Wednesday 31 July 2019

चंद्रयान-२ च्या यशाच्या मानकरी महिलाशक्ती -




प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं आजवर ऐकलंय, पण स्त्री केवळ कुणाच्यातरी मागे असते असे नव्हे तर अनेक यशासाठी प्रत्यक्ष कारणीभूतही ठरते. हे लक्षात यायचे कारण म्हणजे भारताचे महत्वाकांक्षी चंद्रयान-२ या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण २३ जुलै रोजी दुपारी २:४३ वा. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून (एसडीएससी) पार पडले ही भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, आणि त्यात या मोहिमेचे नेतृत्व इस्रोच्या दोन महिला वैज्ञानिकांनी केले ही त्यातही प्रत्येकासाठीच अभिमानास्पद असलेली बाब आहे. भारताच्या इतिहासात एखाद्या महिलेने अंतराळ मोहिमेसारख्या अतिमहत्वाच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बा भ बोरकर म्हणतात ''देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे !'' या प्रमाणेच निर्मितीच्या डोहाळ्यांचे रूपांतर सुंदर सोहळ्यात करणाऱ्या या वैज्ञानिक महिलांबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

कोण आहेत या दोघी, तर मुथय्या वनिथा आणि रितू करिधल अश्या चंद्रयान-२ मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला वैज्ञानिक, ज्यांनी या मिशनमध्ये अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. भारतातल्या या दुसऱ्या आंतरग्रहीय मोहिमेच्या यशाच्या मागे असणाऱ्या अनेक वैज्ञानिकांमध्ये ३०% महिलांचा समावेश आहे त्यात वनिता या मिशनच्या प्रकल्प निर्देशक (प्रोजेक्ट डायरेक्टर) म्हणून नेतृत्व करीत होत्या तर रितू ह्यांनी मोहीम निर्देशिकेची (मिशन डायरेक्टर) धुरा उचलून धरली होती.

मूळ चेन्नई येथील असणारी प्रकल्प निर्देशक वनिथाने ३२ वर्ष इसरो येथे आपली सेवा दिली आहे. सुरुवातीला ज्युनिअर इंजिनिअरच्या पदावर भरती झालेली वनिता पुढे लॅबोरेटरी, टेस्टिंग कार्ट्स, हार्डवेयर तयार करणे, डिजाइनिंग, डेवलपिंगसारखी कामे करत व्यवस्थापनाच्या पोजीशनपर्यंत पोचली. सुरुवातीला चंद्रयान-२ मध्ये असणाऱ्या प्रकल्प निर्देशांकाच्या भूमिकेसाठी ती आनंदी नव्हती, परंतु कुठेही खंड न पडू देता दिवसाला १८ तास जबाबदारीने आणि कष्टाने आपले कार्य चालू ठेवले. या कार्यात केवळ कष्टाचं नाही तर मोठी जोखीम घेऊनही कार्य करावे लागते या सगळ्या जबाबदाऱ्या निगुतीने निभावत वनिथा या प्रकल्पाच्या यशात सहचारी ठरली.

इसरोमध्य अनेक समस्या अडचणींना विचारपूर्वक सोडवणारी रितू मूळची लखनौ येथील. इंडियन इंस्टिट्यूटमधून एरोस्पेस इंजीनियरिंग केलेली रितू 'रॉकेट वुमेन ऑफ इंडिया' या नावानेही ओळखली जाते. २००७ साली पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते इसरो यंग साइंटिस्ट अवॉर्डनेही ती सन्मानित झाली आहे. मिशन मार्स ऑर्बिटर हे तिच्या आजवर केलेल्या अनेक महत्वपूर्ण मिशनपैकी एक महत्वपूर्ण मिशन होते. ज्यात तिने डिप्टी ऑपरेशंस डायरेक्टरची भूमिका निभावली होती. चंद्रयान-२ या महत्वपूर्ण प्रकल्पातील मोहीम  निर्देशिकेची (मिशन डायरेक्टर) भूमिका देखील तिने यशस्वीपणे पार पाडली आहे.



काय आहे चंद्रयान-२ -

दोन वर्षांपूर्वी काही तांत्रिक कारणाने अयशस्वी झालेले चंद्रयान-१ लक्षात घेऊन काळजीपूर्वक चंद्रयान-२ या प्रकल्पाच्या मोहिमेचा पाय रचला गेला. हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने १५ जुलै रोजी होणारे उड्डाण ५६ मिनिटे आधी रद्द झाले होते ते २३ जुलैला अंतराळात झेपावले. या यशस्वी प्रक्षेपणानंतर ते आता ६-७ सप्टेंबरला  चंद्रावर उतरणार आहे. ऑर्बिटर, 'विक्रम' लैंडर, 'प्रज्ञान' रोवरने परिपूर्ण असणारे चंद्रयान-२ पहिल्यांदाच चंद्राच्या भूमीवर 'सॉफ़्ट लैंडिंग' करणार आहे जे अत्यंत कठीण कार्य मानलं जातं. यापूर्वी कधीही कोणतेही चंद्रयान न उतरलेल्या उपग्रह चंद्राच्या दक्षिणी भागावर उतरून तेथील नमुने गोळा करणार आहे. चंद्रयान-२ हा अत्यंत महत्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपग्रह आहे कारण यात  एक ऑर्बिटर, एक 'विक्रम' नावाचा लैंडर आणि 'प्रज्ञान' नावाचा रोव्हर आहे. जीएसएलवी मार्क-तीनच्या माध्यमाने अंतरिक्षात जाणाऱ्या या चंद्रयान-२ चे वजन ३.८ टन इतके आहे, तर सहाशे करोड रुपयांपेक्षा जास्त खर्च या मोहिमेसाठी होणार आहे.  चांद्रयान-२ मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडून या महिलाशक्तींनी आंतराष्ट्रीय स्तरावर देशाची मान अधिक उंचावून भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

-रश्मी पदवाड मदनकर

Monday 29 July 2019

दुखऱ्या बाधेचा 'कृष्णकिनारा' !

दिवस समपात बिंदूवर असताना
एखाद दिवस अचानक
उन्ह हरवतं, सावली साथ सोडत जाते
अंधारून येतं सगळं..
आणि आतात मळभ दाटत जातं.
अवेळीच उगवलेली कातरवेळ ..
मी हातातले 'कृष्णकिनारा' उपडे ठेवते..
काळेभोर खांद्यावर पसरलेले कुरळे केस,
एकत्र गुंडाळून टाळूवर बांधून घेते.
चष्म्याची फ्रेम दुमडून ठेवत, खोल उसासा घेते.
जडावलेल्या देहाची बोचकी विसरून, आराम खुर्चीत पाठ टेकते...
मन शांतावण्याच्या प्रयत्नात असताना,
उरी काहूर माजतं, गम्य-अगम्याच्या लाटा उठतात
वेणूची साद रुंजी घालायला लागते ..आणि मी
मी, पुन्हा निळकांती कृष्णाच्या अथांगतेच्या लहरीत खोल खेचली जाते..
ही वेळ समर्पणाची असते
स्वीकार्य .. आहे ती स्थिती ..तशीच मनःस्थिती
समर्पण तसेच.. राधा, कुंती, द्रौपदीनं स्वतःला कृष्णार्पण केले तसे..
काही क्षण अनंत काळासारख्या रंध्रारंध्रातून ओथंबत राहतात.
अंतरंगाचा तळ ढवळून काळ निसटून जातो ..
मिटल्या डोळी काजळओलीतून कातरवेळ वाहून जाते ..
सचैल न्हाऊन निघतो दुखऱ्या बाधेचा 'कृष्णकिनारा' !
औदास्याचे ग्रहण सुटते ..हरवलेले चित्त भानावर येते.
आभाळ घनव्याकूळ ऐलतिरी अन पैलतीरी
नभांगणाच्या नक्षी खुणावू लागतात..
उसासलेला-उधाणलेला आता बरसणार असतो नभ
धरित्री तरारून येते, सृष्टीच्या नवनिर्मितीचे डोहाळे सुरु होतात..
माझ्या मनातला मोर पुन्हा फुलारून येतो ..
पुन्हा उर्मी जागी होते .. आणि मी ..
मी उपडं ठेवलेलं 'कृष्णकिनारा' पुन्हा अलगद हाती घेते ...

©रश्मी पदवाड मदनकर
27 जुलै 2019

Friday 19 July 2019

ग्रॅव्हीटस रत्न






महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करणारे कॉफीटेबल बुक नुकतेच महिला सक्षमीकरण आणि लहान मुलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या पुण्यातील ‘ग्रॅव्हीटस फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेनं प्रकाशित केलं. आपल्याला अश्या एखाद्या गौरवास्पद उपक्रमाचा भाग होता यावे याहून मोठा आनंद काय असेल. या कॉफीटेबल पुस्तकात मला वरिष्ठ समाजसेविका 'रूपाताई कुलकर्णी-बोधी' यांच्यावर लेख लिहिण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने अनेकदा त्यांच्याशी भेटी झाल्या, समाधान देणाऱ्या चर्चा घडून आल्या. खरतर त्यांच्या कामाबद्दल बरीचशी माहिती होतीच पण त्यांच्या जवळ येण्याची, त्यांच्या कामाचे स्वरूप जाणून घेण्याची, त्यांना जवळून ओळखण्याची संधी मला या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. याकाळात रुपाताईंबद्दल भरपूर वाचन केलं .. त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांपासून ते त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत सगळं चाळून काढलं... इतकं करूनही त्यांच्या कार्याला कितपत न्याय देता आला ही माझी मला शंका आहेच. तरीही हा छोटासा प्रवास प्रगल्भ करणारा आणि अतिशय समाधान देणारा ठरला हे मात्र निश्चित.. रूपाताई तुमच्यावर लेख लिहितांना तुमच्यासोबत असतांना तुमच्यावर प्रश्नांची भडीमार करतांना, खूप किस्से ऐकावे वाटताहेत म्हणून तुम्हाला सतत बोलते ठेवतांना, माझ्या जिज्ञासा शमवतांना तुम्ही न थकता मला साथ दिलीत, मी छान लिहू शकेन म्हणून सतत प्रोत्साहन दिले.. प्रेम जिव्हाळा दिलात त्याबद्दल मी सदैव तुमच्या ऋणातच राहू इच्छिते.


या कामासाठी माझे नाव सुचवणारे, माझ्यावर विश्वास दाखवणारे मा. श्रीपाद अपराजित सर, याकाळात मी सतत तुम्हाला त्रास दिला खूप खूप चर्चा आणि माझी बडबड पण तुम्ही ते मोठ्या मनाने समजून घेतलंत. कामाच्या व्यापात दिलेली वेळ निघून जाऊनही मला पुरेसा वेळ देत माझ्याकडून हे नोबल कार्य घडवून आणलं.. त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. नव्याने मैत्री झाली असूनही अजिबात नवीन न वाटणारी सखी मेघा शिंपी हिने पुस्तकाच्या निर्मितीपासून प्रकाशनाच्या आयोजनापर्यंत घेतलेले कष्ट आणि त्यातून निर्माण झालेली ही सुंदर कलाकृती सगळंच वाखान्यासारखं. तुझे खूप अभिनंदन आणि धन्यवाद सखे.


एखादा लेख सरते शेवटी निव्वळ लेख उरत नाही..खूप काही पदरी पाडून जाणारा ठरतो तसाच हा ठरला. खूप दिवसापासून हे सगळं सांगायचं होतं.. सगळ्यांचे आभार मानायचे होते, उशीर झाला... पण हरकत नाही भावना कायम राहणार आहेत.







Friday 12 July 2019

*उत्तर*
वीज चमकते,
जांभूळ प्रकाश पसरतो
आणि
मी डोळे मिटून घेतो..
..मी डोळे मिटून घेतो
आणि असला नसला पाऊस
तरी घडत जातात
अपेक्षितपणे अनपेक्षित
गोष्टी
मग रेंगेंचं 'सावित्री'
पत्रांतील मचकूराला
घडी न पाडता
दुमडून ठेवतो
कडेने,
अगतिक
पसरलेले
पिकासोचे न्यूडही
सरते नजरेआड
आणि
कुंडलिनीचे चवथे
चक्र स्पर्षणारे
किशोरीचे
'सहेला रे' देखील
होते पॉज..
कॉफीचा मग
बुद्धाच्या अनुयायासारखा
शांत..
मी त्याच्या
कानात अडकवलेले
घट्ट बोटही सैल करतो.
जाणीव होते क्षणभर
अधांतरी टांगलेल्या
शरीराची,
तेव्हा
खुर्चीवर उसासे रेलून
सोडवून घेतो
स्वतःला.
डोळे असतात
अजून मिटलेले;
आणि मी
भासत असतो
अस्पर्शीत
आणि
निवांत..
अशातच
अनोळखी दुरातून
धडपडत येणारे
आवाजी उत्तर
सुचवून जाते;
'सावित्री'चे उलटे वाक्य
'न्यूड' मधला गर्भितार्थ
आणि
'सहेला रे' चा मखमल ध्यास
आता असतो बाहेर मी
आणि जांभूळ प्रकाश
आत..
खोल आत!
-आदित्य दवणे

किस्सा तो है ..



एक किस्सा अतीत का ..

किस्सा है जो भुलाया नहीं जाता

भुनाया नहीं जाता

न गलता है, न मिटता है और नाही मरता है

नाही बूंदो की तरह सुख ही जाता

नाही धुवा होता ...

उसे गाड़ नहीं सकती

नाही जला पाती हूँ...




किस्सा तो है जो जहन में उतर गया है

बस सा गया है वही .. फस सा गया है !

उभर आता है रहरहकर

शांत हो चुकी भावनाओ को झकझोरता रहता है ...




किस्सा तो है ..

आधे-अधूरे लम्हो का

अधभरे जख्मों का

लम्हो को याद कर कुरेदती रहती हूँ जख्मो को ..

बहता लहू जिन्दा होने की निशानी देता रहता है

बेरंगसी जिंदगी में रंग भर देता है

रिसती हुयी यादें गर्माहट देती है

जिंदगी जिने का सहारा बन जाती है..




एक किस्सा है जो जीने नहीं देता

वही किस्सा जीने का कारन बनता रहता है

समझ नहीं आता ..

जिंदगी किस्से में समेट गयी है

या क़िस्साहि जिंदगी बन गया है ..




किस्सा ही तो है ... !


- रश्मी पदवाड मदनकर

तू आणि मी !




भिन्न ध्रुवांवरील दोन भिन्न बिंदू
या बिंदूंना जोडणारी एक ती अदृश्य रेषा
तिलाही कुठेतरी मध्यबिंदू आहेच ना
दोघांनाही सारख्याच अंतराने मिळवणारी
एकाच संंज्ञेेत बांधणारी …


भौमितीय गणितातील आपण दोघे दोन प्रमेये
संबंध जोडायचाच ठरवलं तर सिद्धांत सापडतोच

अवकाशाच्या दोन टोकांना जोडणाऱ्या
पोकळीतही पावसाच्या सरींचा
निमित्त्यमात्र आधार गवसतोच कधीतरी…

दोन विरुद्ध दिशेंनाही वाहणारा एकाच वाऱ्याचा झोत
स्पर्शून जातोच तुलाही अन मलाही

चंद्राला अन सुर्याला भेटवणारी सायंकाळ
तुला मला टाळता येत नाहीच

उन्ह अन पावसाचा लपंडाव तुझ्या अन माझ्यासाठीच
इथून तिथवर वक्राकार इंद्रधनू तुला मला जोडण्यासाठीच ….

तुला स्पर्शून येणारा कवडसा मला येउन का बिलगतो
मोगरा तिथलाही अन इथला सारखाच का गंध देतो

कितीही दूर असलो तरी कुठेतरी कश्यानेही
जुळलेले असतोच हे जाणवतं मला
तुला जाणवतं का रे ?



- रश्मी पदवाड मदनकर

Thursday 11 July 2019

शिरस्ता !!


नीलिमा खरतर एक सुसंस्कृत, सोज्वळ सदगृहिणी. नोकरी करायला, मैत्रिणीत रमायला, समाज कार्य करायला खूप आवडायचं तिला. पण संसाराच्या जबाबदाऱ्या पेलताना सगळ्या आवडी-निवडीचे करकचून गाठोडे बांधून खुंटीला टांगले होते तिने. नवऱ्याच्या गरजा, त्याची नोकरीतली प्रगती, मुलांचं संगोपन, शिक्षण, गणगोतांचे येणेजाणे- देणेघेणे ... कुठलीही खंत न बाळगता संसाराची २० वर्ष जबाबदारया खुबीने निभावल्या होत्या तिने. दिवसभर घरात राहूनही कसलं सुख, कोणाची सोबत अशी नव्हतीच. व्यवसायाच्या नावानं नवरा दिवसरात्र बाहेर. तीन सगळं सांभाळून घेतलं होतं म्हणून तो अधिकच निष्काळजी, बेजबाबदार होत गेला. घराला लागणारा पैसा पुरवण्यापर्यंतच घराशी संबंध संपर्क असलेला. बायको म्हणजे निव्वळ गृहीत धरण्याची चीजवस्तू.. तिच्या मनाचा, भावनांचा, गरजांचा विचार तर दूर ते ध्यानीमनीही येऊ नये इतकी अलिप्तता बाळगणारा. तिच्याप्रती त्याचं काहीच देणं लागत नव्हतं जणू. तिनं मात्र असं अलिप्त-बेदरकार राहून चालणार नव्हतं. तिनं सगळं करावं, सगळ्यांचं करावं हा थोपलेला अलिखित नियम. ती सुद्धा माणूस आहे याच घरात राहते हे तो चक्क विसरून जायचा. स्त्रिया घरात घुसमटायला आणि पुरुष हा बाहेर जगण्यासाठी, बाहेरचच बघण्यासाठी जन्माला आलाय हि अव्यक्त विचारप्रणाली घेऊन जगणारा. त्याच्यालेखी घर म्हणजे फक्त जेवून आराम करण्यासाठीचं ठिकाण.

ती दिवसभर वाट बघून दमायची तो अर्ध्या रात्री अवतारायचा.

वर्षानुवर्षे हाच शिरस्ता.

हल्लीच दोन्ही मुलं शिक्षणासाठी वेगवेगळ्या शहरात राहायला गेलेत. . जरा जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि तिच्या आयुष्याला नाही म्हंटलं तरी जरा रिकामपणच आलं. मोठ्या घरात एकटपण खायला उठायचं. आता स्वतःसाठी काहीतरी करावं असं सारखं तिला वाटत असायचं. मैत्रिणीच्या संपर्कातून हळूहळू सामाजिक कार्याशी जुळली गेली आणि नीलिमा उंबरठा ओलांडून बाहेर पडू लागली. घराची फारफार काळजी न करता आवडीच्या कामात रमू लागली...छंद जोपासायचे, बाहेर अनेक मित्र-मैत्रिणींकडून त्याचे गोगोड़ कौतुक ऐकायचे; घरी आली कि खुश राहायचे...तिचं राहणीमान बदललं. बोलण्याचा ढब बदलला. संपर्क वाढू लागले.

आता त्याचं मन बाहेर लागत नाही. तिच्यातले ठळक होत चाललेले गुण त्याच्या नजरेच्या टप्प्यातून सुटत नाही. तो सतत तिचा विचार करतो. तिच्या बाहेर रमणाऱ्या छबीभोवती घुटमळत बसतो. संध्याकाळ होण्याआधीच घरी येतो .. तीची वाट बघतो. ती किती उशीर करते, कितीवेळ घराबाहेर असते, कुणाशी बोलते ह्याचं गणित मांडत बसतो ….

आता तो असतो … ती नसते.

तू नसलीस कि घर कसं खायला उठतं तो तिला समजाऊन सांगतो. तुझ्याच हातचा स्वयंपाक कसा रुचकर लागतो हे पटवून देतो… तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही हे रुजवून देतो … घराला तुझी गरज असल्याचे रंगवून रंगवून सांगतो....आणि ती पाघळते. चार महिन्यात मिळवलेल्या आवडत्या कामाच्या समाधानाचे पुन्हा एकदा अलगद गाठोडे बांधते.. खुंटीला टांगते. आणि पुन्हा घराला घरपण द्यायला उंबरठ्यावरूनच उजवा पाय आत ठेवते.


दुसरे दिवशी सकाळी तिला दारात सोडून शिळ घालत तो कामावर निघतो …व्यवसायाच्या नावानं दिवसरात्र बाहेर काढू लागतो. ती सुद्धा घरात राहते हे तो चक्क विसरून जातो... पुन्हा ती दिवस दिवस वाट बघत बसते … तो अर्ध्या रात्री अवतरतो....

रश्मी पदवाड मदनकर

29 jan. 2015

























Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...