Tuesday, 10 March 2026

आपल्या संवेदना न मरो...

 


शताब्दी चौकात दोनदोनच्या जोडीत त्या चौघी आळीपाळीने दिसत राहतात. पहिली जोडी आहे १३-१४ वर्ष वयाची आणि दुसऱ्या दोघी असाव्यात २२-२५ तल्या. विशेष म्हणजे चौघींजवळ चार बाळ आहेत.. अगदी छप्पर फाड के दिलंय बघा त्यांना देवाने. ही बाळं झोळीत निपचित पडलेली असतात किंवा कडेवर रडत, पेंगत बसलेली असतात, उन्हातान्हात, पावसात, धुळीत. दुसऱ्या १३-१४ वर्ष वयाच्या ज्या दोघी आहेत. त्या स्वतःच किशोरी असताना त्यांच्याजवळ प्रत्येकी एकेक चिमुकलं असतं. सिग्नल लागला की त्या पुढे येतात, काच ठोठावतात. तुम्ही 'ये किसका बच्चा उठाकर घुमते हो' असं विचारलं की त्या 'मेरा बच्चा है' असं सांगतात आणि तुम्ही पुढला प्रश्न विचारण्याच्याआत भरभर चौक सिग्नल ओलांडून निघून जातात. मग पुढले काही दिवस गुडूप होतात. दिसत नाहीत... मग पुन्हा येतात. पुन्हा झोळीत बाळं; तीच का नवी…? माहिती नाही.

प्रश्र्न असा की प्रत्येकीकडे एक या दराने असे किती चिमुकले असतात यांच्याकडे.. इतक्या ठोक भावाने कुठे मिळतात इतकी लहान मुले ? एका चौकात इतकी तर शहरात किती? आणि राज्यात? देशात?  ही मुले जरा मोठी झाली की काय होतं यांचं? कुठे जातात ही? यात मुली असतील तर त्यांचं काय होतं? यांचं भविष्य काय ? दिवसा सिग्नलवर दिसणाऱ्या या वेदना... तर रात्रीच्या अंधारात काय होत असेल ?

उत्तरं नाहीत, वाली नाही, तक्रार नाही, पुरावा नाही.

पण म्हणून प्रश्न थांबत नाहीत. त्या बाळांचे मिटलेले डोळे, उन्हाने काळवंडलेली गालं आणि स्वतःचं बालपण हरवलेल्या त्या मुली;  हे सगळं मनात ठसत राहतं. आपल्याला कदाचित फारसं काही करता येत नाही. आपण गाडीत बसतो, काच वर करतो, सिग्नल हिरवा झाला की पुढे निघून जातो. पण निदान प्रश्न विचारता येतात. निदान अस्वस्थता शब्दात मांडता येते. कारण कधी कधी बदलाची सुरुवात उत्तरांपासून होत नाही; ती अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांपासूनच होते; आणि म्हणूनच हा प्रपंच. ही तळमळ. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न.

एखाद्या दिवशी मन खूप उद्विग्न करणारं काहीतरी नजरेत पडतं आणि सगळंच कसं फोल वाटायला लागतं. काही महिन्यांआधीची गोष्ट असेल; रोज ऑफिसला जाण्याच्या वाटेत व्हेरायटी चौक नावाचा प्रशस्त चौक लागतो. चौकाच्याच बाजूला मोठ्ठं 'मुख्य' पोलिस स्टेशनही आहे. -६ वर्षाच्या मुलीचा खांद्यापासून ढोपरापर्यंत कट झालेला हात दाखवत बाराएक वर्षांचा मुलगा पुढे आला, हिला औषधीला पैसे द्या म्हणाला. रक्ताळलेला पूर्ण फाटून फाकलेला हात बघून फार कसनुसं झालं. हातात येईल ती शंभरेक रुपयांची नोट त्या पोराच्या हातात ठेवली आणि सिग्नल सुटताच निघून गेले. त्या दिवसभर तो लाललाल हात नजरेसमोर दिसत राहिला. काय झालं असेल का झालं असेल?  अनेक तर्कवितर्काचे सत्र मनातच रंगत राहिले. पण झाला असेल अपघात काहीतरी म्हणून मग संध्याकाळपर्यंत सगळं विस्मरणात गेलं. झाला गेला दिवस निवळला. त्यानंतरच्या चौथ्या दिवशी पुन्हा ५ वर्षांच्या नाजुकश्या मुलीचा पूर्णतः भाजलेला हात पुढे करत ८-९ वर्षांचा वेगळाच एक मुलगा पुढे आला. त्या एवढ्याश्या चिमुकलीचा हात इतका भाजला होता जणू उकळत्या तेलात तळून काढलाय. जीव कळवळला, भोवळ यायची बाकी राहिली. त्या पोराला बोलले, चल दवाखान्यात जाऊ. हिच्यावर उपचार करू, तर ''पैसे दो, नहीं तो जाओ'' म्हणत भरभर चालत रस्ता ओलांडून तो निघून गेला. मी पाहतच राहिले. राहवले नाही म्हणून लगेच वळवून सरळ गाडी पोलिस स्टेशनात घेतली. आत जाऊन रीतसर तक्रार नोंदवली... दिवसभर मन लागलं नाही. इतक्या चिमुकल्या मुलींसोबत काय होतंय, हे इतकं बाहेर दिसतंय तर एकट्यात आत कायकाय होत असेल? विचार करून डोक्याचा भुगा. आत आत खूप गहिवरून येत होतं, चलबिचल चलबिचल होत राहिली. स्वतःच स्वतःचा राग आला. बाहेर हे सगळं असं काय काय चाललंय आणि आपण काय करतोय? आभासी जगात दाखवल्या जाणाऱ्या कित्येक गुडी गुडी गोष्टींना सत्य मानून आनंदात जगतोय. डोळे झाकल्याने सत्य बदलणार आहे का? डोळ्यावरची झापडं काढायला हवीय...

तर मी तक्रार नोंदवल्यानंतर ऑफिसला जाता येता या चौकात आवर्जून लक्ष देणं सुरु होतं... पूर्ण १२ दिवस लहान मुलं तर सोडा साधे दुसरे भिकारीही दिसले नाहीत. वाटलं, चला आपल्या तक्रारीने काहीतरी सकारात्मक फरक पडला असावा, चिमुकल्यांना पोलिसांनी या दुष्टचक्रातून बाहेर काढले असावेपण तसे नव्हते. एका सकाळी पुन्हा अगदी 5-6 वर्षांची नवी पोर हात पूर्ण लदलद जळालेल्या अवस्थेत पुढ्यात आली. पोलिस स्टेशनला जाऊन मी पुन्हा जरा आठवण देऊन आले त्याचा उपयोग पुन्हा ४ दिवस होईलही, पण अश्या किती चिमुकल्या नरकयातना भोगत राहणार आहेत, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. मी एकटीने तरी काय करावे? हवे तसे उत्तर सापडतच नाही.

नागपुरातील अनेक सिग्नल्सवर, रेल्वे स्थानकांवर, मंदिरात, लहान-मोठा ताजबाग अश्या कित्येक ठिकाणी लहान मुले भीक मागताना आढळतात. ऊन-पाऊस-गारवा कुठल्याही वातावरणात उघडे-नागडे, उपाशी-तापाशी, पिंजारलेले केस, जखमा-जखमा झालेलं अंग... वेदनेने-दुःखाने पिचलेले किंवा मग त्यापलिकडे गेलेले.  कुणाचे आहेत, कुठून आले, कुठे गेले ह्याचा कुणाला थांग पत्ता नसतो. त्यातील बरीच मुले ही माफिया लोकांनी गरीब वस्तीतून भीक मागण्यासाठी अपहरण केलेली किंवा परराज्यातून पळवून आणलेली असतात. या मुलांच्या संरक्षण आणि उत्तम नागरिक बनण्याच्या हक्काबद्दल सरकार, प्रशासन काही करणार आहे का?  की, रस्त्यावरच्या मोकाट श्वानांसारखी यांच्या आयुष्याला काहीच किंमत नाही?

 कित्येक आई-वडील याच रस्त्याने रात्रंदिवस प्रवास करीत असतील. यांच्या कुणाच्याच मनाला हे सारे प्रसंग कधीच खटकत नसतील का?  आम्ही कोडग्या मनांनी, उघड्या डोळ्यांनी हा तमाशा पाहत राहणार आहोत पाहतो आहोत. आमच्या संवेदना न मरो हीच प्रार्थना...!

अनेक वेळा सिग्नलवर दिसणाऱ्या, भीक मागणाऱ्या बालकांमागे केवळ दारिद्र्य नसून एक संघटित साखळी कार्यरत असल्याची चर्चा समाजात ऐकायला मिळते. काही प्रकरणांत मुलांना पळवून आणणे, त्यांना जाणीवपूर्वक असुरक्षित परिस्थितीत ठेवणे किंवा त्यांच्याकडून भीक मागवून आर्थिक फायदा मिळवणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे उघडकीस आलेले आहेत. भीक मागण्यासाठी लहान मुलांना जाणीवपूर्वक इजा करणे किंवा त्यांना मारणे हा केवळ गुन्हा नाही, तर मानवतेलाच काळीमा फासणारा प्रकार आहे. भारतात अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर भारतीय दंडसंहितेनुसार (IPC) कठोर कारवाई केली जाते. ही बाब केवळ कायद्याचा प्रश्न नाही; ती मानवी हक्कांची पायमल्ली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा, प्रशासन आणि बालकल्याण संस्था यांनी समन्वयाने आणि ठोस कारवाई करणे अत्यावश्यक आहे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती आणि नागरिकांची सतर्कता यामुळे अशा गुन्हेगारी साखळ्या मोडून काढणे शक्य आहे. प्रत्येक मुलाला सुरक्षित बालपण मिळणे हा केवळ सामाजिक नव्हे, तर नैतिक कर्तव्याचा विषय आहे.

काय करता येईल?

संशयास्पद घटना त्वरित पोलिस किंवा बालकल्याण समितीकडे कळवा.
• ‘
चाईल्ड हेल्पलाईन १०९८वर संपर्क साधा.
भीक देण्याऐवजी पुनर्वसन संस्थांना पाठिंबा द्या.
सजग नागरिक बना; दुर्लक्ष करू नका.

प्रशासन-पोलिस-संस्था यांनी संयुक्त कारवाई मजबूत करावी.

संवेदनशीलतेला कृतीची जोड देऊया. कारण प्रत्येक मूल भीक नव्हे, तर सुरक्षित, सन्मान्य आणि यशस्वी आयुष्याचा अधिकारी आहे. ते देण्यात आपण अपयशी ठरलो, तर ते केवळ व्यवस्थेचा नव्हे, तर समाज म्हणून आपल्या सामूहिक विवेकाचा पराभव ठरेल. एक पिढी सिग्नलच्या लाल दिव्यात अडकून राहू नये, एका पिढीचे बालपण हातात झोळी घेऊन रस्त्यावर हरवू नये, गुन्हेगारीकडे वळू नये; यासाठी आपण शांत राहू नये. नाहीतर उद्या इतिहास विचारेल तुम्ही पाहत होतातपण तुम्ही केलं काय?”

 

रश्मी पदवाड मदनकर 

7720001132 / 8208920440rashmi.aum15@gmail.com


(लोकसत्ता ''शहरनामा'' मालिकेत दि.२ मार्च २०२६ मंगळवार रोजी प्रकाशित लेख)  

वेड्यांच्या दुनियेतली शहाणी माणसे -


शहाण्या माणसांच्या गजबजाटात काही चेहरे असे असतात, जे पहिल्या नजरेत “वेडे” वाटतात. विस्कटलेले केस, मळकट कपडे, असंबद्ध बडबड, तटस्थ नजरा; आपण त्यांना एका क्षणात वेडे ठरवून मोकळे होतो. पण कधी थांबून त्यांच्या जगण्याच्या पायवाटा शोधल्या, त्यांच्या कथा ऐकल्या तर लक्षात येतं की वेडेपणाच्या आवरणाखाली काही विलक्षण शहाणपण जपलेलं असतं. या शहाण्या दुनियेत जी माणसं वेडी ठरवली जातात, तीच कधी कधी आपल्याला माणूसपणाचा आरसा दाखवतात. त्यांच्या अस्ताव्यस्त रूपामागे लपलेला असतो स्वाभिमान, कर्तव्याची जाणीव, नात्यांनी दिलेल्या जखमा आणि तरीही जगण्याची हट्टाग्रही ओढ... हे सगळं आपल्याला विचार करायला भाग पाडते. 

मनोविकार जडलेल्या आणि समाजाने वेड्या ठरवलेल्या माणसांना समाजाने अव्हेरली असली; तरीही त्यांच्यात माणुसकीची, विचारांची, चांगुलपणाची लव अखंड धगधगत असते. कुणी स्वच्छतेला आपला धर्म मानून झाडू हातात घेऊन रस्ते झाडतो; कुणी शब्दांविना शांतपणे उपाशीपोटी बसूनही आत्मसन्मान जपतो; कुणी भूतकाळाच्या चुकांची शिक्षा स्वतःलाच देत, तीन विटांच्या चुलीवर आपलं आयुष्य पुनःपुन्हा पेटवत राहते. त्यांच्याकडे मोठमोठ्या पदव्या नसतात, घोषणाबाजी नसते, अजेंडे नसतात; पण असतं ते जगण्याचं एक निर्मळ तत्त्वज्ञान. कदाचित म्हणूनच या लेखात आपण भेटणार आहोत अशाच काही “वेड्या” माणसांना ज्यांच्या वेडेपणात दडलेलं शहाणपण आपल्याला पुन्हा एकदा स्वतःकडे पाहायला भाग पाडेल.

माझ्या घरातून ऑफिसकडे निघाले की पहिल्यांदा लागतो तो नरेंद्रनगर पूल. आणि त्या पुलाखाली बऱ्याचदा एक माणूस बसलेला दिसतो. शांत… संयमी… जणू जगाकडे तटस्थ नजरेने पाहत. त्याच्या चेहऱ्यावर ना कुठली तक्रार, ना आकांडतांडव, ना मस्तीचा लवलेश. मिळालं तर खातो, नाही मिळालं तर तसाच शांत बसून राहतो. मिळाल्याचा माज नाही, आणि न मिळाल्याचा रागही नाही; साऱ्या जगावर सूड उगवण्याची तर गोष्टच नाही. तुम्ही बोललात तरी तो नुसताच पाहत राहतो. शब्द जणू त्याने वापरणं सोडून दिलं आहे. पण तुम्ही त्याच्या शेजारी काही ठेवून गेलात, तर ते तो कधीतरी भूक लागल्यावर शांतपणे खातो. रात्री परत येताना कधी कधी तेच डबे धुतलेले, उपडे करून त्याच्या शेजारी ठेवलेले दिसतात, नीटनेटके. त्या उपड्या डब्यांत त्याचे मूक आभार दडले असावे असे वाटते.

त्याच मार्गावर दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तुम्ही गेलात, तरी एक चित्र हमखास नजरेस पडतं. नरेंद्र नगर चौकाच्या अलीकडे, एका चहाच्या ठेल्याभोवती, एक कृश देहाची, पाठीत वाक गेलेली, भ्रमिष्ठ भासणारी महिला अखंड झाडू मारताना दिसते... ती जणू थांबायलाच विसरली आहे...रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, पुन्हा पुन्हा, न थकता, न कंटाळता. तिला काळजीपोटी, “मावशी, इतकं वाकून दिवसभर झाडू नका, त्रास होईल,” असं म्हटलं की ती थांबते, क्षणभर सरळ उभी राहते आणि अगदी मनापासून स्वच्छतेचं महत्त्व समजावून सांगते. तिच्या डोळ्यांत वेडेपणा नसतो; असतो तो केवळ प्रामाणिकपणा आणि कर्तव्यभाव. तिचं नाव आहे अलकाबाई कांबळे.

गजानन नगरहून देवनगरकडे जाताना डावीकडच्या एका अरुंद गल्लीत ती नेहमी दिसते; पिंजलेले केस, विरलेली साडी, मळकट अंग आणि आरपार पाहणारे डोळे. पहिल्या नजरेत “वेडी” वाटते. सतत काहीतरी बडबडत रस्त्याच्या टोकापासून टोकापर्यंत फेऱ्या मारत राहते. सगळे तिला “मालाबाई” म्हणून ओळखतात. पण सहज दिलेले पैसे किंवा खाणं ती घेत नाही. तीन विटांच्या चुलीवर ती स्वतः स्वयंपाक करते आणि आसपासची छोटी कामं करून धान्य मिळवते.

मालाबाईला दोन मुलं आहेत. अजनीत त्यांचं मोठं, तीन मजली घर आहे; पण तिच्यासाठी त्या घराचे दरवाजे बंद आहेत. कारण? लहान मुलं आणि नवरा असताना ती कुणासोबत तरी निघून गेली होती, असं लोक सांगतात. काही वर्षांनी ती परतली; पण तोवर मुलांनी आयुष्याचे चटके सोसलेले, त्यांनी तिला घरात घेतलं नाही. आणि मग रस्ता हाच तिचा पत्ता ठरला. हळूहळू तिच्या मनावर परिणाम झाला. लोकांनी तिला “वेडी” म्हणायला सुरुवात केली. पण त्या वेडेपणातही एक शिल्लक राहिलेला स्वाभिमान आहे. कदाचित ती तिच्या चुकांचं प्रायश्चित्त करत असेल; कदाचित जगण्याची शिक्षा भोगत असेल. दान नाकारणारी, श्रमाचा मोबदला स्वीकारणारी, स्वतःची चूल पेटवणारी मालाबाई अजूनही ताठ मानेने जगते.

वंजारी नगरच्या रस्त्यावरच्या एका बेकरीसमोर कट्ट्यावर बसलेले एक दिव्यांग आजोबा दिसतात . मी खाण्याचं एक पॅकेट दिलं, तर त्यांनी शांतपणे विचारलं, “Expiry date पाहिलीस का?” पाहिलं तर खरंच ते पॅकेट एक्सपायर झालेलं! त्या क्षणी त्यांच्या जागरूकतेचं आणि स्वाभिमानाचं आश्चर्य वाटलं. गप्पांत कळलं. ते अमरावतीचे, सरकारी नोकरीतून निवृत्त. मोठ्या आजारात पाय कापावे लागले आणि घरच्यांनी त्यांना मेडिकलमध्ये आणून सोडून दिलं. तेव्हापासून रस्ताच त्यांचा संसार. कुणाकडे भीक मागत नाहीत; कुणी दिलं तर खातात, नाहीतर उपाशी राहतात. पण बोलायला कोणी थांबलं, तर त्यांच्या शब्दांतून ज्ञानाची धार अजूनही तितकीच ओघवती वाहते.

हल्ली वारंवार असं ऐकू येतं की, आपण समाज म्हणतो ती आपल्याभोवतालची माणसं दिवसेंदिवस कोडगी, असहिष्णू आणि असंवेदनशील होत चालली आहेत; आणि दुर्दैवानं त्यात काही अंशी सत्यही दिसतं. काळ बदलतो तसं माणसाचं जगणंही बदलतं, पण या बदलात माणूस अधिक एकलकोंडा, आपलपोटी आणि स्वार्थी होत चालल्याची जाणीव वारंवार होते. प्रमोशन, इन्क्रिमेंट, अचिव्हमेंट, मोठं पॅकेज, परदेशात शिक्षण या स्वप्नांच्या मागे धावताना जगण्यातील साधेपण आणि मोठेपण दोन्हीही कुठेतरी हरवत चालल्यासारखं वाटतं. काहीजण तर दिखाव्याच्या फसव्या आभासात स्वतःलाच हरवून बसलेले दिसतात. आज कुणाच्या मृत्यूचं, कुणावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराचं जर समाजाला सोयरसुतक उरलं नसेल, तर मग एखाद्याच्या वेडेपणाचं किंवा त्यांच्या भुकेचं काय वाटणार? ही जाणीव मनाला खोलवर चटका लावते. कधी कधी निराशेची दाट छाया मनावर पसरते; आपण अशा क्रूर, निष्ठुर आणि फसव्या जगात जन्मलो आहोत का? पण विडंबन असं की, हीच ‘शहाण्यांची दुनिया’ म्हणून मान्य केली जाते. 

या सगळ्या कहाण्या मनात साचत जातात आणि एक प्रश्न सतत उभा राहतो या लोकांसाठी शासन नेमकं काय करतं? त्यांना निवारा केंद्रात, शेल्टर होममध्ये नेण्याचे प्रयत्न होतात का? कागदोपत्री योजना आहेत, पुनर्वसनाच्या तरतुदी आहेत. नागपुरात तर महापालिकेची सहा निवारा केंद्रे आहेत; काही वैयक्तिक पातळीवर, काही स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवली जातात. मग या रस्त्यावरच्या निवारा नसणाऱ्या माणसांकडे त्यांची नजर का जात नाही? की नजर जाते, पण हात पुढे सरकत नाहीत? की हात पुढे सरकतात, पण ही माणसं विश्वासाने तो हात धरायला तयार नसतात? काहींची ओळखच हरवलेली असते, काहींची कागदपत्रं नसतात, काही भावनिक जखमांनी इतकी विदीर्ण असतात की चार भिंतींचा आधारही त्यांना कैद वाटतो. प्रश्न फक्त व्यवस्थेचा नाही; तो आपल्या सामूहिक संवेदनांचा देखील आहे. आपण त्यांना पाहतो, क्षणभर हळहळतो, आणि पुढच्या वळणावर विसरून जातो. म्हणूनच कदाचित ते अजूनही रस्त्यावर आहेत... आपल्या शहाण्या समाजाच्या सावलीत, पण त्याच्या संवेदनशील नजरेच्या टप्प्याबाहेर.

या सगळ्यांचा विचार आला की मला मंगलेश डबरालच्या ओळी आठवतात...

''पागल होने का कोई नियम नहीं है

इसलिए तमाम पागल अपने अद्वितीय तरीके से पागल होते हैं

वे भूल चुके होते हैं कि पागल होने से

बचे रहने के कई नियम हैं....''


रश्मी पदवाड मदनकर

rashmi.aum15@gmail.com


(लोकसत्ता ''शहरनामा'' मालिकेत प्रकाशित लेख)





Monday, 2 March 2026

हिजाबपलीकडचा लढा : इराणमधील स्त्रियांचा विद्रोह

कालच्या इराणमधील घडलेल्या युद्ध घटनेच्या जवळजवळ महिनाभरापूर्वी तरुण भारत आकांक्षा पुरवणीसाठी लिहिलेली ही कव्हर स्टोरी... युद्ध, हिंसा किंवा हत्या यांच्या विरोधात आपले संस्कार असले तरी, कुणासाठी दया दाखवावी याचेही भान आपल्याला असले पाहिजे... हजारो माणसांचा जीव घेणाऱ्या एका क्रूर माणसासाठी आपला जीव तुटत असेल, तेव्हा त्या हजारो माणसांच्या अत्याचारात आपण त्याच्यासोबत होतो हा त्याचा अर्थ असतो.. असे असेल तर आपण स्वतःची तपासणी आधी केली पाहिजे... इराणची सत्ता नेस्तनाबूत होण्याआधी इराणची परिस्थिती काय होती हे समजून घेतले पाहिजे...


*********** 

इंट्रो -

जग फक्त मथळे स्क्रोल करत पुढे सरकत असताना, इराणच्या अंधारात एक अमानुष नरसंहार घडतो आहे. महिनोन्‌महिने चालू असलेल्या आंदोलनांवर सरकारने केवळ लाठीचार्ज किंवा अटकपुरते न थांबता थेट रक्तरंजित दडपशाहीचा मार्ग निवडला आहे. इंटरनेट बंदीच्या भिंतीआड हजारो लोकांचे आवाज दडपवले जाताहेत, गुदमरले जाताहेत, छायाचित्रे आणि व्हिडीओ बाहेर येणे थांबवले गेले आहे... म्हणूनच आतापर्यंत जगाला जे दिसत होते, ते फक्त “हिमनगाचा टोक” होते. आता जे सत्य हळूहळू समोर येते आहे, ते इतके भयावह आहे की, ते केवळ राजकारणाचा विषय न राहता संपूर्ण मानवतेसाठी एक गंभीर इशारा बनले आहे.


इराणमध्ये चालू असलेले महिलांचे आंदोलन हा क्षणिक उद्रेक नाही; तो 1979 पासून चालू असलेला, पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष आहे. प्रत्येक दशकात महिलांनी आवाज उठवला, प्रत्येक वेळी तेथील इस्लामिक सरकारने तो दडपला...पण तरीही त्यांनी हार मानली नाही. आज जे आंदोलन पेटले आहे, ते केवळ त्यांच्यासाठी पोशाखाचा प्रश्न नाही; ते अस्तित्व, स्वातंत्र्य आणि मानवी सन्मानासाठीची ऐतिहासिक लढाई आहे.


***  

बरोबर महिनाभरापूर्वी इराणमध्ये उसळलेले आंदोलन आता एखाद्या एकट्या घटनेपुरते मर्यादित राहिलेले नाही; ते अनेक वर्षांपासून साचलेल्या असंतोषाचा तीव्र उद्रेक आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन व अन्नधान्याच्या प्रचंड वाढलेल्या किमती, महिलांवरील निर्बंध, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची बंदी आणि सरकारी दडपशाही यांमुळे सामान्य जनता दीर्घकाळापासून संतप्त होती. मात्र नुकत्याच घडलेल्या एका स्थानिक घटनेमुळे पुन्हा जखमेवरची खपली निघाली, ठिणगी पेटली आणि हे आंदोलन काही दिवसांतच तेहरानसह इराणमधील अनेक प्रमुख शहरांमध्ये वेगाने पसरले.

या आंदोलनात सुरुवातीला विद्यार्थी, तरुण वर्ग आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. पुढे हळूहळू कामगार संघटना, शिक्षक, दुकानदार आणि मध्यमवर्गीय नागरिकही रस्त्यावर उतरले. घोषणांमधून केवळ आर्थिक मागण्याच नव्हे, तर राजकीय सुधारणा, मानवी हक्क आणि सत्ताधाऱ्यांच्या जबाबदारीची ठाम मागणी व्यक्त होऊ लागली. त्यामुळेच या आंदोलनाकडे सरकारने केवळ असंतोष म्हणून न पाहता, “सत्तेसाठी धोकादायक बंड” म्हणून पाहिले आणि त्यावर कठोर दडपशाहीची कारवाई सुरू केली.

आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल रस्त्यावर उतरवले. अनेक ठिकाणी लाठीचार्ज, अश्रुधूराचा मारा आणि थेट गोळीबाराचे प्रकार घडले. हजारो आंदोलकांना अटक करण्यात आली, अनेकांना बेपत्ता करण्यात आल्याचे आरोप झाले, तर काहींचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात न देता गुपचूप दफन केल्याच्या गंभीर तक्रारी पुढे आल्या. या सगळ्यावर कळस म्हणजे देशभरात लादलेली इंटरनेट बंदी; जेणेकरून व्हिडीओ, छायाचित्रे आणि प्रत्यक्ष साक्षी बाहेरील जगापर्यंत पोहोचू नयेत. तरीही अनेक सत्ये पुढे येत आहेत.  क्रूरतेचा भेसूर चेहेरा दिसतो आहे.

या इंटरनेट बंदीमुळे आतापर्यंत जे सत्य समोर आले आहे, ते फक्त “हिमनगाचा टोक” मानले जाते आहे. मानवी हक्क संघटना आणि निर्वासित इराणी कार्यकर्ते पुढे  येऊन सांगताहेत की प्रत्यक्ष मृतांचा आणि छळ झालेल्यांचा आकडा अधिकृत आकड्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असण्याची शक्यता आहे. तुरुंगांत अमानुष छळ, महिलांवर लैंगिक अत्याचार, आणि तरुणांना जबरदस्तीने कबुलीजबाब द्यायला लावण्याच्या कहाण्या हळूहळू बाहेर येत आहेत. थोडक्यात, गेल्या महिन्यात सुरू झालेले हे आंदोलन आता केवळ आर्थिक असंतोषाचे आंदोलन राहिलेले नाही; ते सत्तेच्या क्रूरतेविरोधातील एक व्यापक जनविद्रोह बनले आहे. आणि सगळं जग रिल्स स्क्रोल करत थांबले असताना, इराणच्या अंधारात घडणारे हे वास्तव मानवी इतिहासातील आणखी एक काळा अध्याय बनत चालले आहे.

इराणमध्ये आज जे आंदोलन सुरू आहे, ते केवळ एखाद्या एका घटनेतून उसळलेले नाही; ते 1979 पासून साचत गेलेल्या अन्याय, दडपशाही आणि मोडलेल्या स्वप्नांचा आर्त उद्रेक आहे. प्रत्येक दशकात सामान्य माणूस आशेने रस्त्यावर उतरला, बदलाची वाट पाहिली; आणि प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांनी रक्तपाताने त्या आशा चिरडल्या. तरीही ही जनता थकली नाही. भीतीच्या सावलीत जगत असतानाही असंतोषाची ठिणगी मनात जिवंत ठेवली. आज जे घडत आहे, ते केवळ राजकीय संघर्ष नाही, तर पिढ्यान्‌पिढ्या चाललेल्या वेदनेचा आवाज आहे आणि कदाचित या संघर्षातील आतापर्यंतचे सर्वात अस्वस्थ करणारे, प्रत्येक पाहणाऱ्या, वाचणाऱ्या, ऐकणाऱ्याच्या काळजाला चरे पाडणारे पर्व आहे.


इराणमधील आंदोलनांचा इतिहास:

1979 च्या इस्लामिक क्रांतीपूर्वी इराणचा इतिहास जगापेक्षा जरा आगळा होता. 20व्या शतकाच्या सुरुवातीस इराण फारसे आधुनिक राष्ट्र नव्हते; ब्रिटिश आणि इतर विदेशी ताकदींचा दबाव, राजाशाहीची असमानता, शेतकऱ्यांची अवस्था, नागरिकांच्या मूलभूत हक्कांची कमतरता हे सर्व समाजाच्या खोल रचनेत मुरलेले  होते. 1941 मध्ये शाह मोहम्मद रझा पहलवी यांनी सत्ता स्वीकारली आणि त्यांनी देशात आधुनिकतेचा आणि पाश्चिमात्याभिमुख विकासाचा मार्ग रेखाटला. शिक्षण, उद्योग, शहरीकरण, कला-संस्कृती यांना चालना मिळाली, महिलांना सार्वजनिक जीवनात अधिक स्वातंत्र्य मिळाले, शहरांमध्ये आधुनिक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. शिक्षणाने स्वातंत्र्य कळले, वैचारिक सुज्ञता वाढली आणि आर्थिक सुबत्ता देखील वाढू लागली.  

पण या विकासाच्या मागे एक वेगळं वास्तवही दडलेले होते. राजाशाही अधिक केंद्रीकृत आणि कठोर होती; जरी ती जनतेच्या भल्यासाठी असली, तरी सामान्य माणसाचा आवाज हळूहळू दडपला जात आहे अशी वल्गना पसरू लागली. देश विघातक लोकांनी संधी साधून अफवा पसरवल्या, सरकारच्या धोरणांमुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यात फरक वाढत असल्याचा भ्रामक संदेश पसरवला आणि जनतेत असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याच कारणाने विरोधकांना दबवण्यासाठी गुप्त पोलिसांचा वापर वाढला, आणि हळूहळू जनतेतून आवाज उठू लागला, हा आवाज वेळोवेळी मोठा आणि निर्धारयुक्त होत गेला.

या अपूर्ण स्वातंत्र्याच्या आणि भ्रामक अन्यायाच्या मिश्र भावनेत जनतेत “बदल हवा” अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. या अपेक्षा आणि आशा पाहता, 1979 मध्ये इस्लामिक क्रांती घडून आली. जनतेला वाटले की परिवर्तनासह आता न्याय, स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांची अपेक्षा पूर्ण होईल. परंतु हे स्वप्न दुःस्वप्न ठरावे असे इतिहासाने वळण घेतले; नव्याने आलेले धार्मिक शासन अधिक कठोर आणि अन्यायकारी आले.

महिलांवर बंधने लादली गेली, अभिव्यक्तीवर बंदी घालण्यात आली, विरोधकांवरील कारवाई आणि धर्मांध पोलिसांची सततची दहशत यामुळे जनतेत हळूहळू असंतोष साचत गेला. तेथील जनतेला त्यांच्या चुका उमगल्या, परंतु बदल घडवण्यासाठी खूप उशीर झाला होता. आज दिसत असलेला हा उद्रेक फक्त सध्याच्या घटनांचा नाही; तो असा अनेक दशकांपासून हिरावून घेतलेल्या स्वातंत्र्य, न्याय आणि बदलाच्या पुनर्प्राप्तीच्या भंगलेल्या स्वप्नांचा थेट परिणाम आहे.

1979 मधील इस्लामिक क्रांतीनंतर आलेल्या इस्लामिक धर्मांध सरकारच्या विरोधात इराणमधील जनतेने अनेकदा आंदोलन पुकारले. त्यात काही आंदोलनांनी केवळ इराणच नव्हे, तर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं.


1999: विद्यार्थी आंदोलन

पहिलं मोठं आधुनिक आंदोलन 8 जुलै 1999 रोजी तेहरानमध्ये विद्यार्थ्यांमुळे भडकलं. या आंदोलनाची सुरुवात एका दळणवळणाच्या कारणामुळे झाली होती; सुधारणावादी वृत्तपत्र “सालाम” सरकारने बंद केले होते. हे वृत्तपत्र राष्ट्राध्यक्ष मोहमद खातामी यांच्या सुधारणावादी गटाशी संबंधित होते, आणि त्याच्या बंदीने विद्यार्थी व युवा वर्गात प्रचंड असंतोष निर्माण केला. सुरुवातीला हे आंदोलन शांततेने सुरू झाले. विद्यार्थी रात्री विद्यापीठाच्या परिसरात जमा झाले, परंतु लवकरच सुरक्षा दल आणि धार्मिक मिलिशियांनी उग्र कारवाई करून त्यांच्यावर हल्ला केला. काही विद्यार्थ्यांना खोल्यांमधून बाहेर फेकले गेले, तर काही खोल्या जाळल्या गेल्याच्या घटनाही नोंदल्या गेल्या. या हिंसक प्रतिक्रियेने आंदोलन दडपण्याऐवजी तिव्रतेने मोर्चा रस्त्यावर पसरला. अंदाजानुसार 10,000 पेक्षा जास्त लोक तेहरानमध्ये आणि इतर शहरांमध्ये सहभागी झाले. हे आंदोलन सात दिवसांपर्यंत सुरू राहिले आणि विविध शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनात अनेक विद्यार्थी ठार झाले, दोन ते तीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले, तर सुमारे 1,200–1,500 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. काही विद्यार्थी गायब झाले, तुरुंगात मारहाण व अत्याचार झाले आणि विद्यार्थ्यांच्या अटकानंतर काही प्रकरणे अजूनही अपूर्ण आहेत, असे मानवी हक्क संघटनांनी नमूद केले.

आंदोलन थांबल्यानंतरही अनेक विद्यार्थी तुरुंगात ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली. सरकारने हिंसाचारात सहभागी काही अधिकाऱ्यांवर अत्यल्प शिक्षा केली आणि मूलभूत प्रशासकीय बदल टाळले. तरीही, या आंदोलनाने भविष्यातील आंदोलने, जसे की 2009 मधील Green Movement, सुरु होण्यासाठी मार्ग मोकळा केला होता.


2009: ग्रीन मूव्हमेंट

2009 मध्ये इराणमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर देशभरात एक प्रचंड राजकीय आंदोलन उसळले, ज्याला पुढे “ग्रीन मूव्हमेंट” म्हणून ओळख मिळाली. या आंदोलनाची ठिणगी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतफसवणूक झाल्याच्या आरोपातून पडली होती. विरोधी उमेदवार मिर होसैन मूसवी यांच्या समर्थकांचा दावा होता की मतमोजणीतील अनियमिततेमुळे जनतेचा खरा कौल दडपला गेला आणि प्रत्यक्षात मूसवीच विजयी ठरले होते. मात्र अधिकृत निकालात महमूद अहमदीनेजाद यांना मोठ्या फरकाने विजयी घोषित करण्यात आले.

जनतेची नाराजी वाढली आणि लाखो लोक; विशेषतः तरुण, शहरातील मध्यमवर्ग आणि सुधारवादी विचारांनी प्रेरित नागरिक  “माझे मतदान कुठे गेले?” अशी घोषणा करत तेहरान, इस्फहान, शिराझ आणि इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरले. हे आंदोलन शांततामय असले तरीही सुरक्षा दलांमधील इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आणि इतर राज्य समर्थित तक्त्यांनी कडक दडपशाही करून विरोधकांना ताब्यात घेतले, हजारो लोकांना अटक करण्यात आली आणि निकालाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. ग्रिन मूव्हमेंटचा रंग “हिरवा” म्हणून निवडला गेला कारण मूसवी आणि त्यांच्या समर्थकांनी हा रंग आशा, सुधारणा आणि शांततेचा प्रतीक म्हणून स्वीकारला होता. या आंदोलनाने इराणमधील अनेक दशकांपासून चालत आलेल्या लोकशाही मागण्या आणि प्रतिष्ठान विरोधी आवाजांना संघटित केले, पण राज्याच्या हुकूमशाहीला थोडक्यातही मोकळीक मिळू दिली नाही. त्यानंतरच्या वर्षांत आंदोलनाचे मुख्य नेते मिर होसैन मूसवी आणि मेहदी कर्रुबबी  बर्‍याच काळासाठी घरबंदिस्त ताब्यात ठेवले गेले, आणि ग्रीन मूव्हमेंटचे सार्वजनिक स्वरूप पुढे एक विशिष्ट काळासाठी मर्यादित झाले.

जरी हे आंदोलन दडपले गेले असले, तरी त्याने इराणी समाजात भीतीऐवजी प्रश्न विचारण्याची, आणि सत्तेला आव्हान देण्याची एक नवी चेतना निर्माण केली; जी पुढील दशकातील आंदोलनांची बीज ठरली...आणि 1979 च्या क्रांतीनंतर सर्वांत मोठ्या प्रमाणावर लोकशाही मागणी आंदोलनांपैकी एक म्हणून इतिहासात स्वतःची जागा निर्माण केली.


2017 ते 2019: आर्थिक आंदोलनं

2017 ते 2019 या काळात वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारामुळे देशभर आंदोलनं झाली. 2019 मध्ये इंधन दर वाढवल्यानंतर प्रचंड हिंसक आंदोलन भडकलं. सरकारने काही दिवस संपूर्ण इंटरनेट बंद केलं. मानवी हक्क संघटनांनुसार शेकडो लोक मारले गेले, पण अधिकृत आकडा खूपच कमी दाखवला गेला.

2022: महिलांच्या नेतृत्वाखालील उठाव

सप्टेंबर 2022 मध्ये 22 वर्षांच्या महसा (जिना) अमिनीला तेहरानमध्ये “मोरॅलिटी पोलिस” (Guidance Patrol) ने हिजाब चुकीच्या पद्धतीने घातल्याचा आरोप करून ताब्यात घेतले. काही अहवालांनुसार पोलिसांनी तिला पकडताना मारहाण केली आणि ताब्यात असलेल्या तिचा पाशवी छळ केला; त्यातच तीन दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात प्रचंड संताप उफाळून आला कारण इराणमध्ये हिजाब आणि महिला स्वातंत्र्यांविरुद्धच्या नियमांवर अनेक वर्षांपासून असंतोष होता.

महसा अमिनीच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यविधीत उपस्थित लोकांनी “Jin, Jiyan, Azadî” म्हणजेच “Woman, Life, Freedom” हा नारा लावून, निदर्शने करत निषेध व्यक्त केला, आणि हे आंदोलन पाहता पाहता इराणच्या अनेक शहरांमध्ये पसरले. महिलांनी सार्वजनिक ठिकाणी आपले हिजाब काढले ,जाळले. तरुण, विद्यार्थी, कामगार आणि विविध समुदायांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. ही लढाई केवळ हिजाब विरोधात नव्हती, तर महिलांच्या हक्क, मानवी स्वातंत्र्य आणि राजकीय दडपशाही विरोधातली एक सर्वसमावेशक आंदोलनाची ठिणगी होती.

प्रतिक्रिया म्हणून सरकारने देशभरात इंटरनेट ब्लॅकआउट लागू केला, सोशल मिडियावर निर्बंध आणले आणि मोठ्या संख्येने लोकांना अटक केली. अनेक शहरांमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना गोळीबार, अश्रुधूर आणि अन्य बल प्रयोग करून सैरभैर केले गेले; या दंगलीत हजारो लोक अडकले आणि सुमारे 551 पेक्षा जास्त नागरिक, ज्यात अनेक अल्पवयीनही आहेत, मारले गेले; असे मानवी हक्क संघटनांनी दस्तऐवजीकरण केले आहे. इस्लामिक धर्मांध सरकारने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई चालू ठेवली आणि मृत्यूनंतरही अन्यायकारक फाशी-शिस्तीचे निर्णय घेतले गेले. या आंदोलनाचे परिणाम आजही चालू आहेत; सरकारने हिजाब आणि मॉरॅलिटी पोलिसीच्या नियमांची अंमलबजावणी अधिक कडक केली आहे, आणि महिलांच्या व मुलींच्या हक्कांविरुद्ध राज्याचे नियंत्रण वाढले आहे.


इराणमधील महिलांचे आंदोलन: चार दशकांचा न संपणारा संघर्ष

इराणमधील महिलांचे आंदोलन हे एखाद्या एका घटनेतून उगवलेले नाही; ते 1979 च्या इस्लामिक क्रांतीपासून सुरू झालेल्या दडपशाहीविरुद्धचा चार दशकांचा अखंड संघर्ष आहे. क्रांतीनंतर नव्या धार्मिक शासनाने महिलांवर सक्तीचा हिजाब, पोशाखावर कडक निर्बंध, काम आणि शिक्षणातील मर्यादा, आणि कौटुंबिक कायद्यात मागासलेली धोरणे लादली. पूर्वी संपूर्ण स्वातंत्र्य अनुभवलेल्या महिलांना हे मेनी नव्हते. सुरुवातीपासूनच महिलांनी याला विरोध केला; पण प्रत्येक वेळी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला.  इस्लामिक क्रांतीनंतर अवघ्या काही आठवड्यांतच सरकारने महिलांसाठी हिजाब सक्तीचा केला. तेहरानमध्ये हजारो महिलांनी रस्त्यावर उतरून “स्वातंत्र्य आमचा हक्क आहे” अशा घोषणा दिल्या. हा इराणमधील महिलांचा पहिला मोठा संघटित विरोध होता. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढील वर्षांत हे कायदे आणखी कठोर केले.

1990 ते 2000 पर्यंतच्या काळात शांत पण सातत्यपूर्ण प्रतिकार चालूच होता. या काळात थेट रस्त्यावर उतरण्याऐवजी महिलांनी शिक्षण, साहित्य, पत्रकारिता आणि कायदेशीर लढ्याच्या माध्यमातून विरोध सुरू ठेवला. स्त्रियांनी स्त्रीहक्क संघटना स्थापन केल्या, मासिके काढली आणि कौटुंबिक कायद्यात सुधारणा करण्यासाठी मोहीमा राबवल्या. पण अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली, मासिकांवर बंदी आली, आणि संघटनांवर निर्बंध लादले गेले. पण महिला थांबल्या नाहीत, त्यांनी विविध मार्गांनी विरोधाची धार अधिक प्रखर करत नेली.

2014 ते 2018: ‘व्हाइट वेन्सडे’ आणि सार्वजनिक निषेध

सामाजिक माध्यमांवरून सुरू झालेल्या “White Wednesdays” या मोहिमेचा उगम सक्तीच्या हिजाबविरोधातील शांत पण ठाम प्रतिकारात होता. या मोहिमेअंतर्गत महिलांनी दर बुधवारी पांढरे कपडे परिधान करून किंवा हिजाब काढून आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. पांढरा रंग हा शांतता, विरोध आणि आशेचं प्रतीक मानला गेला. सरकारच्या कडक सेन्सॉरशिप असूनही VPN आणि गुप्त नेटवर्कच्या माध्यमातून हे संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.


सुरुवतीला वैयक्तिक पातळीवर दिसणारा हा निषेध लवकरच सामूहिक रूप धारण करू लागला. महिलांनी रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये, बसस्थानकांवर आणि अगदी कार्यालयीन परिसरातही उघडपणे हिजाब काढून निषेध नोंदवला. हा निषेध केवळ पोशाखाविरोधात नव्हता, तर महिलांच्या स्वायत्ततेवर, निवडीच्या अधिकारावर आणि सन्मानावर लादलेल्या बंधनांविरोधात होता. सरकारने या आंदोलनाला कठोरपणे चिरडण्याचा प्रयत्न केला. अनेक महिलांना “सार्वजनिक सुव्यवस्थेचा भंग” किंवा “इस्लामविरोधी कृत्य” अशा आरोपाखाली अटक करण्यात आली, दंड ठोठावण्यात आला, आणि दीर्घकाळ तुरुंगात डांबण्यात आले. काही प्रकरणांमध्ये तुरुंगातील अमानुष छळ, मानसिक अत्याचार आणि संशयास्पद मृत्यूंच्या घटना समोर आल्या. तरीही या दडपशाहीने आंदोलन दडपले नाही.

याच काळात महसा अमिनी या 22 वर्षीय तरुणीचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला आणि संपूर्ण देश पेटून उठला. “Woman, Life, Freedom” हा नारा इराणमधील महिलांच्या संघर्षाचं जागतिक प्रतीक बनला. महिलांनी हिजाब जाळले, केस कापले, आणि रस्त्यावर उघडपणे सत्तेला आव्हान दिलं. हा उठाव फक्त महिलांचा राहिला नाही; तो संपूर्ण पिढीचा बंड बनला.

2022 पासून सुरू झालेल्या “Woman, Life, Freedom” आंदोलनाचा परिणाम पुढील अनेक वर्षे चालत राहिला आणि 2023–2025 या अलीकडच्या काळात तो वेगवेगळ्या कारणाने धुमसत राहिला. सरकारने महिलांवर आणखी कडक कायदे लादले, विशेषतः हिजाब आणि मोरॅलिटी पोलिसच्या जबाबदाऱ्या अधिक मजबूत केल्या, जे महिलांच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण वाढवणारे होते. अनेक महिला हक्क कार्यकर्त्यांना विविध आरोपांखाली अटक करण्यात आली आणि लोकविरोधी कारवायांमध्ये दीर्घ शिक्षा ठोठावण्यात आल्या, यातून अनेकांनी तुरुंगातील किचकट परिस्थितीचा सामना केला.

महिलांनी मात्र स्वातंत्र्याची लढाई अजूनही हारली नाही; विद्यापीठांमध्ये, बाजारांत आणि सार्वजनिक ठिकाणी सत्तेविरुद्ध आवाज उठवत त्या आजही पुढाकार घेत आहेत. त्याचबरोबर इंटरनेटवर आणि VPN च्या माध्यमातूनही विरोधी संदेश प्रसारित केले जात आहेत, कारण सरकारने माहितीवर नियंत्रण आणण्याचे कठोर निर्बंध आणले होते.


सद्यस्थिती :-

ईराणमधील मौनात अंधारात एक नरसंहार घडतो आहे. इंटरनेट बंदी अजूनही मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, आतापर्यंत केवळ “हिमनगाचा टोक” दिसत होता, आता जे समोर येत आहे, ते कल्पनेपलीकडचे भयावह आहे.

अहवालांनुसार, आंतरराष्ट्रीय दबाव आणि अमेरिकेकडून आलेल्या इशाऱ्यांनंतर ईराणी सत्ताधाऱ्यांनी अधिकृत मृत्युदंड जाहीर करणे थांबवले आहे. त्याऐवजी आता थेट, कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया न करता हत्या केल्या जात आहेत. आंदोलकांना तुरुंगांमध्ये आणि पोलीस ठाण्यांच्या बंद दरवाज्यांआड मारले जात आहे, जेणेकरून न्यायालयीन कागदपत्रांचा मागही उरू नये. इतकेच नव्हे तर ईराणमधील अनेक शहरांमध्ये शवागृहांमधून मृतदेह जबरदस्तीने उचलले जात असल्याचे वृत्त आहे. इंटरनेट पुन्हा सुरू होण्यापूर्वी या नरसंहाराचे खरे प्रमाण लपवण्यासाठी, हे मृतदेह अज्ञात सामूहिक कबरींमध्ये घाईघाईने पुरले जात आहेत. सरकारी यंत्रणेतून गुप्तरीत्या बाहेर आलेल्या माहितीनुसार, एका बैठकीत मोहसेन हाशेमी यांनी सांगितले की लष्करी अंदाजानुसार मृतांचा आकडा ८०,००० पेक्षा अधिक आहे.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून आलेले अहवाल अंगावर काटा आणणारे आहेत :

एका डॉक्टरने एका रुग्णालयात एकाच वेळी २५० शिरच्छेद केलेले मृतदेह पाहिल्याचे सांगितले. सुरक्षा दल आंदोलकांच्या जननेंद्रियांवर गोळ्या झाडत आहेत, जेणेकरून कायमस्वरूपी, वेदनादायक इजा होईल. शस्त्रक्रियेनंतर बरे होत असलेल्या जखमी तरुणांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. वैद्यकीय कर्मचारी आणि नागरिकांना हुसकावून लावल्यानंतर, प्रत्येक जखमी कैद्याच्या डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली.

मानवीय आपत्ती

डॉक्टरांकडे कोणतीही औषधे, साहित्य उरलेले नाही. रक्तसाठा नसल्यामुळे रुग्ण मरत आहेत. हजारो लोक घरीच रक्तस्त्रावाने तडफडत आहेत, कारण रुग्णालये आता उपचाराची ठिकाणे न राहता अटक आणि मृत्यूचे सापळे बनली आहेत.

आपण गप्प बसू शकत नाही. संवेदनशील माणसांना त्रास होतोच. जगभरातील सत्ताधारी आपल्या उदासीनतेवरच पैज लावत असले तरी, जगाच्या दुसऱ्या टोकावर हे घडत असले, तरी ते मानवतेविरुद्धच आहे आणि अशा अन्यायासमोर अंतर हे  कोणतेही सबब ठरू शकत नाही. आज आपण डोळे मिटले, तर उद्या ही शांतता अपराध ठरेल. आपल्या हातात शस्त्र नाहीत, पण आवाज आहे. जागरूक राहणे, सत्य समजून घेणे, आणि अन्यायाविरोधात उघडपणे निषेध नोंदवणे इतकं करणे तरी आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण इतिहासाने नेहमीच एक गोष्ट सिद्ध केली आहे: अत्याचार करणाऱ्यांना बळ देणारी गोष्ट हिंसा नसते, तर सामान्य माणसांची शांतता असते.

आज विरोध दर्शवणे म्हणजे माणूस म्हणून उभं राहणं आहे. आणि म्हणूनच आपण बोललं पाहिजे....


*रश्मी पदवाड मदनकर*




Wednesday, 24 December 2025

एका ‘T’ची कहाणी - कायांतर

 #मुखपृष्ठ

#कायांतर ही केवळ एक कादंबरी नाही; ती आहे एका ‘T’ची कहाणी...LGBTQAI++ समुदायातील ‘T’, म्हणजेच ट्रान्सजेंडरची.
पण ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही. ही कहाणी आहे एका आयुष्याची....होरपळत, तावून-सुलाखून, वेदनांतून घडत अखेर स्वतःचं अस्तित्व उजळवून टाकणाऱ्या
एका ताऱ्यासारख्या जीवनप्रवासाची. आणि तितक्याच ठळकपणे, आपण जगत असलेल्या या काळाची… या एराची.
हा असा काळ आहे जिथे काही माणसांची असंवेदनशीलता इतर काही माणसांच्या आयुष्याची वाताहत करतात. ज्या समुदायाचा भारतीय इतिहास सांगतो की ते कधी राजाश्रय प्राप्त होते, आदराने आणि प्रतिष्ठेने.. नवरत्नातील रत्न म्हणून राजमहाली वावरत होते. तोच समुदाय आज उपेक्षित का झाला असेल बरं ? कुठे, कधी आणि कसे आपण समाज म्हणून चुकलो की ज्यांना कधी सन्मान मिळत होता, त्यांना आज दारोदार टाळ्या वाजवत फिरण्याची अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली?
आपल्या नाकारण्याची किंमत या समुदायाला कोणकोणत्या यातनांतून मोजावी लागते, हे जर आपण संवेदनशील नजरेने समजून घेतले, तर खूप काही बदलू शकते... आणि हा बदल दोन्ही बाजूंना समाधान देणारा ठरेल याची खात्रीही वाटते.
#कायांतर या कादंबरीच्या माध्यमातून हे समजून घेणं अधिक सोपं होईल असं प्रामाणिकपणे वाटतं.
माझ्या मनाला खोलवर स्पर्श करून गेलेल्या एका ट्रान्सजेंडर महिलेच्या आयुष्याचा हा लेखाजोखा आहे..पण जसाच्या तसा नाही; तर तिच्यासह या समुदायातील इतर अनेक घटकांचे, त्यांच्या वेगळ्या जगण्याचे, अनुभवांचे, संघर्षांचे आणि जगण्यातल्या सूक्ष्म कंगोऱ्यांचे संवेदनशील चित्रण यात गुंफले आहे.
वास्तववादी आशय असलेली ही चरित्रात्मक कादंबरी
वाचकांच्या मनात स्थान मिळवेल, त्यांना विचार करायला भाग पाडेल आणि कदाचित थोडं अधिक माणूसही बनवेल अशी मनापासून आशा आहे.



''कायांतर'' कादंबरीच्या निमित्ताने...

 समाजात #तृतीयपंथी व्यक्तींविषयी काळानुसार असंख्य #कथा निर्माण होत गेल्या... काही अफवा, काही अर्धसत्य तर काही पूर्वग्रहांनी ग्रसित. या कथांनी त्यांच्या भोवती एक धूसर, अंधुक वलय निर्माण केलं. परंतु त्या धुक्याच्या पलीकडे, जरा जवळून पाहिलं की कळतं; हा समुदाय अतिशय भावनाशील-संवेदनशील आणि माणुसकीच्या नात्यांना मायेने जपणारा आहे. #नव्या_येऊ_घातलेल्या_पुस्तकाच्या_निमित्ताने

भूक भागवण्याचा आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात अनेक तृतीयपंथीना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते, आयुष्यभर नरकात भोगाव्या इतक्या दुःखयातना भोगाव्या लागतात. हे सगळं फक्त एवढ्यासाठी कारण समाज त्यांना स्वीकारत नाही.. हे किती दुर्दैवी आहे. आज या बाबत दोन्ही बाजूने जागृती होत असली, बदल घडत असला तरी पूर्ण परिवर्तन घडायला अनेक युगे जावी लागणार आहेत. माझं येऊ घातलेलं हे नवं पुस्तक #कायांतर लिहीत असताना, अनेक तृतीयपंथींच्या भेटी घेतल्या आणि मनाला स्पर्शून जाणारे, हृदय पिळवटून टाकतील असे अनुभव ऐकायला मिळाले. ते ऐकताना आपण कुठल्यातरी वेगळ्याच जगाच्या कहाण्या ऐकत आहोत असे वाटू लागते; कारण आपल्या जगात, आपल्या भोवताल सगळं आलबेल असतं; किमान या स्तरावरचा संघर्ष तरी नसतो. इतकं सगळं भोगुनही, आयुष्याला झुंज देणाऱ्या या व्यक्तींच्या डोळ्यांत एक वेगळंच तेज दिसतं, तावून सुलाखून, संघर्षांनी घणाघात घालून पैलू पडलेलं. स्वतःच्या अंगांगावर घाव झेलून सोलून निघालेलं पण तरीही इतरांच्या वेदना ओळखणारं. स्वतःच्या जखमा दडवूनही इतरांच्या दुःखाना आधार देण्याची त्यांची तयारी असते, कसलाही संकोच न बाळगता ते सदैव तत्पर असतात. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून त्यांना वारंवार दूर ठेवण्यात आलं, तरीही संकटाच्या क्षणी त्याच माणसांच्या मदतीसाठी ते पुढे येताना दिसतात; कुठे वाद निर्माण झाला तर तेच शांततेचा दिवा पेटवतात; कुणी अडचणीत सापडलं तर हात धरून सांभाळून उभं करतात. त्यांचं वागणं ही केवळ मदत करण्याची कृती नसते; ती त्यांच्या मनातील खोलवर वाहणाऱ्या मानवतेची प्रकट रूपं असतात. जगाने त्यांच्याभोवती गैरसमजांच्या चौकटी उभ्या उभ्या केल्या, पण त्यांनी माणुसकीतील ऊब कधीच गमावली नाही. उलट, परिस्थिती तापली की तेच शांततेचा शिडकावा करून लोकांना एकत्र आणणारे ठरतात.
यांच्याबाबत अनेक सत्य आहेत. त्यातले काही अनुभव ''कायांतर'' कादंबरीच्या निमित्ताने तुमच्याशी शेअर करावे वाटतात, (या कथा पुस्तकात नाहीत.. पुस्तकात एक वेगळीच अधिक गहिरी सत्यकथा आहे. आता पोस्ट करत असलेल्या कथा केवळ या समुदायांना मानवंदना देण्यासाठी)
२०१५ च्या चेन्नई पुरात संपूर्ण शहर पाण्यात बुडालं होतं. हजारो लोक घरी अडकले होते. वीज खंडित झाल्याने सर्वत्र अंधार, भीती आणि अनिश्चितता वाढत होती. अशा कठीण वेळी मदतीसाठी कोण येईल याचीच शंका आणि धास्ती अनेकांच्या मनात होती.
पण समाजाकडून अनेकदा उपेक्षित ठरवलेला तृतीयपंथी समुदाय मात्र सर्वांत आधी मदतीला पुढे आला होता. प्रत्यक्ष पुराच्या पाण्यात उतरून कित्येकांचे जीव त्यांनी वाचवले होते. स्वतःंच्या छोट्या-छोट्या घरात जागा कमी असताना देखील, अनेक ट्रान्सजेंडर महिलांनी पुरग्रस्तांना आसरा दिला. पाणी, अन्न, कपडे जे काही त्यांच्या हाताशी होतं ते त्यांनी इतरांना वाटून दिलं होतं. काहीजण पावसात भिजत, गुडघाभर पाण्यातून चालत अडकलेल्या कुटुंबांपर्यंत पोहोचले. कुणाच्या हातात औषधं होती, कुणी अन्न घेऊन पोचलं होतं, तर LGBTQ+ समूहांनी एकत्र येऊन, मिळेल तसं साहित्य जमवून पुरग्रस्तांपर्यंत पोचवलं.
या समुदायाला स्वतःलाच राहत छावण्यांमध्ये अनेकदा जागा मिळत नव्हती. तरीही त्यांनी स्वतःच्या अडचणींपेक्षा इतरांच्या संकटाला प्राधान्य दिलं. त्या दिवसांत तृतीयपंथी समुदायाने खऱ्या अर्थाने मानवतेचं काम केलं. भीती आणि गोंधळाच्या काळात त्यांनी दाखवून दिलं, माणसाची ओळख, रूप किंवा नावाने नाही, तर त्याच्या माणूसपणाच्या कर्माने आणि कृतीने केली जाते. त्यांची मदत, त्यांची संवेदनशीलता आणि संकटातही धैर्याने उभं राहण्याची ताकद हे सगळं समाजाने मान्य करायलाच हवं. कारण खऱ्या मानवतेचा अर्थ मोठ्या शब्दांत नसतो, तो अशा लोकांच्या छोट्या पण मनाला भिडणाऱ्या कृतींमध्ये असतो.



तृतीयपंथी समाजाकडे वर्षानुवर्षे एकाच नजरेतून पाहण्याची आपली सवय झाली आहे. पण कधीतरी तो चष्मा बदलून पाहण्याची गरज आहे. कारण या समुदायाकडे शिकण्यासारखं, समजून घेण्यासारखं आणि मनापासून स्वीकारण्यासारखं खूप काही आहे. आपण समाज म्हणून त्यांना नाकारण्यासाठी हजार कारणं सहज शोधतो; त्यांच्या चुका मोठ्या करून पाहतो, पण त्यांच्या चांगुलपणाकडे पाहण्याइतपत थांबत नाही. उलट, त्यांच्या मनातील माणुसकी, त्यांची निस्वार्थ मदत, त्यांचं निरपेक्ष प्रेम याकडे लक्ष दिलं तर त्यांना स्वीकारण्याचीही अनेक कारणं आपल्याला सापडतील. हा दिवस आपण केव्हा मान्य करू, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून मोठे ठरू.


रश्मी पदवाड मदनकर

Featured post

आपल्या संवेदना न मरो...

  शताब्दी चौकात दोनदोनच्या जोडीत त्या चौघी आळीपाळीने दिसत राहतात . पहिली जोडी आहे १३ - १४ वर्ष वयाची आणि दुसऱ्या दोघी असाव्यात २२ - २५ तल्...