Friday 28 September 2018




मी एक अख्खा काळ नेसून घेतलाय
स्वतःभोवती..माझा माझ्यापुरतं असलेला
एक काळ माझ्या आयुष्याएवढा .. किंवा
आयुष्य एका काळाएवढं..
आयुष्यापलीकडचा काळ मला माहीत नाही
काळापलीकडचे आयुष्यही ठाऊक नाही...


नेसलेल्या काळात मी रंगवलंय माझं एक आकाश
माझ्या वाट्याचा उजेड सांडत राहावा म्हणून
त्यात टाचलाय एक सुर्य, एक चंद्र थोडे तारे
पेरले आहेत काही बियाणे थोडं धनधान्य
टीचभर पोटासाठी जन्मभर लागणार्या अन्नासाठी...

विदग्ध आत्म्याला विसावा म्हणून
टीचभर परिघातल्या चंद्रमौळी घरात
अशक्यतेचं अफाट विश्व सामावलंय
ते मी माझंच मानून घेतलंय कायमचं

जगण्यासाठी मनाच्या रखरखत्या जमिनीवर
मारत असते भावनेच्या ओलाव्याचा शिडकावा
उगवत राहते प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वगैरे
जपून ठेवते काही खाणाखुणा जगण्यासाठी
विदीर्ण आत्म्याला लावत असते संवेदनेचा लेप वगैरे

भिरभिरणाऱ्या अस्तित्वाचा गुंता  सोडवण्यात,
आणि विखुरलेल्या स्वप्नांची चुंबड जमवण्यात
निघून चाललाय हा जन्म वगैरे
हव्या त्या माणसांचे गर्दीतले चेहेरे शोधत
धुमसत राहतो जीव अखंड
अल्पकाळ परीघ ओलांडून आत येणाऱ्या माणसांनी
 दिलेल्या तात्पुरत्या दुःखाचे कढ सोसत
आयुष्याला पुरेल एवढ्या जखमा झोळीत जमा केल्या आहेत
त्या कुर्वाळण्यात या काळाची लक्तरं होणार आहेत

मी नेसलेला काळ असाच जीर्ण होत जाणार आहे
सुरकुत्यांच्या कातडी आड .. मोहवणाऱ्या जगण्याच्या संभावनांशी
संघर्ष करीत मी माझ्या जगण्याचे सांत्वन करीत राहायचे ?

नाही .. नको ..

मी नेसलेला काळ सोडून देऊन
निर्वस्त्र आत्ममग्न अनभिज्ञ
नग्नच अज्ञात प्रवासाला निघणार आहे.
 नश्वर देहभोगाच्या सत्य आभासापलीकडे
चिरशांतीच्या शोधात ...








Tuesday 11 September 2018

ठरवले आहे ..

तुझा उल्लेख मी टाळायचे ठरवले आहे
नियम हा एक मी पाळायचे ठरवले आहे ।

तुला ते शोधतात मी गायल्या गझलांमधुनी
तुझे तर नावही गाळायचे ठरवले आहे ।

 नवा चल डाव मांडू मागचे विसरून जाऊ
आपला व्याप सांभाळायचे ठरवले आहे ।

नसे कोणी कुणाचे जीव ओवाळून कळले
छबीवर आपुल्या भाळायचे ठरवले आहे ।

नको आधारही अता कुणाचा शब्दानेही
तुझ्या पत्रासही जाळायचे ठरवले आहे ।

कलेवर आठवांचे अंगणी या पुरुन टाकू
उगवेल मोगरा माळायचे ठरवले आहे ।

रश्मी पदवाड मदनकर
जुलै 18

(मात्रावृत्तात लिहीण्याचा एक प्रयत्न)

Friday 7 September 2018

नक्की कुणाचा दोष आहे ??

चला कोणीतरी बोललं म्हणायचं - न भिता, न घाबरता, कोपऱ्यात बातमी न लावता कुठल्याही राजकारणाचे दडपण न ठेवता - माध्यमाची जबाबदारी बाळगत सत्य ठामपणे उघडावं वाटलं.... हितवाद तुम्ही अभिनंदनास पात्र आहात.



स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात झालेल्या त्या तीन विद्यार्थिनीच्या अपघाताबाबत शहरभर गदारोळ माजला, राजकारण पेटले, आरोप प्रत्यारोपाचा धुराळा उडाला. मोर्चे, आंदोलनं, धरणे आणि काय काय.. त्या दिवशी पूर्णसत्य माहिती नसल्याने बातम्यांचे पेव उठणे, वाऱ्याच्या वेगाने खोट्या अफवा पसरणे साहजिक होते, त्या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी बातम्या छापून आल्या .. मान्य. पण नंतर सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर आले. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हावं इतकं सगळं स्पष्ट झालं. प्रत्यक्षदर्शींचे स्टेटमेंट आणि पोलीस तपासणीतूनही अनेक बाबी समोर आल्या. इतकं सगळं खरं-खोटं कळाल्यावर आणि अपघातग्रस्त मुलींची नुसती चूकच नव्हती तर दखलपात्र गुन्हा होता हे लक्षात आल्यावरही कुठल्याच दुसऱ्या वृत्तपत्रांना त्यावर सत्य प्रकाशात आणणारी बातमी करावी वाटली नाही ?? अपघाताच्या दिवशी जे काही राजकारण झाले मृतदेहाला कार्यालयात ठेवून पैश्यांसाठी बारगनिंग करत व्यापार मांडण्यात आला, मृतदेहाच्या नावानं नोकऱ्या देण्यासाठी धमक्या देण्यात आल्या त्यावर कुणालाच आक्षेप घ्यावा वाटू नये?? पैसे एकदा ठीक आहे, पण... नोकरी का ? एखाद्या कामगाराचा कार्याच्या ठिकाणी जीव गेल्यास त्याच्या पाठी राहणाऱ्या घरच्या मुख्य व्यक्तीस नोकरी दिली जाते कारण गेलेली व्यक्ती हि त्यांच्या घरची उपजीविका चालवणारी मुख्य व्यक्ती होती असे गृहीतच असते...ह्याला आक्षेप असण्याचे कारणच नाही ..पण अपघात झाला म्हणून नोकरी ?? हा कोणता नवा नियम आहे?? एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याबद्दल काहीही वाईट बोलू नये हे आपले संस्कार आहेत हे मान्य असले तरी, जाणारा व्यक्ती गुन्हा करून जात असेल आणि त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दुसरं कुणाला तरी भोगावे लागणार असतील तरीही बोलू नये का ?? कॉलेज मधून बंक करून पळून जाणाऱ्या ३ मैत्रिणी, लायसन्स नसतांना एका गाडीवर ट्रिपल सीट बसून हेल्मेट न घालता ८० च्या वेगाने मागल्या ५० गाड्यांना ओव्हर टेक करत रस्त्याच्या शेवटच्या टोकावरून धुंदीत मस्तीत गाडी पळवत आणतात, वेग इतका कि रस्त्याच्या फुटपाथला टेकलेल्या अगदी टोकाशी असलेल्या नाल्याच्या झाकणापर्यंत आल्यावर वेगावर कंट्रोल करता येत नाही मग पुढे असलेला विजेचा खांब आणि ऑटोला ओलांडताना ब्रेक लागत नाही वेगावर कंट्रोल होत नाही, तोल जातो आणि पोरी भरधाव गाडीसह घसरून घासत सरळ क्रेनच्या खाली फेकल्या जातात, आपल्या सरळ मार्गाने ठराविक वेगात जाणाऱ्या क्रेनखाली.
जीव गेले .. एक नाही तीन तीन .. दुःख आहे खूप आहे सगळ्यांना आहे ... गेलेला जीव कशानेही भरून देता येत नाही पण, दाक्षिण्य नावाचा प्रकार असतो म्हणून शासन किंवा संस्था दवाखान्याचा होणारा खर्च वगैरे भरून देतात ... पण मृतदेह दारात ठेवून आत्ताच्या आत्ता एक करोड आणि नोकरीचे कागद हातात द्या असं शिवीगाळ करत सांगणारा भाऊ आणि दुसऱ्या मुलीचे आईवडील कशाच्या बदल्यात नोकरी मागतात हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
घरच्यांनी मुलींना कधीही नियमात राहा असं खडसावलं नाही किंवा त्या रहदारीचे नियम पाळतात का याकडे लक्ष दिले नाही याची बक्षिसी हवीये का ?? कि मुलींनी भर रस्त्यावर एक सोडून अनेक चुका केल्या त्यांच्या त्या चुकीने पुढल्या मागच्या अनेक जणांचेही जीव जाऊ शकले असते... त्याबदल्यात त्यांच्या सत्काराप्रीत्यर्थ त्यांच्या घरच्यांना नोकऱ्या द्यायच्या ?? नोकरी कुणाला द्यावी ... जो डिझर्विंग कॅन्डिडेड आहे त्याला कि त्याला जो आयुष्यभर सगळ्या सरकारी सोयी सवलती मिळूनही ना शिक्षणासाठी ना स्वतःला कशाच्या लायकीचे बनवायला मेहेनत करतात फक्त संधीची वाट पाहतात .. संधी मिळाली कि लगेच त्याचे भांडवल करून स्वतःचे भविष्य सेक्युर करून घेतात.. अगदी अगदी बहिणीच्या किंवा मुलीच्या मढ्यावर बसून बोली लावावी लागली तरी चालणार असतं त्यांना.. कारण असंच नाकारात्मकतेची राजनीती करून एक एक पायरी वर चढून बसलेली राजकारणातली बांडगुळे असतातच कि मदतीला. या राजकारण्यांच्या खिशातलं काय जाणार असतं.. यांचं काय नुकसान आहे यात ? राजकारणातून तमाशे उभे करून कुणाच्यातरी खिशातून ५० जणांचं काढायचे आणि पुढे दोघांची झोळी भरायची, मग त्या दोघांच्या जातीवर पुन्हा भाकऱ्या भाजायच्या, संपूर्ण समाजाचे समर्थन आणि मतं लाटत राहायचे जन्मभर. बाकी जातीयवादी किती आंधळे असतात हे वेगळे सांगायला नकोच... पण या साऱ्यात प्रामाणिक कष्ट उपसून अभ्यास करून, कुठल्याही राजकारणात न पडलेल्या, नाकाच्या सरळ रेषेवर चालून स्वतःला सक्षम बनवण्यात आयुष्याचे अनेक वर्ष खर्ची घातलेल्या अनेक डिझर्विंग कॅन्डीडेटचे हक्क हिसकावले जातात त्याचे काय ??
कसलं उदात्तीकरण चाललंय हे ? कुठला समाज .. काय वातावरण निर्मिती करतोय आपण आपल्या पुढल्या पिढीसाठी ? काय शिकवण घ्यावी आजच्या पिढीने यातून ? चूक हि चूकच असते आणि चुकीला बक्षीस नाही शिक्षाच मिळते ... कि मग रोहित वेमुला सारख्यांनी आत्महत्या केली कि त्यांना घरोघरी दारोदारी प्रसिद्धी प्राप्त होते, ते लोकांसाठी हिरो ठरतात ... तुम्ही चुका चुका, चुकत राहा आणि मृत्यू जा.. काही फरक पडत नाही तुमचे ना सही तुमच्या कुटुंबाचे पुढल्या पिढीचे भविष्य सेक्युर होईल ?? मग उद्या त्यांना अभ्यास मेहनत करून, कष्ट उपसून नोकरी मिळवण्यापेक्षा, काहीतरी चांगले करून नाव कमावण्यापेक्षा .. नाव कमावण्यासाठी अपघाती मृत्यूचा किंवा आत्महत्येचा मार्ग सोपा नाही का वाटणार ? चुका झाल्यावर सरकार, राजकारणी मदत करणार असतील, नोकऱ्या मिळवून देणार असतील तर कशाला करा मेहनत, कशाला स्वबळावर जग जिंकण्याचे स्वप्न बाळगा .. स्वाभिमान-स्वसन्मान घालूया खड्ड्यात,, देऊया ना एखाद्याचा बळी किंवा स्वतःचाच देऊया कुटुंबासाठी तेवढंच पुरे... हेच नाही का उदाहरण कायम होतंय ? आपण आपल्या हाताने आपली पुढली पिढी नासवतोय का ? विचार करा जरा..
कुठे जाते आहे आजची पिढी. घरात मिळणारे संस्कार, घरातल्या मोठ्यांच्या वागणुकीतून दिसणारे आत्मसात होणारे तत्वमूल्य संपुष्टात आले का? आणि म्हणून समाजात राहण्यासाठी सगळ्यांसाठी सोयीचे असणारे कायदे जाचक वाटू लागले आहेत. आम्हाला आमचे अधिकार फार प्रखरतेने ठाऊक आहेत आणि आम्ही त्यासाठी आग्रही देखील आहोत पण कर्तव्याचे काय?? संस्कार-मूल्य-तत्वांनाही जातपात, भगवा-निळा-हिरव्याशी जोडण्यापर्यंत राजकारण आमच्या बैठकीतून शयनकक्ष आणि माजघरापर्यंत येऊन पोचला आहे. राजकारण आमच्या घरात शिरले नाहीये, कदाचित आम्हीच राजकारणात गरज नसतांना नको तितके हस्तक्षेप करू लागलो आहे.. आमची मानसिकता बरबटली, तशीच मानसिकता सेट होत चाललीय का आजच्या पिढीत .. आम्ही पालक म्हणून कुठेतरी चुकतोय आणि त्यात राजकारणातल्या कोणत्याही पार्टीचे नाहीतर आपल्याच कुटुंबाचे नुकसान होत चाललेय हे लक्षात का येत नाहीये कुणाच्या ? आजच्या पिढीतल्या मुलांच्या वैचारिक बौद्धिक, मानसिक जडणघडणीत या साऱ्यांचा फार विपरीत परिणाम होत आहे हे कधी कळेल आम्हाला ??
हे सगळं खरतर कुणीतरी लिहायला, प्रकाशित करून लोकांपुढे आणायला हवं होतं... कुणीतरी तर राजकारण कोपऱ्यात ढकलून अनवट वाट धरावी .. खऱ्याची सत्त्याची बाजू मांडण्याचे जिगर ठेवावे. पण असे होतांना दिसत नाही. जेव्हा जेव्हा वातावरण तापेल तेव्हा आम्ही फक्त आमच्या भाकऱ्या भाजून घेणार .. वातावरण तापवणाऱ्याच्या विरोधात कसे बोलायचे बरे.. बऱ्याचअंशी कमाई त्याच्यावर पण तर अवलंबून आहे ना.. तत्व बाळगणारे पत्रकार आणि तत्वांवर चालणारे माध्यम कल्पनेतच उरणार आहेत एकदिवस. लोकांचा पूर्ण विश्वास गमावल्यावरच डोळे उघडून परतीचा मार्ग धरेल पत्रकारिता असं वाटू लागलंय.
तर ...असो ...

उजेडाचा मिलन 'स्पर्श' !

(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं )

एखादा भावनाप्रधान चित्रपट पाहायला आवडतंच त्यात तो जुना आवडत्या अभिनेत्यांचा असेल तर क्या बात .. पण एखाद्या अत्यंत संवेदनशील नजरेने टीपलेले चित्रपटाचे सिन आणि त्याचा उलगडा इतका हळुवार इतका विलोभनीय की चित्रपट पाहील्यावर इतका कळला नसता तो वाचनातून झिरपतोय आपण त्या विश्वात तन्मयतेनं रमतोय असं वाटत राहतं ...
एक अत्यंत आवडलेला लेख.
.................................................
उजेडाचा मिलन 'स्पर्श'!
संजय आर्वीकर
उजेड हा मुक्तीचा भावसंकेत असतो. आत्मज्ञान आणि आत्मशोधाच्या प्रवासातला हा एक वाटाड्या असतो. उजेडाच्या प्रकाशात अहंगंडात रूपांतरित झालेला न्यूनगंड वितळवून टाकण्याची शक्ती असते. त्यागाच्या आवरणाखाली लपलेले प्रेम सूर्यफुलासारखे उमलण्याची असते. सई परांजपेंचा ‘स्पर्श’ हा सिनेमा उजेडाच्या जादूई मिलनाची गोष्ट सांगतो...
नवजीवन अंध विद्यालयाचा प्रमुख असलेल्या अनिरुद्धचं घर. तो स्वतः दृष्टिहीन, पण विलक्षण स्वाभिमानी. घरात अनिरुद्ध आणि त्याच्याच विनंतीवरून शाळेत येऊ लागलेली कविता. कविताच्या पतीचं तीन वर्षांपूर्वी अपघातात निधन झालेलं. त्यानंतर स्वतःच्याच कोषात राहणाऱ्या कविताला शाळेच्या कामात जणू नवे जीवन-प्रयोजन गवसलेले. पण कविताची गुंतवणूक आता फक्त शाळेपुरती मर्यादित राहिलेली नाही. अनिरूद्ध आणि कवितामध्ये नाजूक भावबंध निर्माण झाले आहेत. दोघांनाही याची जाणीव झालेली आहेच. पण अजून दोघांनाही आपण निखळ प्रेमभावनेने एकत्र येत आहोत, हे महा-ज्ञान व्हायला बराच पल्ला गाठायचा आहे.
दोघे एकत्र आलेली अशीच एक संध्याकाळ -
अनिरुद्ध : मै एहसान से घबराता हूं, कविता... और दिन ब दिन तुम्हारे एहसानों का बोझ भारी बनता जा रहा है.
कविता : कैसा एहसान? दो पराठे और एक केक?
अनिरुद्ध : तुम्हारा स्कूल मे आना ही एक एहसान है, हमारे बच्चों के लिये.
कविता : आपने कहा था, कि मै उन्हे कुछ दुंगी, तो वो भी मुझे कुछ देंगे.
अनिरुद्ध : वे किसे क्या देंगे बेचारे?
कविता : यह लब्ज मना था... ‘बेचारा’
अनिरुद्ध : दुसरों के लिये मना था... आखिर मैं भी तो उनमे से हूं - एक बेचारा!
कविता : दुसरा कोई हमदर्दी दिखाये, तो आप कितना चिढ उठते है. बट् यू आर फूल ऑफ सेल्फपिटी... सच, जितनाही आपको अधिक जानती हूं, उतनाही कम समझ पाती हूं.
अनिरुद्ध : मुझे समझनेकी कोशिश मत करो कविता. लीव्ह मी अलोन. अपनी अंधेर नगरीमें मुझे रहने दो.
कविता : अंधेरे में आप अकेले नही है, मैं भी तो अंधेरे में ही रहती हूं.
अनिरुद्ध : हां! लेकिन तुम्हारे और मेरे अंधेरे मे फर्क है.
कविता : क्या हमारा उजाला, एक नही हो सकता?
‘क्या हमारा उजाला एक नही हो सकता?’ हे ‘स्पर्श’ या या चित्रपटातलं भरतवाक्य आहे आणि या वाक्याचा आशय अनिरुद्ध-कविता या परस्परसंबंधांपुरता मर्यादित नाही. चित्रपटाबाहेरचा मोठा अवकाशही. ते आपल्या कवेत घेतं.
आश्वस्त करणाऱ्या प्रकाशमान दिव्यांशी एखादी माळ असावी, अशी एकमेकांना प्रकाश देणारी नितांतसुंदर प्रसंगमालिका ‘स्पर्श’मध्ये लुकलुकत - ‘आम्ही आहोत... आम्ही आहोत’ असं सांगत राहते. लहान मुलांचे हळूवार प्रसंग. हा प्रकाश थेट आपल्या काळजात उतरवतात... चित्रपटाच्या प्रारंभी पपलू हा डोळस मित्र रामप्यारेला मिडास राजाची गोष्ट सांगतो. चित्रपटाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात, रामप्यारे पपलूला गोष्ट सांगतो, ब्रेलमध्ये कविताने तयार केलेल्या पुस्तकाच्या आधारे. हिशेबही जुनाच. एका गोष्टीसाठी दोन चॉकलेटस्. या दोन दृश्यांच्या आंतरक्रियेतून पडलेला प्रकाशझोत थेट कविता-अनिरूद्ध यांच्या आता काहीशा औपचारिक झालेल्या संबंधांवरही पडतो; कारण अटीतटीच्या एका प्रसंगी मुलांसाठी ब्रेलमध्ये गोष्टीची नवी पुस्तकं का नाहीत, असा प्रश्न विचारलेल्या कविताला-तिनं आतापर्यंत ब्रेल शिकणं आवश्यक का मानलं नाही? असा प्रतिप्रश्न अनिरुद्धनं केलेला असतो. या नात्याची सुंदरता अशी आहे, की काहीशा वादावादीच्या सुरात घडलेल्या या प्रसंगाची परिणती कवितानं मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं ब्रेलमध्ये तयार करण्यात होते. या प्रसंगातून उमललेल्या स्निग्ध प्रकाशात कविता-अनिरुद्ध यांच्यातले नाजूक भावबंध पुन्हा क्षणभर उजळून जातात.
अगदी कविता नवजीवन अंध विद्यालयाकडे कशी आकर्षित झाली, हा प्रसंगही अंध आणि डोळसांनाही एकमेकांच्या प्रकाशात न्हाऊन टाकणारा आहे.
दिवाळीचे दिवस. कविताची मैत्रीण मंजुळ दिवाळीसाठी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुंदर रंगीबेरंगी मेणबत्त्यांच्या खरेदीसाठी कवितासह आलेली. रुपेरी पडद्यावर खूप साऱ्या झगमगत्या मेणबत्त्या. मंजुळ त्या बघून हरखून गेलेली. एक भलीथोरली मेणबत्ती घेऊन मंजुळ पैसे देण्यासाठी जात असतानाच दोन अंध विद्यार्थ्यांमध्ये, कोणी तयार केलेली मेणबत्ती विकत घेतली, जाते याबद्दल विलक्षण उत्सुकता. आपली मेणबत्ती विकली न गेल्यामुळे रामप्यारे हिरमुसलेला. कविता रामप्यारेकडे जाते-
कविता : ये पिलीवाली मोमबत्ती आपने बनायी है?
रामप्यारे : हां जी.
कविता : (स्नेहार्द्र आवाजात) अरे ये तो बहोत खूबसुरत है, बहुतही सुंदर!
कविताची बोटं जणू मेणबत्तीला गोंजारताहेत. नंतर त्यालाही ती प्रेमभरानं कुरवाळते.
कविताच्या साडीचे पोत कुरवाळत,जणू बोटांच्या स्पर्शाने बघत -
रामप्यारे म्हणतोय, ‘आपकी साडी बहुत सुंदर है.’
यानंतरच्या दृश्यात कविता एकदम प्रिन्सिपॉल अनिरुद्धच्या केबिनमध्ये दिसते.संभाषणाच्या दरम्यान, तिने आपला इरादा बदलून अंध विद्यालयात येण्याचं कसं ठरवलं? या प्रश्नाच्या उत्तरादाखल ती सांगते. ‘कुछ चेहरे... कुछ मोमबत्तीयाँ... कुछ स्पर्श...’
चित्रपटात खूप नंतर, अनिरुद्धशी साखरपुडा ठरल्यानंतर कविता आणि मंजुळ साडी खरेदीसाठी जातात. कविता डोळ्यांनी बघून साडीची निवड करण्याऐवजी तिला डोळे बंद करून फक्त स्पर्श करून, साडीची निवड करते; तेव्हाही रामप्यारेबरोबरच्या त्या प्रसंगातील मेणबत्त्यांचा प्रकाश या प्रसंगावर आणि त्यानंतरच्या अनिरुद्धबरोबरच्या सुंदर क्षणांवरही पडलेला असतो.
आपण डोळस आहोत म्हणून आपल्यावर या आंधळ्यांच्या शाळेत अन्याय होतोय.कविता आंटी आपल्याकडे पुरेसे लक्ष न देता रामप्यारेचेच लाड करते, अशा भावनेने घेरलेला पपलू - रामप्यारेच्या घरी सगळेच आजारी पडलेत, असं खोटंच सांगतो. रामप्यारेला खरं कळताच दोघांमध्ये जोरदार मारामारी सुरू होते, दोघांची मारामारी सुरू असतानाच, आपल्याला दृष्टी असल्याने आपण वरचढ ठरतोय, याची जाणीव पपलूला होऊन तो डोळे बंद करून पुन्हा मारामारी करू लागतो. पपलूच्या मनात ही जाणीव निर्माण होणं, हा त्याचा नवा प्रकाश सापडण्याचा - ‘डोळस’ होण्याचा क्षण आहे. समान न्यायासाठी, हा ‘असलेले डोळे’ बंद करून घेण्याचा क्षण एखाद्या अक्षय प्रकाश-कुपीसारखा मनात साठवून ठेवावा असा आहे. जेव्हाही मन काळोखाने घेरले जाईल, पपलूने मुद्दाम बंद करून घेतलेले डोळे आपल्याला या प्रकाश-कुपीकडे नेईल.
‘स्पर्श’मधील अनिरुद्ध आणि कविता यांच्यातले एक प्रेम-दृश्य भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील विलक्षण सुंदर, अर्थसमृद्ध दृश्य ठरावे.
हिरवळीवर निवांत बसलेले अनिरुद्ध आणि कविता.
कविता : क्या सोच रहे हो?
अनिरुद्ध : सोच रहा हंू तुम कितनी सुंदर हो!
कविता : कैसे मालूम?
अनिरुद्ध : नही हो क्या?
.....
कविता : हा... हूं. कहते है-
अनिरुद्ध : (हळुवार हसत) तो क्यूं कहते है जो कहते है?
अनिरुद्ध तिच्यानजीक आलेला. तिच्या खांद्यावर त्याची मान.
कविता : क्योंकि मेरी आखे बडी और भुरी है.
अनिरुद्ध तिच्या डोळ्यांवरून बोटं फिरवतो.
कविता : मेरे बाल घने है,
अनिरुद्ध तिच्या केसांवरून हळुवार हात फिरवतो.
कविता : मेरे होठ... (एक अस्फुट हुंकार...) और मेरा रंग गोरा है.
.....
{ आता अनिरुद्ध त्याच्या दृष्टीने तिच्या सौंदर्याचं वर्णन करतो.
‘पता है कि तुम मुझे सुंदर क्यू लगती हो? क्योंकि तुम्हारे बदनकी, बालोकी महक लुभावनी है. इसलिए तुम सुंदर हो, निशिगंधा के फुल की तरह... तुम्हारी आवाज भावस्पर्शी है... सतार की झंकारकी तरह... और तुम्हारा स्पर्श बहोत कोमल है... इसलिए तुम सुंदर हो मखमल की तरह... और इस सबसे ज्यादा तुम्हारापन...
संपूर्ण भारल्यागत आवाजात कविता त्याला ‘बस... बस... बस...’ म्हणत थांबवते.
दोघेही एकमेकांत संपूर्ण. या दृश्यातच अनिरुद्धपणे मूर्तिमंत कविता साकारत असते.
स्त्री सौंदर्याचं समतोल-तत्व जणू दोघे मिळून साकारताहेत पंचेंद्रियांचे एकात्मीकरण साधून.
‘स्पर्श’ हा चित्रपट त्यातील बदणाऱ्या मनोवस्था एका सुंदर गाण्यानं बांधल्या आहेत.कविता एकटेपणाच्या काळोखात असते तेव्हा तिचे गाणे असते -
खाली प्याला धुंधला दर्पन
खाली खाली मन...
आणि अनिरुद्ध बरोबरच्या, अंध विद्यालयात तिला ‘नवजीवन’ देणाऱ्या सहप्रवासात हे गाणे होऊन जाते -
प्याला छलका उजला दर्पन, प्याला छलका उजला दर्पन
जगमग मन आंगन जगमग मन आंगन
इंदू जैन यांच्या ओळींमधला हा पुनर-उच्चार, मन भरून टाकणारा हा प्रकाश साऱ्या जगाबरोबर वाटून घ्यावा, या भावनेची पुनरुक्ती आहे. या प्रकाशात अनिरुद्धचा अहंगंडात रूपांतरित झालेला न्यूनगंड वितळवून टाकण्याची शक्ती आणि त्यागाच्या आवरणाखाली लपलेले तिचे प्रेम सूर्यफूलासारखे उमलण्याची शक्ती आहे. पण या प्रकाशापर्यंत तिला आणि आणि अनिरुद्धलाही आणले आहे, तिच्या सुरांनी-ध्वनीनं, म्हणूनच सौंदर्यशास्त्रज्ञ विदुषी सुसान लँगर म्हणते, सर्व कलांना संगीत व्हायचं असतं...
- संजय आर्वीकर
arvikarsanjay@gmail.com

Tuesday 4 September 2018

बँडवॅगन इफेक्ट !!



याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केरळच्या एका छोट्या गावात तांदूळ आणि खाण्याच्या वस्तू चोरीच्या संशयावरून वेडसर आदिवासी तरुणाला शिकल्यासवरल्या टोळक्‍यानं बेदम मारहाण केल्याची, ती मर्दमुकी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केल्याची अन्‌ शेवटी त्या दुर्दैवी तरुणाचा मृत्यू झाल्याची संवेदनशील मनाचा थरकाप उडविणारी घटना  पलक्‍कड जिल्ह्यातल्या अट्टापडी इथे घडली होती. नंतरही कधी मोबाईल चोरीच्या संशयावरून तर कधी मुलं चोर समजून, गोहत्या केली म्हणून तर गोरक्षक आहे म्हणून कुठलीही शहानिशा न करता पुढे कुणीतरी दिसतंय म्हणून, संधी मिळालीय म्हणून, गम्मत वाटतेय म्हणून, सगळेच मारताहेत म्हणून गर्दी जमत राहिली आणि मारमार मारून एकट्या तावडीत सापडलेल्या माणसांना गलितगात्र करून, अर्धमेले करून किंवा जीव जाईपर्यंत मारत मज्जा पाहत राहिली. २०१२ मधली दिल्लीच्या निर्भयाशी, मुंबईच्या शक्तीमिलच्या पीडितेशी, काश्मीरच्या आसिफा आणि कितीतरी अश्या केसेस, एकावेळी अनेक माणसांनी मिळून केलेले क्रूर कर्म कुणालाही विसरता येणार नाही.


कुठून येत असेल एवढं क्रौर्य हा संशोधनाचा विषय आहे. पण...मला पडलेला प्रश्न असा कि एकावेळी अनेकजण एखाद्या चुकीच्या गोष्टीत शामिल होतात तेव्हा त्यातल्या एकालाही कुठल्याश्या शुल्लक कारणावरून आपण काहीतरी चुकीचं करतो आहे, वागतो आहे याची जाणीव होत नसेल? 

"बँडवॅगन इफेक्ट" नावाचा एक प्रकार आहे मानसशास्त्रात. यामध्ये व्यक्तिंचा समूह इतर व्यक्ती कशा वागत आहेत त्यानुसार वागायला लागतात.मोठ्या प्रमाणावर इतर लोक काय करत आहेत तसंच लोकं करायला लागतात. चार लोकांसारखं वागलं नाही तर आपण चूक ठरू ही भीती, अतार्किक, कुठलाही सबळ पुरावा नसलेल्या गोष्टींना पाठींबा देण्यास भाग पाडते. यात मग वेळोवेळी खूप साऱ्या घटना येतात जसे की फॅशन, निवडणुकांमधल्या लाटा, गाजलेले सिनेमे, एखाद्या गोष्टीविरुद्ध प्रचंड चीड, संताप…
मनुष्य हा मुळात विक्षिप्त प्राणी आहे. सामाजिक नितिमत्तेने आणि संस्कार मूल्यांमुळे तो त्यांच्यासारख्याच इतर माणसांमध्ये समतोल राखून एकत्र राहतो आणि जगूही शकतो. अनेकदा असा तर्क लावला जातो कि जो पकडला जातो तो गुन्हेगार ठरतो म्हणजे माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारी, निंदक; बकवा करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी आहेतच जन्मतः जी तशी नाहीयेत त्यांना खरतर तसे काही करण्याची  कधीच संधी मिळाली नसते म्हणून त्यातून विनासायास सुटू शकलेले असतात. गुन्हा करायची संधी मिळाली तर कुठलाही मनुष्य ती सोडणार नाही. जसजशी  मानवाची  शक्ती आणि क्रौर्य वाढत जातंय, तसतशी बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता त्या प्रमाणात कमी कमी होत जाते आहे अशी शंका उपस्थित व्हायला वाव आहे.. या साऱ्या संसारात सगळा पसारा त्याने स्वतःशीच खेळता यावं म्हणून मांडून ठेवलाय आणि तो पसराच आता त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीच्या विनाशाला आणि पर्यायाने सुरक्षित जगण्याच्या विश्वासाला तडा देणारा ठरतो आहे.  सध्या इथे एकच कायदा आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट!! म्हणून कट थ्रोट स्पर्धाही या स्पर्धेत टिकाव धरायला माणूस कुठलाही स्तर गाठायला तयार झालाय आणि या मानवी मानसिक बदलांची पडझड आता झपाट्याने वेग घेते आहे. 

युगोस्लावियाची सुप्रसिद्ध कलाकार मरीना अब्रोमोविक हिने १९७४ मध्ये अशीच माणसांची मानसिकता तपासून पाहायला ''रिदम झिरो'' नावाने एक प्रयोग केला. ती येणाऱ्या जाणाऱ्यांना सहज उपलब्ध होईल अश्या जागी उभी झाली. तिच्या पुढ्यात ठेवलेल्या टेबलवर ७२ प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या होत्या. या वस्तू दोन भागात विभागल्या होत्या एक हानी पोचवणाऱ्या ज्यात ब्लेड, सूरी, काटे, पिस्तूल अश्या बऱ्याच वस्तू होत्या, दुसऱ्या बाजूने आनंद देणाऱ्या वस्तू होत्या उदाहरणार्थ गुलाब फुले, चॉकलेट आणि बरंच काही. मरिनाने घोषित केले ती पुढली ६ तास अशीच उभी राहणार आहे आणि लोकांना तिच्यासोबत वाटेल ते करण्याचा अधिकार आहे. या ६ तासात तिच्यासोबत जे काही होईल त्याला फक्त ती स्वतः जबाबदार राहील. त्यानंतर काय झाले हे जाणून घेतले तर माणसाच्या मनातल्या अतृप्त विकृत इच्छा या स्तरापर्यंत जातात जाऊ शकतात यावर विश्वास बसत नाही. सुरुवातीला काही माणसांनी तिला स्पर्श करून पहिला ती हालत नाही, काहीच बोलत नाही हे पाहून ते निर्ढावत गेले, तिला नको नको त्या ठिकाणी स्पर्श होऊ लागले, पुढल्या अर्धा तासात एकाने तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केला, नंतर कुणीतरी तिला निर्वस्त्र केले, तिच्या शरीरावर काही माणसे चावा घेऊ लागले, एका इसमाने तिच्या हातात पिस्तूल दिला आणि गनपॉईंट तिच्या गळ्यावर करून उभे राहायला सांगितले. कुणीतरी तिच्या शरीरावर सुरीने घाव केले. नंतर माणसे एकत्र येऊ लागली एकावेळी ४-६ माणसांनी तिला उचलून लेटवले तिच्या अंगावर काटे टोचवले, कचरा टाकला तिच्या संपूर्ण शरीरावर स्पर्श करून नाजूक ठिकाणी सुरीने भोसकून रक्तही काढले.

मरिना सांगते जसजसा वेळ जात होता लोक गटाने येऊन कृती करायला लागले होते. त्यांना एकमेकांचा संकोचाही उरला नव्हता. याकाळात तिने क्रूरतेचा पराकोटीचा अनुभव घेतला.. शेवटचे दोन तास तर तिला असह्य वेदनेच्या   दुष्टचक्रातून जावे लागले. मानवतेवरचा विश्वासच उडावा इतका धक्कादायक प्रकार घडत होता. संधी मिळाली आणि त्याचे कुठलेही परिणाम भोगावे लागणार नाहीयेत हे ठाम झाल्यावर पशूहून पाशवी झालेल्या माणसांनी असा उच्छाद मांडला होता. यात बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांनी तिला गुलाबफूल अन गालावर किस दिले होते. 



विषय माणूस कुठल्या स्तरावर जाऊन अत्याचार करतो हा नाहीच आहे, विषय मानसिकतेचा आहे. एका बाजूला सकारात्मक बाबी असतांना दुसऱ्या बाजूला असणाऱ्या नाकारात्मकतेकडे बहुतांश लोकं आकर्षित होतात आणि एकत्र येऊन कुठलाही संकोच न बाळगता नकारात्मक किंवा समाजमान्यते बाहेरील चुकीच्या गोष्टी मग  त्या इतरांसाठी घातक असल्या तरी बेहत्तर बेधडक  करतात आणि त्यातून मनोरंजन करून घेऊन, विनोद घडवून आणून आनंद घेतात, प्रक्रियेचा भाग नसले तरी बरेच बघ्यांच्या भूमिकेतही निष्क्रिय असतातच तेव्हा या विकृत मनोवृत्तीने आपण किती ग्रासले गेलो आहे, आपल्या संवेदना किती बोथट झाल्या आहेत हे लक्षात येते.

हल्ली यातलाच एक नवा जमान्याचा नवाच ट्रेंड सुरु झाला आहे 'व्हर्च्यूवल मॉबलिंचिंग'

  परवा सचिन पिळगावकरांच्या 'मुंबई अँथम' या गाण्यावरून आणि नंतर त्याने त्याच्या पानावर दिलेल्या स्पष्टीकरणावरून सोशल मीडियावर ट्रोलिंग करून जो काही गदारोळ चालू आहे ते पाहून फार अस्वस्थ व्हायला झालं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबत प्रचंड जागृत असलेले आपण इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जागृत असणे सोडाच सहिष्णूदेखील होऊ शकत नाही हे एकत्र एक समाज म्हणून जगतांना किती घातक आहे ह्याची कल्पना आपल्याला का येत नाही ? हि फक्त सुरुवात असेल तर ह्याचे भविष्य किती भयावह असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. एखादा कलावंत त्याच्या कलेला आणि प्रोफेशनलाही बांधील असतो हे समजण्याइतकीही समजूतदार हल्ली बाळगली जात नाहीये. कलाकार माणूसही असतो, त्यालाही परिवार बायको मुलं, आई-वडील  असतात आणि आपल्या माणसाशी जग इतकं घाण इतकं वाईट पद्धतीने वागतंय याच किती लोकांना दुःख असेल याच जराही वैषम्य हल्ली हि व्हर्च्यूवल गर्दी बाळगताना दिसत नाही.  एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर उभे कि आडवे फटके मारावे, एखाद्या गायकाने-संगीतकाराने कुठला सूर कुठला ताल आळवावा, एखाद्या लेखकाने कुठल्या विषयावर पुस्तक लिहावे खरतर हा सल्ला देणे वेगळे. एखादी कलाकृती आवडली नसेल तर तसे निक्षून सांगणे वेगळे... पण एखादी कलाकृती आपल्याला न आवडणे किंवा न पटणे हा एव्हढा मोठा गुन्हा असतो कि त्यासाठी हजारोने माणसे एकत्र येऊन तासनतास त्या कलाकारांशी असभ्य वर्तन करतात, अगदी खालच्या दर्जाच्या शब्दांचा वापर करून, गलिच्छ भाषेचा उपयोग करून सतत अपमान करीत राहतात. आणि एवढेच नाही तर स्माईलीच्या मागे दडून हजारो बघे दात काढत करमणूक करवून घेतात.

त्या व्हर्च्युअल पडद्यामागेही एक जिवंत व्यक्ती बसली आहे हे का विसरतो आपण? एखाद्याविषयी इतका विखार इतका वाईटपणा पसरवायचा अधिकार कुणी दिला आपल्याला ?? इंटरनेटने सोय करून दिली आहे म्हणून आणि एखाद्याच्या हाताने झालेल्या चुकीने संधी प्राप्त झाली आहे म्हणून शाब्दिक मार हाणणारे..अपमानास्पद शब्द शस्त्रांनी वार करून गर्दीपुढे एकट्या पडलेल्या पुढल्याच्या मनोबलाचे चीरहरण करून त्याला पूर्णतः त्याच्या क्षेत्रातून संपवण्याचा प्रयत्नच तर करतोय .. आणि   आपण काहीतरी चुकीचे करतो आहे असे हजारोच्या संख्येतल्या एकालाही वाटू नये किंवा ज्याला वाटेल तोही यात भरडला जाईल इतकी हि विखारी प्रखरता आम्ही वाढवून अधिक शक्तीने वार करू हि छुपी धमकी.

पुन्हा प्रश्न पडतो तो इतकाच संधीचा सकारात्मक वापर करण्यापेक्षा नकारात्मकतेकडे झुकाव वाढतो आहे. जिथे चांगले करायची संधी असेल तिथून अनेक निमित्त्य सांगून पळ काढणारे नकारात्मकता वाढवणाऱ्या, समाजासाठी घातक असणाऱ्या गोष्टीत आवर्जून सहभागी होताना दिसतात. दीर्घकालीन फायद्यांपेक्षा किंवा भविष्यात नुकसान होणाऱ्या गोष्टींचा विचार पूर्वक स्वीकार-अस्वीकार करण्यापेक्षा, वैचारिक समजूतदारीचा, इतरांच्याबाबतीत सहिष्णू होण्याची क्षमता वाढवण्याचा कल संपुष्टात येऊन क्षणाच्या करमणुकीला जास्त महत्व दिलं जात आहे. या मानसिकतेची लागण होणं किंवा संक्रमण होणं आजच्या आणि पुढच्या पिढीलाही फायद्याचे ठरू शकत नाही.   
 तेव्हा आता थांबलं पाहिजे ... थांबवलं पाहिजे.
रश्मी पदवाड मदनकर 
२ सप्टें. २०१८
(लेख कॉपी राईट आहे. सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन)

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...