Friday, 24 April 2026

कायांतर : देहाच्या कैदेतून माणुसकीच्या मुक्तीकडे



“कायांतर” ही रश्मी पदवाड मदनकर लिखित तृतीयपंथीयांच्या वेदना आणि संघर्ष मांडणारी प्रभावी कादंबरी आहे. अश्विन वर्मा ते आंचल वर्मा असा तिचा जीवनप्रवास अत्यंत खडतर असून समाजमान्य नसलेल्या किन्नर समूहाच्या यातना यात वास्तववादी पद्धतीने उलगडल्या आहेत. ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे; स्वतः आंचल वर्माने लेखिकेशी संवाद साधत तिची जीवनगाथा सांगितली आहे. “कायांतर” हे शीर्षक अत्यंत समर्पक आणि प्रतीकात्मक असून, मुखपृष्ठही स्त्री-पुरुषांतील द्वंद अधोरेखित करत विषयाला पूरक ठरते.

भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांची सुरेख सरमिसळ या कादंबरीत अत्यंत लयबद्धपणे घडताना दिसते. कादंबरीचा सूर आणि ताल एकरूपतेने पुढे सरकत राहतो, त्यामुळे वाचकाची उत्सुकता प्रत्येक पानागणिक वाढत जाते. आंचलच्या यशापासून सुरू होणारा प्रवास हळूहळू तिच्या बालपणात शिरतो आणि अश्विनच्या रूपात, पुरुषी देहात स्त्रीत्वासाठी चाललेली आतली धडपड लेखिकेने अत्यंत संवेदनशीलतेने रेखाटली आहे.

दुःखातून भोगाकडे आणि पुढे यशाकडे वाटचाल करणारी आंचल आणि बालपणीचा अश्विन ही एकच व्यक्ती नव्हे तर जणू दोन वेगवेगळी रूपं वाटतात, तरी ती एकाच अस्तित्वाच्या दोन बाजू आहेत हे समजेपर्यंत आपण बदललेलो असतो.. एका पुरुषाच्या शरीरात कैद झालेली स्त्री बाहेर पडण्यासाठी तडफडत असल्याची जाणीव या कथनातून तीव्रतेने उमटते. आंचल आणि अश्विन या दोन्ही रूपांमधील हा प्रवास लेखिकेने प्रकरणागणिक अत्यंत प्रभावी आणि प्रवाही शैलीत उभा केला आहे. त्यांची पडझड पाहून वाचकाच्या संवेदना जागृत होतात आणि समाज म्हणून या समाजाला समजून घेण्यात आमची चूक झाली असा एक क्षमाभाव निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

लेखिकेची भाषा अत्यंत साहित्यिक, संवेदनशील आणि मनाचा ठाव घेणारी आहे. त्या आंचलबद्दल लिहिताना म्हणतात, “शरीर कुठलंही असलं तरी तिने शंभर टक्के २४ कॅरेट सोन्यासारखं मन मिळवलं होतं,” तसेच “स्थापत्यकलेतील चूक रंगरंगोटीने झाकता येते, डॉक्टरांची चूक टाळता येते; पण नियतीची चूक कुणाकडे मांडायची?” अशा ओळींतून आंचलची वेदना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होते. लेखिकेच्या भाषेतलं सौष्ठव आणि अलंकारिकता ही कृत्रिम न वाटता स्वाभाविकपणे उमटते. एका ओळीत व्यक्तिमत्त्व उभं करण्याची त्यांची हातोटी विशेष लक्षवेधी आहे. अश्विनच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक व्यक्तींचं चित्रण त्यांनी विस्ताराने न करता, अत्यंत थोडक्यात पण नेमक्या शब्दांत उभं केलं आहे. त्यामुळे त्या व्यक्तिरेखा वाचकांच्या डोळ्यासमोर जिवंत होतात. आंचलसोबतच खातिमा, रेशमा, अम्मा आणि आनंद चांदराणी यांसारख्या पात्रांच्या माध्यमातून अनेकांच्या वेदना या कादंबरीत प्रभावीपणे प्रकट होताना दिसतात.

अश्विनचा पुरुषत्वातून स्त्रीत्वाकडे जाणारा प्रवास अत्यंत बोलका आणि अंतर्मुख करणारा आहे. आयुष्यभर प्रेमाच्या अभावाने हळवा झालेला अश्विन खातीमामध्ये जणू मातृत्व शोधतो. लेखिकेने वापरलेल्या प्रतिमा अत्यंत प्रभावी आणि अर्थपूर्ण आहेत. दिल्लीला जाताना अश्विन जणू आपल्या तुडवलेल्या, पडझड झालेल्या बालपणाचे तुकडे गाठोड्यात बांधतो; ही प्रतिमा मनाला खोलवर स्पर्श करून जाते. एखादं नकोसं झुडूप उपटून टाकावं आणि पुन्हा कुठेतरी रुजावं, तसं अश्विनचं आयुष्य उखडत, तुटत आणि तरीही पुन्हा उभं राहत राहणारं, अत्यंत संवेदनशीलतेने उभं केलं आहे.

अश्विन जेव्हा आंचलमध्ये रूपांतरित होतो, तेव्हा त्याच्या मनातील भावनांचा आवेग आणि बदलत जाणाऱ्या आयुष्याचा प्रवास लेखिकेने रेल्वेप्रवासाच्या प्रतीकातून अत्यंत प्रभावीपणे उभा केला आहे. या प्रतीकात्मक मांडणीतून अंतर्मनातील हलचाली आणि आयुष्याच्या वळणांची जाणीव अधिक तीव्रतेने जाणवते.
ही कादंबरी केवळ अश्विन किंवा आंचलच्या जीवनकथेत मर्यादित राहत नाही; ती संपूर्ण किन्नर समाजाच्या वेदना आणि वास्तवाला स्पर्श करते. त्यांच्या प्रथा, परंपरा, श्रद्धास्थाने, दैवतं, तसेच त्यांच्या आयुष्यातील नियम आणि वास्तव यांचा अभ्यासपूर्ण आणि सखोल परिचय लेखिकेने वाचकांना करून दिला आहे. त्यामुळे ही कथा केवळ वैयक्तिक अनुभव न राहता एका संपूर्ण समुदायाची जाणीव करून देणारी ठरते.

रश्मी या लेखिका होतात, कारण समाजातील संघर्ष, दुःख आणि अन्याय त्यांना सतत अस्वस्थ करत राहतात. यापूर्वीची त्यांची #पद्मकोश ही कादंबरी त्याचीच साक्ष देते. संघर्षमय आयुष्याला आवाज देताना त्या केवळ वेदना मांडत नाहीत, तर करुणेने ओथंबलेलं मनही वाचकांसमोर ठेवतात आणि त्यामुळे वाचक नकळत अंतर्मुख होतो. चित्रपटातील कॅमेऱ्यासारख्या नेमकेपणाने, अलिप्त पण संवेदनशील दृष्टिकोनातून त्या पात्रांचे बहिरंग आणि अंतरंग उभे करतात. त्यामुळे #कायांतर ही कादंबरी केवळ वाचनीय राहत नाही, तर ती अनुभवण्याजोगी ठरते. अनेक वाचकांनी प्रत्यक्षात किन्नर समुदायाला जवळून पाहिलेलं नसतं; पण ही कादंबरी वाचताना त्यांचं वास्तव डोळ्यांसमोर उभं राहतं. त्या प्रक्रियेत आपल्या संकुचित, कधी जाचक ठरलेल्या दृष्टिकोनातून बाहेर पडल्याची जाणीव होते. किन्नरांच्या अस्तित्वाच्या लढ्याला सामोरं जाताना मन हेलावून जातं आणि आपण त्यांच्याकडे ‘माणूस’ म्हणून कधीच पाहिलं नव्हतं, ही जाणीव ठसठशीतपणे समोर येते. हीच जाणीव समाजापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य “कायांतर” ही कादंबरी प्रभावीपणे पार पाडते.

घरातून हाकललेला अश्विन, आणि तरीही आंचल झाल्यावरही कुटुंबाशी असलेली नाळ जपण्याची तिची ओढ; ही भावना माणुसकीचा खरा अर्थ अधोरेखित करते. शेवटी कथा जिथून सुरू होते, तिथेच येऊन पूर्ण होते; मात्र वाचकाच्या मनात अनेक प्रश्न, वेदना आणि नव्या जाणिवांची ठिणगी पेटवून जाते. “कायांतर” ही कादंबरी वाचून संपत नाही, ती मनात दीर्घकाळ रेंगाळत राहते, माणूस म्हणून जगण्याचा अर्थ नव्याने उलगडून दाखवते.


सुरुची डबीर
+91 93706 96117

*****************************  

पुस्तकाचे नाव - कायांतर
लेखक - रश्मी पदवाड मदनकर
प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन
प्रकार - कादंबरी
विषय - तृतीयपंथी वास्तवावर आधारित  
संपर्क - ७७२०००११३२


 


Wednesday, 1 April 2026

साहित्यिक नकाशावर हरवलेली ओळख : वैदर्भीय स्त्री साहित्यिक !


'नागपूर' हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले शहर नाही, तर ते संस्कृती, शिक्षण आणि साहित्य यांचेही एक समृद्ध केंद्र आहे. “सारस्वतांचे माहेर” ही ओळख नागपूरने केवळ नावापुरती मिळवलेली नाही, तर अनेक प्रतिभावान साहित्यिकांच्या कार्यातून ती सतत सिद्ध होत आली आहे. या भूमीने घडवलेले लेखक, कवी, विचारवंत यांनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले असून भारतीय साहित्याची पत जागतिक स्तरावर उंचावण्याचे कार्यही केले आहे.
नागपूरची सांस्कृतिक परंपरा अत्यंत वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे. शिक्षणसंस्था, वाचनसंस्कृती, नाट्यसंस्कृती आणि विविध साहित्यिक उपक्रम यांच्या माध्यमातून येथे साहित्याची चळवळ नेहमीच जिवंत राहिली आहे. या वातावरणात घडलेल्या लेखकांनी केवळ शब्दांची मांडणी केली नाही, तर समाजाच्या वेदना, संघर्ष, आशा आणि बदल यांचे जिवंत चित्रण आपल्या लेखणीतून साकारले.
विशेषतः, या सारस्वत भूमीने दिलेल्या स्त्री लेखकांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. पारंपरिक चौकटी मोडत, सामाजिक कुप्रथांना आव्हान देत आणि स्वतःचा स्वतंत्र आवाज निर्माण करत या लेखिकांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या लेखनात स्त्रीच्या भावना, तिचा संघर्ष, तिची ओळख आणि तिचे स्वातंत्र्य यांचे अत्यंत प्रभावी चित्रण दिसून येते. या लेखिकांनी केवळ साहित्यनिर्मिती केली नाही, तर समाजमन घडवण्याचे कामही केले. त्यांनी स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय, शिक्षणाचे महत्त्व आणि मानवी मूल्ये यांसारख्या विषयांवर ठामपणे भूमिका मांडल्या. त्यांच्या लेखनामुळे अनेकांना विचार करण्याची दिशा मिळाली, तर अनेकांना प्रेरणा मिळाली. नागपूरच्या या साहित्य परंपरेतून घडलेल्या लेखिकांची नावे आज मराठी साहित्यात सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात आणि पुढील पिढ्यांसाठी त्या प्रेरणास्त्रोत ठरतात. त्यांच्या लेखनातून केवळ साहित्याचीच नव्हे, तर समाजाचीही प्रगती घडून आली आहे. अगदी १३ व्या शतकातील मराठी साहित्यातील आद्य कवयित्री मानल्या जाणाऱ्या महादाईसा ऊर्फ महदंबा यांचा संबंध विदर्भातील महानुभाव पंथाशी होता. त्यांनी 'धवळ्यांची' रचना केली, जी नागपूर-विदर्भ परिसरातील साहित्यिक वारशाचा भाग आहे. १९ व्या शतकातल्या ताराबाई शिंदेंपासून ते आजच्या डिजिटल युगातही नागपूरची ही साहित्य परंपरा कायम आहे. नव्या पिढीतील लेखक-लेखिका नव्या विषयांवर, नव्या शैलीत लेखन करत आहेत. मात्र, त्यांच्या पाठीशी उभी असलेली ही समृद्ध परंपरा आजही त्यांना दिशा देत आहे.
मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर एक कटू वास्तव समोर येते... बृहन्महाराष्ट्राच्या साहित्यिक नकाशावर वैदर्भीय, विशेषतः नागपूरच्या लेखिकांची आजही अपेक्षित ती दखल घेताना, त्यांना सुयोग्य मान-सन्मान मिळताना दिसत नाही. राज्यातील प्रभावी साहित्यिक वर्तुळात नावांची यादी काढताना विदर्भातील लेखिकांना अनेकदा दुय्यम स्थान दिले जाते. ही केवळ भावना नाही, तर विविध संमेलनांमधील प्रतिनिधित्व, पुरस्कारांचे वितरण, चर्चांमध्ये मिळणारी जागा आणि मुख्य प्रवाहातील समीक्षेतली उपस्थिती यांचा अभ्यास केला, तर ही तफावत स्पष्टपणे जाणवते. या परिस्थितीची कारणे शोधताना केवळ “बाहेरचे दुर्लक्ष” पुरेसे स्पष्टीकरण ठरत नाही. त्यासाठी आपल्या घरात, आपल्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात डोकावणे आवश्यक ठरते....
विदर्भ साहित्य संघसारख्या संस्थांनी निःसंशयपणे विदर्भात साहित्याची परंपरा जिवंत ठेवली. पण प्रश्न असा आहे की, या संस्थांच्या निर्णयप्रक्रियेत स्त्रिया कितपत आहेत? नेतृत्वपदांवर, धोरणात्मक समित्यांमध्ये, निवड प्रक्रियेत स्त्री लेखकांची उपस्थिती मर्यादित असेल, तर व्यापक पातळीवर त्यांचे प्रतिनिधित्व कमी राहणे स्वाभाविक ठरते. अलीकडील संस्थात्मक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साहित्यिक नेतृत्व, गटबाजी, प्रतिनिधित्व यावर चर्चा झाली; पण त्यात लेखिकांचा ठोस, संघटित आवाज कितपत होता? वैयक्तिक पातळीवर सक्षम लेखिका असल्या तरी त्या एकत्रित शक्ती म्हणून उभ्या राहत नाहीत, ही एक मोठी उणीव आहे. विदर्भाचा साहित्यिक इतिहास समृद्ध असला तरी त्याची मांडणी आणि परंपरा मोठ्या प्रमाणावर पुरुषकेंद्री राहिली आहे. त्यामुळे स्त्रियांचे योगदान नेहमीच दुय्यम ठरले किंवा अदखलपात्र राहिले आणि त्यामुळे जिथे घरातच आवश्यक ते महत्त्व मिळाले नाही, तिथे बाहेरची अपेक्षा काय करावी, अशी स्थिती. एकीकडे स्त्रियांच्या लेखनातून सामाजिक भान, स्त्री-अस्मिता, विषमता, बदलाची आस यांचे प्रभावी चित्रण दिसते; तर दुसरीकडे साहित्यिक सत्ताकारणात, निर्णयप्रक्रियेत, नेतृत्वात त्यांची उपस्थिती मर्यादितच राहते... असे का झाले ? हा प्रश्न केवळ “वैदर्भीय स्त्रिया कुठे चुकतात?” इतकाच नाही, तर तो संपूर्ण साहित्यिक संरचनेचा आणि संधींच्या असमानतेचाही आहे. यामागे बाह्य कारणे जितकी जबाबदार आहेत, तितकीच अंतर्गत मानसिकताही कारणीभूत आहे, हे मान्य करावे लागेल. तरीही प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करायचे झाल्यास काही मुद्दे नक्कीच पुढे येतात:
नागपूर आणि विदर्भातील अनेक लेखिका आपल्या लेखनगुणांनी सक्षम असतानाही, त्या व्यापक पातळीवर पुढे येण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करताना दिसत नाहीत. स्थानिक पातळीवर मिळणारा मान, कौतुक आणि ओळख यावर समाधान मानण्याची प्रवृत्ती दिसून येते. “आपल्या वर्तुळात मान मिळतो आहे, तेवढे पुरे” ही मानसिकता दीर्घकालीन दृष्टीने मर्यादा घालणारी ठरते. साहित्य हे केवळ सर्जनशीलतेचे क्षेत्र नसून, ते संवाद, नेटवर्किंग, संघटनात्मक सहभाग आणि नेतृत्व यांचेही क्षेत्र आहे याची जाणीव अजून व्यापकपणे झालेली दिसत नाही.
याच संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो जबाबदारीच्या पदांवर येऊन काम करण्याबाबत लेखिका वर्ग निराशावादी का आहे? नेतृत्व स्वीकारण्याची भीती, संघटनात्मक राजकारणापासून दूर राहण्याची वृत्ती, किंवा “आपल्याकडून काय फरक पडणार?” अशी आत्मसंशयाची भावना, हे घटक यामागे असू शकतात. पण या वृत्तीमुळेच विदर्भातील लेखिकांचा आवाज व्यापक पातळीवर पोहोचण्यात अडथळे निर्माण होतात हे आपल्या लक्षात येत नाही. ही परिस्थिती बदलायची असेल, तर केवळ बाह्य व्यवस्थेवर टीका करून उपयोग नाही. त्यासाठी स्थानिक पातळीवरूनच सजग, संघटित आणि धाडसी प्रयत्नांची गरज आहे. विदर्भातील लेखिकांनी स्वतःहून पुढे येऊन साहित्यिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, निवडणुकांमध्ये उभे राहावे, निर्णयप्रक्रियेत आपला ठसा उमटवावा ही काळाची गरज आहे. तसेच, परस्परांमध्ये सहकार्य, मार्गदर्शन आणि एकमेकांना पुढे नेण्याची वृत्ती निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. एकट्याने यश मिळवण्यापेक्षा, सामूहिक बळ उभारणे अधिक प्रभावी ठरते. साहित्यिक गुणवत्ता ही नक्कीच महत्त्वाची आहे, पण त्यासोबतच दृश्यमानता, उपस्थिती आणि सहभाग हेही तितकेच आवश्यक घटक आहेत.
एकंदरीत, नागपूरची “सारस्वतांचे माहेर” ही ओळख अभिमानाची असली, तरी त्या अभिमानाला साजेशी साहित्यिक आणि संघटनात्मक ताकद उभी करण्याचे आव्हान आजच्या पिढीसमोर आहे. संस्था संघटनेतील पुरुष सदस्यांनीही या दृष्टीने विशेष प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरेल; शिवाय स्त्री लेखकांनी स्वतःच्या क्षमतेची जाणीव ठेवत, मर्यादित चौकटी मोडून व्यापक व्यासपीठांवर आपली भूमिका ठामपणे मांडली, तरच हा असमतोल दूर होईल. अन्यथा, समृद्ध परंपरा असूनही योग्य प्रतिनिधित्व न मिळण्याची ही तफावत कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शांता शेळके यांच्या ओळींत सांगायचे तर—
“स्वतःचा दिवा आपणच पेटवायचा असतो.”
याच भावनेतून हा विषय केवळ चर्चेपुरता न राहता, बदलाची ठोस सुरुवात ठरो आणि उद्याच्या साहित्यिक नकाशावर वैदर्भीय लेखिकांची ओळख केवळ उपस्थितीची नव्हे, तर नेतृत्वाची नांदी ठरो हीच आशा आजच्या या मासिक स्तंभातील शेवटच्या लेखाद्वारे करते.... धन्यवाद !


रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com

(लोकसत्ता ''शहरनामा'' मालिकेत दि. 18 मार्च २०२६ बुधवार रोजी प्रकाशित लेख)  



Featured post

कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी

  प्रतिथयश कवयित्री, लेखिका मिनल येवले यांनी #कायांतर कादंबरीवर लिहिलेले हे पुस्तक समीक्षण.. मिनल ताई आणि देशोन्नती मनःपूर्वक आभार ********...