Tuesday 12 December 2017

सोन्यासारखा जीव !!

भर दुपारची वेळ..अंगाची काहिली उन्ह मी म्हणतांना , .पाणी पाणी जीव होतांना
 काळवंडलेली-कृश पारो...  कळकट मळकट परकर पोलकं, डोईवर भोकं पडलेली ठिगळ लागलेली ओढणी. पाठीवर घर घेऊन बिन चपलेची डांबरी काळ्या तापलेल्या रस्त्यावरून फिरतांना खपाटीला लागलेल्या पोटाच्या खाचेतल्या विरलेल्या झोळीत गाढ झोपलेलं पिटुकलं बाळ घेऊन दुकानाच्या दारादारात  पसरलेल्या मातीत चुंबकाच्या साहाय्याने कण कण शोधणारी....
हातातल्या चुंबकाला वाया गेलेले सोन्याचे काही कण लागतील म्हणून सोनाराच्या दुकानासमोरून माती चिवडणाऱ्या पारोला कोण सांगेल झोळीतला चिमुकला सोन्यासारखा लेकरू नकळत चिवडला जातोय ... कणाकणाने माती होऊन वाया जातोय ते.


Wednesday 6 December 2017

आमच्या संवेदना न मरो ...


नागपुरातील अनेक सिग्नल्सवर, रेल्वे स्थानकांवर, मंदिरात, लहान-मोठा ताजबाग अश्या कित्तेक ठिकाणी लहान मुले भिक मागताना आढळतात. ऊन-पाऊस-गारवा कुठल्याही वातावरणात उघडे-नागडे, उपाशी-तापाशी, पिंजारलेले केस, जखमा जखमा झालेले अंग..वेदनेने-दुःखाने पिचलेले किंवा मग त्यापलीकडे गेलेले. कुणाचे आहेत, कुठून आले कुठे गेले ह्याचा कुणाला थांग पत्ता नसतो. त्यातील बरीच मुले हि माफिया लोकांनी गरीब वस्तीतून भिक मागण्यासाठी अपहरण केलेली किंवा परराज्यातून पळवून आणलेली, स्वतः पळून आलेली असतात. या मुलांच्या संरक्षण आणि उत्तम नागरिक बनण्याच्या हक्काबद्दल सरकार, प्रशासन काही करणार आहे का?? कि रस्त्यावरच्या मोकाट श्वानांसारखी यांच्या आयुष्याला काहीच किंमत नाही?
कित्तेक आई-बाबा याच रस्त्याने रात्रंदिवस प्रवास करीत असतील. यांच्या कुणाच्याच मनाला हे सारे प्रसंग कधीच खटकत नसतील का? आम्ही कोडग्या मनांनी उघड्या डोळ्यांनी हा तमाशा पाहत राहणार आहोत.. पाहतो आहोत. आमच्या संवेदना न मरो हीच प्रार्थना .. 




#बच्चेबचाओ #SaveChildBeggars

#बच्चेबचाओ #SaveChildBeggars
गेल्या १०-१२ दिवसांपासून फेसबुक अकाउंट डिऍक्टिव्हेट केले होते... त्या दिवशी अस्वस्थ होऊन ज्या कारणाने गेले आज त्याच कारणाने परत आले. एखाद्या दिवशी मन खूप उद्विग्न करणार काहीतरी नजरेत पडतं आणि सगळंच कसं फोल वाटायला लागतं....बाराएक दिवसाआधीची गोष्ट असेल रोज ऑफिसला जाण्याच्या वाटेत व्हरायटी चौक नावाचा प्रशस्त चौक लागतो. चौकाच्याच बाजूला मोठ्ठ 'मुख्य' पोलीस स्टेशनही आहे. ७ वर्षाच्या मुलीचा खांद्यापासून ढोपरापर्यंत पूर्ण कट झालेला हात दाखवत पंधराएक वर्षाचा मुलगा पुढे आला, हिला औषधाला पैसे द्या म्हणाला. रक्ताळलेला पूर्ण फाटून फाकलेला हात बघून फार कसनुसं झालं. हातात येईल ती दहा-वीसची एक नोट त्या पोराच्या हातात ठेवली आणि सिग्नल सुटताच निघून गेले त्या दिवसभर तो लाललाल हात नजरेसमोर येत राहिला. काय झालं असेल.. का झालं असेल? अनेक तर्कवितर्काचे सत्र मनातच रंगत राहिले. पण झाला असेल अपघात काहीतरी म्हणून मग संध्याकाळपर्यंत सगळं विस्मरणात गेलं. झाला गेला दिवस निवळला. त्यानंतरच्या चौथ्या दिवशी पुन्हा ६ वर्षांच्या नाजुकश्या मुलीचा पूर्णतः भाजलेला हात पुढे करत ८-९ वर्षांचा मुलगा पुढे आला. त्या एवढ्याश्या चिमुकलीचा हात इतका भाजला होता जणू उकळत्या तेलात तळून काढलाय. जीव कळवळला, माझा मुलगा डोळ्यासमोर आला. भोवळ यायची बाकी राहिली. त्या पोराला बोलले चल दवाखान्यात हीच्यावर उपचार करू तर भरभर चालत रस्ता ओलांडून निघून गेला. मी सरळ गाडी पोलीस स्टेशनात घेतली. आत जाऊन रीतसर तक्रार नोंदवली... दिवसभर मन लागलं नाही इतक्या इतक्या चिमुकल्या मुलींसोबत काय होतंय, हे इतकं बाहेर दिसतंय तर एकट्यात आत काय काय होत असेल विचार करून डोक्याचा भुगा. आत आत खूप गहिवरून येत होतं, चलबिचल चलबिचल होत राहिली. स्वतःच स्वतःचा राग आला. बाहेर हे सगळं असं काय काय चाललंय आणि आपण काय करतोय? आभासी जगात दाखवल्या जाणाऱ्या कित्तेक गुडी गुडी गोष्टींना सत्य मानून आनंदात जगतोय. डोळे झाकल्याने सत्य बदलणार आहे का? डोळ्यावरची झापड काढायला हवीय .. आणि त्याच दिवशी फेसबुक मधून परांगदा झाले...जरा अलिप्त व्हावं वाटत होतं. रोज इथे येऊन एकमेकांचे तोंडभरून कौतुक करणाऱ्या अनेक मित्रांपैकी ८-१० मित्रांशिवाय ते फारसे कुणाला कळलेही नाही .. किती बिझी झालोय आपण. आपल्या बाजूचा रोज दिसणारा माणूस एकदिवस असा नाहीसा होतो आणि आपल्याला पत्ताही लागू नये. मागे असेच चित्रपट सृष्टीतल्या कुठल्याश्या निर्मात्याने सुसाईट नोट टाकली फेसबुकवर .. त्यानं काय लिहिलंय, किती दुःख किती अस्वस्थता त्या लेखातून झळकते आहे याचा जराही लवलेश लावून न घेता नेटिझन्स त्या पोस्टला लाईक करत सुटले. कित्येकांनी गमतीच्या प्रतिक्रियाही दिल्या ...त्याला खरं सांत्वन हवं होतं- कुणाचे तरी आधाराचे शब्द हवे होते. चुकीचं करायला थांबवणारी साथ हवी होती, तेव्हाच नेमके हे जग किती तकलादू, इथले लोकंच कसे आभासी आणि इथे मिळणारी सोबत किती फसवी आहे याची प्रकर्षाने जाणीव होऊन व्यथित होऊन त्याने आत्महत्याचे पाऊल शेवटी उचललेच. आत्ता आत्ताच इथे पोस्ट टाकणारा त्याच्याशी घडलेल्या गोष्टी इतक्या तळमळीने शेअर करणारा, कॉमेंट मधून तटतटून भांडणारा, रोजच दिसणारा,हाकेच्या अंतरावर जाणवणारा आपल्या मित्र यादीतला इसम आत्ता बघता बघता स्वतःला जीवे मारतो, निघून जातो आणि आपण काहीच करू शकत नाही हे सत्य नंतर कित्येकांच्या पचनी पडले नाही.. पण त्यानं काही झालेही नाही. अजून आपण तिथेच गरगर फिरतोय स्वतःतच गुरफटले गेलो आहे. यापलीकडे काय घडतंय याच्याशी काडीमात्र घेणेदेणे नाही. जगबुडी होईपर्यंत आम्ही असेच घाणीच्या बैलासारखे फिरत राहणार आहोत का ? .... असो
तर मी तक्रार नोंदवल्या नंतर ऑफिसला जाता येता या चौकात आवर्जून लक्ष देणं सुरु होतं .. पूर्ण १२ दिवस लहान मुलं तर सोडा साधे दुसरे भिकारीही दिसले नाही.. वाटलं चला आपल्या तक्रारीने काहीतरी सकारात्मक फरक पडला असावा, चिमुकल्यांना पोलिसांनी या घाणीतून काढले असावे..पण तसे नव्हते..आज सकाळी पुन्हा अगदी 5-6 वर्षांची नवी पोर हात पूर्ण लदलद जळालेल्या अवस्थेत पुढ्यात आली. पोलीस स्टेशनला जाऊन मी पुन्हा जरा हिसका दिला ... त्याचा उपयोग पुन्हा ४ दिवस होईलही, पण अश्या किती चिमुकल्या नरकयातना भोगत राहणार आहे हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. मी एकटीने तरी काय करावे हवे तसे उत्तर सापडतच नाहीये. म्हणून मग परत येऊन हे तुम्हा सगळ्यांना सांगावं वाटलं .. वाटलंच कुणाला जरा आपल्या कोषातून बाहेर येऊन कुठेतरी काहीतरी यासाठी करावं तर, कुणी सांगावे... बिचाऱ्या अत्याचार होणाऱ्या चिमुकल्यांना चुकून माखून मदत व्हायची.... आणखी काय ?


Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...