चंद्रयान-२ च्या यशाच्या मानकरी महिलाशक्ती -
प्र त्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं आजवर ऐकलंय, पण स्त्री केवळ कुणाच्यातरी मागे असते असे नव्हे तर अनेक यशासाठी प्रत्यक्ष कारणीभूतही ठरते. हे लक्षात यायचे कारण म्हणजे भारताचे महत्वाकांक्षी चंद्रयान-२ या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण २३ जुलै रोजी दुपारी २:४३ वा. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून (एसडीएससी) पार पडले ही भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, आणि त्यात या मोहिमेचे नेतृत्व इस्रोच्या दोन महिला वैज्ञानिकांनी केले ही त्यातही प्रत्येकासाठीच अभिमानास्पद असलेली बाब आहे. भारताच्या इतिहासात एखाद्या महिलेने अंतराळ मोहिमेसारख्या अतिमहत्वाच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बा भ बोरकर म्हणतात ''देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे !'' या प्रमाणेच निर्मितीच्या डोहाळ्यांचे रूपांतर सुंदर सोहळ्यात करणाऱ्या या वैज्ञानिक महिलांबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. कोण आहेत या दोघी, तर मुथय्या वनिथा आणि रितू करिधल अश्या चंद्रयान-२ मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला वैज्ञानिक, ज्यांनी या मिशनमध्ये अत्यंत महत्वप...