Saturday 1 August 2020

तू गेल्यावर इथे सांडले गंध तुझ्या श्वासाचे
तू गेल्यावर घट्ट जाहले बंध तुझ्या ध्यासाचे

कातरवेळी तू स्वप्नांना हळुच जागर देतो
अलगद येतो ओढून ऊब घट्ट मिठीची देतो

तुझ्या भोवती फेर घालती माझ्या गंधित वेळा
तू असण्याने शितल झाल्या तप्त उन्हाच्या ज्वाळा

तव स्पर्शाची ओढ अनामिक व्याकुळ करते छळते
मखमल शेजेवर दरवळते धुंद अशी तळमळते

सहवासाच्या सुरम्यवेळी सांज सुखाची फुलते
विरहामधली ओढ घेऊनी रात्र उशाशी झुरते

तू गेल्यावर मन बावरते पापण ओले करते
आठवणींची वेडी सर मग, श्रावण होत बरसते


रश्मी पदवाड मदनकर
३०जुलै २०

'शिप ऑफ थिसीस - विरोधाभासाचा कॅलिडोस्कोप !

Ship of Theseus [2012] : A Collective Voyage - High On Films

'शिप ऑफ थिसीस' बऱ्याच दिवसांपासून पाहायचा होता.. थोडा थोडा तुटक पाहीला होता कधीतरी, पण सलग पाहायची इच्छा मात्र राहूनच जायची ती मागल्या आठवड्यात हट्टाने पूर्ण करून घेतली. ३ वेगवेगळ्या कथांचा बंच असलेला हा अत्यंत सूक्ष्म अश्या एका थेअरीवर बेतलेला सिनेमा आहे. 'शिप ऑफ थिसीस' ह्याच नावाची एक थेअरी आहे. ह्याचा गाभा असा आहे की, एखाद्या जुन्या तुटक्या पडक्या पण कामात असणाऱ्या नावेचे जुने भाग एक एक करत बदलत गेलो आणि एकदिवस एकूण एक भाग बदलले गेलेले असतील तेव्हा ती नाव पूर्वीचीच नाव उरेल का की ती पूर्णतः नव्या रंगाढंगांची जुनी वैशिष्ट्ये संपुष्टात येऊन नव्या विशेषांसह नवीच नाव बनलेली असेल ?? जुनी असेल तर कुठून जुनी असेल .. आणि नवी झालीय तर तो कोणता बिंदू कोणता भाग असेल ज्यामुळे त्याला नवी ओळख प्राप्त होईल? .... हा विरीधाभासी प्रश्न (पैराडॉक्सिकल) आणि हीच थीम ही थेअरी ३ माणसांच्या जीवन कहाणीद्वारा 'शिप ऑफ थिसीस' या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

विषय जरा कठीणच आहे.. बुद्धीवर जोर देऊन पहावा आणि समजून घ्यावा लागतो मात्र समजला तर आत्यंतिक समाधान देणारा .. हे असे चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच. भारतातल्या रसिकांची आवड आणि क्लास समजून घेऊन हा चित्रपट भारतात रिलीजच करायचा नाही असा निर्णय सिनेमाच्या निर्मिती टीमने घेतला होता... मग एकदिवस टोरांटो फेस्टिवलमध्ये या सिनेमाचा प्रीमिअर होतो.. तो प्रचंड गाजतो. त्यावर वेड्यासारख्या चर्चा घडायला लागतात. याच फेस्टिवलमध्ये अमीर खान आणि किरण खान उपस्थित असतात, ते भारावून जातात आणि अश्या हटके क्लासी सिनेमाचा रसिक मोठ्या प्रमाणात नसला तरी मूठभर रसिकांनी तरी त्याला का मुकावे म्हणून स्वखर्चावर तो भारतात घेऊन येतात आणि मोजक्याच फिल्म थिएटरला रिलीज करतात. तो मूठभर लोकांचा क्लास ती सिनेमा पाहतात आणि एक चांगली कलाकृती पदरी पडल्याचे समाधान मानून घेतात... माझ्यासारखे रसिक एका छोट्या शहरात राहत असल्याने त्यातही थिएटरमध्ये बिग बजेट फिल्म आणि अश्या क्लासी फिल्मच्या लॉबी संघर्षात फसतात आणि अनेक महिने वाट पाहूनही शेवटी मुकलेच जातात.... नंतर जवळजवळ ६-७ वर्षांनी तो ऑनलाईन धुंडाळून पाहता येतो त्यात समाधान मानतो.... तर असो. या सगळ्यात कौतुक करावे ते या सिनेमाचा निर्देशक आनंद गांधी आणि खान दाम्पत्याचं.


जवळजवळ माझ्याच वयाचा असणारा एखादा अत्यंत प्रतिभाशाली सिने निर्देशक जगावेगळ्या कलाकृती निर्मितीसाठी धडपडतो आणि तसे करूनही दाखवतो तेव्हा त्याचे कौतुक वाटणे साहजिक आहे. आपल्यासारखेच अनेक तर्काधिष्ठित विचार डोक्यात घेऊन फिरणारे बरेच आहेत पण कुठलीही तडजोड न करता कलेच्या माध्यमातूनच का होईना पण ती वाटते तशी, दिसते-जाणवते तशी कोरून बनवून जमिनीवर उतरवून प्रेक्षक रसिकांसमोर मांडणे आणि नंतर त्याच्यावर मिळणाऱ्या बऱ्या-वाईट प्रतिक्रिया, समीक्षा झेलत राहणे ..फार न मिळालेल्या रिस्पोन्सनेही खचून हलून न जाता ठरवलेल्या मार्गाने ठामपणे चालत राहणे आनंद सारख्या कलावंताची खासियत असते. ‘मला जर जादूगार, तत्त्ववेत्ता, लेखक, अभिनेता असं सगळं एकत्रितरीत्या बनायचं असेल तर माझ्यासाठी सिनेमा हे एकमेव माध्यम आहे' असे तो म्हणतो. ‘माझ्या माझ्याकडूनच असलेल्या अपेक्षा मी कला आणि चित्रपटातूनच वाढवतो. मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीतून मला जगण्याबद्दल नवं काहीतरी गवसलं पाहिजे. अशाच गोष्टींमध्ये मी रमतो,’ असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा कोण जाणे का आपल्यासारखाच भासतो.


माणूस बदलत जातो .. आयुष्याच्या अनुभवाने, बऱ्या-वाईट माणसांच्या संगतीने. तो जसा आहे तसाच्या तसा कधीच उरत नाही. आयुष्यात येणारा वाईट काळ म्हणजे आयुष्याचा वसंत जशी पानगळ होते बहर ओसरतो तसा एक दिवस हिरव्याकंच पालवीने नव्या मोहोराने जगणे फुलून बहरुनही येते .. तर असे ऋतू येत जात राहतात आणि माणूस हळूहळू नखशिखांत बदलत जातो. असे म्हणतात मानवाच्या शरीरातल्या एकूण एक कोशिका ७ वर्षांमध्ये पूर्णपणे बदलतात.. मग या बदलानंतरचा माणूस तोच पूर्वीचा असतो की बदललेला असतो ? हे जाणून घेण्याची जिज्ञासा या चित्रपटाच्या निर्मितीच्या मुळाशी आहे.
तर 'बदल' ही मनुष्याच्या हयातीपर्यंत कायम असणारी एकमेव बाब आहे. बदल घडणार हे ठामपणे सांगता येत असले तरी बदल घडण्यामागची कारणे आणि ते कसे घडतील हे कुणालाही सांगता येत नाही. 'शिप ऑफ थिसीस' चित्रपटाच्या तिन्ही कथेचा गाभाही हाच आहे.


पहिली कथा आलिया (आयदा-अल-काशेफ) हिची आहे. नेत्रहीन आलिया तिच्या सेन्सेसचा वापर करून उत्कृष्ट फोटोग्राफी करत असते. दिसत नसूनही तिच्या अत्यंत वेगळ्या धाटणीची कलात्मक फोटोग्राफी तिला सहज साधता येते..पण एक दिवस ऑपरेशन करून दिसू लागल्याने अत्यानंदाने घरी परत आलेल्या आलियाला लक्षात येते कि दृष्टी मिळवली असली तरीही तिने तिचे ते सगळे विशेष सेन्सेस मात्र गमावले आहे आणि खूप प्रयत्नानंतरही आता तिला फोटोग्राफी जमत नाहीये.


दूसरी कथा मैत्रेय(नीरज कबि) नावाच्या एक श्वेतांबर साधु/भिक्षुची आहे. ते जीव-जंतूंच्या अधिकारासाठी विज्ञानाच्या परीक्षणाच्या नावावर त्यांच्यावर
होणाऱ्या अत्याचारासाठी कोर्टपर्यंत लढा देत असतात. त्यांना पोटाचा गंभीर आजार झालाय परंतु ते औषध घ्यायला तयार नाही कारण प्रत्येक औषधीमागे जीव-जंतूंवर अत्याचार झाल्याची खंत मनात आहे. पोटाचा आजार लिव्हर सिरॉयसिस पर्यंत पोचतो आणि तो कॅन्सर पर्यंत पोचण्याचे चान्सेस वाढतात. तरीही तत्वांवर कायम राहून ते जीव त्यागण्याचा निर्णय घेतात आणि आमरण उपोषण सुरु करतात.... वेदनेच्या अत्युच्च बिंदूवर एकदिवस धैर्य खचत आणि ते ऑपरेशन करायला तयार होतात. त्यांचे लिव्हर बदलले जातात. जीवजंतूंच्या हत्येने तयार होणाऱ्या उपचारांचा उपयोग केलेला भिक्षु आता भिक्षु उरला नसतो आणि जीव-जंतूंच्या अन्यायावर लढण्याचा अधिकारही गमावून बसला असतो.


तीसरी कथा नवीन (सोहुम शाह) नावाच्या एका स्टॉकब्रोकरची आहे. कथेची सुरुवातच हॉस्पिटलमध्ये नवीनच्या किडनी प्रत्यारोपण नंतर होते. एका फ्रिडम फायटर, सामाजिक सेवेची आवड असणाऱ्या आजीचा हा नातू. आजीला मुळात ही खंत आहे कि एवढ्या समाजसेवी घराण्यात जन्मूनही नवीन निव्वळ पैशांच्या मागे धावत राहणारा अत्यंत शुल्लक आयुष्य जगणारा माणूस आहे. किडनी ट्रान्सप्लान्टस आणि आणखी एका कारणासाठी पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलेला नवीन एका घटनेला साक्षी ठरतो ... ज्या दिवशी नवीनला किडनी बसवण्यात आली असते त्याच दिवशी एका गरीब मजदुरांची किडनी त्याच हॉस्पिटलला चोरी गेली असते... त्या गरिबाला त्याबदल्यात पैसे नको असतो तर किडनीच परत हवी असते.. आणि सुरु होतो प्रवास त्याच्या किडनी शोधाचा. त्याची किडनी लावण्यात आलेल्या त्या माणसाला शोधायला नवीन स्टॉकहोम, स्वीडनपर्यंत जाऊन पोचतो. या कथेत दोन बदल घडतात .. पैशांमागे धावणाऱ्या सोहम्ला आता मनुष्याचा जीवनाची किंमत कळली असते तो बदलला असतो आणि तो गरीब मजदूर जो पैसे नको किडनीच हवी असे म्हणतो तो विदेशी माणसाने दिलेल्या मोठ्या रकमेला पाहून लालसा निर्माण होऊन पैशांसाठी राजी झालेला असतो. हे दोन्ही कायाकल्प एक विरोधाभासी संभ्रमच तर असतो.


अखेर इतकेच की बॉलिवूडच्या प्रस्थापित स्टीरियोटाइप छबी मोडणारा 'शिप ऑफ थिसीस' सिनेमा अपवादात्मक सिनेमा ठरतो. विचारांच्या खोल तळाशी असणारा एखादा बिंदुएवढाही विचार समाजातील माणसांच्या जगण्याशीच अखेर संबंधित असतो. या जगण्याचाच एक भाग कलेच्या रूपात त्यांच्यासमोर ठेवून त्यांनाच अचंभित करण्याची आनंद गांधी यांची शैली वाखाण्याजोगीच म्हणावी लागेल.


©रश्मी पदवाड मदनकर



No photo description available.



Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...