कायांतर - तिसऱ्या अस्तित्वाची संघर्षकहाणी !
सुप्रसिद्ध लेखिका रश्मी पदवाड मदनकर यांची ''कायांतर'' ही तृतीयपंथीय नायिकेच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. समाजात अनेकदा जाणीवपूर्वक दुर्लक्षित राहणाऱ्या, दुभंगलेल्या आणि वेदनांनी भरलेल्या अशा एका जीवविश्वाचं तपशीलवार आणि हृदयस्पर्शी चित्रण लेखिकेने चरित्रात्मक कादंबरीच्या आकृतिबंधातून अत्यंत कुशलतेने केलं आहे. मिताक्षरी, संयमी आणि नेमक्या शैलीत त्यांनी हा चौकटीबाहेरचा विषय मोठ्या संवेदनशीलतेने हाताळला आहे. विशेष म्हणजे, अशा नाजूक आणि गुंतागुंतीच्या वास्तवाचं चित्रण करताना बीभत्सता किंवा अश्लीलतेचा स्पर्शही होऊ न देता त्यांनी अनुभवविश्वाचं सशक्त आणि प्रभावी दर्शन घडवलं आहे. त्यामुळे ही कादंबरी केवळ एका व्यक्तीची कथा राहत नाही, तर उपेक्षित अस्तित्वाच्या संघर्षाची आणि आत्मशोधाची व्यापक कहाणी बनते. या संदर्भात ज्योत्स्ना देवधर यांची ''कुँवरनी'' (१९७१) ही कादंबरी आठवते. तसेच विदुषी दुर्गा भागवत यांच्या ''पैस'' (१९८८) या संग्रहातील ''जोगवा'' हा लेखही स्मरणात येतो. तृतीयपंथीयांच्या उपेक्षित, समाजाच्या कडेला फेकल्या गेलेल्या आणि ...