Posts

Showing posts from November, 2017

बाप

#बाप गेला कि मुलांना बाप खूप खूप आठवू लागतो .. तो खरा बापमाणूस असेल तर आठवतोच ... पण आयुष्यभर स्वतःच्याच विश्वात जगलेला बाप असला कि जास्तच आठवतो. बापानं आयुष्यभर न देऊ केलेलं प्रेम बालपणात बापानं घ्यावयाची.. न घेतलेली काळजी गरजेच्या वेळी भासलेली बापाची उणीव संकटात न मिळालेला बापाचा सहारा  ... एकटेपणात न मिळालेली आधाराची साथ आणि बाप म्हणून डोक्यावर कधीच न ठेवलेला हात बाप गेला कि हे अधिकच गडद होत जातं...खूप आठवतो न मिळालेला हक्काचा बाप प्रेम आधार सगळं बाहेर शोधता येतं..  ..बाहेर मिळत नाही तो ..'बाप' बापाला ऑप्शन नसतं... बाप असला तरी आणि गेला तरी बाप मिळत नाही दुसरा. अख्या जन्मात बापाचं प्रेम न मिळणं आयुष्यभऱ्याचं मोठं दुःख होऊन बसतं बाप गेल्यावर ते अधिकच सलत राहतं....जन्मभर बाप्पांनो आपल्या विश्वात हरवू नका ... मुलांचा बाप हिरावू नका मुलांना वेळ द्या, प्रेम द्या.... त्यांना त्यांच्या हक्काचा बाप द्या. #बाबांचीआठवण :(

कथांची व्यथा..

तू आखुन दिलेली लक्ष्मणरेषा लांघता येत नाही  आणि अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा मांडताही येत नाही मनात खूप दाटल्याहेत तुला सांगावयाच्या गोष्टी कोंबल्या गेल्या आहेत..काचताहेत न बोलताच गिळून टाकलेले किती हुंदके .. कित्तेक शब्द पचतही नाही आणि ओकवतही नाही. अडकले आहेत मनात-बुद्धीत, घश्यातही आत आत चर्वण करीत राहिले ... तरी त्यांना कंठ फुटत नाही अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा आता मांडताही येत नाही आपणच जन्म घातलेले त्या कथेतले काही पात्र त्या पात्रांना स्वप्नांचे क्षितिज दाखवून आपणच वाढीस लावले होते त्यांना पंख फुटाण्याआत तू भिरकावून लावलेस अन निघून गेलास ते भटकताहेत अनवाणी - तडफडताहेत तुझ्या येण्याच्या वाटेवर जीव अडकलाय त्यांचा त्यांना मुक्ती हवीय रे ... कसं सांगू त्यांचे हाल आताशा बघवत नाही अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा आता मांडताही येत नाही आता मलाही वाटू लागलंय तू यावंसंच एकदा ... फक्त एकदा ये अन स्पर्शाने पुनर्जीवित कर त्यां स्वप्नांना स्वप्नातील विरक्त पात्रांना अन तृप्ततेचा श्वास देऊन पुन्हा समाधानाने मरणाला मार्ग मोकळा करून दे ये अन मोक्ष मिळवून दे त्यांना ...

अंतर

मागे गेलेल्या काळाच्या कुठल्याश्या त्या क्षणी एकाच जागी उभे असूनही वाढत गेले अंतर तुझ्या माझ्यातले कुठल्याश्या एका नात्याने जुळले असूनही पायापासून जमिनीवर पसरत गेलेल्या लांबच लांब होत जाणाऱ्या सावल्यांसारखे लांब होत राहिलो आपण .. वेगवेगळे होत गेलो .. सोबतीने चालत असूनही सोबत नसणारे दोन वेगवेगळ्या समांतर मार्गाने पुढे चालत राहायचं आलेला दिवस ढकलायचा नाते जपतोय कि ओढतोय आपण .. कुठला क्षण होता तो दोघांच्या मध्ये लांब आडवी रेष ओढणारा रेषेइतकेही अंतर निर्माण व्हावे अशी परिस्थिती निर्माण व्हावी हे प्राक्तन का यावे तुला नाही वाटत का खंत कशाचीच ती रेष पुसायलाही किती लांबचा प्रवास करत मागे चालत जायला लागणार आहे हातातला सुटलेला हात धरायला परतीच्या रस्त्यावरही सोबत चालायला लागणार आहे दोघांचीही तयारी हवी पार केलेला प्रवास सोडून द्यायची प्रवास महत्वाचा कि साथ हे दोघांच्याही बाबतीत सारखेही असायला हवे साथ महत्वाची असेल तरच आलो त्या रस्त्याने पुन्हा सोसवत निघण्याची तयारी करता येईल हे सगळं करत आलोच त्या मध्याला तर ... ? सोडला होतास हातातून हात तो क्षण खोडून टाकता येईल का रे पुन्ह...

उदात्तीकरण भाग - २ - सोशल मीडिया आणि असहिष्णुता

Image
का ही दिवसांआधी सोशल नेटवर्किंग वरून फिरणारी एक व्हिडीओक्लिप घरोघरी दारोदारी चर्चेचा विषय ठरली होती. ''अभ्यास घेतांना शुल्लक प्रश्नासाठी मारणारी आई'' ( ती आईच होती का? असा प्रश्न विचारू नये ते गृहीतच  धरायचं आहे ).....तर, फार फार बिचाऱ्या मुलाला ( मूल बिचारं होतं का? :O  अहो काय विचारताय .. हा काय प्रश्न झाला होय ? मूल बिचारच असतं...सरळमार्गी, आईचं सगळं सगळं ऐकणारं, अजिबात बदमाशी न करणारं, खोड्या-बिड्या नावालाही न करणारं अन अजिबात जराही शिक्षा करण्यास पात्र नसलेलं असंच मूल ते होतं असंच गृहीत धरायचंच आहे) मारणारी  हि आई फार फार 'क्रूर' होती ( दोन चापट्यात हे कसं कळालं हे विचारूच नये .. ते पण गृहीत धरायचंच आहे)   तर अश्या बिचाऱ्या मुलाच्या क्रूर आईची कहाणी शिव्यांच्या वाखोलीत गावभर-शहरभर-जगभर पसरली. .. त्या आईचा थाटात शालजोडतला उदो उदो झाला सगळीकडे...त्या एकट्या बिचाऱ्या लेकरासाठी कित्तिजन कळवळले वगैरे ... आणि मला काय काय आठवलं म्हणून सांगू ( हो हो मी पण पाषाणहृदयीच आहे ... हळहळ व्यक्त नाही केली म्हणून ना .. बरं... मानलं ) तर प्रथम कोण आठवली सांगू ... . श्य...
कुणीतरी लिहीत असतं.. मन रितं करायला, मोकळं व्हायला..कल्पकता म्हणून . आवड म्हणून..कलाकृती साकारायला वगैरे वगैरे असा तो/ती लिहीत असते स्पष्ट किंवा पुसटसं.. पारदर्शक किंवा गूढ असं.. उत्सुकता शमवणारं किंवा प्रचंड वाढवणारं.. लिहिणारा लिहीत जातो आतलं आतलं खंदून काढत जातो वाचकाच्या मनात ते भरत राहतं .. आत आत खोलात शिरत राहतं हा लिहून मोकळा.. तो वाचून गंभीर, स्तब्ध, भावुक वगैरे म्हणजे काय, पैसे खर्च करून एखाद्या चांगल्या लेखकाचे पुस्तक घ्यायचे आणि आपण आपले बसायचे खिसा मोकळा आणि कंठ भरून घेऊन .. भावुक बिऊक होऊन हे चांगले लेखक बिखक ना वाइट असतात फार ...

पत्र - ५ आतल्यामास्तरीणबाई - नात्यांचा गुंता

परवा सुवर्णा भेटली मार्केटमध्ये, सुवर्णा हो .. ती नाही का फेसबुकवर फेमस असलेली. चारेक हजारतरी मित्र असतील तिचे. तशी लिहितेही भन्नाटच...साऱ्या जगावर सूड उगवणारं.. फोटो कसले छान छान टाकते. दिवसाला कित्ती पोस्ट आणि कित्ती कित्ती फोटो. किती लोकं निव्वळ तिच्या वॉलवर पडलेली असतात...कित्येकांना तिच्याशी नाते जोडावे वाटते कित्येकांना मैत्री करावी. तिला भेटायची ओढ जशी सर्वांना तशी मलाही होतीच जरा .. तशी तिची माझी हि पहिलीच भेट...पण  भेटून जरा दचकायला झालं...बोलणंही उदासवाणं वाटलं तिचं.. एकटी होती ती फार एकटी ... ४००० मित्र असणारी गर्दीत वावरणारी व्यक्ती इतकी एकाकी .... विचार करून करून रात्रभर झोपच लागली नाही आणि पहाटे पहाटे मास्तरीण बाई आल्याचं मग भेटायला. सखे, माणसं सोबत दिसणं आणि माणसं आपली असणं यात फार फरक आहे राणी. गोतावळ्यात दिसणारी सगळी माणसं आपली असतातच असे नाही.....आणि या गोतावळ्यात न दिसणारी आपली नसतातच असेही नाही. आपल्या अवती भोवती दिसणारी माणसं मनाने किती जवळ असतात आपल्या याचा अंदाज त्यांच्या बाह्य रुपावरुन लावताच येत नाही....गर्दीतली माणसं हरवलेली असतात कुठेतरी, कशाच्यात...

हळूच स्फुरते कविता .. !

अश्रूंचा सागर आटला कि कंठात हुंदका दाटला कि सुखाचा सदरा फाटला कि हळूच स्फुरते कविता बिविता हळवं कातर मन ढवळून आतलं आतलं हलवून बिलऊन वेदनेचा बांध फुटला कि हळूच स्फुरते कविता बिविता मनाची घालमेल थांबली कि विरहाची दुःखे लांबली कि तगमग तगमग वाढली कि हळूच स्फुरते कविता बिविता जगणं बिगण फुलवून नितळ भावना खुलवून शब्द शब्द कुरवाळले कि हळूच स्फुरते कविता बिविता गर्द आभाळ निवून जावा पाऊस थोडा पिऊन घ्यावा मृदगंध पसरून वीरला कि हळूच स्फुरते कविता बिविता .. Rashmi M.