावे मरण जवळ येतंय, दिवस निघत जातायत, 'स्व'च्या पलीकडले जगणे काय असते शिक. आणि जगून घे मनासारखं एकदातरी. असच काहीतरी होतंय ना ... कोरोना नावाच्या बंदुकीच्या टोकावर आहोत आपण सगळे, कुणाची गोळी पहिले चालणार हाच काय तो प्रश्न.. या काळात अनेकांचे अवसान गळून पडले असतील. मुखवटे उतरले असतील. झगमगाटीपेक्षा, दिखाव्यापेक्षा जगण्यामरण्याचा प्रश्न महत्वाचा वाटायला लागावा असा काळ उगवून पुढ्यात येऊन ठाकला आहे. आता जमापुंजी साठवत बसण्यापेक्षा गरजवंतांसाठी पुढे येणारे हात दिसतायेत. एरवी स्पर्धेच्या चढाओढीत पायात पाय अडकवणारे पोटावर पाय देऊन पुढे जाणारेही एकमेकांना हात देऊन स्थिर करण्याचा प्रयत्न करताहेत.

माणूस मरणाच्या रेषेवर उभा असतांना आणि मदतीचा पुढे आलेला हात धरतांना हा हात कुठल्या प्रांतातला, कोणत्या जातीचा-धर्माचा, नात्यातला की अनोळखी, पापी की पुण्यवान या सर्वांचा कितीसा विचार करत असेल…?? संकटाच्या काळी मदतीला आलेला कुठलाही हात हा 'देवस्वरूप' वाटत असेल तर मग सगळं सुरळीत चालू असतांनाच हे सगळे असले चोसले आपण का पाळत बसतो. एकदा 'द बर्निंग ट्रेन' हा सिनेमा पाहतांना मला हा प्रश्न पडला होता तेव्हा वय थोडं लहानच होतं पण आज कोरोनाच्या धर्तीवर पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि सिनेमा पुन्हा पुन्हा आठवू लागला आहे.


साहिर लुधियानवीने लिहिलेली रफी अन आशादी ने गायलेली या सिनेमातली कव्वालीच आयुष्याचे केवढे सार सांगून जाते..


पल दो पल का साथ हमारा
पल दो पल के याराने हैं
इस मंज़िल पर मिलने वाले
उस मंज़िल पर खो जाने हैं


आयुष्याची शाश्वती आहे तोवरच जगून घ्यायला हवे, उद्याचा काय भरवसा आज ज्यांचे हात हातात आहेत उद्या नसतील कदाचित, आज जे डोळ्यांना दिसतायेत उद्या दिसणार नाहीत. आपण तरी उरणार आहोत का ? जिथे कशाचीच शाश्वती नाही तिथे कसला संकोच आणि कसली शंका .. सगळं पुसून कोऱ्या पाटीप्रमाणे स्वच्छ करावं आणि उरलेल्या दिवसांचा मनाप्रमाणे उत्सव करावा.


कव्वालीत म्हटलंय ना ..
हर ख़ुशी कुछ देर की मेहमान है
पूरा कर ले दिल में जो अरमान है
ज़िन्दगी इक तेज़-रौ तूफ़ान है
इसका जो पीछा करे नादान है
झूम जब तक धड़कनों में जान है




१९८० साली रवी चोपडा यांच्या निर्देशनात ५ वर्षाच्या दीर्घ कालावधीत तयार झालेला 'द बर्निंग ट्रेन' सिनेमा आला होता. विनोद खन्ना, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जितेन्द्र आणि नीतू कपूर सारख्या दिग्गज कलाकारांनी काम करूनही त्याकाळात फ्लॉप झालेला परंतु कालांतराने क्लासिक सिनेमाचा दर्जा प्राप्त झालेला हा अफलातून चित्रपट. विविध स्थानकांवरून वेगवेगळ्या गंतव्याला निघालेली जात, धर्म, परंपरा, पेश्यानं आणि स्वभावानंही विवीधता असणारी अनेकजण अगदी अबालवृद्ध एका ट्रेनने प्रवास करत असतात.. प्रवासभर कायकाय घडत राहतं. आपापसात प्यार-मोहब्बत पासून ते मारधाडपर्यंत.. नव्या होणारया मैत्रीपासून ते पुर्विचे असणारे वैर आणि त्याचा सुड वगैरे घेण्यासाठी कुठल्याही थराला जाण्यापर्यंत...अगदी करमणुकीत नाच गाणीही चालू असतात. सगळे आपापल्या तालात जगण्यात तल्लीन वगैरे. पण हे सर्व सगळं आलबेल असतं तोवर... अचानक परिस्थिती पालटते चालत्या ट्रेनला आग लागते आणि सारं चित्रच पालटतं. धगधगत्या ट्रेनमधले ब्रेक फेल होतात. मरण डोळ्यापुढे दिसू लागतं.. जगण्याचे आता काहीच क्षण उरल्याची जाणीव प्रखर होते. सगळे मुखवटे सगळे बेगडी अवसान गाळून पडू लागतात. होते नव्हते क्लेश विसरून प्रेमाची माणसं जवळ येतात.. सहप्रवासी माझं-तुझं विसरून एकमेकांना मदत करू लागतात. वैरी हातात हात घेऊन संकटातून मार्ग काढायला रणांगणात उतरतात, महिला खांद्याला खांदा लावून मदतीला सरसावतात, ज्यांना ज्यांना हे शक्य होत नाही ती देवाला प्रार्थना करून हातभार लावतात.


तेरी मर्ज़ी से ऐ मालिक हम
इस दुनिया में आए हैं
तेरी रहमत से हम सबने
ये जिस्म और जान पाए हैं
तू अपनी नज़र हम पर रखना
किस हाल में हैं ये ख़बर रखना
तेरी है ज़मीं, तेरा आसमां
तू बड़ा मेहरबां, तू बक्शिश कर ..


जगण्या-मरण्याच्या प्रचंड कोलाहलातून, मोठ्या संघर्षातून महत्प्रयासाने विजय मिळविला जातो आणि काही प्रवासी गमावून उर्वरित मात्र सुखरूप गंतव्याला पोचतात. हा मरणाकडे घेऊन जाणारा प्रवास खूप काही शिकवून गेलेला असतो. ट्रेनमध्ये चढतांना असलेला प्रवासी त्याच ट्रेनमधून उतरतांना पूर्वीचा तो राहिलेलाच नसतो ... नखशिखांत बदललेला असतो.


काहीतरी शिकायला समजून घ्यायला बरेचदा स्वतःचे अनुभवच का घ्यावे. पुढ्ल्याला लागलेली ठेच पाहून खरतर मागल्याने शहाणे व्हायला हवे पण असे होत नाही. त्याला ठेच कशी लागली म्हणून पाहायला धजावतो आणि स्वतःचा पाय ठेचकाळून घेतो. आज या घडीला तरी हे व्हायला नको कारण शिकत बसायला आयुष्य पडलंय हे म्हणण्याइतकासुद्धा वेळ खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का कुणास ठाऊक. म्हणून वाटतं जो पर्यंत आपल्या घरात, परिवारात, आपल्या आजू-बाजूला सर्व सुरळीत आणि सुखरूप असतं तोपर्यंतच माणसाचे जात-धर्म, आपला-तुपला, सख्खा-परका, हा गरीब तो श्रीमंत असे जास्तीचे चोसले असतात, पण खरी वेळ अंगावर आली की यातले काहीही कामात येत नाही कामात येते ती फक्त माणसातली माणुसकी... आपल्यातली माणुसकीच तेवढी शिल्लक राखायला हवी .. जपायला हवी.


 रश्मी पदवाड मदनकर






Saturday 2 May 2020

क्वारंटाईन ..



शेवटी भांडून निघालो तेव्हा 
अडकून पडणार आहोत आपण 
एकमेकांपासून दूर .. आपापल्या घरात 
क्वारंटाईन होऊन ..
कुठे माहिती होते तुला मला 
 
नकोच तू मला म्हणतांना 
तोंडच बघायचे नाही ठरवतांना 
जीव तटतटून आठवण येईल 
पण नाहीच बघायला मिळणार एकमेकांना .. 
कुठे माहिती होते तुला मला 

हातातले हात सोडले तेव्हा 
रागानेच विलागलो तेव्हा 
एकमेकांच्या स्पर्शालाही पारखे होऊ 
आठवणींशी झटत राहू .. 
हा अंदाजही कुठे बांधता आला तुला मला 

स्वप्नातले इमले होते इवले इवले 
एकमेकांच्या सोबतीने पाहिलेले 
तुझ्या डोळ्यात माझे माझ्या डोळ्यात तुझे 
अवकाश होते झुकलेले .. 
सोबतीचे अवकाशच असे दुरावेल  
 कुठे माहिती होते तुला मला 

एकमेकांपर्यंत पोचायचे सगळे रस्ते बंद आहेत आता 
एकमेकांजवळ घेऊन जाणाऱ्या पायांना टाळे  ..
निरोपाचे रस्ते सुद्धा अदृश्य झाले तर ? ... आणि 
शेवटचा श्वास घ्यावाच लागला तर 
सांग कसे कळेल तुला मला ? 

लॉकडाऊन संपेल तेव्हा 
धावत येऊ भेटायाला 
पश्चातापाचे अश्रू थोपवून 
मिठीत शिरून सॉरी म्हणायला 
आपल्यातला एक दिसलाच नाही 
कुठे विरला कळलेच नाही 
पाहता पाहता दुनिया बदलेल 
अखंड पोकळी निर्माण होईल 
जगण्या जगवण्याचे प्रश्न 
शून्य होऊन संपून जातील 

जगता जगता मरता मरता 
का मी उरलो कळणार नाही 
तगणे इतके कठीण होईल   
उरल्या सुरल्या त्या एकाला 
भकास जगणे जमणार नाही 

सांग माहिती होते तुला मला ?

शेवटी भांडून निघालो तेव्हा 
अडकून पडणार आहोत आपण 
कुठे माहिती होते तुला मला 
 
- रश्मी 

#लॉकडाऊन_मधल्या _कविता 







 
कुणीतरी हाक घालतं
 मनाच्या बांधावरच हात घालतं
बंद असलेली दारे उघडी होऊ बघतात
आणि भीती दाटून येते

कधीतरी दुखऱ्या अनुभवांचे संचित
मनात कोंडून आपणच दारं गच्च बंद करून
टाळे लावून घेतलेले असतात
आत बाहेरचे सर्व रस्ते बंद करून टाकले असतात
अंतर आखले अंतर राखले असतात ..

मान्य - अंतरं जवळीक साधत नाहीत
पण अंतरं मन मोडतही नाहीत
मनांचा मनाशी संवाद घडत राहायला
हरकत नाही एकवेळ ..
पण मनाचा बांध मोडून सोडून जाणाऱ्यांना
मनाच्या टाळ्याची चावी मात्र देऊ नये ..
 
  

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...