Tuesday 25 December 2018

माणसे ...

माणसे ... 

पाळली जातात
टाळली जातात
चाळली जातात
गाडली जातात 

माणसे ... 
पकडली जातात
जखडली जातात
अडवली जातात
नडवली जातात
रडवली जातात

माणसे ... 
घेरली जातात
पेरली जातात 
पीडली जातात
रेटली जातात

माणसे ... 
ढवळली जातात
खवळली जातात
सतवली जातात
बधवली जातात

माणसे ... 
वापरली जातात
चाळवली जातात
नाचवली जातात
नागवली जातात

माणसे ... 

आवरता येतात
सावरता येतात
घडवता येतात 
स्विकारता येतात.. 

जपली जाऊ शकतात
आपली राहू शकतात .. 

माणसे माणसे असतात !!

रश्मी मदनकर
21 डीसे. 18

Saturday 22 December 2018

काय कळाले कळले नाही, असेच झाले जगणे
नजरी काही भिडले नाही असेच झाले बघणे !

डोहमनाच्या खोलीचा मज थांगच कळला नाही
उथळ मोहाच्या खेळामधे असेच झाले फसणे !

गणगोतास देऊन अंतर,जगलो वेड्यावानी
चरणस्पर्श मज घडले नाही उगाच झाले तगणे !

चांगल्या  वाईटामधला, भेद आकळला नाही
पस्ताव्याचे अश्रू ढाळत उगाच झाले रडणे !

सोबतीची बातच सोडा , कुणीच थांबले नाही
प्रताडणेची भोगून पिडा, असेच झाले खचणे !

रश्मी मदनकर.
12 डीसे. 18

Wednesday 12 December 2018

चर्चा सेलिब्रेटी मॅरेजेसची ...



जगातल्या सर्व बातम्या देण्यासारख्या घटना संपुष्टात येऊन केवळ डोळ्यांचे पारणे फेडणा-या दिमाखदार विवाह लग्नसोहळ्याच्या बातम्या येऊ लागल्या तर ?? जिकडे तिकडे हि एकमेव चर्चा सुरु असली तर ? सकाळपासून टीव्ही चॅनेल्सवरून छोट्या छोट्या गोष्टींचे लाइव्ह प्रक्षेपण.. गेल्या वर्षभर प्रसारमाध्यमात जेकाही सुरु आहे ते पाहून हे प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. जणूकाही जगातील सर्व घटना संपल्या आहेत, राजकारण बंद पडलंय, समाजकारण संपुष्टात आलंय, अपघात, चोऱ्या चपाट्या, मृत्यू, गरिबी, भ्रष्टाचार हे सगळं सगळं व्हायचं थांबलंय आणि घडतंय फक्त नं फक्त सेलिब्रेटींचे विवाह असे वाटायला लागावं इथवर या लग्नाच्या बातम्या, फोटो, व्हिडीओ प्रसारमाध्यमांमधून फिरताहेत.. नुसतं फिरत नाहीयेत तर गल्ली-बोळात, कट्ट्यावर, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर ह्याचे चर्वित चर्वण वायरल होतंय. यंदाचं वर्ष म्हणजे जगप्रसिद्ध भारतीय इंडस्ट्रीयालिस्ट आणि बॉलिवूडमधील ख्यातनाम व्यक्तींच्या लग्नसराईचं वर्ष म्हणून गाजलं. रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश आणि नीता अंबानींच्या मुलाचे लग्न आटोपले आता सुरु आहे लगीनघाई मुलीच्या लग्नाची.. अंबानी कुटुंब घरातून निघून कुठे पोचतात, कोणकोणत्या देवळात दर्शनाला जातात, पत्रिका कशी छापली आहे, लग्नात कुठले सेलिब्रिटी कोणता डान्स करणार, पाहुणे कोण आले, कसे दिसले, कुठे बसले, कसे नाचले..  सोनमच्या लग्नात कोण काय नेसणार, अनुष्काचं लग्न कोणत्या देशात होणार, दीपिकाने काय काय आणि कुठून कुठून शॉपिंग केलीय ते प्रियांका कुठल्या कुठल्या पद्धतीने लग्न करतेय .. या सगळ्यांच्या लग्नात कोणी हजेरी लावली, कुणाला निमंत्रण होतं, कुणाला नव्हतं ते लग्न लागताना कोण कसं हसलं कोण कसं दिसलं इथपर्यंत. लग्न आटोपले ..त्या नंतरही  कोण कोण कुठे हनिमूनला गेले, जातांना हातात हात होते का गालात स्मित होतं कि नाही अश्या बिनबुडाच्या ब्रेकिंग बातमीनं प्रसारमाध्यम आणि सोशल मीडिया तुडुंब डुंबून गेला होता.

माध्यम समूहात कोणत्या बातम्या विशेषत्वाने गाजतात त्यावरून वर्षभऱयाचा आलेख तयार केला जात असतो.  म्हणजे गेल्या वर्षाची ओळख त्या बातम्यांवरून ठरते.  किती जणांना कुठले कुठले पुरस्कार मिळाले. देशाबद्दल विदेशात झालेल्या काही घडामोडी. आरक्षणाच्या बातम्या, निवडणुकीचा धुराळा अश्या बातम्यांनी वर्ष वर्ष गाजत असतात. यंदाचं वर्ष मात्र सुरुवातीपासूनच खऱ्या अर्थाने लग्नसराईचं वर्ष म्हणूनच गाजतंय. सोनम कपूर, अनुष्का शर्मा आता दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या लोकप्रिय अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. सोनमन आनंद आहुजाशी, अनुष्काने देशाच्या लाडक्या खेळाडू विराट कोहलीशी गाठ बांधली, दीपिका पदुकोण हिने अभिनेता रणवीर सिंग याच्याशी तर देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्राही  अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाविषयीची माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ऑस्कर पुरस्कारावर आपली छाप पाडणाऱ्या Slumdog Millionaire या चित्रपटातील 'लतिका' या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेली फ्रिडा लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या माध्यमसमूहात झळकायला सुरुवात झाली आहे. म्हणजे वर्ष जाताजाताही लग्नाचीच बातमी भाव खाऊन जाणार.

परीकथेत शोभावे अशा सोहळ्याने डोळ्याचे पारणे फेडले असले तरी त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मात्र कंबरडे मोडण्याची शक्यता असते. कोट्यवधी खर्चाचे ओझे विनाकारण झेलावे लागणे, लोकांच्या महत्वाच्या वेळेचा अपव्यय, विनमहत्वाच्या घटनांना वेळ दिल्याने महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष, हा यातला मुख्य लूपहोल आहे.
पर्यटन आणि रिटेल व्यवसाय विवाहामुळे भरात असले तरी सामान्य जनतेच्या खिशातून काढूनच हा सोहळा पार होत असतो.. यातील सगळ्यात मोठा खर्च सुरक्षा व्यवस्थेवर करण्यात आलेला असतो. एकंदरीत समाजात आपण नट-नट्याना अवास्तव महत्व देऊन नको इतके लाडावून ठेवले आहे. अनेक माध्यमांतून त्यांचा उदो उदो होत असतो. त्यांची प्रेम प्रकरणे, विवाह-सोहळे, घटस्फोट आणि विवाहबाह्य संबंध इ. गोष्टी ‘राष्ट्रीय घटना’ असल्यागत सतत चघळले जातात. ज्या नटांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेले असतात त्यांच्या चित्रपटांचा गल्ला कितीशे कोटी करण्याचा जणू विडाच जनता उचलते. काही नटांच्या आयकर थकबाकीबाबत बातम्याही ‘टीआरपी’ साठी प्रसिद्ध होतात आणि चवीने पहिल्या जातात. एक दिवसाचीही समाजसेवा न करता ही नटमंडळी जेव्हा थेट लोकसभेच्या निवडणुकीस उभी राहतात तेव्हाही आपण विचार नं करता त्यांना निवडून का देतो? सगळेच असे असतात असेही नाही अगदी मोजके अभिनेते सामाजिक भान ठेऊन वागतात. त्यांच्यात चांगल्या नागरिकाची लक्षणे जरूर असतात. परंतु ते नको त्या मंडळींच्या झगमगाटात झाकोळले जातात खरे. आपले मनोरंजन करणारे कलाकार आवडण्यात काही गैर नाही पण आपल्या आयुष्यात त्यांना किती स्थान द्यावे हे ज्याचे त्याला समजायला हवे.

रश्मी पदवाड मदनकर
१०. १२. १८


(दैनिक सकाळ विदर्भ आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)


Thursday 6 December 2018

वाटतंय ..

वाटतंय डोळ्यांना अन मनाला उन्हात नेऊन सोडून यावं
दाटलेली ओल आटली पाहिजे.. सुकली पाहिजे
उरलेली सगळी उब मग डोळ्यातच साठवून घेऊन यावी
ठेऊन द्यावी उशाशी ..
कधीतरी जागल्या रात्री तगमग वाढतेय असं वाटेल
भावनांचा उद्रेक होईल, मग
ती उशाखालची उब पेनात भरावी .. आणि
नक्षीदार वळणांनी ओतत राहावी कागदावर
शब्दसुमने गुंफत गुंफत आकार घेतील,
 नाद, गंध, रंग स्पष्ट होऊ लागतील
अर्थ उमटू लागतील ..ते भिनू द्यावेत आतात
उधळून टाकू नये.. राखून ठेवावे तिथेच
मनाच्या भावविभोर अवस्थेसाठी ..

कधीतरी ओल पुन्हा दाटून आलीच कि ..
डोळे पाझरायला लागले कि
अन उबेचे शब्दही भिजले कि,
डोळ्यांचा डोह करावा ..मनाचा सागर
आणि
डोळ्यांना अन मनाला उन्हात नेऊन सोडून यावं
पुन्हा ... पुन्हा





कातरवेळ !

हि कविता म्हणजे एका निराशेने ग्रासलेल्या सखीने दुसऱ्या तश्याच हळव्या सखीला उद्देशून केलेला संवाद आहे. अनुभव समांतर असला की ते दुःख आपलं वाटतं. खरंतर समदुःख हे परानुभूती सहजतेनं देत असेल .. म्हणून नभ भरून आलं कि, पाऊस बरसून गेल्यावर, रात्र दाटून आली कि बरेचदा सारखे फीलिंग असतात, म्हणूनतर कविता आवडतात त्या बरचजणांना सारखंच रडवतात कुणीतरी तयार केलेली गाणी ऐकताना , चित्रपट पाहताना डोळ्यातून पाणी वाहू लागतं, मनाच्या घालमेली तश्याच अनुभवताना, जवळून बघत जगताना खूप कठीण आणि त्रासदायक होत जातं, असं मन घेऊन जन्माला येणं प्राक्तनच म्हणायचं..  पण आता आपल्यात बदल होत नाहीच हे समजावून घेउन स्वतःलाच सांभाळून घ्यावं लागतं कारण आपल्या मनाची त्या त्या घटनेला त्या त्या परिस्थितीला होणारी अवस्था समजून घेणारा सहयोगी प्रत्येकवेळी तश्याच मनाचा असतो असे नव्हे, तश्या मनाचा असला तरी त्याचे तुमचे प्राक्तन सारखे असतेच असे नाही आणि म्हणून तो त्या त्या प्रत्येकवेळी सोबत असतोच असे नव्हे..एकसारख्या मनाची माणसं एका विशिष्ट घटनेत विशिष्ट वेळी एकाठीकाणी सेम अनुभवातून जात असणे किंवा निदान मनाने तीथे अवैलेबल असणे हे योगायोगानेच घडत असावं आणि हे जेव्हा घडतं तो काळ डीवाईन होतो त्या विशिष्टांसाठी अजरामर ठरतो. कदाचित नियती त्यांना अश्या अजरामर ऐतिहासिक क्षणांसाठी क्षणैक भेटवत असेल पण असाही अनुभव दुर्मिळच... म्हणून अश्याच कुठल्याश्या हळव्या मनाच्या, समजून घेणाऱ्या सखीला हि आर्त मानभावनी आहे.

सावळओल्या आभाळाची सावळीच सावली गं ।
गहिवरलेेल्या शब्दांमधल्या अंतरातच मावली गं ।

हे आभाळ कसं दाटून सावळं झालंय बघ, सावळ्याची सावळीच सावली पसरलीय  ..सगळीच पानंफुलं सृष्टी सावळ्याच रंगात झाकोळली जाते आहे .. या वातावरणानं मन गहिवरून येतंय... कुणाला काय सांगू ? शब्दांमधल्या कंपनातून अंतरात दडून बसलेले सारे गुपित उकलतील म्हणून भीती वाटतेय .. आभाळ आणि मन गहिवरून ओसंडेस्तोवर संध्याकाळ अवतरते आहे...आणि सखी , मी लिहू लागलेय या आभाळाचं दुःख !

खिन्नसावळ्या स्निग्ध किनारी केसर आले रंगून गं ।
कातरवेळी सोन झळाळी उतरेल चोर पावली गं  ।

सखी , तशीतर ही संध्याकाळ , अशावेळी डोळ्यातून आसवे वाहून किनाराही आपोआप ओला होतो .. ढग भरुन आलेत मनातल्या पावसाची रिपरिप सुरु झालीय, इकडे निळाई उतरून आता केशरीया सूर्यकिरणं सप्तरंगात न्हावून धरतीवर उतरलीत ..आणि त्या सोनेरी किरणांची एक नाजूकशी तेजस झळाळी निसर्गाच्या गात्रागात्रात शिरूनही कातरवेळेची खिन्नता पाठ सोडत नाही..मळभ दाटतंय, काळ सरकतोय अंधाराचे सावट चोर पावलाने सर्वत्र पसरेल आता.

चंद्रसख्याच्या भोवताली मग चांदण्यांचे आलिंगन गं ।
सांज वेडीला रातराणीची भूलच अलगद भावली गं  ।

सखी , सांज मावळून रात्र होत जाते, या सांजवेडीला रातराणीची भूल अलगद वेढत / चढत जातेय  .. अगं , माझ्या सख्याची आठवण या चंद्रसख्याला पाहून होतेय ..आणि चांदण्या चंद्राला अलिंगन देताहेत तशा माझ्या अनिवार आठवणी त्याच्याभोवती रुंजी घालताहेत.

घनमोराचा फुलत पिसारा अंगणभर मन थयथय गं  ।
थरथर वेड्या श्वासामधूनी सरसर वीज धावली गं ।

घन म्हणजे ढग ते मयूरपंख लेवून अंगणात अक्षरशः थयथय नाचताहेत आणी माझे श्वास अनावर झालेत . इतका आवेग वाढला की त्याच्या ओढीनं अंगातून श्वासातून अक्षरशः वीज धावल्याचा भास होतो आहे.
 
सावळओल्या आभाळाची सावळीच सावली गं ।
गहिवरलेेल्या शब्दांमधल्या अंतरातच मावली गं ।

खिन्नसावळ्या स्निग्ध किनारी केसर आले रंगून गं ।
कातरवेळी सोन झळाळी उतरेल चोर पावली गं  ।

चंद्रसख्याच्या भोवताली मग चांदण्यांचे आलिंगन गं ।
सांज वेडीला रातराणीची भूलच अलगद भावली गं  ।

घनमोराचा फुलत पिसारा अंगणभर मन थयथय गं  ।
थरथर वेड्या श्वासामधूनी सरसर वीज धावली गं ।





Wednesday 5 December 2018

आकांक्षांपुढती गगन ठेंगणे!



हिलांनी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई सुरु करून आता बराच काळ लोटला. दरम्यानच्या काळात  समाजागणिक, व्यक्तीगणिक स्त्रियांच्या व स्त्रियांसाठीच्या ह्या अव्याहत लढ्याची वेगवेगळी रूपे पाहावयास मिळाली.  एक दुर्लक्षित, असहाय जिणे, परिस्थितीचे चटके खात जगणे तिला मान्य नव्हते.. हा लढा देत असतांनाच तिला अनेक संघर्षाला, आव्हानांना सामोरे जावे लागले. स्त्रियांना जगण्याची - जन्म घेण्याची संधी, पदोपदी संघर्ष न करता समान शिक्षण व अर्थार्जनाची संधी, समान वागणूक, श्रमांचे समान मूल्य व असुरक्षिततेची भावना न बाळगता समाजात सन्मानाने वावरता येणे हे सहज साध्य करणे शक्य नव्हते. सुरुवातीचा काळ कठीण होता खरा पण आता महिलांच्या तंबूतले वारे बदलू लागले आहेत. तीन तिच्या कष्टाने निगुतीने प्रयत्न करून स्वतःसाठी स्वतःच असं अस्तित्व निर्माण करून घेतलं आहे. तिला शिक्षणामुळे व आर्थिक स्वयंपूर्णतेमुळे एक अनुभव-समृद्ध आयुष्य जगता येऊ लागलं आहे. तिचे स्वतःचेच नव्हे तर सर्व घराचे आर्थिक निर्णय घेणे, गुंतवणूक - आर्थिक नियोजन करणे यासारख्या गोष्टींबरोबरच नोकरी - करियरमध्येही तिला भरपूर वाव मिळायला लागला आहे. या संधीचे सोने करायला आता पुढली पिढीही सरसावली आहे आणि केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर भारतीय महिलांचा चेहेरा झळकू लागला आहे.

अगदी परवा परवाच फोर्ब्सने 50 टेक कंपन्यांच्या अमेरिकन शीर्ष महिला अधिकार्यांची यादी घोषित केली. या  गटात काही चेहऱ्यांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ते चेहेरे होते कष्टाळू, कणखर, तेजस्वी आणि बुद्धिमान स्त्रियांचे ! भारतीय स्त्रियांचे. यंदा एक दोन नव्हे तर तब्बल चार भारतीय महिलांचा समावेश फोर्ब्ज ने जाहीर केलेल्या पन्नास प्रभावशाली महिलांच्या यादीत करण्यात आला आहे. कोण आहेत या स्त्रिया? यशोशिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी कोणकोणते कष्ट उपसले, आव्हाने पेलली? सिस्को कंपनीची पूर्व चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर पद्मश्री वॉरियर, उबर कंपनीची सीनियर डायरेक्टर कोमल मंगतानी, कॉन्फ्लुएंट ची चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर आणि को-फाउंडर नेहा नरखेड़े, आइडेंटिटी मैनेजमेंट कंपनी ड्रॉब्रिज ची कामाक्षी शिवरामकृष्णन या भारतीय महिलांनी हे उत्तुंग यश मिळवून अभिमानाचे क्षण देशाच्या झोळीत घातले आहेत.

पद्मश्री वॉरिअर :- आंध्रप्रदेशच्या विजयवाड्याला जन्म झालेली पद्मश्रीने दिल्ली आईआईटीतुन शिक्षण पूर्ण केले त्या ५८ वर्षांच्या आहेत. त्या सध्या चीनची कंपनी नियोच्या यूएस हेड आहेत. याआधी अमेरिकी टेक कंपनी सिस्को सिस्टम्समध्ये चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर होत्या त्यांनी सिस्कोसाठीच्या अधिग्रहण व्यवहारांमध्ये  महत्त्वाची व निर्णायक भूमिका बजावली होती.

कोमल मंगतानी :-  धर्मसिंह देसाई इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, गुजरात येथून शिक्षण पूर्ण करणाऱ्या ४३ वर्षीय  कोमल सध्या उंबर कंपनीच्या सिनियर डायरेक्टर आहेत. त्या बिजिनेस इंटेलीजेंस सेक्शनच्या सर्वोच्च अधिकारीही आहेत. एवढेच नाहीतर उबरच्या महिला एनजीओच्या बोर्डमध्येही सामील आहेत.

नेहा नरखेड़े :- महाराष्ट्रातल्या पुणे शहरात वाढलेली आणि शिकलेली मराठमोळी नेहा लिंक्डइनमध्ये सॉफ्टवेयर इंजीनियर म्हणून कार्यरत असतांनाच तिने कॉफ्लुएंटसाठी 'अपाचे काफ्का' सॉफ्टवेयर तयार करायला मदत केली. या डेटा प्रोसेसिंग सॉफ्टवेयरमुळे कॉफ्लुएंट कंपनीचा बिजिनेस प्रचंड वाढला आणि हीच विदेशात नेहाची ओळखही ठरत राहिली.

कामाक्षी शिवरामकृष्णन :- मुंबईतून शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत स्थायिक असणारी कामाक्षी आर्टिफिशियल इंटेलीजेंसशी संयोजित कंपनी ड्रॉब्रिजची सीईओ आणि फाउंडर आहे. लोकं कामानिमित्त कुठकुठले डिवाइस वापरतात हे ड्रॉब्रिज ट्रॅक करण्याचे काम करते. हि कंपनी त्यांनी २०१० साली निर्मिली होती.  या कंपनीत आतापर्यंत 6.87 करोड़ डॉलरची गुंतवणूक विदेशातून झाली आहे. या आधी मोबाइल अँड प्लेटफॉर्म एडमोब मध्ये निव्वळ डेटा साइंटिस्ट असलेली कामाक्षी आज यशाच्या अनेक पायऱ्या चढत या मानबिंदूची मानकरी ठरली आहे.



या आणि अशा अनेक स्त्रिया विदेशात मोठ्या जबाबदारीची कामे पार पाडत देशाच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा खोवत आहेत. तिथे मिळणाऱ्या संधी स्त्रियांना आपले कौशल्य, बुद्धी आणि चमक दाखण्यास कारणीभूत ठरत आहेत. या सर्व स्त्रियांनी आपले कुटुंब,  स्वास्थ्य आणि आपले काम यांची कसरत अनुभवली आहे. अनेक आव्हाने पेलत त्या देशाला आणि समस्त स्त्रियांना अभिमानास्पद कामगिरी करत आहेत. दीपस्तंभासारख्या या निगर्वी आणि तेजस्वी स्त्रियांकडून प्रेरणा घेऊन अनेक तरुणी विविध क्षेत्रात पुढेही येतील यात काही शंका नाही!

रश्मी पदवाड मदनकर
1 dec. 2018



Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...