Posts

Featured post

एका जिव्हाळ्याच्या लेखिकेबद्दल…

माझ्या अत्यंत आवडत्या लेखिका अरुणा ढेरे ह्यांनी त्यांच्या ‘प्रेमातून प्रेमाकडे’ या अनोख्या मैत्रीच्या नात्यांवर आधारित पुस्तकात लिहिलेली अर्पणपत्रिका मला खूप भावली होती. त्यात त्या लिहितात.. “मैत्र जे होतं आणि आता नाही त्याला स्मरून आणि जे आहे, असण्याचं आश्वासन आहे त्याचा हात धरून...” बस्स... इतकंच. पण एवढ्याशा तीन-साडेतीन ओळी आयुष्याचं मोठं तत्त्वज्ञान सांगून जातात. काही माणसं काळाच्या ओघात मागे पडतात, काही नाती विरून जातात; पण त्यांची आठवण मनात कायम राहते. आणि त्याचवेळी, अजूनही सोबत असणाऱ्या, “आहोत” असं शांत ठामपणे सांगणाऱ्या हातांची किंमतही या ओळी शिकवतात. त्यांचं “काळोख आणि पाणी” हे आणखी एक अंतर्मुख करणारं पुस्तक; हे माझ्या अतिशय आवडत्या पुस्तकांपैकी एक. महाभारतातील व्यक्तिरेखा, त्यांच्या भावना, त्यांच्या निर्णयांमागचे कारण आणि त्यातून निर्माण झालेल्या अनेक अपरिचित कथा या पुस्तकात अतिशय सुंदर पद्धतीने मांडल्या आहेत. “जे महाभारतात नाही ते जगात नाही” असे म्हणतात, त्याची प्रचिती हे पुस्तक वाचताना येते. गंगा, भीष्म, गांधारी, कुंती, द्रौपदी अशा अनेक व्यक्तिरेखा नव्या दृष्टीने समोर येतात...

कुछ घर उम्रभर साथ चलते हैं....

Image
'पॅकर्स अँड मूव्हर्स'चा ट्रक दुपारीच निघून गेला. घरातलं आवश्यक सामान काळजीपूर्वक बांधून, पेट्यांमध्ये बंद करून, तो मुंबईहून नागपूर शहराच्या रस्त्याला लागला. उरलेल्या काही वस्तू कुणाकुणाला द्यायच्या होत्या, काहींची निरवानिरव बाकी होती. त्यामुळे आम्ही अजून काही तास त्या घरात थांबलो. ट्रेन रात्रीची होती. घाई नव्हती. एकेक खोली रिकामी होत गेली तसं घराचं रूप बदलत गेलं. भिंती तिथल्याच होत्या, खिडक्या त्याच होत्या, पण त्यांच्यावरचा आपलेपणाचा हात निसटत चालला होता. घर जणू हळूहळू घरपण उतरवून ठेवत होतं. सगळं आटोपलं. शेवटचं कुलूप लावण्याआधी आम्ही एकदा घरभर नजर फिरवली. तेव्हा नवरा सहज म्हणाला, "सगळं घेतलंय ना? काही राहिलं तर नाही?" मी क्षणभर काहीच बोलले नाही. काय सांगणार होते त्याला? सामान म्हणजेच सगळं नसतं ना... या घरात एक कोपरा आहे. अगदी साधासुधा. कुठल्याही आगंतुकाच्या नजरेत न भरणारा. पण माझ्यासाठी तो घराचा आत्माच जणू. त्या कोपऱ्यात बसून कितीतरी संध्याकाळ पाहिल्या आहेत. उगवता चंद्र, मावळता सूर्य, हवेची झुळूक, पावसाच्या सरी, मृदगंध, पाखरांची किलबिल, कुणाचातरी निरोप, कुणाकुणाची प्र...
Image
  काही गोष्टींचे, काही नात्यांचे, काही क्षणांचे, काही घटनांचे Endnote, Closure (पूर्णविराम) Epilogue मिळत नाहीत… ते फक्त थांबतात, गोठतात अचानक, अकस्मात; आणि मग सगळंच अडकून राहतं अधांतरी. शब्द अर्धवट राहतात, संवाद मध्येच तुटतात, नाती अचानक संपतात, काही प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत आणि काही माणसं कारण न सांगता निघून जातात. परिस्थिती उद्भवते.. निवळून जाते, पण अपूर्ण राहिलेल्या गोष्टी काळाच्या पलीकडेही आपला पाठलाग करत राहतात. आपण पुढे चालत राहतो, जगत राहतो, हसतही राहतो… पण आत कुठेतरी एक अधांतरी जागा कायम उघडी राहते.अंतिम स्पष्टता किती आवश्यक असते याचा अंदाज सहज लावता येत नाही. त्याचे परिणाम मात्र दीर्घकाळ आसपास रेंगाळत राहतात. क्लोजर मिळालेल्या गोष्टी मात्र शांतपणे पुढे निघून जातात. एखादं वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं. त्यांची वेदना, त्यांचं अस्तित्व संपत नाही कदाचित… पण त्यांचं ओझं राहत नाही. त्या विस्मृतीत जात नाहीत, पण त्या स्मृतींना छळतही नाहीत. पण क्लोजर न मिळालेल्या, कधीच पूर्ण न झालेल्या गोष्टी वेगळ्याच असतात. त्या मनात, विचारांत, आठवणींत भटकत राहतात. तुकड्यांत. विखुरलेल्या. कधी एखाद...

कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी

Image
  प्रतिथयश कवयित्री, लेखिका मिनल येवले यांनी #कायांतर कादंबरीवर लिहिलेले हे पुस्तक समीक्षण.. मिनल ताई आणि देशोन्नती मनःपूर्वक आभार ******** *कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी* कायांतर ही पद्मगंधा प्रकाशनची निर्मिती असलेली आणि पुणे येथील पुस्तक महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झालेली रश्मी पदवाड मदनकर यांची दुसरी बहुचर्चित कादंबरी आहे. एका देहातून दुसरा जन्म घेतलेल्या तृतीयपंथीय आंचल वर्मा या ट्रान्सजेंडर महिलेच्या जिवंत, ज्वलंत आणि अंतर्मुख करणाऱ्या संघर्षाची ही कहाणी आहे. स्त्री-पुरुष या चौकटींपलीकडील ‘तिसरे लिंग’ आपल्या समाजाला अजूनही सहज स्वीकारता आलेले नाही. त्यांच्या अस्तित्वाकडे पाहताना समाज आजही कचरतो; बोलताना, समजून घेताना, अगदी त्यांच्या शेजारी उभे राहतानाही. निसर्गाने निर्माण केलेल्या या जीवांना मात्र समाजाने उपेक्षेची शिक्षा दिली आहे. लाज, अवहेलना, टाळले जाणे, पावलोपावली करावा लागणारा स्वाभिमानाचा संघर्ष, पोटापाण्यासाठी शोधावे लागणारे खाचखळग्याचे मार्ग आणि केवळ अस्तित्व सिद्ध करण्यासाठीची लढाई....हे सगळे अनुभव या कादंबरीत अत्यंत दाहक आणि अस्सलपणे उल...

नसरापूर घटनेच्या निमित्ताने...

  ज्या दिवशी ही घटना घडली, अगदी त्याच दिवशी माझी अडीच वर्षांची भाची दिवसभर राहायला घरी आली होती, सोबत दहा वर्षांची मोठी भाची. आमचा अक्खा दिवस या चिमुकल्यांचे चैतन्याने भरलेले वावरणे, त्यांचा खळाळता आनंद पाहण्यात गेला. खेळता खेळता या देवाच्या फ़ुलपाखरांना टेबलाचा कोपराही लागू नये, जरा खरचटूही नये म्हणून केवढं जपत होतो आम्ही. इतक्या नाजूक. इतक्या कोवळ्या की आयुष्यात त्यांना जराशीही इजा पोहोचू नये...त्यांचा आनंद चिमूटभरही कमी होऊ नये, त्यांच्या वाट्याला सदैव भली माणसे यावीत असं वाटत राहिलं. आणि म्हणूनच त्याच दिवशी घडलेली ती घटना फारच जिव्हारी लागली. गेल्या महिनाभर झालेल्या घटनांनी खूप उदास, खूप अस्वस्थ वाटतं आहे… एवढं की सगळं सोडून कुठेतरी दूर पळून जावं असं मनात येतं. या कुठल्या जगात राहतो आहे आपण ? हे जग आपल्यासाठी नाहीच, किंवा आपणच इथे राहण्याच्या लायकीचे नाहीयोत.. पण प्रश्न असा की जावं तरी कुठे? जिकडे पाहावं तिकडे माणसं… आणि त्यांच्या मनातल्या विचारांची-विकारांची गुंतागुंत... जितकी माणसे तितक्या वृत्तीच नाही; तर तितक्या विकृती. त्या विचारांना, त्या मानसिकतेला बदलणं आता जणू अशक...

कायांतर : देहाच्या कैदेतून माणुसकीच्या मुक्तीकडे

Image
“कायांतर” ही रश्मी पदवाड मदनकर लिखित तृतीयपंथीयांच्या वेदना आणि संघर्ष मांडणारी प्रभावी कादंबरी आहे. अश्विन वर्मा ते आंचल वर्मा असा तिचा जीवनप्रवास अत्यंत खडतर असून समाजमान्य नसलेल्या किन्नर समूहाच्या यातना यात वास्तववादी पद्धतीने उलगडल्या आहेत. ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे; स्वतः आंचल वर्माने लेखिकेशी संवाद साधत तिची जीवनगाथा सांगितली आहे. “कायांतर” हे शीर्षक अत्यंत समर्पक आणि प्रतीकात्मक असून, मुखपृष्ठही स्त्री-पुरुषांतील द्वंद अधोरेखित करत विषयाला पूरक ठरते. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांची सुरेख सरमिसळ या कादंबरीत अत्यंत लयबद्धपणे घडताना दिसते. कादंबरीचा सूर आणि ताल एकरूपतेने पुढे सरकत राहतो, त्यामुळे वाचकाची उत्सुकता प्रत्येक पानागणिक वाढत जाते. आंचलच्या यशापासून सुरू होणारा प्रवास हळूहळू तिच्या बालपणात शिरतो आणि अश्विनच्या रूपात, पुरुषी देहात स्त्रीत्वासाठी चाललेली आतली धडपड लेखिकेने अत्यंत संवेदनशीलतेने रेखाटली आहे. दुःखातून भोगाकडे आणि पुढे यशाकडे वाटचाल करणारी आंचल आणि बालपणीचा अश्विन ही एकच व्यक्ती नव्हे तर जणू दोन वेगवेगळी रूपं वाटतात, तरी ती एकाच अस्तित्वाच्या दोन...

साहित्यिक नकाशावर हरवलेली ओळख : वैदर्भीय स्त्री साहित्यिक !

Image
'नागपूर' हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले शहर नाही, तर ते संस्कृती, शिक्षण आणि साहित्य यांचेही एक समृद्ध केंद्र आहे. “सारस्वतांचे माहेर” ही ओळख नागपूरने केवळ नावापुरती मिळवलेली नाही, तर अनेक प्रतिभावान साहित्यिकांच्या कार्यातून ती सतत सिद्ध होत आली आहे. या भूमीने घडवलेले लेखक, कवी, विचारवंत यांनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले असून भारतीय साहित्याची पत जागतिक स्तरावर उंचावण्याचे कार्यही केले आहे. नागपूरची सांस्कृतिक परंपरा अत्यंत वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे. शिक्षणसंस्था, वाचनसंस्कृती, नाट्यसंस्कृती आणि विविध साहित्यिक उपक्रम यांच्या माध्यमातून येथे साहित्याची चळवळ नेहमीच जिवंत राहिली आहे. या वातावरणात घडलेल्या लेखकांनी केवळ शब्दांची मांडणी केली नाही, तर समाजाच्या वेदना, संघर्ष, आशा आणि बदल यांचे जिवंत चित्रण आपल्या लेखणीतून साकारले. विशेषतः, या सारस्वत भूमीने दिलेल्या स्त्री लेखकांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. पारंपरिक चौकटी मोडत, सामाजिक कुप्रथांना आव्हान देत आणि स्वतःचा स्वतंत्र आवाज निर्माण करत या लेखिकांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या ल...