Friday, 9 December 2022

 कोणता तो तीर होता जो मनाच्या पार गेला 

कोण होते आपले ज्यांनी विषारी वार केला 


आटली ती ओलमाया खुंटला सारा जिव्हाळा 

कोरड्याशा भावनांचा का फुका आधार केला 


आसवांच्या वाहण्याला बांध टाकावा म्हणाला 

घाव झाला खोल तेव्हा का तमाशा फार केला  


जिंकणे ना हारणे हेतू सुखाने खेळणे हा 

जे मिळाले ओंजळी त्याचा सुखे स्वीकार केला


पावसाची वाट होती तो सुगीचा काळ होता 

घात केला प्राक्तनाने वादळाने मार केला 


झाड होते डवरले, होते नभाशी उंच गेले

वादळाने पाडले मी त्या फुलांचा हार केला


काल रात्री काय झाले कोण जाणे का पळाले

 त्या बिचाऱ्या मांजराला का असा बेजार केला


बेरजेला भागले अन् गुणेला जोडले मी

शून्य झाल्या भावनांचा मी मनोव्यापार केला


रश्मी पदवाड मदनकर

Featured post

कायांतर : देहाच्या कैदेतून माणुसकीच्या मुक्तीकडे

“कायांतर” ही रश्मी पदवाड मदनकर लिखित तृतीयपंथीयांच्या वेदना आणि संघर्ष मांडणारी प्रभावी कादंबरी आहे. अश्विन वर्मा ते आंचल वर्मा असा तिचा जीव...