Thursday 21 June 2018

आज चंद्र विझणार
याचं केवढं अप्रूप केवढा उत्साह
फाटक्या संसाराची फाटकी लक्तरं वेशीवर टांगून
नसणाऱ्या श्रद्धेचा बाजार मांडून
उदास खिन्न रात्रीला.. विझल्या उजेडाच्या
पिकल्या अंधाराचे भांडवल करून
पोटाची खळ बुजवायला मिळणं
हे क्वचित घडतं...कधीतरी ...
तसेही
श्रद्धा-अंधश्रद्धेची..पुण्य-पापाची, देवा-राक्षसाच्या भीतीची
उतरण मिळवून काहिवेळच्या पोटापाण्याची आग विझणार असेल
तर ...
विझता चंद्र-सूर्य येऊ देत दर महिन्याला
कोणाचं काय बरं अडतंय ??

"दे दान तर सुटे ग्रान !!"

रश्मी पदवाड मदनकर
19 jun 18

Saturday 2 June 2018

शेवटी काय ना सगळ्यांचेच पाय मातीचे असतात. आदर्शवत वगैरे असं काही नसतच..म्हणूनच व्यक्तीपुजा मुर्तीपुजेइतकीच फसवी असते. नकोच करायला कुणाचीही.
कानावर पडणारे आणि मनाला भिडणारे स्वर हे खूपदा वेगवेगळे असतात. खरं तर मनाला भिडणाऱ्या गोष्टी व्यक्त स्वरूपातल्या असव्यातच असेही नाही. त्या सोन ओळींमधल्या रिकाम्या जागेसारख्याही असू शकतात, ज्या ना सांगताही कळतात-भिडतात मनात ठाण मांडून बसतात. व्यक्त केलेल्या गोष्टीही बरेचदा दिसतात तश्या असतात कुठे?? ओठांची एखादी तिरकी रेषा, डोळ्यातली चमक किंवा मलूल दिसणारे डोळे, आर्त स्वर, कातर झालेले शब्द, पडलेला-फुललेला चेहेरा, दिलेलं-न दिलेलं स्मित अश्या किती किती गोष्टी असतात पुढच्याच्या मनातलं समजून घ्यायला.. पण मनातलं समजून घ्यायला आधी मन दिसायला हवं आपलं वाटायला हवं, त्यासाठी ते आपलं करून घ्यावं लागतं त्यासाठी आयुष्यातला वेळ-ऊर्जा इन्व्हेस्ट करावी लागते ..दोन्ही बाजूने..ते न देताच फक्त मिळत राहण्याची अपेक्षा फोल ठरणारच. म्हणूनच तर मैत्रीचे नाते असे व्याख्येपलीकडे असते कारण इथे दोन्ही बाजूने समान देवाण घेवाण झालेली असते.....साऱ्याच नात्यात हि इन्व्हेस्टमेंट व्हायला हवी ... ती ती नाती जपायची असेल तर ...  खरया समाधानासाठी....
काही जवळची माणसं चुकताहेत हे दिसूनही
काहीच करता न येणं यासारखी दुसरी हतबलता नसते ..

आपण सर्व प्रयत्न करून थकलो असतो ..
पुढ्ल्यानं ऐकायचंच नाही ठरवलं असेल ...
चुकीच्या मार्गानं जायचंच ठरवलं असेल तर
त्याचे कान आणि पाय धरूनही उपयोग नसतो ..

दूर निघून जाणारयाला बघत राहण्याशिवाय उपाय नसतो ..

सदिच्छा तेवढ्या पाठी पाठी पाठवत राहाव्या ...तेवढं तर हातात असतंच.
अंतर्यामाच्या सागरडोहात ..अथांग खोलात उतरत जाते. तेव्हा आठवणींच्या गडद प्रतिबिंबाशी भेटी होतात. प्रेमाचं हतबलतेशी फार गहिरं नातं आहे म्हणतात, त्या क्षणांशी आत्म्याचे मिलन होतांना अंतरात्म्याची होणारी तडफड थांबवण्याचे धारिष्ट्य कुणातच नसते. या क्षणांचा गंध झिंग रूपात चढत जातो. आत्म्यात झिरपत देहात पसरतो..रोम रोम गंधावत नेतो. त्याक्षणात - गंधात तादात्म पावणार काहीतरी खास असतंच ना ?

 काही क्षणांच्या आठवणींचं व्यसन जडतं रे ...

Rashmi.

(एका दीर्घ ललितलेखाचा छोटा भाग)

विषय !

ते कपाळावर आठ्या आणतात
विचारतात... 
काय गं, तू हेही करतेस
तू तेही करतेस..
दिवसरात्र लगलग करत
बरंच काय काय करत असतेस..
कसंच बाई जमतं तुला ?

ती खमकं हसते ..
उत्तरते...

खरं सांगू,
मला बरंच काय काय करायचं नसतं..
टाळायचंच असतं खरंतर ..
ते करण्याची उर्मी दाटून येऊ नये
आसक्ती उफाळून त्रास देऊ नये
म्हणून
बरंच काय काय करत असते

काही काही विसरायला
काहीबाही आठवत असते. 

विषय आठवून, जमवून करण्याचा नसतोच हो
विषय विसरून हसून जगण्याचा असतो ..
तेच करत असते .. 

रश्मी मदनकर
16 मे 18.
कधी लाट वाटे जरा आपुलीशी
कधी भास तिचा जशी सावलीशी
जरा ओल येतो तुशारात शिंपून
अकस्मात होते जरा बावरीशी

मी .....उभी एकटी बोलते सागराशी !!




Friday 1 June 2018

दुनियेत मुखवट्यांचा सूकाळ फक्त आहे
वठवावयास सोंगे तय्यार तख्त आहे l

मेंदूत खलबते नी ओठात जप हरीचा
बाजार देवतांचा मांडून भक्त आहे

भासे अखंड प्रीती भेटीत आर्ततेच्या
नाती मनामनाची आतून रिक्त आहे l

आहे जरा दिलासा माणूसपण मरेना
किमया खरेपणाची अजूनी सशक्त आहे l

कोणी म्हणे मनीचे सांगून मोकळे हो
जखमा मनातल्या पण, माझ्या अव्यक्त आहे l

रपम / 12.5.18

#मराठीगझल

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...