Sunday 31 December 2023

टाइम बँक

 




एक सुंदर संकल्पना वाचनात आली, अतिशय आवडली आणि पटली देखील. 

असं म्हणतात आपला देश हा सध्या सगळ्यात तरुण असणारा देश आहे. दुसरे आजही कुटुंबव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याने टोकाची वाईट परिस्थिती आपल्या देशात उद्भवली नाहीये आणि निकटच्या काळात उद्भवणाराही नाही, तरीही मी वाचलेली ही व्यवस्था एक चांगली संकल्पना आहे. इतर देशांची  स्थिती याबाबत जरा वाईट आहे. बहुतांश देशात कुटुंबसंस्थाच ढासळलेली असल्याने अमाप पैसे असूनही तिथे एकाकी राहणाऱ्या माणसांची त्यात वृद्धावस्थेत किंवा आजारी असल्यावर त्यांची सुश्रुषा करणारी माणसे त्यांना मिळणं दुरापास्त झाले आहे. त्यामुळे तिथे सुरु झालेली ही व्यवस्था अनेक दृष्टीने आपल्या देशातही करता येण्यासारखी आहे. आपण काय चांगले ते घेत जावे... तर, 


स्विझर्लंडमध्ये तिथल्या सरकारच्या माध्यमातून 'टाइम बँक' ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. त्यात तुम्हाला तुमचे ''वेळ खाते'' (Time Account) सुरु करावे लागते. या खात्यात तुमच्या वेळेचा लेखाजोखा जमा राहतो. 


स्विझर्लंडमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने या संकल्पनेबाबत तिचा अनुभव सांगितला...  


स्वित्झर्लंडमध्ये शिकत असताना मी माझ्या शाळेजवळ एक घर भाड्याने घेतले. घरमालकीण, क्रिस्टीना, एक ६५ वर्षांची अविवाहित महिला होती जिने सेवानिवृत्त होण्यापूर्वी माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम केले होते. स्वित्झर्लंडला पेन्शन व्यवस्था खूप चांगली आहे, त्याला त्याच्या नंतरच्या वर्षांत अन्न आणि निवारा बद्दल काळजी करावी लागत नाही, इतकी रक्कम मिळते. एके दिवशी मला कळले की तिला एका ८७ वर्षांच्या अविवाहित वृद्धाची काळजी घेण्यासाठी नोकरी मिळाली आहे. मी त्या महिलेला विचारले की या वयात कशाला दगदग, अराम करा. पैशासाठी हे करण्याची गरज नाही ? तिच्या उत्तराने मला आश्चर्य वाटले: "मी पैशासाठी काम करत नाही, परंतु मी माझा वेळ 'टाइम बँकेत' जमा करते आहे, आणि जेव्हा मी माझ्या म्हातारपणात चालू शकणार नाही, किंवा मला फार गरज असेल तेव्हा मी ते परत घेऊ शकते."


"टाईम बँक" या संकल्पनेबद्दल मी पहिल्यांदा ऐकले, तेव्हा मी खूप उत्सुक होते आणि घरमालकाला सविस्तर विचारले. "टाइम बँक" ही संकल्पना स्विस फेडरल मिनिस्ट्री ऑफ सोशल सिक्युरिटीने विकसित केलेला वृद्धापकाळातील पेन्शन कार्यक्रम आहे. लोक वृद्धांची काळजी घेण्यासाठी 'वेळ' देतात, पर्यायाने खात्यात वेळेची बचत करतात आणि ते वृद्ध झाल्यावर किंवा आजारी पडल्यावर किंवा काळजी घेण्याची गरज असताना ते खात्यातून काढून घेऊ शकतात.


आता हे खाते कोण काढू शकतात ह्याच्या अटी फार गमतीशीर आहेत... अर्जदार निरोगी, संवाद साधण्यात चांगला आणि प्रेमाने परिपूर्ण असावा. त्यांना दररोज मदतीची गरज असलेल्या वृद्धांची काळजी घ्यावी लागते. त्यांचे 'सेवा तास' सामाजिक सुरक्षा प्रणालीमधील वैयक्तिक 'वेळ' खात्यांमध्ये जमा केले जातात. माझी घरमालकीण आठवड्यातून दोनदा कामावर जायची, प्रत्येक वेळी दोन तास गरजूंच्या सेवेत घालवायची, म्हातार्‍यांना मदत करायची, त्यांच्यासाठी खरेदी करायची, त्यांच्या खोल्या साफ करायची, त्यांना उन्हात नेऊन फिरवून आणायची, त्यांच्याशी गप्पा मारायची.


नियमानुसार, एक वर्षाच्या सेवेनंतर, “टाइम बँक” सेवा देणाऱ्या व्यक्तीच्या कामाच्या तासांची गणना करते आणि त्याला “टाइम बँक कार्ड” जारी करते. जेव्हा तिला तिची काळजी घेण्यासाठी कोणाची गरज असते तेव्हा ती "व्याजासह वेळ" काढण्यासाठी तिचे "टाइम बँक कार्ड" वापरू शकते. माहितीच्या पडताळणीनंतर, "टाइम बँक" रुग्णालयात किंवा तिच्या घरी तिची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवकांना नियुक्त करते.


एके दिवशी, मी कॉलेजला  आणि घरमालकिणीने फोन केला आणि म्हणाली की, ती खिडक्या पुसताना स्टूलवरून पडली. मी त्वरीत सुट्टी घेऊन तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले. त्यांचा पाय मोडला होता, ज्यामुळे त्यांना चालणे शक्य होणार नव्हते. जेव्हा मी तिला सांभाळण्यासाठी माझ्या कॉलेजमधून सुट्टीघेण्याची तयारी करत होते, तेव्हा त्यांनी मला सांगितले की मला तिची काळजी करण्याची गरज नाही, कारण तिने आधीच "टाइम बँक" कडे विनंती सबमिट केली आहे. दोन तासांपेक्षाही कमी वेळात "टाइम बँक" ने एका नर्सिंग कर्मचाऱ्याला घरमालकिणीची काळजी घेण्यासाठी पाठवले.


पुढचा महिनाभर, देखभाल कर्मचाऱ्याने घरमालकाची रोज काळजी घेतली, तिच्याशी बोलून, तिचे हवेनको ते सगळं बघून, तिच्यासाठी स्वादिष्ट स्वयंपाक बनवून तिची सुश्रुषा केली. केअरटेकरच्या सेवेमुळे घरमालकीण लवकरच ठणठणीत झाली. सावरल्यानंतर तीच पुन्हा "कामावर" देखील जायला लागली. ती म्हणाली की ती अजूनही निरोगी आहे आणि त्यामुळे भविष्यासाठी "टाइम बँक" मध्ये अधिक वेळ वाचवण्याचा तिचा हेतू आहे.


आज, स्वित्झर्लंडमध्ये, वृद्धापकाळाला आधार देण्यासाठी "टाइम बँक" वापरणे ही एक सामान्य प्रथा बनली आहे. यामुळे देशाच्या पेन्शनवरील खर्चात बचत तर होतेच पण इतर सामाजिक समस्याही सुटतात. अनेक स्विस नागरिक या प्रकारच्या वृद्धापकाळाच्या टाइम पेन्शनला खूप पाठिंबा देतात.


स्विस पेन्शन ऑर्गनायझेशनने केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की निम्म्याहून अधिक स्विस लोकांना या प्रकारच्या वृद्धाश्रम सेवांमध्ये सहभागी व्हायचे आहे. स्विस सरकारने "टाइम बँक" पेन्शन योजनांना समर्थन देण्यासाठी कायदा देखील मंजूर केला. सध्या, आशियाई देशांमध्ये घरी एकटे राहणाऱ्या वृद्ध लोकांची संख्या वाढत आहे आणि ती हळूहळू एक सामाजिक समस्या बनत चालली आहे. स्वित्झर्लंड शैलीतील "टाइम बँक" पेन्शन आपल्यासाठी देखील एक चांगला पर्याय असू शकतो.. 


तुम्हाला काय वाटतं ? 


@रश्मी पदवाड मदनकर



माँ भारती

 भूषणकुमार उपाध्याय ह्यांची एक अतिशय आवडलेली कविता..


वेदमंत्रों की ध्वनि में हूँ।

उपनिषदों की वाणी में हूँ।।

गीता का विश्वरूप मेरा तन है।

पतंजलि का योग मेरा मन है।।

भक्त प्रह्लाद ध्रुव के नमन में हूँ।

षड् दर्शनों  के अमर श्रवण में हूँ।।


पुराणों की मोहक कथाओं में हूँ।

दुखी मानव की व्यथाओं में हूँ।।

राम के धनुष का अमोघ वाण हूँ।

कृष्ण का सुदर्शन चक्र महान हूँ।।


लिच्छवी का गणतंत्र हूँ।

राजा पौरुष यथा स्वतंत्र हूँ।।


बुद्ध की करुणा हूँ।

महावीर की धारणा हूँ।।

नानक का संदेश हूँ।

सूफ़ियों का देश हूँ।।


गिरिजाघर की प्रार्थना हूँ।

पारसियों की अग्नि याचना हूँ।।


सर्वे भवन्तु सुखिनः का घोष हूँ।

मानव सभ्यता का प्रदोष हूँ।।

चरक का आयुर्वेद हूँ।

कालिदास का रस संवेद हूँ।।


भरत के नाट्य शास्त्र का संवाद हूँ।

शंकर मंडन मिश्र का विवाद हूँ।।

पाणिनि का व्याकरण हूँ।

आर्यभट्ट का खगोल जागरण  हूँ।।


शिवलिंग अनंत हूँ।

माँ दुर्गा दिगंत हूँ।।

शंकर के त्रिशूल का दुर्धर प्रहार हूँ।

दुष्ट दानव राक्षसों का संहार हूँ।।


उत्तर में हिम का अखंड विस्तार हूँ।

दक्षिण में जलधि का संचार हूँ।


अर्जुन का निष्काम कर्म हूँ।

चाणक्य का राष्ट्र धर्म हूँ।।

शास्त्र की पुकार हूँ।

शस्त्र की झंकार हूँ।

ज्ञान का आलोक हूँ।

विज्ञान का विलोक हूँ।


गंगा का पावन प्रवाह हूँ।

अनेक कल्पों का गवाह हूँ।।

लोक कल्याण की भावना से ओत प्रोत हूँ।

वसुधैव कुटुम्बकम् का प्राचीन स्रोत हूँ।।


माँ भारती के मन का मीत हूँ।

सत्यमेव जयते का गीत हूँ।।

( डॉ भूषण कुमार उपाध्याय, भा पो से, से. नि.)

Friday 22 December 2023

सक्तीची ''पाळी''



आमच्या लहानपणी आईच्या काळात, म्हणजे साधारणतः २५-३० वर्षांआधी मासिक पाळी आलेल्या महिलेला तू मंदिरात यायचे नाही किंवा कोणत्याच शुभकार्यात उपस्थित राहायचे नाही असे सांगितले जायचे, अश्या कार्यातून ''सक्तीची रजा'' तिला मिळालेली असायची. तोवर तिचा घरात वावर, किंवा घरकामात सूट वगैरे कुटुंबीयांनी मान्य केलेली होती. त्याही पूर्वी म्हणजे आजीच्या वगैरे काळात तर तिला कुठेच जाण्याची परवानगी नव्हती. अगदी परसात, पडवीत, अंगणात, तिनेच सावरलेल्या तिच्या हक्काच्या स्वयंपाक घरात देखील नाही. तिच्या हाताने केलेला स्वयंपाक देखील ग्रहण करायचे नाकारले जायचे. तिला एखाद्या कोपऱ्यात गुपचूप बसून राहावे लागायचे. ही ''सक्तीची विश्रांती'' होती.

महाराष्ट्राच्या मराठवाड्यात उसतोडणीला जाणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या दिवसात काम करू दिले जात नाही म्हणून तेथील कामगार महिलांनी गर्भाशयच काढून टाकण्याचा 'सक्तीचा' मार्ग निवडला आता त्याला अनेक वर्ष होतायेत. अशा महिलांचा वाढता आकडा आता चिंताजनक झाला आहे, त्याचे प्रतिकूल परिणाम आता दृश्य स्वरूपात दिसू लागले.. पण अजूनही त्यावर ठोस तोडगा काही निघालेला नाही. हे प्रकरण भयंकर आहे. पाळी आलेल्या बाईला काम द्यायचे नाही हे कोण ठरवतं, तर मुकादम. पाळी येणारच नसलेल्या महिलेला नवऱ्यासह कामावर ठेवायचे हे कोण ठरवतं - मुकादम. आणि काम हवे असेल तर गर्भाशय काढून टाका हा सल्ला सुद्धा देतो मुकादम, ऐकतो नवरा आणि भोगते स्त्री... सक्तीची रजा, सक्तीचे काम, सक्तीचा सल्ला, सक्तीचा भोग.

जपानी सरकारच्या अनेक कंपनीबरोबर, वर्षभर केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले की त्या वर्षभरात केवळ 0.9% महिला कर्मचार्‍यांनी मासिक पाळीमुळे होणाऱ्या त्रासामुळे रजेसाठी अर्ज केला होता. इतर महिला स्वखुशीने कामावर हजर होत्या. त्या वर्षी सरसकट १००% महिलांना मासिक पाळीत सक्तीची रजा घ्यावयास सांगितले असते तर ०.९% महिलांशिवाय इतर महिलांवर तो सक्तीचा न्याय ठरला असता काय कि अन्याय ठरला असता ? किंवा त्यांना त्यांच्या कार्यापासून, कर्तव्य निभावण्यापासून वंचित ठेवले गेले असा त्याचा अर्थ काढता आला असता का ?

हे सगळे प्रश्न उपस्थित होण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे, नुकतंच राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेत महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या त्रासाचा विचार करून पगारी रजा देण्याबाबत सरकार काय प्रयत्न करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी महिलांना मासिक पाळीत पगारी रजा देण्याच्या मागणीला विरोध केला. तसेच मासिक पाळी येणं हे काही अपंगत्व नाही, असं वक्तव्य केलं. यानंतर मासिक पाळीच्या काळात त्रास होणाऱ्या महिलांना पगारी रजा मिळण्याच्या विषयावर घमासान सुरू आहे. असं असलं तरी महिलांना मासिक पाळीच्या काळात पगारी रजा मिळावी ही मागणी पहिल्यांदाच झालेली नाही. याआधीही ही मागणी झाली. जगाच्या वेगवेगळ्या देशात यावर उहापोह देखील झाला, त्यावर मतभेद झाले. पण तोडगा मात्र आजतागायत कुठेही निघालेला नाही.


जागतिक इतिहास :
औपचारिक मासिक पाळीच्या रजेची कल्पना सुमारे एक शतकापूर्वी सोव्हिएत रशियामध्ये उद्भवली, जेव्हा मासिक पाळी असलेल्या स्त्रियांना 1920 आणि 30 च्या दशकात त्यांच्या पुनरुत्पादक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पगाराच्या श्रमातून मुक्त करून सक्तीच्या रजेवर पाठवायला सुरुवात झाली. त्यानंतर 1920 च्या दशकाच्या उत्तरार्धात जपानमधील कामगार संघटनांमध्ये या कल्पनेने जोर धरला आणि अखेरीस 1947 मध्ये जपान देशाच्या कायद्यात हा अंतर्भूत झाला. जपानमधील या निर्णयामागील विचार काही प्रमाणात महिलांच्या प्रजननक्षमतेच्या सिद्धांतांवर आधारित आहे, युनियनने चेतावणी दिली आहे की दीर्घ तास आणि खराब स्वच्छताविषयक परिस्थिती त्यांच्या मुलांना जन्म देण्याच्या क्षमतेस हानी पोहोचवू शकते, म्हणून या काळात त्यांना सक्तीची विश्रांती देण्यात यावी. म्हणजे ह्यातही महिलांच्या आरोग्याविषयी, तिला होणाऱ्या त्रासासाठी किंवा तिच्या स्वतःच्या मर्जीसाठी नव्हे तर, ही सक्तीची रजा तिने पुढल्या पिढीला जन्म घालताना काही कसूर सुटू नये या स्वार्थी विचाराभोवती फिरणारा आहे.

काही देशात अशा योजना करण्यात आल्या की, मासिक पाळीच्या दिवसात महिलांना सुट्टी घेता येईल मात्र त्यांच्या कामाचे तास नंतरच्या काळात त्यांनी ज्यादा काम करून भरून काढायचे आहेत. तिथे मात्र एक वेगळी अडचण निर्माण झाली.. तेथील पुरुषांना आपल्यालाही महिन्याला चार सुट्ट्या जास्त मिळाव्या असे वाटू लागले आणि दुसऱ्या बाजूला मासिक पाळी जास्त वेदनादायी आहे की, पुढे ते काम पूर्ण करण्यासाठी द्यावे लागणारे जास्तीचे तास त्रासदायक आहेत हा भेद करणं महिलांना कठीण झालं. अखेर या सगळ्याला महिलाच बळी पडताहेत या विचारला अधिक बळकटी येऊ लागली.

2016 साली चार इटालियन खासदारांनी दरमहा तीन दिवसांपर्यंत सशुल्क मासिक पाळीच्या रजेचा प्रस्ताव संसदेत मांडला होता, जो पुढे अयशस्वी झाला. तो अयशस्वी होण्यामागे महिलांचाच सहभाग जास्त होता कारण त्यांना काळजी वाटत होती की आधीच नोकऱ्यांवर पुरुषी वर्चस्व असतांना आणि नोकरी पेशात महिलांचे प्रमाण अत्यंत कमी असताना, नियुक्ती होण्याआधीच महिला कर्मचाऱ्यांना नाकारण्याचे प्रमाण या एका कारणाने वाढीस लागेल. ट्रेंटो विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापिका डॅनिएला पियाझालुंगा तेव्हा म्हणाल्या, “माझ्यासह—बहुतेक लोकांना असे वाटले की यामुळे स्त्रियांना अधिक भेदभाव आणि अन्यायाचा सामना करावा लागेल.”

आणखी एक २०१४ साली केलेला सरकारी सर्वे असेही सांगतो कि ०.८ % महिलांना सोडले तर इतर महिला पाळीच्या काळातील त्रासाबद्दल सुट्टी घेऊ शकल्या नाही कारण त्यांना त्यांच्या वरिष्ठांना ते पटवून देणे फार कठीण वाटले किंवा वरिष्ठांमध्ये या बाबतची जागृतता आणि समजूतदारपणाची उणीव भासली.

मासिक पाळीच्या रजेचा जगभरातील नियोक्त्यांद्वारे स्वीकार केला जात असताना, यूएसमध्ये या कल्पनेला फारसा फायदा झाला नाही. हेल्थ केअर फॉर वुमन इंटरनॅशनल या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या 600 अमेरिकन लोकांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की जवळजवळ निम्म्या प्रतिसादकर्त्यांना असे वाटते की मासिक पाळीच्या रजेचा परिणाम होईल. काहींनी चिंता व्यक्त केली की ज्यांना मासिक पाळी येतच नाही अशा लोकांसाठी हे धोरण अन्यायकारक असेल किंवा अशा सुट्ट्यांचा हिशेब कोण आणि कसा ठेवणार ? या रजेचा गैरवापर केला जाणार नाही ह्याची शाश्वती कशी दिली जाऊ शकते.

भारतात, फूड डिलिव्हरी स्टार्टअप Zomato ने २०२० या वर्षी कर्मचार्‍यांना वर्षातून 10 दिवसांपर्यंत सशुल्क मासिक पाळीच्या रजेची मुभा देण्यास सुरुवात केली आणि देशातील काही खाजगी कंपन्यांमध्ये सामील झाले ज्यांनी मासिक पाळीच्या संदर्भात भारताच्या दृढ निषिद्धांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की पॉलिसी ऑगस्ट 2020 मध्ये लाँच झाल्यापासून, 2,000 दिवसांपेक्षा जास्त सुट्टी घेतलेल्या 621 महिला कर्मचाऱ्यांनी त्याचा वापर केला आहे. तरी अजूनही भारतासारख्या देशात महिला कर्मचार्‍यांना असे वाटते की त्यांची अनुपस्थिती मासिक पाळीशी संबंधित आहे ही अत्यंत खाजगी गोष्ट सार्वजनिकपणे उघड करावी लागणे हे देखील अन्यायकारक ठरू शकेल. दुसरे, महिलांना सुट्टी हवीय का ? की त्यांना कामात व्यस्त राहणे आवडते. हा जिचा तिचा निर्णय असू शकतो. जसे आरोग्याची समस्या असतानाही कामावर यावेच लागेल हे अन्यायकारक आहे तसेच फक्त पाळी आहे म्हणून कामावर येऊच नये हे देखील तिच्यालेखी अत्यंत बळजबरीचे आणि अन्यायकारक असू शकेल.


असे कायदे लागू करण्याआधी खरी गरज आहे ती काही पूर्वतयारी करण्याची, महिला करीत असलेल्या कामाच्या ठिकाणी मासिक पाळी साक्षरता आणि त्याला पूरक अशी संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे. कोणतीही धोरणे केवळ तेव्हाच प्रभावी होऊ शकतात जेव्हा कामाच्या ठिकाणी मासिक पाळी येत असलेल्यांसाठी विचारांचा समंजस मोठेपणा आणि त्यासाठी समर्थनाची स्पष्ट संस्कृती असेल. यामध्ये कामाच्या ठिकाणी असलेल्या बाथरूममध्ये मासिक पाळीच्या उत्पादनांचा पुरवठा करणे, स्वच्छता व आरोग्याविषयी आवश्यक संसाधनांची पूर्तता करणे आणि त्या त्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेल्या संघांना मासिक पाळी सारख्या विषयांवर कशी प्रतिक्रिया द्यायची आणि कसे समर्थन व सहयोग द्यावा याची समज आहे याची खात्री करणे अश्या गोष्टी समाविष्ट करता येतील.


खरतर महिलांना कोंडीत पकडण्याचे अनेक मार्ग आहेत. तिला दुय्यम स्थान देण्याच्या असंख्य प्रथा आहेत. त्यातली एक परंपरा आहे पाळी आलेल्या महिलेला बाजूला बसवणे, वेगळे समजणे, दूर लोटणे.. त्याला नाव काहीही दिले तरी. असे होऊ नये की प्रगतीची कास धरताना आपला प्रवास उलट्या दिशेने होऊ लागेल. मला अनेकदा हा प्रश्न पडतो, महिलांबाबतचे अनेक नियम पुरुषांना का ठरवावे वाटतात किंवा ते ठरवताना किती स्त्रियांचा सहभाग, मत, निर्णय घेतले, मान्य केले जातात ? तिच्या बाबतीत तिला काय हवंय, काय करायचंय हे तिचे तिने ठरवायला, निर्णय घ्यायला आणि त्यावर अंमल करायला ती समर्थ आहे आणि सक्षमही. गरज आहे ती तिच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याची आणि त्यासाठी पूर्ण ताकदीनिशी तिच्या पाठीशी उभे राहून तिला स्वातंत्र्य देण्याची.

भारतात हा कायदा निघालाच तर यातल्या किती मुद्द्यांवर विचार केला जाईल हे बघण्यासारखे असणार आहे..
तूर्तास सुट्टी द्यायची की द्यायची नाही या वर्चस्ववादी वादापेक्षा ''पाळीत तिला सुट्टी घ्यायची असेल तर अडवणूक नको आणि नको असेल तर बळजबरी नको असा कायदा निघत नाही तोवर वाट बघूया...


रश्मी पदवाड मदनकर
7720001132


(आजच्या तरुण भारत आकांक्षा पुरवणीत प्रकाशित कव्हर स्टोरी)



Tuesday 19 December 2023

इन्स्युलिनच्या जन्माची कथा -





१९२२ च्या पूर्वी मधुमेहाने मरणाऱ्यांची संख्या टोकाला गेली होती. लहान मुलांना देखील मधुमेहाने ग्रासले होते. पहिल्यांदा इन्सुलिनचा शोध लागला तेव्हा अश्याच मरणासन्न मुलांवर हा प्रयोग करायचे ठरले. 1922 मध्ये, शास्त्रज्ञांचा एक गट टोरंटो जनरल हॉस्पिटलमध्ये गेला जिथे मधुमेही मुलांना एका वेळी 50 किंवा त्याहून अधिक वॉर्डांमध्ये ठेवले जात होते. त्यापैकी बहुतेक कोमॅटोज (बेशुद्धावस्थेत) होते आणि डायबेटिक केटोआसिडोसिसमुळे मरणाच्या सीमारेषेवर पोचले होते.


मधुमेहामुळे शरीरातील इतर अवयवांचे निकामी होणे सुरु झाले की मृत्यूच ह्यांना सोडवेल अशी धारणा असे, त्यामुळे मृत्यूची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मधुमेहाच्या पहिल्या स्तराच्या रुग्णावर प्रयोग करण्यापेक्षा मरणासन्न मुलांवर उपचार करणे योग्य होते, कारण तशीही त्यांच्या परतण्याची आशा कमी होती त्यामुळे प्रयोग फसला तरी त्याने जास्त नुकसान होणार नव्हते. पण प्रयोग यशस्वी झाला तर ह्या लहान मुलांचे आयुष्य सत्कर्मी लागणार होते. त्यांनाही जीवनदान मिळणार होते. शास्त्रज्ञांनी झपाट्याने हालचाली सुरु केल्या आणि इन्सुलिनच्या नवीन शुद्ध अर्कासह मुलांना इंजेक्शन देण्यास पुढे सरसावले.

त्यांनी एकेक मुलाला शुद्ध अर्काच्या इन्सुलिनचे इंजेक्शन द्यायला सुरुवात केली. ते जसजसे एकेक मुलाला इंजेक्शन देत पुढे जाऊ लागले तसतसे आधी इंजेक्शन दिलेली मुले शुद्धीवर येऊ लागली. मग एक एक करून सर्व मुले त्यांच्या डायबेटिक कोमातून जागी झाली. मृत्यू, दुःख, भीती आणि अंधकाराने भरलेली खोली अचानक आनंद आणि आशेने भरून गेली.
 
1920 च्या दशकाच्या सुरुवातीस, फ्रेडरिक बॅंटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी टोरंटो विद्यापीठात जॉन मॅक्लिओडच्या अंतर्गत इन्सुलिनचा शोध लावला. जेम्स कॉलीप यांच्या मदतीने इन्सुलिनचे शुद्धीकरण करण्यात आले, ज्यामुळे ते मधुमेहावर यशस्वीरित्या उपचार करण्यासाठी उपलब्ध झाले. १९२२ मध्ये त्याच्या यशस्वी प्रयोगानंतर जगभर मधुमेहावर उपचार करणे शक्य झाले. बॅंटिंग आणि मॅक्लिओड या दोघांनाही 1923 मध्ये त्यांच्या कार्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले.

बॅंटिंग यांना नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हा ते फक्त 32 वर्षांचे होते आणि त्यांनी बक्षिसाची अर्धी रक्कम बेस्टसोबत शेअर करायचे ठरवले, जो त्यांचा सहाय्यक होता आणि त्यावेळी तो फक्त 24 वर्षांचा होता. बॅंटिंगने पेटंटवर आपले नाव देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी ते टोरंटो विद्यापीठाला $1 मध्ये विकले. लाखो जीव वाचवणाऱ्या शोधातून फायदा मिळवणे अनैतिक आहे असे त्याला वाटत होते..
 
"इन्सुलिन हे माणसांना जगवण्यासाठी आहे, त्यामुळे ते माझे नाहीच, ते जगाचे आहे" तो म्हणाला होता.
इन्सुलिनवर पेटंट नसल्यानेच जगभर त्याचा उपयोग करून रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले. अशा माणसांना सलामच करायला हवा.
 
इन्स्युलिनच्या प्रयोगाला आणि मानवी सेवेत उतरले त्याला आता १०० वर्ष झालीत . ही कथा इंग्रजीतून वाचनात आली, वाटलं सर्वांशी शेअर करावी. म्हणून हा भावानुवाद प्रपंच.

मनाचा थांग लागेना

 मनाची ढवळली खोली मनाचा थांग लागेना  

मना समजावले थोडे मनाला भाव पोचेना 


उन्हाला आर्जवा कोणी उन्हा रे हो जरा सौम्य  

फुलांना बाधते ऊन्ह, फुलाला आग सोसेना 


प्रिया मी बावरा होतो तुझे का नाव आल्यावर 

प्रियाशी जोडले नाते प्रियाची साथ सोडेना 


नभावर रंगली नक्षी रवीचा कुंचला होता  

अचानक ढग भरू आले नभाला मेघ शोभेना


सख्याने भार्गवी गावी सख्याला सूर गवसावा 

सुरांना ताल जोडावा, लयी बेताल चालेना

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...