खरं सांगू का अमृता तू म्हणजे देहभानापलीकडच्या जगात घेऊन जाणारी एक अवर्णनीय जादू..ती जादू आम्ही सगळ्यांनी कधीतरी अनुभवली आहे किंवा ऐकीव तरी आहे, किंवा पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळावी म्हणून लालसेने किंवा कधीच न अनुभवल्याने एकदा तरी अनुभवायला मिळावी या अपेक्षेने.. जगण्याच्या मूलभूत गरजांच्या पलीकडे, जिथं थांबतात, विसावतात आणि उसळतात आयुष्याचे काही क्षण अश्या आनंदाच्या अनुभूतीच्या ओढीने सतत तुझ्याकडे ओढले जात असतो. जगण्याचा खूप गुंता होत राहतो अधून मधून. आणि मग त्यापुढला बराच काळ गुंता सोडवण्यात निघून जातो. मनात हे असं काही काहूर माजतं कि, प्रापंचिक आन्हिकं, जबाबदाऱ्या निभावताना वेदना सहन करणाऱ्या भौतिक शरीराची कात भिरकावून द्यावीशी वाटते, कधीकधी तर बाईपण बोजड वाटायला लागतं..वाटतं परंपरेतून, संस्कृतीतून, प्रपंचातून, साचेबद्ध जगण्यातून या रोजरोजच्या धावधावपळीतून एवढंच काय या शरीरातूनही बाहेर पडावं; मोकळं व्हावं आणि दूर दूर जाऊन बघत राहावा आपणच घालून ठेवलेला घाट... जमलंच तर मोडून पाडावा, बंद करून घ्यावे परतीचे सगळे रस्ते.. हा आंतरिक मनाचा कल्लोळ शांतावताना का कुणास ठाऊक तू आठवत राह...