Thursday 29 March 2018

हे बघ ऐक, 

फक्त निभवायचंय म्हणून येऊ नकोस, निभावाव लागतं म्हणून निभावणारे नाईलाज आणि कुचंबणेला त्रासून परत फिरतात..

तेव्हा तू जा .. 
जिथे कुठे तुझ्या मनाचं समाधान असेल, जिथे प्रेमाची आस असेल तू जा. 
मी नाही घालणार हाक तुला .. 

पण काळाच्या ओघात आलीच आठवण तर .. माझ्या प्रेमाची जाणीव झालीच प्रखर तर 
विश्वासाच्या सोबतीची गरज तीव्र होईल .. अन डोळे ओथंबून वाहू लागतील ...तेव्हा 
तेव्हाच ये परत .. 

साथ निभवायचीय म्हणून येऊ नकोस 
प्रेम जगवायचंय म्हणून ये ,,, 
इतकंच ..

ऊन्हाचं झाड !


हे असं होतं..

ऑफीसमधून रोज रोज अंधार पडल्यावर बाहेर पडताना एकच दृष्य दिसतं; ऑफीसदारातलं झाड अंधार लपेटून झाकोळून घेत असतं स्वतःला. काळ्या, करड्या, वाळक्या फांद्यांचं अंधार लपेटलेलं काळकभीन्न झाड.. कधी फार लक्ष जात नाही त्याकडे..कधी गेलच तर अंधाराचं झाड स्वतःला गडद करून घेतं अधिक... अंधाराचं काय ते अपृप..

कलता दिवस पाहणं नसतच नशिबी..पण कधीतरी उतरणीचं ऊन पाहायची, अनुभवायची उर्मी होते.. नाहीच जमत..पण एखाद्यावेळी अंधार दाटण्याआधी निश्चयानं बाहेर पडावंच तर ऊन असं खोडसाळ होत राहतं, ऑफीसदारातल्या झाडाचा आडोसा घेत लपंडाव मांडतं.... झाडही आखडून वाकोल्या दाखवत अंगभर उन्ह पांघरून घेतं अन स्वर्णरंगानं तेजाळून निघतं...सायंकाळचा फारसा अनुभव नसणारया मला मग ते उन्हाचंच झाड वाटू लागतं.. आत कालवाकालव होते.. माझ्या आतली सायंकाळ गहीवरून येते, अचानक जोम चढतो, आतला अंधार मी ओढून काढते, घडी घालते अन गाडीच्या डीक्कीत टाकून देते...मनातल्या पेरलेल्या आशांना मग पालवी फुटू लागते.. मी झाडाजवळ येते तांबडं पिवळं उन उन तोडून गोळा करते..एकात एक घालून मोठी लांब शाल विणते अन आतबाहेर पांघरून घेते..गाडी सुरू करून रस्त्याला लागते तोवर मनातल्या झाडाला स्वर्णरंग चढत जातो..बहर येतो..पोचेपर्यंत सुर्य मावळला असतो..मनातले ऊन्हाचे झाड अजून तांबड फुटून डोलत असतं..डोलणार असतं


उद्या अंधाराचं झाड नजरेस पडेपर्यंत तरी दिलासा असतो..रात्र झाली तरी उन्ह झडणार नसतं...

(C)रश्मी पदवाड मदनकर
28 March 18
#ऊन्हाचंझाड #ललित
#MyClick

प्रिय कविता ..

प्रिय कविते !

एक दिवस अचानक तू भेटलीस, आणि आयुष्य पालटलं.
रुक्ष, कोरड्या रखरखत्या मातीवर कुणीतरी पाणी घालावं, घालत राहावं आणि एकदिवस आत आत गाडल्या गेलेल्या एखाद्या पेराला पालवी फुटू लागावी तसेच काहीसे होऊ लागले. भरकटलेल्या सुन्न पायवाटेवर भेटलीस तू मला आणि हात धरून शब्दालंकाराने शृंगारलेल्या मखमली, रेशमी, तलम भावस्पर्शाच्या स्वप्नील दुनियेत घेऊन आलीस.

कविते ... तू प्रसवलंयस मला
खरं सांगू मी नाही तुला जन्म घातला, तुझ्या येण्यानं माझ्यातल्या कवियित्रीचा जन्म झालाय. मी नाही तुला नाव दिलं..तूच मला नाव मिळवून दिलंस. मी नाही ओळख तुझी तूच माझी ओळख झालीयेस.
मी नाही ठरवत तू कसं असावस, तू असतेच मुळी अस्तित्वात फक्त तुझे स्वरूप एकत्र तेवढे बांधायचे असते. मग तूच ठरवतेस तुझी शैली..तुझा छंद-बंध, आणि ते कुणी कागदावर उतरवावे हि निवडही तुझीच असते.

मी नाही तू निवडतेस मला ..आईच्या वात्सल्याने माझा हात धरतेस, गिरवायला लावतेस आणि तुला हवी तशी काळे निळे वस्त्र लेवून अवतरत जाते कागदावर. एखाद्या अप्सरेने प्रगट व्हावे तितकेच चमत्कारिक असते तुझे पूर्ण रूप. तुझ्या प्रगटीकरणात मी तर फक्त निमित्तमात्र.

तुझ्या विखुरल्या रुपाला एकत्र बांधायला तू माझ्यावरच विश्वास का ठेवावास  ..?

कारण ..कविते ..

माझं आहे त्याहून अधिक तुझं प्रेम जडलंय माझ्यावर.. तुझं पूर्ण रूप साकारण्याआत तू मला आई म्हणून जन्माला घातलेलं आणि मानलेलं असतेस.. माझ्यातल्या लेखनाचा दर्जा न तपासता, माझीच लेखनकुस प्रसवून घेण्यासाठी तू निवडलेली असतेस  . .. मी मात्र ..
मी फार खुजी आहे तुझ्यापुढे .. तू अवतारल्यावरही मी तुझ्यातल्या श्रेष्ठ निकृष्टाच्या खुणा शोधत राहते एक एक चूक काढून ओरबाडून लेखन संस्काराच्या नावाखाली तुझे रूप मला हवे तसे सोलत-फोडत राहते. मी इतकी खुजी असते कि इतके केल्यावरही तुझे अंतिम स्वरूप पाहून ठरवते तुला माझे नाव जोडायचे कि बोळा करून कचऱ्याचा डबा दाखवायचा...

प्रिये  ...

तू फार फार मोठ्या मनाची आहेस ....

मी तुझी सतत आस मनात पेटत ठेवते. तुझ्या येण्याचे डोहाळे झेलते. क्वचित कधी प्रसवपीडाही सह्ते...तुही येतांना तावून सुलाखून निघालेली असतेस,  पण जितके सहज तू मला निर्माती म्हणून स्वीकारतेस तितकं सहज मी तुला माझी निर्माती म्हणून कधीच स्वीकारत नाही, मला तो कमीपणा घ्यायचा नसतो...

कविते ...
तू गुरु असतेस माझी ...

तुझ्या निर्मितीच्या काळात मी कल्पनेतला ब्रह्मांड पालथा घालत अनुभूतीच्या हिंदोळ्यावर रममाण होत, न घेतलेल्या अनुभवांच्याही शब्दांची नक्षी चितारत असते, तेव्हा न शिकलेल्या न पाहिलेल्या न वाचलेल्या किती गोष्टींचं ज्ञान तू सहज माझ्या बालबुद्धीच्या पदरी पाडत राहते. कुठलाही बडेजाव न आणता मला समृद्ध अधिक समृद्ध करीत राहते.

सखे  .. कधी जिवलग असतेस तू ..

दैनंदिन धावपळीच्या, संसाराच्या पसाऱ्यात भावनांची गळचेपी झाली कि आतात घालमेल होते, मनाच्या अनंत, अनादी, अथांग खोल खोल रुतलेल्या तळात साचलेल्या विचारांचा डोह खळवळतो गाळ हलतो आणी मनात कोलाहल होतो तेव्हा मी भोवतालच्या पोकळीत निराधार उभी, नजर फिरवते तेव्हा तू डोळे मिचकवत खंबीर आधाराचे स्मित पसरवत उभी असतेस शेजारी. मी डोळा ओला थेंब आतच वीरवते, हातातली दिवसभराची काम संपवते आणि गुडूप अंधाऱ्या रात्री हळूच तुझ्या कुशीत शिरते तेव्हा माझे हुंदके, उमाळे अश्रूंच्या आवेगाने भिजवत राहतात तुला रात्रभर...मी शब्द शब्द तुझ्या हवाली करते आणि मोकळं करून घेते स्वतःला... कुठलाही प्रश्न न विचारता, कोणतेही दूषणं न लावता माझ्या मनातली सगळी जळमटं तू अंगाखांद्यावर ओढून घेतेस, माझा कोलाहल माझी घालमेल आता तुझी झालेली असते आणि तरीही तू प्रसन्न चित्त शांत हसत असते.

कविते..
फक्त तीन अक्षरी नाव ग तुझे. पण केवढ्या मोठ्या व्याप्तीच्या प्रगाढ संवेदनांचा भार पेलून धरलायेस खांद्यावर. तुझं ब्रह्मांडव्यापी रूप न्याहाळते तेव्हा.. मी स्वतःला जगासमोर सादर करते ते माझे अस्तित्व किती शुल्लक किती भासमयी आहे याची जाणीव होऊ लागते.

कविते...
तू फक्त देत राहणारी पूर्णा आहेस, आणि मी सतत तुझ्या कडून घेत राहणारी तरीही सतत अतृप्त, असमाधानी..
माझी झोळी तुझ्यासमोर सतत फाटकी ...

कविते ...
माझ्यावरची तुझी माया तू कधीही कमी होऊ देऊ नकोस, तुझ्या कवेत असणारी माझी जागा कधीही कमी करू नकोस. तुझी कृपादृष्टी अशीच कायम ठेव, तुझा आशीर्वादाचा हात माझ्या माथी ठेव. आणि मरणाच्या दारी पाऊल ठेवेपर्यंत तुझी साथ कायम ठेव .. तू आज आहेस तशीच राहा .. अंतरात्म्यात मुरलेली ..रंध्रारंध्रात सामावलेली.
इतकेच मागणे ..

कविते तुला कविता दिनाच्या शुभेच्छा !!  

तुझीच
रश्मी पदवाड मदनकर
२१मार्च २११८




Wednesday 14 March 2018

ऋतू कोवळा येऊन जाता आठवतो तू
ऋतू सोहळा आटपतांना आठवतो तू

सहा ऋतूंच्या स्मरणांच्याही पडता गाठी
ऋतूत एक होऊन ऋतू मग आठवतो तू

उधळून देता इंद्रधनुचे रंग नभाशी
तांबडं फुटता आकाशी बघ आठवतो तू

पाऊस धारा खिडकी मधुनी ओघळताना
तुषार उडता गाली अलगद आठवतो तू ...

तू आठवता मनात भरते घन व्याकुळ
नजरेमध्ये ओल दाटता आठवतो तू   ...

रश्मी मदनकर
१३.०३.१८ 

Tuesday 13 March 2018




काय चक्रावून टाकणारे योगायोग असतात बघा.. काल रात्रभर झोप लागली नाही म्हणून पहाटे 3.30 च्या सुमारास टीव्ही लावून बसले. झी सिनेमावर खुदा गवाह लागला होता... बर्याच वर्षाआधी पाहीलेला हा सिनेमा पाहूया जरावेळ म्हणून तोच लावून बसले. आई आणि मुलगी अश्या दुहेरी भुमिकाही काय खुबीने निभावल्या आहेत श्रीदेवीने हीच्यासारखी अभीनेत्री पुन्हा होणे नाही हा विचार करतच शेवटाला सिनेमा पोचला..काबूलवरून हिंदूस्थानला वेड लागलेल्या श्रीदेवीला आणलं जाईल आणि ती खलनायकांच्या तावडीत सापडेल...तीच्यावर होणारे अत्याचार सकाळी सकाळी बघू नये उगाच मूड जाईल म्हणून तीचा सिनेमातला अब्बूजान- बादशाह खान म्हणजे अमिताभबरोबरचा एक सुंदर सिन तीची प्रगल्भ देखणी छबी डोळ्यात साठवून काहीतरी वेगळे बघायला चानल बदलले ...न्युजचानल लावलं, जनरल बातम्या चालू होत्या.. 5 एक मिनीटातच तीच्या मरणाची बातमी येऊ लागली..आधी धस्सकन झालं.मग वाटलं शक्यच नाही आतातर आपण हीला पाहत होतो. कालच तीचा मुलीबरोबर रॅम्पवर चालताना.. मुलीला दटावताना वायरल झालेला व्हीडीओ पाहण्यात आला होता तेव्हा किती ग्रेसफुल दिसत होती. मुलीपेक्षाही तीचंच आकर्षण अजून कायम होतं...
इंग्लिश-विंग्लिश चित्रपटात इतक्या वर्षांनी ती दिसली तेव्हा काहीतरी खटकलं होतं हे नक्की, पुर्वीचा मिश्किल स्वभाव..हसण्यातली सहाजीकता..पुर्वीचा कॅमेरासमोरचा सहज वावर अर्थात काॅन्फिडन्स, पब्लिकबरोबर एका झटक्यात केमिस्ट्री जमवून आणणारी तीची खट्याळ अदा..टपोर डोळ्यातली चमक जरा लोप पावलेलं दिसलं. पण यासगळ्या पलिकडे ती परत आलीय पडद्यावर दिसतीये यातला आनंद अधीक होता.. तीच्या दिसण्याहून तीच्या अभिनयावर आमचं प्रेम अधिक होतं आणि ही अभिनयाची तीला जन्मतःच मिळालेली देणगी त्याचं नवं रूप पुन्हा तीनं इंग्लिश विंग्लिश मधून आणि नंतर माॅम मधूनही दाखवून दिलंच.
एक आश्चर्यकारक घडलं ते असं की बरेचदा जाणारयाला आपण जाणार असल्याची जाणीव आधीच जरा होत असावी का हा संशोधनाचा विषय आहे पण असे योगायोग घडून आले की तसं वाटायला मात्र लागतं .. श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट तीनं तीच्या आग्रहानं तीचा पहीला चित्रपट रिलीज झाला त्या दिवशीच रिलीज करायला लावला म्हणे, म्हणजे स्टार्ट टू एंडचं एक सर्कल माॅमच्या वेळेला पुर्ण झालं होतं. .. नवं सर्कल तीच्या एखाद्या नव्या वेगळ्या चित्रपटानं सुरू झालं असतं कदाचीत पण ते आता तीच्या मुलीच्या फिल्ममध्ये पदार्पणानं सुरू होणार आहे, पण ते पाहायला आता ती नाही... ती त्या चिंतेतही असल्याचं दिसायचं जाणवायचं. तीनं मुलीची सगळी तयारीही करून घेतली आणि या पिरेड मध्येच 'माॅम' सारख्या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आणखी एक मिलाचा दगड रोवून..मुलींसाठी आयुष्यभराची शिकवण आठवणीचा ठेवा पेरून.. स्वतःची विकेट उडवून पुढील सुत्र मुलीच्या हातात सोपवणारी 'माॅम' ठरणं देखील तीच्या नियतीचा भाग असणं हा केवढा सुयोग मानायचा.
या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर, जे जसं अन ज्या क्रमात व्हायला हवं तसंच झालंय 'वेळेत घेतली गेलेली एक्झिट' असं समजून तीला मिळालेली मुक्तीही तेवढ्याच ग्रेसफुली एक्सेप्ट करून तीला सन्मानाने श्रद्धांजली वाहायला हवी.. आमच्या मनात मात्र ती सदैव अमर राहणार आहेच.
श्रीदेवीच्या आत्म्यास सद्गती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!
रश्मी मदनकर

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...