Saturday 21 May 2016

पाटीवरचा हक्क ..!



महिलांच्या कर्तव्याबद्दल बोलायचे झाले कि भरून बोलता येतं. पण तेच त्यांच्या अधिकारांचा प्रश्न उद्भवला कि तो प्रश्नच म्हणून शिल्लक राहतो. प्रश्न वारसाहक्काचा असुदेत किंवा वडिलांच्या संपत्तीची हिस्से वाटणी, तिच्या वाट्याला येते पुन्हा तेच ती 'स्त्री' असण्याचा शिक्का अगदी साऱ्यांच्या सही सकट. जन्म घातलेल्या मुलाला तिच्या नावाची कुठलीच ओळख नसते. वडलांच्या घरात तिचे काहीच शिल्लक उरत नाहीच पण मग जन्मभरासाठी ज्याच्याकडे ती आली असते त्याच्याकडेही तिची स्वतःची अशी विशेष ओळख नसते... हा सर्वत्र वादाचा मुद्दा असताना, विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातील तानिष्कांनी मात्र निव्वळ वाद घालत न बसता. जिल्ह्यापुरता का होईना परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना भरघोस यश देखील मिळाले. तानिष्कांनी स्त्री म्हणून स्त्रियांना स्त्रियांच्या अधिकारांची जाणीव करून दिली त्यासाठी जनजागृती केली. प्रत्यक्ष कार्य घडवून आणले आणि त्यांचे नवे स्थान नवा मान त्यांना मिळवून दिला.


विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली हे तालुक्याचे ठिकाण. नक्सलग्रस्त भागापासून थोड्याच अंतरावर वसलेले विकसनशील छोटेखानी शहरवजा गाव. दोन वर्षांपूर्वी २० महिला सकाळ मध्यम समूहाच्या ''तनिष्का'' व्यासपीठात सहभागी झाल्या आणि बघता बघता मुख्य अडचणींना वाचा फुटू लागली. विकासाच्या दिशेने वारे वाहत असताना ह्याच कामात तानिष्कांचा सिंहाचा वाटा ठरला. इंद्रायणी कापगते या गटनेत्या पुढे सरसावल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनात गटाद्वारे अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले. इंद्रायणीताई तश्या लढवैय्या, महिलांच्या अडचणींसाठी सतत कार्यशील राहणाऱ्या. महिलांच्या हक्कासाठी काम करायचे ठरले आणि गटाला सोबत घेऊन त्यांनी रणशिंग फुंकले.

जमिनीच्या कागदपत्रांवर महिलांचे नाव देखील असावे आणि त्यांच्या सहीशिवाय जमिनीचा व्यवहार होणार नाही हा मुख्य मुद्दा घेऊन गटाने काम सुरु केले. ग्रामपंचायतीच्या पावतीपासून ते घराच्या दारावर लावण्यात येणाऱ्या नावाच्या पाटीवरही घरातल्या स्त्रीचे नाव असावे त्या घराशी सलग्न अशी तिची ओळख असावी हा त्यामागचा मुख्य हेतू होता. ग्रामसेवकापासून ते कलेक्टर आणि पुढे पंतप्रधान कार्यालयापर्यंत धाव घेऊन तानिष्कांनी कार्य सिद्धीस नेले.


आज साकोली तालुक्यासह जिल्ह्यातील बव्हंशी गावातील प्रत्येक दारावर घरातील कर्त्या पुरुषांबरोबरच त्या घरातील स्त्रीचे नाव देखील चढले आहे. एवढेच नाही तर ग्रामपंचायतीच्या पावतीपासून ते जमीन क्रय-विक्रयाच्या कागदपत्रांवर तिच्या सहीशिवाय व्यवहार केले जात नाही. आता ७/१२ वर स्त्रीचे नावही आवश्यक पात्रतेपैकी एक आहे.

साकोलीतील तनिष्कांच्या या अभूतपूर्व यशाची परिणीती म्हणून '२०१५ तनिष्का महोत्सवात' मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कामाची प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी बघता आज साकोली तालुक्यात ४ गट जवळजवळ ४० तनिष्का एकजुटीने कार्यरत आहेत. आणि अनेक चांगल्या उपक्रमांच्या यशाच्या भागीदार होण्यास प्रयत्नरत आहेत. .........................................................................................

-: कोट :-

जमीन व्यवहार पत्रांवर महिलांचे नाव असावे हा संपत्तीचा मुद्दा नव्हता, व्यसनात अडकलेल्या घरच्या पुरुषांच्या हातून व्यसनासाठी जमिनीची नासधूस होऊ नये किंवा ती होतांना निदान तिला त्याची माहिती असावी अशी साधीच अपेक्षा यामागे आहे. आज महिलांना तो मानच मिळाला नाही तर त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव देखील त्या निमित्त्याने झाली.

इंद्रायणी कापगते
गटनेत्या, साकोली तनिष्का व्यासपीठ



(सकाळ दैनिकात प्रकाशित बातमी )

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...