Monday 30 April 2018

कवडसे ...

#लघुकथा


खिडकीतून थेट येऊन फरशीवर लांब पसरलेल्या दोन कवडश्यांशी मितालीचा खेळ चालला होता. खिडकीच्या गजांनी विभागलेले, भुरभुर दिसणारे सोनरंगी-चमचमते दोन कवडसे...  दोन बाजूने दिवाण खोलीत पसरले असायचे. त्या दोहोत पडलेल्या दुहित उभे राहून दोन कवडश्यांना एकहाती पकडण्याचा खेळ खेळण्यात चार वर्षांची चिमुकली दंग व्हायची. दोन कवडश्यांना कधीचे तिला एकत्र आणायचे होते. कधीतरी हे दोन्ही कवडसे हाताने धरून एकत्र करूया अशी निरागस मनाची स्वप्नील कल्पना नितळ आरस्पानी डोळ्यात डोकावत दिसायची.  त्या दोहोंच्या मधोमध उभ राहून पाय फाकवुन हात पसरून दोहोंना एकत्र स्पर्शायची धडपड रोज दुपारी करत राहायची. एक कवडसा हातात आला कि दुसरा दूर राहायचा, मग ती महत्प्रयासाने पुन्हा दोन्ही पाय अधिकाधिक पसरून..  हात लांबवून कवडसे मुठीत घेऊ बघायची. ते तसे हातात येतच नाहीयेत हे लक्षात यायचे मग ती खाली बसून..कधी लोळून जमेल तसे ते दोन्ही कवडसे एकाच वेळी स्पर्शण्याचा तिचा वेडगळ चाळा अखंड सुरु  ठेवायची. दुपारी दीडेक वाजेपासून डोकावणारे कवडसे जागा बदलत ऊन-सावली होत फिके पडत अखेर जागा सोडायचे तोवर दोन कवडसे जोडायची अन मुठीत धरून ठेवायची लगबग संपायचीच नाही. जरा उतरणीवर  उन्ह कलायला लागली कि  जाता जाता काही क्षण दोन्ही कवडसे जरा जवळ आल्यागत व्हायचे आणि तेव्हाच मिताली समाधानाने तिथेच जमिनीवर त्यांच्या मध्यात कुशीत शिरल्यागत शांत प्रसन्न व्हायची.

उन्ह उतरून सांज व्हायची .... आणि मग रात्र ..

आपापली काम आटोपून घरी परतलेल्या आई बाबांना एकत्र एकहाती धरून ठेवायची तिची धडपड पुन्हा सुरु व्हायची ... सुरु राहायची

त्या दोघांमधील तप्त उन्ह उतरणीची वाट पाहतच  ...  दोघांच्या मध्ये कधीतरी मग एकटीच झोपी जायची...


(C)रश्मी पदवाड मदनकर
26 एप्रिल 18

Thursday 5 April 2018

#आतल्यामास्तरीणबाई म्हणतात,

मने,
आपण बासुंदी करायला दूध आणतांना दिसलो ना कि रस्ताभर चौकाचौकात लोकं विर्जनाची वाटी घेऊन तयार उभे दिसतील. तेव्हा घाबरून जायचं नाही, चांगल्या कामासाठीचं मनोबल कधीच कमी होऊ द्यायचं नाही, जमलं तर बासुंदीला दूध वाचवायचं.. नाहीच वाचलं तर तीच साखर आणि वेलची-केशर घालून मस्त श्रीखंड तयार करायचं.. तोंड तर दोन्हीने गोड़ होणारच ... नाही का ? 😋🤗😇😇😇

#A_Wise_Woman_Said -

#आतल्यामास्तरीणबाई

Intro :-

मित्रांनो
 नवी मालिका सुरु करते आहे, नाव आहे 'आतल्या मास्तरीण बाई' चिंतनशील मनाला अनेकदा आतला आवाज काहीतरी सांगू पाहत असतो. अनेकदा तो आपल्यापर्यंत पोचतो-पोचत नाही किंवा आपण कित्तेकदा त्याकडे लक्षही देत नाही. मग एखादी घटना घडते एखादा प्रसंग पुढ्यात उभा राहतो आणि आधी आलेला आतला आवाज पुन्हा पुढ्यात येऊन उभा राहतो. म्हणतो ''बघ मी सांगितले होते ना तुला'' आणि आपल्यालाही वाटत , खरंच आपण ऐकायला हवं होतं. हा आतला आवाज म्हणजेच 'मास्तरीणबाई' आपल्याला पटले नाही पटले तरी ती शिकवणं सोडत नाही. हल्ली वाटू लागलंय आतल्या मास्तरीण बाईंनी ठक ठक केली कि आठवणीने त्याची काही टिपणं काढून ठेवावी. आज नाही कामात आले तरी कधीतरी हा धडा उपयोगात येईलच ... तेव्हा 'आतल्या मास्तरीण बाईंची न लिहिलेल्या पत्रांची पेटी उघडणार आहे मित्रांनो.... तिच्या पत्रांना माझ्या पेटीत सामील करून घेत असतांना ते तुमच्या मार्गातून प्रवास करणार आहेत, आवडले तर आपले मानून घ्या.  #आतल्यामास्तरीणबाई

झिरोमाईल !


प्रत्येक शहर गावाचा इतिहास असतो, भौगोलिक परिचय असतो तसंच प्रत्येक गाव-शहराचा त्याचा त्याचा एक स्वभाव असतो. विशिष्ट कॅरेक्टर असतं. आणि त्यानुसारच त्याच प्राक्तनही घडत जात असावं. असंच काहीसं माझ्या नागपूरचंही घडलं असावं .. ऐतिहासिक आहेच आहे, तेवढंच भौगोलिक नावलौकिक. देशातल्या कोणत्याही भाषेच्या, प्रांताच्या, संस्कृतीच्या कोणत्याही माणसांना स्वतःत सामावून घेण्याची, त्यांना समजून उमजून, सोबत घेऊन चालण्याची कुटुंबवत्सल वैशिष्ट्ये या शहराच्या दावणीला बांधली आहे. हे शहर फक्त माणसांना हृदयात जागा देत नाही..तर शहरच देशाच्या हृदयात म्हणजे केंद्रस्थानात वसलंय आणि शहरातील माणसं शहराच्या तर शहराच्या पण नकळत देशाच्या हृदयात वावरत असतात..स्वातंत्र्यापूर्वीच्या अखंड भारताचे प्रतीक म्हणून आज नागपुरातील झिरो माइलकडे बघितले जाते. हि याची विशेष ओळख.. देशाचा मध्यभाग..अर्थात हृदयस्थान. तुम्ही या शहरात उभे असता तेव्हा.. देशापासून शून्य अंतरावर असता. म्हणजे आत खूप आत मध्यात पोचले असता...मेडिटेशन करतांना विचारांच्या गतीचे आकलन करून दूर पोचलेल्या मनाला हजारो माईल पार करून ओढत मध्यात घेऊन यावं आणि अथक प्रयत्नांनी शून्यात ज्ञान लागावं...तेव्हा अध्यात्म दृष्टीने जिथे असतो ना आपण प्रत्यक्ष शहर आपल्याला तिथे घेऊन बसलंय... झिरो माईलला.
या झिरो माइल स्टोनचे स्वरूप चार घोडे आणि एक स्तंभ असे आहे. ते वाळूच्या दगडांनी बनले आहेत. १९०७ साली झिरो माइलचा स्तंभ उभारला, त्यावेळी घोडे नव्हते. नंतर राजस्थानातून चार घोडे तयार करून आणण्यात आले. चार दिशांचे प्रतीक म्हणून झिरो माइलपुढे हे घोडे ठेवण्यात आले आहेत. सीताबर्डी टी पॉईंटवर किल्ल्याच्या पायथ्याशी हा झिरो माईल आजही दिमाखात उभा आहे. मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा तसेच अलाहाबाद-त्रिवेंद्रम राष्ट्रीय महामार्ग क्र. सात या ठिकाणी परस्परांना छेदतात.
आयुष्यात कुणाच्यातरी हृदयात स्थान मिळावं म्हणून भावनिक मानसिक स्तरावर किती संघर्ष करीत असतो माणूस..एखाद्यानं आपल्याला हृदयात बसवावं आणि तिथून कधीच कमी करू नये..आपण त्याच्या हृदयाचा म्हणजे मनाचा कोपरा न कोपरा कॅप्चर करावा. मनावर अधिराज्य गाजवावं, तिथेच विहरावं, रंध्रारंध्रात सामावून हक्क गाजवावा: कुणाला बरं नको असेल हे ? माझं शहर मला रात्र-दिवस हेच सुख देत असतं..आणि बरेचदा मला या गोष्टीची जाणीवही नसते. या झिरो माईलनं मला देशाच्या हृदयात स्थान दिलयं. मी या हृदयात मनसोक्त विहरते. रंध्रारंध्रात शिरते आणि तरीही हे शहर मला त्याच्या शिरोताजच्या मुकुटमनीप्रमाणे जपत राहतं. माझ्या बाल्यावस्थेतून प्रगल्भतेकडे जाणारा प्रवास मी शहरात सुरु केला तो अजून सुरु आहे, माझे गंतव्य गाठण्याच्या मार्गात हे शहर मला वळणावळणावर हात धरून शिकवत असतं. झिरो माईलवर उभे राहून मी आयुष्याचा काळ घालवला.. मी इथले ऋतू पाहिले. श्रावणांच्या सरीचे धुंद कोसळणे याची देही याची डोळा अनुभवले, धो धो बरसणाऱ्या सरींचे दोर हातात धरून कल्पनेच्या हिंदोळ्यावर झुलले..या शहरावर सूर्याचीही विशेष कृपादृष्टी आहे..त्यालाही थेट हृदयात शिरायचे असते..मग हे शहर उन्हाळ्याच्या झळा सोसत ऊन्हाचा पदर डोक्यावर धरतं, आणि तावून सुलाखून निघण्याची अनुभूती देत राहतं. असं हे झिरोमाईल माझ्या आयुष्य पुस्तकातलं सोनेरी पान आहे. जे देशासाठी अथवा शहरासाठीच नव्हे तर प्रत्येकाच्या मनातला मानबिंदू आहे याचा अभिमान वाटतो.
रश्मी पदवाड मदनकर
३ एप्रिल १८
#ललित #झिरोमाईल
लेख पुढे वाढवणार आहे .. आजपुरता एवढाच
PC :- Shirish Sharma & Rohan Dhopate










धडा -


जात-धर्माच्या महाकाय पाषाणाखाली
ते समजतात सुरक्षित स्वतःला
बिनबुडाच्या अस्मितेचा प्रश्न
जगण्याहूनही पसाभर मोठाच झालाय
पिढ्यागणीक उद्धाराचा हेतू
वळचणीखाली झाकोळला गेलाय

संस्कृती रक्षणाचा भार पाषाणावर
आणि...खाली
तकलादू अस्मितेच्या चिघळट घसरंडीचा
तोल बिघडत चाललाय..
प्रत्येकाजवळ जातीच्या कुबड्या असल्या तरी
दावणीला लावलेला पाय घसरलाच.. आणि
महाकाय पाषाण आदळलाच...तर ?

तर आम्ही आमचेच एकत्र आत चेपले जाऊ
दडले जाऊ...गाडले जाऊ.
मग आमच्या धर्म संस्कृतिचा मोहेन जोदाडो- हडप्पा
काय करू नये याची साक्ष
भविष्यातल्या इतिहासाच्या पानावर देत राहील
विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लावत राहील..

अभ्यास तर दुर ते वाचायलाही हात लावणार नाहीत
इतके रटाळ अन टुकार वाटत राहतील धडे ..



रश्मी मदनकर
4 एप्रिल 18

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...