Tuesday 28 October 2014

एक क्षण !!



आयुष्यातला एक क्षण अलगद निसटला

सुटला, आणि पुढ्यात येउन बसला

म्हंटला …

काय फरक पडतोय एक क्षण चुकल्याने

त्याच त्या भावनांना क्षणभर मुकल्याने ??


तुही घे विश्रांती एकाच क्षणाची

होऊन दे जरा शांती मनाची


क्षण हा क्षणाने वाहून जाईल

क्षणभर जरी विसावून जाईल

दुसऱ्याच क्षणात शिरशील तू

वेडे, मला विसरशील तू


नव्याने पुन्हा जगायला शिक

विसरून मला जगाला जिंक

बघेन तुला याच धर्तीवर

यशवान होतांना कीर्तीवर


मी हळहळले, मुसमुसले

हात धरून क्षणाला... म्हणाले


क्षणा

आयुष्य क्षणांनी जगतेय मी

सारेच क्षण ओंजळीत वेचतेय मी

क्षणात सारे विखरून जाईन

तू गेलास तर सारेच विस्कटून जाईन


क्षणा …. मी क्षण क्षण साठणार आहे

जगण्याचं गणित मांडणार आहे.

आयुष्याचा क्षणही भागला तरी

जगणंच माझं थांबणार आहे .


(c) रश्मी / ५ जून २०१४





(प्रस्तुत मुक्तछंदातले काव्य मासिकात प्रकाशित झाले असून कावियीत्रीच्या नावे कॉपीराईट आहे.)

Friday 10 October 2014

डॉ श्रीधर शनवारे :- एक व्रतस्थ कवी !






एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देण्यास महत्वपूर्ण ठरले आहे. यांच्या वाड्मयीन प्रवासातले ठळक टप्पे बारकाईने न्याहाळले तर त्यांच्या लिखाणाला प्रतिभेचे अनेकविध पंख फुटलेले दिसतात. वैदर्भीय रसिकांना अभिमान बाळगण्यास महत्वपूर्ण कारण ठरलेल्या या कविमनाच्या साहित्यिकाच्या वाण्ग्मयीन प्रवासाचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.


या संवेदनशील साहित्यिकाचा जन्म ५ आक्टोबर १९३५ रोजी अमरावती जिल्ह्यातल्या' साहूर' येथे झाला. मात्र शिक्षण अन नौकरीच्या निमित्त्याने नंतर च्या काळात ते नागपुरात स्थायिक झाले. ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले आणि मराठी विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाले. गेल्या चार दशकांपासून त्यांचे साहित्य सृजन अव्याहत चालू होते.


‘‘उन्हंउतरणी सुरू होईल आता,

पण वाती भिजलेल्या नसतील,

धुपारतीची वेळ होईल लवकर अन्

माझ्याजवळ फुले जमलेली नसतील,’’



असं म्हणत सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ‘उन्हंउतरणी’ या संग्रहातून त्यांनी कवितेच्या क्षेत्रात पदार्पण केलं.… …

साठोत्तरी मराठी काव्यविश्‍वातील डॉ. श्रीधर शनवारे हे ज्येष्ठ कवी होते. लेखकाच्या जाणीवेत आणि नेणीवेत एखाद्या विषयासंबंधी अधिकाधिक चिंतनाने कसकसे परिवर्तन होत गेले याचे प्रतिबिंब त्याच्या साहित्यात दिसते. त्यांची वाण्ग्मयीन अभिरुची अनेक विषयात व्यापून राहिलेली आहे कविता, बाल-किशोर कविता, नाटक, प्रवासवर्णन, समीक्षा, मराठी व्याकरण, प्रबंध अशा अनेकविध अंगांनी त्यांचे साहित्यसृजन निरंतर प्रवाहित राहिले . पण विविध क्षेत्रातले लेखन त्यांनी केले असले तरी त्यांचा व्यासंग हा कवितेच्या गावचाच. समकालीन अनेक प्रतिभावंत कवी नावारूपाला येत असतांना डॉ. श्रीधर शनवारे यांनी स्वतःचे वेगळेपण जपत त्यांच्या काव्य चाहत्यांच्या आणि समीक्षकांच्याही नजरेत चिंतनशील कवी असा लौकिक प्राप्त केला. सूक्ष्म निरीक्षणशक्ती व चिंतनाची पक्की मांड त्यांची शक्तिस्थानं होती. त्यांच्या अनेक कवितांमधून त्यांची प्रतिभा बोलती झाली आणि आजही त्यांच्या अनेकविध पुस्तकांमधून त्यांची वाण्ग्मयीन गुणवत्ता सिद्ध झालेली आहे. 1960 नंतर मराठी कवितांना आयाम देणाऱ्या कवींमध्ये श्रीधर शनवारे यांचा समावेश आहे. विदर्भातील आध्यात्मिक, वैचारिक कवींच्या परंपरेतील ते कवी होते. त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये 'उन्हउतरणी', 'आतून बंद बेट', 'तळे संध्याकाळचे', ' ‘तीन ओळींची कविता’, 'थांग अथांग तळे' आणि ‘सर्वा’ असे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. या व्यतिरिक्त ‘राक्षसांचे वाडे’ हा बाल-किशोर कवितांचा संग्रह, श्री शरत्‌चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘रामेर सुमोती’ या कथेचा अनुवाद, ‘अतूट’ या शीर्षकाने नाट्याविष्कार, हिन्दीतील प्रख्यात साहित्यिक ‘प्रेमचंद’ यांचा निवडक कथांचा अनुवाद, मराठीतील समर्थ ‘कथाकार वामन चोरघडे’ हा समीक्षाग्रंथ, ‘अभिनव मराठी व्याकरण’ हा व्याकरणावरील ग्रंथ, ‘कोलंबसाची इंडिया’ आणि ‘पायावर चक्र’ ही अप्रतिम प्रवासवर्णने अशा विविध रूपांनी त्यांच्या प्रतिभा वृक्षाला बहर आलेला आहे. साहित्य क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे विदर्भाच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचे कलादालन समृद्ध होण्यास मदत झाली. विशेषत: मराठी कवितेतील त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल नागपूर येथील कृषी विकास प्रतिष्ठानाच्या वतीने त्यांना ‘विदर्भ गौरव’ हा अत्यंत सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या ’सरवा' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार, ’कोलंबसाची इंडिया’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाला नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा ‘गाडगेबाबा स्मृती पुरस्कार’ याव्यतिरिक्त प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ’सूर्योदय काव्य पुरस्कार’ आणि विविध साहित्य प्रकाराला अनेकविध सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत.


डॉ श्रीधर शनवारे हे एक विकासशील कवी होते त्यांच्या लिखाणात 'अनुभवाची अंतर्मुखता' आहे त्यांच्या साहित्यातून प्रतिमासृष्टी, अभिव्यक्तीतील मनमोकळेपणा आणि आत्मविश्वास या साऱ्यातून एक प्रथामिक जोम व्यक्त होतांना दिसतो. निसर्ग आणि मानवी जीवनमूल्यांविषयी निस्सीम निष्ठा असणा-या या कवीच्या कवितेत अपूर्णतेनं खंतावणारं मन दिसत राहायचं. श्रीधर शनवारे यांनी पूर्वसूरींचे अनुकरण न करता, समकालीनांमध्ये न रमता, कोणत्याही वाद-संप्रदायात न अडकता शांतपणे काव्यलेखन करून कवितेची एक देखणी पाऊलवाट निर्माण केली. म्हणूनच त्यांच्या साहित्यावर अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी 'प्रबंध' आणि 'शोधनिबंध' सादर केले आहेत . त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत आणि अनेक ग्रंथांची प्रकाशने त्यांच्या हस्ते झाली आहेत. त्यांच्यावर जवळपास शंभर एक समीक्षा लेख प्रसिद्ध झाले आहेत.

त्यांचा स्वभाव काहीसा आत्ममग्न होता, ते अत्यंत शांत आणि संयमी होते. एक चारित्र्यसंपन्न, सदाचारी, सतत कार्यमग्न असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या हयातीत त्यांनी साहित्य सृजन केलेच पण अनेक समृद्ध विद्यार्थी घडवले. त्यांच्या हयातीत मिळणारा कोणताही पुरस्कार योग्य ठिकाणी दान करण्याचा संकल्प त्यांनी केला होता यातून त्यांच्या निरपेक्ष, हळव्या स्वभावाचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

वांग्मय प्रेमी अन काव्यरसिकांसाठी ढीगभर मेजवानी ठेऊन, शब्दांची आगळी धून पाठी सोडून डॉ श्रीधर शनवारे २८ ऑक्टोबर २०१३ रोजी साहित्यविश्वात एक पोकळी निर्माण करून निघून गेलेत. साठोत्तरी मराठी काव्य विश्वातला तळपता सूर्य अस्ताला गेला. एका कवीची शेवटची ओळ संपली. त्यांच्याच शब्दात उर्धृत करायचे म्हंटले तर


"अंतिम ओळ
तुटण्याशी जोडलेली;
खोडता खोडता उरलेली
उरता उरता
सरलेली"


उन्ह-उतरणी संपली आणि अज्ञाताचा शोध घेताघेता एक आतून बंद बेट काळाच्या अथांग सागरात मावळून गेले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या शब्दातून अन कवितेतून अजरामर आहेत.





(दिनांक २५ ऑक्ट २०१४ रोजी 'सकाळ' वृत्तपत्रातील फास्टट्रॅक पानावर प्रकाशित लेख )

Monday 6 October 2014

लव कि जिहाद ?





लव जिहाद -
मागल्या काही महिन्यांपासून प्रचंड उहापोह होणारा विषय चावून चावून चोथा झालेला पण अजूनही चर्वित चर्वण सुरूच असलेला. चर्चा, वाद, संवाद आणि काय काय पण अजूनही विषयाला खरा संदर्भ न लाभलेला  गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात कथित ‘लव्ह जिहाद’वर चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ’ बोर्डाचे उपाध्यक्ष आणि शिया धर्मगुरु कल्बे सादिक यांनी वाराणसीत बोलताना ‘जो मुस्लिम लव्ह जिहाद करत असेल त्याला ठार मारायला हवं’ असं वक्तव्य केलं आणि सर्व देशात जरथंड झालेल्या धार्मिक चर्चेला पुन्हा तोंड फुटलं. पण प्रश्न निर्माण होतो तो हा कि कुठून पेव फुटलं या विषयाला आणि किती सत्यता आहे त्यात ? 

ब्रिटनमध्ये गेल्या दोन तीन वर्षात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आणि यात मुख्यत: मिड्लंडमध्ये - रोचडेल नंतर ऑक्सफर्ड व नुकतेच रोदरहम मध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी पुरुष आणि गट यात सामील असल्याचे निदर्शनात आले तसेच ब्रिटीश गोऱ्या मुली यांचे सॉफ्ट टार्गेट ठरतात . त्यांच्या जाळ्यात सहज फसतात. …. यामागे बरीच सामाजिक कारणे आहेत - पाकिस्तानी पुरुषांचे आकर्षण हा खरा मुद्दा नहिये. बहुतेक शाळकरी मुली विस्कळीत कुटुंबातून आलेल्या, सिगारेट, ड्रग्स आणि दारूच्या व्यसनाधीन असलेल्या अशा आहेत. तिथल्या संस्कृतीचा तो एक भाग आहे परंतु त्याचा परिणाम म्हणजे पैशांसाठी, एका दारूच्या बाटलीसाठी यातील कोणाही बरोबर त्या जात असत. हे प्रकरण गंभीर होऊ लागले तसे प्रशासन जागे झाले. यावर  सखोल चौकशी झाली आणि समोर आलेले वास्तव कल्पनेपेक्षा भयानक असल्याचे जाणवले.  अगदी पद्धतशीरपणे आधी एका बॉयफ्रेंड शी संबंध आणि त्यातून पुढे त्यान्चे लैंगिक शोषण अशी साखळी. पाकिस्तानी पुरुष गोऱ्या मुलींना कस्पटासमान लेखून त्यांचे शोषण केल्याच्या संघटीत घटना शंभर टक्के खऱ्या होत्या. स्त्रिया - मुली त्याही दुसऱ्या समाजाच्या ह्या उपभोग्य आणि दासीसमान हा टोळीकाळचा समज आणि स्वभाव बदललेला दिसत नाही . मिद्लंड आणि एकूणच ब्रिटनमध्ये वाढणाऱ्या अश्या घटनेला उग्र स्वरूप प्राप्त झाले इथल्या शासनाने दखल घ्यायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या पातळीवर कामही सुरु आहे. ऑक्सफर्ड प्रकरणातल्या १३ जणांना शिक्षा झाली. जिथे जिथे या घटना घडल्या तिथल्या पोलिस आणि child protection मधील उच्च अधिकारी बडतर्फ केले गेले. याबरोबरच सामाजिक पातळीवर अजूनही प्रयत्न चालू आहेत. या विषयाला खरी वाचा फुटली ती इथूनच.


भारतात लव जिहादची पहिली लाट उसळली ती केरळात. एकूण ६००० मुली गायब झाल्याची बातमी होती. सुब्रम्हणीयन स्वामीच्या भाषणातील संदर्भ खरे मानल्यास २००८-०९ मध्ये केरळ न्यायालयात स्थानीक हिंदुत्ववाद्यानी धाव घेतली. न्यायालयाने लव जिहाद प्रकरण खरच असते का याची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मल्याळी पोलिसांनी जिवाचे रान करत शोधमोहीम व तपास यंत्रणा राबवीली. सरते शेवटी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेली कागद पत्रे हेच सांगतात की हे लव जिहाद निव्वळ अफवा असून हिंदुत्ववाद्यांनी संगठना बळकट करण्यासाठी वापरलेले एक तंत्र आहे. ‘दि व्हॉईस फॉर जस्टिस’ या चेन्नईस्थित मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी काम करणार्‍या अ-राजकीय नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने केरळमधील हिंदू घरातील मुली गायब होण्याच्या घटनांवर आधारित बातम्या, जन्मभूमी तसेच मल्याळम मनोरमा या प्रतिष्ठित नियतकालिकात वारंवार प्रकाशित झाल्यानंतर या बातम्यांच्या आधारे ‘लव जिहाद’चा अभ्यास करायचे ठरवले. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून, देशाच्या सार्वभौमत्वाला असलेला धोका लक्षात घेऊन ‘व्हॉईस ऑफ जस्टिस’ने या प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली. या समिती मधे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुरेंद्र भार्गव यांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या 7 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये भटके विमुक्त परिषदेच्या अध्यक्षा प्रा. सुवर्णा रावळ यांचा समावेश होता. आंतरारष्ट्रीय पातळीवर मुलींच्या Human Trafficking मध्ये दरवर्षी भारतातून पुरवठा होणाऱ्या मुलींची संख्या वाढतच आहे हि  अतिशय गंभीर समस्या असूनही ते समजून घ्यायला, नियंत्रण घालायला ना तर आपल्याकडे पुरेसे कायदे, ना यंत्रणा.

लव जिहादची आवई उठविणाऱ्या काही संस्था कट्टर हिंदुत्ववादी आहेत हे नाकारता येत नाही. नुकतंच कर्नाटक पोलिसानी त्यांचा अहवाल सादर करत लव  जिहाद प्रकरण सपशेल फेटाळले आहे. पण त्याच बरोबर कर्नाटक पोलिसांनी हे सुद्धा मान्य केले की मागच्या पाच वर्षात २३० हिंदू मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तपासाअंती यातल्या १५० मुलींनी धर्म बदलवून मुस्लीमांशी लग्न केल्याचे आढळले. पण वरील विवाह निव्वळ प्रेम विवाह असून त्याचा लव जिहादशी कोणताही संबंध नाहि. पण हिंदुत्ववादी मात्र याच आकड्यांकडे बोट दाखवत "हा बघा लव जिहाद" अशी अरोळी फोडतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पण तरीही अजूनही विचार पडतो हिंसा आणि नकारात्मक घटनांचा प्रवाह कधी कधी एखाद्या विशिष्ट समाजाकडून होत असलेला का दिसत असावा कि तशी निव्वळ आरोळी ठोकली जाते हा अभ्यासाचा विषय असला तरी त्यामागे काही करणे असू शकतात. दक्षिण आशियायी समाजात एकूणच स्त्रिया आणि मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा आहे.  दहा बारा वर्षात आर्थिक प्रगतीसाठी स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. बहुतांशी तरुण असलेला हा वर्ग आणि या आधी वसलेला आता ५०-६० त असलेला, दुसऱ्या महायुद्धानंतर कामगार म्हणून आलेली आधीची पिढी यात कमालीचे अंतर आहे. कौटुंबिक हिंसा आणि वाढता धार्मिक कट्टरपणा ही सर्वच समाजात - श्रीलंकन, भारतीय ( पंजाबी, गुजराती, दक्षिणात्य ), पाकिस्तानी आणि बांगलादेशी समाजात पाहायला  मिळतो .आणि इस्लामिक मुलतत्ववादाला तर एक जागतिक परिमाण आहे आणि त्याचे प्रतिबिंब इथल्या कट्टर मुस्लिम समाजात प्रकर्षाने दिसते.

समस्या अनेक आहेत विशेषतः  होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण मागल्या काही वर्षात सर्वच भागात सर्वच समाजात वाढल्या असल्याचे आता दृष्य स्वरुपात जाणवू लागले आहे. बलात्कार, स्त्री भृणहत्या आणि आता लव जिहाद इतकंच नाहीतर हरवणाऱ्या, बेपत्ता होणाऱ्या मुलींमधील निम्म्याच्यावर मुली वेश्याव्यवसायात विकल्या जातात. पुढे त्यांचे काय होते हे तर पूर्ण वेगळंच प्रकरण ठरेल. प्रश्न नुसत्याच लव जिहाद चा नाहीच आहे समस्या अनेक आहेत आणि त्या धर्मांच्या वेष्टणाने झाकून चालणाऱ्या सुद्धा नाहीयेत. आजही आणि अजूनही भारतात ग्रामीण किंवा शहरी भागात आपापल्या जात पंचायती आणि समुदाय यांची अगदी घट्ट पकड लग्न आणि नातेसंबंधांवर आहे. त्यामुळे मुलगी किंवा बाई कुटुंब आणि त्या पलीकडे त्या त्या समुदायाची संपत्ती असेच समजले जाते. ज्यांनी कुणी या जाती -पातीच्या कुंपणापलीकडे जावून आपापले लग्न किंवा नात्याचे निर्णय घेतले त्यांना थोड्या फार प्रमाणावर समाजाचा रोष स्वीकारावाच लागतो, त्यांच्या कुटुंबीयांनातर अनेक काळ अनेक प्रकारचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष छळ सोसावे लागतात. जात, उपजात, पोटजात असे सर्व धर्मात आहेत आणि अगदी हिरीरीने आपापल्या समाजातल्या मुलींच्या फक्त रक्षणाच्या नावाखाली त्यांच्यावर पूर्ण लक्ष ठेवून असतात. समस्या धर्म, जातीपातीचा पण नाहीये. त्यातले नीतीनियम अक्षरशः स्त्रियांवर लादल्या जातात हा सुद्धा नाही आहे. प्रश्न स्त्रिया आणि मुलींच्या स्वातंत्र्याचा मुख्यत: निर्णय स्वातंत्र्याचा आहे. प्रश्न मुळातच पुरुषप्रधान संस्कृती आणि स्त्रियांना समुदायाची संपत्ती मानण्याचा आहे. स्त्री, मुलगी म्हणून ती स्वतः तिचे निर्णय घेऊ शकते, किंवा तसे करण्यासाठी तिने सक्षम व्हावे - ही मान्यता गेल्या ३०-३५ वर्षात मुख्यत: मध्यमवर्गीय, शिक्षित समाजात दिसून येत असली तरी अजूनही स्वतंत्रपणे आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य ही आपल्या धर्म आणि समुदायाच्या कक्षेतच कुंपणाच्या आत आणि जे कोणी या पलीकडे जाउन आपले जोडीदार निवडतात तिथेही नवऱ्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक रितीरिवाजांचा प्रभाव दैनदिन जीवनात स्त्रियांना स्वीकारावा लागतो. 

हो बदल हवेतच कठोर का होईना बदल हवेत समाजाच्या बदलत चाललेल्या धार्मिक संकल्पनेच्या बदलाखातर बदल हवेत. त्यासाठी आधी सर्वांचे एकमत होणे गरजेचे आहे. हे विचार काल्पनिक वाटत असले तरी निदान प्रयत्न करता येऊ शकतातच ना. जात धर्म, स्त्री पुरुष आणि अनेक भेदाभेद सोडून नको त्या गोष्टींचा नसता अभिमान सोडून राष्ट्रीयता राष्ट्रप्रेम जागृत होणे आता काळाची गरज आहे.    



(टीप : प्रस्तुत लेख दैनिक सकाळ च्या फास्टट्रॅक पानावर प्रकाशित झाला आहे )

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...