Tuesday 10 December 2019

आसमान छुती लडकीया !!




पण एक्केविसाव्या शतकात जगतोय असे सांगतांना अनेकदा उर भरून येतो, हे संगणकाचं युग आहे..तंत्रज्ञानाचं युग आहे. विज्ञानानं आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. तरी या युगात अजूनही अनेक क्षेत्र पुरुषी मक्तेदारीचाच भाग असल्याचे दिसणे किंवा कुठल्याही कारणाने का होईना अजूनही स्त्रिया अनेक पैलूंना स्पर्शू शकल्या नाही तिथवर पोचूच शकल्या नाही, हे ऐकून विषन्न व्हायला होतं. खरतर जिथे भारतीय महिलांना अजूनही सामाजिक हक्कांसाठी सतत लढावं लागतं तिथे इतर अपेक्षा अनेकदा कुचकामी ठरतात. पण गेल्या दोन दशकात महिलांचं कर्तृत्व आणि नेतृत्व परिपक्व होत गेलंय. तिच्या अंगी फार काळ ही ऊर्जा दडपून ठेवणे शक्य नव्हतेच तिच्या पंखांनी भरारी घेणे ठरले होतेच ते आता घडू लागले आहे. महिलांच्या गोटात आनंद पेरणाऱ्या अश्याच दोन बातम्या याच वर्षात कानावर आल्या मे महिन्यात भावना कांत ही भारतीय हवाई दलाची पहिली महिला ऑपरेशनल फाइटर पायलट बनली. जी युद्धाच्या मोहिमेवर जाण्यासाठी आता लढाऊ विमान उडवणार आहे .. तर मागच्याच आठवड्यात सब लेफ्टनंट शिवांगी नौदलाची पहिली महिला पायलट बनली, शिवांगी पाळत ठेवणारी विमाने म्हणजे सर्विलांस एयरक्राफ्ट उडवणार आहे.


ह्यांच्याबद्दल जाणून घेणं प्रेरक आहे -

भावना कांत : भावना नोव्हेंबर २०१७ मध्ये फायटर स्क्वाड्रॉनमध्ये सामील झाली आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये मिग -21 बायसनवर प्रथमच तिने एकटीने उड्डाण केले होते. हे तेच विमान आहे ज्याने विंग कमांडर वर्तमान अभिनंदन ह्याने पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाला मारून पाडले होते. भावना कांत सध्या राजस्थानमध्ये असणाऱ्या पाकिस्तानच्या सीमेवर तैनात आहेत. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील घनश्यामपुर ब्लॉकमधील बाऊर गावची रहिवासी असणाऱ्या भावनानी एमएस कॉलेज बंगळुरू येथून बीई इलेक्ट्रिकलचे शिक्षण घेतले. भावना सामान्य कुटुंबातली असली तरी तिने आकाशापर्यंत उडण्याचे स्वप्न लहानपणापासूनच हृदयाशी बाळगले होते; स्वतःच्या स्वप्नासोबत देशाला गर्व वाटावा असे कार्य तिच्या हातून घडून आले आहे.

सब लेफ्टनंट शिवांगी : सिक्कीम-मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली शिवांगी बिहारच्या मुझफ्फरपूरची रहिवाशी आहे. एखाद्या शिक्षिकेची नोकरी किंवा गृहिणी होईल एवढीच तिच्याकडून अपेक्षा केली गेली होती मात्र, विद्यापीठाच्या प्रवेश योजनेचा एक भाग म्हणून बनविलेले नौदल सादरीकरण करतांना तिच्या उडण्याच्या सुप्त इच्छेला बळ मिळाले. त्यानंतर तिने जयपूरच्या मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये २०१८ साली एमटेकचे शिक्षण पूर्ण केले. मुजफ्फरपूरमधल्या भारतीय नौदल अकादमीमध्ये सहा महिन्यांच्या नौदल ओरिएंटेशन कोर्सनंतर तिने एअरफोर्स अकॅडमी (एएफए) येथे पिलाटस बेसिक ट्रेनरवर उड्डाण करण्याच्या प्रॅक्टिससाठी आणखी सहा महिने प्रयत्न केले. गेल्या सहा महिन्यांपासून कोची स्थित भारतीय नौदल एअर स्क्वॉड्रॉन 550 ज्याला ‘फ्लाइंग फिश’ म्हणून ओळखली जाते तेथे भारतातील नौदल उड्डाणांचे अल्मा मॅटर, डोर्निअर सागरी विमान चालविणे शिकली. कोर्सचा एक भाग म्हणून तिने आतापर्यंत सुमारे 100 फ्लाइंग तास लॉग इन केले आहेत, त्यामध्ये 60 पेक्षा जास्त डॉर्नियर तिने उडवले आहेत.नौदलात सामील होण्यापूर्वी फक्त गोव्याचा समुद्र पर्यटक म्हणून पाहिलेली शिवांगी आता हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) निर्मित ड्रोनिअर 228 सागरी विमान उड्डाण करणार आहे. हे विमान अल्प-अंतराच्या सागरी मिशनवर पाठविले जाते. त्यात रडारवर अ‍ॅडव्हान्स पाळत ठेवणे , इलेक्ट्रॉनिक सेन्सर आणि नेटवर्किंग सारख्या बर्‍याच उत्कृष्ट वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या वैशिष्ट्यांच्या मदतीने हे विमान भारतीय समुद्री भागावर नजर ठेवेल.



शिवांगीचे हे असाधारण यश पाहून तिला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ती म्हणाली होती “विमान उड्डाण करण्यासाठी आपल्याकडे सुपर प्रतिभावान असण्याची गरज नाही, परंतु आपल्याला खरोखर कठोर परिश्रम करण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे,” पुढे ती म्हणाली, “उडणे तुमच्या नैसर्गिक वृत्तीच्या विरूद्ध आहे. म्हणूनच फोकस आणि स्किल सेटचे महत्त्व जास्त आहे”


भावना आणि शिवांगी सारख्या महिलांमुळे इतर महिलांसाठी अनवट वाटा मोकळ्या होतायत, त्यांचं पहिलं पाऊल उमटलं आता या पाऊलखुणा अनेकींना नवनवे मार्ग दाखवतील. महिला ताकतवर आणि हीमतीही असतातच, त्यांच्या पंखांना हवा फक्त द्यायची असते. ते काम या दोघींनी उदाहरणासह करून दाखवलं आहे. आता याही क्षेत्रात महिलांना परचम लहरवता येईल आणि देशासाठी काहीतरी केल्याचं समाधानही मिळवता येईल.. या दोन्ही भारतभूच्या लेकींचे मनभरून कौतुक आणि शुभेच्छा.

- रश्मी पदवाड मदनकर


Saturday 7 December 2019

मामाचं पत्र हरवलं ..





पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र, आणि लिफाफ्यातून येणारी चिट्ठी..... आठवतंय ना ? आपल्या साऱ्यांचंच लहानपण  कुणाला तरी पत्र लिहिण्यासाठी आसुसलेलं किंवा कुणाच्या तरी पत्राची वाट पाहण्यात अस्वस्थ झालेलं गेलं आहे. या पत्रांना सांभाळून त्या त्या काळच्या सगळ्या आठवणी जपणं किती सहज सुंदर असायचं .. मग कधीतरी जुनी पत्र काढून वाचण्याचा आनंद तर अवर्णनीय आहे.  पत्राचं काय महत्व असतं ते आपल्या पिढीला तरी वेगळं सांगावं लागणार नाही. दारात आलेलं पत्र पाहिलं कि आनंद व्हायचा.
आज दारात फक्त बिलं येतात किंवा नोटीस. व्हाट्सॲप किंवा सोशल नेटवर्किंगने जग इतकं जवळ आणलाय की जवळच्या माणसांबद्दल काहीच वाटेनासं करून टाकलंय. आपण एकमेकांशी साधलेला संवाद पुढे कधीतरी ५ वर्षांनी वाचावासा वाटलं तर ? जितके पटापट मेसेज करता येतात तितकेच पटापट ते संपुष्टातही येतात..कुठलेही नामोनिशाण न ठेवता .. म्हणूनच पूर्वी या भावना नात्यांना एकमेकांशी बांधून ठेवायच्या आता बांधून ठेवायला लागणाऱ्या शब्दांचा ओलावा उरतंच नाही आणि म्हणून नात्यांचाही ओलावा हल्ली तात्पुरता झालाय.

पूर्वी पत्र कुणी कुणाला लिहायचे तर प्रेयसी प्रियकराला, लेक माहेराला, शिष्य गुरूला, मित्र एकमेकांना अगदी कुणीही कुणाला ... ''मामाचं पत्र हरवलं, तेच मला सापडलं'' असा खेळ खेळायचो आम्ही आमच्या लहानपणी त्या खेळातूनही आलेलं पत्र हरवलं म्हणून किती शोधायची धडपड चालायची.  अश्या या पत्रांचं अनन्यसाधारण महत्व ओळखून पुढे ही पत्र साठवली जाऊन प्रकाशित होऊ लागली. संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी, स्वामी विवेकानंदांची तर कितीतरी पत्रं, महात्मा गांधींनी ॲनी बेझंटला, आचार्य विनोबा भावेंना लिहिलेली पत्रं,मग हल्लीच्या कवी अनिल आणि कुसुमावतींची पत्रं आणि अमृता प्रीतम आणि इमरोजची पत्रं ही पत्रं साहित्यप्रेमींच्या काळजाचा ठाव घेणारी ठरली. पुष्टी रेगेंच्या सावित्रीने तर साहित्य रसिकांना भुरळच पाडली होती.

पत्र व्यक्तीच्या आयुष्याचा आरसाच तर असतो जणू.
प्रेमचंद म्हणतात ''पत्र-साहित्य का महत्त्व इसलिए है कि उसमें ‘बने-ठने, सजे-सजाये’ मनुष्य का चित्र नहीं, वरन् एक चलते-फिरते मनुष्य का स्नैप शॉट मिल जाता है, लेखक के वैयक्तिक सम्बंध, उसके मानसिक और बाह्य संघर्ष तथा उसकी रुचि और उस पर पड़नेवाले प्रभावों का पता चल जाता है. जिन पत्रों के विषय और शैली दोनों ही महत्त्वपूर्ण हों, वे साहित्य की स्थायी सम्पत्ति बन जाते हैं और इस सम्पत्ति पर पाठक भी गर्व करते हैं!

याच भावभावनांचा संचय करायला पत्र वाङ्मयाची सुरुवात झाली असावी. साहित्यात आज पत्र वाङ्मयाचे एक अनन्यसाधारण महत्व आहे. पूर्वी प्रकाशित होणाऱ्या पत्रिकांसाठी जी पत्रं यायची त्या पत्रांनाही साहित्यिक स्पर्शअसायचा व ती साठवली जायची, जसजसे साहित्यिकांमध्ये आत्मभान यायला लागले ते दिवंगत झालेल्या साहित्यिकांच्या पत्रांचे संकलन करून प्रकाशित करू लागले. हिंदी साहित्यात या परंपरेची प्रथम सुरुवात  पं. बनारसीदास चतुर्वेदी यांनी केली त्यांनी पत्रलेखनाचा जणू ध्यासच घेतलाआणिकही लेखकांसमवेत पत्रलेखन मंडळाची स्थापना केली. उर्दूतही अनेक पत्रसंग्रह आहेतच. सर्वप्रथम उर्दूतले संकलन रजब अली बेग ‘सरूर’ यांचं प्रकाशित झालं पण मिर्ज़ा गालिब यांचे खतूत प्रकाशित झाल्यानंतर तर अनेक पत्रसंग्रह येत राहिले. कराचीवरून प्रकशित होणारे 'नकुश'१९५७ नोव्हेंबरच्या अंकात १०४० पानात १५५ प्रसिद्ध व्यक्तींचे ३००० पेक्षा जास्त दुर्मिळ पत्र प्रकाशित झाले होते.

प्रसिद्ध अमेरिकी संत एमर्सन यांच्या पत्राचं संकलन तर जवळ जवळ 32 हज़ार पानांचं आणि पाच खंडांमध्ये व्याप्त आहे. स्वामी विवेकानंदांनी भगिनी निवेदिताला लिहिलेली तत्व चिंतनपूर्ण पत्रे असूदेत, स्वामी स्वरूपानंदचे ‘पत्र-प्रबोध’ पुस्तक किंवा ‘प्रेमचंद की चिट्ठी-पत्री... डॉ. वा.श. अग्रवाल म्हणतात - ‘मेरी समझ में किसी व्यक्ति की भारी-भरकम साहित्यिक कृति आंधी के समान है, पर उसके साहित्यिक पत्र उन झोंकों के समान हैं, जो धीरे से आते-जाते रहते हैं और वायु की थोड़ी मात्रा साथ लाने पर भी सांस बनकर जीवन देते हैं.’

मराठेशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत, हे व्यवहार त्या पत्रांमार्फत करीत हि पत्रे हा इतिहासाचा आरसाच तर आहेत. त्या कालचे जगणे-वागणे त्यावेळचा कारभार-राजकारण या पत्रांतून सुस्पष्ट होतो.अस्सल पुराव्याखेरीज इतिहासाच्या नोंदी खऱ्या कश्या मानल्या जाणार. इतिहासलेखनाचे एक विश्वसनीय साधन म्हणून पत्र-वाङ्मयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एकूण मराठी पत्रवाङ्मय विपुल प्रमाणात उपलब्ध असून ५० हजाराहून अधिक पत्रे इतिहास संशोधकांनी आणि विविध संस्थांनी अभ्यासकांना उपलब्ध करून दिली आहेत. तुलनात्मकदृष्टय़ा पाहावयाचे झाल्यास मराठीइतका पत्रवाङ्मय-संभार अन्य कोणत्याही भारतीय भाषेत प्रसिद्ध झाला नाही आणि मराठेशाहीतील स्त्रियांइतका पत्रव्यवहार अन्य-मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही.  शिवमाता जिजाबाई, छत्रपती संभाजींची पत्नी येसूबाई, छत्रपती राजारामांची पत्नी महाराणी ताराबाई, छत्रपती शाहूंच्या राण्या, प्रमुख मराठी सरदारांच्या स्त्रिया, पेशव्यांच्या स्त्रिया यांनी समकालीन राजकारणात भाग घेऊन आपली मते पत्रद्वारा व्यक्त केली आहेत. मुत्सद्देगिरी, असहायता, स्वाभिमान, धर्मपरायणता, राजकीय डावपेच इत्यादी अनेक स्वभावविशेष या स्त्रियांच्या पत्रांतून व्यक्त झालेले आहेत. हा मराठी इतिहासातील पत्रव्यवहार तर बुद्धिभेद करून राजकारण करण्याचे उदाहरण कायम करणारे ठरतात. 

अश्या या पत्रवाङ्मयाचा इतिहास आता संपुष्टात येण्याचे संकेत दिसू लागले आहेत. हल्ली कुणी कुणाला पत्रेच पाठवत नसल्याने हा वाङ्मयीन प्रकारचं भविष्यात बंद होणार असे स्पष्ट जाणवू लागले आहे. आणि निव्वळ हे बंद झाल्याने साहित्याचा तोटा होणार नसून इतिहास समजून घेण्याची पाळंमुळं देखील हलणार आहेत हे निश्चित.


रश्मी पदवाड मदनकर -
२४ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित


Tuesday 3 December 2019

लँड ऑफ होप - अंजा रिग्रेन



बराक ओबामा, पोप फ्रान्सिस, दलाई लामा इत्यादी प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहेऱ्यांना मागे टाकून डेन्मार्कस्थित सामाजिक कार्यकर्ता अंजा रिंग्रिन लोवेन जगातील प्रेरणादायक लोकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आल्या होत्या 'उम' नावाच्या जर्मन भाषेच्या लोकप्रिय मासिकाने ही यादी प्रसिद्ध केली तेव्हा माझाही उर अभिमानाने भरून गेला होता. अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवून शेकडो नायजेरिअन मुलांना जीवनदान देणाऱ्या त्यांच्यासाठी त्यांच्याच देशात राहून जीव ओतून कार्य करीत असलेल्या अंजाची या दिशेने जाण्याची जीवनकहाणी तिच्या सुरुवातीच्या काळापासून मी पाहत आले आहे. काही बोटावर मोजण्याइतक्या प्रेरणा स्थानांमध्ये अंजाचे नाव माझ्या यादीत अग्रगण्य आहे.

हो आता मोठा झालाय... इतर कुठल्याही सामान्य मुलांएवढाच तंदुरुस्त आणि आनंदी दिसतो. कोण आहे हा होप ? ही एका अश्या दुर्दैवी लहान मुलाची कहाणी आहे ज्याला अज्ञान, दारिद्र्य आणि अंधश्रद्धा मानणाऱ्या बेगडी समाजाने मरणासन्न अवस्थेत रस्त्यावरून टाकून दिले होते. दारिद्र्यामुळे जगण्यासाठीचा करावा लागणार संघर्ष, अशिक्षितपणा आणि त्यामुळे समाजातील घसरलेली मूल्य या गोष्टी माणसाला काय काय करायला भाग पाडू शकतात हे पाहिले कि आपल्यासारख्या संवेदनशील माणसांना त्रास होणे साहजिक आहे.. पण बरेचदा आपण हळहळण्याशिवाय काहीच करू शकत नाही. नायजेरियात जादूटोणा केल्याच्या आरोपाखाली दोषी मुलांवर होणारा हिंसाचार आणि अत्याचार ही सामान्य बाब आहे. अश्याच आरोपांनी ओढवलेल्या संकटात त्या चिमुकल्या जीवाला अत्यंत द्वेषपूर्ण वागणूक, छळ आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या .. हे कधी तर अगदी ३ वर्षे वयाचा असतांना. पण अश्या हजारो मुलांमध्ये होप सुदैवी होता ज्याला एका ममतामयी हळव्या महिलेच्या बिनशर्त प्रेमामुळे जीवनदान मिळाले. बचावानंतर लगेचच अंजाने स्वत:चा त्या चिमुकल्या जीवाला पाणी पाजत असल्याचा एक व्हिडिओ सामायिक केला ज्यामुळे मुलाच्या जादूटोण्यांच्या दुःखद समस्येबद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि होपच्या वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी पैसे एकत्रित व्हावे. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आणि होपची कथा लाखो लोकांच्या मनाला भिडली.










30 जानेवारी, 2016 चा तो दिवस होता मूळची डेन्मार्कची असणारी अंजा रिंगग्रेन लोव्हन सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने नायजेरियाच्या गल्लीबोळातून फिरून तेथील परिस्थितीचा आढावा घेत होती. अचानक कुपोषणाने ग्रस्त अतिशय कृश शरीराचा ३ वर्षाचा चिमुकला मरणासन्न अवस्थेत रस्त्यावर फिरत असलेला तिच्या नजरेस पडले. अफगाणिस्तानसारख्या बर्‍याच देशांमध्ये सामान्यपणे प्रचलित असलेल्या ‘जादूटोणा’ सारख्या अंधश्रद्धेवरून तास आरोप लावलेल्या मुलांना स्वतःचेच कुटुंब चक्क मरण्यासाठी म्हणून रस्त्यावर सोडून देतात. त्यावेळी मुलांचा द्वेष द्वेष केला जातो. त्यांना खायला प्यायला सुद्धा दिले जात नाही, त्यांच्या अंगावर कपडे नसतात.. त्यांच्या रस्त्यावरच मारून पडण्याची वाट पहिली जाते. होपचे हेच झाले होते .. तो दिसला तेव्हा चालण्यास अगदीच अक्षम तो आठ महिन्यांपासून रस्त्यावरच राहत होता आणि लोकांकडून फेकल्या जात असलेल्या अन्नावर जिवंत वाचला होता. अश्या परिस्थितीतल्या त्या चिमुकल्याला पाहून अंजाचे मन द्रवले तिने त्याला त्या क्षणी खायला प्यायला दिले आणि उचलून सोबत घेऊन आली. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याचे नाव अंजाने 'होप' असे ठेवले. आज होप ७ वर्षांचा आहे आणि इतर मुलांएवढाच तंदुरुस्त आणि सक्षम आयुष्य जगतो आहे. होपच्या प्रकृतीविषयी बोलताना अंजा म्हणाली होती की 'मी फक्त 20 महिन्यांपूर्वी आई बनले होते. मुलांच्या गरजा आणि आईची माया काय असते हे मला माहित होते, एका छोट्याश्या जीवाचे हाल मला बघवले नाहीत आणि मी त्याला दत्तक घेण्याचे ठरवले'.

होपबद्दल जिव्हाळा वाटणाऱ्या लोकांसाठी होपची सध्याची स्थिती वर्तवणारा फोटो जाहीर करतांना अंजाने 'तो क्षण' पुन्हा क्रिएट करणारा फोटो काढून बिफोर-आफ्टर परिस्थिती दाखवणारे फोटो टाकले आणि पुन्हा एकदा नेटिझन्स नॉस्टेल्जिक होत होप-अंजा च्या प्रेमात पडले आहेत. 






अंजा आणि तिचा नवरा डेव्हिड इमॅन्युएल अश्या दुर्दैवी मुलांसाठी 'आफ्रिकन चिल्ड्रन्स एड एज्युकेशन डेव्हलपमेंट फाउंडेशन' (एसीएईडीएफ) नावाचे अनाथालय दक्षिण-पूर्व नायजेरियात चालवतात, नायजेरियातच राहतात. 'लँड ऑफ होप' या नावाने अंजा एक सोशल मीडिया कॅम्पेन देखील चालवते आहे. या माध्यमातून अनेक नायजेरियन मुलांचे प्राण वाचवून त्यांना चांगले जीवन तिने दिले आहे. या मुलांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि अश्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ती सध्या नायजेरियन सरकारशी लढा देते आहे. अश्या ममतामयीला मानाचा मुजरा.





- रश्मी पदवाड मदनकर



Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...