Wednesday 28 December 2016

२०१६ वर महिलांची मोहोर







चालू वर्षाचा हा शेवटचा आठवडा, बघता बघता हे वर्षही सरले. दरवर्षी नेमाने येणारा क्षण पुन्हा जवळ आलाय या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षात प्रवेश कराण्याचा क्षण. सरत्या वर्षात काय गमावले, काय कमावले याचे जमाखर्च मांडत आपण नव्या वर्षात काय करणार याचे मनसुबे रचत असतो. नव्या वर्षात पदार्पण करताना भूतकाळाची उजळणी करणे क्रमप्राप्त ठरते. सरते वर्ष अनेक घडामोडींनी भरलेले राहिले अनेक मार्गाने उल्लेखनीय ठरले. कुठे सामाजिक बदलांची नांदी कानी आली तर कुठे भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणं वाचनात आलीत. जातीय आरक्षणासाठी पुकारले गेलेले आंदोलन, नोटा बंदीने पिडला गेलेला सामान्य नागरिक, सत्तापक्ष-विरोधी पक्षाचे अटीतटीचे राजकारण आणि त्यात ढवळून निघालेला देश. अश्या अनेक घटनांच्या खुणा गोंदल्या जात असतांना वर्षभर महिलांच्या संबंधित देश-विदेशातून चांगल्या वाईट बातम्यांची धूळही उडत राहिली. कुठे महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्न झाले. नेतृत्व गुणांना वाव मिळाला, मोठ्या पदांवर ती आरूढ झाली तर कुठे बलात्कार, अत्याचाराच्या घटनाही गाजत राहिल्या. अश्याच काही मुख्य घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा हा छोटा प्रयत्न.

वर्ष २०१६ महिलांना मिळालेल्या पुरस्कारांसाठी विशेष ठरले. भारतीय पत्रकार मालिनी सुब्रमण्यम हिला नक्सल प्रभावित 'बस्तर' क्षेत्रात तिने केलेल्या पत्रकारितेसाठी 'इंटरनॅशनल प्रेस फ्रिडम अवॉर्ड-२०१६' ने सन्मानित करण्यात आले. तिच्या व्यतिरिक्त हा पुरस्कार तुर्की, मिस्र आणि अल सल्वाडोर या राष्ट्रातील पत्रकारांना मिळाला. मानवाधिकारसाठी दिला जाणारा युरोपीय संघाचा प्रतिष्ठित 'सखारोव पुरस्कार-२०१६' दोन यजीदी महिला नादिया मुराद आणि लामिया अजी बशर यांना देण्यात आला. इस्लामिक स्टेट आतंकवादी संघटनेने या दोघींचे यौन उत्पिडन केले होते. त्या वेदनादायी घटनेतून बाहेर पडून या दोघीही आज पीडित महिलांसाठी समाजसेवेत कार्यरत आहेत. या वर्षीचा 'राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार' प्रसिद्ध गायिका शुभा मुद्गल हिला देण्यात आला. हा पुरस्कार त्यांना सांप्रदायिक शांती आणि सद्भावना वाढविण्याच्या दृष्टीने दिलेल्या योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. मद्रास संगीत अकादमीद्वारा दिला जाणारा 'संगीता कलानिधी पुरस्कार' व्हायोलिन वादक अवसारला कन्याकुमारी हिला देण्यात आला. अवसारला गतवर्षीच्या पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित आहे. वर्ष २०१६ मध्ये १० पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये यामिनी कृष्णमूर्ती आणि गिरीजा देवी या दोन महिला शामिल आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'साऊथ एशियाई लिटरेचर पुरस्कार' भारतीय लेखिका अनुराधा रॉय हिला तिच्या 'स्लीपिंग ऑन ज्युपिटर' साहित्यासाठी देण्यात आला. बंगळुरूच्या सुभाषिणी वसंत हिला संकटात लोकांची मदत करण्यासाठी तसेच सैनिकांच्या विधवांना सक्षम करण्यासाठी केलेल्या कार्यासाठी 'नीरजा भनोत' पुरस्काराने नावाजण्यात आले. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश पदावर डॉ. मंजुळा चेल्लुर यांची नियुक्ती करण्यात आली. मंजुला या दुसऱ्या महिला मुख्य न्यायधीश ठरल्या.


गेले वर्ष सिनेक्षेत्रातल्या घटनांचाही बराच गाजावाजा होता. ऐश्वर्या, प्रियांका आणि दीपिका यांचा हॉलिवूड प्रवेश आणि अभिनयावर चर्चा झडल्याच पण अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा यांच्याबरोबर प्रियंकाने घेतलेले डिनर, कतरिनाला मिळालेला 'स्मिता पाटील स्मृती पुरस्कार' ऐश्वर्याचे जांभळे लिपस्टिक आणि दीपिकाचा रेड कार्पेटवरचा ड्रेस हे विषय नेटिझन्सने बराच काळ चघळले. यात एक भूषणावह होते ते हे कि 'पीपल्स चॉईस अवॉर्ड' जिंकणारी प्रियांका चोपडा हि पहिली भारतीय नागरिक ठरली.


महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या समाजसेविका तृप्ती देसाई यांचे विविध धार्मिक क्षेत्रात महिलांच्या प्रवेशासाठी चालवलेले आंदोलन तर दुसऱ्या बाजूने मुस्लिम महिलांनी तीन तलाक विरोधात पुकारलेला एल्गार वर्षभर लोकांचे लक्ष वेधत राहिले. बंगाली सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेतादेवी ह्यांनी तसेच संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेत भारताच्या राजदूत म्हणून भूमिका वठवणाऱ्या 'व्यापक अणुचाचणी प्रतिबंध करारावर' (सीटीबीटी) भारताची बाजू मांडण्यात महत्त्वाची व निर्णायक भूमिका बजावणाऱ्या अरुंधती घोष आणि १९५० पासून तब्बल ३० वर्ष आपल्या गायकीने सिनेरसिकांचे मन मोहनारी पार्श्वगायिका मुबारक बेगम तसेच वर्ष जाता जाता अम्मा म्हणून प्रसिद्ध तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या चौघींनी यावर्षात पृथ्वीतलावरचा त्यांचा प्रवास संपवला. गोव्याला परफ्युम मलिका मोनिका घुरडे तर चेन्नईत इन्फोसिसमध्ये काम करणारी आयआयटीयन स्वाथीची सर्वांदेखत झालेली हत्या आणि महाराष्ट्राच्या कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्या हि काही प्रकरणं घडली, संतप्त नागरिकांच्या जखमा पुन्हा भळभळायला लागल्या, जनता रस्त्यावर उतरली, प्रकरणं चव्हाट्यावर आलीच आणि पुन्हा एकदा देशाच्या प्रतिष्ठेवर डाग लावणारी ठरली.

एकंदरीतच महिलांच्या पदरी गेले वर्ष नेहेमीप्रमाणेच संमिश्र फळ देणारे ठरले. कुठे घवघवीत यश मिळाले तर कुठे निराशा हाती लागली. जे काही घडले ते मात्र अनुभव देणारे, जाणिवा जागृत करणारे अन धडा शिकविणारे ठरेल हीच अपेक्षा.
चला तर या गुलाबी थंडीत सोनेरी प्रकाशात. नव्या स्वप्नांची नवी लाट आणूया
नवे प्रयत्न ,नवा विश्वास ...नव्या यशाचा नवा ध्यास घेऊया.
चला सख्यांनो, हसत खेळत दंगा करत नूतन वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज होऊया .


रश्मी मदनकर
२८/१२/२०१६


(सकाळ नागपूर आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)
http://epaper1.esakal.com/28Dec2016/Normal/Nagpur/Me/index.htm

Sunday 11 December 2016

शब्द




शब्द सुचत नाहीत सुचावे तेव्हा
अन पंक्तीतही बसत नाही बसवावे तेव्हा 
मनमानी करून घेतात 
वाटेल तिथे जाउन येतात 
हळूच जागल्या रात्री मग 
उशाशी येउन विसावतात   

शब्द येत  नाहीत बोलवावे तेव्हा 
स्वरातही खुलत नाही खुलवावे तेव्हा
भावूक होऊन हिरमुसतात
मुसमुसतात धुस्फुसतात
हळूच ओल्या रात्री मग
कंठाशी येउन गुणगुणतात

शब्द शब्दाला जागतातही
शहाण्यासारखे वागतातही
शब्दांचा तोरा बदलला तर मग
मौनात  जाऊन बसतातही

शब्दांचे ऐकावे, शब्दांना सांगावे
शब्दांचे चित्र शब्दांनीच रंगावे
शब्दांशी भांडावे, शब्दांनीच मनवावे
शब्द शब्द गोंजारून
कवितेत मांडावे ....


रश्मी मदनकर
११/१२/२०१६










मोगरा फुलला ...


माझं लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर लागलेलं. काहीतरी छान वाचत होती. तंद्री लागलेली, गालातल्या गालात हसणं सुरु होतं. तेवढ्यात काच वाजली. ती काचेबाहेरून काहीतरी बोलत होती. हातवारे करत होती.
तिशीतली असेल, नाकीडोळी नीटशी पण जरा मळलेली. रापलेला चेहेरा. ठिगळ लागलेली साडी. विस्कटलेले केस. फारसे लक्ष न देता सिग्नल सुटायची वाट बघत मी पुन्हा मान खाली करत नजर फोनमध्ये घातली. तिने पुन्हा काच वाजवली, आवाज डोक्यात गेला ..रागच आला जरा. काच खाली ओढत ठणकावलेच मी.

''क्या है, दो मिनिट का सिग्नल लगा नही कि आ जाते हो भीक मांगने..शरम नही आती, निकलो यहांसे''

''नाही ताई भीक नग, गजरा हाये.. घ्या कि दहाला तीन लावते.. छान दिसेन तुमास्नी'' ती

मी बघत राहिले तिच्याकडे .. तेवढ्यात सिग्नल सुटले. ड्रायवरने गाडी पुढे घेतली. मागे वळून पहिले. ती धावत होती शेजारी लाल झालेल्या दिव्यात थांबलेल्या  गाड्यांच्या दिशेने, कुठल्याश्या गाडीचा काच खणखणत 'छान दिसेन तुमास्नी' म्हणत होती.  तिचे शब्द कानात घोळत राहिले... माझे मलाच गिल्ट आले. घराच्या प्रशस्थ खोलीत किंवा एअरकंडिशन ऑफिसात बसून टाईमपास करायला पाठवलेले जोक, सुविचार, फॉरवर्ड मेसेजेस वाचण्यात दंग आपल्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून भिकारी आणि काय काय बोलून गेलोय आपण तिला, या गजऱ्याच्या सुगंधावर कुणास ठाऊक कुणाकुणाची पोटं भरतेय ती'

''सचिन, गाडी वळ्व .. युटर्न घे जरा'' 

त्याच सिग्नलला पोचले. गाडी कडेने लावायला सांगितली. उतरले अन चालतच गेले तिच्याजवळ.
ओळखल्याचा संकेत एक छानसं स्मित देऊन दिला तिनं..

''धाचे देऊ का ताई? बांधून देऊ का लावता हितच ''

मी तिच्या टोपलीतले ३ गजरे उचलले, माझ्या केसांची क्लिप काढली, अन तिच्या पाठी जाऊन तिच्या अस्ताव्यस्त बांधलेल्या केसात माळले. तिच्या केसात मोगरा अधिकच फुलून आल्याचा भास झाला.

''हे काय करता ताई, अव मी गजरे लावून काय करू?'' 

हातात काढलेली १०० ची नोट तिच्या हातात कोंबली

'लाव गं, छान दिसते तुमास्नी' म्हणत तिला स्मित दिले अन गाडीकडे वळले.

अजून हाताला घमघमाट येतोय तेव्हापासून ....






--

Friday 25 November 2016

केमिकल लोचा (स्वगत)

तो एमबीबीएसचा मुन्नाभाई 'केमिकल लोचा' आहे असं म्हणाला होता तेव्हा ती गम्मत वाटली होती. पण केमिकल लोचा काय असतो ते कळायला लागण्याआत आपल्या डोक्यातच केमिकल लोचा झाला हे लक्षात आले. . गम्मतच वाटते कधीकधी ...  कधीकधी कशाला 'मैं हू हि नही इस दुनिया कि' असे कायमच वाटू लागलंय हल्ली.. आता प्रश्न सतावतो तो हा कि आपल्यालाच हे असं होत का? मनाच्या कोपऱ्यात शिरलेले पण बुद्धीत अडकून पडलेले अडगळीतले असे कित्तेक जुने विचार त्याचा गुंता अजून सुटत नसतांना नव्या विचारांच्या धाग्यावर गाठी सोडवण्याचा प्रयत्न करत बसतो आपण. हे काही विचार पुसता आले तर किती बरे ? कोरी कारकरकरीत पाटी कळीकभीन्न असली तरी मिळावी ना पुन्हा एकदा.... पुन्हा रेघोट्या ओढता याव्यात आपल्या मनासारख्या. हव्या त्या आकारात-रंगात .. पण असे होते कुठे?

मानवशरीरातला हा 'बुद्धी' नावाचा प्रकार फार त्रासदायक असतो खरतर. 'अज्ञानात सुख' आहे असं म्हणतात ते उगाच नाही .... बुद्धीचा संबंध वयाशी असतो का?? कि ज्ञानाशी ...नाही नाही तो अनुभवाशी असावा. माहिती नाही पण फार बुद्धीचा वापर व्हायला लागला कि समाजाला किंवा संबंधित लोकांना त्याचा कितीसा फायदा होतो माहिती नाही पण ज्याला ती सतत वापरावी लागतेय किंवा ती उगाचच प्रगल्भ झाल्याने छोट्या छोट्या गोष्टीतही डोकं वर काढत आपलीच वापरली जातेय त्या व्यक्तीला मात्र त्याचा सतत त्रास होतो हे तितकेच खरे आहे. फार वैचारिक किंवा तात्विक बित्त्विक असू नये माणसाने हि समज येईपर्यंत त्या टोकाला पोचलेला असतो माणूस आणि या टोकापासून परतीचा मार्ग नाही हे लक्षात येईपर्यंत फार वेळ झालेला असतो. समाजात होणाऱ्या प्रत्येकच वाईट गोष्टी चटकन निदर्शनात येत असतील, समाजात वाईट गोष्टी बदलण्याचा ठेका आपणच घेतलाय असं वाटत असेल. चांगल्या गोष्टी सतत बदलाचा प्रयत्न आपल्या करवी वारंवार होत असेल. सतत उच्च विचारांची ओढ लागली असेल. निम्न स्तरीय सोच पचत नसेल आणि त्याहून अधिक त्यामुळे मनःस्ताप होऊ लागला असेल. माणसांना पारखायची सवय लागली असेल ... एकटेपणा आवडायला लागला असेल ? आपल्या IQ पेक्षा कमी बुद्धीक्षमतेची बाळबोध विचारांच्या माणसांचं सान्निध्य नकोस व्हायला लागलं असेल. गप्पांहून अधिक पुस्तक, सिनेमा सारख्या गोष्टीत मन रमायला लागले असेल. शांतता चोहीकडे असूनही जन्माची अस्वस्थता लागून राहिली असेल  तर आपण त्या स्टेजला पोचतोय असे समजायला हरकत नाही.

दिवसाच्या कोणत्याही वेळी अगदी रात्री बेरात्रीही कुठल्यातरी विचारांचा किडा मनात शिरतो. हळूहळू डोकं वर काढत जातो. त्या किड्याला पाय फुटतात. तो रेंगाळत बुद्धीत प्रवेश करतो. त्या चिवट किड्यातून चिकट स्त्राव स्त्रवू  लागतो तो भटकत राहतो आणि त्या स्रावाचे तार तयार होतात गुंतत जातात आणि त्या एका चिमुकल्या विचाराचे डोक्यात कोळिष्टकं तयार होऊ लागत. बरं इतक्यावर कुठे सगळं थांबतं ?? त्या कोळिष्टकांवर दुसऱ्या विचारांचे किडे येऊन बसू लागतात गुंफली जातात आणि बुद्धीचा भुगा होतो. विचारांच्याही अनेक छटा असतात नाही ? काही विचार आपले आपल्यालाच आलेले, काही कुणीतरी थोपलेले तर काही कल्पनेच्या अवकाशातून बरसलेले. कधी कधी वाटतं... नसतोच आपण शिकलो बिकलो तर, नसतेच पहिले रंग जगाचे, नसते दुःख मानून घेतले वाईटाचे, आनंदाच्या उकळ्या नसत्या फुटू दिल्या, वेदनेचे कढ थोपवले असते, सौन्दर्य बिंदर्य दृष्टी नसतीच जोपासली कधी ...तर काय बरं बिघडलं असतं? कुठे काय .... बेगडी माणसं जगतातच ना सुखाने? असे मस्त उंच उंच उडतांना पक्षी कुठे करत असतील विचार बिचार..झाडे डोलतातच ना विचाराविना. उन्ह-सावल्यांचा खेळ चालतोच ना ? पाऊस वारा, दिवस रात्र, चंद्र तारे सगळे सगळे युगानुयुगे कायम आहेत. ते कुठे शोधतात बुद्धीला खाद्य? ते कुठे करतात तत्वांचा विचार? आपणच मेले अतिशहाणे... 

आताही नेमकं करतोय काय आपण विचारांचे 'फुगेच' फुगवत बसलोय...पोकळ विचार निव्वळ हव्वा असलेले. अश्या फालतूच्या विचारांचाच तेवढा उजेड पाडलाय आपण आयुष्यात ते काढून टाकले तर अंधारच सगळा....हुह्ह्ह्ह ... धावतोय धावतोय आपण कायम धावतोय विचारांच्या मागे.

चला इथे लिहिलंय जरातर मन मोकळं झालंय... बघूया पुढे काय होतंय ते..    

Monday 21 November 2016

हम में है दम !

बॉलिवूड अभिनेत्रींचे सौन्दर्य नेहेमीच जगात चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळेच त्यांच्या बारीक सारीक हालचालींवरही चाहत्यांबरोबरच समीक्षकांचीही करडी नजर असते. हॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या आणि तिथेही 'ब्युटी विद ब्रेन'ची प्रचिती घडवून आणणाऱ्या तीन बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रवास दिपवणारा दिसत असला तरी त्यामागे किती संघर्ष आहे हे देखील जगजाहीर आहे. अश्‍याच गाजलेल्या या तीन घटना, याच वर्षी कान फिल्म फेस्टिवलला 'लॉरिएल' ची प्रतिनिधी म्हणून रेड कार्पेटवर आलेल्या ऐश्वर्याचे पर्पल लिपस्टिक नेटिझन्सच्या टीकेचा विषय ठरला होता. प्रियंकाने व्हाइट हाऊसमध्ये बराक ओबामांबरोबर घेतलेले डिनर आणि हल्लीच हि सर्व चर्चा पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याचे कारण म्हणजे 'एमटीव्ही एमा' अवॉर्डसाठी आलेल्या दीपिकाच्या ड्रेससिंग स्टाइलवरून पुन्हा एकदा जगभर तिच्यावर टीकेची लाट उठली आहे.

असं म्हणतात कलेला कोणतेही गाव नसते, देश, जाती धर्म, पंथ अशी कुठलीही चौकट त्यांना अडकवू शकत नाही. 'कला' हा कलाकाराचा एकच धर्म असतो, तीच त्याची जात आणि तो त्यात किती माहीर आहे त्यावरच त्याची श्रीमंतीही गणली जाते. म्हणूनच इतर देशातील कलाकार जसे आमच्या चित्रपटात येतात, झळकतात कधी टिकतात कधी गळतात. तसेच बॉलिवूड कलाकारांनाही हॉलीवूडला जाऊन दोन-चार चौकार षटकार लावून यायचे डोहाळे लागतात. तसे ते जातातही त्यांच्या अभिनय कौशल्याने चांगली कलाकृती घडवण्यात त्यांचे प्रामाणिक योगदानही देतात. हल्ली बॉलिवूड कलाकारांचे हॉलिवूड चित्रपटात झळकने प्रेक्षकांना फार अप्रूप राहिले नसले तरी एकेकाळी म्हणजेच काही वर्षांपूर्वीपर्यंत ते चांगल्या प्रतीच्या अभिनयाचे मापदंड म्हणून तसेच स्टेटस सिम्बॉल सारखे गणले जायचे. अश्‍या अभिनेत्यांची एक वेगळीच इमेज निर्माण व्हायची. तसे हॉलिवूडमध्ये प्रवेश करणे वाटते तितके सोपेही नव्हते ते आजही नाहीच. म्हणूनच बॉलिवूडमध्ये पाय रोवलेल्या आघाडीच्या कलाकारांनाही हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हॉलिवूडची पायरी चढणाऱ्या बॉलिवूड कलाकाराची यादी अजूनही फार मोठी नाही. नासिरुद्दीन शाह, अनुपम खेर, इरफान खान, अनिल कपूर अशी बोटावर मोजता येणारे अभिनेते तर मल्लिका शेरावत, हेमा कुरेशी, तब्बू या अभिनेत्री तेथील 70mm च्या पडद्याला तसे टेलिव्हिजनला निव्वळ स्पर्शच करू शकल्या आहेत.

'ब्राईड अँड प्रिज्युडीस' 'पिंक पॅंथर2' 'मिस्ट्रेस ऑफ स्पाईसेस' सारख्या सिनेमात काम करून ऐश्वर्याच्या हॉलिवूड प्रवेशानंतर आणि तिथे रुजल्या रुळल्यानंतर बऱ्याच काळाने प्रियांका चोप्राच्या हॉलिवूड डेब्यूने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रियांकाने हॉलिवूडमध्ये 'क्वॉंटिको' या मालिकेत काम केले तसेच 'बेवॉच' सिनेमातही तिची प्रमुख भूमिका आहे. त्याहून अधिक वॉशिंग्टन डिसीमध्ये व्हाईट हाऊसच्या 'करसपॉंडंट डिनर'च्या निमित्ताने ती बराक दांम्पत्यांना भेटली हा विषय बराच काळ चर्चेत राहिला. याशिवायही ऑस्करसह विविध सोहळ्यांना प्रियांकाला आवर्जून आमंत्रित केले जाते. तिच्या पाठोपाठच आता दिपीकाही हॉलिवूडमध्ये प्रवेश करती झाली. दीपिका सध्या विन डिझेलसोबत 'XXX रिटर्न ऑफ झांडर केज' या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमेरिकेतील नामवंत मासिक व्हॅनिटी फेअरने 'हॉलिवूडस नेक्‍स्ट जनरेशन' ही यादी प्रसिद्ध केली तेव्हा दीपिकाला दुसरा क्रमांक देण्यात आला होता. पण हल्लीच रोडरडॅम शहरातील 'एमटीव्ही एमा' सोहळ्यासाठी दीपिकाने मोनिषा जयसिंह आणि शालीना नथनी यांनी डिझाईन केलेला शिमरी ब्लॅक टॉप आणि सिल्क ग्रीन स्कर्ट परिधान केला होता. तिने तिचा ग्लॅमरस लूक जॅकेट आणि लांब, हिरव्या इअररिंग्जनी वाढवला होता. पण इंटरनॅशनल मीडिया डैली मेलने तिला 'बॉलिवूड ब्लॅडर' असे संबोधले आणि नेटिझन्सने देखील त्यावर टीका करून तिला ट्रोल केले.

ऐश्वर्या, प्रियांका आणि दीपिका या तिघीही तेथे येणाऱ्या सगळ्या आव्हानांना पेलत खंबीरपणे यशाच्या चढत्या ग्राफवर स्वार आहेत. त्या पुढेही हॉलिवूडच्या बड्याबजेटच्या चित्रपटातून नामवंत निर्देशकांच्या मार्गदर्शनात स्वतःला निखारत गाजलेल्या कलाकारांबरोबर काम करतांना हॉलिवूडच्या पडद्यावर दिसणार आहेत. बॉलिवूडच्या सर्वात महागड्या या अभिनेत्रींना सातासमुद्रापार तिथे पाय रोवायला मात्र अनेक कसोटींना तोंड द्यावे लागणार आहे हे निश्‍चित.


(दैनिक सकाळच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)






Saturday 19 November 2016

*“ब्राह्मण हरवला आहे...!!!”*



_*स्थळ: एका कारखान्यात दोघे सहकारी चहा पीत गप्पा मारता मारता दोघांमध्ये वादाला सुरुवात होते.*_

*कांबळे*: (थट्टेने हसत हसत) जोशी, तुम्ही भटांनी आमच्यावर पाच हजार वर्षे अन्याय केलात, आणि आम्ही तो मूर्खासारखा सहन केला. आम्हाला तुम्ही अगदी गुरासारखे वागवलेत. इंग्रज आले नसते, तर आम्हाला कळलंच नसत की आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही अजून काही वर्षे अंधारात खिचपत पडलो असतो.

*जोशी*: अहो कांबळे, तुमच्यावर अन्याय झाला हे खरचं !! आणि इंग्रजांच्या राज्यातच हे जे चालले आहे ते चूक आहे हे विचारवंतांच्या लक्षात आले. त्यांनी समाजप्रबोधन केल. हे विचारवंत कोण होते तुम्हाला माहीत आहे का?

*कांबळे*: हो!! फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांनी भटांवर टीकेचे आसूड ओढले.

*जोशी*: अहो कांबळे, फुले, आंबेडकर महाराष्ट्रात का झाले? उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश मध्ये का झाले नाहीत?

*कांबळे*: मी नाही समजलो; तुम्हाला काय म्हणायचं आहे?

*जोशी*: सांगतो. अहो महाराष्ट्रात ८०० वर्षांची संत परंपरा आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदासस्वामी ह्या सर्वांनी जातीपातीच्या कृत्रिम भिंती मोडा आणि सर्वांनी एकोप्याने, समतेने, गुण्यागोविंदाने रहा, विठ्ठलाची भक्ती करा असा संदेश दिला. ह्यातले ज्ञानेश्वर, एकनाथ व रामदासस्वामी हे ब्राह्मण होते.

*कांबळे*: हे बाकी खर जोशी. महाराष्ट्रात कधीही अमानुषता नव्हती. “मानवता धर्म” हाच श्रेष्ठ धर्म मानला जात आला आहे.

*जोशी*: अगदी बरोबर. ह्यात शिवाजी महाराज आणि संत मंडळी ह्याचं मोठ, “नव्हे”, त्यांंचचं १००% योगदान आहे. महाराजांनी सुलतानी संकटे आपल्या समर्थ बाहूंनी पेलली आणि प्रजेला सुरक्षित केले, अभय दिले.

*कांबळे*: अगदी बरोबर. महाराजांनी परकीय आक्रमकांपासून स्वकीय जनतेचे रक्षण केले, आणि संतांनी मानवतावाद मराठी जनतेच्या नसानसात बिंबवला.

*जोशी*: क्या बात है कांबळे!! जीते रहो!!

*कांबळे*: पुढे इंग्रज आले, आणि स्वतःबरोबर युरोपातील आधुनिक विचार यथे घेऊन आले. Equality, fraternity, freedom. समता, बंधुता आणि स्वराज्य.

*जोशी*: काय गम्मत आहे नाही!! स्वतः भारतीयांना गुलामीत जोखाडायचे, काला कुत्ता म्हणून हिणवायचे, आणि इंग्लंडमधील समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे गोडवे गायचे. अहो कांबळे, इंग्रजांनी आपल्याला लुटलं, नागवल हे सत्य आहे. स्वतःच राज्य सुरळीत चालावं, म्हणून भारतीय समाजातील जातीभेद व प्रांतभेद ह्या दुफळीचा त्यांनी यथेच्छ फायदा घेतला. स्वतःच्या फायद्यासाठी येथील जातीभेदावर वारंवार टीका करू लागले. ब्राह्मणांना झोडपू लागले. कारण अगदी अलेक्झांडरच्या काळापासून परकीयांनी ओळखले होते की ब्राह्मणांना वेगळे पाडले, त्यांना झोडपले की भारतावर बिनदिक्कत राज्य करता येते.

*कांबळे*: पण इंग्रजांच्या काळातील टीकेमुळेच आपल्या समाजात समता येऊ लागली.

*जोशी*: हे अर्धसत्य आहे. इंग्रजामुळे समता आली हे खोटे. पण त्याकाळातील आपल्या विचारवंतांनी इंग्रजी विचार वाचले, इंग्रजी शिक्षण घेतले आणि त्यांनी भारतीय समाज-व्यवस्थेवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. हे विचारवंत कोण होते ठाऊक आहे तुम्हाला?

*कांबळे*: फुले, आंबेडकर, शाहू महाराज दुसर कोण?

*जोशी*: (हसून बघत) अहो कांबळे; फुले-आंबेडकर ह्यांच्या अगोदर लोकहितवादी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमुर्ती रानडे, रेवेरंड नारायण टिळक ह्यांनी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांच्या बरोबरीने, स्वातंत्र्यवीर सावरकरही जातीवादावर प्रखर आसूड ओढत असत.
सावरकरांनी स्पष्ट सांगितले, की जातीवाद हा हिंदूधर्माला लागलेला काळा डाग आहे. आणि तो पुसण्याकरता, आपापसात रोटीबेटी व्यवहार झाला पाहिजे. सावरकरांनी दलितांबरोबर सहभोजने केली होती, त्यांना मंदीर प्रवेश मिळवून दिला होता.

*कांबळे*: बरोबर आहे जोशी, सावरकरांनी देशाकरता, समाजाकरता खूप केले. आणि त्यांना बदनाम केले गेले, आणि अजून केले जाते.

*जोशी*: आता मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो. मी तुमच्याबरोबर ८ – ९ वर्ष काम करतो आहे; तुमच्याबरोबर जेवतो, हास्यविनोद करतो. मी तुमच्यावर कधी अन्याय केला? अन्याय सोडा, दुजाभाव केला का?

*कांबळे*: नाही, कधीच नाही. आपण दोघे अत्यंत चांगले मित्र आहोत. आपण अडीअडचणीच्यावेळी एकमेकांना मदत करतो. पण जोशी आता आमच्यावर कोणी अन्याय करूच शकणार नाही. आमच्यापाठी कायदा खंबीरपणे उभा आहे.

*जोशी*: बरोबर. धरून चाला, की माझ्या मनात खर तर तुमच्यावर अन्याय करायचा आहे, पण तुमच्या मागील कायद्याच्या पाठबळामुळे, घाबरून, मी तुमच्यावर अन्याय करत नाही आहे. कांबळे, तुमच्या वडिलांवर कोणा ब्राह्मणाने अन्याय केला का?

*कांबळे:* नाही. उलट त्यांचे सर्व चांगले शिक्षक आणि चांगले मित्र भटच होते. आणि म्हणूनच माझे वडील शिकून मोठे वकील झाले.

*जोशी*: अजून एक प्रश्न. तुमच्या आजोबांवर कोणी ब्राह्मणांनी अत्याचार केला का?

*कांबळे*: नाही जोशी. माझे आजोबा म्हणत की, भट म्हणजे देव मानस. भट चांगले संस्कार करतात. चांगले काय वाईट काय ते शिकवतात.

*जोशी*: अहो कांबळे, मग तुम्ही स्वतःच्या वडिलांवर व आजोबांवर अविश्वास दाखवून, स्वार्थी, फसव्या अशा पुढार्यांवर विश्वास ठेऊन, ब्राह्मणांनी अन्याय केला, असा ओरडा का करता?

*कांबळे*: अहो जोशी, अजून खैरलांजीसारखी प्रकरणे होतातच ना? दलितांवर अत्याचार अजून होताच आहेत ना?

*जोशी*: खैरलांजीचा अत्याचार करणाऱ्यात एकही ब्राह्मण होता का? एकही नव्हता. हे मी नाही सांगत, सरकारी पुरावे बोलत आहेत.

*कांबळे*: (अचंबित झाले आहेत) जोशी बरोबर बोलता आहात तुम्ही.

*जोशी*: हल्ली काय झालं आहे, कोणीही उठावे, आणि ब्राह्मणाच्या टपलीत मारून जावे अशी परिस्थिती आहे. कारण ब्राह्मण कुणाच्या अध्यात ना मध्यात. काहीच बोलत नाही. आपल्याच कोषात निपचित पडलाय. आपण बर; आपल कुटुंब बर आणि टीव्हीवरचे
कार्यक्रम बरे.

*कांबळे*: अहो, म्हणजेच भट स्वकेंद्री झालाय; कुठे आग लागली काय किंवा वणवा पेटला काय. भटाला त्याचे सोयर – सूतक नसते. भट आणि त्याच कुटुंब. अगदी संदीप खरे म्हणतात तसा, “भेंडीच्या भाजीसारखा बुळबुळीत”.

*जोशी*: ब्राह्मण असे का झाले ह्याचा विचार केलात तर तुम्हाला त्याची कारणे लक्षात येतील. स्वातंत्र्यसंग्रामात कोण अग्रेसर होते हो? महाराष्ट्रापुरत बोलायचं झाल्यास!!

*कांबळे*: वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, चाफेकर बंधु, स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत कान्हेरे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, एस. एम. जोशी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन.

*जोशी*: बस! बस! एव्हढी नावे पुरे आहेत. ही सर्व मंडळी जातीने कोण होती? हे सगळे ब्राह्मण होते. ह्या लोकांनी स्वतःच्या कुटुंबाची, संसाराची होळी केली, जेणेकरून समस्त भारतीयांना दिवाळी साजरी करता येईल. त्यांच्या बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला.

*कांबळे*: (पुन्हा निःशब्द, डोळ्यात पाणी) पण जोशी, गांधीजीना गोडसेने मारले. तोही भटच होता.

*जोशी*: गोडसेने गांधीवध केला. त्यानंतर गावोगावी ब्राह्मणांची घर जाळली गेली, सावरकरांच्या लहान भावाची, दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली. एका माणसाच्या कृत्याने हजारो ब्राह्मणांचे निःस्वार्थी बलिदान दुर्लक्षित ठरले. आणि मग पेशवाईला बदनाम करण्याची चढाओढ लागली.

*कांबळे*: पण रघुनाथराव आणि दुसऱ्या बाजीरावाने पेशवाई, आणि पर्यायाने मराठ्यांचं राज्य बुडवलच ना?

*जोशी*: हा एक “typical dialogue” आहे. अरे पण त्या आधी बाळाजी विश्वनाथ, अजिंक्य योद्धा पहिला बाजीराव, विश्वासराव, नानासाहेब, माधवराव, ह्यांनी स्वतः छत्रपती न होता, छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून पांच पिढ्या इमाने – इतबारे कारभार केलाच ना? आणि रघुनाथरावांनीसुद्धा अटकेपार म्हणजे अफगाणिस्थानपर्यंत आपली मराठी सत्ता नेली.

पहिल्या बाजीरावाचे युद्धातील डावपेच अमेरिकेत कॉलेजमध्ये शिकवले जातात, आणि महाराष्ट्रात त्या महान अजिंक्य योद्ध्याला बदफैली म्हणून हिणवले जाते. महाराजांना ब्राह्मण देवासारखे पूजतात. पण पेशव्यांचा मात्र कोणी आदर करत नाही. उलटपक्षी त्यांना बदनाम केले जाते.

*कांबळे*: (अचंबित झाले आहेत) भट एव्हढे पराक्रमी, निःस्वार्थी होते, तर ते आता समाजकारणात, राजकारणात का येत नाहीत.

*जोशी*: ब्राह्मण समाजकारणातून बाहेर नाही. हां तो राजकारणातून निश्चित बाहेर पडला आहे. ह्याला कारण, आमच्यावरील राजकीय बहिष्कार म्हणा, किंवा ब्राह्मण स्वतः कोषात गेला म्हणा. ब्राह्मणांनी विचार केला, की देशासाठी एव्हढा स्वार्थत्याग, बलिदान करून पदरी काय पडल? अवहेलना? तिरस्कार? त्यापेक्षा आपण बर, आपल कुटुंब बर. मरू दे, समाज, देश गेला खड्ड्यात.

*कांबळे*: ओहो!! मला हे कधी जाणवलच नाही. मी नेहेमी भटांच्या आपण बर आपल कुटुंब बर ह्या वृत्तीला शिव्या घालत आलो आहे. पण ह्या वृत्तीमागील कारण काय ते आज तुमच्याकडून कळल्यावर मला भटांबद्दल आदर वाटू लागला आहे. पण जोशी, ही वृत्ती किंवा निवृत्ती म्हणा पाहिजे तर त्याला, चुकीची नाही वाटत तुम्हाला. भटांनी, त्यांना लोकांनी काही बोलल तरी, समाजाला चांगल मार्गदर्शन करण्याचा म्हणजेच थोडक्यात नेतृत्वाचा त्याग करून, महाराष्ट्राचं व पर्यायाने देशाच नुकसान केल आहे असेच म्हणावे लागेल.

कारण निःस्वार्थी, चांगले लोक राजकारणापासून दूर राहिले आणि स्वार्थी, पुढाऱ्यांची अनिर्बंध सत्ता सुरु झाली. हे देशाला, समाजाला घातक आहे. निःस्वार्थी, पापभिरू, पुण्यवान माणसांनी राजकारणात, समाजकारणात यायलाच हवे.

*जोशी*: अहो कांबळेसाहेब, आज इतकी वाईट परिस्थिती आहे, २६/११ नंतर लोकांच्या सुरक्षिततेबद्दल विचार न करता महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी त्यांच्या पाळलेल्या लोकांकरवी ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद उकरला. बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्यासारख्या थोर इतिहास अभ्यासकाच्या शिवाजी महाराजांवरील भक्तीवर त्यांनी लांच्छन उडवली. दादोजी कोंडदेव हे महाराजांचे प्रशिक्षक नव्हते असा जावई-शोध लावून दादोजींचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून ह्यांनी काढले. ह्यांच्या दृष्टीने, समर्थ रामदासस्वामी आणि महाराज एकमेकांना कधी भेटलेच नाहीत. त्यामुळे, रामदासस्वामी हे महाराजांचे राजकीय व आध्यात्मिक गुरु नव्हतेच मुळी. वाह वाह!! किती किती शोध लावले काही मर्यादाच ठेवली नाही.

*कांबळे*: अहो जोशी, पण तुकोबांनीच महाराजांना रामदास स्वामींकडे पाठवले होते. तुकाराम महाराजांनी शिवाजीराजांना सांगितले की, “राजकारण माझी प्रवृत्ती नाही. सुलतानी आक्रमणापासून रयतेचे रक्षण करून स्वराज्य स्थापन करायचे असल्यास गुरु म्हणून समर्थ रामदासच योग्य आहेत. त्यामुळे राजे तुम्ही त्यांच्याकडे जा” असा योग्य सल्ला दिला होता.

*जोशी*: पण ज्यांना २६/११ पासून लोकांचे लक्ष्य हटवायचे होते, त्यांना अशा जाती भेदासारख्याच गोष्टी सुचणार दुसर काय

*कांबळे*: पण भटांनी ह्यावर कुठेच आवाज उठवला नाही.

*जोशी*: ब्राह्मणांनी “मौनं खलु साधनं” हे व्रत घेतलं आहे अस समजा हव तर.

*कांबळे*: अहो, पण हे घातक आहे. चूकीचा किंवा सोयीचा इतिहास मुलांना शिकवण हे पाप आहे.

*जोशी*: हल्ली पाप-पुण्य, खरे-खोटे असं काही राहील आहे अस वाटत तुम्हाला?
गुंड बदमाश आमचे पुढारी होतात. आम्ही त्यांना निमूटपणे स्वीकारतो. यथा राजा तथा प्रजा.

*कांबळे*: नाही जोशी, भटांनी समाजकारणात व राजकारणात परतायला हवं. ही राजकारणात पसरलेली घाण दूर करायला हवी. निःस्वार्थी, शिकलेले सवरलेले लोक राजकारणात यायला हवेत तरच समाज ह्यातून वाचेल आणि देशाच कल्याण होईल.

*जोशी*: चला तुम्हाला माझे विचार पटले, बर वाटल. सत्याची बाजू मी व्यवस्थित मांडली. आता ब्राह्मणांनी समाजकारणात, राजकारणात उतरून आज पसरलेली घाण साफ कारण आवश्यक आहे, ती काळाची गरज आहे. ती जबाबदारी ब्राह्मण स्वीकारतील अशी मला अशा वाटते. स्वतःवरील अन्यायाच्या विरोधात बोलतील व स्वतःच घालून घेतलेल्या कोशातून बाहेर येतील असा विश्वास वाटतो आहे.

🙏🏼🙏🏼🙏🏼


Wednesday 16 November 2016

 हे महाशय माधव कारेगावकर पोलिस खात्यातून पोलीस निरीक्षकच्या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. वयवर्ष 64 .. अमरावतीच्या रस्त्यावर भेटले. तरूण सैनिक सिमेवर जीव गमावताय त्याचं प्रचंड दुःख बाळगून आहेत. वय वृद्धत्वाकडे झुकणारे असले तरी विचाराने अगदी तरुण असणाऱ्या, बोलण्यात प्रचंड उत्साह आणि काहीतरी करण्याची उर्मी त्यांच्याशी बोलतांना सहज जाणवते.
''आमच्यासारख्या साठीच्या माणसांना रिकामपण असतं...अर्ध जगणं झालेलं असतं. मरणाची वाट पाहत बसण्यापेक्षा, सरकारनं आम्हाला सीमेवर पाठवावं आणि देशसेवेची संधी द्यावी'' अशी मागणी पंतप्रधान मोदींपर्यंत पोचवायला ते देशभर एकटेच फिरताहेत ..

अश्या माणसांना अन त्यांच्या विचारांनाही सलाम!

Sunday 6 November 2016

एक खूबसूरत दर्द 'शरबत गुल'

फगाणिस्थान युद्धाच्या वेळी तिथून जीव वाचवून पळून आलेल्या हजारो कुुुटूूंबाात एक कुुुुटुंब हिचंही होतं. त्यावेळी अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियन आणि मुजाहिदींन यांनी युध्‍दभूमीच साकारली होती. अनेक परिवार पाकिस्तानमधल्या निर्वासित छावणीत वास्तवास आले होते. आपली घरे-दारे सोडून देशोधडीला लागलेल्या,अफगाण युद्धाच्या झळा सोसणाऱ्या शरणार्थींची बातमी करतांना 1984 साली छायाचित्रकार स्टीव्ह मॅक्यूरीने निर्वासित छावणीत एका किशोरीचे छायाचित्र कॅमे-यात कैद केले होते. नॅशनल जिओग्राफ‍िक मास‍िकात ते प्रसिद्ध झाले आणि छायाचित्रकारालाही अपेक्षा नव्हती तेवढे ते प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले, हिरव्या रंगाच्या डोळ्याची 'अफगाण गर्ल' सर्वत्र चर्चेचा विषय झाली. त्यावेळी तिचे नाव कुणालाही माहिती नव्हते. 'अफगाणी मोनालिसा' अश्याच नावाने तिला ओळखले जाऊ लागले. छायाचित्रकाराच्याही करिअरचा तो टर्निंग पॉईंट ठरला. हळूहळू युद्धाचे वारे निवळले, तो काळ लोटला आणि ती हिरव्या डोळ्यांची निर्वासित मुलगी विस्मरणात गेली. पण ज्या चित्राने त्याला प्रकाशझोतात आणले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवले अशी ती चित्रातील हिरव्या डोळ्याची अफगाण बाला छायाचित्रकाराच्या विस्मरणात मात्र कधीच गेली नाही. त्या छायाचित्राची आठवण सांगतांना स्टीव्ह सांगतो 'ती अफगाणिस्तानमधील तथाकथित कट्टर परंपरावादी समाजातून येत होती, जिथे अनोळखी माणसाला चेहरा दाखवणे हा गंभीर गुन्हा ठरतो.स्ट‍िव्हला तिचे डोळे आणि निष्‍पाप चेहरा आवडला होता. त्याने खूप विनंती केल्यानंतर तिने छायाचित्र काढण्‍यास परवानगी दिली होती.' ती नेमकी कोण आहे आणि सध्या कुठे असेल काय करीत असेल या प्रश्नांनी त्याला भंडावून सोडले. आणि 2002 साली नॅशनल जिओग्राफिक टेलिव्हिजन अँड फिल्म्स आणि मॅक्युरीने पुन्हा एकदा त्या मुलीचा शोध करत अफगाण‍िस्तान पालथे घातले, आणि तब्बल 17 वर्षांनी तिचे खरे नाव जगाला माहित झाले. यानंतर मॅक्यूरीने पुन्हा एकदा त्या पश्‍तुन आदिवासी जमातीतील मुलीचे म्हणजेच 'शरबत गुलचे' छायाचित्र काढले आणि मासिकाच्या मुखपृष्‍ठावर पुन्हा ती एकदा सर्वत्र झळकली. 

शरबत गुल आता पुन्हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरते आहे. त्याचे कारण म्हणजे तब्बल दोन वर्षांच्या तपासाअंती पाकिस्तानने तिला खोटे दस्तऐवज बाळगून बेकायदेशीरपणे पाकिस्तानात वास्तव्य करण्याच्या गुन्ह्यात 23 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. तिच्यावर खटला चालू असतांना दोनदा तिची जामिन देखील नाकारण्यात आली. तिला 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. शरबतने एप्रिल 2014 मध्‍ये पेशावर शहरात शरबत बीबी नावाने ओळखपत्रासाठी अर्ज केला होता. तिने निवेदनात सादर केलेल्या कागदपत्रात घोळ असल्याचे प्रशासनाला लक्षात आले आणि शरबत गुलला अटक झाली. तिचे वकील सांगतात तिची लवकरच सुटका होणार असून त्यानंतर निर्वासित म्हणून तिच्यावर लागलेला शिक्का पुसला जाऊन तिला पुन्हा अफगाणला तिच्या मूळ गावी परत पाठवण्यात येणार आहे. 

शरबत लहानपणापासूनच संघर्षमय आयुष्य जगते आहे. अफगाणिस्तानमध्‍ये सततच्या युध्‍दाने लोकांचे सर्वकाही हिसकावून घेतल्यावर 90 च्या दशकात सोव्हिएत लष्‍कर अफगाणिस्तानमध्‍ये दाखल झाले होते. तेव्हा ती 6 वर्षांची होती. एक बॉम्ब विस्फोटात तिचे आई-वडील मृत्यू पावले. शरबतचा भाऊ कशर खान आणि ती दोघेच उरले. तेथील नागरिकांची स्थिती जनावरांपेक्षाही खराब होत चालली होती. या कारणामुळे या दोघे बहीणभावासकट अनेकांनी अफगाणिस्तान सोडून पाकिस्तानातं आसरा घेतला होता. तेव्हापासूनच तिचा निर्वासित असण्याचा संघर्ष संपतच नाहीये. 

शरबत 16 वर्षांची असतांना तिचे लग्न झाले. सासरचे आयुष्यही सुखी नाही. विवाहानंतरही तिच्या आयुष्‍यात काही बदल झाला नाही. शरबतने तिचे पहिले सुप्रसिद्ध झालेले चित्रही पहिले नव्हते. तिचे चित्र जगभर प्रसिद्ध झाले हे देखील तिला माहिती नव्हते. जगाला वेड लावणारी शरबत स्वतः मात्र तिच्या गुरफटलेल्या संघर्षमय जीवनात कुठेतरी नावाप्रमाणेच 'गुल' आहे. तिला लवकरच जामिन मिळेल आणि तिचा हा संघर्ष संपून तिच्या गावी ती पुढले आयुष्य सुखाचे काढेल हिरव्या डोळ्याच्या या 'अफगाण मोनालिसा' ला याक्षणी याच शुभेच्छा ....  



(नागपूर दैनिक सकाळच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)




Monday 31 October 2016

मिसाल-ए-हिम्मत - नादिया मुराद

 ब्रिटनने इराकवर युद्ध लादले तेव्हा 'ती' केवळ 8 वर्षांची होती. देशावर संकट कोसळलंय पण आपल्यासाठी पुढे आणखी काय वाढून ठेवलंय याचा अंदाजही तेव्हा तिला आला नसावा. 2014 - दिवसेंदिवस अस्थिर होत कोलमडून पडलेल्या इराकी शासन व्यवस्थेचा सोयीस्कर गैरफायदा घेत धर्माच्या भ्रामक कल्पनेवर जगणाऱ्या 'इसिस' सारख्या खुंखार आतंकवादी संघटनेने तेथे आपले पाय पसारायला सुरुवात केली. हळूहळू कित्तेक भागावर जोम बसवला, तेथील दुर्बल घटकांवर विशेषतः गैरमुस्लिम याझिदी वंशाच्या लोकांवर अत्याचार होऊ लागले. अनेक यजिदी देशोधडीला लागले, अनेकांना क्रूरपणे ठार मारण्यात आले. अजूनही इराकमध्ये रक्ताचे पाट वाहतच  आहेत. ज्या लोकांनी जीव वाचवून पळ काढला ती नशीबवान ठरली, पण जी माणसं त्यांच्या तावडीत सापडली  ती एकतर जीवे गेली किंवा या अतिरेक्यांच्या क्रौर्याचे शिकार झाले. २०१४ मध्ये पाच हजार याझिदी महिलांना आयसिसने लैंगिक गुलामगिरीत ढकलले. अश्याच इसिसच्या तावडीत सापडलेल्या आणि नरकयातना भोगून परत आलेल्या एका 23 वर्षांच्या साहसी तरुणीची नादिया मुरादची हि चित्तथरारक कथा! ती ऐकतांना कुठल्याही पापभिरू माणसांचा कंठ दाटला नाही तरच नवल.

तिचा जन्म इराकमधल्या जिंजर प्रांतातला. अवघ्या हसण्या खेळण्याच्या वयात नादियाने जगाचा भेसूर चेहेरा अनुभवला. त्या भोगलेल्या यातनांना धाडसाने तोंड देतांना ती स्वतः मात्र प्रगल्भ होत गेली. आज ती याझिदी वंश हक्क कार्यकर्ती म्हणून नावाजली जाते आहे. तिचे नोबेल पारितोषिक व साखारोव पुरस्कारासाठी नामांकन देखील झालेले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी तस्करीविरोधी विभागाची सदिच्छादूत म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आणि पुन्हा एकदा ती प्रकाश झोतात आली. नादिया सोबत झालेल्या भयावह अत्याचारांबद्दल तिने 2015 च्या यूएन सेक्युरिटी कौन्सिलमध्ये खुलासा केला होता. याझिदी महिलांवर बळजबरी, छळवणूक आणि लैंगिक शोषण करत क्रौर्याच्या सर्व सीमा लंघून पाशवी अत्याचार केले जातात. गैरमुस्लिम असल्याने याझिदी समाजाच्या महिलांना मरणयातना दिल्या जातात. असे ती ओरडून जगाला सांगते आहे.

तिची करुणकहाणी ऐकतांना अंगावर शहारे येतात. इसिसचे प्रस्त कायम व्हावे म्हणून या अतिरेक्यांनी दंडुके वापरून निर्दोषांचा हकनाक बळी घेऊन उच्छाद मांडला होता. त्या काळात तिच्या संपूर्ण कुटुंबाला घरात घुसून घेऊन जाऊन गुलामगिरीत ठेवण्यात आले होते. 300 पुरुषांसमोर तिलाही ताब्यात घेण्यात आले, काही दिवसांनी तिच्या डोळ्यादेखतच तिच्या आईवडिलांना मारून टाकण्यात आले. तिच्या आठपैकी सहा भावांना ठार करण्यात आले. नंतर दोन बहिणी,  दोन चुलत बहिणी व पुतणी यांना आयसिसच्या दहशतगरदांची वासना शमवत, बलात्कार करतच मोसुलला पाठवण्यात आले. तिच्यावर एकेक दिवसात अनेकानेक पुरुषांनी कित्तेकदा पाशवी बलात्कार केले, तिच्या शरीराचे लचके तोडले जायचे, मारहाण सहन करावी लागायची. बलात्कार केलेल्या पुरुषांची ओळख तिला कधीही पटू दिली नाही. तीन महिने ती इसिसच्या तावडीत सेक्स स्लेव्ह (लैंगिक गुलाम) म्हणून राहिली. तिने तिथून पळून जाण्याचा प्रयत्नही केला पण ती पकडली गेली. शिक्षा म्हणून सहा सुरक्षा रक्षकांनी पुन्हा तिच्यावर बलात्कार केला, आणि नंतर तिच्यावर होणारे अत्याचार अधिकच वाढत गेले. एकदा ती एकटी असतांना तिने तिथून पळ काढला. मोसूलच्याच एका मुस्लिम परिवाराच्या मदतीने ती कुर्दीस्थानात पोचली. शरणार्थी शिबिरातही न्याय मिळवायला ती लढत राहिली. कित्तेक महिन्यांनी जर्मन सरकारने या शरणार्थीपैकी 1000 लोकांची मदत करण्याचे घोषित केले. नादिया त्यापैकी एक नशीबवान ठरली आणि तिने जर्मनीची शरणागती पत्करली. तिच्यावर उपचार होत असतांना तिथल्याच एका स्वयंसंघटनेने तिला यूएन मध्ये जाऊन आपबिती सांगण्याचा सल्ला दिला आणि नादिया जगासमोर बोलती झाली.

इसिसच्या माजोरड्या दहशतवादी थैमानाच्या कथा सांगून सारे विश्वच असुरक्षित असल्याचा संकेत देत नादियाने संयुक्त राष्ट्राला यावर कार्यवाही करण्यास चेतवले आहे. नादियाच्या जिद्दी, चिकाटी अन साहसी प्रवृत्तीचे करावे तितुके कौतुक थोडेच आहे. तिच्या भाषणाचाच असर कि काय कि, 'इराकवर आम्ही लादलेल्या युद्धामुळेच इसिससारख्या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला' अशी धडधडीत कबुली ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी दिली आहे. टोनी ब्लेअर यांनी इराकवरील हल्ल्याची केवळ चूकच कबूल केली नाही तर इराकवर लादलेल्या युद्धाबद्दल सपशेल माफीही मागितली आहे....
नादिया आज ब्रिटनमध्ये राहते आहे आणि तिच्यासारख्याच पीडित अत्याचारग्रस्तांसाठी धैर्याने कार्य करते आहे..




Monday 24 October 2016

काही नाण्यांची खणखण अन काही नोटांची फडफड
खिशात होत राहावी म्हणून अक्ख आयुष्य वनवन करतो माणूस
सगळं जग भटकून अखेर हातात उरतं काय ... तर निव्वळ ओंजळभर रान  

शब्द ..

मनाशी मनाचं बोलत राहतात शब्द
इकडे तिकडे डोलवावेत
तसे डोलत राहतात .....

गच्चं रानात आढळावी एखादी
अनवट पायवाट आणि
वाटेचे शेवटचे टोक शोधत
अंधारात चाचपटत
चालत जावे सरळ,  तसे
चालत राहतात विचार रात्रभर
बरसत राहतात, अनंत जुने संदर्भ
आठवणीच्या सरींनी भिजून
पाझरत राहतात आत बाहेर
थेंब थेंबाने ओथंबून वाहू लागतात

दूर कुठेतरी क्षितिजावर
शुक्रतारा चमकत राहतो
तसा मग एखादाच विचार
गहिवरून येतो स्मृतीपटलावर
तरंग उठवतो मनाच्या तळ्यात
अन अखंड लुकलुकत राहतो तेथेच
रात्रभर ….

डोळे टक्क उघडे
नजर छताकडे
ध्यान शून्यात ….
अपरिहार्य …. अटळ
हा विचारांचा डोलारा…. मनभर

रात्र सरते ... हळूच मग
विचारांना पंख फुटतात, 
अन भिरभिरतात ... शब्द
मनाशी मनाचं बोलत राहतात
इकडे तिकडे डोलवावेत
तसे डोलत राहतात …शब्द !!

Sunday 23 October 2016

|| एका वडिलांचं मुलाला पत्र ||


बघ, वाच, ठरव !

माझ्या लाडक्या मुला.
मी हे असं तुला पत्र लिहितोय, त्याची कारणं तीन.
01) जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या ब-या.
02) मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.
03) मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.
वाचून ठरव, जमल्यास लक्षात ठेव, आयुष्यभर!

04) माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे.
तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.

05) जगणं कशानंच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.

06) आयुष्य फार छोटं आहे. आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.

07) प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.

08) अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना!

09) माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचास.

10) आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.

- युवर डॅड

( एका हॉँगकॉँगच्या टीव्ही ब्रॉडकास्टर आणि चाईल्ड सायकॉलॉजिस्ट बापानं वयात येणा-या मुलाला लिहिलेलं पत्र असं म्हणतात  हे इंग्रजी पत्र सध्या व्हॉट्सअॅपवर फिरतंय. त्याचा हा मराठी अनुवाद.)

Saturday 22 October 2016

Rj Shubham We will miss u ..



'हाय नागपूर' अशी हाक मारणारा शुभम अकस्मात नाहीसा झालाय, त्याचा आवाज गहाळ झालाय आता तो कधीच ऐकायला येणार नाही हि बातमी सर्वच नागपूरकरांसाठी धक्कादायक आहे. सकाळी सकाळी 7 वाजता  ‘रेडिओ मिरची ९८.३’ ट्यून केले कि नागपुरी लहेजा असणारा एक बिंदास आवाज ऐकायला यायचा हा आवाज म्हणजे कित्येकांच्या दिवसाची सुरुवात आणि सवयीचा भाग झाला होता. हा आवाज होता आरजे शुभमचा. 'लाईफ में हो झोलझाल तो शुभम को बोल डाल' असं ठणकावून सांगणारा 24 वर्षांचा शुभम, . रोज नागपूरकरांच्या हृदयाचे स्पंदने वाढविणारा शुभम इतक्या कमी वयात हृदयआघाताने जाईल अशी कल्पनाही करवत नाही. Shubham We will miss u ..
शुभमच्या दुःखातून सावरण्याची ताकद त्याच्या परिवाराला दे प्रभू. इतकेच मागणे


Wednesday 19 October 2016

महाश्वेतादेवी कि कविता

Beautiful lines by Mahadevi verma !          

आ गए तुम?
द्वार खुला है, अंदर आओ..!

पर तनिक ठहरो..
ड्योढी पर पड़े पायदान पर,
अपना अहं झाड़ आना..!

मधुमालती लिपटी है मुंडेर से,
अपनी नाराज़गी वहीँ उड़ेल आना..!

तुलसी के क्यारे में,
मन की चटकन चढ़ा आना..!

अपनी व्यस्ततायें, बाहर खूंटी पर ही टांग आना..!

जूतों संग, हर नकारात्मकता उतार आना..!

बाहर किलोलते बच्चों से,
थोड़ी शरारत माँग लाना..!

वो गुलाब के गमले में, मुस्कान लगी है..
तोड़ कर पहन आना..!

लाओ, अपनी उलझनें मुझे थमा दो..
तुम्हारी थकान पर, मनुहारों का पँखा झुला दूँ..!

देखो, शाम बिछाई है मैंने,
सूरज क्षितिज पर बाँधा है,
लाली छिड़की है नभ पर..!

प्रेम और विश्वास की मद्धम आंच पर, चाय चढ़ाई है,
घूँट घूँट पीना..!
सुनो, इतना मुश्किल भी नहीं हैं जीना..!!

सोंग


जगण्याचाच शाप झालाय
मृत्यू पावलय सगळंच
संवेदनेचा मृत्यू
सहिष्णुतेचा मृत्यू
जगण्यासाठी लागणाऱ्या
संभावनेचा मृत्यू

मृत्यू पावलाय माणूस
माणसातलं माणूसपण
मरण पावलंय जगणं
जगण्यातलं मीपण

विचार मेलेत, आचार मेलेत
मेलेत सगळे संस्कार
मेलीय ओळख, मेलाय संवाद
उरलाय केवळ अंधार

मेली मैत्री मेलंय प्रेम
नातीही मृत्यू पावली
मेला जिव्हाळा नि मेली माया
उरलीय केवळ काया

आता जगतायेत अर्थहीन सुरावटी
रंगरंगोटी चढवलेला मुखवटा
आयुष्य सरकत राहते 
जिवंतपणाची खून शोधत
उंची गाठता गाठता
हरवलेली खोली शोधत

उडण्याचे स्वप्न पाहत
मरण्याआधीची कन्हती आत्मा
त्याच त्याच वर्तुळात भटकत राहते
वांझोट्या अपेक्षांचे बोचके कोंबत
प्राणहीन शरीर सोंग वठवत राहते



Rashmi  / 19/10/2016









Friday 14 October 2016

कहो - अमृता प्रितम

वह कहता था,
वह सुनती थी,
जारी था एक खेल
कहने-सुनने का।

खेल में थी दो पर्चियाँ।
एक में लिखा था *‘कहो’*,
एक में लिखा था *‘सुनो’*।

अब यह नियति थी
या महज़ संयोग?
उसके हाथ लगती रही वही पर्ची
जिस पर लिखा था *‘सुनो’*।

वह सुनती रही।
उसने सुने आदेश।
उसने सुने उपदेश।
बन्दिशें उसके लिए थीं।
उसके लिए थीं वर्जनाएँ।
वह जानती थी,
'कहना-सुनना'
नहीं हैं केवल क्रियाएं।

राजा ने कहा, 'ज़हर पियो'
*वह मीरा हो गई।*

ऋषि ने कहा, 'पत्थर बनो'
*वह अहिल्या हो गई।*

प्रभु ने कहा, 'निकल जाओ'
*वह सीता हो गई।*

चिता से निकली चीख,
किन्हीं कानों ने नहीं सुनी।
*वह सती हो गई।*

घुटती रही उसकी फरियाद,
अटके रहे शब्द,
सिले रहे होंठ,
रुन्धा रहा गला।
उसके हाथ *कभी नहीं लगी वह पर्ची,*
जिस पर लिखा था, *‘कहो'*।

-Amrita Pritam

Tuesday 27 September 2016

स्मिताच्या स्मृतीने दरवळणारा पुरस्कार

उत्कृष्ट अभिनयाचं कौशल्य हे नुसतेच सुंदर दिसण्यावर कसे भारी पडू शकते ह्याचे सर्वात जिवंत उदाहरण कायम केले ते स्मिता पाटील हिने. हिरोईन व्हायचं असेल तर गोरं चामडं आणि रूपवती असलंच पाहिजे हे भारतीय चित्रपटांचं शतकात चोख बसलेलं सूत्रच बदलवून टाकणारी मराठी व हिंदी दोन्‍ही चित्रपटसृष्‍टीवर दोन दशके अधिराज्‍य गाजवणारी हि गुणी लाडकी अभिनेत्री स्मिता पाटील.
 या अभिनेत्रीने हिंदी- मराठी रसिकांना रडवले, हासवले, विचार करायला भाग पाडले. स्मिता पाटील यांना जाऊन आज 30 वर्षांचा कालावधी लोटला. परंतु, चित्रपटसृष्‍टीतील सर्वोत्‍तम अभिनेत्री कोण असा प्रश्‍न उपस्‍ि‍थत झाल्‍यास आजही स्मिता पाटील यांचे नाव अग्रगण्य ठरते. तिच्या नंतरही कित्तेक हिरोईन आल्या अन गेल्या पण भारतीय कलाविश्वावर छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ठसा उमटवलेली स्मिता कधीच सिनेरसिकांच्या विस्मरणात जाऊ शकली नाही.

दिवंगत प्रतिभावंत अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या स्मिता पाटीलची आत्ता इतकी ठळक आठवण येण्याचे कारण म्हणजे हल्लीच बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिला 'स्मिता पाटील स्मृती' पुरस्कार सोहळ्याने सन्मानित करण्यात आले. तिला या पुरस्काराची घोषणा झाल्यापासूनच नेटिझन्स सोशल नेटवर्किंग साईटवरून तिला ट्रॉल करीत तिची खिल्ली उडवत आहेत. आपल्या मनात असणाऱ्या स्मिता पाटीलची अजरामर छबी कतरिनाच्या रूपात पाहणे रसिकांना मान्यच नसल्याचे यावरून लक्षात आले.

पण हे सगळे कतरिनाच्याच वेळी का घडावे हा प्रश्नही उभा राहतो. यापूर्वी हा पुरस्कार तन्वी आझमी, श्रीदेवी, मनीषा कोयराला, उर्मिला मातोंडकर, तब्बू, विद्या बालन, ऐश्वर्या राय बच्चन, करिना कपूर खान, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पण कतरिनाला या पुरस्काराने सन्मानित करण्याच्या निर्णयावर मात्र वादंग सुरु झाले. कतरिनाला बॉलिवूड इंडस्ट्रीत येऊन तब्बल दहा वर्ष झालीत. सध्य स्थितीत आघाडीची अभिनेत्री असूनही कतरिनाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही छाप सोडू शकले नाही. गेल्या दहा वर्षात चित्रपट सृष्टीला तिने दिलेले योगदान कलेच्या अनुषंगाने पाहिल्यास फार वाखाणण्यासारखे जरी नसले तरी, तीने वारसाहक्काने इथे प्रवेश केला नव्हता. डोक्यावर हात धरणारा कुणी नसतांनाही इथे टिकण्यासाठी, तग धरून धैर्याने पाय रोवत स्वतःला सिद्ध करत राहणे यासाठी तिने घेतलेले कष्ट नाकारता येणार नाही. यापुढेही ती काम करणार आहे तेव्हा तिच्याकडून चांगल्या चित्रपटांची अपेक्षाही इथे संपत नाही.


समांतर चित्रपटातील अभिनयातून रसिकांच्या मनामनात अधिराज्य गाजवणाऱ्या स्मिताचे 'मंथन' 'अर्थ' 'भूमिका' 'आक्रोश' तसेच मराठीतले 'उंबरठा'  'जैत रे जैत' सारखे चित्रपट सिने इतिहासात अजरामर ठरले.ज्या चित्रपटांनी समांतर आणि मनोरंजनाचा योग्य समतोल साधला. तिने स्‍त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले. व्यावसायिक चित्रपट तिची प्राथमिकता कधीच होऊ शकले नाही. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला भारतीय सिनेमातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले. तिच्या याच सामाजिक बांधिलकीचे आणि भारतीय चित्रपटांना दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी सन्मान म्हणून 'स्मिता पाटील स्मृती पुरस्कार' प्रियदर्शनी अकॅडमीतर्फे देण्यात येतो.

अभिनयासोबतच सामाजिकतेचे भान जपणा-या स्मिता पाटील यांचा आदर्श आजच्या काळातल्या प्रत्‍येक अभिनेत्रीने जपावा. कतरिना सारख्या महेनती कलाकाराने तसेच आजतागायत या पुरस्काराने सन्मानित इतर अभिनेत्रींनीं देखील स्मिता पाटीलचा हा वारसा पुढे चालवावा. पुरस्कार घेतांना ती तंतोतंत तशीच छबी असावी, तसेच योगदान दिलेले असावे, तीच प्रतिष्ठा प्राप्त असावी असा त्याचा अर्थ होत नाही. तर योगदानाबरोबरच भविष्यात तशी जाणीव निर्माण व्हावी, तसा आदर्श घडवणारा प्रयत्न केला जावा, त्यासाठी प्रोत्साहन मिळावे ह्याच हेतूने हा पुरस्कार देण्यात येतो. कतरिनाला ह्यासाठी हा पुरस्कार मिळालाय असे गृहीत धरले तर आता वाटतेय तसे आश्चर्य वाटणार नाही. आणि  'स्मिता पाटील स्मृती' पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण सर्व तिचे अभिनंदनच करू. 




 

हाक - बलुचिस्थानची

 लुचिस्थान मधील विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष करीमा बलोच हिने नुकतंच एका विडिओद्वारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भावुक करणारा संदेश पाठविला होता. सोशल मीडियावरून हा व्हिडीओ संदेश मोदींपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करीमाने केला त्यात तिने म्हंटले होते कि, 'बलुचिस्थान मधल्या महिला तुम्हाला भाऊ मानतात, पाकिस्तानच्या चांगुल मधून स्वतंत्र करण्यास आपण पुढे येऊन आमची मदत करावी.' मोदींना भाऊ संबोधून बलूचमध्ये सध्या सुरु असलेल्या नरसंहार, अपराधीक घटना, अत्याचार विरुद्ध त्यांच्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर मदतीची मागणी करावी. त्यांच्या पाठी उभे राहावे असे आवाहन तिने केले होते. नरेंद्र मोदी दर महिन्याला देत असणारा संदेश 'मन कि बात' चे प्रसारण आता बलुचिस्तानात बलूच भाषेतही होणार यासाठी केंद्र सरकारने आता परवानगीही दिली आहे. 

भारताने पाकिस्तानसाठी नीतीत अचानक काही बदल घडवून आणले आणि पाकिस्तानात खळबळ माजली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी त्यांच्या भाषणातून पाकिस्तानमधील अधिकृत काश्मीर आणि बलुचिस्थान मधील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी आवाज उठवला आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी समर्थन असल्याचे बोलून दाखवले आणि बलुचिस्थान मधील नागरिकांमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वेगवेगळ्या संस्था संघटनांमधून मोदींना मदतीसाठी आव्हान करण्यात येत आहे. मात्र त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांचे अत्याचार अधिकच तीव्र झाल्याच्या झळा उठू लागल्या. बलूच रिपब्लिकन पार्टीचे नेते अब्दुल नवाज बुगती यांच्यानुसार पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानच्या लोकांवरील अत्याचारात वाढ केली आहे. पाक लष्कराद्वारे नव्याने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे बुगती यांनी सांगितले. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी बलुचिस्तानच्या बोलन क्षेत्रातून 40 पेक्षा अधिक महिला आणि मुलांचे अपहरण केले आहे. पाकिस्तान बलुचिस्तानात सातत्याने आपले अत्याचार वाढवत आहे. बलुचिस्तानात मानवाधिकार उल्लंघनाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पाककडून तेथे ‘मारा आणि फेका’ धोरण अवलंबिले जात असल्याचा दावा बलूच कार्यकर्त्या फरजाना मजीद बलूच यांनी केला.

पाकिस्तानासारख्या देशात रुढीपरंपरावादी लोकांमुळे महिलांची परिस्थिती फारच वाईट आहे. मानवाधिकार आंदोलनाच्या कार्यकर्त्या फर्जाना मजीद बलूच हिनेतर सध्या बलुचिस्तानमध्ये महिलांवर केले जाणारे अत्याचार, नरसंहार आणि मानवाधिकार उल्लंघनाची तुलना 1971 साली झालेल्या बांग्लादेशच्या स्वातंत्र्य संग्रामसोबत केली. पाकिस्तानी सैनिकांद्वारा बलूच महिलांना लक्ष्य करून सूड उगवणे हे 1971 मध्ये महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्काराएवढे पाशवी असल्याचे त्या बोलल्या. बलूच मधून विद्यार्थी नेते जाकीर माजिदच्या बहिणीने मजीद बलुचने डूरा बुगतीच्या वेगवेगळ्या भागातून महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर पाशवी अत्याचार होत असल्याचा गौप्य स्फोट केला. राजकीय दृष्ट्या पुढाकार घेऊ इच्छिणाऱ्या किंवा स्वान्त्र्यासाठी आवाज उठविणाऱ्याव महिलांचे वर्चस्व संपुष्ठात आणण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने येथे अभियानाचा राबवले असल्याची माहिती अब्दुल नवाज बुगती यांनी दिली.

14 ऑगस्ट या पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी कला दिवस मनावणाऱ्या बलूच लोकांनी 15 ऑगस्ट हा भारतीय स्वतंत्रता दिवस अतिशय हर्षोल्लासात साजरा केला होता. बानूक झरीना बलूच या बलुची महिलेने 15 ऑगस्टला एका छोट्या मुलाचा हात ज्यावर भारतीय झेंडा रंगवला होता आणि त्यात आई लव्ह इंडिया असे लिहिलेला फोटो सोशल मीडियावर टाकला होता म्हणजेच लहानमुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच मोदींकडून अपेक्षा असल्याचे त्यातून संदेश देण्याचा हा प्रयत्न होता.



  • बलुचिस्थान मधील उइगर नेता डोल्कुन ईसा हिला भारताने हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे राहणाऱ्या तिब्बतींचे  सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा ह्यांना भेटण्यासाठी वीजा मान्य केला आणि पाकिस्तानसकट चीनमध्ये सुद्धा भारतविरोधी सूर उमटू लागले. डॉकुन इसा हि चीन मध्ये आतंकवादी प्रमुख म्हणून प्रतिबंधित आहे. याआधीही भारताने बलूच नेता नीला कादरीला व्हिजा दिला होता तेव्हा त्यावर पाकिस्तानातही असाच विरोधाचा स्वर उमटला होता. 


  • बलुचिस्थान पाकिस्तानच्या चार प्रांतांपैकी एक आहे. ते पाकिस्तानचे सर्वात मोठे राज्य आहे. पाकिस्तानचे जवळ जवळ 44% क्षेत्रफळ बलुचिस्तानने वेढले आहे. येथील लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 7% म्हणजेच जवळ जवळ 1.3 करोड एवढी आहे. इथे राहणाऱ्या नागरिकांना बलूच नागरिक असे संबोधिले जाते. या प्रदेशाला 'ब्लैक पर्ल' किंवा 'काला मोती' देखील म्हणतात. तेल, गॅस, सोने, तांबे अश्या नैसर्गिक संपत्तीने हा प्रदेश संपन्न आहे.




Monday 19 September 2016

वैनगंगा ..

भंडाऱ्या जिल्ह्यातील लाखनी वरून परतीच्या रस्त्यावर, धावत्या गाडीतून सूर्यास्ताच्यावेळी घेतलेले हे वैनगंगा नदीचे  चित्र 







Tuesday 13 September 2016

माजघरातले रुदन ..

अतिशय कर्तृत्ववान, हुशार, देखणी असलेली स्वकर्तृत्वाच्या जोरावर प्रतिष्ठा मिळवून सांस्कृतिक क्षेत्राची लाडकी झालेली. करिअरच्या उत्तुंग शिखरावर असतांना आयुष्यात घेतलेल्या एका चुकीच्या वळणाने आयुष्यच श्राप बनून बसलेली डॉली. गुणी निवेदिका म्हणून नागपूरकरांच्या घराघरात पोहचलेला एक सुंदर चेहरा तिच्या चाहत्यांच्या आणि एकंदरीतच समाजासमोर मोठा प्रश्नचिन्ह सोडून आज ब्रेनडेड होऊन निपचित पडलेली आहे. तिची हि करून कहाणी. 
 ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून संपूर्ण आयुष्यच समर्पित केले अश्या माणसाने फसवणूक केली. सात महिन्याआधी सप्तपदी चालून ज्याच्या उंबरठ्या आत पाऊल ठेवले त्या नवऱ्यानेच दगा दिला. पैशांसाठी, हुंड्यासाठी पिळवणूक केली. शारीरिक मानसिक अत्याचार केले. म्हणून वाढदिवसालाच फाशी लावून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉलीला तिच्या माहेरच्या माणसांनी ताबडतोब उपचारार्थ भरती केले परंतु तोपर्यंत डॉली कोमात गेली होती आणि आता नागपूरच्याच कुठल्याश्या रुग्णालयात अति दक्षता विभागात मरणासन्न अवस्थेत मृत्यूशी झुंझ देते आहे.  हल्लीच दिल्लीत आप या राजकीय पार्टीचे मोठे नाव असलेला नेता सोमनाथ भारतीच्या पत्नीने लिपिका मित्राने नवर्याकरवी  आपल्यावर घरगुती हिंसा होत असल्याची तक्रार पोलिसात टाकली होती. त्याआधी अनेकवर्ष तिने हा अत्याचार सहन केला होता. दोनेक वर्षाआधी अशीच गाजलेली घटना 70 कोटीचे चित्रपट नावावर असणाऱ्या बंगरुळुच्या सिनेइंडस्ट्रीचा लोकप्रिय अभिनेता दर्शन विरुद्ध त्याच्या पत्नीने 'घरगुती हिंसाचाराची' तक्रार केली. 8 वर्ष प्रचंड मारहाण आणि अत्याचार सहन केला पण जेव्हा तिच्या मुलाच्या जीवावरही तो उठला तेव्हा सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि तिला पुढे यावे लागले होते. सुशिक्षित सुसंस्कृत संपन्न समजल्या जाणाऱ्या घरातली हि व्यथा असेल तर निरक्षर गरीब कुटुंबाचे काय?

स्त्री सहनशील आहेच. मानसिक रीतीने सबळ देखील असते. कुठल्याही परिस्थितीत तग धरून उभे राहून आपल्या माणसांना धीर देण्याचे कामही ती करू शकते मात्र जेव्हा अन्याय अत्याचार आपल्याच माणसांकडून होतो तेव्हा मात्र ती खचते. कोसळते. आपलीच माणसे आपले वैरी का होतात ?? हा मात्र आजतागायत कधीही न सुटलेला प्रश्न आहे.

अनादी काळापासून शोषण सहन करणारी 'कन्यादान' 'सती जाणे' 'देवदासी' 'बालविवाह' सारख्या प्रथांना मागे टाकून आकाशाला गवसणी घालायचा प्रयत्न करणारी स्त्री, आजही स्त्रीभ्रूण हत्या, बलात्कार, हुंडाबळी अश्या अनेक बड्या समस्यांना तोंड देत असतांनाच कौटुंबिक हिंसाचारासारख्या दुर्लक्षित समस्येला ती रोज तोंड देते आहे. यात, शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक, शाब्दिक किंवा कुठल्याही प्रकारची मानहानी म्हणजे हिंसा तिच्या वाट्याला येते. गाव पातळीवरील महिला, शहरी, नोकरीपेशा, सुशिक्षित, श्रीमंत गरीब, स्वतः कमावती असणारी काय किंवा घरातील चौकटीपलीकडे स्वतःची प्रतिष्ठा असणारी काय. चार भिंतीआत मात्र अनेकदा अश्या अत्याचारांना तोंड देत असते. बऱ्याचदा भावनिक हिंसाचार हा गृहितच धरला जात नाही. त्याची तीव्रता आणि व्याप्तीही मोजता येत नाही. कारण ती व्यक्तिगणिक बदलू शकते. कुटुंबांमधला भावनिक हिंसाचार हा अधिक धारदार आणि माणसांचा कडेलोट करणारा असू शकतो. शारीरिक हिंसाचार हा बऱ्याचदा या भावनिक हिंसाचाराचंच प्रकट रूप असतं. स्त्रियां कडे बघण्याचा समाजाचा आणि काही विकृत पुरुष मनोवृत्तींना आळा घालण्या साठी लहानपणा पासून शालेय शिक्षणा बरोबरच सभ्यतेनी कसं वागावं याचं रितसर शिक्षण-धडे मुलांना देणे प्रचंड गरजेचं आहे. महिला दिना निमित्त फक्त एक दिवस ही सगळी चर्चा करून पुन्हा उरलेले दिवस समाजाच्या अन्यायापुढे गुडघे टेकणे, बचावात्मक पवित्रा घेणे जेंव्हा बन्द होईल तेंव्हा स्त्री ने स्त्रीमुक्तीच्या दृष्टीने एक पाउल पुढे टाकले असे म्हणायला हरकत नाही.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करतांना आपण विकासाच्या बड्या बाता मारतांना आजही स्त्रीमुक्तीच्या आंदोलनांना सामोरे जावे लागत असतांना, तिच्या प्राथमिक गरजाच पूर्ण होतं नसतांना तिच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतांना तिच्या शरीराला खुसपटसामान भोगवस्तू मानली जाऊन जागोजागी तिचे लचके तोडले जात असतांना. आम्ही भारत विश्वप्रमुख बनण्याचे स्वप्न पाहतो हा खरतर वैश्विक विनोदच नाहीये का?




 2005 च्या राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणात असे लक्षात आले कि 15 ते 49 वयोगटातल्या 81 % स्त्रियांना शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक छळांना सामोरे जावं लागतं. पॉप्युलेशन कौन्सिल ऑफ इंडिया (दिल्ली) या संस्थेच्या  सर्वेक्षणात ८,०५२ विवाहित पुरुष आणि ९३,९१२ विवाहित स्त्रिया (१८ ते २९ वयोगट) यांच्या अभ्यासातून निष्कर्षांला आलंय की आपल्या प्रागतिक सुधारक महाराष्ट्रात 23 टक्के स्त्रियांना नवऱ्याद्वारा लैंगिक हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. त्यामध्ये १४ टक्के अत्याचार लग्नाच्या पहिल्या वर्षांत होतात. अपमानास्पद बोलणे किंवा थप्पड खाणे 97 % स्त्रियांसोबत होते. लाथा, बुक्क्या, पट्ट्याने मार खाणे, सिगरेटचे चटके, घराबाहेर हाकलून लावणे हे प्रकार सर्रास घडतांना दिसतात. २००५ साली कौटुंबिक हिंसेपासून स्त्रियांचे रक्षण करणारा कायदा अस्तित्त्वात आला.
४९८ कलमामुळे गुन्हेगाराला शिक्षा मिळते.  हा दिवाणी कायदा असल्याने पोलिसांचा हस्तक्षेप नसतो. पुन्हा फक्त स्त्रीच नव्हे तर तिचे नातेवाईक, शेजारी, मित्र, हितचिंतक अर्ज करू शकतात. त्याकरता वकिलांची गरज नसते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाने नेमलेल्या संरक्षण अधिकारी, नोंदणीकृत सेवाभावी संस्था, मॅजिस्ट्रेट किंवा पोलिस अधिकारी यापैकी कुणाकडेही ही स्त्री तक्रार नोंदवू शकते. पण शोकांतिका म्हणजे आज 11 वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी समाधानकारक होऊ शकत नाहीये. 




('सकाळ' नागपूर आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित.  http://epaper4.esakal.com/14Sep2016/Enlarge/Nagpur/NagpurToday/page9.htm)

स्क्रिझोफ्रेनिया





आपल्या अवतीभवती अनेक प्रकारची माणसे आपण रोज पाहत असतो. जितकी माणसे, तितकेच निरनिराळे स्वभाव. "जितक्‍या व्यक्ती तितक्‍या प्रवृत्ती', अशी म्हणच आहे. या सगळ्यात आपण सामावून गेलो असतो. त्या सगळ्यांना स्वीकारले असते. स्वतःलाही त्यांच्यात सामावून घेतले असते. पण, कधीतरी विचित्र वागणारी माणसे दिसतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात समन्वय नसतो. सामान्यांपेक्षा काहीतरी वेगळ्याच हालचाली ते करीत असतात. असंबंध बडबडत असतात. त्यांना आपण विक्षिप्त किंवा पागल ठरवून मोकळे होतो. पण, त्यांना असे का झाले असावे, त्यामागची कारणे काय, त्यावर उपाययोजना काय, याचा विचारही आपण करत नाही. अनेकदा अशी लोक स्क्रिझोफ्रेनियाचे रोगी असू शकतात.

काय आहे हे स्क्रिझोफ्रेनिया प्रकरण?
स्क्रिझोफ्रेनिया हा रुग्णाच्या विचार, भावना व वर्तणुकीवर परिणाम करणारा मानसिक आजार आहे.
हा विकार दीर्घ काळ चालणारा, गंभीर व मानसिक संतुलन बिघडविणारा आजार आहे. या आजारात रुग्ण जीवनातल्या वास्तविकतेपासून दूर होत जातो. त्याला वास्तविकता व भ्रम यात फरक समजून येत नाही. बऱ्याचदा तो काल्पनिक जीवनात रममाण होतो आणि तसेच वर्तन करतो. त्यामुळे त्याच्या एकंदरीतच वागण्यात विक्षिप्तपणा येत जातो.

स्क्रिझोफ्रेनिया होण्याची निश्‍चित कारणे अजूनही शोधता आली नाहीत. तरीही आनुवंशिकता, मुळात विस्कळीत व्यक्तिमत्त्व असणारी, वास्तविक जीवनापासून दूर राहून पुस्तके, चित्रपट यात रमून स्वतःचे वेगळे विश्‍व निर्माण करणारे, सतत मानसिक दडपणाखाली जगणारे, बाळंतपण किंवा एखाद्या गंभीर आजारातून-अपघातातून होणारे शारीरिक-मानसिक बदल, अशी कारणे यासाठी सांगितली जातात. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही मानसिक आजार होतात. पण, स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते.

स्क्रिझोफ्रेनियाची लक्षणे म्हणजे, खूप एकापाठोपाठ एक दिवास्वप्न पाहणे, तोंडातल्या तोंडात पुटपुटणे/बडबड करणे, कारण नसताना हसणे व रडणे, लहान मुलांप्रमाणे वर्तणूक करणे, काहीतरी विचित्र क्रिया करणे, नकारार्थी भूमिका घेणे, पुन:पुन्हा तेच शब्द उच्चारणे, अंगस्थिती विचित्र ठेवणे, विक्षिप्त हावभाव करणे, इच्छाशक्ती कमी, उद्देश, ध्येय नसते, रोजचे दैनंदिन कामदेखील करण्याची इच्छा नसते. घरातील नातलग किंवा मित्रमैत्रिणी यांच्यात बोलायला आवडत नाही. निर्णय घेता येत नाही. भावना बोथट झालेल्या असतात. काहींच्या मध्ये त्या अतिशय उथळ असतात. इतक्‍या की त्या व्यक्ती भावनावेग आवरू शकत नाहीत. सहानुभूती, प्रेम, जिव्हाळा काहीही नसतो. उदा. रडण्याची परिस्थिती असेल तर तिथे ते खूप हसावयास लागतात. बऱ्याच वेळा बऱ्याच रुग्णामध्ये अगदी विविध भावनात्मक जाणिवा निर्माण होतात.

असा रुग्ण आढळल्यास त्याच्या वागणुकीने वैतागून न जाता त्याला मानसिक तज्ज्ञांकडे नेऊन योग्य उपचाराची गरज आहे हे ओळखले पाहिजे. त्याला सहृदयची वागणूक दिली पाहिजे. प्राथमिक स्वरूपातील आजार लवकर बरा होण्याचे चान्सेस असतात. अन्यथा मानसिक रोग बरे होण्यास बराच काळ लागतो तितके दिवस धीर धरून उपचार सुरू ठेवणे गरजेचे असते.


सुंदर दिसण्याचा रामबाण उपाय

"डॉ .हिला चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काहीतरी द्या ना"
त्या तरूणीची आई सांगत होती.
"ग्लो येण्यासाठी म्हणजे ?" माझा प्रतिप्रश्न
"चेहरा उजळण्यासाठी !...चेहरा कसा ना, असा चमकला पाहिजे."
"मग कानाजवळ दोन छोटे छोटे एल ई डी  बल्ब लावा की, सेलवरचे ! चेहरा आपोआप उजळेल."
"डॉक्टर , तुम्ही चेष्टा करताय हं !"
"नाही, मी सीरियसली बोलतोय, चेहरा उजळण्यासाठी हा सर्वात चांगला उपाय आहे "
"तसं नाही हो .....सध्या तिला बघायला रोज पाहुणे येताहेत. तेव्हा चेहरा चांगला दिसायला पाहिजे ना ; पाहा ना, चेहरा कसा निस्तेज दिसतोय.  एखादी क्रीम ,एखादा साबण असलं काहीतरी मिळालं तर बरं होईल. चेहऱ्यावर जरा  तेज यायला पाहिजे "
डॉक्टर हसले
"का हसलात?" तिनं विचारलं.
"तू आधी काय वापरत होतीस?".
"फेअर अँड लव्हली ,फेअरएवर ,फेअरग्लो अशा बऱ्याच क्रीम लाऊन झाल्या ; पण फरक कशाचाच नाही !पाच वर्षांपासून हे नाही ते किंवा ते नाहीतर हे लावत असते पण थोडा तरी फरक पडावा ?काडीचाही फरक नाही." ती. 

"बरोबर आहे फरक पडणारच नाही. चेहरा आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी याचा उपयोगच नाही.
त्यासाठी  माणसाजवळ आत्मविश्वास असला पाहिजे.
चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.
मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.
मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.
मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.
मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात
तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा."
"आता काय बोलावं ?"
"पाहा ना !इथं आल्यापासून तुमची मुलगी अजून एकही शब्द बोललेली नाही.सगळं तुम्हीच बोलताय !
माणसानं घडघड बोललं पाहिजे ,
खळखळून हसलं पाहिजे,
दिलखुलास विनोद केले पाहिजेत ,
मनसोक्त रडलं पाहिजे
!थोडक्यात स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवलं पाहिजे.
त्यासाठी वाचन पाहिजे ,चिंतन पाहिजे ,खेळ पाहिजे.हे सगळं जवळ असेल तरच चेहरा सुंदर !...
..आजपासून हे सुरू कर आणि मग बघ कसा फरक पडतो ते !.......
लोक धबधबाच बघायला का जातात ? लोकांना पाण्याचं  साठलेलं डबकं का आवडत नसावं  ? माणसाचंही धबधब्याप्रमाणेच आहे ! चैतन्यमय व्यक्तिमत्व सगळ्यांनाच आवडतं !.....आणि असं व्यक्तिमत्व म्हणजेच तेजस्वी चेहरा !
व्यक्तिमत्व खुलवा चेहरा , आपोआप तेजस्वी होईल. जे लोक आरशाचा कमीत कमी उपयोग करतात तेच लोक जास्त सुंदर असतात !"

किती खरं बोललेत ना डॉक्टर. चलातर व्यक्तिमत्व खुलवूया, सुंदर दिसूया. 

(व्हाट्सअप वर वाचलेला एक आवडलेला लेख )

Tuesday 30 August 2016

माणुसकीचा बोन्साय ...



जन्म नेमका कशासाठी घ्यायचा, कशासाठी जगायचे आणि काय नेमके काय करून मरायचे हे बरेचदा अनेकांना सतावणारे प्रश्न असतील. जगतांना येणाऱ्या सगळ्या संकटांना सगळ्या कसोटींना तोंड द्यायला तयार असणारा माणूस, कष्ट करत दुःख भोगत जगणारा माणूस, एकमेव शाश्वत सत्य असणाऱ्या 'मृत्यूला' मात्र घाबरतो,. खरतर आयुष्यच  माणसाला जन्मभर छळत असतं. आयुष्य नावाच्या यातनांतून सुटका हवी असेल तर एकमेव मार्ग ...  मृत्यू.
कवी सुरेश भटांच्या ओळी आठवतात  'इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते'  ... पण ज्यांनी जीवनही वेदना हृदयाशी कवटाळून गोधडीच्या चरचर झालेल्या चिंध्यासारखे निष्प्रभपणे जगले, सुखाच्या सावलीचाही स्पर्श ज्यांच्या वाट्याला कधीच आला नाही अश्या अभाग्यांना मृत्यूनंतरही सुटका मिळू नये? मृतदेहाचीही विटंबना व्हावी... स्मशानापर्यंतचा प्रवास आयुष्याहून अधिक खडतर व्हावा हि कसली नियती? सरणापर्यंत पोचायलाही यातनांचा पूल पार करावा लागावा अन मृतदेहालाही ठेचकाळत, डुचमळत जावे लागावे.  वैकुंठापर्यंतचा प्रवासही असा पीडादायी असावा.  गरिबीच्या झळा माणसाला कुठवर सोसाव्या लागाव्या? हे कसले भोग आणि हे कसले नशीब. हे भोग नियतीचे नव्हतेच, भोग होते बौद्धिक बाता करणाऱ्या असंवेदनशील समाजाच्या तथाकथित नैतिक जबाबदारी झटकून पळ काढणाऱ्या वृत्तीचे. हे भोग होते माणसाचे माणूसपण गहाळ झालेल्या नुसतच पोकळ उरलेल्या संस्कृतीचा धोशा मिरवणाऱ्या बेगडी सामाजिक मूल्यांचा.

असेच दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या बायकोचे कलेवर खांद्यावर घेऊन गाव गाठू पाहणाऱ्या दाना मांझीची हि हृदय पिळवटून टाकणारी घटना. ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातल्या भवानीपटना येथील दाना मांझी या माणसाची पत्नी क्षयरोगावर उपचार घेत असतांना रूग्णालयात मरण पावली. प्रचंड हलाखीच्या परिस्थितीत दिवस कंठणाऱ्या दाणाला पैसे लावून गाडी करून तिला 60 किलोमीटरवर असणाऱ्या गावी पार्थिव घेऊन जाणे शक्य नव्हते. रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय अधिकारी सगळ्यांना त्याने गावापर्यंत ऍम्ब्युलन्सची सोय करून द्यावी म्हणून विनंती केली. पण मुळात पाषाण झालेल्या यंत्रणांना पाझर फुटेल कसा?? अखेर मांझीने मृत पत्नीचे शव खांद्यावर लादले सोबत आपल्या मातेच्या मृत्यूमुळे शोक व्यक्त करणारी त्याची १२ वर्षांची मुलगी चौला अश्रू ढाळत मागे चालत राहिली आणि सुरु झाला प्रवास सरणावरच्या यातनांचा.

अपघात होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या, संकटात सापडलेल्या, दुःखाने हतबल झालेल्या माणसांच्या अनेक कथा रोज आपण ऐकतो. पण आमच्या आतल्या संवेदना जाग्या होत नाहीत. आमच्यातल्या 'माणुसकी' नावाच्या संवेदनेचा बोन्साय झालाय. असे काही घडले कि आम्ही शासनाला दोष द्यायला आणि त्यांच्या माथी सारे आरोप मारून सोयीस्करपणे आमचा 'ढिम्मपणा' जपायला पुन्हा मोकळे होतो. मांझींचा 12 किलोमीटर पर्यंतचा प्रवास बघ्यांच्या मनोरंजनाचा विषय ठरला. सोशल नेटवर्किंग वरून त्यावर मस्करीही करण्यात आली. त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवरून संतापाच्या प्रतिक्रियाही गाजल्या, पण प्रत्यक्षात अश्या भयंकर परिस्थितीतही एखाद्या गरजूला मदतीचा हात कुणीही पुढे करू नये हि शोकांतिका नाहीये का? सुदैवाने एका स्थानिक पत्रकाराने याचे चित्रीकरण करून वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठविल्याने भराभर सूत्र हलली आणि पुढील ५० किलोमीटरसाठी वाहन उपलब्ध होऊ शकले.

दाणा मांझीने त्याच्या पत्नीचे शव खांद्यावर लादले होते त्याच्या स्वतःच्या संवेदना जिवंत असल्याचे ते लक्षण होते. पण आम्ही आमच्या बधिर झालेल्या संवेदना अन स्वतःच मारून टाकलेल्या माणुसकीचे पार्थिव खांद्यावर घेऊन जगतो आहोत कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिप्त राहून मजा बघण्याची आत्ममग्न राहण्याची हि अधम प्रवृत्ती वाढीस लागते आहे. हे कुणाच्याच हिताचे नाही हे लक्षात घ्यायला हवे. वेळीच जागे व्हायला हवे अन्यथा खूप वेळ होईल .... खूप वेळ होईल

रश्मी पदवाड मदनकर / २९ऑग.१६











Monday 22 August 2016

अल्झायमर - एक गंभीर समस्या


अल्झायमर - एक गंभीर समस्या



काही मानसिक आजारांवर आपल्या देशात फारशी चर्चा होत नाही. खरतर मानसिक आजारात वेगवेगळे आजार असतात आणि योग्य उपचाराने ते बरेही होतात.  याचेच मुळी ज्ञान आम्हाला कमी आहे. मानसिक आजार म्हंटले कि ती व्यक्ती ठार वेडी असते या एकाच निष्कर्षाप्रत आम्ही पोचतो. म्हणजेच ठार वेडे होणे या टोकापर्यंत पोचेपर्यंत मधल्या काळात रुग्णाला होणार त्रास किंवा त्याच्यातले बदल टिपले सुद्धा जात नाही. मग पुढे त्याचा गांभीर्याने विचार होणे किंवा उपचार करवून घेणे, त्याची सहृदयाने काळजी घेणे या अपेक्षा गौणच राहतात. मानसिक आजाराकडे दुर्लक्ष होण्याचे कारण फक्त समाज, नातलग किंवा लोकच करतात असे नाही तर मानसिक आजारांवर हवे ते उपाय करता यावे म्हणून संशोधन घडवून आणून नवनवी उपचार पद्धती विकसित करणे किंवा तसे तंत्रज्ञान उपलब्ध करवून देणे यातही फारसे गांभीर्य दाखवले जात नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे 'अल्झायमर' सारखा आजार.

काही वर्षाआधी अल्झायमर रोगाचा प्रादुर्भाव फार नव्हता. पण आज 40 लाख लोकांना अल्झायमर सारखा मानसिक आजार असल्याचे आकडे सांगतात. आणि आकडे असेही सांगतात कि आज वाढतोय त्याच वेगाने हा आजार वाढत राहिला तर 2050 साली हि संख्या 150 करोड इतकी असेन. काही काळाने अल्झायमर पीडित रुग्णांची संख्या दोनामागे एक इतकी असेन. म्हणजेच एकतर आपण स्वतः ग्रसित असू किंवा या रोगाने ग्रस्त माणसांच्या सेवेत गुंतलेले असू. हे सगळे ऐकतांना फार भयंकर वाटत असले तरी सध्यस्थिती आहे.

1901 साली ऑगस्ते डीटर नावाच्या महिलेला उपचारार्थ फ्रैंकफर्ट हॉस्पिटलला आणण्यात आले. ऑगस्ते भ्रमितवस्थेत होती. तिला तिच्या आयुष्याच्या प्राथमिक बाबी सुद्धा लक्षात येत नव्हत्या. डॉ अलोइस अल्झायमरने तिच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न केले पण नेमका हा काय आजार आहे हे त्यांच्याही लक्षात येत नव्हते. ते तिच्यावर तरीही उपचार करीत राहिले. 1906 साली तिचे निधन झाले. हि पहिलीच महिला होती जिच्यात या आजाराची सगळी लक्षणे असल्याचे निदर्शनात आले. आणि तेव्हापासून या मानसिक आजाराला 'अल्झायमर' असे नाव पडले. 1901 हा फार जुना काळ नाही त्यानंतर अनेक दुर्धर रोगांवर प्रगत औषध, व्हॅक्सिन आणि अँटिबायोटिक औषधांचा शोध लावला.  कँसर साठी अनेक उपचार पद्धती, एचआयव्ही साठी एनिरेट्रो वायरल, हृदयरोगाची स्टॅटिन असे अनेक उपचार उदयास आले पण हि शोकांतिका आहे कि अल्झायमर आणि आणखी इतरही मानसिक आजारांवर आपल्याकडे अजूनही आवश्यक उपचार पद्धती विकसित झालेली नाही.

म्हणूनच आपल्यासारख्या साधारण माणसांनी पुढाकार घेऊन मानसिक रोगांसाठी आणि रुग्णांसाठी काहीतरी केले पाहिजे. या रुग्णांना मानवतेची वागणूक देण्यासोबतच हि वेळ आपल्यावर येण्याआधी याचे गांभीर्य सरकारपर्यंत आणि मेडिकल कौन्सिलवर बिंबवणे आवश्यक आहे. चलातर जागरूक नागरिक म्हणून पुढे येऊया. सामाजिक आरोग्यासाठी प्रयत्न करूया. 

भय इथले संपत नाही ...

मंगला जेधे नावाच्या महिलेच्या खुनाच्या आरोपावरून संतोष पोळ नावाच्या बनावट डॉक्टरला अटक होते आणि एक दोन नाही तर तब्बल 6 खून त्याने केले असल्याचे तपासात उघडकीस येते. एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे प्रत्यक्षात उतरलेले प्रकरण, हाहा म्हणता राज्यभरात चर्चेचा विषय ठरते आणि पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेची संतापजनक प्रतिक्रिया सगळीकडे उमटू लागते. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मागल्याच आठवड्यात हा सारा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेसोबत एकंदरीतच प्रशासनावर प्रश्न उभे राहिले. हि बातमी वाचली आणि नकळत डोळ्यासमोरून भूतकाळ सरकू लागला.

मला आठवतं मी लहान असतांना अमरावतीला आजोळी गेले होते. दर उन्हाळ्यात सुट्ट्यात जायचो. एरवी सतत भटकंती करायला हौसून असणारे मामा-मावशी त्या उन्हाळ्यात मात्र कमालीचे धास्तीत होते. तरुण मुलींनी घरातून बाहेर पडायचे बंद केले होते.1991-92 सालातील ही घटना असावी. रस्त्याने जाणाऱ्या मुलींच्या घोळक्यातल्या बरोबर डाव्या बाजूच्या मुलीवर सायकलने येऊन चाकूने हल्ला करणाऱ्या सीरिअल किलरच्या दहशतीत संपूर्ण अमरावती शहर वावरत होते. पुढे तो पकडला गेला. एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे तपासात पुढे आले होते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा लक्ष वेधून घेणारी हि घटना. वयाच्या नवव्या वर्षी मला प्रश्न पडला होता 'नराधमांचे सावज महिलाच का असतात??'  हाच प्रश्न आजही सतावतो.

2010 साली असेच एक सीरिअल हत्येचे प्रकरण गाजले. मुंबईतील कुर्ल्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करणारा जावेद मोहम्मद रहमान आणि त्याचे आणखी दोन साथीदार 19-20 वर्ष अल्पवयाच्या या त्रिकुटांनी वासनेपोटी एकापाठोपाठ एक अनेक अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचे आयुष्य संपवले. या राक्षसांच्या तावडीतून पळून आलेल्या एका मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे अखेर ते पकडले गेले.  2011 साली पणजीत गाजलेले क्रमिक हत्येचे आणखी एक प्रकरण, वासंती गावडे या तरुणीच्या खूनप्रकरणी सीरिअल किलर महानंद नाईक याला अटक करण्यात आली. एका खुनाचा आरोप असणाऱ्या महानंद नाईक ने एक दोन नव्हे तर तब्बल 16 महिलांचा बलात्कार आणि हत्या केल्या असल्याचे तपासात पुढे आले होते. 2014 साली कऱ्हाड तालुक्यात काही वृद्ध महिलांच्या हत्या करण्यात आल्या. काशिनाथ काळे या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी व त्याच्याकडून निष्पन्न झालेले गुन्हे तपासात पुढे आले, प्रतिकार न करू शकणाऱ्या वृद्ध महिलांवर पैसे व दागिने लूट अश्या अत्यंत क्षुल्लक कारणासाठी त्याने हल्ले करून खून केल्याचे उघड झाले होते.

निठारी हत्याकांड  तर संपूर्ण देशालाच हादरवून गेले. 29 डिसेंबर 2006 रोजी नोयडाच्या निठारी गावातून बेपत्ता झालेल्या सुमारे दोन डझन तरुण मुली आणि लहान मुलांच्या हत्येची सनसनाटी घटना उघडकीस आली होती. नोयडाच्या सेक्टर ३१ मधील डी-५ या बंगल्याचा मालक मोनिंदरसिंग पंधेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली यांनी अनेक मुलींवर बलात्कार करून त्यांना ठार केले आणि त्यांचे मांस भक्षण केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते.

या दोघांना अटक झाली. त्याचदरम्यान रवींद्र नावाचा एक नराधम श्वापद दिल्लीत अश्याच हत्याकांडात लिप्त होता. 2008 पासून पुढे 7 वर्ष तो बलात्कार आणि हत्या करीत राहिला. दर दोन महिन्याने 1 लहान मुलगी याप्रमाणे 7 वर्षात 28 जणांशी त्याने बलात्कार करून हत्या केली होती. एकनाअनेक कित्तेक प्रकरणे.




 या समाजाला छेद देणाऱ्या घटना घडत होत्या आणि आज कित्तेक वर्षांनी तश्याच घडत आहेत.  विकासाच्या नावाने  बाविसाव्या शतकाचे अग्रगण्य राष्ट्र म्हणून भारताचे नाव गणले जात असतांना आज अजूनही आम्ही संरक्षणासाठी कळकळीची मागणीच करत असू तर त्या विकासाचे करायचे काय ? आजही उपायांवर आणि सकारात्मक बाबींवर न बोलता आमची वेळ न ऊर्जा असल्या आटोक्यात न आलेल्या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि घटना निस्तरण्यात खर्ची पडताहेत.

समाजानेही झालेल्या घटनेची  केवळ चर्चा करून किंवा चघळून चघळून चोथा करून चालणार नाही तर त्यामागची कारणे जाणून घेऊन वैचारिक सामंजस्याने सोल्युशन काढणे गरजेचे आहे. समाजात एकमेकांशी अलिप्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. प्रत्येकजण प्रॅक्टिकल होऊ बघतो आहे. त्याचा अचूक फायदा घेण्याची मनोवृत्ती गुन्हेगारांत बळावते आहे.  त्यातून विकृती फैलावत जाते आहे. विशेषतः शहरात प्रमाण वाढते आहे. समाजाच्या हिताच्या दृष्टीने प्रत्येकाने जागृत होण्याची वेळ आली आहे. शासन प्रशासनाच्या भरवशावर न बसता प्रत्येकाने हि जबाबदारी उचलली पाहिजे. सजग आणि निर्भीड समाज, जबाबदार नागरिकच असे दुष्प्रकार थांबवू शकतो. नव्या पिढीच्या जडणघडणासाठी प्रत्येकाने पाऊल उचलायला हवे. 

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...