Tuesday, 12 May 2026

कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी

 प्रतिथयश कवयित्री, लेखिका मिनल येवले यांनी #कायांतर कादंबरीवर लिहिलेले हे पुस्तक समीक्षण.. मिनल ताई आणि देशोन्नती मनःपूर्वक आभार

🙏🌹🌿
********
*कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी*
कायांतर ही पद्मगंधा प्रकाशनची निर्मिती असलेली आणि पुणे येथील पुस्तक महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झालेली रश्मी पदवाड मदनकर यांची दुसरी बहुचर्चित कादंबरी आहे. एका देहातून दुसरा जन्म घेतलेल्या तृतीयपंथीय आंचल वर्मा या ट्रान्सजेंडर महिलेच्या जिवंत, ज्वलंत आणि अंतर्मुख करणाऱ्या संघर्षाची ही कहाणी आहे. स्त्री-पुरुष या चौकटींपलीकडील ‘तिसरे लिंग’ आपल्या समाजाला अजूनही सहज स्वीकारता आलेले नाही. त्यांच्या अस्तित्वाकडे पाहताना समाज आजही कचरतो; बोलताना, समजून घेताना, अगदी त्यांच्या शेजारी उभे राहतानाही.
निसर्गाने निर्माण केलेल्या या जीवांना मात्र समाजाने उपेक्षेची शिक्षा दिली आहे. लाज, अवहेलना, टाळले जाणे, पावलोपावली करावा लागणारा स्वाभिमानाचा संघर्ष, पोटापाण्यासाठी शोधावे लागणारे खाचखळग्याचे मार्ग आणि केवळ अस्तित्व सिद्ध करण्यासाठीची लढाई....हे सगळे अनुभव या कादंबरीत अत्यंत दाहक आणि अस्सलपणे उलगडले आहेत. ‘कायांतर’ ही केवळ एका व्यक्तीची कथा नाही; ती संपूर्ण तृतीयपंथीय समुदायाच्या वेदनेचा, अस्मितेचा आणि मानवी अस्तित्वाच्या हक्काचा आवाज आहे.
कायांतर मध्ये एलजीबीटीक्यूएआय समुदायातील विविध गटांचा स्वतंत्र आणि गुंतागुंतीचा लढा रश्मी पदवाड मदनकर यांनी अत्यंत संवेदनशीलतेने उलगडला आहे. प्रत्येक गटाचा संघर्ष वेगळा...स्वतःला जगवताना, स्वतःची ओळख सिद्ध करताना, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्याच अंतरंगाशी सुरू असलेल्या द्वंद्वाशी दोन हात करताना. एका शरीरात दोन भिन्न लिंगांची आतल्या आत चालणारी घुसमट, आणि बाहेरच्या सामाजिक आयुष्यात सतत भोगावी लागणारी उपेक्षा ही द्विस्तरी वेदना कादंबरीत प्रखरपणे समोर येते.
समाजातील एका वर्गाच्या वाट्याला आलेल्या जीवघेण्या दुःखाची ही कहाणी ‘कादंबरी’ या साहित्यप्रकाराच्या मर्यादा आणि वैशिष्ट्ये जपत प्रभावीपणे आकाराला आली आहे. ट्रान्सजेंडर आंचल वर्मा या नायिकेचा जीवनपट सहसंवेदनेने रेखाटताना ही कथा केवळ तिची वैयक्तिक कहाणी राहत नाही; ती तिच्या संपूर्ण समुदायाचा प्रवास ठरते. त्यांच्या आयुष्यातील बारकावे, भोवतीचे वंगाळ आणि खजिल करणारे वास्तव, मृतप्राय यातना देणारी सामाजिक वागणूक, अपमान आणि नकारात्मकतेचा मारा; हे सगळं सहन करत स्वतःला उभं करण्याचा त्यांचा जीवघेणा संघर्ष वाचताना मन अक्षरशः पिळवटून निघतं. ‘कायांतर’ ही केवळ कथा नाही; ती वेदनेचा दस्तऐवज आणि अस्मितेची ठाम घोषणा आहे.
कायांतर या कादंबरीत आपल्या समाजाने स्त्री–पुरुष अशा उभारलेल्या चौकटीत तिसऱ्या पंथाला स्थान नाकारल्याचे कठोर वास्तव प्रकर्षाने समोर येते. पूर्वग्रहांच्या मनामनात उभारलेल्या भक्कम भिंती आणि त्यांच्यासाठी कायमचे बंद ठेवलेले दरवाजे, यामुळे तृतीयपंथीयांचे जगणे किती कठीण, दुःखमय आणि अवघड बनले आहे, याची जळजळीत जाणीव ही कादंबरी करून देते. 'कायांतर'ने प्रतिष्ठित समाजमनाला अंतर्मुख करीत, काही जाणीवा जागवल्या आहेत. कायांतर या कादंबरीतून एक ठाम प्रश्न उभा राहतो, समाजाने तृतीयपंथीयांच्या भोवती उभारलेल्या चौकटी, पूर्वग्रहांच्या भिंती आणि आपण देत असलेली अपमानास्पद वागणूक जर बाजूला ठेवली, आणि त्यांना समाजघटक म्हणून माणूसपणाचे समान हक्क दिले, तर त्यांच्या जगण्याचा प्रवास इतका जीवघेणा, इतका दाहक राहील का?
अतिशय संवेदनशील आणि ज्वलंत विषयाला हाताळण्याचे धाडस करणाऱ्या रश्मी पदवाड मदनकर यांनी ‘कायांतर’मधून तृतीयपंथीयांच्या वेदना, चिरडली जाणारी स्वप्ने आणि अस्तित्वासाठीचा त्यांचा संघर्ष समाजासमोर प्रभावीपणे आणला आहे. कादंबरीतील प्रत्येक व्यक्तिरेखा ठाशीव आणि जिवंत आहे. नायिका आंचल वर्माचे चित्रण इतके प्रभावी आहे की वाचकमनात तिला प्रत्यक्ष पाहण्याची, भेटण्याची उत्सुकता जागते. शांत, समंजस, प्रगल्भ आणि कणखर मनोवृत्तीची, मनाने नितळ पण तितकीच सजग असलेली आंचल तिच्या आयुष्यातील बालपणापासूनचे कष्ट, यातना, पडझड, एकटीने घेतलेले खंबीर निर्णय, उणीवांच्या दिवसांत लाभलेला आधार, सहवासातील जिव्हाळा आणि विश्वासघातानंतरची मानसिक पडझड या सगळ्यांतून सावरत नव्याने उभी राहणारी आंचलची जिद्द मनाला भिडते. सारथी ट्रस्टमुळे आयुष्याला मिळालेली नवी दिशा आणि अखेरीस सौंदर्यस्पर्धेत अव्वल येत ‘महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी’ म्हणून झालेली तिची निवड; हा तिच्या आत्मविश्वासाचा आणि अस्तित्वघोषणेचा परमोच्च बिंदू ठरतो. लेखिकेच्या संयमी, प्रवाही आणि भारदस्त लेखणीतून साकारलेला आंचल वर्माचा जीवनप्रवास वाचकांना खिळवून ठेवतो आणि अंतर्मुखही करतो. कायांतर ही कादंबरी तृतीयपंथीय समुदायाकडे पाहण्याची नवी शहाणीव निर्माण करेल, अशी आशा निर्माण करते. कादंबरीची नायिका आंचल आपल्या मनोगतात अत्यंत थेट शब्दांत सांगते ... “माझ्या आयुष्याचा आरसा असलेले हे पुस्तक माझ्यासाठी केवळ साहित्यकृती नाही; ते माझ्या अस्तित्वाला मिळालेल्या सामाजिक मान्यतेचे प्रतीक आहे.” ही ओळ केवळ तिच्या वैयक्तिक भावविश्वाची अभिव्यक्ती नाही, तर संपूर्ण समुदायाच्या स्वीकृतीच्या आकांक्षेचा आवाज आहे.
लेखिकाही आपल्या मनोगतात स्पष्ट करते; “जर या पुस्तकानं वाचकांच्या अंतःकरणात एक क्षणभर जरी ‘त्यांचंही आयुष्य आपल्या आयुष्याइतकंच महत्त्वाचं आहे’ ही जाणीव जागवली, तर मला वाटेल माझा हा लेखनप्रवास खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला पोहोचला आहे.” या शब्दांतून ‘कायांतर’चा मूळ हेतू अधोरेखित होतो.. वेदना मांडण्यापुरते नव्हे, तर संवेदना जागवण्यासाठी; कथा सांगण्यासाठी नव्हे, तर समाजमनाला अंतर्मुख करण्यासाठी ही कादंबरी लेखिकेने लिहिली आहे.
'पद्मकोश' ही रश्मी पदवाड मदनकर यांची यापूर्वी प्रकाशित झालेली पत्ररूप चरित्रात्मक कादंबरी. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करणाऱ्या नायिकेच्या वेदना, तिची अंतःकरण हेलावून टाकणारी झुंज आणि मृत्यूच्या सावटातही सकारात्मकतेने प्रत्येक क्षण जगण्याची तिची जिद्द हे सगळं लेखिकेने पत्रात्मक संवादातून अत्यंत हृदयस्पर्शीपणे साकारलं आहे. डॉक्टरांनी आयुष्याचा अवधी मोजून दिल्यानंतरही न खचता उभी राहणारी ती नायिका वाचकांच्या मनात खोलवर घर करून राहिली. कॅन्सरसारख्या ज्वलंत विषयावरची ही वेगळ्या धाटणीची पत्रोत्तररूपी कादंबरी रसिकांना भावलीच नाही, तर प्रेरणादायी ठरली. ‘पद्मकोश’ची नायिका आजही सकारात्मकतेने आयुष्य जगत आहे; हीच त्या साहित्यकृतीची खरी पावती आहे. याशिवाय त्यांचे २ काव्यसंग्रह आणि एक सामाजिक लेखसंग्रह प्रकाशित आहे.
त्यानंतर आलेली कायांतर ही त्यांची आजची दुसरी बहुचर्चित कादंबरी. आंचलची जीवनगाथा केवळ एका व्यक्तीचा प्रवास उलगडत नाही, तर आपल्या सामाजिक विचारसरणीवर आणि बंदिस्त चौकटींवर प्रकाश टाकते. आपापल्या कोशात गुरफटलेल्या जीवनप्रणालीला ती हलवते, सजग करते आणि अंतर्मुख होण्यास भाग पाडते. ‘कायांतर’ तृतीयपंथीयांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात बदल घडवावा, समाजातील प्रत्येक उपेक्षित घटकाला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा हीच आशा व्यक्त करते. या दोन्ही कादंबऱ्यांतून रश्मींच्या लेखणीचा धागा एकच जाणवतो.... तो म्हणजे 'वेदनेतून उभारीकडे, उपेक्षेतून स्वीकृतीकडे आणि संघर्षातून आत्मसन्मानाकडे नेणारा'.
'कायांतर' ही केवळ संघर्ष आणि व्यथांचीच कहाणी नाही तर धैर्य, आशा, जिद्द आणि माणुसकी याचाही अनुभव या कादंबरीतून येतो. असे लेखन लेखिका रश्मी पदवाड मदनकर यांच्या लेखणीतून पुनःपुन्हा येत राहो, त्यांच्या लेखन प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा !
प्रा. मीनल येवले
नागपूर
पुस्तक - कायांतर
प्रकार - कादंबरी
लेखिका - रश्मी पदवाड मदनकर
प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन, पुणे
संपर्क - ७७२०००११३२



नसरापूर घटनेच्या निमित्ताने...

 ज्या दिवशी ही घटना घडली, अगदी त्याच दिवशी माझी अडीच वर्षांची भाची दिवसभर राहायला घरी आली होती, सोबत दहा वर्षांची मोठी भाची. आमचा अक्खा दिवस या चिमुकल्यांचे चैतन्याने भरलेले वावरणे, त्यांचा खळाळता आनंद पाहण्यात गेला. खेळता खेळता या देवाच्या फ़ुलपाखरांना टेबलाचा कोपराही लागू नये, जरा खरचटूही नये म्हणून केवढं जपत होतो आम्ही. इतक्या नाजूक. इतक्या कोवळ्या की आयुष्यात त्यांना जराशीही इजा पोहोचू नये...त्यांचा आनंद चिमूटभरही कमी होऊ नये, त्यांच्या वाट्याला सदैव भली माणसे यावीत असं वाटत राहिलं. आणि म्हणूनच त्याच दिवशी घडलेली ती घटना फारच जिव्हारी लागली.

गेल्या महिनाभर झालेल्या घटनांनी खूप उदास, खूप अस्वस्थ वाटतं आहे… एवढं की सगळं सोडून कुठेतरी दूर पळून जावं असं मनात येतं. या कुठल्या जगात राहतो आहे आपण ? हे जग आपल्यासाठी नाहीच, किंवा आपणच इथे राहण्याच्या लायकीचे नाहीयोत.. पण प्रश्न असा की जावं तरी कुठे? जिकडे पाहावं तिकडे माणसं… आणि त्यांच्या मनातल्या विचारांची-विकारांची गुंतागुंत... जितकी माणसे तितक्या वृत्तीच नाही; तर तितक्या विकृती. त्या विचारांना, त्या मानसिकतेला बदलणं आता जणू अशक्यच वाटायला लागलं आहे. माणूसपण संपत चाललंय का…? चांगुलपणा आता फक्त शब्दात उरलाय का…? असे प्रश्न मनात वारंवार येतात. नसरापूरच्या त्या चिमुकल्या जीवावर जे अत्याचार झाले, त्याची वेदना खूप आत खोलवर जाऊन भिडली आहे. मन कळवळलं, आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटलं… चार दिवस झाले पण त्या वेदनेलाही आवाज फुटत नाहीये, असं जाणवलं.
आजकाल सगळेच “व्यक्त व्हा” म्हणतात. पण कुणासाठी व्यक्त व्हायचं…? आणि व्यक्त होऊन काय बदलणार आहे…? गेली कित्येक वर्षें सगळेच ओरडत व्यक्त होत आहेत, लिहित आहेत, बोलत आहेत… तरीही जग तसंच आहे. उलट अधिकच घसरणीला लागलं आहे. जर केवळ व्यक्त होण्यानं बदल झाला असता, तर आजपर्यंत सगळं काही वेगळं, चांगलं दिसलं असतं. आता असं वाटायला लागलं आहे की व्यक्त होणंही एक दिखावा झाला आहे. केवळ सोशल मीडियावरील मुखवट्यामागचं दिखाव्याचं व्यक्त होणं. कारण शेवटी प्रत्येक जण आपल्याला जे पटतं, तेच घेतो. कितीही सांगितलं, कितीही समजावलं… तरीही ते कुणापर्यंत पोहोचत नाही. शब्द हवेतच विरघळून जातात.
सरकार येतात, जातात… बदलाचे आश्वासन देतात. पण हे सगळं वरवरचं आहे. खरा बदल तर माणसांच्या मनात व्हायला हवा आहे. आणि तोच आता सर्वात कठीण वाटतो आहे. माणसांच्या आत साचलेली घाण… ती कुठलंही सरकार साफ करू शकत नाही. तो बदल प्रत्येकाने स्वतःच स्वतःच्या आतून करायला हवा.
आज माणूस माणसापासून दूर जातोय… काही ठिकाणी तर माणूस राक्षस होत चाललाय. सहनशक्तीचा कडेलोट होतो आहे. आणि अशा वेळी एकच वाटतं ; आता खूप झालं… आता थांबायला हवं.
आपण सतत बोलतो, व्यक्त होतो… कृतीशून्य असतं सगळं.. कोलाहल वाढत चाललाय. कुणालाच काही समजून घ्यायचे नाहीये प्रत्येकाला व्यक्त व्हायची घाई. शांतता हवी न. सहिष्णुता वाढवावी लागेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं इन्स्टंट का हवी ? मारून टाका, कापून टाका, जाळून टाका ? उद्याच्या उद्या आरोपीचा खात्मा केला पाहिजे म्हणताना उद्या एखाद्यावर खोटे आरोप झाले तर ते सिद्ध करायचा पण वेळ घ्यायला नको ? हे नाही का मनात येत. संयम बाळगायला हवा. कायद्यावर विश्वास ठेवायला हवा. संयम आणि समंजस शांतता राखली गेली पाहिजे.. सोल्युशन शोधायचे आहे. आयुष्य म्हणजे काही दोन तासांची थ्रिल देणारी फिल्म नाही.
म्हणूनच कदाचित आता सगळ्यांनी थोडं शांत होण्याची गरज आहे. गुन्हा करण्यापासून शांत होणं…
समाजात विष पसरवण्यापासून शांत होणं… जाती-धर्माच्या नावावर भिंती उभ्या करण्यापासून शांत होणं… ही शांतता पळून जाण्याची नाही… ही शांतता आत डोकावण्याची आहे. थोडं थांबण्याची, स्वतःला विचारण्याची की, “मी नेमके काय करतोय…?”
कदाचित मोठे बदल लगेच होणार नाहीत. पण प्रत्येकाने स्वतःत थोडासा चांगुलपणा जपला…थोडा समजूतदारपणा वाढवला… तरच काहीतरी बदल शक्य आहे. आपण जग बदलायचा प्रयत्न करतोय, पण कदाचित आता वेळ आली आहे, स्वतःकडे परत वळायची. कारण बदल घोषणा, आंदोलनं, चित्कार करून होत नाही; ओरडण्यापेक्षा, थोडं थांबणं गरजेचं आहे… थोडं स्वतःला ऐकणं, स्वतःला समजावणं गरजेचं आहे… जर प्रत्येकाने एक क्षण जरी थांबून स्वतःच्या मनात डोकावलं, तर कदाचित आपल्या आतलाच कुट्ट अंधार, इतकी घाण, इतका राग, इतकी हिंसा पाहता येईल, प्रयत्नपूर्वक कमी करता येईल. स्वतःपासून केलेली हीच खरी सुरुवात असेल थोडंसं तरी पुन्हा माणूस होण्याची..हे जग किमान चिमुकल्या जीवांसाठी विश्वासार्ह, जगण्यालायक, आनंदी राहण्यायोग्य बनवता येईल.

Friday, 24 April 2026

कायांतर : देहाच्या कैदेतून माणुसकीच्या मुक्तीकडे



“कायांतर” ही रश्मी पदवाड मदनकर लिखित तृतीयपंथीयांच्या वेदना आणि संघर्ष मांडणारी प्रभावी कादंबरी आहे. अश्विन वर्मा ते आंचल वर्मा असा तिचा जीवनप्रवास अत्यंत खडतर असून समाजमान्य नसलेल्या किन्नर समूहाच्या यातना यात वास्तववादी पद्धतीने उलगडल्या आहेत. ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे; स्वतः आंचल वर्माने लेखिकेशी संवाद साधत तिची जीवनगाथा सांगितली आहे. “कायांतर” हे शीर्षक अत्यंत समर्पक आणि प्रतीकात्मक असून, मुखपृष्ठही स्त्री-पुरुषांतील द्वंद अधोरेखित करत विषयाला पूरक ठरते.

भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांची सुरेख सरमिसळ या कादंबरीत अत्यंत लयबद्धपणे घडताना दिसते. कादंबरीचा सूर आणि ताल एकरूपतेने पुढे सरकत राहतो, त्यामुळे वाचकाची उत्सुकता प्रत्येक पानागणिक वाढत जाते. आंचलच्या यशापासून सुरू होणारा प्रवास हळूहळू तिच्या बालपणात शिरतो आणि अश्विनच्या रूपात, पुरुषी देहात स्त्रीत्वासाठी चाललेली आतली धडपड लेखिकेने अत्यंत संवेदनशीलतेने रेखाटली आहे.

दुःखातून भोगाकडे आणि पुढे यशाकडे वाटचाल करणारी आंचल आणि बालपणीचा अश्विन ही एकच व्यक्ती नव्हे तर जणू दोन वेगवेगळी रूपं वाटतात, तरी ती एकाच अस्तित्वाच्या दोन बाजू आहेत हे समजेपर्यंत आपण बदललेलो असतो.. एका पुरुषाच्या शरीरात कैद झालेली स्त्री बाहेर पडण्यासाठी तडफडत असल्याची जाणीव या कथनातून तीव्रतेने उमटते. आंचल आणि अश्विन या दोन्ही रूपांमधील हा प्रवास लेखिकेने प्रकरणागणिक अत्यंत प्रभावी आणि प्रवाही शैलीत उभा केला आहे. त्यांची पडझड पाहून वाचकाच्या संवेदना जागृत होतात आणि समाज म्हणून या समाजाला समजून घेण्यात आमची चूक झाली असा एक क्षमाभाव निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

लेखिकेची भाषा अत्यंत साहित्यिक, संवेदनशील आणि मनाचा ठाव घेणारी आहे. त्या आंचलबद्दल लिहिताना म्हणतात, “शरीर कुठलंही असलं तरी तिने शंभर टक्के २४ कॅरेट सोन्यासारखं मन मिळवलं होतं,” तसेच “स्थापत्यकलेतील चूक रंगरंगोटीने झाकता येते, डॉक्टरांची चूक टाळता येते; पण नियतीची चूक कुणाकडे मांडायची?” अशा ओळींतून आंचलची वेदना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होते. लेखिकेच्या भाषेतलं सौष्ठव आणि अलंकारिकता ही कृत्रिम न वाटता स्वाभाविकपणे उमटते. एका ओळीत व्यक्तिमत्त्व उभं करण्याची त्यांची हातोटी विशेष लक्षवेधी आहे. अश्विनच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक व्यक्तींचं चित्रण त्यांनी विस्ताराने न करता, अत्यंत थोडक्यात पण नेमक्या शब्दांत उभं केलं आहे. त्यामुळे त्या व्यक्तिरेखा वाचकांच्या डोळ्यासमोर जिवंत होतात. आंचलसोबतच खातिमा, रेशमा, अम्मा आणि आनंद चांदराणी यांसारख्या पात्रांच्या माध्यमातून अनेकांच्या वेदना या कादंबरीत प्रभावीपणे प्रकट होताना दिसतात.

अश्विनचा पुरुषत्वातून स्त्रीत्वाकडे जाणारा प्रवास अत्यंत बोलका आणि अंतर्मुख करणारा आहे. आयुष्यभर प्रेमाच्या अभावाने हळवा झालेला अश्विन खातीमामध्ये जणू मातृत्व शोधतो. लेखिकेने वापरलेल्या प्रतिमा अत्यंत प्रभावी आणि अर्थपूर्ण आहेत. दिल्लीला जाताना अश्विन जणू आपल्या तुडवलेल्या, पडझड झालेल्या बालपणाचे तुकडे गाठोड्यात बांधतो; ही प्रतिमा मनाला खोलवर स्पर्श करून जाते. एखादं नकोसं झुडूप उपटून टाकावं आणि पुन्हा कुठेतरी रुजावं, तसं अश्विनचं आयुष्य उखडत, तुटत आणि तरीही पुन्हा उभं राहत राहणारं, अत्यंत संवेदनशीलतेने उभं केलं आहे.

अश्विन जेव्हा आंचलमध्ये रूपांतरित होतो, तेव्हा त्याच्या मनातील भावनांचा आवेग आणि बदलत जाणाऱ्या आयुष्याचा प्रवास लेखिकेने रेल्वेप्रवासाच्या प्रतीकातून अत्यंत प्रभावीपणे उभा केला आहे. या प्रतीकात्मक मांडणीतून अंतर्मनातील हलचाली आणि आयुष्याच्या वळणांची जाणीव अधिक तीव्रतेने जाणवते.
ही कादंबरी केवळ अश्विन किंवा आंचलच्या जीवनकथेत मर्यादित राहत नाही; ती संपूर्ण किन्नर समाजाच्या वेदना आणि वास्तवाला स्पर्श करते. त्यांच्या प्रथा, परंपरा, श्रद्धास्थाने, दैवतं, तसेच त्यांच्या आयुष्यातील नियम आणि वास्तव यांचा अभ्यासपूर्ण आणि सखोल परिचय लेखिकेने वाचकांना करून दिला आहे. त्यामुळे ही कथा केवळ वैयक्तिक अनुभव न राहता एका संपूर्ण समुदायाची जाणीव करून देणारी ठरते.

रश्मी या लेखिका होतात, कारण समाजातील संघर्ष, दुःख आणि अन्याय त्यांना सतत अस्वस्थ करत राहतात. यापूर्वीची त्यांची #पद्मकोश ही कादंबरी त्याचीच साक्ष देते. संघर्षमय आयुष्याला आवाज देताना त्या केवळ वेदना मांडत नाहीत, तर करुणेने ओथंबलेलं मनही वाचकांसमोर ठेवतात आणि त्यामुळे वाचक नकळत अंतर्मुख होतो. चित्रपटातील कॅमेऱ्यासारख्या नेमकेपणाने, अलिप्त पण संवेदनशील दृष्टिकोनातून त्या पात्रांचे बहिरंग आणि अंतरंग उभे करतात. त्यामुळे #कायांतर ही कादंबरी केवळ वाचनीय राहत नाही, तर ती अनुभवण्याजोगी ठरते. अनेक वाचकांनी प्रत्यक्षात किन्नर समुदायाला जवळून पाहिलेलं नसतं; पण ही कादंबरी वाचताना त्यांचं वास्तव डोळ्यांसमोर उभं राहतं. त्या प्रक्रियेत आपल्या संकुचित, कधी जाचक ठरलेल्या दृष्टिकोनातून बाहेर पडल्याची जाणीव होते. किन्नरांच्या अस्तित्वाच्या लढ्याला सामोरं जाताना मन हेलावून जातं आणि आपण त्यांच्याकडे ‘माणूस’ म्हणून कधीच पाहिलं नव्हतं, ही जाणीव ठसठशीतपणे समोर येते. हीच जाणीव समाजापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य “कायांतर” ही कादंबरी प्रभावीपणे पार पाडते.

घरातून हाकललेला अश्विन, आणि तरीही आंचल झाल्यावरही कुटुंबाशी असलेली नाळ जपण्याची तिची ओढ; ही भावना माणुसकीचा खरा अर्थ अधोरेखित करते. शेवटी कथा जिथून सुरू होते, तिथेच येऊन पूर्ण होते; मात्र वाचकाच्या मनात अनेक प्रश्न, वेदना आणि नव्या जाणिवांची ठिणगी पेटवून जाते. “कायांतर” ही कादंबरी वाचून संपत नाही, ती मनात दीर्घकाळ रेंगाळत राहते, माणूस म्हणून जगण्याचा अर्थ नव्याने उलगडून दाखवते.


सुरुची डबीर
+91 93706 96117

*****************************  

पुस्तकाचे नाव - कायांतर
लेखक - रश्मी पदवाड मदनकर
प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन
प्रकार - कादंबरी
विषय - तृतीयपंथी वास्तवावर आधारित  
संपर्क - ७७२०००११३२


 


Wednesday, 1 April 2026

साहित्यिक नकाशावर हरवलेली ओळख : वैदर्भीय स्त्री साहित्यिक !


'नागपूर' हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले शहर नाही, तर ते संस्कृती, शिक्षण आणि साहित्य यांचेही एक समृद्ध केंद्र आहे. “सारस्वतांचे माहेर” ही ओळख नागपूरने केवळ नावापुरती मिळवलेली नाही, तर अनेक प्रतिभावान साहित्यिकांच्या कार्यातून ती सतत सिद्ध होत आली आहे. या भूमीने घडवलेले लेखक, कवी, विचारवंत यांनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले असून भारतीय साहित्याची पत जागतिक स्तरावर उंचावण्याचे कार्यही केले आहे.
नागपूरची सांस्कृतिक परंपरा अत्यंत वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे. शिक्षणसंस्था, वाचनसंस्कृती, नाट्यसंस्कृती आणि विविध साहित्यिक उपक्रम यांच्या माध्यमातून येथे साहित्याची चळवळ नेहमीच जिवंत राहिली आहे. या वातावरणात घडलेल्या लेखकांनी केवळ शब्दांची मांडणी केली नाही, तर समाजाच्या वेदना, संघर्ष, आशा आणि बदल यांचे जिवंत चित्रण आपल्या लेखणीतून साकारले.
विशेषतः, या सारस्वत भूमीने दिलेल्या स्त्री लेखकांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. पारंपरिक चौकटी मोडत, सामाजिक कुप्रथांना आव्हान देत आणि स्वतःचा स्वतंत्र आवाज निर्माण करत या लेखिकांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या लेखनात स्त्रीच्या भावना, तिचा संघर्ष, तिची ओळख आणि तिचे स्वातंत्र्य यांचे अत्यंत प्रभावी चित्रण दिसून येते. या लेखिकांनी केवळ साहित्यनिर्मिती केली नाही, तर समाजमन घडवण्याचे कामही केले. त्यांनी स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय, शिक्षणाचे महत्त्व आणि मानवी मूल्ये यांसारख्या विषयांवर ठामपणे भूमिका मांडल्या. त्यांच्या लेखनामुळे अनेकांना विचार करण्याची दिशा मिळाली, तर अनेकांना प्रेरणा मिळाली. नागपूरच्या या साहित्य परंपरेतून घडलेल्या लेखिकांची नावे आज मराठी साहित्यात सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात आणि पुढील पिढ्यांसाठी त्या प्रेरणास्त्रोत ठरतात. त्यांच्या लेखनातून केवळ साहित्याचीच नव्हे, तर समाजाचीही प्रगती घडून आली आहे. अगदी १३ व्या शतकातील मराठी साहित्यातील आद्य कवयित्री मानल्या जाणाऱ्या महादाईसा ऊर्फ महदंबा यांचा संबंध विदर्भातील महानुभाव पंथाशी होता. त्यांनी 'धवळ्यांची' रचना केली, जी नागपूर-विदर्भ परिसरातील साहित्यिक वारशाचा भाग आहे. १९ व्या शतकातल्या ताराबाई शिंदेंपासून ते आजच्या डिजिटल युगातही नागपूरची ही साहित्य परंपरा कायम आहे. नव्या पिढीतील लेखक-लेखिका नव्या विषयांवर, नव्या शैलीत लेखन करत आहेत. मात्र, त्यांच्या पाठीशी उभी असलेली ही समृद्ध परंपरा आजही त्यांना दिशा देत आहे.
मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर एक कटू वास्तव समोर येते... बृहन्महाराष्ट्राच्या साहित्यिक नकाशावर वैदर्भीय, विशेषतः नागपूरच्या लेखिकांची आजही अपेक्षित ती दखल घेताना, त्यांना सुयोग्य मान-सन्मान मिळताना दिसत नाही. राज्यातील प्रभावी साहित्यिक वर्तुळात नावांची यादी काढताना विदर्भातील लेखिकांना अनेकदा दुय्यम स्थान दिले जाते. ही केवळ भावना नाही, तर विविध संमेलनांमधील प्रतिनिधित्व, पुरस्कारांचे वितरण, चर्चांमध्ये मिळणारी जागा आणि मुख्य प्रवाहातील समीक्षेतली उपस्थिती यांचा अभ्यास केला, तर ही तफावत स्पष्टपणे जाणवते. या परिस्थितीची कारणे शोधताना केवळ “बाहेरचे दुर्लक्ष” पुरेसे स्पष्टीकरण ठरत नाही. त्यासाठी आपल्या घरात, आपल्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात डोकावणे आवश्यक ठरते....
विदर्भ साहित्य संघसारख्या संस्थांनी निःसंशयपणे विदर्भात साहित्याची परंपरा जिवंत ठेवली. पण प्रश्न असा आहे की, या संस्थांच्या निर्णयप्रक्रियेत स्त्रिया कितपत आहेत? नेतृत्वपदांवर, धोरणात्मक समित्यांमध्ये, निवड प्रक्रियेत स्त्री लेखकांची उपस्थिती मर्यादित असेल, तर व्यापक पातळीवर त्यांचे प्रतिनिधित्व कमी राहणे स्वाभाविक ठरते. अलीकडील संस्थात्मक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साहित्यिक नेतृत्व, गटबाजी, प्रतिनिधित्व यावर चर्चा झाली; पण त्यात लेखिकांचा ठोस, संघटित आवाज कितपत होता? वैयक्तिक पातळीवर सक्षम लेखिका असल्या तरी त्या एकत्रित शक्ती म्हणून उभ्या राहत नाहीत, ही एक मोठी उणीव आहे. विदर्भाचा साहित्यिक इतिहास समृद्ध असला तरी त्याची मांडणी आणि परंपरा मोठ्या प्रमाणावर पुरुषकेंद्री राहिली आहे. त्यामुळे स्त्रियांचे योगदान नेहमीच दुय्यम ठरले किंवा अदखलपात्र राहिले आणि त्यामुळे जिथे घरातच आवश्यक ते महत्त्व मिळाले नाही, तिथे बाहेरची अपेक्षा काय करावी, अशी स्थिती. एकीकडे स्त्रियांच्या लेखनातून सामाजिक भान, स्त्री-अस्मिता, विषमता, बदलाची आस यांचे प्रभावी चित्रण दिसते; तर दुसरीकडे साहित्यिक सत्ताकारणात, निर्णयप्रक्रियेत, नेतृत्वात त्यांची उपस्थिती मर्यादितच राहते... असे का झाले ? हा प्रश्न केवळ “वैदर्भीय स्त्रिया कुठे चुकतात?” इतकाच नाही, तर तो संपूर्ण साहित्यिक संरचनेचा आणि संधींच्या असमानतेचाही आहे. यामागे बाह्य कारणे जितकी जबाबदार आहेत, तितकीच अंतर्गत मानसिकताही कारणीभूत आहे, हे मान्य करावे लागेल. तरीही प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करायचे झाल्यास काही मुद्दे नक्कीच पुढे येतात:
नागपूर आणि विदर्भातील अनेक लेखिका आपल्या लेखनगुणांनी सक्षम असतानाही, त्या व्यापक पातळीवर पुढे येण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करताना दिसत नाहीत. स्थानिक पातळीवर मिळणारा मान, कौतुक आणि ओळख यावर समाधान मानण्याची प्रवृत्ती दिसून येते. “आपल्या वर्तुळात मान मिळतो आहे, तेवढे पुरे” ही मानसिकता दीर्घकालीन दृष्टीने मर्यादा घालणारी ठरते. साहित्य हे केवळ सर्जनशीलतेचे क्षेत्र नसून, ते संवाद, नेटवर्किंग, संघटनात्मक सहभाग आणि नेतृत्व यांचेही क्षेत्र आहे याची जाणीव अजून व्यापकपणे झालेली दिसत नाही.
याच संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो जबाबदारीच्या पदांवर येऊन काम करण्याबाबत लेखिका वर्ग निराशावादी का आहे? नेतृत्व स्वीकारण्याची भीती, संघटनात्मक राजकारणापासून दूर राहण्याची वृत्ती, किंवा “आपल्याकडून काय फरक पडणार?” अशी आत्मसंशयाची भावना, हे घटक यामागे असू शकतात. पण या वृत्तीमुळेच विदर्भातील लेखिकांचा आवाज व्यापक पातळीवर पोहोचण्यात अडथळे निर्माण होतात हे आपल्या लक्षात येत नाही. ही परिस्थिती बदलायची असेल, तर केवळ बाह्य व्यवस्थेवर टीका करून उपयोग नाही. त्यासाठी स्थानिक पातळीवरूनच सजग, संघटित आणि धाडसी प्रयत्नांची गरज आहे. विदर्भातील लेखिकांनी स्वतःहून पुढे येऊन साहित्यिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, निवडणुकांमध्ये उभे राहावे, निर्णयप्रक्रियेत आपला ठसा उमटवावा ही काळाची गरज आहे. तसेच, परस्परांमध्ये सहकार्य, मार्गदर्शन आणि एकमेकांना पुढे नेण्याची वृत्ती निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. एकट्याने यश मिळवण्यापेक्षा, सामूहिक बळ उभारणे अधिक प्रभावी ठरते. साहित्यिक गुणवत्ता ही नक्कीच महत्त्वाची आहे, पण त्यासोबतच दृश्यमानता, उपस्थिती आणि सहभाग हेही तितकेच आवश्यक घटक आहेत.
एकंदरीत, नागपूरची “सारस्वतांचे माहेर” ही ओळख अभिमानाची असली, तरी त्या अभिमानाला साजेशी साहित्यिक आणि संघटनात्मक ताकद उभी करण्याचे आव्हान आजच्या पिढीसमोर आहे. संस्था संघटनेतील पुरुष सदस्यांनीही या दृष्टीने विशेष प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरेल; शिवाय स्त्री लेखकांनी स्वतःच्या क्षमतेची जाणीव ठेवत, मर्यादित चौकटी मोडून व्यापक व्यासपीठांवर आपली भूमिका ठामपणे मांडली, तरच हा असमतोल दूर होईल. अन्यथा, समृद्ध परंपरा असूनही योग्य प्रतिनिधित्व न मिळण्याची ही तफावत कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शांता शेळके यांच्या ओळींत सांगायचे तर—
“स्वतःचा दिवा आपणच पेटवायचा असतो.”
याच भावनेतून हा विषय केवळ चर्चेपुरता न राहता, बदलाची ठोस सुरुवात ठरो आणि उद्याच्या साहित्यिक नकाशावर वैदर्भीय लेखिकांची ओळख केवळ उपस्थितीची नव्हे, तर नेतृत्वाची नांदी ठरो हीच आशा आजच्या या मासिक स्तंभातील शेवटच्या लेखाद्वारे करते.... धन्यवाद !


रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com

(लोकसत्ता ''शहरनामा'' मालिकेत दि. 18 मार्च २०२६ बुधवार रोजी प्रकाशित लेख)  



Tuesday, 24 March 2026

संघर्ष, स्वाभिमान आणि मानवतेच्या वाटा - तृतीयपंथी समुदाय


आपण आपल्याच विश्वात इतके मश्गुल असतो की या दुनियेत आपल्यासारखीच दिसणारी; पण नियतीनं वेगळा बेत आखला म्हणून संघर्षमय आणि नाईलाजास्तव सामान्यांपेक्षा वेगळं आयुष्य जगण्यास भाग असणारी अनेक माणसे आहेत याकडे आपले लक्षही नसते किंवा लक्ष असले तरी अंगाला-मनाला काहीही लावून न घेता बिनदिक्कत झापडे पांघरून आपल्याला निघून जाता येते. पण अशी झापडं सगळ्यांनाच लावता येत नाही; अगदी त्यांनाही नाही ज्यांना स्वतःच मदतीची गरज असते; आपलीच झोळी फाटली असतांना ती उरलेली लक्तरं घेऊन इतर गरजुंच्या मदतीसाठी पुढे येतात. नागपूर शहराच्या वर्दळीमध्ये अनेक समाजघटक आपापल्या संघर्षांसह जगत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा, पण दुर्लक्षित समाजघटक म्हणजे तृतीयपंथी समुदाय. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेले हे लोक आजही स्वतःच्या अस्तित्वासाठी, सन्मानासाठी आणि समान हक्कांसाठी झुंज देत आहेत.

आपल्या समाजाने स्त्री आणि पुरुष अशा दोन ठराविक चौकटी उभ्या केल्या; मात्र त्या चौकटीत न मावणाऱ्या तृतीयपंथीयांकडे अनेकदा संशय आणि उपेक्षेच्या नजरेने पाहिले गेले. शिक्षण, नोकरी, निवारा आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत हक्कांसाठीही त्यांना सतत संघर्ष करावा लागतो. त्यामुळे उपजीविकेचे स्थिर मार्ग नसल्याने अनेकांना भीक मागणे किंवा मंगलकार्यांमध्ये नाच-गाणे करण्यावर अवलंबून राहावे लागते. तरीही गेल्या काही वर्षांत परिस्थितीत सकारात्मक बदल दिसू लागले आहेत. विविध संस्था आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे शिक्षण, रोजगार आणि समाजातील स्वीकाराबाबत जागरूकता वाढत आहे आणि काही तृतीयपंथी विविध क्षेत्रांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करताना दिसतात.

नागपूरमध्येही या समुदायातील अनेक जण स्वकष्टाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने स्वतःचा मार्ग घडवत आहेत. समाजाने जर पूर्वग्रहांच्या चौकटी मोडून त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहिले आणि सन्मानाने जगण्याची संधी दिली, तर त्यांच्या आयुष्यातील संघर्ष निश्चितच कमी होऊ शकतो. तृतीयपंथी समाज वेगळा नाही; तोही आपल्या समाजाचाच एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांना समजून घेणे, स्वीकारणे आणि सन्मान देणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर आपल्या माणुसकीची खरी कसोटी आहे. यानिमित्ताने नागपुरातील काही तृतीयपंथींची ओळख करून घेऊया..

विद्या कांबळे या नागपूरमधील तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्या अनेक वर्षांपासून आपल्या समुदायाच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी काम करत आहेत. शिक्षण, आरोग्य, कायदेशीर मदत आणि रोजगाराच्या संधींबाबत त्या जनजागृती करतात. विशेष म्हणजे, त्या लोकअदालतमध्ये पॅनल सदस्य म्हणून सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी ठरल्या. तृतीयपंथीयांना ओळखपत्रे, शासकीय योजना आणि आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठीही त्या सातत्याने प्रयत्नरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे समाजात या समुदायाविषयी स्वीकाराची भावना हळूहळू वाढताना दिसते.

ट्रान्सजेंडर आंचल वर्मा यांनी संघर्षातून आपलं आयुष्य घडवलं. किन्नर समाजाला ज्या कठीण वाटा पार कराव्या लागतात, त्या सगळ्या अनुभवूनही त्या कधी खचल्या नाहीत. नाच-गाण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज समुपदेशन आणि LGBTQAI समुदायासाठी सामाजिक कार्यापर्यंत पोहोचला असून त्या देशभर जनजागृतीसाठी प्रवास करतात. सौंदर्यस्पर्धेत “मिस महाराष्ट्र” ठरलेल्या आंचल सामाजिक कार्यासाठी मॉडेलिंगही करतात. विशेष म्हणजे अवघ्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या एका मुलीला वाचवून तिचा सांभाळ केला आणि एका वृद्ध देवदासी महिलेलाही आधार दिला. त्यांच्या या प्रेरणादायी आयुष्यावर “कायांतर” हे पुस्तक प्रकाशित झाले, जे आज राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.

शिवानी सूरकर या विदर्भातील तृतीयपंथी समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. समाजातील उपेक्षा आणि भेदभावाचे चटके सहन करूनही त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला. B.Com, MBA, LLB अशी उच्च शिक्षणे पूर्ण करत २०२० साली बार कौन्सिलकडून वकिलीची सनद मिळवून त्या विदर्भातील पहिल्या तृतीयपंथी वकिल ठरल्या. त्या तृतीयपंथीयांना कायदेशीर मार्गदर्शन, ओळखपत्रे मिळविण्यास मदत आणि विविध सामाजिक प्रश्नांवर आधार देत आहेत. त्यांच्या कार्यातून शिक्षण आणि स्वावलंबनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे.

ट्रान्सजेंडर मोहिनी या किन्नर समाजातील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नृत्यांगना आहेत. मंगलकार्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतील नृत्य-गायनाच्या परंपरेला त्यांनी केवळ परंपरेपुरते मर्यादित न ठेवता त्यात कलात्मकतेची भर घालून वेगळी ओळख मिळवली. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतून नृत्य सादर करत त्या किन्नर समुदायाच्या प्रतिभेकडे समाजाचे लक्ष वेधतात. कलेच्या माध्यमातून तृतीयपंथीयांविषयीचे गैरसमज दूर करून समाजात स्वीकार आणि सन्मान वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.

कल्याणीगुरु या नागपूरमधील तृतीयपंथी समाजातील ओळखल्या जाणाऱ्या किन्नर गुरु आहेत. सन्मानाने आणि स्वावलंबीपणे जगण्याचा संदेश देण्यासाठी त्यांनी वेगळी वाट निवडत नागपुरात “चाय वीला” या नावाने चहाचे दुकान सुरू केले, ज्याची ख्याती आज सर्वदूर पसरली आहे. पारंपरिक मंगती किंवा मंगलकार्यांपुरतेच आयुष्य मर्यादित नसते, तर व्यवसायाच्या माध्यमातूनही स्वाभिमानाने जगता येते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक तृतीयपंथीयांसाठी स्वावलंबनाची नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.

तृतीयपंथीयांना नोकरीच्या संधी कमी मिळतात, या वास्तवावर खंत व्यक्त करत बसण्याऐवजी ट्रान्सजेंडर संजना हिने वेगळी वाट निवडली. तिने स्टॉक मार्केट ट्रेडिंगचे पद्धतशीर प्रशिक्षण घेत सातत्याने सराव करत या क्षेत्रात प्राविण्य मिळवले. आज ती शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून सन्मानाने उदरनिर्वाह करते. विशेष म्हणजे, ती आपल्या समुदायातील इतर इच्छुकांना देखील ट्रेडिंगचे प्रशिक्षण देत स्वावलंबनाचा नवा मार्ग दाखवत आहे.

याशिवाय नागपूरमध्ये काही तृतीयपंथी HIV-जागरूकता, आरोग्य मोहिमा आणि सामाजिक जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांसोबत काम करतात. आरोग्य शिबिरे, समुपदेशन आणि जनजागृती कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. काहींनी छोट्या व्यवसायांद्वारे स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे.. जसे की ब्युटी पार्लर, मेकअप सेवा, कार्यक्रम व्यवस्थापन. काही तृतीयपंथीनी लॉकडाऊन किंवा आपत्तीच्या काळात गरजू लोकांना अन्नवाटप, कपडे आणि आवश्यक वस्तू देण्याचे मानवतावादी काम केले. त्यामुळे समाजात त्यांच्या भूमिकेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन तयार झाला. अनेकांनी सिद्ध केले "माणुसकीच्या वाटेने चालण्यासाठी माणसांनी घालून दिलेल्या चौकटीत जन्मणे आवश्यक नसते. मानवता लिंगावर अवलंबून नसते; ती मनाच्या विशालतेतून आणि संवेदनशीलतेतून उमलते. माणुसकी जपण्यासाठी जे धाडसी, नि:स्वार्थ आणि करुणेने भरलेले हृदय लागते, ते त्यांच्या जवळही ताकदीने धडधडत असते.'' पण आजही कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या वाट्याला काय येते ? वंचना आणि उपेक्षा!

अशावेळी फ़िराक़ गोरखपुरी यांचे शब्द आठवतात....

“हर ज़ोर-ए-ज़माने का सहा हमने बड़ी मुश्किल से,

हम लोग मगर आदमी कहलाए बड़ी मुश्किल से…”


या ओळीत ज्या वेदना दिसतात, त्या आजही तृतीयपंथीच्या संघर्षांना तंतोतंत लागू पडतात.

या सर्व उदाहरणांकडे पाहिले की एक गोष्ट ठळकपणे जाणवते; तृतीयपंथी समाजाला संधी, आधार आणि स्वीकार मिळाला, तर तेही इतरांप्रमाणे स्वाभिमानाने आणि स्वावलंबीपणे आयुष्य जगू शकतात. उपेक्षा आणि भेदभावाच्या अंधाऱ्या वाटा पार करत त्यांनी जिद्दीने स्वतःसाठी नवे मार्ग तयार केले आहेत. थोडा विश्वास, थोडी साथ आणि समानतेची दृष्टी मिळाली, तर ते केवळ स्वतःचे आयुष्य घडवत नाहीत, तर समाजालाही संवेदनशीलतेचा नवा धडा देतात. कारण शेवटी प्रश्न वेगळेपणाचा नाही, तर स्वीकाराचा आहे आणि तृतीयपंथी समाज हा आपल्या समाजाचाच एक अविभाज्य भाग आहे.



रश्मी पदवाड मदनकर

rashmi.aum15@gmail.com

7720001132


(लोकसत्ता ''शहरनामा'' मालिकेत दि. 18 मार्च २०२६ बुधवार रोजी प्रकाशित लेख)  




Tuesday, 10 March 2026

आपल्या संवेदना न मरो...

 


शताब्दी चौकात दोनदोनच्या जोडीत त्या चौघी आळीपाळीने दिसत राहतात. पहिली जोडी आहे १३-१४ वर्ष वयाची आणि दुसऱ्या दोघी असाव्यात २२-२५ तल्या. विशेष म्हणजे चौघींजवळ चार बाळ आहेत.. अगदी छप्पर फाड के दिलंय बघा त्यांना देवाने. ही बाळं झोळीत निपचित पडलेली असतात किंवा कडेवर रडत, पेंगत बसलेली असतात, उन्हातान्हात, पावसात, धुळीत. दुसऱ्या १३-१४ वर्ष वयाच्या ज्या दोघी आहेत. त्या स्वतःच किशोरी असताना त्यांच्याजवळ प्रत्येकी एकेक चिमुकलं असतं. सिग्नल लागला की त्या पुढे येतात, काच ठोठावतात. तुम्ही 'ये किसका बच्चा उठाकर घुमते हो' असं विचारलं की त्या 'मेरा बच्चा है' असं सांगतात आणि तुम्ही पुढला प्रश्न विचारण्याच्याआत भरभर चौक सिग्नल ओलांडून निघून जातात. मग पुढले काही दिवस गुडूप होतात. दिसत नाहीत... मग पुन्हा येतात. पुन्हा झोळीत बाळं; तीच का नवी…? माहिती नाही.

प्रश्र्न असा की प्रत्येकीकडे एक या दराने असे किती चिमुकले असतात यांच्याकडे.. इतक्या ठोक भावाने कुठे मिळतात इतकी लहान मुले ? एका चौकात इतकी तर शहरात किती? आणि राज्यात? देशात?  ही मुले जरा मोठी झाली की काय होतं यांचं? कुठे जातात ही? यात मुली असतील तर त्यांचं काय होतं? यांचं भविष्य काय ? दिवसा सिग्नलवर दिसणाऱ्या या वेदना... तर रात्रीच्या अंधारात काय होत असेल ?

उत्तरं नाहीत, वाली नाही, तक्रार नाही, पुरावा नाही.

पण म्हणून प्रश्न थांबत नाहीत. त्या बाळांचे मिटलेले डोळे, उन्हाने काळवंडलेली गालं आणि स्वतःचं बालपण हरवलेल्या त्या मुली;  हे सगळं मनात ठसत राहतं. आपल्याला कदाचित फारसं काही करता येत नाही. आपण गाडीत बसतो, काच वर करतो, सिग्नल हिरवा झाला की पुढे निघून जातो. पण निदान प्रश्न विचारता येतात. निदान अस्वस्थता शब्दात मांडता येते. कारण कधी कधी बदलाची सुरुवात उत्तरांपासून होत नाही; ती अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांपासूनच होते; आणि म्हणूनच हा प्रपंच. ही तळमळ. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न.

एखाद्या दिवशी मन खूप उद्विग्न करणारं काहीतरी नजरेत पडतं आणि सगळंच कसं फोल वाटायला लागतं. काही महिन्यांआधीची गोष्ट असेल; रोज ऑफिसला जाण्याच्या वाटेत व्हेरायटी चौक नावाचा प्रशस्त चौक लागतो. चौकाच्याच बाजूला मोठ्ठं 'मुख्य' पोलिस स्टेशनही आहे. -६ वर्षाच्या मुलीचा खांद्यापासून ढोपरापर्यंत कट झालेला हात दाखवत बाराएक वर्षांचा मुलगा पुढे आला, हिला औषधीला पैसे द्या म्हणाला. रक्ताळलेला पूर्ण फाटून फाकलेला हात बघून फार कसनुसं झालं. हातात येईल ती शंभरेक रुपयांची नोट त्या पोराच्या हातात ठेवली आणि सिग्नल सुटताच निघून गेले. त्या दिवसभर तो लाललाल हात नजरेसमोर दिसत राहिला. काय झालं असेल का झालं असेल?  अनेक तर्कवितर्काचे सत्र मनातच रंगत राहिले. पण झाला असेल अपघात काहीतरी म्हणून मग संध्याकाळपर्यंत सगळं विस्मरणात गेलं. झाला गेला दिवस निवळला. त्यानंतरच्या चौथ्या दिवशी पुन्हा ५ वर्षांच्या नाजुकश्या मुलीचा पूर्णतः भाजलेला हात पुढे करत ८-९ वर्षांचा वेगळाच एक मुलगा पुढे आला. त्या एवढ्याश्या चिमुकलीचा हात इतका भाजला होता जणू उकळत्या तेलात तळून काढलाय. जीव कळवळला, भोवळ यायची बाकी राहिली. त्या पोराला बोलले, चल दवाखान्यात जाऊ. हिच्यावर उपचार करू, तर ''पैसे दो, नहीं तो जाओ'' म्हणत भरभर चालत रस्ता ओलांडून तो निघून गेला. मी पाहतच राहिले. राहवले नाही म्हणून लगेच वळवून सरळ गाडी पोलिस स्टेशनात घेतली. आत जाऊन रीतसर तक्रार नोंदवली... दिवसभर मन लागलं नाही. इतक्या चिमुकल्या मुलींसोबत काय होतंय, हे इतकं बाहेर दिसतंय तर एकट्यात आत कायकाय होत असेल? विचार करून डोक्याचा भुगा. आत आत खूप गहिवरून येत होतं, चलबिचल चलबिचल होत राहिली. स्वतःच स्वतःचा राग आला. बाहेर हे सगळं असं काय काय चाललंय आणि आपण काय करतोय? आभासी जगात दाखवल्या जाणाऱ्या कित्येक गुडी गुडी गोष्टींना सत्य मानून आनंदात जगतोय. डोळे झाकल्याने सत्य बदलणार आहे का? डोळ्यावरची झापडं काढायला हवीय...

तर मी तक्रार नोंदवल्यानंतर ऑफिसला जाता येता या चौकात आवर्जून लक्ष देणं सुरु होतं... पूर्ण १२ दिवस लहान मुलं तर सोडा साधे दुसरे भिकारीही दिसले नाहीत. वाटलं, चला आपल्या तक्रारीने काहीतरी सकारात्मक फरक पडला असावा, चिमुकल्यांना पोलिसांनी या दुष्टचक्रातून बाहेर काढले असावेपण तसे नव्हते. एका सकाळी पुन्हा अगदी 5-6 वर्षांची नवी पोर हात पूर्ण लदलद जळालेल्या अवस्थेत पुढ्यात आली. पोलिस स्टेशनला जाऊन मी पुन्हा जरा आठवण देऊन आले त्याचा उपयोग पुन्हा ४ दिवस होईलही, पण अश्या किती चिमुकल्या नरकयातना भोगत राहणार आहेत, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. मी एकटीने तरी काय करावे? हवे तसे उत्तर सापडतच नाही.

नागपुरातील अनेक सिग्नल्सवर, रेल्वे स्थानकांवर, मंदिरात, लहान-मोठा ताजबाग अश्या कित्येक ठिकाणी लहान मुले भीक मागताना आढळतात. ऊन-पाऊस-गारवा कुठल्याही वातावरणात उघडे-नागडे, उपाशी-तापाशी, पिंजारलेले केस, जखमा-जखमा झालेलं अंग... वेदनेने-दुःखाने पिचलेले किंवा मग त्यापलिकडे गेलेले.  कुणाचे आहेत, कुठून आले, कुठे गेले ह्याचा कुणाला थांग पत्ता नसतो. त्यातील बरीच मुले ही माफिया लोकांनी गरीब वस्तीतून भीक मागण्यासाठी अपहरण केलेली किंवा परराज्यातून पळवून आणलेली असतात. या मुलांच्या संरक्षण आणि उत्तम नागरिक बनण्याच्या हक्काबद्दल सरकार, प्रशासन काही करणार आहे का?  की, रस्त्यावरच्या मोकाट श्वानांसारखी यांच्या आयुष्याला काहीच किंमत नाही?

 कित्येक आई-वडील याच रस्त्याने रात्रंदिवस प्रवास करीत असतील. यांच्या कुणाच्याच मनाला हे सारे प्रसंग कधीच खटकत नसतील का?  आम्ही कोडग्या मनांनी, उघड्या डोळ्यांनी हा तमाशा पाहत राहणार आहोत पाहतो आहोत. आमच्या संवेदना न मरो हीच प्रार्थना...!

अनेक वेळा सिग्नलवर दिसणाऱ्या, भीक मागणाऱ्या बालकांमागे केवळ दारिद्र्य नसून एक संघटित साखळी कार्यरत असल्याची चर्चा समाजात ऐकायला मिळते. काही प्रकरणांत मुलांना पळवून आणणे, त्यांना जाणीवपूर्वक असुरक्षित परिस्थितीत ठेवणे किंवा त्यांच्याकडून भीक मागवून आर्थिक फायदा मिळवणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे उघडकीस आलेले आहेत. भीक मागण्यासाठी लहान मुलांना जाणीवपूर्वक इजा करणे किंवा त्यांना मारणे हा केवळ गुन्हा नाही, तर मानवतेलाच काळीमा फासणारा प्रकार आहे. भारतात अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर भारतीय दंडसंहितेनुसार (IPC) कठोर कारवाई केली जाते. ही बाब केवळ कायद्याचा प्रश्न नाही; ती मानवी हक्कांची पायमल्ली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा, प्रशासन आणि बालकल्याण संस्था यांनी समन्वयाने आणि ठोस कारवाई करणे अत्यावश्यक आहे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती आणि नागरिकांची सतर्कता यामुळे अशा गुन्हेगारी साखळ्या मोडून काढणे शक्य आहे. प्रत्येक मुलाला सुरक्षित बालपण मिळणे हा केवळ सामाजिक नव्हे, तर नैतिक कर्तव्याचा विषय आहे.

काय करता येईल?

संशयास्पद घटना त्वरित पोलिस किंवा बालकल्याण समितीकडे कळवा.
• ‘
चाईल्ड हेल्पलाईन १०९८वर संपर्क साधा.
भीक देण्याऐवजी पुनर्वसन संस्थांना पाठिंबा द्या.
सजग नागरिक बना; दुर्लक्ष करू नका.

प्रशासन-पोलिस-संस्था यांनी संयुक्त कारवाई मजबूत करावी.

संवेदनशीलतेला कृतीची जोड देऊया. कारण प्रत्येक मूल भीक नव्हे, तर सुरक्षित, सन्मान्य आणि यशस्वी आयुष्याचा अधिकारी आहे. ते देण्यात आपण अपयशी ठरलो, तर ते केवळ व्यवस्थेचा नव्हे, तर समाज म्हणून आपल्या सामूहिक विवेकाचा पराभव ठरेल. एक पिढी सिग्नलच्या लाल दिव्यात अडकून राहू नये, एका पिढीचे बालपण हातात झोळी घेऊन रस्त्यावर हरवू नये, गुन्हेगारीकडे वळू नये; यासाठी आपण शांत राहू नये. नाहीतर उद्या इतिहास विचारेल तुम्ही पाहत होतातपण तुम्ही केलं काय?”

 

रश्मी पदवाड मदनकर 

7720001132 / 8208920440rashmi.aum15@gmail.com


(लोकसत्ता ''शहरनामा'' मालिकेत दि.२ मार्च २०२६ मंगळवार रोजी प्रकाशित लेख)  

Featured post

कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी

  प्रतिथयश कवयित्री, लेखिका मिनल येवले यांनी #कायांतर कादंबरीवर लिहिलेले हे पुस्तक समीक्षण.. मिनल ताई आणि देशोन्नती मनःपूर्वक आभार ********...