पाटीवरचा हक्क ..!
महिलांच्या कर्तव्याबद्दल बोलायचे झाले कि भरून बोलता येतं. पण तेच त्यांच्या अधिकारांचा प्रश्न उद्भवला कि तो प्रश्नच म्हणून शिल्लक राहतो. प्रश्न वारसाहक्काचा असुदेत किंवा वडिलांच्या संपत्तीची हिस्से वाटणी, तिच्या वाट्याला येते पुन्हा तेच ती 'स्त्री' असण्याचा शिक्का अगदी साऱ्यांच्या सही सकट. जन्म घातलेल्या मुलाला तिच्या नावाची कुठलीच ओळख नसते. वडलांच्या घरात तिचे काहीच शिल्लक उरत नाहीच पण मग जन्मभरासाठी ज्याच्याकडे ती आली असते त्याच्याकडेही तिची स्वतःची अशी विशेष ओळख नसते... हा सर्वत्र वादाचा मुद्दा असताना, विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातील तानिष्कांनी मात्र निव्वळ वाद घालत न बसता. जिल्ह्यापुरता का होईना परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना भरघोस यश देखील मिळाले. तानिष्कांनी स्त्री म्हणून स्त्रियांना स्त्रियांच्या अधिकारांची जाणीव करून दिली त्यासाठी जनजागृती केली. प्रत्यक्ष कार्य घडवून आणले आणि त्यांचे नवे स्थान नवा मान त्यांना मिळवून दिला. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली हे तालुक्याचे ठिकाण. नक्सलग्रस्त भागापासून थोड्याच अंतरावर वसलेले...