Thursday 19 June 2014

पटतंय का बघा ....

पर्वा पर्यंत प्रणव दवाखान्यात भरती होता...अवघ्या १०-१२ वर्षांचा असेल...सायकलीने घरी येत असतांना कुण्या तरुणीने भरधाव गाडीने सायकलीला कट लावला प्रणव रस्त्यावर पडला आणि पायावरून मागाहून येणाऱ्या कारचे चाक गेले ...'मल्टीपल फ़्रेक्चर' झाले आणि हा चिमुकला महिन्यांपर्यंत दुखणे सहन करत राहिला....काही महिन्यात प्लास्टर निघाले पण जन्माचे दुखणे मात्र पाठी लागून राहिले....श्वेता मुलाच्या शाळेतून 'पालक शिक्षक मिटिंग' करून परत येत होती , मेन रोड वरून शंभर एक पावलांच्या अंतराने आत तीच घर. पूर्ण घरापर्यंत ऑटो नेण्यापेक्षा इथेच उतरू म्हणजे तेवढच आपलं चालणं होत. म्हणून रोडवरच उतरली आणि घराच्या दिशेने चालू लागली. मागून येणाऱ्या भरधाव बाइक ने एवढ्या जोरात धडक दिली कि श्वेता उंच उडून कितीतरी दूर फेकली गेली...काय होतंय हे समजायच्या आत अंशतः शुध्द हरपली. जाग आली तेव्हा घोळका भोवती जमा होता. धडक कोणी आणि कशी दिली हे समजण्याची तिची मानसिकताच नव्हती....तिला दवाखान्यात नेले  तेव्हा तिच्या डोक्यात ब्लडक्लोट्स झाले होते आणि चेहेऱ्यापर्यंत रक्त उतरले होते..शरीराला प्रचंड मूक घाव होते...घरातल्या सर्व जवाबदार्या सांभाळणारी आणि लहान मुल असणारी श्वेता यानंतर जवळ जवळ ४ महिने डोक्याच्या  आणि शरीराच्या  मरणप्राय वेदना सहन करत राहिली.  आणि तिच्या सोबतीने तिची चिमुकली सुद्धा  सफर होत राहिली......
अनुराग वयवर्ष १८ च्या घरात, सरळ मार्गाने वागणारा ..परीक्षेच्या तयारीसाठी संपूर्ण वर्ष मरमर करत अभ्यास करणारा अनुराग ..संध्याकाळी क्लासवरून घरी निघालेला...सकाळ पासून उपाशी, पोटात भुकेने कावळे ओरडत होतेत.. तसे आईला फोन करून सांगितले होते... .. आई सुद्धा घरी आतुरतेने वाट पाहत होतीच .....कुणाच्या तरी क्षणिक आनंदाखातर भरधाव वेगात घेऊन जाणार्या आणि मस्तीच्या धुंदीत सिग्नल तोडून पळू पाहणाऱ्या बाइकच्या आवाक्यात आला...अतिशय हुशार आणि भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारा अनुराग तीन महिने कोमा मध्ये होता..अनेक ठिकाणची हाड तुटलेली..अनेक लाइफ़ सेविंग ऑपरेशन नंतर अनुराग जीवाने वाचला पण त्याचा स्मृतीभश झाला..आजही अनुराग नीट बोलू शकत नाही आपण बोललेले त्याला कळत नाही, क्षणात आपली माणसं तो ओळखतो तर क्षणात तीच लोक अनोळखी असल्या सारखा वागतो...त्याच्या अभ्यासच आणि भविष्याच काय झाल असेल हे तर वेगळे सांगणेच नको....
आताच परवा परवा शंकर नगर मध्ये दोन तरुणांना आपल्या चारचाकी गाडीखाली तुडवणारया दोन तरुणी कदाचित बेल वर सुटून घरी पालकांसोबत परत नॉर्मल आयुष्य जगू लागल्या असतील  पण त्या दोन तरुणांच्या घरचे मात्र कायमचे त्यांच्या अपत्यांना मुकले...त्यांचे दुःख बोलून दाखवण्या इतके सोप्पे तर नक्कीच नाही...
वर्षभरापूर्वी असेच दहा दिवसा पूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा दोन चाकी गाडीखाली येउन मृत्यू झाला...पोरगा जीवाने गेला आणि नवे स्वप्न डोळ्यात साठवून आलेल्या त्या नव्या नवरीवर काय आघात झाले असेल कल्पना सुद्धा करवत नाही.....शाळेतून परत येणाऱ्या ६-८ वर्षीय दोन सक्ख्या बहिण-भावांना गाडीने धडक देऊन त्यांचा अंत आणणाऱ्या त्या इसमाला खरच काहीच वाटत नसेल का आज...त्या दोघांचे आई-वडील मात्र कसे दिवस रेटत असेल विचार सुद्धा भयंकर वाटतात.....
कस असतं ना....कुणाच्या तरी मस्तीसाठी, क्षणभर दाखवू पाहणाऱ्या स्टाईल साठी किंवा मग क्षणभर होणार्या विलंबासाठी कोणता दुसरा जीव कायमचा लाचार,अपंग होतो..वेदनेच्या गर्तात जन्मभर डुंबून जातो, त्यांच्या भविष्याचे स्वप्न धुळीला मिळतात किंवा काही कायमचे आपल्या माणसांपासून दूर निघून जातात......छोट्याश्या मस्तीने त्या चालकाला तरी काय मिळवून दिले ना?? अश्या प्रसंगानंतर कुणीही स्वस्थ, शांत जीवन जगू शकत असेल काय ?...
मित्रांनो...आपल्या आई-वडिलांनी महेनतीच्या पैशात आपल्याला घेऊन दिलेली वाहने आपल्या सोयीसाठी आहेत....कोलेजला, क्लासेस ला, कामावर जातांना आपल्याला त्रास होऊ नये हा त्यांचा उद्देश...पण आपण कुठेतरी भावनाशुन्य होऊन वागू लागतो, वेगळेपणा दाखवायला, स्टाइल म्हणून किंवा इम्प्रेशन टाकायला आपण जे करतोय त्याने कुण्या चिमुकल्याचा..एखाद्या आईचा किंवा कुणाच्या एकुलत्या अपत्याला जीव गमवावा लागावा हि अतिशय दयनीय, निंदनीय आणि दुखद घटना आहे...अशी घटना आपल्या हाताने घडावी??..आपण सुद्धा अशा घटनेनंतर सुखाने जगू शकत नाही.....म्हणूनच आपण काळजी घेतली पाहिजे...आपले तारुण्य, अंगात असलेल्या कला आणि स्टाइल चांगल्या कामासाठी वापरावी पण ज्यात कुणाचे नुकसान होणार असेल...कुणाला वेदना मिळणार असतील अश्या देखाव्यात काहीही मोठेपणा नाही हे समजून घेतले पाहिजे ....
तुमची इतरांबद्दलची संवेदनशीलता, नम्रता, प्रेमळ स्वभाव आणि केअरिंग असणेच तुमचे वेगळेपण सिध्द करते ...हे असे असणे म्हणजेच तुम्ही नुसते वेगळे नाहीतर चांगले सुद्धा आहात आणि यातूनच इतरांवर इम्प्रेशन पडत असतं ....चांगुलपणाचे इम्प्रेशन लास्टलॉंग ठरत असतं ...तेव्हा स्टाइलीश होण्यापेक्षा केअरिंग होऊया ...सुपरफास्ट होण्यापेक्षा संवेदनशील आणि नम्र होऊया.....अस वागणंच  आपलं वेगळेपण आणि आपले संस्कार सिध्द करतील आणि समाजात होणारे अपघात किंवा इतर अनेक चुकीच्या गोष्टींचा पायंडा न बसता चांगल्या संस्कारित गोष्टींचे बीज रोपण आपल्या तरुणांच्या हातून घडत राहील........मोठे लोक सांगतात ते ऐकतांना समजून न घेतल्यास ते समजण्यासाठी एखादा अनुभव घडून यावा असे घडणे हिताचे नाही....हे आपल्या हाताने घडणे किंवा मग आपल्याच बाबतीत घडणे दोन्ही बाजूने दुखदच आहे....तेव्हा या वळणावर थांबून जरा विचार करूया आणि आत्ता याक्षणापासून समजून उमजून वागूया.........   


(सकाळ 'युवा' च्या विदर्भ आवृत्तीत दि. ०१ एप्रिल १४ ला प्रकाशित माझा लेख) 

मोठ्ठ होण …. म्हणजे !!



शेजारच्या घरी गेले दोन दिवस तणाव दिसत होता…शुभम पण जरा फुगलेलाच होता रोज मजल्यावर खेळायचा तो कालपासून दिसलाच नाही … काय होतंय कळत नव्हते पण विचारणार कसे ?…. रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या घरात आवाज वाढला. शुभम च्या आईचा रडायचा आवाज येत होता आणि त्याच्या बाबांची त्याला आणि त्याच्या आईला उद्देशून बडबड सुरु होती…. असे कधीही यापूर्वी त्यांच्या घरी झाले नव्हते… माझा धीर सुटलाच जेव्हा शुभम धाडकन दरवाजा आदळून घराबाहेर पडला आणि तंनतनत  एवढ्या रात्री घरातून चालता होऊ लागला … नेमकं काय होतंय हे विचारायला मी त्यांच्या दरवाजावर थाप देणारच होते तोच शुभम बाहेर पडतांना दिसला आणि त्याच्या मागाहून त्याची आई डोळ्यात अश्रू घेऊन…शुभम तनफनत निघून जाणार तोच मी त्याचा हात धरला आणि त्याच्या आईकडे प्रश्नार्थक नजर टाकली…. 'अग बघ न हा कस वागतोय आमच्याशी …. काल पासून जेवला सुद्धा नाहीये ' एवढच बोलून त्यांनी डोळ्याला ओढणी लावली….
मी नजेरेनेच वहिनींना शांत होण्यास सांगितले आणि शुभम चा हात धरून माझ्या घरात घेऊन आले …. आतून दार लावून घेतले…. शुभम अजूनही रागाने संन होता माझ्या इशाऱ्यावर तो बसला सोफ्यावर काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हताच, मी पाणी आणले तो नाही म्हणाला तरी प्यायला सांगितले…. पाणी पिउन थोडा शांत झाला पण बोलायला तयार नव्हता …. 'काय खातोस? जेवलास का? का जेवला नाहीस? तुझ्या आवडीची पनीर भुर्जी केलीये जेवणार का?' अश्या साध्या साध्या बोलण्या नंतर शुभम जरा नॉर्मल झाल्याचे जाणवले…. त्याने थोड खाउन घेतले आणि धीर सोडून मी विषयाला हात घातलाच….

शुभम ने यंदा दहावीची परीक्षा दिली होती पुढल्या वर्षात कुठल्या क्षेत्रात पाउल टाकायचे, कोणत्या कॉलेजला जायचे हि सर्व आपल्या आईबाबांचे टेन्शन्स असे समजणारा शुभम…. त्याला स्मार्ट फोन सारखा लेटेस्ट अड्वांस फोन हवाय म्हणून दोन दिवसांपासून हट्टाला पेटला होता …. एवढ्या लहान वयात हे सर्व नको नाहीतर त्याचे अभ्यासातून लक्ष कमी होईल म्हणून मुलांचे असे लाड पुरवायचे नाही इति शुभम चे बाबा …. आणि आई दोन्ही बाजूने कोंडी झाल्याने भ्रमात अडकलेली ……

'अरे पण शुभम स्मार्ट फोन वगैरे हवाय कशाला रे एवढ्यात… तुला आता पुढे वेळ तरी कितीसा मिळणार? .... क्लासेस, कॉलेज आणि अभ्यास खूप काही असेल करायला फोन हवा पण सध्या साधा फोन वापर वेळ आली कि देतील रे बाबा स्वतःच घेऊन ' इति अस्मादिक
शुभम ' असं कसं म्हणतेस माझ्या सर्व मित्रांकडे महागडे फोन आहेत शिवाय आईपाड, घरी पर्सनल लापी हे सगळं वेगळं…माझाकडे साधा स्मार्टफोन असू नये …. मी मोठा झालोय आता कधीपर्यंत मोठ्यांचच ऐकायचं ?'

'मी मोठा झालोय … किती काळ मोठ्यांचच ऐकायचं?" त्याच्या या प्रश्नाने मी जरा स्तिमितच झाले...
मोठे होण्याच्या या मुलांच्या कल्पना किती भ्रामक आहेत …
मोठे होणे म्हणजे फक्त मनासारख्या वस्तू बाळगणे, हक्क गाजवणे, मोठ्यांचे ऐकायचेच नाही किंवा मग रागराग करणे एवढाच होतो ?
मोठेपणाला आलेल्या जवाबदार्या, निभावायला लागणारे कर्तव्य, वागण्यातला मेचुअर पणा हे काहीच यांच्या लेखी महत्वाचे नाही ?

आमच्याच सोसायटीची श्रुती तिचाही नूर वेगळाच होता…. मोकळे केस, घुटण्यापर्यंत स्कर्ट हाताशी गाडी आणि सतत मोबाइल
ला चिकटून आईने जरा काही सांगायला गेले कि 'तुला यातलं काय कळतंय… तू तुझ काम कर… मी आता लहान राहिलेले नाही मला कळतं मी काय करायला हवं ते ' असा सूर …. वेळी अवेळी मित्र-मैत्रिणींचे फोन … मुलगी घरात असूनही आई सतत एकटी पडलेली आणि मुलगी घरात एकटी बसलेली असली तरी सतत फ्रेंड्स ने घेरलेली ……

कपड्यांवर आक्षेप घेऊ नये म्हंटले तरी कपड्यांमधून आलेल्या कल्चर वर वागण्यावर आक्षेप आहेच ना ? आणि का असू नये …. आपण अश्या युगाची, अश्या संस्कृतीची कल्पना तरी केली होती का ?….  कुठे जात आहोत आपण?? विकासाकडे, प्रगतीकडे कि पुन्यांदा अधःपतनाकडे …. प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर,त्यांच्या जीवनशैलीवर तोपर्यंत कुठलीही तक्रार उठू शकत नाही जोपर्यंत ती मर्यादेच्या अखत्यारीत असेल… यात युवा पिढीही आलीच …. आता प्रश्न हा पडतो कि मर्यादा आखल्या आहेत कुणी ? माणसांनीच ना ? मग ते म्हणाले तसेच का वागावे ?

नाही मर्यादा या सहजासहजी कुणीतरी आले आणि आखल्या अस झालेलं नसतं वर्षानुवर्ष आलेले अनुभव त्यातल्या अडचणी चुकीचे परिणाम आणि त्यातून भोगाव्या लागलेल्या शिक्षा हे पाहता आपोआप पडत गेलेला पायंडा असतो …. आणि हाच पायंडा बरोबर आहे हे सांगणारे अनेक जिवंत, अनुभवी उदाहरणे आपल्या अवती-भोवती बघायला मिळतात. ….
हे आजच्या तुमच्या आमच्या पिढीने समजून घ्यायलाच हवे... 

आपल्या पालकत्वाचा अधिकार न गाजवता व्यापक दृष्टीने समाजाकडे बघण्याची वेळ आली आहे … आजच्या काळानुरूप मुलांच्या गरजा ओळखून पण चांगल्या वाईटाची ओळख योग्य वेळी योग्य वयात मुलांना व्हावी यासाठी पालकांनी दृष्टीकोन बदलावा आणि बऱ्या - वाईटाची, योग्य - अयोग्यतेचि समज परिपक्व व्हावी यासाठी मुलांनी देखील त्यांच्या दृष्टीकोनाची बाजू पालटून पहावी …. अपटूडेट राहन्यासाठी निव्वळ भंपक कपडे अन वस्तू कारणीभूत नसतात त्यासाठी त्या लेवल ची समज अन एडजस्टमेंट करण्याचे कसब अंगी भिनले पाहिजे …

Maturity maturity म्हणतात ती दिखाव्याने येत नाही त्यासाठी समजदारी आणि बुद्धीचा योग्य ताळमेळ हवाच …. पण त्याही आधी पाल्य आणि पालकांमध्ये संबंधांचा योग्य ताळमेळ असणारा पूल बांधायला हवा …एकमेकांपर्यंत पोचणारा …त्यापलीकडे पार न करता येणारा …. नाही का ??    



(सकाळ 'युवा' च्या विदर्भ आवृत्तीत दि. २२ जुलै १३ ला प्रकाशित लेख  )

Tuesday 17 June 2014

लग्न :- सर्वांग सुंदर सहप्रवास


लग्न म्हणजे दोन जीवांचा दोन मनांचा दोन परिवारांचा आनंद सोहळा. दोन संस्कृतींना एकत्र एका धाग्यात बांधू पाहणारी समाजाने निर्माण केलेली व्यवस्था. लग्न दोन भिन्न विचारधारांना सामंजस्याने एकाच वाटेवरून चालायला लावणारी आयुष्याची पायवाट. हिंदू संस्कृतीप्रमाणे सोळा संस्कारातील एक संस्कार.  स्त्रीपुरूषांमध्यें कायदेशीर प्रकारानें पतिपत्नीचें नातें निर्माण करून त्यांच्यामधील शारीरिक, धार्मिक व नैतिक संबंध निश्चित करणारी पध्दति म्हणजे विवाह होय. विवाहानंतर दोन लोकं एकत्र येतात एकत्र जगू लागतात त्यातून कुटुंब तयार होतं आणि समाजाचा प्रवाह अखंड रीतीनें वाहता राहण्यास मदत होते. पण म्हणून लग्न म्हणजे काही निव्वळ सामाजिक आणि शारीरक अनुबंध मात्र नाहीये. विवाह म्हणजे निव्वळ स्वप्नील, सुंदर,रम्य आयुष्य नाही प्रत्येक मनुष्यात उणीवा आहेत कुणीही परिपूर्ण नाही आणि या उणीवा समजून घेऊन एकमेकांच्या अपुर्णत्वाला आपल्या गुणांनी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे हीच लग्नाची खरी सुंदरता.  विवाहानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्या अनुषंगाने ग्रहण करावयाची समजदारी 'लग्नसंस्थेचा' हा मुख्य गाभा आहे. वरवरचं रंग-रूप, पैसा श्रीमंती या सर्वांनी संपूर्ण आयुष्य सुखमय होऊ शकत नाही. आयुष्याला हवी असते ती अंगीभूत गुणांची संपत्ती संस्काराची शिदोरी ती भरून असेल तर कृत्रिम आणि तात्पुरत्या सुखाचा हंडा स्वबळावर भरायला वेळ लागत नाही. म्हणून लग्नाच्या मंडपात आधी या गुणांना पारखून घेणे महत्वाचे आहे.       

 कधीतरी प्रत्येकाला लग्न करायचंच असतं तसा अलिखित नियमच आहे जगायचा इथे . मग कुणाबरोबर तरी जीवन घालवायचेच असेल आणि त्या व्यक्तीच्या गुण-दोषाबरोबर जगायचेच असेल तर ते गुण आणि दोष पारखून घेऊन का निवडू नये ? कुठल्या तरी दोषांबरोबर तडजोड करायचीच असेल तर ते असे असावेत ज्यामुळे अगदीच संपूर्ण आयुष्यावर फरक पडणार नाही. किंवा असे गुण स्वीकारू नयेत जे काही दिवसात संपुष्टात येणार असतील. आणि मग आयुष्यभर पस्तावण्याची वेळ येईल. एखादा व्यक्ती  फार श्रीमंत नसेल, फार देखणा नसेल तरीही आयुष्य चालू शकेल पण देखणं असूनही चरित्र्यशिल नसेल, व्यसनी असेल तर मात्र त्या तात्पुरत्या टिकणाऱ्या गुणांशी आयुष्य निभावणं कठीण होऊन बसतं. 

असं म्हणतात लग्न जुळवतांना मुलाचा खिसा पहिला जातो आणि मुलीचा चेहेरा. पण हे जरा विनोदीच नाहीये काय ? मुलाच्या खिशात आज असणारा पैसा आणि मुलीच्या चेहेर्यावर आज दिसणारं सौंदर्य चिरकाळ आहे ह्याची काय शाश्वती ? उद्या मुलाचा पगार वाढत जाणार आणि मुलीचे सौंदर्य ढळत, किंवा कदाचित अगदी ह्याच्या उलटही घडू शकेन,  मग पुढे काय ?? मग काय बघावं तर 'अंगात रग' असणारा पुरुष जो कधीही कुठेही गेला तरी निदान आयुष्यात कधीही रस्त्यावर येऊ देणार नाही, दोन वेळचं जेवण मिळत नाहीये निदान अशी वेळ, अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही.अगदी काहीही झाले तरी पुरुषी आधार बनून पूर्ण साथ देईल. आणि पुरुषानं स्त्री मध्ये काय बघावं तर 'समाधान' कमी जास्त कुठल्याही परिस्थितीत स्वतः तग धरून उभी राहून सोबत करणारी अन परिवार सावरून घेणारी अशी जीवनसंगिनी. 

 याबरोबर दोघांचेही शिक्षण महत्वाचे. आपल्या देशात मुलं नौकरी मिळावी आणि त्या नौकरीच्या भरवशावर चांगली मुलगी मिळावी म्हणून शिकतात तर मुली चांगली नौकरी करणारा, शिकलेला मुलगा मिळावा म्हणून शिकतात. खरच शिक्षणाचं एवढंच मोल आहे, एवढंच औचित्य ?? शिक्षण स्वतःकरता घ्यायचं आहे स्वतःला अधिकाधिक प्रगल्भ बनवण्यासाठी आणि झालंच तर पुढे आपल्या हातून घडणाऱ्या नव्या पिढीला वैचारिक आणि बौद्धिक दृष्टीकोन देता यावा या उद्देशाने शिक्षण घेतलं तर शिक्षण घेतल्याचे उद्देश कधीच संपुष्टात येणार नाही औचित्य संपणार नाही. घेतलेलं ज्ञान सतत स्वतःस आणि पर्यायाने समाजास कामी येत राहील किंबहुना वाढीस लागत राहील.     

विवाह जुळल्यानंतर घरातली मोठी मंडळी अनेक कामांच्या तयारीला लागतात. विवाह किती धुमधडाक्यात करायचा, किती किती आणि कोणा कोणाला बोलवायचं, लग्नाचा हॉल, दागिने , मुला-मुलीचा कपडा, डेकोरेशन सगळंच कसं उंची आणि तोलामोलाचं असावं, जेवणाचे पदार्थ किती जास्तीत जास्त आणि वेरायटी असावेत हे आणि काय काय पण या सर्वांवर वेळ आणि पैसा घालवतांना हीच मोठी मंडळी मुलांचे पुढले आयुष्य कसे चांगले जावे, त्यांनी एकमेकांना किती आणि कसे समजून घ्यावे, आल्याच अडचणी तर त्यांना कसे सामोरे जावे? एकदिवसाच्या धुमधडाक्याच्या पलीकडे आयुष्य एकमेकांसमवेत जास्तीत जास्त सुखी आणि आनंदी करण्यास काय प्रयत्न करावेत आणि त्याहीपलीकडे लग्न ग्रेसफुली कसे टिकवावे या सर्व बाबी बोहल्यावर उभ्या मुला मुलींना सांगण्यास पुढे होऊ धजतात काय ?? या सर्व गोष्टींचा जरा थांबून विचार करायला हवा नुसतेच लग्न लावून देऊन मोकळे होता येत नाही. जबाबदारीने जबाबदारी निभावायला शिकवणे हि सर्वात महत्वाची जबाबदारी दुर्लक्षित राहू नये यासाठी प्रयत्न केले जायलाच हवे. 

सरते शेवटी काय तर विवाहात उपस्थित इतर सर्व मातृतुल्य पितृतुल्य आणि मित्र मंडळी हे शुभेच्छा अन सदिच्छा देण्यासाठीच आलेले असतात. उभयंतानी आता पुढील आयुष्यात अतिशय आनंदपूर्ण सहजीवन घालवावं हा एकमेव उद्देश सर्वांच्याच मनात असतो त्या सदिच्छा मनात साठवून आणि या संपूर्ण आनंदाचा ठेवा कुपीत घेऊन वर-वधूंनी नवं आयुष्याची आनंदाने सुरुवात करावी स्वत्व जपूनही जोडीदार आणि परिवार यांच्यात संपूर्ण एकांगी होऊन एकत्र जीवनाला नवा आयाम द्यावा… दोघांच्या मध्ये कुठेही अहं भावना न येऊ देता अहंकार आणि स्वार्थ यांना दूर दूर पर्यंत स्थान न देता सहजीवन सुखकर करण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत राहायचा. विवाह म्हणजे एका दिवसाचा उत्साही उत्सव नाही तर आयुष्यभरयाचा सर्वांग सुंदर सहप्रवास आहे. या प्रवासाठी उत्सुक असणाऱ्या किंवा निघू घातलेल्या सर्व प्रवास्यांना मनःपूर्वक शुभेच्छा .   


(सार्वजनिक विवाह संस्थेच्या नागपूर आवृत्तीतून प्रकाशित लेख)

मेरा कुछ सामान …काही गुलजारमय लम्हे !




मेरा कुछ सामान …काही गुलजारमय लम्हे !


स्वतःच्या खऱ्या नावाला सार्थ करून दाखवणारे कमीच असतात, नाही? पण नसतात असे नव्हेच…. सम्पूर्ण सिंह कालरा जन्म १८ ऑगस्ट १९३६ ज्यांना आपण गुलजार नावाने ओळखतो. त्यांचा जन्म अविभाजित भारताच्या पंजाब मधील झेलम जिल्ह्यातील 'दिना' गावचा जे आता पाकिस्तानात आहे. अनेक पुरस्कारांचे, सन्मानांचे मानकरी ….गुलजार यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्याही मोठी आहे. पद्गमभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. शिवाय तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार व चौदा वेळा फिल्मफेअर पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आले . म्हणूनच म्हणावेसे वाटते, तुम्ही तुमच्या नावाला जागलात गुलझारजी, सार्थ करून दाखवलंत….  तुम्हाला 'दादासाहेब फाळके अवार्ड' जाहीर झाला तो क्षणही किती महत्वाचा होता, प्रत्येकाचंं मन पुन्हा गुलजार गुलजार झालं वातावरण गुलजारमय होऊन ओठ गुणगुणायला लागले होते. तुमचे नाव जरी घेतले तरी प्रत्येकाला त्यांचे त्यांचे ते भारावलेले दिवस आठवतात आणि मन स्वप्नील दुनियेत रममाण होत जातं. एखाद्याची जादू तनामनावर राज्य करतेय 'जाने कीस सदि से'… तुम्हाला ऑस्कर मिळाला त्याचाही आनंद झाला होताच पण आपल्या देशातला हा सर्वोच्च अवार्ड आपल्या आवडत्या कलाकाराला मिळावा यातला आनंद शब्दातीत आहे.

मानवी भावभावनांचे स्पंदन त्यांच्या लेखणीतून असे काही उतरते कि "सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो... प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो..हमने देखी है उन आंखों कि महेकती खुशबू" सुंदर कल्पना आणि सुरेख शब्दांची मेजवानी वर्षानुवर्ष अनुभवून आताशा गुलजार देशाच्या नसानसात भिनले होते, नाही भिनले आहेत आणि तसेच भिनले राहतील आणि असाच हृदयस्पर्शी मनोरंजनाचा तोहफा देऊन जगणे सोपे सुंदर करण्यास मदत करत राहतील. त्यांच्या शब्दात रंग आहे, गंध आहे, त्यांच्या शब्दांचे बादल बनतात, शब्दांतून तितलियां उडतात, प्रेयसीला ते गुलमोहर संबोधतात तर कधी फुल. गुलजार लिहित नाहीत ते जाणीवा जागृत करतात. एखाद्या व्यक्तीने काय काय करावं प्रत्येकाच्या मर्यादा असतातच हो, पण काहींना विशिष्ट शक्तींच प्राप्त असावी का ? कविता, कथा, दिग्दर्शन, गीत लेखन, गझल आणि हो 'खराशे'सारख्या नाट्यसंहितादेखील लिहाव्या हा चमत्कारच नाहीये का? त्यांनी दिलेला हा प्रचंड मोठा सुंदर खजिना आपल्याला अनेक कठीण मार्गातून मार्गक्रमण करतांना साथ देत आलाय, मरगळलेल्या मनाला पुन्हा फुलवून जगण्यासाठी बाध्य करत आलाय.

'जाने क्या सोचकर नही गुजरा, एक पल रातभर नही गुजरा' , ' दिल धुंडता है फिर वही फुरसत के रात दिन' किंवा मग'कहीं किसी रोज यूं भी होता, हमारी हालत तुम्हारी होती,जो रात हमने गुजारी मरके वो रात तुमने गुजारी होती
बडी वफा से …'
प्रत्येकाच्या मनातली अस्वस्थता अशी स्पष्ट शब्दात मांडायचे कसब असू दे किंवा मग साधारण माणसांची काल्पनिक स्वप्न सत्यात उतरवावे असे हृदयस्पर्शी गीत गुलजारची लेखणी तुमच्या आमच्या मनातल्या वाटेने प्रवास करत असावी किंवा मग तुमच्या आमच्या विचारांच्या शाईने भरली जात असावी इतकी ती आपली वाटते.

दिल दर्द का टुकड़ा है, पत्थर की डाली सी है
एक अँधा कुवा हैं या, एक बंद गली सी है
एक छोटा लम्हा हैं , जो ख़त्म नहीं होता
मैं लाख जलाता हूँ, वो भस्म नहीं होता



माचिस फिल्म चे हे गाणे 'छोड़ आए हम वो गलियाँ'  एकेकाळी प्रचंड गाजलेले. आजही मनाचा ठाव घेते. आणि अश्या सोडून दिलेल्या अनेक घटना मग आठवत राहतात. त्यांच्या शब्दात जादूच तशी आहे. 'चांद' हि गुलजार साहेबांची लाडकी उपमा त्यांच्या बऱ्याच गीतात तो कुठूनतरी झाकून बघतांना दिसतो, जाणवतो. अनेकांनी तर गुलजार आणि चांद असे समीकरणच असल्याचे संबोधिले आहे. चंद्राशी हे गुलजार चे नाते इतके जवळचे कि चांद म्हणजे लज्जा, चांद म्हणजे दिवा, चांद म्हणजे आत्मीयता आणि चांद म्हणजेच गीत सुद्धा….

'बदली हटा के चंदा, चुपकेसे झांके चंदा...'

जसे 'चांद' शी नाते तसे पाण्याशीही
'खामोश सा अफसाना पानी पे लिखा होगा, ना तुमने कहा होगा ना हमने सुना होगा' हे गीत असू दे किंवा मग जगजीत सिंग सारखा मित्र गमावल्यानंतर लिहिलेला शायराना अंदाज.

'आदमी बुलबुला है पानी का
और पानी की बहती सतह पर टूटता भी है, डूबता भी है,
फिर उभरता है, फिर से बहता है,
न समंदर निगल सका इसको, न तवारीख़ तोड़ पाई है,
वक्त की मौज पर सदा बहता'



आहह! काय ते शब्द आणि कसल्या त्या प्रतिमा आणि उपमा फिल्मी गैरफिल्मी गझल, नज्म नाही तर 'कजरारे कजरारे' किंवा 'नमक इश्क का' सारखे आयटम सॉंग अगदी त्यांनी लिहिलेल्या त्या विशिष्ट जाहिराती सुद्धा त्यांनीच लिहाव्यात इतरांचे कामच नाही, काम सोडाच कम्पेरिझनच नाही. प्रत्येक नव्या कामातले नाविन्य आणि स्वतःचे वेगळेपण त्यांनी ठायी ठायी जपले आहे. आणि दिग्दर्शनाबद्दल तरी काय बोलावे एकसे बढकर एक संहिता माचिस, हुतुतू, आंधी, मौसम, अचानक, अंगूर, लेकीन, मेरे अपने, खुशबू, किनारा जेवढी नावं तेवढे विविध विषय तशी हाताळणी आणि म्हणूनच त्यांचा प्रत्येक सिनेमा गर्दी बाहेरचा ठरतो आणि पाहणाऱ्यांच्या आठवणीत जाउन विसावतो. त्यांच कुठलंही गीत नसावं तुम्ही आम्ही ऐकले नाहीये एकदा नाही अनेकदा. काही गाणी तर अजरामर गटातलीच ' मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' या गाण्याने तर सगळे रेकॉर्ड तोडले असावे इतके ते वाजले आणि गाजले. सगळ्याच पिढीला स्पर्श करणारे.

'एक सौ सोलह चांद की राते
एक तुम्हारे कांधे का तील...
गिली मेहंदी कि खुशबू
झूटमुट के शिकवे कुछ...!'


हृषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी, बासू भट्टाचार्य या दिग्दर्शकांपासून ...सलील चौधरी, जयदेव, हेमंत कुमार, खय्याम आणि सर्वांत लाडका त्यांचा 'पंचम' आर. डी. बर्मन...यांच्याशी गीतकार म्हणून जमलेली जोडी...आत्ता तीच केमिस्ट्री नवा संगीतकार ए. आर. रहमान आणि विशाल भारद्वाज सोबतही आहे त्यांची. त्यांच्या शब्दांना वेळेचे, काळाचे बंधन नाही. पिढीशी जुळवून घेण्यासाठी धडपड करावी लागत नाही. त्या शब्दातच एक रुहानी ताकद आहे, पाण्यासारखे सगळ्यात मिसळून जाण्याची जादू आहे.

गुलजार साब तुमच्याबद्दल आणखी काय काय बोलावे आणि किती किती, तुम्ही म्हणजे निव्वळ वेड आहात आणि या वेडात जगायची सवय झालीये आताशा. तुम्ही असेच लिहित राहा आणि आमचे आयुष्य अधिक सुखद समृद्ध करत राहा ही सदिच्छा. आमचे जगणे जास्त सोपे अन सुंदर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आम्हाला फार आभिमान आहे तुमचा.

(जुलै 2016 च्या 'एफसी रोड' या डिजिटल मासिकात प्रकाशित लेख) 

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...