Monday 10 July 2017

काही फ़ाइल्स काही फोल्डर्स अलबत स्मृतीत सेव झालेले असतात. कधीपासून ..कुठून कुठून त्याचा पत्ता नसतो. अगदी गच्च चिकटून बसलेल्या आठवणी, कधी सांधलेले कधी भंगलेली स्वप्न, कधी अनुभूती देणाऱ्या कधी खोल जखमा खणून गेलेल्या घटना, अस्तित्वाच्या जाणीवा कोरत गेलेली माणसे, आयुष्य ढवळून काढणारे विचार, कधी मांडून कधी कोंडून ठेवणाऱ्या रिती, प्रयत्न करूनही पुसली न जाणारी नावं, गोंगाटातही वाजत राहणारे आवाज, स्मृतीत चलचित्रासारखी दिसत राहणारी काही स्थळं, एकांतातले सुस्कारे, घुस्मटलेले आवंढे, मागे सुटलेले हवेहवेसे क्षण .... निवांत वेळ, एकांत आणि एक क्लिक.. गाणी सुरु होतात काही गोष्टी लगेच कनेक्ट होऊ लागतात. गीतातल्या एखाद्या शब्दाने खपली पडते तर एखाद्या ओळीने विस्मरणात गेलेला माणूस आठवणीत जागा होतो…एखाद्या आलापात आपण भूतकाळाचा प्रवास करून येतो..… गाण्याची एखादी अर्थपूर्ण ओळ कानी पडते अन लगेच मनात काहीतरी हलतं. शब्द आत आत उतरत जातात अन सगळंच विस्कटत जातं... रोजची घातलेली घडी निसटते. आपण वाहवत जातो त्या तेव्हाच्या जगात त्या क्षणात. एक एक सूर स्पर्शत जातो, तन्मयतेचा षड्ज लागतो. जुने भास होऊ लागतात तरल संवेदना जागृत होतात आणि गाण्याला असणारे आपल्या खऱ्या आयुष्याचे भूतकाळातले संदर्भच मग त्या गाण्याची ओळख होऊन बसतात. हे संदर्भ खूप अवघड अवस्था निर्माण करतात हवेहवेसे तरीही त्रासदायक...
काही आठवणी मुठीत गच्च आवळाव्या वाटतात आणि तळव्याला चटका साहवतही नाही.
अशी आठवणींशी चिकटून बसलेली गाणी आलीच अचानक समोर तर, जीवाची घालमेल होते, न सांगता न कोंडता येणारी. कधीतरी ऐकता ऐकता बंद करावी वाटतात अन कधी मुद्दाम शोधून ऐकावी वाटतात.… गाणी एकतर सगळं काही आठवायला भाग पाडतात किंवा हीच सगळं विसरायला मदत करतात.
काही गाणी हि अशी काळजाचा ठाव घेणारी असतात...



Tuesday 4 July 2017

तिघींची घोडदौड साकारतेय 'वूमनविश्व'ची वाटचाल

प्रत्येक पिढीत होणारी स्थित्यंतरे ही त्या-त्या जनुकांवर प्रभाव टाकणारी असतात. आजच्या पिढीच्या अपेक्षा अन्‌ आकांक्षा बदलत्या परिस्थितीवर अवलंबून असतात. अन्‌ याच अनुषंगाने व्यक्तिमत्व घडत असतात. परिस्थिती, बदलत जाणारे वातावरण आणि त्यानुसार घडत जाणारी माणसे उमलत्या पिढीच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असतात. आजच्या तरुणाईपुढे अमर्याद संधी, तेवढीच स्पर्धेमुळे निर्माण झालेली आव्हाने आहेत. ती पार पाडायला वेळ मात्र मर्यादित. मग निव्वळ धक्कातंत्र सुरु असतं. एकमेकांशी तुलना करून मार्क्‍स आणि ग्रेडच्या गणिती
चक्रव्युव्हात गरगर फिरत राहणं. वयाच्या एका टप्प्यापर्यंत आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे सुद्धा ठाम माहिती नसणारे किशोरवयीन मुलं-मुली पालकांनी बोट दाखवल त्या दिशेने प्रवाहात वाहत राहणं, एवढच पसंत करतात. आपल्याला नेमकं काय आवडतं, आपल्या सांस्कृतिक गरजा काय हे कळेस्तोवर पाणी डोक्‍यावरून गेलेलं असतं. मग काय..? आहे त्यात समाधान मानून केवळ तडजोड करत जगणे इतकंच काय ते हाती उरतं. आपण
कोणत्या विषयाचे शिक्षण घेतोय तेवढेच फोकस करून त्यातच करीअर करायचे एवढेच चौकटीतले ध्येय राखून आजच्या तरुणाईची पळापळ चालू आहे. छंद जोपासणे, कला-साहित्याची आवड, सामाजिक बांधिलकी या गोष्टी यांच्या गावीही नसतात असे म्हणण्यापेक्षा असे म्हणूया कि तेवढा विचार करण्यासाठीचा विसावा सुद्धा त्यांना मिळत नाही. आणखी एक आजच्या काळात काळजीचा ठरलेला विषय म्हणजे कालची पिढी व्यसनात तर आजची पिढी इंटरनेटच्या जाळ्यात फसून स्वतःचे करिअर वाया घालवते आहे, अशी बोंब सर्वत्र होताना दिसते. तरुण
पिढीत वाढत जाणारे सोशल नेटवर्किंगचे फॅड हा आजच्या पॅरेंटिंग विषयाचा महत्वाचा मुद्दा ठरतो आहे. पण या सगळ्या "ड्रॉबॅक' समजल्या जाणाऱ्या अडचणींनाच प्रयत्नांची किनार देऊन यशाचे गणित मांडणाऱ्या तीन तरुणींची ही यशोगाथा आजच्या पिढीला खरंच प्रेरणादायी ठरणारी आहे.

आजची पिढी प्रॅक्‍टिकल आहे ती सहजासहजी भावनाविवश होत नाही असे म्हणतात. याचा अर्थ त्यांना संवेदना नाहीत असा नाही. पण वेळेचा अभाव हेच एकमेव कारण. पण या तिघींच्या बाबतीत मात्र हा अभावही सपशेल फसला. कॉलेजातून शिक्षण घेत असतानाच आजू-बाजूला दिसणाऱ्या समस्या उघड्या डोळ्यांनी पाहण्याची सवय लागली. जाणिवा जागृत होईपर्यंत दृष्टिकोन बदलत गेला आणि आहे ती परिस्थिती पाहून नुसतं कळवळत बसण्यापेक्षा काहीतरी केले पाहिजे, हा विश्वास ठाम होत गेला. महिलांवर होणारे अत्याचार हा एवढाच मुद्दा नव्हता खरतर. तर त्यांच्या समस्यांना त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे, सोडवण्याचे माध्यम निर्माण करून छोट्या छोट्या हाताने फुल ना फुलाची पाकळी बनून हा जगन्नाथाचा रथ ओढण्यास भागीदार व्हावे ही भावना हे ध्येय त्यापाठी होते.

कोण आहेत या तरुणी? कनक वाईकर, वर्षा गायकवाड आणि श्रुती गुप्ता अशी या तीन मैत्रिणींची नावे. परभणीसारख्या छोट्या शहरातून शिक्षण घेऊन मुंबईसारख्या शहरात एका स्टार्टअप मध्ये ग्राफीक डीझायनर म्हणून नोकरी करणारी कनक सांगते की आजुबाजूला बघताना अनेक कलागुण आणि क्षमता असणाऱ्या स्त्रिया निव्वळ मार्ग सापडत नाही म्हणून मार्गदर्शनाअभावी मागे पडतात. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करतांना मला असे लक्षात आले कि याच साहाय्याने आपल्याला काहीतरी करता येण्यासारखे आहे. या कामाचा अनुभव आणि अनेक वर्षांपासून असलेली इच्छाशक्ती या बळावर हा आत्मविश्वास निर्माण झाला होता. समविचारी मैत्रिणी वर्षा आणि श्रुती या दोघींनाही हि कल्पना अतिशय आवडली आणि 'वूमनविश्व' हे संकेतस्थळ साकाराला आले. श्रुती सॉफ्टवेअर इंजिनिअर असून बंगरूळ येथे एका स्टार्टअप कंपनीत जॉब करते. वूमनविश्वची संपूर्ण तांत्रिक बाजू सांभाळण्याची महत्वाची जबाबदारी ती पार पडते आहे. वर्षा कन्टेन्ट रायटर आणि एडिटर म्हणून यशस्वी करिअर सांभाळून ऍडव्हेंचर, ट्रेकिंग, फोटोग्राफी हे तिचे छंदही जोपासते हे सगळे करून वूमनविश्वची संपादकीय जबाबदारी मोठ्या खुबीने पार पाडते.

अनेक भाषांमध्ये अनेक पद्धतीचे वेबसाईट असले तरी खास आपल्या मराठी भाषेत विविध विषयांना घेऊन विशेषतः महिलांसाठी त्यांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने निर्माण केलेले पोर्टल हा पहिलाच प्रयत्न आहे. वूमनविश्वतून महिलांसाठी उर्मी जागवणारे त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या देश विदेशातील महिलांच्या संघर्षातून यशाकडे नेणाऱ्या लेखाच्या श्रुंखलेतून सुरु झालेला हा प्रवास आता महिलांच्या समुपदेशनाच्या दृष्टीनेही खुला करण्यात आला आहे. ज्याद्वारे त्या त्यांच्या सामाजिक समस्या, आरोग्याविषयी विचारणा, कायद्याचे ज्ञान तसेच करिअर संबंधी नवे पर्याय या  माध्यमातून संबंधित विषय तज्ज्ञांकडून जाणून घेऊ शकतात. लेख प्रकाशनाशिवाय हल्लीच वूमनविश्वने ग्राउंड ऍक्टिव्हिटी देखील सुरु केल्या आहेत. बहुलिंगी माणसांच्या जगण्यातले कंगोरे समजून घेण्यासारखे चाकोरीबाहेरची कार्यक्रमाचे आयोजन, 'वूमनस्पेशल ऍडव्हेंचर कॅम्प' सारखे उपक्रम, कँसर जागृती सारखी मोहीम वूमनविश्वाच्या माध्यमातून पार पाडली जाते आहे. याशिवाय पुढे महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी नवे मार्ग निर्माण करण्याचे प्रयत्न या तिघींनी सुरु केलेले आहेत.
'वूमनविश्व' या संकेतस्थळाला विदेशातील वाचकांपासून ते देशातील अगदी गाव-खेड्यातील वाचकांचा मिळणार प्रतिसाद स्तंभित करणारा आहे.
वूमनविश्व साकारण्याचा उद्देश सर्वांगीण विकासातून महिलांचे सक्षमीकरण हे असल्याने तसेच महिला हाच  कामाचा केंद्रबिंदू असल्याने विविध लेखक-वाचक, समाजसेवक, तज्ज्ञ मंडळी अश्या सर्व स्तरातील चांगल्या माणसांचे पाठबळ संचित म्हणून आमच्याकडे गोळा होते आहे. या सगळ्यांच्या आधाराने पुढे मराठेतर भाषांमध्ये आमच्या कामाचा विस्तार वाढवून महिलांच्या विकासासाठी जास्तीत जास्त दारे उघडण्याचा प्रयत्न आम्ही सतत करत राहू. असे आत्मविश्वासाने ठामपणे त्या बोलतात.



Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...