Monday 30 September 2019

नायरा टू ग्रेटा... व्हाया मलाला - कहाणी अश्रूंची

कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं

( संदेश सामंत ह्यांचा एक विचार करायला लावणारा लेख)

दिवस होता १० ऑक्टोबर १९९० चा. अमेरिकेच्या काँग्रेशनल ह्युमन राईट्स कॉकसमध्ये एक साक्ष होणार होती. आणि साक्ष देणारी व्यक्ती होती एक १५ वर्षांची तरुणी. नायरा असं तिचं नाव सांगण्यात आलं. आपण कुवेती आहोत आणि इराकच्या सद्दामच्या सैन्याने कुवेतमध्ये अत्याचारांचं काहूर माजवलंय, असा तिचा आरोप.

साक्ष सुरू झाल्यावर तिने काही विधानं केली. ज्याने जगाच्या काळजाचा ठोका चुकला. तिने केलेला एक गंभीर आरोप फार महत्त्वाचा होता. नायराच्या मते इराकी सैन्याने कुवेतमधील एका इस्पितळात घुसून इंक्युबेटरमधील काही नवजात बालकांची हत्या केली. हे सर्व सांगताना नायरा रडू लागली. आपलं दुःख आवरणं नायरला आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच कठीण झालं. सद्दामकडून होत असलेले अत्याचार किती भीषण आहेत, याची जाणीव सर्वांना होऊ लागली. "आपण याआधी इतकं भीषण आणि वाईट काहीच ऐकलं नव्हतं," हे तिथे उपस्थित काही व्यक्तींनी नमूद केलं.

अमेरिकेने नायराचा साक्षीचा व्हिडीओ जगभर पसरवला. जगभरात कुवेतच्या बाजूने एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली. सद्दामच्या विरोधात जनमत तयार झालं. अगदी मुस्लिम राष्ट्रांतही द्वेष वाढू लागला. याचाच फायदा घेऊन अमेरिकेने ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्मला सुरुवात केली. अमेरिकेच्या विमानांनी बगदादवर हल्ला चढवला. इराकचा या युद्धात सपशेल पराभव झाला. अमेरिका जिंकली होती. इतिहास लिहिण्याची संधी जेत्याला मिळते. व्हिएतनामच्या युद्धात तोंड होरपळून गेल्यानंतर अमेरिकेने केलेलं हे पहिलं थेट युद्ध.

पण, याचा क्लायमॅक्स सुरू होतो तो नंतर. ABC नावाच्या अमेरिकी वृत्तसंस्थेच्या काही पत्रकारांनी नायराने नमूद केलेल्या हॉस्पिटलला भेट दिली. तिथे डॉक्टरांसह लोकांच्या मुलाखती घेतल्या. "नवजात बालकांसह अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे, हे सत्य आहे. अनेक डॉक्टर्स आणि परिचरिकांनी देश सोडला आहे, हे त्याचे एक कारण आहे..... पण, इराकी फौजांनी नक्कीच कोणतेही इंक्युबेटर चोरून नवजात बालकांना जमिनीवर फेकून दिल्याने कोणत्याही बालकाचा मृत्यू झाला नाही" अशी बातमी पत्रकाराने प्रसिद्ध केली.

पुढे १९९२ मध्ये न्यू यॉर्क टाईम्समध्ये आलेल्या एका बातमीत एक धक्कादायक बाब प्रसिद्ध झाली. त्या बातमीनुसार नायरा ही कुवेतच्या अमेरिकेतील राजदूताची मुलगी होती. त्यांचं नाव होतं नासिर अल सबाह. तिने जी घटना घडल्याचं सांगितलं तेव्हा तर ती कुवेतमध्ये उपस्थितही नव्हती.

मग हे रामायण घडलं कसं?

तर त्यामागे होती एक PR कंपनी - हिल अँड नॉलटॉन. व्हिएतनामच्या युद्धात केलेल्या चुका अमेरिकेला पुन्हा करायच्या नव्हत्या. माध्यमांची आणि त्यांच्यात दिसणाऱ्या चित्रांची जादू अमेरिकन सरकार नक्कीच जाणून होते. म्हणूनच लक्षावधी डॉलर्स खर्च करून अमेरिकेने एक प्रपोगंडा उभा केला. यामागे अमेरिकेचं तेलाचं राजकरण आणि हितसंबंध होते. पहिलं आखाती युद्ध संपलं आणि यामागची खरी कथा बाहेर येऊ लागली. अमेरिकेने एखाद्या वस्तूप्रमाणे हे युद्ध जगाला विकलं होतं.

घटना दुसरी -

तारीख होती ९ ऑक्टोबर २०१२... पाकिस्तान. तालिबानी दहशतवाद्यांनी स्वात भागात एका शाळेच्या बसवर हल्ला केला. दोन मुली त्यात जखमी झाल्या. एकीच्या डोक्यात गोळ्या लागल्या. या मुलीने काही वर्षांपासून मुलींच्या शिक्षणासाठी एक आंदोलन उभं केलं होतं. या हल्ल्याची बातमी जगभर पसरली. तालिबानी कृष्णकृत्यांची जगाला घृणा वाटू लागली. पाकिस्तान सरकारवर दबाव वाढू लागला. या जखमी मुलीला विमानाने लंडनला नेण्यात आलं. तिचं नाव मलाला युसूफझाई. पुढे तिला तिच्या 'साहसासाठी' शांततेचा नोबेल पुरस्कार 'एका भारतीय व्यक्तीसोबत विभागून देण्यात आला.'

मलाला बरी झाली; पण, पुढे इंग्लंडच्या बरमिंगहॅममध्येच ती राहू लागली. पाकिस्तानात पुन्हा गेली नाही. महिलांचे प्रश्न, मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न किंवा मानावाधिकारांचे प्रश्न यावर संयुक्त राष्ट्रांसह जगभर व्याख्यानं देऊ लागली. हजारो डॉलर्सचं मानधन यासाठी घेऊ लागली. सर्वच प्रसिद्ध व्यक्तींप्रमाणे मलाला फाउंडेशनची स्थापना झाली आणि समाजकार्याचा आवाका वाढू लागला. पाकिस्तानातच्या बलुचिस्तानात होणाऱ्या अनन्वित मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना असताना काश्मीर प्रश्नावर मलाला जागतिक समुदायात बोलू लागली. पण, तिला मानणाऱ्या एकाही गटाला तिच्याच पश्तून समाजाच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाविषयी विचारण्याची मती झाली नाही, हे नवलच.

मलालावर हल्ला झाला तो काळ होता तेलांच्या वाढत्या दरांचा आणि अरब जगात घडणाऱ्या क्रांतीचा. पाश्चात्य देशांना अनेक अरब देशांत सत्ताबदल करायचे होते. म्हणूनच, एकामागोमाग एक 'क्रांती'चा वणवा या भागात पसरू लागला. तालिबान्यांशी वाटाघाटी होत नव्हत्या. तेव्हा त्यांच्याविरुद्ध अजून कठोर पावलं उचलायची तर जगमान्यता हवी होती. मलालाच्या हृदयद्रावक कथेने ती मिळाली. मलाला पाश्चात्य माध्यमांची हिरो झाली. ओबामांनी अफगाणिस्तान यथेच्छ बॉम्ब वर्षाव केला. पुढे त्याच 'गांधीवादी' ओबामांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला.

यात एक बाब सारखी होती तो म्हणजे टीन एज मध्ये असणाऱ्या, जगाच्या समस्येच्या चिंतेचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन चालणाऱ्या आणि अश्रू ढाळत आपलं दुःख, आपली कळकळ जगापुढे मांडणाऱ्या दोन मुली.

हे सांगण्याचं निमित्त म्हणजे सध्या इंटरनेटवर चर्चेत आलेली एक १६ वर्षीय स्वीडिश मुलगी ग्रेटा थुनबर्ग. संयुक्त राष्ट्रांत "हाऊ डेअर यू!" म्हणत या मुलीने जागतिक समुदायाला आणि देशांच्या प्रमुखांना वातावरण बदलाविषयी प्रश्न विचारला आहे. तिचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात तिचा चेहरा उद्विग्न आहे. डोळ्यांत राग आहे आणि अश्रूही आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी तिच्याविषयी उपहासात्मक ट्विट केलं आणि (नेहमीप्रमाणे) ते जनतेच्या रोषाचे धनी झाले आहेत.

वातावरण बदल आणि पर्यावरणीय धोके यावर सध्या जगात बरीच आंदोलनं घडताना दिसतायत. जगभरात तरुण रस्त्यांवर उतरून आंदोलन करतायत. एक नवी 'क्रांती' घडतेय असं चित्र निर्माण होतं आहे. पण, याला कदाचित दुसरी बाजू असेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

जर्मनी, फ्रान्स, ब्राझील, अर्जेंटिना आणि तुर्की या देशांनी तापमानवाढीस वेसण घालण्यासाठी मूलभूत प्रयत्न न केल्याने कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ चिल्ड्रेनच्या अंतर्गत मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करून तिने संयुक्त राष्ट्रांत याचिका दाखल केली आहे. यात चीनचा साधा उल्लेखही नाही.

गेली अनेक वर्ष जागतिक तापमान वाढीने हैराण झालेल्या जगाने आपलं कार्बन उत्सर्जन कमी करावं यासाठी आंतरराष्ट्रीय आराखडा तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, प्रत्येक देशाच्या समस्याच वेगळ्या आहेत. भारत आणि अनेक विकसनशील देशांनी आपल्या कार्बन उत्सर्जनात घट करावी, असा विकसित देशांचा आग्रह आहे. तर विकसित देशांनी विकासाची एक पातळी गाठल्यानंतर आता विकसनशील देशांना उपदेश करून दबाव आणू नये, असा भारतासह अनेक देशांचा प्रतिकार आहे.

पोट भरल्यावर इतरांना उपोषणाचे सल्ले देणं सोपं असतं. गरिबाला उपासाचे फायदे ढेकर देणाऱ्याने सांगू नये. सत्तरच्या दशकात पर्यावरण रक्षणासाठी कागद सोडून प्लास्टिक वापरण्याचा प्रचार करणारे आज कागद वापरायला सांगत आहेत, ही हास्यास्पद बाब आहे.

या सर्वाला बऱ्याच तांत्रिक बाबींची किनार आहे. शाश्वत विकासाची टूम जगभर आली आहे. पण, शाश्वत विकासाचं तंत्रज्ञान बहुतांशी विकसित राष्ट्रांकडे आहे. त्याची किंमत मोठी आहे. बहुतेक गरीब राष्ट्रांना ते आजच्या घडीला परवडणारं नाही. आणि त्याचे परिणाम पाहण्यासाठी लागणारा वेळ देण्याची तिथल्या लोकसमुदायाची तयारीही नाही. तयार असलेल्या तंत्रज्ञानाला 'बाजारपेठ' हवी आहे. ती किंमत देण्यासाठी जनमानस तयार करण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत.

यात सोपं लक्ष आहे ती क्रांतीचं सळसळतं रक्त अंगात असलेली तरुणाई. आणि त्यांना साथ आहे ती त्याच भांडवली अर्थव्यवस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या तांत्रिक आधुनिकतेची.

लहान मुलांचा प्रचारात वापर करणं हा तर राजकारण्यांचा आवडता उद्योग. इतिहासात डोकावलं तरी सर्वच लोकशाही ते हुकूमशाही प्रवृत्तीच्या प्रत्येक नेत्याला ही मुलं फार भावतात, असं दिसून येतं. सोव्हिएतच्या स्टॅलिन पासून जर्मनीच्या हिटलर पर्यंत प्रत्येकाने तरुण मुला-मुलींचा वापर आपल्या फलकांवर केला.

मुलं ही देशाचं 'भविष्य' असतात. त्यांना वाढवण्याची जबाबदारी ही वर्तमानातील पिढ्यांवर असते. हा झाला सृष्टीचा नियम. पण, आजच्या पिढ्यांना भविष्याच्या ओझ्याखाली दाबून आपले हितसंबंध जपणं हा मानसिक युद्धाचा उत्तम मार्ग असतो. तो जगभर सर्वत्र अवलंबला जातो... अगदी दररोज.

प्रगतीचे आणि विकासाचे टप्पे पार करून मग जगाला तत्वज्ञान शिकवणं, हे तसं सोपंच. शिवाय, घरात, मोबाईलवर आणि सर्वत्र इंटरनेट असलेल्या व्यक्तींना आता जग वाचवण्याची आस लागणं, हे काही विशेष नाही. आपल्या आजूबाजूला असलेल्या लाखोंच्या या मूलभूत गरजा पूर्ण होणार आहेत की नाहीत, याचा साधा विचारही तेव्हा मनात येत नाही. "विकास म्हणजे नक्की काय?" यावर चर्चासत्र घेणं हा तर विकासाचा सर्व परीने उपभोग घेतलेल्या लाभार्थींचा लाडका उद्योगच जणू!

इंटरनेटने जगात एक क्रांती आणली. समाजमाध्यमांनी पेटवलेल्या वातावरणाने सरकारं उलथवली. लोकशाही व्यवस्थांमध्ये जनमत निर्मिती करणं सोपं झालं. एका विशिष्ट विचारसरणीच्या हातांमध्ये एकवटलेल्या माध्यमांचं आणि परिणामी माहितीचं लोकशाहीकरण झालं. बदल झाले. पण, आज त्याच्यापुढेच आव्हानं निर्माण झाली आहेत. भांडवली विचारांच्या पाठिंब्यावर जन्मलेल्या या माध्यमांवरही ताबा मिळवून (वैचारिक) शोषणाची खोटी चित्र रंगवून पुन्हा विचारांचं युद्ध जागतिक पटलावर भडकताना दिसत आहे.

पडद्यामागे असणारं चित्र फार वेगळं आहे. पडद्यावर ओघळणाऱ्या अश्रूंना विविध छटा आहेत. त्या पाहून सारासार विचार करणं ही येत्या काळाची गरज आहे.

- संदेश स. सामंत

Wednesday 25 September 2019

लढा स्त्रीवादाचा !


'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' - sonam kapoor
- रश्मी पदवाड मदनकर



'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' असे वक्तव्य करणारी सिने अभिनेत्री सोनम कपूर हिने पुन्हा एकदा हा सार्वकालीन वाद पटलावर आणला आहे. स्त्रीवाद हा विषय तसा आजचा नाही. स्त्रीस्वातंत्र्य आणि समानतेसाठी पुरुषप्रधान समाजाशी दोन हात करण्याची स्त्री चळवळ अनेक दशकांपासून चालूच आहे. स्त्रीवादी चळवळीचा हेतू स्त्रियांना राजकीय, आर्थिक व सामाजिक हक्क आणि समान संधी याची जाणीव करून देणं, तिला आत्मनिर्भर बनवणं इतकाच नाहीये, तर हे साधताना आर्थिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि निर्णयस्वातंत्र्य म्हणजे नेमके काय याचे स्पष्टीकरण करणे आहे,’ असे एकदा अरुणा ढेरे म्हणाल्या असल्याचे आठवते. चित्रपट, साहित्य, कलाक्षेत्रातील अनेक नामवंतांचे याबाबतचे मत-मतभेद अनेकदा चर्चेचा विषय होत राहिलेला आहे. आजही स्त्रीवादाचा प्रश्न निर्माण झाला की त्याची परिभाषा अनेक स्तरातून होत असते. गेले वर्षभर महिलांशी जुळलेल्या प्रश्नांनी सोशल मीडिया ओसंडून वाहत होता, गेल्या वर्षभरात 'हैशटैग मी टू' ने सोशल मीडियाचा फार मोठा भाग आणि काळ व्यापला होता. हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वे विंस्टीनवर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते आणि तिथून सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपाचे रूपांतर आंदोलनाच्या स्वरूपात जगभर पसरत गेले, वर्ष सरता सरता हे आंदोलन फक्त चित्रपट सेलिब्रिटीजपुरते मर्यादित न राहता, लेखक, पत्रकार, सैन्यातले अधिकारी, राजकारणापासून ते न्यायमूर्तीपर्यंत चिघळत गेले. अंतर्राष्ट्रीय खेळाचे रिपोर्टींग करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ वायरल झाले, अनेक एमएमएस, ऑडिओ नोट, मॅसेजेस चव्हाट्यावर आणले गेले. पण हे किती महत्वाचे होते हे हळूहळू लक्षात येऊ लागले आणि ही साधी दिसणारी मोहीम जगव्यापी आंदोलनात परावर्तित झाली. हा ट्रेंड सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु झाला होता, हे आठवण्याचे विशेष कारण म्हणजे सोनम कपूरने लग्नानंतर सासरचेही नाव तिच्या नावासह जोडले आणि स्त्रीवादींनी तिच्या नावाने शंख फुंकायला सुरुवात केली. त्याचे प्रत्यत्तर म्हणून हल्लीच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सोनमने 'स्त्रीवाद' म्हणजे फेमिनिज्मचा खरा अर्थ काय हे प्रत्येकीने समजून घेणे आवश्यक आहे स्त्रीवादाचे ढोंग करणे म्हणजे स्त्रीवाद नाही असे परखडपणे सांगितले. स्त्रीवादी असण्याचा खरा अर्थ आहे प्रत्येक गोष्टीत समानता. तुम्ही तुमची ब्रा जाळून मिशा वाढवणे हा काही स्त्रीवादाचा अर्थ नाही. अनेक अभिनेत्रींना स्त्रीवादाचा खरा अर्थच माहीत नाही. आता बदलत्या काळानुसार सर्वांनीच स्त्रीवादाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. समाजात स्त्री-पुरूष असा भेदभाव आहे. यात बदल होईल अशी आशा आहे. अनेकांचा हा फरक दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.' 'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' तिच्या या वाक्याचा बुरा-भला प्रभाव व्हायचा तो झालाच आणि सोशल मीडिया पुन्हा एकदा ढवळून निघाले. स्त्रीवादाचा जो काही नवा अर्थ सोनमच्या वक्तव्यातून उद्धृक्त होतो आहे त्याचे महत्व समजून घेणे महत्वाचे ठरते.


योगायोगाने १९६८ साली ७ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील एका सौन्दर्यस्पर्धेत स्त्री-समानतेच्या हक्कासाठी २०० स्त्रीवादी महिलांनी अंतर्वस्त्र जाळून निषेध व्यक्त केला होता, अमेरिकेतील 'ब्रा बर्निंग' या प्रातिनिधिक घटनेला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निषेध आंदोलनाचा उद्देश ''स्त्रियांच्या शरीरापेक्षा तिच्या बुद्धीवर लक्ष केंद्रित व्हावे आणि तिच्याकडे मानवतावादी दृष्टीने पाहिले जावे'' असा होता.

काळ सरता सरता आज इथवर पोचेपर्यंत अश्या चळवळीचे स्वरूप बदलत गेले असले तरी समस्या सुटली नाही, मुद्दा कायम आहे बदललेल्या काळाचे स्वरूप समजून घ्यायला अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या स्त्री आंदोलनांची काही उदाहरण पाहणं महत्वाचं ठरेल.

> २०१० ऑगस्टमधे लॉस अ‍ॅन्जलेसच्या सुप्रसिध्द व्हेनिस बिचवर एक मोठा चळवळीचा ग्रुप, विशेष म्हणजे स्त्री -पुरुष दोन्ही समान संख्येनी एकत्र जमला होता. स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देणारे हे संघटन होते. 'गो टॉपलेस इक्वालिटी राइट्स' हा या आंदोलनाचा विषय होता.
त्यांच्या म्हणण्यानुसार 'अ‍ॅज लाँग अ‍ॅज मेन आर अलाउड टु गो टॉपलेस इन पब्लिक विमेन शुड हॅव द सेम कॉन्स्टिट्युशनल राइट ऑर एल्स मेन शुड हॅव टु वेअर समथिंग टु कव्हर देअर चेस्ट्स.' त्यांच्या वेबसाइट वर लिहिलल्याप्रमाणे, अमेरिकेसारख्या समान हक्काचा दावा करणार्‍या देशात स्त्रियांना या गोष्टीसाठी दंड होणे, हाकलून लावणे, अपशब्द ऐकावे लागणे अश्या अपमानास्पद गोष्टींना सामोरे जावे लागते त्याच गोष्टीसाठी पुरुषांना मात्र पूर्ण मान्यता आहे ही गोष्ट त्यांना इक्वल राइट्सवर आणलेली गदा वाटते.

> या विरुद्धही काही पाश्चात्त्य देशात 'बुरखा न घालु देणे' ही मुस्लिम स्त्रियांच्या हक्कावर आणलेली गदा असे वाटणार्‍या बऱ्याच मुस्लिम महिला आहेत, 'इफ आय कान्ट वेअर बुरखा, इट्स नॉट माय रिव्हॉल्युशन' या विचारांच ते समर्थन करतात. त्या स्वतः बुरखा घालतातच असेही नाही, काही हिजाबही घालतात. पण पाश्चात्य लोकांनी बुरख्यावर बन्दी घालणे हे त्यांना कट्टरपंथीय मुस्लिम देशांच्या बुरखा कंपलसरी करणे, किंवा इतर कडक कायद्या इतकेच अन्याय झाल्यासारखे वाटते !

पुरुषप्रधानतेच्या इतर सिद्धांतांच्या इतिहासात उदारमतवादी स्त्रीवादाचा इतिहास खूप जुना आहे. अठराव्या शतकाच्या सुरूवातीस, स्वातंत्र्य आणि समानता या लोकशाही मूल्यांनुसार स्त्रियांच्या बाबतीतला विरोधाभास उदारमतवादी स्त्रीवादींनी अधोरेखित केला. मेरी वॉलस्टोन क्राफ्टने १७९० च्या दशकात लंडनमधून पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या 'सपोर्टिंग द राईट्स ऑफ वुमन' या लेखात महिलांच्या हक्कांसाठी परखडपणे लिहिले. संयुक्त राष्ट्रात १८४८ मध्ये सेनेका फल्स संमेलन झाले ज्यात महिलांच्या अधिकारांसाठी पहिल्यांदाच आंदोलन झाले होते. भारतीय स्त्रीवादाची सुरुवात मात्र त्यामानाने सुदैवी होती एकतर ती स्त्रीवादापेक्षा स्त्रीमुक्तीची लढाई होती आणि त्यासाठी महिलां पुरुषांचा सहभाग होता, अनेक बुरसटलेल्या प्रथा परंपरेच्या जोखडातून इथल्या स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी मानसिकता बदलण्याचा संघर्ष तिचा अजून संपलेला नाही. मुस्लिम समाजातील महिला त्यांच्या हक्कांसाठी पुढाकार घेऊ लागल्या तो अगदी आत्ता आत्ताचा काळ, याची सुरुवात झाली ३ ते ५ ऑगस्ट २००७ रोजी पुण्यात एका राष्ट्रस्तरीय बैठकीत ३० महिलांनी एकत्र येऊन केली होती. या आंदोलनानंतर मुस्लिम महिलांचे धाडस वाढले, युगानुयुगे जखडलेल्या बेड्या गळून पडू लागल्या, लादलेली बंधने झुगारली जाऊ लागली आणि अन्यायाला वाचा फुटू लागली.


गेल्या अनेक वर्षात स्त्री पुरुष असमानतेचे कवच भेदून हे दोन्ही वर्ग सहशिक्षण, सहकारी म्हणून एकत्र कार्य करीत आहेत. स्त्री-पुरुष मैत्री हा देखील आता अचंभित करणारा विषय राहिला नाही. पण म्हणून एवढ्याने परिस्थिती बदलली आहे का? महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले पूर्वीपेक्षा तिच्या स्वातंत्र्यताही वाढ झाली असली तरी स्त्रीकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात-मानसिकतेत बदल झाला आहे का? हा कळीचा मुद्दा आहे. आजही निरनिराळ्या कवितांमधून लेखांमधून ' आई -बहिण-पत्नी-सखी' अश्या अपेक्षा अधोरेखित करत 'स्त्रीत्त्व' बंदिस्त करण्यात येतेच.. ते बदलून मुळात आधी एक 'माणुस' म्हणून समाजाने स्त्रीचा आदर करणे महत्वाचं आहे. पात्रता असताना समाजात समान वागणुक न मिळणे, रुढी परंपरांच्या नावाखाली आपेक्षांची ओझी लादणे, हुंडा, सेक्शुअल हॅरेसमेन्ट, विचार आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अजिबात नसणे, या गोष्टी आधी बदलल्या पाहिजेत. आजही एकविसाव्या शतकात तिला तिच्या हक्कांसाठी, तिच्यावर झालेल्या अन्यायांसाठी-अत्याचारांवर शासनाने, समाजाने दखल घ्यावी म्हणून आंदोलनं करावे लागणार असतील. तिच्या हक्कांसाठी न्यायासाठीचे निर्णय पुरुषांच्या संघटना घेणार असतील तर आमचा समाज कितीही विकसित झाला तरी काय उपयोग, खरच, स्त्रियांचे समान ह्क्क खूप दूरची गोष्ट आहे मुळात मुलीने जन्म घ्यावा कि नाही, मुलगी जन्मलेली जगू द्यायची कि नाही, तिच्या अथपासून इतिपर्यंत समाज मुलीला मुठीत ठेवू इच्छितो. स्त्रीच्या आयुष्याचं, तिच्या अस्त्तित्त्वाचं दृष्य थोडंफार बदललं असलं, तरी इथे 'पेला अर्धा भरलाय' म्हणून समाधान मानता येत नाही. खूप काही व्हायचं आहे. एकूणच वैश्विक समाजाची मानसिकता बदलण्याची, या दिशेनं सुसंस्कार घडवलेली पिढी तयार होण्याची नितांत गरज आहे. म्हणजेच अजून थकून थांबता येणार नाहीये .. प्रवास अजून चालू आहे.

हा सुरुवातीपासूनचा सगळा काळ स्त्रीअधिकाराच्या आंदोलनाच्या संघर्षाचाच काळ नव्हता तर प्रस्थापितांच्या आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेला मोडणारी स्त्री म्हणून त्या मोबदल्यात पुरुषसत्ताक समाजाकडून अवहेलना सहन करण्याचाही काळ होता. हि जखडलेली बंधने झुगारतांना तिने उचललेला पवित्रा हा त्या स्त्रियांना पुरुषविरोधी स्त्री किंवा समाज चौकट लांघणारी बाई असं संबोधन करू लागली तिच्याबाबत नकारात्मक भाव पोसू लागला. इतकेच कशाला, तिच्या केसांच्या-कपड्यांच्या लांबीवरून, लिपस्टिकच्या रंगावरून किंवा चपलांच्या हिलवरून तिच्या चारित्र्याची मोजमाप करण्याची मानसिकता आजही दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणूनच सुरुवातीपासून समानतेचा लढा देतांना स्त्री-पुरुष समान कसे ह्याचे पुरावे देण्यासाठी अनेक सोंगे तिला घ्यावी लागली. पुरुषांच्या सवयी स्वीकारण्यापासून त्याच्यासारखा पेहेराव करण्यापर्यंत.. त्याच्यासारखी नोकरी-व्यवसाय करण्यापासून ते त्याच्यासारखी व्यसनं कारण्यापर्यंतही तिने मजल मारली. मात्र हे करतांना स्त्रीची नकारात्मक छबी प्रस्थापित होऊ लागली. या सर्वांपलीकडे पाहणारी आजची स्त्री पुन्हा बदलतांना दिसते आहे. मी पुरुषासारखीच आहे म्हणून मला समान अधिकार द्या असे म्हणून लढा देणारी स्त्री आज मी स्त्री आहे मला त्याचा अभिमान आहे एवढेच नाही तर स्त्री म्हणून पूर्ण स्वतंत्र आणि मनासारखे जगायचं अधिकारही आहे हे निक्षून सांगते आहे. आज तिचा लढा प्रथा-परंपरा किंवा पुरुषविरोधी नाही, तर त्या पलीकडचा कायदेशीर हक्कांचा आहे तसा तो तिच्या जन्मजात मिळालेल्या नागरिकत्वाचा, मानवी हक्कांचा आणि अस्तित्वाचा आहे आणि त्याची आत्मप्रतिष्ठा, बाईपणाचं स्वत्व जपण्याचा देखील आहे. 

(२५ सप्टेंबर २०१९ च्या  दैनिक सकाळ 'मी' पुरवणीत प्रकाशित )



- रश्मी पदवाड मदनकर

Monday 23 September 2019

मला वाटलं ...
की तू मला
आता माझी जात विचारशील.

कुसवाआतली की कुसवाबाहेरची.
वाडीतली की वाड्यातली.
माणूस की बाईमाणूस.

माझ्या नावाचं
लेबलही तस निश्क्रीयचं.
कुठल्याच चौकटीत न बसणारं.
बसवताही न येणारं.

मैला वहाणारी मी
दैवपुजेत रमणारी.
तुमच्या भातुकल्या
दूरुनच बघणारी.

तिन्ही सांजेला
दिवा लावणारी.
भुकेल्या कावळ्यांसाठी
गिधडांना शमवणारी.

डोई झाकल्या पदरात
जट वाढवणारी,
वीतभर कपड्यात पण
रामायण वाचणारी.

गळ्यातल्या धडुत्यात
तान्हूल निजवणारी,
पाळणाघराच्या पाय-यांवर
नकळत थबकणारी.

मी कालची, मी आजची.
कधी गर्भात खुडलेली,
कधी उमल्याआधी
श्वापदांनी कुस्करलेली.

मी रमा , मी आनंदी.
मी जिजा, मी सावित्री .
मी सिंधू , मी किरण,
मी अहिल्या .मी अभया......
            मी......मी......फक्त माणूस...
                                 बाईमाणूस......

...............डॉ भाग्यश्री यशवंत............

Thursday 19 September 2019

वेड्या माणसांच्या गोष्टी !! - 4



#भेटलेलीमाणसं


सातेक वर्षाआधीची गोष्ट. नागपूरच्या इंडियन स्केटिंग अकादमीच्या २३ चम्पिअन्सने पायाला चाक बांधून म्हणजेच स्केटिंग वरून कन्याकुमारी ते नागपूर प्रत्यक्षात २००० किलोमीटरचा प्रवास केवळ अकरा दिवसात यशस्वीपणे पार पाडला होता विश्वविक्रम घडवून आणणाऱ्या या विक्रमवीरांचा साहसी प्रवास कसा घडला..कोणकोणत्या टप्प्यातून...कोणत्या संकटातून यांना तावून सुलाखून निघावं लागलं, कश्या स्वरूपाच्या अडचणींना तोंड द्याव लागलं याचाच आढावा घ्यायला मी या चमुंना भेटले..यांना भेटणे म्हणजे खरच एक पर्वणी होती. वय वर्ष ११ ते २५ वयोगटातली ही मंडळी त्यांचे अनुभव मांडतांना प्रचंड उत्साही होते. त्यांचे थरारक अनुभव त्यांच्याच भारावून जाणारया शब्दात ऐकणे सुद्धा जणू थरारच होता जो मी अनुभवत होते ...अनेक घटना मन हादरवून टाकणाऱ्या मेंदू सुन्न करणाऱ्या, काही दुःखद तर काही आनंदून सोडणाऱ्या...या प्रवासात या मुलांचे किरकोळ अपघात झाले, शारीरिक इजा झाल्यात, मानसिक दडपण आले, अनेक संकट आ वासून उभे होते...या सर्वांतून यांना पार जावं लागलं पण कौतुकाची बाब म्हणजे ही मुलं कुठल्याच क्षणी खचली नाहीत...आताही त्यांच्या बोलण्यात त्यांनी केलेल्या साहसी कृत्याच्या अभिमानाची झळक जाणवत नव्हती तर जाणवत होता तो त्यांचा ओथंबून वाहणारा आनंद...


या थरारक प्रवासाचे अनुभव जो मुख्यतः माझ्याशी शेअर करीत होता तो होता स्वप्नील.. स्वप्नील समर्थ. दिसायला मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला हा मला त्या क्षणीच भावला होता. नंतर कुठल्या कुठल्या निमित्ताने कुठकुठल्या कार्यक्रमात भेटी होत राहिल्या अनेकदा एकत्र कार्य केले आणि स्वप्निलच्या खेळाडू वृत्तीची, चांगल्या स्वभावाची, समाजसेवेच्या कर्तव्यबुद्धीची, सतत उत्साही आनंदी मूर्तीची चुणूक लागत राहिली. स्वप्निलच्या आजोबांनी केलेल्या अनेक समाजसेवेच्या व्रताचा वारसा हा पुढे चालवतो आहे, त्यासाठी वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवतो त्यांच्यासारख्याच अनेक तरुणांना फक्त उद्बोधनातून नाही तर कृतीतून प्रोत्साहित करीत राहतो. समाजातील माणसांसाठी संस्थेद्वारा उपयोगी कामे करतोच शिवाय इतरांच्या सामाजिक संस्थेसोबत मिळून जास्तीत जास्त चांगली कामे हाताने व्हावे यासाठी सतत प्रयत्नरत असतो. हा सार्वजनिक विवाह सारखे कार्य घडवून आणतो, समाजातील बांधवांना एकत्र आणून, विद्यार्थ्यांना बरोबरीने घेऊन पर्यावरणासाठी कामं करतो. 'रा. पै. समर्थ स्मारक समिती' या स्वतःच्याच संस्थेद्वारा समाजातील चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव 'विदर्भ रत्न' पुरस्कार देऊन करीत असतो. स्वाप्निल उत्कृष्ट स्केटर आहे पण ह्याचा उपयोग त्याने स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतरांना ते देत राहण्याचे ठरवले .. या खेळाच्या माध्यमातून तो निव्वळ खेळाडू नाही तर समाजोपयोगी, वैचारिक समंजस अशी एक पिढीचं घडवतो आहे असं मला सतत वाटतं. त्याचे छान चौकोनी छोटे कुटुंब आहे .. म्हणजे आई, बायको आणि एक गोडुली लेक. संपूर्ण परिवारच सामाजिक कार्यात समरस होऊन त्याला साथ देणारे. आता तर त्याची लेक त्याचा हात धरून या कार्यात उतरतांना दिसते आहे.


स्वप्नील बद्दल बोलावे तेवढे कमीच. तो मला माझ्या लहान भावासारखा वाटतो. हाच हक्क मी स्वतःच घेऊन वेळोवेळी त्याचा कान धरून त्याला दटावत असते पाठीत रट्टाही घालत असते.. पण तो मात्र नेहेमी नम्र असतो.. माझ्या कार्यातही माझ्या मदतीसाठी अगदी अर्ध्या रात्रीही एका पायावर उभा असतो.


आपल्या आयुष्यात भेटलेल्या काही लोकांना पाहून आपल्याला अभिमान दाटतो त्यातलाच स्वप्नील एक आहे तेवढंच कौतुक मला ममताचंही करावं वाटतं सहचारिणी असावी तर ममतासारखी असे म्हणावे इतकी ती गुणी आहे..आणि हे सगळं काकूंच्या संस्कारात घडत आहे यात वाद नाही.. माझ्यापेक्षा खूप लहान असला तरी त्याच्याकडे पाहून खूप शिकायला मिळाले आहे हे सांगायला मला कधीच कमीपणा वाटणार नाही...


स्वप्नील आज तुझा वाढदिवस, तू अशीच चांगली कामे करत राहा.. खूप प्रगती कर आनंदी राहा. खूप शुभेच्छा !













- रश्मी पदवाड मदनकर

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...