Tuesday 19 March 2024

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...


काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली
ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली !

झाडाचे जाडे खोड खोलले, सोलले, रंगवले
घराच्या दृश्य भागात निगुतीने सजवले.

इतर फांद्यांचा कोंडा केला, चुलीत घातला  
चुलीवरच्या चविष्ट मटणावर मग यथेच्छ ताव मारला.

मी म्हणाले,
अहो दादा, तुम्ही झाडे तोडायला नको होती
पक्ष्यांची घरटी अशी मोडायला नको होती
बाग बघा कशी ओकीबोकी झाली
परिसरातली आपल्या हो रयाच गेली...रयाच गेली

दादा म्हणाले
ताई जरा इकडे या, मी काय म्हणतो कान देऊन ऐका..  

तुम्हाला नसेल माहित, मी पर्यावरणवादी आहे
तुम्हाला नसेल माहित मी पर्यावरणवादी आहे
आणि काय सांगू अहो, निसर्गाच्या बाबतीत जरा जास्तच दर्दी आहे...

तशी माझी नजर पारखी आहे बरे
निसर्गात दिसतात मला चमचमते हिरे
हिऱ्यांना पेहेलू   पाडल्याशिवाय चमक येते होय?
आणि हिऱ्यांशिवाय सौन्दर्याची मजा येते होय ??  

वृक्षारोपण तर मी दरवर्षीच करतो..  
आणि त्या वाढत्या वृक्षामध्येच सौन्दर्य घेरतो.

काय माहित वृक्षाला त्याची जागा कुठे असते
बघा आमच्या बंगल्यात कसा पठ्ठा शोभून दिसते

उभे राहून झाड थकले होते फार
म्हणून आम्हीच झालो त्याचा तारणहार

मी म्हणलं
बस झाले थांबा! तुमचे म्हणणे पटले
रजा द्या आता, तुमच्यासमोर हात टेकले
तुमच्यासमोर हात टेकले !  

 

 



Thursday 15 February 2024

चिमुकल्या देशाची रोमहर्षक कहाणी -

 


खाली फोटोत दिसतोय तो एक अक्खा देश आहे. जगातला सगळ्यात छोटा देश. हा देश आहे जो उत्तर समुद्रात, इंग्लंडच्या किनाऱ्यापासून सुमारे 12 मैलांवर दूर स्थित आहे. या देशाची संख्या एकेकाळी ५० होती आता आहे फक्त २७ माणसे.

या छोट्याश्या देशाची कहाणी देखील तशीच अजिब आणि रोमहर्षक आहे. पॅडी रॉय बेट्स एक निवृत्त ब्रिटीश सैन्य अधिकारी यांनी 1967 मध्ये त्यांच्या कुटुंबासह एचएम फोर्ट रफ्सजवळील एक निरुपयोगी नौदलाचा किल्ला ताब्यात घेतला जो एकेकाळी लष्करी किल्ला म्हणून वापरला जात होता आणि त्याला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले.

असा देश निर्माण करण्याची कल्पना एका वेडातून साकार झाली, पॅडी ह्यांनी त्यांच्या बायकोला वाढदिवसाची भेट द्यायला म्हणून हे पाऊल उचलले होते. पुढे त्यावर फार वाद निर्माण झाला आणि पुढे शिक्कामोर्तब झाले. 1966 साली ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, बेट्सने एक पडीत टॉवर घेतली आणि ती प्लॅटफॉर्मवर नेली. मग, ग्रॅपलिंग हुक, दोरी आणि त्याच्या बुद्धीचा वापर करून, तो प्लॅटफॉर्मच्यावर चढला आणि त्यावर हक्क घोषित केला. तो म्हणाला होता कि त्याने आपल्या पत्नीसाठी हा किल्ला भेट म्हणून जिंकला आहे.

गिफ्ट म्हणजे त्यात बायकोला आवडण्यासारखे खरतर काहीही नव्हते.. मात्र पॅडीच्या डोक्यात भविष्यासाठी काही वेगळ्या योजना होत्या. 1940 च्या दशकाच्या सुरुवातीला खरतर दोन काँक्रीटच्या खांबांवर उभारलेला तुटका-फुटका फोर्ड म्हणजे हिज मॅजेस्टीज फोर्ड (HMF) एक रफ टॉवर होते जे टेम्सचे रक्षण करणारी चौकी म्हणून कार्यरत होती. ५ टॉवरपैकी हाही एक टॉवर होता. हे दोन पोकळ काँक्रिट टॉवर्सच्या वर समुद्रापासून सुमारे 60 फूट उंचीवर असलेल्या दोन टेनिस कोर्टच्या आकाराचे होते. त्यावेळी यावर शंभरहून अधिक ब्रिटिश सैनिक संपूर्ण शस्त्रांसह तैनात असत.




1950 च्या दशकाच्या उत्तरार्धात, जर्मनच्या पराभवानंतर ब्रिटिश आर्मीने हा किल्ला सोडला आणि त्यानंतर अनेक वर्ष त्यांना ह्याचा विसर पडला. हीच संधी साधून पदी रॉयने त्यावर स्वतःचा दावा ठोकला. मुळात रॉय बेट्स हा एक कर्मठ माणूस होता ज्याने प्रथम स्पॅनिश गृहयुद्धात आणि नंतर WWII दरम्यान उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व आणि इटलीमध्ये 15 वर्षांचा असल्यापासून लष्कर सेवा केली होती. तो कुठल्याही संकटांना घाबरत नसे. उलट  रॉय बेट्सला नोकरशहांनी काय करावे हे जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा तो जिद्दीला पेटला आणि न घाबरता त्याने या किल्ल्यावर मालकीचा दावा ठोकला पुढेही सरकारच्या इशाऱ्यांकडे धमक्यांकडे दुर्लक्ष करत तो त्याच्या या छोट्याश्या देशासाठी काम करीत राहिला आणि परिणामी सीलँडची प्रतिष्ठा जगभरात वाढत गेली.

या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली ती एका रेडिओ स्टेशनच्या अधिकारशाहीने आणि ती मोडून काढण्याच्या पॅडीच्या जिद्दीमुळे. त्या वेळी, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) हे एकमेव कायदेशीर रेडिओ स्टेशन होते आणि रॉयल चार्टरमुळे लोक काय ऐकू शकतात आणि काय ऐकू शकत नाहीत यावर त्यांचे पूर्ण नियंत्रण होते. त्यांना आव्हान देत बेट्सने या रिकाम्या पडलेल्या, पडीक किल्ल्यावर त्याचे पायरेट रेडिओ स्टेशन सुरू केले, लोकांना आवडेल ते संगीत ऐकता याय्ला पाहिजे एवढाच त्याचा हेतू होता. मात्र सरकारने त्याच्या कामात अडथळे आणून त्याचे रेडिओ स्टेशन इतरांपर्यंत पोचू नये अशी सोया केली. त्यानंतर बेट्स ती जागा सोडून निघून जाईल असे ब्रिटिशांना वाटले. मात्र झाले काहीतरी वेगळेच. पॅडीने त्या किल्ल्यावरच स्वतंत्र देशाचा दावा ठोकला.

असे म्हटले जाते की एका रात्री मित्रांसोबत आणि पत्नीसोबत गप्पा मारत असताना बेट्सने निश्चय केला आणि 2 सप्टेंबर 1967 रोजी किल्ल्याला “प्रिन्सिपॅलिटी ऑफ सीलँड” असे नाव दिले. तो त्याच्या पत्नीचा वाढदिवस होता. काही काळानंतर त्याचे कुटुंब त्याच्याबरोबर या जगातल्या सर्वात लहान देशात राहायला गेले
सफोकच्या किनाऱ्यापासून अवघ्या सात मैलांवर, सागरात असलेल्या या अपरिचित सार्वभौमत्वाच्या स्थापनेने यूके सरकारचे लक्ष वेधून घेतले. देशभर खळबळ माजली.  ब्रिटीश पुढारी अधिकारी या घटनेमुळे अस्वस्थ झाले. त्यांनी सीलँडचे वर्णन "आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बेट म्हणून मान्यता नसलेल्या संरचनेवर बेकायदेशीर कब्जा" असे केले..आणि त्यांनी उर्वरित चार चौक्या उद्धवस्त केल्या जेणेकरून पुन्हा कोणी असा दावा ठोकू नये. दुसरीकडे, बेट्स सर्व संकटांना सामना करायला तयार आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम होते की सीलँड हा त्याचा स्वतःचा देश आहे तो त्यांनी संघर्षाने जिंकला आहे आणि तो त्याचा योग्य नेता आहे.

1978 मध्ये, अलेक्झांडर गॉटफ्रीड अचेनबॅच नावाच्या एका पश्चिम जर्मन व्यावसायिकाने स्वत: ला सीलँडचे "पंतप्रधान" घोषित केले आणि सत्तापालट केला.
कौटुंबिक आणीबाणीचा सामना टाळण्यासाठी बेट्सने कुटुंबासह सीलँड सोडले होते आणि त्याच्या अनुपस्थितीत, अचेनबॅच आणि काही जर्मन आणि डच भाडोत्रींनी हा किल्ला म्हणजे नवा देश ताब्यात घेतला.

त्यांनी बेट्सचा मुलगा प्रिन्स मायकेलला ओलीस ठेवले आणि त्याला चार दिवस कोंडून ठेवले. बेट्सने त्वरीत राज्य परत घेण्यासाठी माणसांना एकत्र आणलं. एक संघ तयार केला. युद्धदरम्यान अचेनबॅचच्या गटातील बरेच लोक पळून गेले, परंतु बेट्सने अचेनबॅचला ओलीस ठेवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा यूकेच्या राजदूताने बेट्सशी वाटाघाटी केली तेव्हा कुठे त्याने शेवटी अचेनबॅकची सुटका केली.

1980 च्या दशकात, ब्रिटीश सरकारने सीलँडच्या दाव्यांची कोणतीही वैधता काढून टाकण्यासाठी आपल्या प्रादेशिक अधिकारांचा विस्तार केला. तरीसुद्धा, बेट्सने सीलँड हा स्वतंत्र देश असल्याचे ठामपणे सांगत असून राहिला. सीलँडचे चलन, पासपोर्ट आणि स्टॅम्प जारी करणे ही प्रक्रिया त्याने अधिक प्रखर केली. स्वतःचा ध्वज देखील त्याने तयार केला. दुर्दैवाने, 1990 च्या दशकात, लोकांनी काही गुन्हेगारी क्रियाकलापांसाठी वापरल्यामुळे सीलँडला त्याचे पासपोर्ट मात्र रद्द करावे लागले.

2006 मध्ये प्लॅटफॉर्मवर विध्वंसक आग लागली आणि मुख्य पॉवर जनरेटरचा नाश झाला, अनेकदा अनेक संकटं आलीत. सीलँडवर यूके सरकारकडून भाडोत्री आक्रमण आणि सतत धमक्या आल्या, परंतु ते ठाम राहिले, ही लोकं डगमगली नाहीत. सीलँड आजही तेथे आहे आणि मायकेल बेट्स आणि त्यांचे कुटुंब सीलँडच्या कल्याणात गुंतलेले आहेत आणि ते स्वतंत्र देश म्हणून चालवतात. त्यांनी प्लॅटफॉर्मवर पूर्णवेळ सुरक्षा देखील स्थापित केली आहे.




या स्वतंत्र रियासतची वेबसाइट देखील आहे आणि खर्चाला मदत करण्यासाठी नाणी, पॅचेस आणि टी-शर्ट यांसारखी स्मृतिचिन्हे ते विकतात. आश्चर्यकारकपणे, समुद्राच्या मध्यभागी असलेल्या अशा लहान संरचनेने 50 वर्षांहून अधिक काळ त्याचे सार्वभौमत्व टिकवून ठेवले आहे हे आश्चर्य आहे.
दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा रक्षक किल्ला म्हणून सुरू झालेला एक पडीक टॉवर पुढे एक कौटुंबिक प्रकल्प आणि त्याही पुढे जाऊन एक स्वतंत्र राष्ट्र बनला. खडतर भूतकाळ असूनही, सीलँड कधीच डगमगला नाही. तो देश अजूनही सुरूच आहे आणि जगभरातील सर्वात लहान देश म्हणून अनौपचारिकरित्या का होईना तो ओळखला जातो; आणि आजही ह्या देशाचा रोमांचक इतिहास जगभरातल्या लोकांना आकर्षित करीत राहतो..

Thursday 25 January 2024

जगातील सर्वात घाणेरडा माणूस-अमो हाजीचा आंघोळ केल्याने मृत्यू -

 #IntrestingStory #worldsdirtiestman #Iran

सध्या थंडीचे दिवस आहेत आणि फेसबुकवर अनेकदा अनेकजण आंघोळ न करण्यावरून जोक करताना दिसतात. म्हणजे या दिवसात रोज रोज आंघोळ केली नाही तरी फार फरक पडत नाही अशी जवळ जवळ मान्यता असल्यासारखे लोक बोलतात. कुणी गमतीने म्हणतात आज आंघोळीची गोळी घेतलीय. कुणी म्हणतात अंगावर चार थेम्ब शिंपडून घ्यावे. बर्‍याच लोकांनी त्यांच्या आयुष्यात अशी वेळ देखील अनुभवली असेल जेव्हा आंघोळ करणे हे सर्वोच्च प्राधान्य नव्हते. त्याहून महत्वाची कामे होती, आजारपण वगैरे.

आंघोळीशिवाय काही दिवस चालूही शकत असेल पण जेव्हा तुम्हाला एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ आंघोळीशिवाय होतो तेव्हा गोष्टी थोड्या चिंताजनक आणि दुर्गंधीयुक्त होऊ लागतात, आणि अश्यात एखाद्याने वर्षभर आंघोळ केली नाही तर काय होईल ? अनेक वर्ष ? किंवा अगदी 67 संपूर्ण वर्षे?

#अमोहाजी या नावाने ओळखल्या जाणार्‍या इराणी माणसाची ही जीवनपद्धती होती, ज्याला “जगातील सर्वात घाणेरडा माणूस” म्हणूनही ओळखले जाते.


अमो हाजी (20 ऑगस्ट, 1928 - 23 ऑक्टोबर, 2022) यांनी आपले संपूर्ण आयुष्य इराणमधील देझ गाह गावात व्यतीत केले. त्याचे खरे नाव माहित नाही, आणि त्याचे अमो हाजी हे प्रत्यक्षात एक टोपणनाव आहे ज्याचे भाषांतर "जुना टाइमर" असे आहे.




अर्ध्या शतकाहून अधिक काळ, अमौ हाजी एक संन्यासी म्हणून जगला, जो कधीही आंघोळ करत नव्हता, हाजी शहराच्या काठावर एका सिंडर ब्लॉकच्या झोपडीत राहत होता, तो रस्त्यावरच जेवायचा आणि पाईपमधून जनावरांचे शेण काढायचे काम करायचा. अमो हाजीच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल फारसे माहिती नाही, परंतु त्याने घोषित केले की त्याने हृदयविकाराचा त्रास सहन केल्यानंतर संन्यासी म्हणून आपले जीवन सुरू केले आहे. आंघोळ न करण्याचे त्याचे कारण म्हणजे साबण आणि पाण्याने शरीर धुतल्याने रोग होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकर मरण येते असे तो म्हणत. हा विश्वास इतका दृढ होता की त्याने 60 वर्षांहून अधिक काळ आंघोळ केली नाही, त्याची त्वचा धूळ, माती आणि अगदी पिकलेल्या जखमांनी भरलेली असायची. अमौ हाजी हा गावकऱ्यांसाठी अतिशय ओळखीचा माणूस होता. अनेक दशके अंग न धुतल्यामुळे त्याची त्वचा जवळजवळ एकसमान राखाडी-तपकिरी रंगाची झाली होती आणि त्याचे केस विचित्र दिसायचे. तो अंघोळ करत नसला तरी त्याचे हे जगावेगळे सौंदर्य टिकविण्यासाठी तो त्याचे डोके आणि दाढीचे केस आगीत जाळून टाकण्यासाठी ओळखला जात असे. त्याच्या आंघोळीची भीती ही एकमेव गोष्ट अमो हाजीला इतर समाजापासून वेगळे ठरवणारी नव्हती, तर त्याचा आहार आणि छंद देखील विचित्र-आणि घृणास्पद-लक्ष वेधण्यासाठी पुरेसे होते. आंघोळ करताना हाजीला पाण्याची भीती वाटायची, पण पाणी पिण्याच्या बाबतीत तसे नव्हते. हायड्रेटेड राहण्यासाठी तो अनेकदा न धुतलेल्या, घाणेरड्या टिन डब्यातून मिळेल तिथून दिवसातून ५ लिटर पाणी प्यायचा. कुणीही देऊ केलेले अन्न तो नाकारायचा आणि स्वतः शोधून ताजे कच्चे अन्न, कच्चे मांस, कधीकधी अगदी सडलेले मांस तो खात असे. त्याला स्मोकिंग आवडत असे त्याच्याजवळ असलेल्या एका पुरातन पाईपमध्ये तो प्राण्यांची वाळलेली विष्ठा टाकून स्मोक करायचा आणि एकावेळी अनेक सिगारेट ओढत असल्याचे त्याचे फोटो देखील उपलब्ध आहेत.






सगळ्यात अषाचार्याची गोष्ट म्हणजे हाजी अविश्वसनीयरित्या 94 वर्षांचे आयुष्य जगला आणि त्यांच्या मृत्यूनंतर अंतिम तपासणीत त्याला कुठलाही रोग नसल्याचे आणि त्यांची तब्येत चांगली असल्याचे घोषित करण्यात आले..आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गलिच्छ वापर, घाण पाणी आणि कुजलेले मांस अमो हाजीला कधीच आजारी बनवत नव्हते . मरेपर्यंत तो निरोगी होता. त्याला खरोखर आजारी बनवले असेल ते म्हणजे त्याचे इतक्या काळातील पहिले स्नान. वयाच्या 94 व्या वर्षी, काही गावकऱ्यांनी दयाळू दृष्टीकोन दाखवला आणि अमो हाजीला 67 वर्षांमध्ये आग्रहाने त्याची पहिली आंघोळ घातली.आंघोळीनंतर तो आजारी पडला आणि काही महिन्यातच त्याचे निधन झाले.

त्याच्या मृत्यूपूर्वी, तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील पॅरासिटोलॉजीचे प्रोफेसर डॉ. घोलामरेझा मोलावी यांनी हाजी यांच्यावर चाचण्या केल्या होत्या, ज्यामुळे त्याची अशी जीवनशैली असूनही त्यांच्या दीर्घायुष्याची आणि चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली शोधण्यात आली होती. डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की अमौ हाजी इतकी वर्षे अस्वच्छ परिस्थितीत राहिल्यामुळे खूप मजबूत रोगप्रतिकारक शक्ती विकसित करू शकला, या मजबूत रोगप्रतिकारक शक्तीने त्याला अत्यंत अविश्वसनीय परिस्थितीतही निरोगी राहण्यास मदत केली.




एकंदरीत, अमौ हाजी एक निरुपद्रवी माणूस होता ज्याला कधीही नियमात जगण्यात किंवा स्वच्छतेत रस नव्हता. 67 वर्षांतील त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या आंघोळीमुळे त्याचा मृत्यू झाला की नाही याची खात्री नाही, परंतु हे लक्षात येतंय की तो खूप दीर्घ आणि स्वतःच्या नियमांवर एक आनंदी, मनोरंजक जीवन जगला.

Rashmi Padwad Madankar

Sunday 31 December 2023

टाइम बँक

 




एक सुंदर संकल्पना वाचनात आली, अतिशय आवडली आणि पटली देखील. 

असं म्हणतात आपला देश हा सध्या सगळ्यात तरुण असणारा देश आहे. दुसरे आजही कुटुंबव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याने टोकाची वाईट परिस्थिती आपल्या देशात उद्भवली नाहीये आणि निकटच्या काळात उद्भवणाराही नाही, तरीही मी वाचलेली ही व्यवस्था एक चांगली संकल्पना आहे. इतर देशांची  स्थिती याबाबत जरा वाईट आहे. बहुतांश देशात कुटुंबसंस्थाच ढासळलेली असल्याने अमाप पैसे असूनही तिथे एकाकी राहणाऱ्या माणसांची त्यात वृद्धावस्थेत किंवा आजारी असल्यावर त्यांची सुश्रुषा करणारी माणसे त्यांना मिळणं दुरापास्त झाले आहे. त्यामुळे तिथे सुरु झालेली ही व्यवस्था अनेक दृष्टीने आपल्या देशातही करता येण्यासारखी आहे. आपण काय चांगले ते घेत जावे... तर, 


स्विझर्लंडमध्ये तिथल्या सरकारच्या माध्यमातून 'टाइम बँक' ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. त्यात तुम्हाला तुमचे ''वेळ खाते'' (Time Account) सुरु करावे लागते. या खात्यात तुमच्या वेळेचा लेखाजोखा जमा राहतो. 


स्विझर्लंडमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने या संकल्पनेबाबत तिचा अनुभव सांगितला...  


स्वित्झर्लंडमध्ये शिकत असताना मी माझ्या शाळेजवळ एक घर भाड्याने घेतले. घरमालकीण, क्रिस्टीना, एक ६५ वर्षांची अविवाहित महिला होती जिने सेवानिवृत्त होण्यापूर्वी माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम केले होते. स्वित्झर्लंडला पेन्शन व्यवस्था खूप चांगली आहे, त्याला त्याच्या नंतरच्या वर्षांत अन्न आणि निवारा बद्दल काळजी करावी लागत नाही, इतकी रक्कम मिळते. एके दिवशी मला कळले की तिला एका ८७ वर्षांच्या अविवाहित वृद्धाची काळजी घेण्यासाठी नोकरी मिळाली आहे. मी त्या महिलेला विचारले की या वयात कशाला दगदग, अराम करा. पैशासाठी हे करण्याची गरज नाही ? तिच्या उत्तराने मला आश्चर्य वाटले: "मी पैशासाठी काम करत नाही, परंतु मी माझा वेळ 'टाइम बँकेत' जमा करते आहे, आणि जेव्हा मी माझ्या म्हातारपणात चालू शकणार नाही, किंवा मला फार गरज असेल तेव्हा मी ते परत घेऊ शकते."


"टाईम बँक" या संकल्पनेबद्दल मी पहिल्यांदा ऐकले, तेव्हा मी खूप उत्सुक होते आणि घरमालकाला सविस्तर विचारले. "टाइम बँक" ही संकल्पना स्विस फेडरल मिनिस्ट्री ऑफ सोशल सिक्युरिटीने विकसित केलेला वृद्धापकाळातील पेन्शन कार्यक्रम आहे. लोक वृद्धांची काळजी घेण्यासाठी 'वेळ' देतात, पर्यायाने खात्यात वेळेची बचत करतात आणि ते वृद्ध झाल्यावर किंवा आजारी पडल्यावर किंवा काळजी घेण्याची गरज असताना ते खात्यातून काढून घेऊ शकतात.


आता हे खाते कोण काढू शकतात ह्याच्या अटी फार गमतीशीर आहेत... अर्जदार निरोगी, संवाद साधण्यात चांगला आणि प्रेमाने परिपूर्ण असावा. त्यांना दररोज मदतीची गरज असलेल्या वृद्धांची काळजी घ्यावी लागते. त्यांचे 'सेवा तास' सामाजिक सुरक्षा प्रणालीमधील वैयक्तिक 'वेळ' खात्यांमध्ये जमा केले जातात. माझी घरमालकीण आठवड्यातून दोनदा कामावर जायची, प्रत्येक वेळी दोन तास गरजूंच्या सेवेत घालवायची, म्हातार्‍यांना मदत करायची, त्यांच्यासाठी खरेदी करायची, त्यांच्या खोल्या साफ करायची, त्यांना उन्हात नेऊन फिरवून आणायची, त्यांच्याशी गप्पा मारायची.


नियमानुसार, एक वर्षाच्या सेवेनंतर, “टाइम बँक” सेवा देणाऱ्या व्यक्तीच्या कामाच्या तासांची गणना करते आणि त्याला “टाइम बँक कार्ड” जारी करते. जेव्हा तिला तिची काळजी घेण्यासाठी कोणाची गरज असते तेव्हा ती "व्याजासह वेळ" काढण्यासाठी तिचे "टाइम बँक कार्ड" वापरू शकते. माहितीच्या पडताळणीनंतर, "टाइम बँक" रुग्णालयात किंवा तिच्या घरी तिची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवकांना नियुक्त करते.


एके दिवशी, मी कॉलेजला  आणि घरमालकिणीने फोन केला आणि म्हणाली की, ती खिडक्या पुसताना स्टूलवरून पडली. मी त्वरीत सुट्टी घेऊन तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले. त्यांचा पाय मोडला होता, ज्यामुळे त्यांना चालणे शक्य होणार नव्हते. जेव्हा मी तिला सांभाळण्यासाठी माझ्या कॉलेजमधून सुट्टीघेण्याची तयारी करत होते, तेव्हा त्यांनी मला सांगितले की मला तिची काळजी करण्याची गरज नाही, कारण तिने आधीच "टाइम बँक" कडे विनंती सबमिट केली आहे. दोन तासांपेक्षाही कमी वेळात "टाइम बँक" ने एका नर्सिंग कर्मचाऱ्याला घरमालकिणीची काळजी घेण्यासाठी पाठवले.


पुढचा महिनाभर, देखभाल कर्मचाऱ्याने घरमालकाची रोज काळजी घेतली, तिच्याशी बोलून, तिचे हवेनको ते सगळं बघून, तिच्यासाठी स्वादिष्ट स्वयंपाक बनवून तिची सुश्रुषा केली. केअरटेकरच्या सेवेमुळे घरमालकीण लवकरच ठणठणीत झाली. सावरल्यानंतर तीच पुन्हा "कामावर" देखील जायला लागली. ती म्हणाली की ती अजूनही निरोगी आहे आणि त्यामुळे भविष्यासाठी "टाइम बँक" मध्ये अधिक वेळ वाचवण्याचा तिचा हेतू आहे.


आज, स्वित्झर्लंडमध्ये, वृद्धापकाळाला आधार देण्यासाठी "टाइम बँक" वापरणे ही एक सामान्य प्रथा बनली आहे. यामुळे देशाच्या पेन्शनवरील खर्चात बचत तर होतेच पण इतर सामाजिक समस्याही सुटतात. अनेक स्विस नागरिक या प्रकारच्या वृद्धापकाळाच्या टाइम पेन्शनला खूप पाठिंबा देतात.


स्विस पेन्शन ऑर्गनायझेशनने केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की निम्म्याहून अधिक स्विस लोकांना या प्रकारच्या वृद्धाश्रम सेवांमध्ये सहभागी व्हायचे आहे. स्विस सरकारने "टाइम बँक" पेन्शन योजनांना समर्थन देण्यासाठी कायदा देखील मंजूर केला. सध्या, आशियाई देशांमध्ये घरी एकटे राहणाऱ्या वृद्ध लोकांची संख्या वाढत आहे आणि ती हळूहळू एक सामाजिक समस्या बनत चालली आहे. स्वित्झर्लंड शैलीतील "टाइम बँक" पेन्शन आपल्यासाठी देखील एक चांगला पर्याय असू शकतो.. 


तुम्हाला काय वाटतं ? 


@रश्मी पदवाड मदनकर



माँ भारती

 भूषणकुमार उपाध्याय ह्यांची एक अतिशय आवडलेली कविता..


वेदमंत्रों की ध्वनि में हूँ।

उपनिषदों की वाणी में हूँ।।

गीता का विश्वरूप मेरा तन है।

पतंजलि का योग मेरा मन है।।

भक्त प्रह्लाद ध्रुव के नमन में हूँ।

षड् दर्शनों  के अमर श्रवण में हूँ।।


पुराणों की मोहक कथाओं में हूँ।

दुखी मानव की व्यथाओं में हूँ।।

राम के धनुष का अमोघ वाण हूँ।

कृष्ण का सुदर्शन चक्र महान हूँ।।


लिच्छवी का गणतंत्र हूँ।

राजा पौरुष यथा स्वतंत्र हूँ।।


बुद्ध की करुणा हूँ।

महावीर की धारणा हूँ।।

नानक का संदेश हूँ।

सूफ़ियों का देश हूँ।।


गिरिजाघर की प्रार्थना हूँ।

पारसियों की अग्नि याचना हूँ।।


सर्वे भवन्तु सुखिनः का घोष हूँ।

मानव सभ्यता का प्रदोष हूँ।।

चरक का आयुर्वेद हूँ।

कालिदास का रस संवेद हूँ।।


भरत के नाट्य शास्त्र का संवाद हूँ।

शंकर मंडन मिश्र का विवाद हूँ।।

पाणिनि का व्याकरण हूँ।

आर्यभट्ट का खगोल जागरण  हूँ।।


शिवलिंग अनंत हूँ।

माँ दुर्गा दिगंत हूँ।।

शंकर के त्रिशूल का दुर्धर प्रहार हूँ।

दुष्ट दानव राक्षसों का संहार हूँ।।


उत्तर में हिम का अखंड विस्तार हूँ।

दक्षिण में जलधि का संचार हूँ।


अर्जुन का निष्काम कर्म हूँ।

चाणक्य का राष्ट्र धर्म हूँ।।

शास्त्र की पुकार हूँ।

शस्त्र की झंकार हूँ।

ज्ञान का आलोक हूँ।

विज्ञान का विलोक हूँ।


गंगा का पावन प्रवाह हूँ।

अनेक कल्पों का गवाह हूँ।।

लोक कल्याण की भावना से ओत प्रोत हूँ।

वसुधैव कुटुम्बकम् का प्राचीन स्रोत हूँ।।


माँ भारती के मन का मीत हूँ।

सत्यमेव जयते का गीत हूँ।।

( डॉ भूषण कुमार उपाध्याय, भा पो से, से. नि.)

Friday 22 December 2023

सक्तीची ''पाळी''



आमच्या लहानपणी आईच्या काळात, म्हणजे साधारणतः २५-३० वर्षांआधी मासिक पाळी आलेल्या महिलेला तू मंदिरात यायचे नाही किंवा कोणत्याच शुभकार्यात उपस्थित राहायचे नाही असे सांगितले जायचे, अश्या कार्यातून ''सक्तीची रजा'' तिला मिळालेली असायची. तोवर तिचा घरात वावर, किंवा घरकामात सूट वगैरे कुटुंबीयांनी मान्य केलेली होती. त्याही पूर्वी म्हणजे आजीच्या वगैरे काळात तर तिला कुठेच जाण्याची परवानगी नव्हती. अगदी परसात, पडवीत, अंगणात, तिनेच सावरलेल्या तिच्या हक्काच्या स्वयंपाक घरात देखील नाही. तिच्या हाताने केलेला स्वयंपाक देखील ग्रहण करायचे नाकारले जायचे. तिला एखाद्या कोपऱ्यात गुपचूप बसून राहावे लागायचे. ही ''सक्तीची विश्रांती'' होती.

महाराष्ट्राच्या मराठवाड्यात उसतोडणीला जाणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या दिवसात काम करू दिले जात नाही म्हणून तेथील कामगार महिलांनी गर्भाशयच काढून टाकण्याचा 'सक्तीचा' मार्ग निवडला आता त्याला अनेक वर्ष होतायेत. अशा महिलांचा वाढता आकडा आता चिंताजनक झाला आहे, त्याचे प्रतिकूल परिणाम आता दृश्य स्वरूपात दिसू लागले.. पण अजूनही त्यावर ठोस तोडगा काही निघालेला नाही. हे प्रकरण भयंकर आहे. पाळी आलेल्या बाईला काम द्यायचे नाही हे कोण ठरवतं, तर मुकादम. पाळी येणारच नसलेल्या महिलेला नवऱ्यासह कामावर ठेवायचे हे कोण ठरवतं - मुकादम. आणि काम हवे असेल तर गर्भाशय काढून टाका हा सल्ला सुद्धा देतो मुकादम, ऐकतो नवरा आणि भोगते स्त्री... सक्तीची रजा, सक्तीचे काम, सक्तीचा सल्ला, सक्तीचा भोग.

जपानी सरकारच्या अनेक कंपनीबरोबर, वर्षभर केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले की त्या वर्षभरात केवळ 0.9% महिला कर्मचार्‍यांनी मासिक पाळीमुळे होणाऱ्या त्रासामुळे रजेसाठी अर्ज केला होता. इतर महिला स्वखुशीने कामावर हजर होत्या. त्या वर्षी सरसकट १००% महिलांना मासिक पाळीत सक्तीची रजा घ्यावयास सांगितले असते तर ०.९% महिलांशिवाय इतर महिलांवर तो सक्तीचा न्याय ठरला असता काय कि अन्याय ठरला असता ? किंवा त्यांना त्यांच्या कार्यापासून, कर्तव्य निभावण्यापासून वंचित ठेवले गेले असा त्याचा अर्थ काढता आला असता का ?

हे सगळे प्रश्न उपस्थित होण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे, नुकतंच राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेत महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या त्रासाचा विचार करून पगारी रजा देण्याबाबत सरकार काय प्रयत्न करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी महिलांना मासिक पाळीत पगारी रजा देण्याच्या मागणीला विरोध केला. तसेच मासिक पाळी येणं हे काही अपंगत्व नाही, असं वक्तव्य केलं. यानंतर मासिक पाळीच्या काळात त्रास होणाऱ्या महिलांना पगारी रजा मिळण्याच्या विषयावर घमासान सुरू आहे. असं असलं तरी महिलांना मासिक पाळीच्या काळात पगारी रजा मिळावी ही मागणी पहिल्यांदाच झालेली नाही. याआधीही ही मागणी झाली. जगाच्या वेगवेगळ्या देशात यावर उहापोह देखील झाला, त्यावर मतभेद झाले. पण तोडगा मात्र आजतागायत कुठेही निघालेला नाही.


जागतिक इतिहास :
औपचारिक मासिक पाळीच्या रजेची कल्पना सुमारे एक शतकापूर्वी सोव्हिएत रशियामध्ये उद्भवली, जेव्हा मासिक पाळी असलेल्या स्त्रियांना 1920 आणि 30 च्या दशकात त्यांच्या पुनरुत्पादक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पगाराच्या श्रमातून मुक्त करून सक्तीच्या रजेवर पाठवायला सुरुवात झाली. त्यानंतर 1920 च्या दशकाच्या उत्तरार्धात जपानमधील कामगार संघटनांमध्ये या कल्पनेने जोर धरला आणि अखेरीस 1947 मध्ये जपान देशाच्या कायद्यात हा अंतर्भूत झाला. जपानमधील या निर्णयामागील विचार काही प्रमाणात महिलांच्या प्रजननक्षमतेच्या सिद्धांतांवर आधारित आहे, युनियनने चेतावणी दिली आहे की दीर्घ तास आणि खराब स्वच्छताविषयक परिस्थिती त्यांच्या मुलांना जन्म देण्याच्या क्षमतेस हानी पोहोचवू शकते, म्हणून या काळात त्यांना सक्तीची विश्रांती देण्यात यावी. म्हणजे ह्यातही महिलांच्या आरोग्याविषयी, तिला होणाऱ्या त्रासासाठी किंवा तिच्या स्वतःच्या मर्जीसाठी नव्हे तर, ही सक्तीची रजा तिने पुढल्या पिढीला जन्म घालताना काही कसूर सुटू नये या स्वार्थी विचाराभोवती फिरणारा आहे.

काही देशात अशा योजना करण्यात आल्या की, मासिक पाळीच्या दिवसात महिलांना सुट्टी घेता येईल मात्र त्यांच्या कामाचे तास नंतरच्या काळात त्यांनी ज्यादा काम करून भरून काढायचे आहेत. तिथे मात्र एक वेगळी अडचण निर्माण झाली.. तेथील पुरुषांना आपल्यालाही महिन्याला चार सुट्ट्या जास्त मिळाव्या असे वाटू लागले आणि दुसऱ्या बाजूला मासिक पाळी जास्त वेदनादायी आहे की, पुढे ते काम पूर्ण करण्यासाठी द्यावे लागणारे जास्तीचे तास त्रासदायक आहेत हा भेद करणं महिलांना कठीण झालं. अखेर या सगळ्याला महिलाच बळी पडताहेत या विचारला अधिक बळकटी येऊ लागली.

2016 साली चार इटालियन खासदारांनी दरमहा तीन दिवसांपर्यंत सशुल्क मासिक पाळीच्या रजेचा प्रस्ताव संसदेत मांडला होता, जो पुढे अयशस्वी झाला. तो अयशस्वी होण्यामागे महिलांचाच सहभाग जास्त होता कारण त्यांना काळजी वाटत होती की आधीच नोकऱ्यांवर पुरुषी वर्चस्व असतांना आणि नोकरी पेशात महिलांचे प्रमाण अत्यंत कमी असताना, नियुक्ती होण्याआधीच महिला कर्मचाऱ्यांना नाकारण्याचे प्रमाण या एका कारणाने वाढीस लागेल. ट्रेंटो विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापिका डॅनिएला पियाझालुंगा तेव्हा म्हणाल्या, “माझ्यासह—बहुतेक लोकांना असे वाटले की यामुळे स्त्रियांना अधिक भेदभाव आणि अन्यायाचा सामना करावा लागेल.”

आणखी एक २०१४ साली केलेला सरकारी सर्वे असेही सांगतो कि ०.८ % महिलांना सोडले तर इतर महिला पाळीच्या काळातील त्रासाबद्दल सुट्टी घेऊ शकल्या नाही कारण त्यांना त्यांच्या वरिष्ठांना ते पटवून देणे फार कठीण वाटले किंवा वरिष्ठांमध्ये या बाबतची जागृतता आणि समजूतदारपणाची उणीव भासली.

मासिक पाळीच्या रजेचा जगभरातील नियोक्त्यांद्वारे स्वीकार केला जात असताना, यूएसमध्ये या कल्पनेला फारसा फायदा झाला नाही. हेल्थ केअर फॉर वुमन इंटरनॅशनल या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या 600 अमेरिकन लोकांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की जवळजवळ निम्म्या प्रतिसादकर्त्यांना असे वाटते की मासिक पाळीच्या रजेचा परिणाम होईल. काहींनी चिंता व्यक्त केली की ज्यांना मासिक पाळी येतच नाही अशा लोकांसाठी हे धोरण अन्यायकारक असेल किंवा अशा सुट्ट्यांचा हिशेब कोण आणि कसा ठेवणार ? या रजेचा गैरवापर केला जाणार नाही ह्याची शाश्वती कशी दिली जाऊ शकते.

भारतात, फूड डिलिव्हरी स्टार्टअप Zomato ने २०२० या वर्षी कर्मचार्‍यांना वर्षातून 10 दिवसांपर्यंत सशुल्क मासिक पाळीच्या रजेची मुभा देण्यास सुरुवात केली आणि देशातील काही खाजगी कंपन्यांमध्ये सामील झाले ज्यांनी मासिक पाळीच्या संदर्भात भारताच्या दृढ निषिद्धांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की पॉलिसी ऑगस्ट 2020 मध्ये लाँच झाल्यापासून, 2,000 दिवसांपेक्षा जास्त सुट्टी घेतलेल्या 621 महिला कर्मचाऱ्यांनी त्याचा वापर केला आहे. तरी अजूनही भारतासारख्या देशात महिला कर्मचार्‍यांना असे वाटते की त्यांची अनुपस्थिती मासिक पाळीशी संबंधित आहे ही अत्यंत खाजगी गोष्ट सार्वजनिकपणे उघड करावी लागणे हे देखील अन्यायकारक ठरू शकेल. दुसरे, महिलांना सुट्टी हवीय का ? की त्यांना कामात व्यस्त राहणे आवडते. हा जिचा तिचा निर्णय असू शकतो. जसे आरोग्याची समस्या असतानाही कामावर यावेच लागेल हे अन्यायकारक आहे तसेच फक्त पाळी आहे म्हणून कामावर येऊच नये हे देखील तिच्यालेखी अत्यंत बळजबरीचे आणि अन्यायकारक असू शकेल.


असे कायदे लागू करण्याआधी खरी गरज आहे ती काही पूर्वतयारी करण्याची, महिला करीत असलेल्या कामाच्या ठिकाणी मासिक पाळी साक्षरता आणि त्याला पूरक अशी संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे. कोणतीही धोरणे केवळ तेव्हाच प्रभावी होऊ शकतात जेव्हा कामाच्या ठिकाणी मासिक पाळी येत असलेल्यांसाठी विचारांचा समंजस मोठेपणा आणि त्यासाठी समर्थनाची स्पष्ट संस्कृती असेल. यामध्ये कामाच्या ठिकाणी असलेल्या बाथरूममध्ये मासिक पाळीच्या उत्पादनांचा पुरवठा करणे, स्वच्छता व आरोग्याविषयी आवश्यक संसाधनांची पूर्तता करणे आणि त्या त्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेल्या संघांना मासिक पाळी सारख्या विषयांवर कशी प्रतिक्रिया द्यायची आणि कसे समर्थन व सहयोग द्यावा याची समज आहे याची खात्री करणे अश्या गोष्टी समाविष्ट करता येतील.


खरतर महिलांना कोंडीत पकडण्याचे अनेक मार्ग आहेत. तिला दुय्यम स्थान देण्याच्या असंख्य प्रथा आहेत. त्यातली एक परंपरा आहे पाळी आलेल्या महिलेला बाजूला बसवणे, वेगळे समजणे, दूर लोटणे.. त्याला नाव काहीही दिले तरी. असे होऊ नये की प्रगतीची कास धरताना आपला प्रवास उलट्या दिशेने होऊ लागेल. मला अनेकदा हा प्रश्न पडतो, महिलांबाबतचे अनेक नियम पुरुषांना का ठरवावे वाटतात किंवा ते ठरवताना किती स्त्रियांचा सहभाग, मत, निर्णय घेतले, मान्य केले जातात ? तिच्या बाबतीत तिला काय हवंय, काय करायचंय हे तिचे तिने ठरवायला, निर्णय घ्यायला आणि त्यावर अंमल करायला ती समर्थ आहे आणि सक्षमही. गरज आहे ती तिच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याची आणि त्यासाठी पूर्ण ताकदीनिशी तिच्या पाठीशी उभे राहून तिला स्वातंत्र्य देण्याची.

भारतात हा कायदा निघालाच तर यातल्या किती मुद्द्यांवर विचार केला जाईल हे बघण्यासारखे असणार आहे..
तूर्तास सुट्टी द्यायची की द्यायची नाही या वर्चस्ववादी वादापेक्षा ''पाळीत तिला सुट्टी घ्यायची असेल तर अडवणूक नको आणि नको असेल तर बळजबरी नको असा कायदा निघत नाही तोवर वाट बघूया...


रश्मी पदवाड मदनकर
7720001132


(आजच्या तरुण भारत आकांक्षा पुरवणीत प्रकाशित कव्हर स्टोरी)



Tuesday 19 December 2023

इन्स्युलिनच्या जन्माची कथा -





१९२२ च्या पूर्वी मधुमेहाने मरणाऱ्यांची संख्या टोकाला गेली होती. लहान मुलांना देखील मधुमेहाने ग्रासले होते. पहिल्यांदा इन्सुलिनचा शोध लागला तेव्हा अश्याच मरणासन्न मुलांवर हा प्रयोग करायचे ठरले. 1922 मध्ये, शास्त्रज्ञांचा एक गट टोरंटो जनरल हॉस्पिटलमध्ये गेला जिथे मधुमेही मुलांना एका वेळी 50 किंवा त्याहून अधिक वॉर्डांमध्ये ठेवले जात होते. त्यापैकी बहुतेक कोमॅटोज (बेशुद्धावस्थेत) होते आणि डायबेटिक केटोआसिडोसिसमुळे मरणाच्या सीमारेषेवर पोचले होते.


मधुमेहामुळे शरीरातील इतर अवयवांचे निकामी होणे सुरु झाले की मृत्यूच ह्यांना सोडवेल अशी धारणा असे, त्यामुळे मृत्यूची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मधुमेहाच्या पहिल्या स्तराच्या रुग्णावर प्रयोग करण्यापेक्षा मरणासन्न मुलांवर उपचार करणे योग्य होते, कारण तशीही त्यांच्या परतण्याची आशा कमी होती त्यामुळे प्रयोग फसला तरी त्याने जास्त नुकसान होणार नव्हते. पण प्रयोग यशस्वी झाला तर ह्या लहान मुलांचे आयुष्य सत्कर्मी लागणार होते. त्यांनाही जीवनदान मिळणार होते. शास्त्रज्ञांनी झपाट्याने हालचाली सुरु केल्या आणि इन्सुलिनच्या नवीन शुद्ध अर्कासह मुलांना इंजेक्शन देण्यास पुढे सरसावले.

त्यांनी एकेक मुलाला शुद्ध अर्काच्या इन्सुलिनचे इंजेक्शन द्यायला सुरुवात केली. ते जसजसे एकेक मुलाला इंजेक्शन देत पुढे जाऊ लागले तसतसे आधी इंजेक्शन दिलेली मुले शुद्धीवर येऊ लागली. मग एक एक करून सर्व मुले त्यांच्या डायबेटिक कोमातून जागी झाली. मृत्यू, दुःख, भीती आणि अंधकाराने भरलेली खोली अचानक आनंद आणि आशेने भरून गेली.
 
1920 च्या दशकाच्या सुरुवातीस, फ्रेडरिक बॅंटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी टोरंटो विद्यापीठात जॉन मॅक्लिओडच्या अंतर्गत इन्सुलिनचा शोध लावला. जेम्स कॉलीप यांच्या मदतीने इन्सुलिनचे शुद्धीकरण करण्यात आले, ज्यामुळे ते मधुमेहावर यशस्वीरित्या उपचार करण्यासाठी उपलब्ध झाले. १९२२ मध्ये त्याच्या यशस्वी प्रयोगानंतर जगभर मधुमेहावर उपचार करणे शक्य झाले. बॅंटिंग आणि मॅक्लिओड या दोघांनाही 1923 मध्ये त्यांच्या कार्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले.

बॅंटिंग यांना नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हा ते फक्त 32 वर्षांचे होते आणि त्यांनी बक्षिसाची अर्धी रक्कम बेस्टसोबत शेअर करायचे ठरवले, जो त्यांचा सहाय्यक होता आणि त्यावेळी तो फक्त 24 वर्षांचा होता. बॅंटिंगने पेटंटवर आपले नाव देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी ते टोरंटो विद्यापीठाला $1 मध्ये विकले. लाखो जीव वाचवणाऱ्या शोधातून फायदा मिळवणे अनैतिक आहे असे त्याला वाटत होते..
 
"इन्सुलिन हे माणसांना जगवण्यासाठी आहे, त्यामुळे ते माझे नाहीच, ते जगाचे आहे" तो म्हणाला होता.
इन्सुलिनवर पेटंट नसल्यानेच जगभर त्याचा उपयोग करून रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले. अशा माणसांना सलामच करायला हवा.
 
इन्स्युलिनच्या प्रयोगाला आणि मानवी सेवेत उतरले त्याला आता १०० वर्ष झालीत . ही कथा इंग्रजीतून वाचनात आली, वाटलं सर्वांशी शेअर करावी. म्हणून हा भावानुवाद प्रपंच.

मनाचा थांग लागेना

 मनाची ढवळली खोली मनाचा थांग लागेना  

मना समजावले थोडे मनाला भाव पोचेना 


उन्हाला आर्जवा कोणी उन्हा रे हो जरा सौम्य  

फुलांना बाधते ऊन्ह, फुलाला आग सोसेना 


प्रिया मी बावरा होतो तुझे का नाव आल्यावर 

प्रियाशी जोडले नाते प्रियाची साथ सोडेना 


नभावर रंगली नक्षी रवीचा कुंचला होता  

अचानक ढग भरू आले नभाला मेघ शोभेना


सख्याने भार्गवी गावी सख्याला सूर गवसावा 

सुरांना ताल जोडावा, लयी बेताल चालेना

Tuesday 3 October 2023

संस्कृती संरक्षणाची अफगाणी धडपड

गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर अचानक अफगाण महिलांचे अतिशय सुंदर सुंदर पोशाखात फोटो झळकू लागले. काही जुन्या काळचे गटागटाने काढलेले फोटो, काही सणावरांचे तर काही आत्ता वर्तमानातील महिलांचे. हे सगळे फोटो त्यांच्या आजवरच्या संस्कृतीची ओळख सांगणारे, पारंपरिक पोशाख परिधान केलेले आहेत. हे रंगीबेरंगी हसरे फोटो पाहून आनंद व्यक्त करावा वाटला पण या हसऱ्या फोटोंमागे कुठलीशी वेदना डोकावते आहे हे त्यावरील आठवडाभर trending होत गेलेल्या हॅशटॅगवरून लक्षात आले. हा hashtag होता #DontTouchMyCloths. 



अशा विचित्र अर्थाचा hashtag का? त्याच्या कारणांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा.. माझ्याचसारख्या, माझ्याच युगात ह्याचं धर्तीवर एकाच काळात जन्म घेऊनही वेगवेगळ्या प्रांताचा आणि संस्कृतीचा भाग असल्याने आम्हाला जगाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या विरोधाभासी आयुष्याचे अप्रूप वाटत गेले..आणि तेथील 'ति'च्यासाठी अनुकंपा दाटून आली. 

तीन वर्षांपूर्वी पुन्हा सत्ता काबीज केल्यापासून, तालिबानने स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर - शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत, तर त्यांच्या कपड्यांपासून ते त्यांच्या दैनंदिन हालचालींपर्यंत निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी तालिबानची सत्ता गेल्यानंतर महत्प्रयासाने जे स्वातंत्र्य आणि अधिकार मिळवण्यासाठी तेथील महिलांनी जीवाचे रान केले, संघर्ष करत महिलांना शिक्षण नोकरी कायदे अधिकार मिळवून दिले. सगळं आलबेल चालू असताना तालिबानी सत्ता पुन्हा आरूढ झाली आणि मिळवलेलं आता सगळंच मातीत मिळून निरर्थक ठरतं की काय अशी भीती वाटू लागली आहे. तरी अजूनही हार न मानता स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महिलांचे जिवतोडून प्रयत्न सुरू आहेत..

 तालिबानी शासनाने महिलांच्या जगण्यावर अन्यायकारक प्रतिबंध लावणारे कायदे कायम करण्यासाठी तेथील नागरिकांचाच उपयोग करून घेत त्यांचे अनिर्बंध अन्यायी पंख पसरायला सुरुवात केली आहे. ह्याचे जिवंत उदाहरण सांगणारी घटना नुकतंच  घडली. डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर झाकणाऱ्या काळ्या आबाया घातलेल्या महिलांनी गेल्या आठवड्यात तालिबानच्या समर्थनार्थ काबूलमध्ये मोठी रॅली काढली. या रॅलीत सहभागी झालेल्या महिलांचे असे मत होते की "आधुनिक, रंगीत कपडे आणि मेकअप परिधान केलेल्या अफगाण महिला देशातील मुस्लिम महिलांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. संपूर्ण शरीर झाकणारे अबाया, बुरखा आणि निकाब न घालणाऱ्या स्त्रिया परकीय संस्कृतीच्या अधीन गेल्या असून, शरिया कायद्याशी विसंगत असलेल्या आहेत. असे स्त्रियांचे हक्क आम्हाला नको आहेत. आम्हाला तालिबानी नियाब कबूल आहेत"

तालिबान शासित अफगाणिस्तानात स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी चिंतित, जागरूक, लढा देणाऱ्या महिलांसाठी ही रॅली म्हणजे एक धक्का होता. अफगाणिस्तानमधील अमेरिकन विद्यापीठातील इतिहासाची प्राध्यापक डॉ. बहर जलाली या सर्वप्रथम ह्या मोहिमेविरोधात पुढे आल्या. इतर माध्यामांजवळ त्यांचे विचार व्यक्त करण्यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली. अफगाणिस्तानची अस्मिता आणि सार्वभौमत्वावर आघात होत असल्याने ही मोहीम सुरू केल्याचे बहार जलालीचे म्हणणे आहे. खरी अफगाण महिला अगदी पूर्वापार कशी होती.. त्यांची खरी संस्कृती काय होती हे सांगण्यास तिने सुरुवात केली. हिरव्या अफगाण पारंपरिक सुंदर पोशाखात तिचा फोटो शेअर करत तिने इतर अफगाण महिलांना 'अफगाणिस्तानचा खरा चेहरा' जगाला दाखवण्याचे आवाहन केले. अफगाण महिलांनी हातोहात ही मोहीम उचलून धरली. त्यांनी त्यांचे पारंपारिक कपडे, राहणीमान, पूर्वी उपभोगलेलं स्वातंत्र्य, त्याचा इतिहास आणि बरंच काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर ठेवण्यास सुरुवात केली. हे करताना त्यांनी #DoNotTouchMyClothes आणि #AfghanistanCulture सारखे हॅशटॅग वापरले, जे सध्या सर्वत्र trending आणि viral होत असून, जगभरातल्या स्त्रिया त्यांच्या समर्थनार्थ या सोशल मीडिया मोहिमेत जुळत चालल्या आहेत. 

बहर जलाली म्हणते, "मला जगाला सांगायचे आहे की, तालिबान समर्थक रॅली दरम्यान तुम्ही मीडियामध्ये जी पूर्ण झाकलेल्या स्त्रियांची छायाचित्रे पाहिली ती आमची संस्कृती नाही. ती आमची ओळख कधीच नव्हती. पारंपारिकपणे रंगीबेरंगी कलात्मक कपडे परिधान करणार्‍या अफगाण लोकांसाठी संपूर्ण शरीर झाकणे हीच खरेतर परदेशी संकल्पना आहे. जी आमच्यावर लादली जाऊ शकत नाही." 

यानंतर सोशल मीडियावर अफगाणिस्तानच्या अनेक नामवंत, प्रतिथयश महिलांनी फोटोंसह मत व्यक्त केले. अफगाणिस्तानच्या प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा पारंपारिक पोशाख आहे. इतकं वैविध्य असूनही, त्यात रंग, आरसे आणि भरतकामाचा भरपूर वापर आहे. रंगीबेरंगी व कलात्मक पद्धतीने तयार केलेले कपडे परिधान करणे हीच आमची सांस्कृतिक ओळख आहे जी आम्ही मिटू देणार नाही. असे त्यांचे मत आहे. 

व्हर्जिनियातील मानवाधिकार कार्यकर्त्या स्पोझमे मसीद यांनी पारंपरिक पेहराव्यातील विविध स्त्रियांचे फोटो टाकत ट्विटरवर लिहिले, "हा आमचा खरा अफगाण पोशाख आहे. अफगाण स्त्रिया असे रंगीबेरंगी आणि शोभिवंत कपडे घालतात. काळा बुरखा हा अफगाणिस्तानात कधीही पारंपारिक पोशाख नव्हता" पुढे त्या म्हणतात "आम्ही शतकानुशतके इस्लामिक देश आहोत आणि आमच्या आजींनी त्यांचे पारंपारिक कपडे सन्मानाने परिधान केले आहेत. त्यांनी ना निळी चादीरी घातली होती ना अरबांचा काळा बुरखा" त्यांच्या पुढल्या एका ट्विटमध्ये त्या म्हणाल्या "आमचे पारंपारिक कपडे पाच हजार वर्षांच्या आमच्या समृद्ध संस्कृतीचे आणि इतिहासाचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक अफगाणीला त्याचा सार्थ अभिमान आहे."

37 वर्षीय अफगाण संशोधक लिमा हलिमा अहमद सोशल मीडियावर लिहितात, "मी माझा फोटो पोस्ट केला कारण आम्ही अफगाण महिला आहोत. आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे आणि आमचा विश्वास आहे की कोणताही अतिरेकी गट आमची ओळख ठरवू शकत नाही. आमची संस्कृती कधीच काळी नव्हती, ती सदैव रंगांनी भरलेली आहे. त्यात सौंदर्य आहे, त्यात कला आहे आणि तीच आमची ओळख आहे" 

अफगाणिस्तानच्या पुराणमतवादी लोकांचेही म्हणणे आहे की, त्यांनी महिलांना काळ्या रंगाचा निकाब घातलेला कधीच पाहिला नाही. 

गेल्या 20 वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये काम करणाऱ्या लीमा हलिमा अहमद काबूलमध्ये झालेल्या रॅलीचां संदर्भ देत सांगतात, "महिलांना त्यांचा पोशाख निवडण्याचे पूर्वीपासूनच स्वातंत्र्य आहे, त्यांना त्यांचा ड्रेसकोड कधीच कोणी ठरवून दिला नाही. आम्ही अफगाण महिला आहोत आणि आम्ही आमच्या महिलांनी कधीही त्यांचे शरीर पूर्णपणे झाकलेले कपडे घातलेले पाहिले नाही. ज्या प्रकारचे काळे हातमोजे आणि बुरखे रॅलीत महिलांनी घातले होते, त्यावरून असे वाटत होते की, रॅलीसाठी ते खास शिवलेले असावे, ही रॅली तालिबानने मुद्दाम घडवून आणलेली होती."

या सोशल मीडिया कॅम्पेनमध्ये सक्रिय असणारी  आणखी एक महिला म्हणजे मलाली बशीर, ही प्रागमधील पत्रकार आहे. अफगाण देशाचे सौंदर्य जगाला दाखवण्यासाठी ती सुंदर कपड्यांमधील अफगाण महिलांची चित्रे बनवते. ती म्हणते, "शहरात सोडा अगदी गावात देखील कोणीही काळा किंवा निळा बुरखा आजवर घातला नाही. पूर्वीपासून लोक फक्त पारंपारिक अफगाणी कपडे घालायचे. वृद्ध स्त्रिया डोक्यावर रंगीत चित्रांचा स्कार्फ घालत तर लहान मुली रंगीबेरंगी शाल ओढत. अलीकडे, अफगाण महिलांवर त्यांचा अस्सल सांस्कृतिक पोशाख बदलण्यासाठी दबाव वाढला आहे. लोकांना स्त्री दिसू नयेत म्हणून त्यांना पूर्ण झाकलेले कपडे घालण्यास सांगण्यात येत आहे. मी अनेक पुरातन स्त्रियांचे पेंटिंग्ज आजवर बनवले आहेत ज्यामध्ये अफगाण स्त्रिया त्यांचे पारंपारिक कपडे परिधान करतात. पेंटिंगमध्ये त्या अफगाणिस्तानचे राष्ट्रीय नृत्य 'अट्टन' सादर करतानाही दिसतात" 

या सर्व प्रकरणात तालिबान मात्र अजूनही त्यांच्या मतावर ठाम आहेत. तालिबानचे म्हणणे आहे की महिलांना शरिया कायदा आणि स्थानिक परंपरांनुसारच अभ्यास आणि काम करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र यासोबतच ड्रेस कोडचे कठोर नियमही लागू होतील, जे त्यांना पाळणे बंधनकारक असेल. 

या अन्यायकारक कायद्यांचे समर्थन तेथील अफगाण पुढारी देखील करतात, पर्यायाने स्वसंरक्षणार्थ काही अफगाण महिलांनी आतापासूनच काळजी घेत चादरी, आबाया, नीकाब घालण्यास सुरुवात केली आहे. या निळ्या रंगाच्या ड्रेसने महिलांचे डोके ते पाय अगदी डोळे देखील झाकलेले असतात. कधी नव्हे ते काबूल आणि इतर शहरांमध्ये महिला या चादरी मोठ्या प्रमाणात परिधान करताना दिसू लागल्या आहेत. ह्याचीच चिंता आता परिवर्तनशील, उदारमतवादी, स्त्रीवादी अफगाण महिलांना सतावू लागली आहे, म्हणूनच विविध माध्यमांचा उपयोग करत त्या त्यांचे मत जगासमोर मांडत आहेत. जगभरातून त्यांच्या मानवी अधिकारासाठी आणि स्वातंत्र्यासाठी समर्थन यावे एवढीच त्यांची अपेक्षा असावी. स्त्री म्हणून स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी आपण त्यांची सोबत द्यायला काय हरकत आहे ? 

- रश्मी पदवाड मदनकर


(Published on 30 September 2023 in Tarun Bharat 'Akanksha' Suppliment)

Thursday 24 August 2023

डोळ्यात हरवल्या माझ्या पेंगुळल्या साऱ्या रात्री 

स्पर्शातुन उठते काहूर पोचण्यास गात्री गात्री 


श्वासात कोरल्या गेल्या व्याकूळ मनाच्या गाठी 

आठवता गहिवर येतो त्या धुंद क्षणांच्या भेटी 


ही ओढ अनामिक दाटे मोहरून येते काया 

देहात असा दरवळतो तू मोहक अत्तर फाया 


का नाव तुझे घेताना ओथंबुन श्रावण येतो 

सावळा मेघ भिरभिरतो देहावरती कोसळतो 


हे सौख्य असे नात्याचे की नुसते आभासाचे 

मी भान हरपुनी आहे की बघते स्वप्न सुखाचे 


पोचल्या कश्या ना हाका का साद न पडली कानी 

मी व्याकुळ आहे इकडे का तुझ्या न आले ध्यानी 


©रश्मी पदवाड मदनकर

विधाता वृत्त

Saturday 29 July 2023

जरा हासून घेते..

 गालगागा*4


मी व्यथांचे गीत गाते अन जरा हासून घेते

काळजाची जखम शिवते अन जरा हासून घेते


ज्या उन्हाने जाळले ते घेतले झोळीत माझ्या

लपवते दररोज चटके अन जरा हासून घेते


भेटलेल्या माणसांचे चेहरे खोटे निघाले

मुखवटा बघते जगाचा अन् जरा हासून घेते


सारखे आरोप करतो हा जमाना का कळेना

वागते निर्ढावलेली अन जरा हासून घेते


नाचते, ना लाजते मी बाळगत नाही तमा ही

वागते स्वच्छंदी ऐसी अन् जरा हासून घेते


या जगाशी भांडते अन जिंकते काही हवे‌ ते

चिडवते मी प्राक्तनाला  अन् जरा हासून घेते

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...