Thursday 26 August 2021

 या आहेत त्या चारमधल्या दोघी -

स्थळ - शताब्दी चौक, रिंग रोड
विषय - #SaveChildBeggars
वेळ - ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला

शताब्दी चौकात दोनदोनच्या जोडीत या चौघी आळीपाळीने दिसत राहतात. पहिली जोडी आहे १३-१४ वर्ष वयाची आणि हा जो फोटो टाकलाय त्या दोघी असाव्यात २२-२५ तल्या. विशेष म्हणजे चौघींजवळ चार बाळ आहेत.. अगदी छप्पर फाड के दिलंय बघा त्यांना देवाने. ही बाळं एकतर झोळीत निपचित पडलेली असतात किंवा कडेवर रडत, पेंगत बसलेली असतात. दुसऱ्या १३-१४ वर्ष वयाच्या आणखी दोघी मुली आहेत. त्या स्वतःच चिमुकल्या असताना त्यांच्याजवळ प्रत्येकी एकेक चिमुकलं असतं. तुम्ही 'ये किसका बच्चा उठाकर घुमते हो' असं विचारलं की त्या ' मेरा बच्चा है' असं सांगतात आणि तुम्ही पुढला प्रश्र्न विचारण्याआत भरभर भरभर चौक सिग्नल ओलांडून निघून जातात. मग दोन-तीन दिवस गुडूप होतात.
प्रश्र्न असा की प्रत्येकीकडे एक या दराने असे किती चिमुकले असतात यांच्याकडे.. इतक्या ठोकच्या भावाने कुठे मिळतात इतकी लहान मुले ?? एका चौकात इतकी तर शहरात किती .. आणि राज्यात.. देशात ? ही मुले जरा मोठी झाली की काय होतं यांचं.. कुठे जातात ही ? यात मुली असतील तर त्यांचं काय होतं ? यांचं भविष्य काय ? दिवसा असे अत्याचार तर रात्री काय होत असेल ?
या प्रश्नांना उत्तरं नाहीत, त्यांचे कोणीच वाली नाही हे माहीत असूनही गप्प बसवत नाही. ही लोकं, ती छोटी बाळं दिसलीत की छळत राहतात प्रश्र्न.. आपल्याला फक्त बोलता लिहिताच येतं.. निदान तेवढं तरी करावं, ही तळमळ मांडावी पुढे तुमच्या.. म्हणून हा प्रपंच ..
यापुर्वी देखील यावर अनेकदा लिहिलंय त्याच्या लिंक देतेय खाली-
रश्मी पदवाड मदनकर

होऊन जाऊ दे ..


परवा दुपारी फोन आला मावशींचा, म्हणाली 'अगं पुरणपोळी केलीय, आवडते ना तुला, म्हणून खास फोन केला. संध्याकाळी ये जेवायला'. मी बाहेरगावी होते. नाही येऊ शकणार बोलले तिला. त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली, पण फोन ठेवतांना ती जरा नाराजीतच म्हणाली 'बघ तुला कळत नाहीये तू अत्यंत चविष्ट अस काहीतरी मिस करतेय.' मी निव्वळ हसले. मावशी स्वयंपाक छानच करते हे नाकारता येणारच नाही, पण आज तिला मला बोलवावं वाटलं आणि त्यातही स्वतःचच असं कौतुक करावं वाटलं. खरच तिच्या पन्नास-पंचावन्न वर्षांच्या आयुष्यातील या वेळी तिने केलेली पुरणपोळी सर्वोत्कृष्ट असेल? की उगाच मग स्वतःचीच पाठ थोपटणं. मन पुन्हा विचारांच्या हिंदोळ्यावर दोलायमान झाले..


आयुष्य जगतांना आपण अनेक आवडत्या गोष्टी वेचत पुढे जात असतो. पाहिलेल्या, रुचलेल्या, स्पर्शलेल्या बाबी अंगात भिनवत असतो. एखाद्याचे अंगीभूत गुण नाही आत्मसात करता आले तरी त्याचं निदान तोंडभरून कौतुक करीत असतो. एखाद्या छंदाने नाद नाहीच सोडला तर ते मिळवायला, आत्मसात करायला आयुष्याचा कित्तेक काळ खर्ची घालतो. स्वतःला त्या त्या तंत्रात फिट बसवायला, परफेक्ट व्हायला मग जीवाचे रान करतो. कधीतरी पोचतो तिथवर. इतके कष्ट करून मिळवलेल्या आपल्याच एखाद्या गुणाचं आपण स्वतःच कौतुक केलं तर ते चुकीचे का ठरावे ?

असाच एक प्रसंग आठवला मागल्या महिन्यात एका सांगीतिक कार्यक्रमात गेलेलो आम्ही. शास्त्रीय गायिका जीव ओतून एकेक बंदिश गात होती आणि ... आणि आम्ही आरोह, अवरोह, मुरक्या, आलापात धुंद होत होतो. तिनं असं काही तिच्या स्वरात, आवाजात गुंतवून ठेवलं की कश्याकश्याचंच भान नव्हतं. प्रत्येक आलापाला तोंडून 'वाह' बाहेर पडायचं आणि ते अगदी सहज घडायचं. कौतुक करायची वेळ आलीच तर कुठला तुकडा वगळावा आणि कुठल्याचे तोंडभरून कौतुक करावे हा प्रश्नच पडला असता. गाणी संपली आणि गायिकेला व्यासपीठावर बोलण्याचे आमंत्रण आले. शेवटच्या संबोधनात तिनं तिच्याच गायलेल्या कुठल्याश्या गीताच्या विशिष्ट आलापाचं मनमोकळं कौतुक केलं आणि अनेकजण अवाक झालेत. शेजारी कुजबुज सुरु झाली, काही ठिकाणी हशा पिकला काहींनी चक्क उद्धट टोमणे मारायला सुरुवात केली. का ? तिनं गायलेलं तिनं आवडून घ्यायचं नाही असा नियमबियम असतो की काय ?


आपण एखाद्या कलेचा आस्वाद घेतांना त्याच्या कलेची इतर कलाकारांशी तुलना करीत असतो...परंतु कलाकार स्वतः त्याच्या कलेची तुलना त्याच्याच आधीच्या सृजनाशी-सर्जनाशी किंवा सादरीकरणाशी करीत असतो... ज्या दिवशी त्याला त्याच्या पूर्वीच्या सर्व सादरीकरणाहून एखाद्या क्षणात अनवट अनुभवाची अनुभूती होते, उत्तुंग आनंद-समाधानाची जाणीव होते त्यावेळी त्याने त्याच्या नजरेतल्या त्या उत्कृष्ट कलाकृतीला 'वाह' दिलीच तर त्यात गैर काय?


एखादा क्षण त्या कलाकाराच्या गुणांची परीक्षा घेणारा ठरतो एखाद्या गज़लकाराचा एखादा शेर, कवितेचा काव्यार्थ, लेखकाचा अन्वयार्थ आणि चित्रकाराला अभिप्रेत भावार्थ हा उत्तम रीतीने रसिकांपर्यंत पोहचला पाहिजे हा मुख्य उद्देश असतो. रसिकांच्या पसंतीस उतरणारे कलेचे सादरीकरण व्हावे हा ध्यास असतो.. अनेकदा तो चाहत्यांच्या नजरेत खराही उतरतो, ही शर्यत त्याने यशस्वीपणे पार केलेली असते. पण स्वानंदाचं काय ? आत्मतृप्तीचा एखादाच असा क्षण उद्भवतो तो क्षण आत्तापर्यंतच्या सर्व क्षणांच्या पुढे सरसावून आत्मिक समाधानाच्या अनुभूतीपर्यंत घेऊन गेलेला असतो..


आतापर्यंतच्या कालावधीत आपल्याच कलागुणांची आपल्याच तुलनेतली उत्कृष्टता आपण आत्ताच गाठू शकलो आहोत हे त्या कलाकाराशिवाय कुणाला बरे माहित असणार... एखादा आलाप आळवतांना त्याचे हरपलेले भान किंवा लागलेली तंद्री, त्याला लाभलेले तादात्म आपण बघू शकतो, अनुभवू शकत नाही....एखाद्या चित्रकाराला एखादे चित्र काढतांना आलेली आनंदाची अनुभूती आपल्या उघड्या डोळ्यांना दिसणाऱ्या दृष्याहून वेगळी, कल्पनेच्या पलीकडची असू शकते. कुणीतरी बनवलेला एखादा पदार्थ, एखादं काव्य, एखादी कथा त्यांच्या त्यांच्या लेखी त्यांच्या त्यांच्या आयुष्याचा मुकुटमणी असू शकतो. त्या पदार्थाहून चविष्ट, त्या चित्राहून सुंदर आणि त्या गीताहून श्रवणीय इतरांना बरच काही मिळेल एरवी, तुलनेने फार उल्लेखनीयही वाटणार नाही कारण आपण फक्त पदार्थ चाखलाय, चित्र पाहिलंय, गाणं ऐकलंय पण ज्यांनी ते प्रत्यक्ष प्रसवलय, सृजन केलंय, अनुभवलंय त्यांना येणारी अनुभूती काही और आहे. त्या क्षणाची प्रचीती खास आहे. आणि म्हणून तो क्षण कौतुकास पात्रही आहे.


मग अश्या आत्मिक तृप्तीच्या अनुभूतीची परिणिती आपण स्वतःचच मनभरून कौतुक करण्यात झाली तर बिघडलंय कुठं ??

होऊन जाऊ द्यायचे ...निःसंकोच !!


रश्मी पदवाड मदनकर







Friday 6 August 2021

कोवळा स्नेह !


आपलं आयुष्य म्हणजे एखाद्या पॅसेंजर ट्रेनसारखं असतं.. आयुष्याच्या आरंभापासून आपण काही नात्यांच्या-मैत्रीच्या माणसांचा गोतावळा सोबत घेऊन निघतो. जसेजसे पुढे जात राहतो काही नाती घट्ट होतात, काही निखळतात मग पुढल्या थांब्यावर ही काही माणसं उतरतात, काही नवे चढतात. या चढलेल्या माणसांसोबत आपली गाडी पुन्हा कधी गतीने तर कधी संथपणे पुढे सरकत राहते. काही ठिकाणी गाडी जास्त वेळ रेंगाळते, काही थांबे सोडून पुढे पळत राहते. या थांब्यांवर चढणाऱ्या प्रवाश्यांना आपण वेगवेगळी नात्यांची लेबलं चिकटवत राहतो. कुठल्यातरी थांब्यावर माणसे उतरली कि ही लेबलं आपोआप गळून पडतात किंवा शिल्लक उरतात; पुन्हा काही माणसांना तीच ती चिकटवली जातात. नाती अनेक प्रकारची असतात. रक्ताची नाती, प्रेमाची नाती, मैत्रीची नाती, विचारांची नाती आणि काही तर गरजेची सुद्धा. या सगळ्यात सर्वात जास्त वाखाणलं जाणारं नातं म्हणजे मैत्रीचं नातं.


माझ्या अत्यंत आवडत्या लेखिका अरुणा ढेरे ह्यांनी त्यांच्या अनोख्या मैत्रीच्या नात्यांवर असणाऱ्या 'प्रेमातून प्रेमाकडे' या त्यांच्या पुस्तकात लिहिलेली अर्पण पत्रिका मला खूप भावली होती. त्या लिहितात..

''मैत्र

जे होतं आणि आता नाही

त्याला स्मरून

आणि

जे आहे, असण्याचं आश्वासन आहे

त्याचा हात धरून... ''



बस्स, इतकंच. एवढ्या इनमीन तीन-साडेतीन ओळी जगण्यातलं सगळं सार सांगून जातात. प्रत्येकवेळेला आपली आयुष्याची पॅसेंजर जिथेजिथे थांबते तिथे तिथे या साडेतीन ओळींचे स्मरण करावे आणि हातात उरलेल्या हातांसह पुढे पुढे चालत राहावे. मैत्रीतला सगळ्यात सुखाचा काळ कुठला असतो सांगू.. जेव्हा ती अगदी कोवळी असते आणि नंतर ती जेव्हा सगळ्यात जून होते. कोवळ्या मैत्री नंतरचा आणि मैत्री मुरेपर्यंतच्या मधला जो काळ असतो हाच सगळ्यात घातक असा काळ असतो.


मैत्रीचं नातं जुळतानाचे सुरुवातीचे दिवस म्हणजे कोवळा स्नेह. मैत्री होण्याच्या पूर्वीचा काळ. कधी कधी पुढे हा स्नेह मैत्रीत परावर्तित होतो, पुढे ही मैत्री चांगली घट्ट जमते किंवा कधी कधी हा स्नेह मैत्री होण्याआधीच क्षीण होत होत उगीचच तुटूनही जातो. पण तरीही कोवळ्या नात्याचे ते अलवार दिवस आयुष्याला वेगळ्या अनुभवाचं देण मात्र देऊन गेलेली असते..


या कोवळ्या स्नेहील मैत्रीला नेहेमीच्या दोस्तीतले नियम लागू पडत नाही...कारण या कोवळ्या मैत्रीने अजून कुंपणं ओलांडलेलीच नसतात. तिची प्रकृती वेगळीच आणि म्हणून त्यातला वावर आणि त्यातली देणीघेणीही वेगळी. पुढे ती मैत्री जून परिपक्व झाली कि त्यावेळी रुसवे-फुगवे, मानापमान, बुद्धीसंपत्तीची तुलना अशा यादीबाहेरचे सर्व शत्रू मनात वसतीला आलेले असतात..... पण कोवळ्या मैत्रीत मात्र कुठल्याही आशा-अपेक्षांच्या पल्याड, वचनबद्धतेच्या पलीकडची एक अनिश्चितता असते आणि त्यामुळे अनिवार ओढ लागून राहते...


मैत्रीतला सुरुवातीचा हा कोवळेपणाचा मऊ निरागस स्पर्श त्या त्या काळातलं अवघं जगणंच बदलून टाकणारा असतो.. विशिष्ट जातीतल्या गवतांच्या पातीला विलक्षण धार असते. पण त्याची कोवळी पाती म्हणे नेहेमीच्या गवतासारखीच मऊ, लुसलुशीत असते .. कोवळ्या स्नेहाचीही तीच अवस्था ! जवळकीच्या नात्यात हमखास येणारी इर्षेची, मानापमानाच्या जाणिवेची धार त्यात नसते. उलट त्याला अर्धकच्चेपणाची खास आंबटगोड ओली चव असते. कोवळ्या मैत्रीतल्या ज्ञानाच्या देवाणघेवाणीत ज्ञानीपणाचा आव आणलेला नसतो. त्या अल्पकाळातील सोबतीच्या प्रवासात पुढे जाण्यासाठीची चढाओढ नसते. असते ती सोबत चालत राहण्याची निरपेक्ष मनीषा. एखाद्या चिमुकल्याला बघून गालाची कळी उमलावी इतकी सहजता असते त्यात..



आपल्या आयुष्यातील नाती पुढे वेळेपरत्वे बदलत जातात .मुख्य म्हणजे नात्यातल्या प्रायोरीटीज बदलतात. अर्धवट उमललेले, उमलता उमलताच खुरडले गेलेले, होरपळून निघालेले असे असंख्य स्नेहांकूर अल्पावधीचे वाटेकरी ठरतात. कोवळ्या स्नेहांकुरातून उमललेले मोजक्याच मैत्रीचे पुढे रोप होऊन परिपक्व होत वटवृक्ष होतात. कोवळेपणा एवढी जपायला कठीण गोष्ट दुसरी नसते कारण या कोवळेपणाला फक्त आणि फक्त तुटणं माहीत असतं..अजिबात पीळ नसलेल्या दोऱ्यासारखं, पण दोऱ्याचा शेवटचा तुकडाही कोवळे पण जपून असतो. या धाग्यापासूनच पुढे मजबूत तलम सुरक्षित वस्त्र विणता येतं. ते तुटू न देण्याची काळजी त्यापुरती, त्यासाठी घ्यावीच लागते.


आयुष्याच्या अवघे पणापासून क्षणासारख्या भंगुरतेपर्यंत हा कोवळेपणा, स्वतःच्या जगण्यात झिरपला पाहिजे. मैत्रीच्या आरंभ-क्षणापासून ते परिपक्वतेचा अंतिम क्षणापर्यंत नात्यांचा प्रवास होईस्तोवर मैत्रीतला हा कोवळा स्नेह जपला गेला पाहिजे. शिखरांच्या कठोरतेतूनही हिरवाई निवडत-जपत शुभ्र कोसळत्या धबधब्यासारखे जगता आले पाहिजे.




रश्मी पदवाड मदनकर












Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...