Monday, 2 March 2026

हिजाबपलीकडचा लढा : इराणमधील स्त्रियांचा विद्रोह

कालच्या इराणमधील घडलेल्या युद्ध घटनेच्या जवळजवळ महिनाभरापूर्वी तरुण भारत आकांक्षा पुरवणीसाठी लिहिलेली ही कव्हर स्टोरी... युद्ध, हिंसा किंवा हत्या यांच्या विरोधात आपले संस्कार असले तरी, कुणासाठी दया दाखवावी याचेही भान आपल्याला असले पाहिजे... हजारो माणसांचा जीव घेणाऱ्या एका क्रूर माणसासाठी आपला जीव तुटत असेल, तेव्हा त्या हजारो माणसांच्या अत्याचारात आपण त्याच्यासोबत होतो हा त्याचा अर्थ असतो.. असे असेल तर आपण स्वतःची तपासणी आधी केली पाहिजे... इराणची सत्ता नेस्तनाबूत होण्याआधी इराणची परिस्थिती काय होती हे समजून घेतले पाहिजे...


*********** 

इंट्रो -

जग फक्त मथळे स्क्रोल करत पुढे सरकत असताना, इराणच्या अंधारात एक अमानुष नरसंहार घडतो आहे. महिनोन्‌महिने चालू असलेल्या आंदोलनांवर सरकारने केवळ लाठीचार्ज किंवा अटकपुरते न थांबता थेट रक्तरंजित दडपशाहीचा मार्ग निवडला आहे. इंटरनेट बंदीच्या भिंतीआड हजारो लोकांचे आवाज दडपवले जाताहेत, गुदमरले जाताहेत, छायाचित्रे आणि व्हिडीओ बाहेर येणे थांबवले गेले आहे... म्हणूनच आतापर्यंत जगाला जे दिसत होते, ते फक्त “हिमनगाचा टोक” होते. आता जे सत्य हळूहळू समोर येते आहे, ते इतके भयावह आहे की, ते केवळ राजकारणाचा विषय न राहता संपूर्ण मानवतेसाठी एक गंभीर इशारा बनले आहे.


इराणमध्ये चालू असलेले महिलांचे आंदोलन हा क्षणिक उद्रेक नाही; तो 1979 पासून चालू असलेला, पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष आहे. प्रत्येक दशकात महिलांनी आवाज उठवला, प्रत्येक वेळी तेथील इस्लामिक सरकारने तो दडपला...पण तरीही त्यांनी हार मानली नाही. आज जे आंदोलन पेटले आहे, ते केवळ त्यांच्यासाठी पोशाखाचा प्रश्न नाही; ते अस्तित्व, स्वातंत्र्य आणि मानवी सन्मानासाठीची ऐतिहासिक लढाई आहे.


***  

बरोबर महिनाभरापूर्वी इराणमध्ये उसळलेले आंदोलन आता एखाद्या एकट्या घटनेपुरते मर्यादित राहिलेले नाही; ते अनेक वर्षांपासून साचलेल्या असंतोषाचा तीव्र उद्रेक आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन व अन्नधान्याच्या प्रचंड वाढलेल्या किमती, महिलांवरील निर्बंध, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची बंदी आणि सरकारी दडपशाही यांमुळे सामान्य जनता दीर्घकाळापासून संतप्त होती. मात्र नुकत्याच घडलेल्या एका स्थानिक घटनेमुळे पुन्हा जखमेवरची खपली निघाली, ठिणगी पेटली आणि हे आंदोलन काही दिवसांतच तेहरानसह इराणमधील अनेक प्रमुख शहरांमध्ये वेगाने पसरले.

या आंदोलनात सुरुवातीला विद्यार्थी, तरुण वर्ग आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. पुढे हळूहळू कामगार संघटना, शिक्षक, दुकानदार आणि मध्यमवर्गीय नागरिकही रस्त्यावर उतरले. घोषणांमधून केवळ आर्थिक मागण्याच नव्हे, तर राजकीय सुधारणा, मानवी हक्क आणि सत्ताधाऱ्यांच्या जबाबदारीची ठाम मागणी व्यक्त होऊ लागली. त्यामुळेच या आंदोलनाकडे सरकारने केवळ असंतोष म्हणून न पाहता, “सत्तेसाठी धोकादायक बंड” म्हणून पाहिले आणि त्यावर कठोर दडपशाहीची कारवाई सुरू केली.

आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल रस्त्यावर उतरवले. अनेक ठिकाणी लाठीचार्ज, अश्रुधूराचा मारा आणि थेट गोळीबाराचे प्रकार घडले. हजारो आंदोलकांना अटक करण्यात आली, अनेकांना बेपत्ता करण्यात आल्याचे आरोप झाले, तर काहींचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात न देता गुपचूप दफन केल्याच्या गंभीर तक्रारी पुढे आल्या. या सगळ्यावर कळस म्हणजे देशभरात लादलेली इंटरनेट बंदी; जेणेकरून व्हिडीओ, छायाचित्रे आणि प्रत्यक्ष साक्षी बाहेरील जगापर्यंत पोहोचू नयेत. तरीही अनेक सत्ये पुढे येत आहेत.  क्रूरतेचा भेसूर चेहेरा दिसतो आहे.

या इंटरनेट बंदीमुळे आतापर्यंत जे सत्य समोर आले आहे, ते फक्त “हिमनगाचा टोक” मानले जाते आहे. मानवी हक्क संघटना आणि निर्वासित इराणी कार्यकर्ते पुढे  येऊन सांगताहेत की प्रत्यक्ष मृतांचा आणि छळ झालेल्यांचा आकडा अधिकृत आकड्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असण्याची शक्यता आहे. तुरुंगांत अमानुष छळ, महिलांवर लैंगिक अत्याचार, आणि तरुणांना जबरदस्तीने कबुलीजबाब द्यायला लावण्याच्या कहाण्या हळूहळू बाहेर येत आहेत. थोडक्यात, गेल्या महिन्यात सुरू झालेले हे आंदोलन आता केवळ आर्थिक असंतोषाचे आंदोलन राहिलेले नाही; ते सत्तेच्या क्रूरतेविरोधातील एक व्यापक जनविद्रोह बनले आहे. आणि सगळं जग रिल्स स्क्रोल करत थांबले असताना, इराणच्या अंधारात घडणारे हे वास्तव मानवी इतिहासातील आणखी एक काळा अध्याय बनत चालले आहे.

इराणमध्ये आज जे आंदोलन सुरू आहे, ते केवळ एखाद्या एका घटनेतून उसळलेले नाही; ते 1979 पासून साचत गेलेल्या अन्याय, दडपशाही आणि मोडलेल्या स्वप्नांचा आर्त उद्रेक आहे. प्रत्येक दशकात सामान्य माणूस आशेने रस्त्यावर उतरला, बदलाची वाट पाहिली; आणि प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांनी रक्तपाताने त्या आशा चिरडल्या. तरीही ही जनता थकली नाही. भीतीच्या सावलीत जगत असतानाही असंतोषाची ठिणगी मनात जिवंत ठेवली. आज जे घडत आहे, ते केवळ राजकीय संघर्ष नाही, तर पिढ्यान्‌पिढ्या चाललेल्या वेदनेचा आवाज आहे आणि कदाचित या संघर्षातील आतापर्यंतचे सर्वात अस्वस्थ करणारे, प्रत्येक पाहणाऱ्या, वाचणाऱ्या, ऐकणाऱ्याच्या काळजाला चरे पाडणारे पर्व आहे.


इराणमधील आंदोलनांचा इतिहास:

1979 च्या इस्लामिक क्रांतीपूर्वी इराणचा इतिहास जगापेक्षा जरा आगळा होता. 20व्या शतकाच्या सुरुवातीस इराण फारसे आधुनिक राष्ट्र नव्हते; ब्रिटिश आणि इतर विदेशी ताकदींचा दबाव, राजाशाहीची असमानता, शेतकऱ्यांची अवस्था, नागरिकांच्या मूलभूत हक्कांची कमतरता हे सर्व समाजाच्या खोल रचनेत मुरलेले  होते. 1941 मध्ये शाह मोहम्मद रझा पहलवी यांनी सत्ता स्वीकारली आणि त्यांनी देशात आधुनिकतेचा आणि पाश्चिमात्याभिमुख विकासाचा मार्ग रेखाटला. शिक्षण, उद्योग, शहरीकरण, कला-संस्कृती यांना चालना मिळाली, महिलांना सार्वजनिक जीवनात अधिक स्वातंत्र्य मिळाले, शहरांमध्ये आधुनिक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. शिक्षणाने स्वातंत्र्य कळले, वैचारिक सुज्ञता वाढली आणि आर्थिक सुबत्ता देखील वाढू लागली.  

पण या विकासाच्या मागे एक वेगळं वास्तवही दडलेले होते. राजाशाही अधिक केंद्रीकृत आणि कठोर होती; जरी ती जनतेच्या भल्यासाठी असली, तरी सामान्य माणसाचा आवाज हळूहळू दडपला जात आहे अशी वल्गना पसरू लागली. देश विघातक लोकांनी संधी साधून अफवा पसरवल्या, सरकारच्या धोरणांमुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यात फरक वाढत असल्याचा भ्रामक संदेश पसरवला आणि जनतेत असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याच कारणाने विरोधकांना दबवण्यासाठी गुप्त पोलिसांचा वापर वाढला, आणि हळूहळू जनतेतून आवाज उठू लागला, हा आवाज वेळोवेळी मोठा आणि निर्धारयुक्त होत गेला.

या अपूर्ण स्वातंत्र्याच्या आणि भ्रामक अन्यायाच्या मिश्र भावनेत जनतेत “बदल हवा” अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. या अपेक्षा आणि आशा पाहता, 1979 मध्ये इस्लामिक क्रांती घडून आली. जनतेला वाटले की परिवर्तनासह आता न्याय, स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांची अपेक्षा पूर्ण होईल. परंतु हे स्वप्न दुःस्वप्न ठरावे असे इतिहासाने वळण घेतले; नव्याने आलेले धार्मिक शासन अधिक कठोर आणि अन्यायकारी आले.

महिलांवर बंधने लादली गेली, अभिव्यक्तीवर बंदी घालण्यात आली, विरोधकांवरील कारवाई आणि धर्मांध पोलिसांची सततची दहशत यामुळे जनतेत हळूहळू असंतोष साचत गेला. तेथील जनतेला त्यांच्या चुका उमगल्या, परंतु बदल घडवण्यासाठी खूप उशीर झाला होता. आज दिसत असलेला हा उद्रेक फक्त सध्याच्या घटनांचा नाही; तो असा अनेक दशकांपासून हिरावून घेतलेल्या स्वातंत्र्य, न्याय आणि बदलाच्या पुनर्प्राप्तीच्या भंगलेल्या स्वप्नांचा थेट परिणाम आहे.

1979 मधील इस्लामिक क्रांतीनंतर आलेल्या इस्लामिक धर्मांध सरकारच्या विरोधात इराणमधील जनतेने अनेकदा आंदोलन पुकारले. त्यात काही आंदोलनांनी केवळ इराणच नव्हे, तर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं.


1999: विद्यार्थी आंदोलन

पहिलं मोठं आधुनिक आंदोलन 8 जुलै 1999 रोजी तेहरानमध्ये विद्यार्थ्यांमुळे भडकलं. या आंदोलनाची सुरुवात एका दळणवळणाच्या कारणामुळे झाली होती; सुधारणावादी वृत्तपत्र “सालाम” सरकारने बंद केले होते. हे वृत्तपत्र राष्ट्राध्यक्ष मोहमद खातामी यांच्या सुधारणावादी गटाशी संबंधित होते, आणि त्याच्या बंदीने विद्यार्थी व युवा वर्गात प्रचंड असंतोष निर्माण केला. सुरुवातीला हे आंदोलन शांततेने सुरू झाले. विद्यार्थी रात्री विद्यापीठाच्या परिसरात जमा झाले, परंतु लवकरच सुरक्षा दल आणि धार्मिक मिलिशियांनी उग्र कारवाई करून त्यांच्यावर हल्ला केला. काही विद्यार्थ्यांना खोल्यांमधून बाहेर फेकले गेले, तर काही खोल्या जाळल्या गेल्याच्या घटनाही नोंदल्या गेल्या. या हिंसक प्रतिक्रियेने आंदोलन दडपण्याऐवजी तिव्रतेने मोर्चा रस्त्यावर पसरला. अंदाजानुसार 10,000 पेक्षा जास्त लोक तेहरानमध्ये आणि इतर शहरांमध्ये सहभागी झाले. हे आंदोलन सात दिवसांपर्यंत सुरू राहिले आणि विविध शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनात अनेक विद्यार्थी ठार झाले, दोन ते तीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले, तर सुमारे 1,200–1,500 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. काही विद्यार्थी गायब झाले, तुरुंगात मारहाण व अत्याचार झाले आणि विद्यार्थ्यांच्या अटकानंतर काही प्रकरणे अजूनही अपूर्ण आहेत, असे मानवी हक्क संघटनांनी नमूद केले.

आंदोलन थांबल्यानंतरही अनेक विद्यार्थी तुरुंगात ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली. सरकारने हिंसाचारात सहभागी काही अधिकाऱ्यांवर अत्यल्प शिक्षा केली आणि मूलभूत प्रशासकीय बदल टाळले. तरीही, या आंदोलनाने भविष्यातील आंदोलने, जसे की 2009 मधील Green Movement, सुरु होण्यासाठी मार्ग मोकळा केला होता.


2009: ग्रीन मूव्हमेंट

2009 मध्ये इराणमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर देशभरात एक प्रचंड राजकीय आंदोलन उसळले, ज्याला पुढे “ग्रीन मूव्हमेंट” म्हणून ओळख मिळाली. या आंदोलनाची ठिणगी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतफसवणूक झाल्याच्या आरोपातून पडली होती. विरोधी उमेदवार मिर होसैन मूसवी यांच्या समर्थकांचा दावा होता की मतमोजणीतील अनियमिततेमुळे जनतेचा खरा कौल दडपला गेला आणि प्रत्यक्षात मूसवीच विजयी ठरले होते. मात्र अधिकृत निकालात महमूद अहमदीनेजाद यांना मोठ्या फरकाने विजयी घोषित करण्यात आले.

जनतेची नाराजी वाढली आणि लाखो लोक; विशेषतः तरुण, शहरातील मध्यमवर्ग आणि सुधारवादी विचारांनी प्रेरित नागरिक  “माझे मतदान कुठे गेले?” अशी घोषणा करत तेहरान, इस्फहान, शिराझ आणि इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरले. हे आंदोलन शांततामय असले तरीही सुरक्षा दलांमधील इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आणि इतर राज्य समर्थित तक्त्यांनी कडक दडपशाही करून विरोधकांना ताब्यात घेतले, हजारो लोकांना अटक करण्यात आली आणि निकालाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. ग्रिन मूव्हमेंटचा रंग “हिरवा” म्हणून निवडला गेला कारण मूसवी आणि त्यांच्या समर्थकांनी हा रंग आशा, सुधारणा आणि शांततेचा प्रतीक म्हणून स्वीकारला होता. या आंदोलनाने इराणमधील अनेक दशकांपासून चालत आलेल्या लोकशाही मागण्या आणि प्रतिष्ठान विरोधी आवाजांना संघटित केले, पण राज्याच्या हुकूमशाहीला थोडक्यातही मोकळीक मिळू दिली नाही. त्यानंतरच्या वर्षांत आंदोलनाचे मुख्य नेते मिर होसैन मूसवी आणि मेहदी कर्रुबबी  बर्‍याच काळासाठी घरबंदिस्त ताब्यात ठेवले गेले, आणि ग्रीन मूव्हमेंटचे सार्वजनिक स्वरूप पुढे एक विशिष्ट काळासाठी मर्यादित झाले.

जरी हे आंदोलन दडपले गेले असले, तरी त्याने इराणी समाजात भीतीऐवजी प्रश्न विचारण्याची, आणि सत्तेला आव्हान देण्याची एक नवी चेतना निर्माण केली; जी पुढील दशकातील आंदोलनांची बीज ठरली...आणि 1979 च्या क्रांतीनंतर सर्वांत मोठ्या प्रमाणावर लोकशाही मागणी आंदोलनांपैकी एक म्हणून इतिहासात स्वतःची जागा निर्माण केली.


2017 ते 2019: आर्थिक आंदोलनं

2017 ते 2019 या काळात वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारामुळे देशभर आंदोलनं झाली. 2019 मध्ये इंधन दर वाढवल्यानंतर प्रचंड हिंसक आंदोलन भडकलं. सरकारने काही दिवस संपूर्ण इंटरनेट बंद केलं. मानवी हक्क संघटनांनुसार शेकडो लोक मारले गेले, पण अधिकृत आकडा खूपच कमी दाखवला गेला.

2022: महिलांच्या नेतृत्वाखालील उठाव

सप्टेंबर 2022 मध्ये 22 वर्षांच्या महसा (जिना) अमिनीला तेहरानमध्ये “मोरॅलिटी पोलिस” (Guidance Patrol) ने हिजाब चुकीच्या पद्धतीने घातल्याचा आरोप करून ताब्यात घेतले. काही अहवालांनुसार पोलिसांनी तिला पकडताना मारहाण केली आणि ताब्यात असलेल्या तिचा पाशवी छळ केला; त्यातच तीन दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात प्रचंड संताप उफाळून आला कारण इराणमध्ये हिजाब आणि महिला स्वातंत्र्यांविरुद्धच्या नियमांवर अनेक वर्षांपासून असंतोष होता.

महसा अमिनीच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यविधीत उपस्थित लोकांनी “Jin, Jiyan, Azadî” म्हणजेच “Woman, Life, Freedom” हा नारा लावून, निदर्शने करत निषेध व्यक्त केला, आणि हे आंदोलन पाहता पाहता इराणच्या अनेक शहरांमध्ये पसरले. महिलांनी सार्वजनिक ठिकाणी आपले हिजाब काढले ,जाळले. तरुण, विद्यार्थी, कामगार आणि विविध समुदायांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. ही लढाई केवळ हिजाब विरोधात नव्हती, तर महिलांच्या हक्क, मानवी स्वातंत्र्य आणि राजकीय दडपशाही विरोधातली एक सर्वसमावेशक आंदोलनाची ठिणगी होती.

प्रतिक्रिया म्हणून सरकारने देशभरात इंटरनेट ब्लॅकआउट लागू केला, सोशल मिडियावर निर्बंध आणले आणि मोठ्या संख्येने लोकांना अटक केली. अनेक शहरांमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना गोळीबार, अश्रुधूर आणि अन्य बल प्रयोग करून सैरभैर केले गेले; या दंगलीत हजारो लोक अडकले आणि सुमारे 551 पेक्षा जास्त नागरिक, ज्यात अनेक अल्पवयीनही आहेत, मारले गेले; असे मानवी हक्क संघटनांनी दस्तऐवजीकरण केले आहे. इस्लामिक धर्मांध सरकारने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई चालू ठेवली आणि मृत्यूनंतरही अन्यायकारक फाशी-शिस्तीचे निर्णय घेतले गेले. या आंदोलनाचे परिणाम आजही चालू आहेत; सरकारने हिजाब आणि मॉरॅलिटी पोलिसीच्या नियमांची अंमलबजावणी अधिक कडक केली आहे, आणि महिलांच्या व मुलींच्या हक्कांविरुद्ध राज्याचे नियंत्रण वाढले आहे.


इराणमधील महिलांचे आंदोलन: चार दशकांचा न संपणारा संघर्ष

इराणमधील महिलांचे आंदोलन हे एखाद्या एका घटनेतून उगवलेले नाही; ते 1979 च्या इस्लामिक क्रांतीपासून सुरू झालेल्या दडपशाहीविरुद्धचा चार दशकांचा अखंड संघर्ष आहे. क्रांतीनंतर नव्या धार्मिक शासनाने महिलांवर सक्तीचा हिजाब, पोशाखावर कडक निर्बंध, काम आणि शिक्षणातील मर्यादा, आणि कौटुंबिक कायद्यात मागासलेली धोरणे लादली. पूर्वी संपूर्ण स्वातंत्र्य अनुभवलेल्या महिलांना हे मेनी नव्हते. सुरुवातीपासूनच महिलांनी याला विरोध केला; पण प्रत्येक वेळी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला.  इस्लामिक क्रांतीनंतर अवघ्या काही आठवड्यांतच सरकारने महिलांसाठी हिजाब सक्तीचा केला. तेहरानमध्ये हजारो महिलांनी रस्त्यावर उतरून “स्वातंत्र्य आमचा हक्क आहे” अशा घोषणा दिल्या. हा इराणमधील महिलांचा पहिला मोठा संघटित विरोध होता. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढील वर्षांत हे कायदे आणखी कठोर केले.

1990 ते 2000 पर्यंतच्या काळात शांत पण सातत्यपूर्ण प्रतिकार चालूच होता. या काळात थेट रस्त्यावर उतरण्याऐवजी महिलांनी शिक्षण, साहित्य, पत्रकारिता आणि कायदेशीर लढ्याच्या माध्यमातून विरोध सुरू ठेवला. स्त्रियांनी स्त्रीहक्क संघटना स्थापन केल्या, मासिके काढली आणि कौटुंबिक कायद्यात सुधारणा करण्यासाठी मोहीमा राबवल्या. पण अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली, मासिकांवर बंदी आली, आणि संघटनांवर निर्बंध लादले गेले. पण महिला थांबल्या नाहीत, त्यांनी विविध मार्गांनी विरोधाची धार अधिक प्रखर करत नेली.

2014 ते 2018: ‘व्हाइट वेन्सडे’ आणि सार्वजनिक निषेध

सामाजिक माध्यमांवरून सुरू झालेल्या “White Wednesdays” या मोहिमेचा उगम सक्तीच्या हिजाबविरोधातील शांत पण ठाम प्रतिकारात होता. या मोहिमेअंतर्गत महिलांनी दर बुधवारी पांढरे कपडे परिधान करून किंवा हिजाब काढून आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. पांढरा रंग हा शांतता, विरोध आणि आशेचं प्रतीक मानला गेला. सरकारच्या कडक सेन्सॉरशिप असूनही VPN आणि गुप्त नेटवर्कच्या माध्यमातून हे संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.


सुरुवतीला वैयक्तिक पातळीवर दिसणारा हा निषेध लवकरच सामूहिक रूप धारण करू लागला. महिलांनी रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये, बसस्थानकांवर आणि अगदी कार्यालयीन परिसरातही उघडपणे हिजाब काढून निषेध नोंदवला. हा निषेध केवळ पोशाखाविरोधात नव्हता, तर महिलांच्या स्वायत्ततेवर, निवडीच्या अधिकारावर आणि सन्मानावर लादलेल्या बंधनांविरोधात होता. सरकारने या आंदोलनाला कठोरपणे चिरडण्याचा प्रयत्न केला. अनेक महिलांना “सार्वजनिक सुव्यवस्थेचा भंग” किंवा “इस्लामविरोधी कृत्य” अशा आरोपाखाली अटक करण्यात आली, दंड ठोठावण्यात आला, आणि दीर्घकाळ तुरुंगात डांबण्यात आले. काही प्रकरणांमध्ये तुरुंगातील अमानुष छळ, मानसिक अत्याचार आणि संशयास्पद मृत्यूंच्या घटना समोर आल्या. तरीही या दडपशाहीने आंदोलन दडपले नाही.

याच काळात महसा अमिनी या 22 वर्षीय तरुणीचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला आणि संपूर्ण देश पेटून उठला. “Woman, Life, Freedom” हा नारा इराणमधील महिलांच्या संघर्षाचं जागतिक प्रतीक बनला. महिलांनी हिजाब जाळले, केस कापले, आणि रस्त्यावर उघडपणे सत्तेला आव्हान दिलं. हा उठाव फक्त महिलांचा राहिला नाही; तो संपूर्ण पिढीचा बंड बनला.

2022 पासून सुरू झालेल्या “Woman, Life, Freedom” आंदोलनाचा परिणाम पुढील अनेक वर्षे चालत राहिला आणि 2023–2025 या अलीकडच्या काळात तो वेगवेगळ्या कारणाने धुमसत राहिला. सरकारने महिलांवर आणखी कडक कायदे लादले, विशेषतः हिजाब आणि मोरॅलिटी पोलिसच्या जबाबदाऱ्या अधिक मजबूत केल्या, जे महिलांच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण वाढवणारे होते. अनेक महिला हक्क कार्यकर्त्यांना विविध आरोपांखाली अटक करण्यात आली आणि लोकविरोधी कारवायांमध्ये दीर्घ शिक्षा ठोठावण्यात आल्या, यातून अनेकांनी तुरुंगातील किचकट परिस्थितीचा सामना केला.

महिलांनी मात्र स्वातंत्र्याची लढाई अजूनही हारली नाही; विद्यापीठांमध्ये, बाजारांत आणि सार्वजनिक ठिकाणी सत्तेविरुद्ध आवाज उठवत त्या आजही पुढाकार घेत आहेत. त्याचबरोबर इंटरनेटवर आणि VPN च्या माध्यमातूनही विरोधी संदेश प्रसारित केले जात आहेत, कारण सरकारने माहितीवर नियंत्रण आणण्याचे कठोर निर्बंध आणले होते.


सद्यस्थिती :-

ईराणमधील मौनात अंधारात एक नरसंहार घडतो आहे. इंटरनेट बंदी अजूनही मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, आतापर्यंत केवळ “हिमनगाचा टोक” दिसत होता, आता जे समोर येत आहे, ते कल्पनेपलीकडचे भयावह आहे.

अहवालांनुसार, आंतरराष्ट्रीय दबाव आणि अमेरिकेकडून आलेल्या इशाऱ्यांनंतर ईराणी सत्ताधाऱ्यांनी अधिकृत मृत्युदंड जाहीर करणे थांबवले आहे. त्याऐवजी आता थेट, कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया न करता हत्या केल्या जात आहेत. आंदोलकांना तुरुंगांमध्ये आणि पोलीस ठाण्यांच्या बंद दरवाज्यांआड मारले जात आहे, जेणेकरून न्यायालयीन कागदपत्रांचा मागही उरू नये. इतकेच नव्हे तर ईराणमधील अनेक शहरांमध्ये शवागृहांमधून मृतदेह जबरदस्तीने उचलले जात असल्याचे वृत्त आहे. इंटरनेट पुन्हा सुरू होण्यापूर्वी या नरसंहाराचे खरे प्रमाण लपवण्यासाठी, हे मृतदेह अज्ञात सामूहिक कबरींमध्ये घाईघाईने पुरले जात आहेत. सरकारी यंत्रणेतून गुप्तरीत्या बाहेर आलेल्या माहितीनुसार, एका बैठकीत मोहसेन हाशेमी यांनी सांगितले की लष्करी अंदाजानुसार मृतांचा आकडा ८०,००० पेक्षा अधिक आहे.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून आलेले अहवाल अंगावर काटा आणणारे आहेत :

एका डॉक्टरने एका रुग्णालयात एकाच वेळी २५० शिरच्छेद केलेले मृतदेह पाहिल्याचे सांगितले. सुरक्षा दल आंदोलकांच्या जननेंद्रियांवर गोळ्या झाडत आहेत, जेणेकरून कायमस्वरूपी, वेदनादायक इजा होईल. शस्त्रक्रियेनंतर बरे होत असलेल्या जखमी तरुणांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. वैद्यकीय कर्मचारी आणि नागरिकांना हुसकावून लावल्यानंतर, प्रत्येक जखमी कैद्याच्या डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली.

मानवीय आपत्ती

डॉक्टरांकडे कोणतीही औषधे, साहित्य उरलेले नाही. रक्तसाठा नसल्यामुळे रुग्ण मरत आहेत. हजारो लोक घरीच रक्तस्त्रावाने तडफडत आहेत, कारण रुग्णालये आता उपचाराची ठिकाणे न राहता अटक आणि मृत्यूचे सापळे बनली आहेत.

आपण गप्प बसू शकत नाही. संवेदनशील माणसांना त्रास होतोच. जगभरातील सत्ताधारी आपल्या उदासीनतेवरच पैज लावत असले तरी, जगाच्या दुसऱ्या टोकावर हे घडत असले, तरी ते मानवतेविरुद्धच आहे आणि अशा अन्यायासमोर अंतर हे  कोणतेही सबब ठरू शकत नाही. आज आपण डोळे मिटले, तर उद्या ही शांतता अपराध ठरेल. आपल्या हातात शस्त्र नाहीत, पण आवाज आहे. जागरूक राहणे, सत्य समजून घेणे, आणि अन्यायाविरोधात उघडपणे निषेध नोंदवणे इतकं करणे तरी आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण इतिहासाने नेहमीच एक गोष्ट सिद्ध केली आहे: अत्याचार करणाऱ्यांना बळ देणारी गोष्ट हिंसा नसते, तर सामान्य माणसांची शांतता असते.

आज विरोध दर्शवणे म्हणजे माणूस म्हणून उभं राहणं आहे. आणि म्हणूनच आपण बोललं पाहिजे....


*रश्मी पदवाड मदनकर*




Wednesday, 24 December 2025

एका ‘T’ची कहाणी - कायांतर

 #मुखपृष्ठ

#कायांतर ही केवळ एक कादंबरी नाही; ती आहे एका ‘T’ची कहाणी...LGBTQAI++ समुदायातील ‘T’, म्हणजेच ट्रान्सजेंडरची.
पण ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही. ही कहाणी आहे एका आयुष्याची....होरपळत, तावून-सुलाखून, वेदनांतून घडत अखेर स्वतःचं अस्तित्व उजळवून टाकणाऱ्या
एका ताऱ्यासारख्या जीवनप्रवासाची. आणि तितक्याच ठळकपणे, आपण जगत असलेल्या या काळाची… या एराची.
हा असा काळ आहे जिथे काही माणसांची असंवेदनशीलता इतर काही माणसांच्या आयुष्याची वाताहत करतात. ज्या समुदायाचा भारतीय इतिहास सांगतो की ते कधी राजाश्रय प्राप्त होते, आदराने आणि प्रतिष्ठेने.. नवरत्नातील रत्न म्हणून राजमहाली वावरत होते. तोच समुदाय आज उपेक्षित का झाला असेल बरं ? कुठे, कधी आणि कसे आपण समाज म्हणून चुकलो की ज्यांना कधी सन्मान मिळत होता, त्यांना आज दारोदार टाळ्या वाजवत फिरण्याची अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली?
आपल्या नाकारण्याची किंमत या समुदायाला कोणकोणत्या यातनांतून मोजावी लागते, हे जर आपण संवेदनशील नजरेने समजून घेतले, तर खूप काही बदलू शकते... आणि हा बदल दोन्ही बाजूंना समाधान देणारा ठरेल याची खात्रीही वाटते.
#कायांतर या कादंबरीच्या माध्यमातून हे समजून घेणं अधिक सोपं होईल असं प्रामाणिकपणे वाटतं.
माझ्या मनाला खोलवर स्पर्श करून गेलेल्या एका ट्रान्सजेंडर महिलेच्या आयुष्याचा हा लेखाजोखा आहे..पण जसाच्या तसा नाही; तर तिच्यासह या समुदायातील इतर अनेक घटकांचे, त्यांच्या वेगळ्या जगण्याचे, अनुभवांचे, संघर्षांचे आणि जगण्यातल्या सूक्ष्म कंगोऱ्यांचे संवेदनशील चित्रण यात गुंफले आहे.
वास्तववादी आशय असलेली ही चरित्रात्मक कादंबरी
वाचकांच्या मनात स्थान मिळवेल, त्यांना विचार करायला भाग पाडेल आणि कदाचित थोडं अधिक माणूसही बनवेल अशी मनापासून आशा आहे.



''कायांतर'' कादंबरीच्या निमित्ताने...

 समाजात #तृतीयपंथी व्यक्तींविषयी काळानुसार असंख्य #कथा निर्माण होत गेल्या... काही अफवा, काही अर्धसत्य तर काही पूर्वग्रहांनी ग्रसित. या कथांनी त्यांच्या भोवती एक धूसर, अंधुक वलय निर्माण केलं. परंतु त्या धुक्याच्या पलीकडे, जरा जवळून पाहिलं की कळतं; हा समुदाय अतिशय भावनाशील-संवेदनशील आणि माणुसकीच्या नात्यांना मायेने जपणारा आहे. #नव्या_येऊ_घातलेल्या_पुस्तकाच्या_निमित्ताने

भूक भागवण्याचा आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात अनेक तृतीयपंथीना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते, आयुष्यभर नरकात भोगाव्या इतक्या दुःखयातना भोगाव्या लागतात. हे सगळं फक्त एवढ्यासाठी कारण समाज त्यांना स्वीकारत नाही.. हे किती दुर्दैवी आहे. आज या बाबत दोन्ही बाजूने जागृती होत असली, बदल घडत असला तरी पूर्ण परिवर्तन घडायला अनेक युगे जावी लागणार आहेत. माझं येऊ घातलेलं हे नवं पुस्तक #कायांतर लिहीत असताना, अनेक तृतीयपंथींच्या भेटी घेतल्या आणि मनाला स्पर्शून जाणारे, हृदय पिळवटून टाकतील असे अनुभव ऐकायला मिळाले. ते ऐकताना आपण कुठल्यातरी वेगळ्याच जगाच्या कहाण्या ऐकत आहोत असे वाटू लागते; कारण आपल्या जगात, आपल्या भोवताल सगळं आलबेल असतं; किमान या स्तरावरचा संघर्ष तरी नसतो. इतकं सगळं भोगुनही, आयुष्याला झुंज देणाऱ्या या व्यक्तींच्या डोळ्यांत एक वेगळंच तेज दिसतं, तावून सुलाखून, संघर्षांनी घणाघात घालून पैलू पडलेलं. स्वतःच्या अंगांगावर घाव झेलून सोलून निघालेलं पण तरीही इतरांच्या वेदना ओळखणारं. स्वतःच्या जखमा दडवूनही इतरांच्या दुःखाना आधार देण्याची त्यांची तयारी असते, कसलाही संकोच न बाळगता ते सदैव तत्पर असतात. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून त्यांना वारंवार दूर ठेवण्यात आलं, तरीही संकटाच्या क्षणी त्याच माणसांच्या मदतीसाठी ते पुढे येताना दिसतात; कुठे वाद निर्माण झाला तर तेच शांततेचा दिवा पेटवतात; कुणी अडचणीत सापडलं तर हात धरून सांभाळून उभं करतात. त्यांचं वागणं ही केवळ मदत करण्याची कृती नसते; ती त्यांच्या मनातील खोलवर वाहणाऱ्या मानवतेची प्रकट रूपं असतात. जगाने त्यांच्याभोवती गैरसमजांच्या चौकटी उभ्या उभ्या केल्या, पण त्यांनी माणुसकीतील ऊब कधीच गमावली नाही. उलट, परिस्थिती तापली की तेच शांततेचा शिडकावा करून लोकांना एकत्र आणणारे ठरतात.
यांच्याबाबत अनेक सत्य आहेत. त्यातले काही अनुभव ''कायांतर'' कादंबरीच्या निमित्ताने तुमच्याशी शेअर करावे वाटतात, (या कथा पुस्तकात नाहीत.. पुस्तकात एक वेगळीच अधिक गहिरी सत्यकथा आहे. आता पोस्ट करत असलेल्या कथा केवळ या समुदायांना मानवंदना देण्यासाठी)
२०१५ च्या चेन्नई पुरात संपूर्ण शहर पाण्यात बुडालं होतं. हजारो लोक घरी अडकले होते. वीज खंडित झाल्याने सर्वत्र अंधार, भीती आणि अनिश्चितता वाढत होती. अशा कठीण वेळी मदतीसाठी कोण येईल याचीच शंका आणि धास्ती अनेकांच्या मनात होती.
पण समाजाकडून अनेकदा उपेक्षित ठरवलेला तृतीयपंथी समुदाय मात्र सर्वांत आधी मदतीला पुढे आला होता. प्रत्यक्ष पुराच्या पाण्यात उतरून कित्येकांचे जीव त्यांनी वाचवले होते. स्वतःंच्या छोट्या-छोट्या घरात जागा कमी असताना देखील, अनेक ट्रान्सजेंडर महिलांनी पुरग्रस्तांना आसरा दिला. पाणी, अन्न, कपडे जे काही त्यांच्या हाताशी होतं ते त्यांनी इतरांना वाटून दिलं होतं. काहीजण पावसात भिजत, गुडघाभर पाण्यातून चालत अडकलेल्या कुटुंबांपर्यंत पोहोचले. कुणाच्या हातात औषधं होती, कुणी अन्न घेऊन पोचलं होतं, तर LGBTQ+ समूहांनी एकत्र येऊन, मिळेल तसं साहित्य जमवून पुरग्रस्तांपर्यंत पोचवलं.
या समुदायाला स्वतःलाच राहत छावण्यांमध्ये अनेकदा जागा मिळत नव्हती. तरीही त्यांनी स्वतःच्या अडचणींपेक्षा इतरांच्या संकटाला प्राधान्य दिलं. त्या दिवसांत तृतीयपंथी समुदायाने खऱ्या अर्थाने मानवतेचं काम केलं. भीती आणि गोंधळाच्या काळात त्यांनी दाखवून दिलं, माणसाची ओळख, रूप किंवा नावाने नाही, तर त्याच्या माणूसपणाच्या कर्माने आणि कृतीने केली जाते. त्यांची मदत, त्यांची संवेदनशीलता आणि संकटातही धैर्याने उभं राहण्याची ताकद हे सगळं समाजाने मान्य करायलाच हवं. कारण खऱ्या मानवतेचा अर्थ मोठ्या शब्दांत नसतो, तो अशा लोकांच्या छोट्या पण मनाला भिडणाऱ्या कृतींमध्ये असतो.



तृतीयपंथी समाजाकडे वर्षानुवर्षे एकाच नजरेतून पाहण्याची आपली सवय झाली आहे. पण कधीतरी तो चष्मा बदलून पाहण्याची गरज आहे. कारण या समुदायाकडे शिकण्यासारखं, समजून घेण्यासारखं आणि मनापासून स्वीकारण्यासारखं खूप काही आहे. आपण समाज म्हणून त्यांना नाकारण्यासाठी हजार कारणं सहज शोधतो; त्यांच्या चुका मोठ्या करून पाहतो, पण त्यांच्या चांगुलपणाकडे पाहण्याइतपत थांबत नाही. उलट, त्यांच्या मनातील माणुसकी, त्यांची निस्वार्थ मदत, त्यांचं निरपेक्ष प्रेम याकडे लक्ष दिलं तर त्यांना स्वीकारण्याचीही अनेक कारणं आपल्याला सापडतील. हा दिवस आपण केव्हा मान्य करू, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून मोठे ठरू.


रश्मी पदवाड मदनकर

Tuesday, 23 December 2025

मानवतेचा खरा अर्थ दाखवणारा तृतीयपंथी समुदाय


२०१४ चा काळ होता… २३ ऑक्टोबर 2014. ती दिवाळीची रात्र होती. दिल्लीच्या त्रिलोकपुरी परिसरात त्या दिवशी हवा काहीतरी वेगळीच जाणवत होती. सकाळपासूनच गल्लीबोळांत कुजबुज वाढत होती, लहानमोठे वाद ऐकू येऊ लागले. रस्त्यांवर तणावपूर्ण चेहरे फिरत होते. जणू काही अदृश्य ठिणगी हवेत पेट घेण्याचीच वाट पाहत होती. संध्याकाळी सूर्य मावळायला लागला आणि शहरावर अंधार पसरू लागला तशी परिस्थिती अचानक हाताबाहेर गेली. दिल्ली अचानक थरथरली… कुठेतरी दगडफेक झाली, एखाद्या गल्लीत भांडण पेटलं, दुसऱ्या टोकाला जमाव एकत्र येऊ लागला आणि क्षणभरात संपूर्ण परिसरात सांप्रदायिक दंगल उसळली.



लोक धावाधाव करू लागले; दुकाने, कार्यालयांचे दरवाजे झटापट करत बंद करू लागली. कुठे हाका, कुठे किंकाळ्या, काही घरांच्या खिडक्यांमधून रडणाऱ्या स्त्रियांचे आवाज ऐकू येत होते. कुणाच्या मोबाईलवर अफवा, कुठे भीतीची लाट… हवा धुराने आणि भयाने भरून गेली होती. पोलीस पुरेसे नव्हते, नेते दिसत नव्हते आणि संपूर्ण परिसर तोडाफोडीच्या, जळायच्या मार्गावर उभा होता. जमाव गटागटाने एकमेकांना मारण्याच्या कापून टाकण्याच्या उद्देशाने धावून येत होते. बायका, लहान मुले धास्तावल्या होत्या. या सगळ्या तणावात किती आणि कोणकोण घायाळ होतील कित्येकांचे जीव जातील याची भीती मनामनात साठून राहिली होती.



आणि तेव्हा पुढे आले… समाजाने उपेक्षित, वाळीत टाकलेली, टाकाऊ मानलेली ती माणसे...१५ तृतीयपंथी !
ब्लॉक ३५ च्या कोपऱ्यावरून दगड आणि शस्त्र घेऊन पुढे येणारा एक जमाव दिसताच, लोक घाबरून पळू लागली. आसपासच्या परिसरात माणसे घराची दारं बंद करू लागले. बाहेर उघड्यावर असणाऱ्या माणसांचे आता काही खरे नाही असे वाटत असतानाही, त्या वेळी १५ तृतीयपंथी बहिणी मात्र पळून गेल्या नाहीत.
नाही.
त्या उलट त्या रौद्र जमावासमोर जाऊन ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी हात वर करत शांततेची विनंती केली, रागाने पेटलेल्या जमावाशी संवाद साधला. त्यांच्या शब्दांना मान मिळतो की नाही हा प्रश्न नव्हता, त्या क्षणी काहीही करून त्यांना फक्त रक्तपात थांबवायचा होता, माणसे वाचवायची होती. परिसर शांत करायचा होता, लोकांना सुरक्षित ठेवायचं होतं.
त्यांची नेता किन्नर लैला शाह (35) मोठ्या आवाजात म्हणाली: “भांडणानं कुणाचं घर वाचणार नाही… परत फिरा! शांतता ठेवा!” त्यांचा आवाज प्रामाणिक होता, धाडसी होता. त्या आवाजात काळजीपूर्ण दरारा होता. डोळ्यात धगधगती आग होती, निश्चय होता; कदाचित म्हणूनच जमावाची पाऊलं तिथेच थांबली.
त्या भयंकर रात्रीत त्यांनी एक आशेचा दिवा सुलगावला होता.. त्या रात्री त्यांनी काही घरांत घुसून दडून बसलेल्या भीतीने धास्तावलेल्या महिलांना सुरक्षित बाहेर काढलं. रडणाऱ्या मुलांना सांभाळलं. दोन्ही समुदायातील लोकांशी संवाद साधून गैरसमज कमी केले. गल्लीबोळात उभं राहून तणाव कमी होईपर्यंत जागरण केलं. आजही दिल्लीचे लोक म्हणतात की त्या १५ बहिणी त्या दिवशी नसत्या तर तो परिसर अनेक दिवस जळत राहिला असता.

ही केवळ एक धाडसाची गोष्ट नाही ही मानवतेची कहाणी आहे.. ज्यांना समाज धुडकावून लावतो, लोकांच्या लेखी ज्यांची किंमत शून्य आहे, ज्यांचा उल्लेख देखील कित्येकांना आजही अपमानास्पद वाटतो. त्याच लोकांनी त्या दिवशी दिल्ली वाचवण्यासाठी सर्वांत मोठी भूमिका निभावली होती. ज्यांच्या शेजारी उभे राहणेही लोक टाळतात, ज्यांना तुच्छतेची वागणूक देतात त्याच तृतीयपंथींनी स्वतःच्या सुरक्षेचा विचार न करता, हजारो लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली.
त्यांनी सिद्ध केलं "माणुसकीच्या मार्गाने चालण्यासाठी माणसांनी निर्माण केलेल्या चौकटीत जन्म नसला तरी; मानवता लिंगावर अवलंबून नसते... तर माणुसकी निभवायला जे हृदय लागते ते हृदय त्यांच्याकडे आहे... अतूट, निर्भय, नि:स्वार्थ.''
पण कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या वाट्याला काय येतं ? अशावेळी फ़िराक़ गोरखपुरी यांचे शब्द आठवतात....
“हर ज़ोर-ए-ज़माने का सहा हमने बड़ी मुश्किल से,
हम लोग मगर आदमी कहलाए बड़ी मुश्किल से…”
या ओळी ज्या वेदना दिसतात, त्या आजही आपल्या समाजातील तृतीयपंथी समुदायाच्या संघर्षांना तंतोतंत लागू पडतात. समाजाकडून सतत वंचना, गैरसमज आणि उपेक्षा कित्येकदा तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केला जाणारा अन्याय सहन करूनही, फक्त “माणूस” म्हणून ओळख मिळवण्यासाठी त्यांची अविरत झुंज चालू असते. पण या सर्व अडचणी संघर्ष झेलत जगतानाही तेच अनेकदा माणुसकीचे सर्वात मोठे उदाहरण बनून समोर येतात, त्याच समाजासाठी धावून येतात. त्यांच्या प्रयत्नांची दखल म्हणून त्यांना पुरस्कारांची अपेक्षा नसते.. फक्त दोन प्रेमाचे, आदराचे शब्दही त्यांना पुरे असतात. पण आपलीच झोळी अनेकदा इतकी फाटकी असते की इतके साधे शब्दही आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धजावत नाही..
माझ्या नव्या येऊ घातलेल्या पुस्तकाच्या निमित्ताने, त्यांच्या या अविरत संघर्षाला आणि मानवी मूल्यांना शब्दरूपातील विनम्र मानवंदना अर्पण करण्याचा हा छोटासा प्रयत्न…


रश्मी पदवाड मदनकर

Wednesday, 3 December 2025

From wheels to wings ...

 From wheels to wings .... A symbol of freedom beyond limitations; the iconic wheelchair grave in Salt Lake, America.

काहीतरी वाचत शोधत राहिलं की काहीतरी सापडत राहतं... कधी मनाला भावणारं, तर कधी बुद्धीला खाद्य देणारं. असच काहीतरी सापडलं आणि शेअर करावं वाटलं. प्रेमाला कुठलीच मर्यादा नसते म्हणतात, आणि ते प्रेम अपत्याबद्दल असेल तर ते मर्यादेच्याही पलीकडे कितीतरी व्यापक होऊन बसतं. परवा एका वेगळ्या कारणासाठी काही संदर्भ शोधत होते... तेव्हा एक व्हिडिओ पाहण्यात आला; त्यात अतिशय सुंदर स्मारक शिळा नजरेस पडली. खूप आकर्षित केले त्या मूर्तीने. संपूर्ण स्मशानभूमीत ते एकमेव थडगे किंवा स्मारक (Grave) होते.. जे लक्ष आकर्षित करत होते. आपल्या प्रिय मुलाच्या मृत्यूनंतर त्या वडिलांनी ज्या भावनेने ते बनवले होते तेही विशेष आहे. ते थडगे आहे मॅथ्यू स्टॅनफर्ड रोबिसन याचे. ते पाहून माहिती काढल्यावाचून राहवले नाही.



मॅथ्यू स्टॅनफर्ड रोबिसनचा जन्म २३ सप्टेंबर १९८८ मध्ये झाला होता, जन्मतःच गंभीर आणि कधीही बरे न होणारे अपंगत्व घेऊन तो जन्माला आला.. तो जन्मापासूनच अंध आणि पंगु होता. जन्मानंतर तो काही तासच जिवंत राहील, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता; परंतु तो जवळपास ११ वर्षे धैर्याने आयुष्य जगला. या काळात त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासोबत जगलेल्या एकेक क्षणाचे महत्त्व समजून ते क्षण जतन केले आणि त्याच्या मृत्यूनंतर देखील त्यांनी त्याच्या स्मृतींना अमरत्व देण्यासाठी असे रूप दिले कि ते आजही प्रत्येक पाहणाऱ्याला भावुक करून जातं.

मॅथ्यू १० वर्ष जगला पण पूर्णकाळ व्हीलचेअरवर बसून.. त्याची अनेक स्वप्ने होती जी त्याला कधीच पूर्ण करता आली नाहीत. कारण तो बंधनात होता... बंधन शरीराचं, वेदनेचं, अपंगत्वाचं. त्याचे आई-वडील त्याला फार जपत असले तरी त्याचा मृत्यू मात्र अटळ होता; आणि खरतर हा मृत्यूचं त्याची सुटका करू शकणार होता. या अपंग शरीरापासून, ते देत असलेल्या दुःखापासून आणि त्या व्हीलचेअरपासून मृत्यूचं त्याला स्वतंत्र करू शकणार होता. अखेर तो दिवस उगवला. १९९९ मध्ये मॅथ्यूच्या निधनानंतर, त्यांचे वडील अर्नेस्ट रोबिसन आणि चुलत बहीण सूझन कॉर्निश यांनी मॅथ्यूच्या स्मरणार्थ अत्यंत हृदयस्पर्शी असे एक शिल्प तयार केले. या शिल्पामध्ये मॅथ्यू आपल्या व्हीलचेअरवरून उडत स्वर्गाकडे झेपावत असल्याचे दिसते. सॉल्ट लेक सिटी स्मशानभूमी येथे उभारलेले हे स्मारक दिव्यांगच काय प्रत्येक पाहणाऱ्या व्यक्तींकरिता आकर्षणाचा, प्रेरणेचा स्रोत आहे. मॅथ्यूच्या पालकांनी १९९३ मध्ये 'ऍबिलिटी फाउंडेशन' ची देखील स्थापना केली. या संस्थेमार्फत गरजू लोकांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून दिली जातात. त्यांच्या संकेतस्थळावर मॅथ्यूच्या स्मारकाची प्रतिकृती व इतर स्मरणिकाही विक्रीस उपलब्ध आहेत.


गम्मत

 NBT च्या राष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात झालेल्या मुलाखतीत विशाखाने एक प्रश्न विचारला... 

“तुम्हाला लिखाणासाठी प्रेरित करणारा एखादा गमतीशीर किस्सा सांगा ना. काहीतरी मजेशीर घडले असेल, ज्यातून काहीतरी लेखणीत उतरले असेल?”

असा प्रश्न आला की खरतर मीच गोंधळते. कारण मी लिहिते ते बहुतांश गंभीर, वास्तविकतेत घडलेल्या घटनांमधून, आणि त्या अनुभवांतून मनात निर्माण झालेल्या उद्विग्नतेतून व कोलाहलातून जन्माला आलेलं असतं. माझ्या लिखाणाचा संबंध हा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून केलेल्या कामाशी, अभ्यासाशी आणि संवादांशी आहे. त्यामुळे त्या लिखाणामागे गमतीदार किस्सा असण्याची शक्यता फारच कमी. उलटपक्षी गंभीर घटना अधिक असतात. 

गम्मत असेल तर ती लिहिण्यानंतर किंवा लिखाणाच्या प्रक्रियेदरम्यान घडणाऱ्या प्रसंगांत असते. संवेदनशील विषयांवर लिहिल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यात जी गम्मत असते, किंवा गंभीर मुद्द्यांबाबत लोकांच्या उथळ समजुतींशी सामना झाला की जी विडंबनात्मक मजा जाणवते तीच खरी मजेशीर असते. एकाच व्यक्तीत दिसणारे दोन विरुद्ध चेहरे, दोन विरोधी विचार… हे पाहताना मात्र मला खरी गंमत वाटते.

अशा अनेक “गंभीर गमतीजमती” सतत माझ्यासोबत घडत असतात, आणि त्यांची उदाहरणे सांगताना नेहमीच हशा पिकतो. एरवी सतत मिश्किली, विनोद, मस्ती करणाऱ्या माझ्याकडे लिहिण्यासाठी प्रेरणादायी असा अगदीच गमतीदार एकही किस्सा नाही, याचे आश्चर्य मात्र श्रोत्यांसह मला स्वतःलाही वाटत राहते. हीही एक गंमतच तर आहे 😀😀

वाईब्ज -


एक मराठी चित्रपट येऊन गेलाय ''अगंबाई, अरेच्चा'' या चित्रपटातल्या नायकाला स्त्रियांच्या मनातल्या गोष्टी ऐकायला येत असे. बरेचदा हे असे काहीतरी विचित्र माझ्याबाबत घडतं असं मला नेहमी फार स्ट्रॉन्गली वाटतं. म्हणजे माझ्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांचे वाईब्ज माझ्यापर्यंत फार थेट आणि  प्रखरपणे पोचतात आणि ते फार स्पष्ट मला जाणवतात. म्हणजे पुढला व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करतो, वरवर काहीही दाखवत असला तरी मनात काय भावना काय विचार बाळगतो.. समोर हसून बोलणारा आपल्या मागे गेल्यावर काय बरळतो ते आपोआप माझ्यापर्यंत पोचतं. याचे अनेक उदाहरण आहेत.. आश्चर्यात पाडणारे, अचंभित करून सोडणारे अनुभव आले आहेत. म्हणतात ना ''Actions can be seen, but vibes are felt; and what is felt stays longer than what is seen.'' म्हणजे एखाद्या नात्यात-मैत्रीत फार चांगलं चाललेलं असतं.. एखाद्या काळात त्या नात्यात काहीतरी जाणवायला लागतं. इथे आपल्याबाबतीत काहीतरी चांगलं नाहीये, काहीतरी चुकीचं घडत असल्याचा आभास होतो. पुढला मात्र सगळं आलबेल असल्याचा दिखावा करण्यात अधिक चांगला वागू लागतो.. काळ पुढे सरकतो तसतशा गोष्टी स्पष्ट होऊ लागतात आणि एकदिवस समोरच्या माणसाचा मुखवटा उतरतो. त्याने आपल्याबाबत काहीतरी फार वाईट करण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्यासाठी भरपूर वेळ घेतलेला असतो आणि हा तोच काळ असतो ज्यावेळी आपल्याला ते वाईब्ज जाणवले होते. संकेत मिळाले होते. बरेचदा तर मी समोरच्याला हे सांगितलेही आहे की मला तुमच्याकडून चांगले वाईब्ज येत नाहीयेत. पुढला ते गमतीत घेतो; पण मी बरोबरच होते हे काळ सिद्ध करतो. बरेचदा अनेक लोकांपासून दूर होण्याचे हे एक कारण ठरते. म्हणतात ना, ज्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत त्या गोष्टी तुमचा देव (निसर्ग, ब्रह्मांड, सुपर पावर काहीही म्हणा) पाहत असतो आणि म्हणून तो तुम्हाला तुमच्यासाठी योग्य नसणाऱ्या काही माणसांपासून दूर करतो. हे असेच अगदी या उलटही. जी माणसे खरोखर आपल्या बाबतीत प्रामाणिक भावना बाळगून असतात. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात कुठलाही भेद नसतो. जे आतबाहेरून एकसमान असतात आणि खरोखर आपल्यावर मनापासून प्रेम करत असतात त्यांचे हेतू खूप शुद्ध असतात; अश्यांचे ते शुद्ध, प्रामाणिक, प्रेमाचे वाईब्ज आपल्यापर्यंत थेट येतात आणि आतवर पोचत असतात आणि म्हणून त्या माणसांबद्दल अधिक आदर, प्रेम आणि ओढ वाढत जात असते. त्यांची मैत्री त्यांचा सहवास हवाहवा वाटत असतो. अशी मैत्री कधीच कुठल्याच कारणाने दुरावू शकत नाही.. दुरावण्याचे एकच कारण असू शकते ते म्हणजे अंर्तमनातले खरेखुरे भाव बदलेल तेव्हा, त्यात नकारात्मक भाव निर्माण होतील तेव्हा ते पुढ्ल्यापर्यंतही आपोआप पोचतील हे निश्चित. Sometimes a silent vibe reveals more truth than a thousand spoken words or actions.

शेवटी सगळं वाइब्जवरच येऊन ठरतं.
तुम्ही कितीही चांगलं बोललात, हसलात, वागलात – पण जर मनात राग, मत्सर, स्वार्थ किंवा कपट असेल, तर ते लपवताच येत नाही. शब्दांनी पडदा टाकता येतो, पण ऊर्जा आणि भावनांचं सत्य नेहमी प्रकट होतंच.म्हणून कदाचित, नाती जपताना शब्दांपेक्षा भावना शुद्ध ठेवणं महत्त्वाचं असतं. कारण माणसांच्या आठवणीत तुमचं रूप, तुमचे कपडे, तुमची आर्थिक स्थिती नाही तर तुमच्या वाइब्ज राहतात...तुम्ही त्यांना कशी जाणीव करून दिली ते. Vibes are the soul’s language; they whisper what actions cannot explain. जिथे चांगले वाइब्ज मिळतात, तिथे मन शांत होतं जिथे नकारात्मक वाइब्ज असतात, तिथे मन नकळत दूर जायला लागतं. खरं तर, हे वाइब्ज म्हणजे विश्वाचा तुमच्याशी बोलण्याचा एक मार्गच आहे. फक्त आपण त्याला ऐकायचं आणि मानायचं, कोणाला जवळ करायचं आणि कोणाला हळूच सोडून द्यायचं हे वाइब्ज हा निसर्गाचा संकेतच देत असतो..जे काळानुरूप अकळतात.. आणि जे झाले ते योग्यच होते हा विश्वास पटायला लागतो.  







Monday, 18 August 2025

 एक वर्तुळ पूर्ण झालं ! #छोटी_छोटी_बाते

आयुष्य स्वतःजवळ काहीच ठेवत नाही.. तुम्ही जे जे बरं-वाईट वाटून दिलेलं असतं ते ते कधीतरी तुमच्याकडे परत येतं, याउलट असेही की जे जे मिळवलेलं असतं...स्वतःच्या कष्टाने, कर्माने किंवा ओरबाडून देखील; ते कधीतरी कुठेतरी कोणत्यातरी रूपात तुम्हाला परत करावं लागतं. त्याच व्यक्तीला करावं लागेल असंही नाही; पण ते परतावं लागतं हे निश्चित. कर्माचा सिद्धांत म्हणा किंवा जगण्याचे नियम. आयुष्य जसजसं पुढं जात राहतं आणि जाणीवा प्रखर होतात तसतसे हे अनुभव अधिकच ठळकपणे प्रखर स्वरूपात जाणवायला लागतात.
हल्ली मला एक गोड आठवण सतत येत असते, माझा मुलगा ओम आठ महिन्यांचा असताना आम्ही नागपूरहून मुंबईला शिफ्ट झालो आणि तो दोन अडीच वर्षांचा असताना मी मुंबईत जॉब जॉईन केला होता. माझ्या सिनिअर असणाऱ्या मॅडमचा या अडीच वर्षांच्या ओमवर फार जीव जडला होता. त्याचे त्या लाड पुरवायच्या, फोनवर त्याच्याशी बोलत बसायच्या. त्या कुठेही बाहेर गेल्या की त्याच्यासाठी काहीतरी घेऊन यायच्या. कधी गिफ्ट्स कधी खाऊ. हा सिलसिला काही वर्षे निरंतर चालू होता. त्यावेळी त्यांचा मुलगा टीनेज होता. आता माझा मुलगा टिनेज आहे. माझ्याकडे एक मदतनीस आहे जिचा मुलगा ५ वर्षांचा आहे, नाव आहे जय. सध्या आम्हा दोघांचं छान सूत जुळलं आहे. त्याला त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या असतात. अभ्यासातलं यश शेअर करायचं असतं ... आणि त्याबदल्यात हक्कानं काय हवं ते मागून घ्यायचं असतं. माझ्या सांगण्यावर तो मोबाईल सोडून पुस्तकं वाचत बसतो, तेवढ्यासाठी मी त्याच्यासाठी छानछान चित्र असणारी पुस्तकं शोधात असते. तो चित्रही काढतो. फार लांब गप्पा चालतात आमच्या. सध्या त्याला लग्न करायचं आहे म्हणतो; त्यासाठी मुलगी पाहायला सांगितले आहे. फार गम्मत येते या विषयावर.. लग्न का तर लग्नात छान छान कपडे घालायला मिळतात आणि खूप सारे पदार्थ खाता येतात म्हणून. पण लग्न केले की नोकरी करून मुलीला, घराला सांभाळावे लागते असे त्याला सांगितल्यावर ''मैं जल्दी जल्दी पढाई खतम करके, जल्दी ही नोकरी कर लुंगा, लेकिन आप लडकी धुंडो'' असे तो सांगतो. त्याला समजावतानाच खळखळून हसूनही घेतो. सुट्टीच्या दिवशी तो त्याच्या आईसोबत घरी आलेला असला की आमच्या गप्पा अशा रंगात येतात. ''इस बार मैं क्लास का मॉनिटर बनूंगा फिर आप मुझे लकडी कि बॅट लेकर देना... मेरे पास बॉल है'' असे हक्काने सांगणे असते. त्याला पक्का प्रॉमिस म्हंटले की तो खरोखर मॉनिटर बनून दाखवतो आणि आम्ही त्याच्यासाठी छान बॅट जी आधीच आणून ठेवलेली असते ती मस्ती करत देतो... कधी चांगले मार्क आणले म्हणून गिफ्ट, कधी चीज सँडविच आवडतं म्हणून ते बनवून दिले की मग त्या चिमण्याच्या चेहेऱ्यावर दिसणारा आनंद अवर्णनीय-अविस्मरणीय असतो. या आठवणी आहेत.. जय उद्या मोठा होईल या गमती संपतील कदाचित, उद्या तो असा नियमित येईल न येईल; पण या आठवणी कायम स्मरणात राहणार आहेत.. त्याच्याही आणि आमच्याही. त्याला मोठे होताना पाहण्यात आनंद आहे. अगदी अगदी तसाच जसा कधीतरी मुंबईतल्या मॅडमला माझ्या लेकासाठी असे क्षण जगताना होत असे. आनंदाचे असे हे देणेघेणे वेगवेगळ्या माध्यमातून अखंड चालू राहावे. आनंद घेता घेता आनंद देणाऱ्याचे हात होत राहावे...



Thursday, 22 May 2025

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !



परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्यातील सहनशीलता, त्याग आणि समर्पण या गुणांचंच पूजन करण्यात आलं. मात्र, गेल्या काही दशकांत हे चित्र बदलताना दिसत आहे. गुन्हेगारी क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढतो आहे, आणि ही बाब केवळ जागतिक पातळीवरच नव्हे, तर भारतातही प्रकर्षाने जाणवते आहे. अलीकडच्या काळात महिलांद्वारे केलेल्या गुन्ह्यांच्या बातम्या सतत चर्चेचा विषय ठरत आहेत. वृत्तपत्रांपासून ते टीव्ही आणि सोशल मीडियापर्यंत अशा घटना सतत झळकत राहतात; जणू त्या नव्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब आहेत.

गेल्या वर्षातही अनेक धक्कादायक घटनांनी समाजाला हादरवून टाकलं आहे. काही स्त्रियांनी आई असून आपल्या मुलांचाच जीव घेतला; तर काहींनी जोडीदाराला किंवा कुटुंबीयांना क्रूरतेनं ठार केलं. जेथे प्रेम, सान्निध्य आणि विश्वास असायला हवा, तिथेच छळ, हिंसा आणि मृत्यू घडताना आपण पाहिले. हे पाहून अंतर्मन अस्वस्थ होतं. या घटनांचा मागोवा घेताना, एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो... अशा गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्यामागचं, वाढीला लागण्याचं कारण काय आहे? हा फक्त कायद्याचा विषय नाही, तर तो सामाजिक, मानसिक आणि भावनिक घटकांशी संबंधित आहे. कदाचित वर्षानुवर्षे दडपलेला राग, अन्याय, भावनिक ताणतणाव, किंवा सामाजिक अपेक्षांचं दडपण या सगळ्यांचा स्फोट अशा स्वरूपात होत असेल का ? या प्रश्नांवर केवळ चर्चाच नव्हे, तर सखोल विचार, समाजशास्त्रीय विश्लेषण आणि मानसशास्त्रीय समज आवश्यक आहे. कारण ही फक्त गुन्हेगारी नव्हे; तर ही बदलत्या समाजाच्या वेदनेचा प्रारंभ तर नसेल अशी चिंता वाटू लागली आहे.


विकसनशील सामाजिक भूमिका, वाढते स्थलांतर, व्यवसायांमधील परिवर्तन, महिला मुक्तीची चळवळ, आर्थिक स्वातंत्र्य आणि राजकीय स्वायत्तता; या सगळ्यांमुळे आजच्या काळातील स्त्रियांना विविध क्षेत्रांत सहभागी होण्याच्या नव्या संधी प्राप्त झाल्या आहेत. संधी मिळाल्या की आत्मविश्वास वाढतो, आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण झालेली व्यक्ती नव्या दिशांकडे आकर्षित होते. मात्र या आकर्षणाला एक वेगळीही दिशा मिळत आहे; काही स्त्रिया गुन्हेगारीच्या वाटेवर वळताना दिसत आहेत. एकेकाळी केवळ पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या गुन्हेगारी जगतात आता महिलांची संख्याही वाढताना दिसतेय. ही वाढ इतकी स्पष्ट आहे की, तिच्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांकडून होत असलेले गुन्हे आता फक्त किरकोळ स्वरूपाचे उरलेले नाहीत. त्या अनेक गंभीर, हिंसक आणि अप्रचलित गुन्ह्यांमध्येही सक्रिय सहभागी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे गुन्ह्यांचा स्वरूप अधिक व्यापक आणि धोकादायक होत चालले आहे.

मग प्रश्न उभा राहतो की, महिलांमध्ये अचानक गुन्हे करण्याची उर्मी का वाढते आहे? हा संताप कुठून निर्माण होतो आहे? हे फक्त सामाजिक बदलांचे परिणाम आहेत की वर्षानुवर्षे साचलेल्या असंतोषाचा उद्रेक? की स्वातंत्र्याचा अर्थ चुकीचे समजण्याची लक्षणं? या प्रश्नांवर विचार होणे आणि त्याचे सखोल विश्लेषण होणे आज अत्यावश्यक झाले आहे.

महिलांचा राग आणि संताप हे काही अलीकडील घटक नाहीत. इतिहास, पुराणकथा आणि लोककथांमध्ये या भावना वारंवार उमटताना आपल्याला दिसतात. परंतु, अलीकडच्या काळात या भावना अधिक स्पष्ट, ठाम आणि प्रखर स्वरूपात व्यक्त होताना दिसतात. समाजमाध्यमे आणि विविध सार्वजनिक मंचांवर, विशेषतः अवहेलनेच्या आणि अश्लीलतेच्या छटांनी युक्त भाषेत, हा राग अधिक ठळकपणे समोर येतो. अनेकदा हा संताप अपरिपक्व, भावनाशून्य आणि बेपर्वा वाटतो. परंतु, हे दुर्लक्ष करता येणार नाही की अनेक पिढ्यांपासून स्त्रियांमध्ये साठून राहिलेला, दाबलेला राग आता उफाळून येत आहे.

पूर्वी महिलांचा राग मुख्यतः साहित्य, सिनेमा किंवा नाट्यरूपांमधूनच व्यक्त होत असे. वास्तविक जीवनात त्याला फारसे स्थान नव्हते. त्याची दखल घेतली जात नव्हती, स्वीकार केला जात नव्हता. त्यामुळे हा दाबलेला संताप आता समाजमाध्यमांच्या मंचांवर अधिक तीव्र आणि आक्रमक रूपात व्यक्त होत आहे. त्यास तिथे एक प्रकारची अनुमती, संमती आणि सहानुभूती मिळत असल्याने, तो अधिकाधिक वाढत असल्याचे जाणवते. मनोविज्ञानतज्ज्ञांचे मत आहे की, स्त्रिया अनेक पिढ्यांपासून अंतर्मनात रागाचे ओझे बाळगत जगत आहेत. दैनंदिन जीवनातील अन्याय, भेदभाव आणि अपमान यांच्या विरोधातील त्यांचा संताप आज चित्रपट, समाजमाध्यमांवरील रील्स, संगीत, साहित्य आणि लोकप्रिय संस्कृतीच्या विविध माध्यमांतून ठळकपणे प्रकट होत आहे. तथापि, प्रत्यक्ष जीवनात या रागाला समाजाकडून आवश्यक ती मान्यता, समजून घेणे आणि गांभीर्याने विचार करणे याचा अभाव जाणवतो. या भावनांवर सखोल मंथन होऊन, त्या समजून घेत योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत हीच यातली खरी शोकांतिका आहे.

या पार्श्वभूमीवर काही मूलभूत प्रश्न समोर येतात —
समाज या भावना समजून घेईल का?
या रागाला योग्य दिशा देण्याची संधी स्त्रियांना मिळेल का?
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आवाज केवळ अभिव्यक्त होण्यापुरताच मर्यादित राहील, की परिवर्तन घडवण्यासाठी आधार बनेल?


आपल्या समाजाची एक मोठी समस्या अशी आहे की, मोकळेपणाने बोलणारी, खळखळून हसणारी, आनंदी राहणारी स्त्री समाजाला खटकते. स्त्रियांनी अल्पभाषी राहावे, नम्र, संयमी वर्तन करावे हे ‘बाळकडू’ तिला लहानपणापासूनच दिले जाते. उघडपणे हसणारी, स्पष्ट बोलणारी स्त्री सहजपणे चरित्रहीन ठरवली जाते. मुलगी जन्मल्यापासून तिच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रिया तिने दबलेल्या, पिचलेल्या, कुचंबणा झालेल्या अवस्थेत जगताना तिला दिसतात. अशा वातावरणात तिच्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांचा निचरा होण्यासाठी कोणीही नसते; न व्यक्त होण्यासाठी माणसं, न समजून घेणारा समाज. आणि हे चक्र पिढ्यानपिढ्या सुरूच राहिलं आहे. राग हा भाव नेहमी एखाद्या गोष्टीच्या रक्षणाशी जोडलेला असतो. पण समाजाने हा रक्षणाचा अधिकार, हा संताप व्यक्त करण्याचा हक्क आजपर्यंत फक्त पुरुषांसाठी राखून ठेवला होता. स्त्रियांनी राग व्यक्त केला, तर तो "अस्वीकार्य" मानला गेला. मात्र अलीकडच्या काळात हे चित्र हळूहळू बदलू लागले आहे. स्त्रियांच्या हातात आता सोशल मिडिया, साहित्य, कला यासारखी प्रभावी माध्यमं आली आहेत. या माध्यमांतून त्यांच्या मनात वर्षानुवर्षे साचून राहिलेल्या भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत ... कधी सौम्य, तर कधी प्रखर उद्रेकाच्या रूपाने. हा बदल केवळ अभिव्यक्तीपुरता मर्यादित न राहता, समाजाला स्त्रियांच्या अनुभवांकडे नव्या दृष्टीने पाहायला लावेल, अशी अपेक्षा आहे.

स्त्रियांचा राग हा एक अत्यंत वैयक्तिक अनुभव असला तरी, सध्याच्या काळात तो सामूहिक अनुभव देखील बनत चालला आहे. सामाजिक प्लॅटफॉर्मवरून म्हणा किंवा अभिव्यक्त होण्याच्या उर्मीतून आता स्त्रिया स्वतः एकमेकींशी ते शेअर करताना दिसतात. पूर्वी ज्या रागासाठी लाज वाटायची, त्याच रागासाठी आता एकजूट होऊन समर्थन तयार होत आहे. महिलांमध्ये एक नव्या प्रकारची जागरूकता आणि एकात्मता दिसून येत आहे, जिचामुळे त्यांच्या रागाची, त्यांच्या भावना व्यक्त करण्याची व स्वीकार करण्याची त्यांना आपसूकच परवानगी मिळत आहे.

ब्रिटिश गायिका आणि गीतकार पालोमा फेथ यांचं गाणं "लेबर" सध्या अत्यंत लोकप्रिय झालं आहे. या गाण्यात स्त्रियांच्या संतापाची तीव्र आणि थेट अभिव्यक्ती आहे. सुमारे ३५,००० रील्समध्ये या गाण्याचा साउंडट्रॅक वापरण्यात आला आहे. हे गाणं, हे रील्स, आणि अशा कथा हे दाखवतात की आता महिलांचा राग दाबून ठेवला जात नाही; तो जगासमोर स्पष्टपणे, निर्भीडपणे व्यक्त केला जातो आहे.

खरं तर, रागाचा उद्रेक तोच क्षण असतो, जेव्हा स्त्री सहनशीलतेच्या सीमारेषेवर येऊन पोहोचते... जेव्हा तिच्या भावना, अस्तित्व आणि ओळख सातत्याने दुर्लक्षित केल्या जातात. पूर्वी केवळ सहन करणाऱ्या स्त्रिया आता बोलू लागल्या आहेत, व्यक्त होऊ लागल्या आहेत आणि समाजबदल घडवण्यासाठी पुढे येत आहेत. हा राग आता केवळ भावनिक उद्रेक न राहता, कृतीशीलता, आत्मभान आणि सामर्थ्य यांचं योग्य रूप धारण करू लागला आहे. तो दडपशाहीच्या कोंडमाऱ्यातून बाहेर पडून समाजपरिवर्तनाची नांदी ठरू लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा राग जोपर्यंत सकारात्मकता आणि बांधिलकीच्या दिशेने मार्गक्रमण करतो, तोपर्यंत समाजात खोलवर आणि स्थायिक परिवर्तन घडवण्याची परिणामकारक क्षमता त्याच्यात असते. कारण असा राग विध्वंसक नसून, सृजनशील असतो... स्वतःसाठी नव्हे, तर व्यापक सामाजिक हितासाठी प्रेरित असतो. परंतु हाच संताप जर अराजक व विध्वंसाच्या मार्गाला लागला, तर तो त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि पर्यायाने समाजासाठीही घातक ठरतो.

गेल्या काही दशकांतील चित्रपटांचा मागोवा घेतला, तर लक्षात येतं की स्त्रियांच्या अंतर्मुख संतापाला पडद्यावर आवाज मिळू लागला आहे. हा राग आक्रमक नसला, तरी तो गंभीर आणि गहिरा आहे, खोल आहे. दैनंदिन लहानसहान अपमान, अन्याय, दुर्लक्ष आणि दमित भूमिका यांचा हळूहळू साचणारा असंतोष आहे. मल्याळम चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' आणि त्याचाच हिंदी रीमेक 'मिसेस' (2025), 'थप्पड' (2020), पगलट (2021) या चित्रपटांनी हाच शांत, पण सतत उफाळणारा स्त्रियांचा संताप दाखवला आहे. त्यातील नायिकांच्या संतप्त नजरा, मौन विद्रोह, आणि शेवटी एका कृतीतून होणारा नात्यांचा किंवा चौकटींचा भंग; हे सर्व आजच्या समाजातील स्त्रियांच्या अंतर्गत लढ्याचं प्रतिनिधित्व करतं. तरीही, खरतर या आधुनिक चित्रपटांमधील राग तुलनेने सौम्य वाटतो, विशेषतः पूर्वीच्या काही चित्रपटांतील रौद्र रूपाच्या तुलनेत. उदाहरणार्थ, स्मिता पाटीलच्या मिर्च मसाला (1987) चित्रपटातील अंतिम दृश्य ! एक अश्रुत पण आगीने पेटलेला संताप जेव्हा उफाळून येतो तेव्हा तो सूड नसतो तो स्वसंरक्षणासाठी उचललेले अंतिम पाऊल असते. मिरची फॅक्टरीत येणारा क्रूर अत्याचारी सुभेदार जेव्हा सहनशीलतेची पराकाष्टा झालेल्या सोनाबाईला पकडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा फॅक्टरीतील सर्व महिला एकत्र येतात आणि ताज्या लाल मिरच्यांच्या मसाल्याने त्याच्यावर हल्ला करतात. या हल्ल्यात सुभेदार घायाळ होतो. ते दृश्य म्हणजे स्त्रियांच्या संयमाच्या सीमेला पार केल्यानंतर झालेला उद्रेक ... एक प्रतीकात्मक विस्फोट ! 'मदर इंडिया' (1957) मध्ये तर नायिका स्वतःच्या मुलाला गोळी घालते. कर्तव्य आणि नैतिकतेच्या संघर्षात तिला स्वीकारावा लागलेला हा क्रूर निर्णय असतो.

मर्दानी, मॉम, कहाणी, गुलाब गँग आणि बँडिट क्वीन हे चित्रपट आधुनिक स्त्रीच्या रागाला केवळ भावनात्मक प्रतिक्रिया म्हणून न दाखवता, त्यामागील परिपक्वता, अन्यायाविरोधातील झुंज, सूडाची भावना आणि अन्यायी समाजरचनेविरोधात घेतलेली ठाम भूमिका दाखवतात. हे चित्रपट स्त्रीचा राग म्हणजे दुबळेपणाची नाही तर दृढ प्रतिकाराची, आत्मभानाची आणि न्यायाच्या शोधातील प्रवृत्तीची अभिव्यक्ती आहे हे अधोरेखित करतात. मात्र, असा प्रतिकार नेहमीच हिंसक असायला हवा, असे नाही. राग व्यक्त करण्याची किंवा सूड उगवण्याची दिशा सकारात्मक आणि सृजनात्मकदेखील असू शकते, याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत. अनेक अशा स्त्रिया आहेत, ज्या संकटांनी उद्ध्वस्त झाल्यानंतरही पाषाणाच्या छाताडावर एखादे हिरवे कोंब फुटावे तशा जगल्या तगल्या आणि पाय रोवून उभ्या राहिल्या, नव्या उमेदीनं आयुष्य घडवलं आणि समाजासाठी प्रेरणास्थान ठरल्या. काहींनी बेघर अवस्थेतून स्वतःचं विश्व उभं केलं, तर काहींनी शिक्षण, व्यवसाय, समाजसेवा यामध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्यांच्या जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि न झुकणाऱ्या वृत्तीने त्या अनेकांसाठी आदर्श ठरल्या आहेत.

''स्त्रीने ठरवले तर ती काहीही करू शकते'' असे एक वाक्य सर्वश्रुत आहे पण हे ''काहीही'' म्हणजे शब्दशः काहीही नव्हे. ते म्हणजे सृजन, सर्जन, उत्पत्ती आणि कल्पकतेच्या अंगाने काहीही करणे असते. स्त्रीराग केवळ विद्रूपतेचा, दुःखाचा अथवा तक्रारीचा उद्रेक असू नये; तो परिवर्तनाची बीजं घेऊन येणारा, एक सृजनशील उर्जेचा प्रवाह असायला हवा. कारण हीच स्त्रीची मूळ प्रवृत्ती, महत्वाचा स्वभावधर्म आहे. राग येणे साहजिक असले तरी; जेव्हा या रागाला योग्य दिशा, समजूतदार व्यासपीठ आणि स्वीकार करणारा प्रगल्भ समाज लाभतो, तेव्हा तो संहारक न राहता समाज परिवर्तनाचा प्रेरणास्त्रोत बानू शकतो. म्हणूनच एक समाज म्हणून आजच्या काळात सर्वांत मोठी गरज आहे, ती स्त्रीच्या रागाकडे संवेदनशीलतेने, समजूतदारपणे आणि सहानुभूतीने पाहण्याची. अशा रागाला योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा दिली, तर तो फक्त विरोध न राहता परिवर्तनाचे साधन बनू शकतो असा विश्वास वाटतो.







रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com

Featured post

हिजाबपलीकडचा लढा : इराणमधील स्त्रियांचा विद्रोह

कालच्या इराणमधील घडलेल्या युद्ध घटनेच्या जवळजवळ महिनाभरापूर्वी तरुण भारत आकांक्षा पुरवणीसाठी लिहिलेली ही कव्हर स्टोरी... युद्ध, हिंसा किंवा ...