Tuesday 30 August 2016

माणुसकीचा बोन्साय ...



जन्म नेमका कशासाठी घ्यायचा, कशासाठी जगायचे आणि काय नेमके काय करून मरायचे हे बरेचदा अनेकांना सतावणारे प्रश्न असतील. जगतांना येणाऱ्या सगळ्या संकटांना सगळ्या कसोटींना तोंड द्यायला तयार असणारा माणूस, कष्ट करत दुःख भोगत जगणारा माणूस, एकमेव शाश्वत सत्य असणाऱ्या 'मृत्यूला' मात्र घाबरतो,. खरतर आयुष्यच  माणसाला जन्मभर छळत असतं. आयुष्य नावाच्या यातनांतून सुटका हवी असेल तर एकमेव मार्ग ...  मृत्यू.
कवी सुरेश भटांच्या ओळी आठवतात  'इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते'  ... पण ज्यांनी जीवनही वेदना हृदयाशी कवटाळून गोधडीच्या चरचर झालेल्या चिंध्यासारखे निष्प्रभपणे जगले, सुखाच्या सावलीचाही स्पर्श ज्यांच्या वाट्याला कधीच आला नाही अश्या अभाग्यांना मृत्यूनंतरही सुटका मिळू नये? मृतदेहाचीही विटंबना व्हावी... स्मशानापर्यंतचा प्रवास आयुष्याहून अधिक खडतर व्हावा हि कसली नियती? सरणापर्यंत पोचायलाही यातनांचा पूल पार करावा लागावा अन मृतदेहालाही ठेचकाळत, डुचमळत जावे लागावे.  वैकुंठापर्यंतचा प्रवासही असा पीडादायी असावा.  गरिबीच्या झळा माणसाला कुठवर सोसाव्या लागाव्या? हे कसले भोग आणि हे कसले नशीब. हे भोग नियतीचे नव्हतेच, भोग होते बौद्धिक बाता करणाऱ्या असंवेदनशील समाजाच्या तथाकथित नैतिक जबाबदारी झटकून पळ काढणाऱ्या वृत्तीचे. हे भोग होते माणसाचे माणूसपण गहाळ झालेल्या नुसतच पोकळ उरलेल्या संस्कृतीचा धोशा मिरवणाऱ्या बेगडी सामाजिक मूल्यांचा.

असेच दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या बायकोचे कलेवर खांद्यावर घेऊन गाव गाठू पाहणाऱ्या दाना मांझीची हि हृदय पिळवटून टाकणारी घटना. ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातल्या भवानीपटना येथील दाना मांझी या माणसाची पत्नी क्षयरोगावर उपचार घेत असतांना रूग्णालयात मरण पावली. प्रचंड हलाखीच्या परिस्थितीत दिवस कंठणाऱ्या दाणाला पैसे लावून गाडी करून तिला 60 किलोमीटरवर असणाऱ्या गावी पार्थिव घेऊन जाणे शक्य नव्हते. रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय अधिकारी सगळ्यांना त्याने गावापर्यंत ऍम्ब्युलन्सची सोय करून द्यावी म्हणून विनंती केली. पण मुळात पाषाण झालेल्या यंत्रणांना पाझर फुटेल कसा?? अखेर मांझीने मृत पत्नीचे शव खांद्यावर लादले सोबत आपल्या मातेच्या मृत्यूमुळे शोक व्यक्त करणारी त्याची १२ वर्षांची मुलगी चौला अश्रू ढाळत मागे चालत राहिली आणि सुरु झाला प्रवास सरणावरच्या यातनांचा.

अपघात होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या, संकटात सापडलेल्या, दुःखाने हतबल झालेल्या माणसांच्या अनेक कथा रोज आपण ऐकतो. पण आमच्या आतल्या संवेदना जाग्या होत नाहीत. आमच्यातल्या 'माणुसकी' नावाच्या संवेदनेचा बोन्साय झालाय. असे काही घडले कि आम्ही शासनाला दोष द्यायला आणि त्यांच्या माथी सारे आरोप मारून सोयीस्करपणे आमचा 'ढिम्मपणा' जपायला पुन्हा मोकळे होतो. मांझींचा 12 किलोमीटर पर्यंतचा प्रवास बघ्यांच्या मनोरंजनाचा विषय ठरला. सोशल नेटवर्किंग वरून त्यावर मस्करीही करण्यात आली. त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवरून संतापाच्या प्रतिक्रियाही गाजल्या, पण प्रत्यक्षात अश्या भयंकर परिस्थितीतही एखाद्या गरजूला मदतीचा हात कुणीही पुढे करू नये हि शोकांतिका नाहीये का? सुदैवाने एका स्थानिक पत्रकाराने याचे चित्रीकरण करून वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठविल्याने भराभर सूत्र हलली आणि पुढील ५० किलोमीटरसाठी वाहन उपलब्ध होऊ शकले.

दाणा मांझीने त्याच्या पत्नीचे शव खांद्यावर लादले होते त्याच्या स्वतःच्या संवेदना जिवंत असल्याचे ते लक्षण होते. पण आम्ही आमच्या बधिर झालेल्या संवेदना अन स्वतःच मारून टाकलेल्या माणुसकीचे पार्थिव खांद्यावर घेऊन जगतो आहोत कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिप्त राहून मजा बघण्याची आत्ममग्न राहण्याची हि अधम प्रवृत्ती वाढीस लागते आहे. हे कुणाच्याच हिताचे नाही हे लक्षात घ्यायला हवे. वेळीच जागे व्हायला हवे अन्यथा खूप वेळ होईल .... खूप वेळ होईल

रश्मी पदवाड मदनकर / २९ऑग.१६











Monday 22 August 2016

अल्झायमर - एक गंभीर समस्या


अल्झायमर - एक गंभीर समस्या



काही मानसिक आजारांवर आपल्या देशात फारशी चर्चा होत नाही. खरतर मानसिक आजारात वेगवेगळे आजार असतात आणि योग्य उपचाराने ते बरेही होतात.  याचेच मुळी ज्ञान आम्हाला कमी आहे. मानसिक आजार म्हंटले कि ती व्यक्ती ठार वेडी असते या एकाच निष्कर्षाप्रत आम्ही पोचतो. म्हणजेच ठार वेडे होणे या टोकापर्यंत पोचेपर्यंत मधल्या काळात रुग्णाला होणार त्रास किंवा त्याच्यातले बदल टिपले सुद्धा जात नाही. मग पुढे त्याचा गांभीर्याने विचार होणे किंवा उपचार करवून घेणे, त्याची सहृदयाने काळजी घेणे या अपेक्षा गौणच राहतात. मानसिक आजाराकडे दुर्लक्ष होण्याचे कारण फक्त समाज, नातलग किंवा लोकच करतात असे नाही तर मानसिक आजारांवर हवे ते उपाय करता यावे म्हणून संशोधन घडवून आणून नवनवी उपचार पद्धती विकसित करणे किंवा तसे तंत्रज्ञान उपलब्ध करवून देणे यातही फारसे गांभीर्य दाखवले जात नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे 'अल्झायमर' सारखा आजार.

काही वर्षाआधी अल्झायमर रोगाचा प्रादुर्भाव फार नव्हता. पण आज 40 लाख लोकांना अल्झायमर सारखा मानसिक आजार असल्याचे आकडे सांगतात. आणि आकडे असेही सांगतात कि आज वाढतोय त्याच वेगाने हा आजार वाढत राहिला तर 2050 साली हि संख्या 150 करोड इतकी असेन. काही काळाने अल्झायमर पीडित रुग्णांची संख्या दोनामागे एक इतकी असेन. म्हणजेच एकतर आपण स्वतः ग्रसित असू किंवा या रोगाने ग्रस्त माणसांच्या सेवेत गुंतलेले असू. हे सगळे ऐकतांना फार भयंकर वाटत असले तरी सध्यस्थिती आहे.

1901 साली ऑगस्ते डीटर नावाच्या महिलेला उपचारार्थ फ्रैंकफर्ट हॉस्पिटलला आणण्यात आले. ऑगस्ते भ्रमितवस्थेत होती. तिला तिच्या आयुष्याच्या प्राथमिक बाबी सुद्धा लक्षात येत नव्हत्या. डॉ अलोइस अल्झायमरने तिच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न केले पण नेमका हा काय आजार आहे हे त्यांच्याही लक्षात येत नव्हते. ते तिच्यावर तरीही उपचार करीत राहिले. 1906 साली तिचे निधन झाले. हि पहिलीच महिला होती जिच्यात या आजाराची सगळी लक्षणे असल्याचे निदर्शनात आले. आणि तेव्हापासून या मानसिक आजाराला 'अल्झायमर' असे नाव पडले. 1901 हा फार जुना काळ नाही त्यानंतर अनेक दुर्धर रोगांवर प्रगत औषध, व्हॅक्सिन आणि अँटिबायोटिक औषधांचा शोध लावला.  कँसर साठी अनेक उपचार पद्धती, एचआयव्ही साठी एनिरेट्रो वायरल, हृदयरोगाची स्टॅटिन असे अनेक उपचार उदयास आले पण हि शोकांतिका आहे कि अल्झायमर आणि आणखी इतरही मानसिक आजारांवर आपल्याकडे अजूनही आवश्यक उपचार पद्धती विकसित झालेली नाही.

म्हणूनच आपल्यासारख्या साधारण माणसांनी पुढाकार घेऊन मानसिक रोगांसाठी आणि रुग्णांसाठी काहीतरी केले पाहिजे. या रुग्णांना मानवतेची वागणूक देण्यासोबतच हि वेळ आपल्यावर येण्याआधी याचे गांभीर्य सरकारपर्यंत आणि मेडिकल कौन्सिलवर बिंबवणे आवश्यक आहे. चलातर जागरूक नागरिक म्हणून पुढे येऊया. सामाजिक आरोग्यासाठी प्रयत्न करूया. 

भय इथले संपत नाही ...

मंगला जेधे नावाच्या महिलेच्या खुनाच्या आरोपावरून संतोष पोळ नावाच्या बनावट डॉक्टरला अटक होते आणि एक दोन नाही तर तब्बल 6 खून त्याने केले असल्याचे तपासात उघडकीस येते. एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे प्रत्यक्षात उतरलेले प्रकरण, हाहा म्हणता राज्यभरात चर्चेचा विषय ठरते आणि पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेची संतापजनक प्रतिक्रिया सगळीकडे उमटू लागते. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मागल्याच आठवड्यात हा सारा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेसोबत एकंदरीतच प्रशासनावर प्रश्न उभे राहिले. हि बातमी वाचली आणि नकळत डोळ्यासमोरून भूतकाळ सरकू लागला.

मला आठवतं मी लहान असतांना अमरावतीला आजोळी गेले होते. दर उन्हाळ्यात सुट्ट्यात जायचो. एरवी सतत भटकंती करायला हौसून असणारे मामा-मावशी त्या उन्हाळ्यात मात्र कमालीचे धास्तीत होते. तरुण मुलींनी घरातून बाहेर पडायचे बंद केले होते.1991-92 सालातील ही घटना असावी. रस्त्याने जाणाऱ्या मुलींच्या घोळक्यातल्या बरोबर डाव्या बाजूच्या मुलीवर सायकलने येऊन चाकूने हल्ला करणाऱ्या सीरिअल किलरच्या दहशतीत संपूर्ण अमरावती शहर वावरत होते. पुढे तो पकडला गेला. एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे तपासात पुढे आले होते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा लक्ष वेधून घेणारी हि घटना. वयाच्या नवव्या वर्षी मला प्रश्न पडला होता 'नराधमांचे सावज महिलाच का असतात??'  हाच प्रश्न आजही सतावतो.

2010 साली असेच एक सीरिअल हत्येचे प्रकरण गाजले. मुंबईतील कुर्ल्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करणारा जावेद मोहम्मद रहमान आणि त्याचे आणखी दोन साथीदार 19-20 वर्ष अल्पवयाच्या या त्रिकुटांनी वासनेपोटी एकापाठोपाठ एक अनेक अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचे आयुष्य संपवले. या राक्षसांच्या तावडीतून पळून आलेल्या एका मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे अखेर ते पकडले गेले.  2011 साली पणजीत गाजलेले क्रमिक हत्येचे आणखी एक प्रकरण, वासंती गावडे या तरुणीच्या खूनप्रकरणी सीरिअल किलर महानंद नाईक याला अटक करण्यात आली. एका खुनाचा आरोप असणाऱ्या महानंद नाईक ने एक दोन नव्हे तर तब्बल 16 महिलांचा बलात्कार आणि हत्या केल्या असल्याचे तपासात पुढे आले होते. 2014 साली कऱ्हाड तालुक्यात काही वृद्ध महिलांच्या हत्या करण्यात आल्या. काशिनाथ काळे या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी व त्याच्याकडून निष्पन्न झालेले गुन्हे तपासात पुढे आले, प्रतिकार न करू शकणाऱ्या वृद्ध महिलांवर पैसे व दागिने लूट अश्या अत्यंत क्षुल्लक कारणासाठी त्याने हल्ले करून खून केल्याचे उघड झाले होते.

निठारी हत्याकांड  तर संपूर्ण देशालाच हादरवून गेले. 29 डिसेंबर 2006 रोजी नोयडाच्या निठारी गावातून बेपत्ता झालेल्या सुमारे दोन डझन तरुण मुली आणि लहान मुलांच्या हत्येची सनसनाटी घटना उघडकीस आली होती. नोयडाच्या सेक्टर ३१ मधील डी-५ या बंगल्याचा मालक मोनिंदरसिंग पंधेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली यांनी अनेक मुलींवर बलात्कार करून त्यांना ठार केले आणि त्यांचे मांस भक्षण केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते.

या दोघांना अटक झाली. त्याचदरम्यान रवींद्र नावाचा एक नराधम श्वापद दिल्लीत अश्याच हत्याकांडात लिप्त होता. 2008 पासून पुढे 7 वर्ष तो बलात्कार आणि हत्या करीत राहिला. दर दोन महिन्याने 1 लहान मुलगी याप्रमाणे 7 वर्षात 28 जणांशी त्याने बलात्कार करून हत्या केली होती. एकनाअनेक कित्तेक प्रकरणे.




 या समाजाला छेद देणाऱ्या घटना घडत होत्या आणि आज कित्तेक वर्षांनी तश्याच घडत आहेत.  विकासाच्या नावाने  बाविसाव्या शतकाचे अग्रगण्य राष्ट्र म्हणून भारताचे नाव गणले जात असतांना आज अजूनही आम्ही संरक्षणासाठी कळकळीची मागणीच करत असू तर त्या विकासाचे करायचे काय ? आजही उपायांवर आणि सकारात्मक बाबींवर न बोलता आमची वेळ न ऊर्जा असल्या आटोक्यात न आलेल्या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि घटना निस्तरण्यात खर्ची पडताहेत.

समाजानेही झालेल्या घटनेची  केवळ चर्चा करून किंवा चघळून चघळून चोथा करून चालणार नाही तर त्यामागची कारणे जाणून घेऊन वैचारिक सामंजस्याने सोल्युशन काढणे गरजेचे आहे. समाजात एकमेकांशी अलिप्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. प्रत्येकजण प्रॅक्टिकल होऊ बघतो आहे. त्याचा अचूक फायदा घेण्याची मनोवृत्ती गुन्हेगारांत बळावते आहे.  त्यातून विकृती फैलावत जाते आहे. विशेषतः शहरात प्रमाण वाढते आहे. समाजाच्या हिताच्या दृष्टीने प्रत्येकाने जागृत होण्याची वेळ आली आहे. शासन प्रशासनाच्या भरवशावर न बसता प्रत्येकाने हि जबाबदारी उचलली पाहिजे. सजग आणि निर्भीड समाज, जबाबदार नागरिकच असे दुष्प्रकार थांबवू शकतो. नव्या पिढीच्या जडणघडणासाठी प्रत्येकाने पाऊल उचलायला हवे. 

Monday 8 August 2016

नैराश्यातून आशेकडे (मनाचिये गुंती)


आयुष्यात अनेक घटना घडतात, काही प्रसंग अत्यंत कडवट अनुभव देणारे असतात. ते कुठेतरी मनाच्या तळाशी साठून राहतात. विसरता विसरले जात नाहीत. कधीतरी मध्येच एखाद्या धक्क्याने ते सगळं स्मृती पटलावर येतात असे वारंवार घडत राहते अन आयुष्य त्या घटनेच्याच अवती भवती घुटमळत राहते. हि नैराश्याची स्थिती फार गंभीर असते. यातनामयी भूतकाळात गुरफटला गेलेला माणूस वर्तमान आयुष्यही मातीमोल करतो आणि साऱ्या जगण्याचीच राखरांगोळी होत जाते. कुठलीही दुःखद घटना पचवणे-विसरणे सोपे नसते. काही काळ ती मनात ठाण मांडून बसते हे जरी खरे असले तरी जीवन जगतांना येणारे नवनवीन आव्हान झेलताना, नवीन अनुभव घेतांना ते क्षण त्या आठवणी पुसट होत असतात किंबहुना व्हायलाच हव्या असतात. असे जेव्हा घडत नाही, त्याच त्याच आठवणी उगाळून तेच ते दुःख तो रवंथ करीत राहतो तेव्हा माणूस नैराश्येने ग्रासला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पण असे होत नाही, त्याच्या वागण्याचा वैताग येऊन त्रासलेली लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्याच्याशी बोलायचे टाळतात किंवा चिडचिड करतात. त्याचे उलट परिणाम होतात. नैराश्यग्रस्त माणूस अधिकाधिक गुरफटत जातो. मन मोकळं न करता आल्याने आतल्या आत घुसमट होते आणि समस्या अधिकच गंभीर रूप धारण करते.

हा सारा संबंध असतो तो मनाशी. बुद्धीने कितीही युक्तिवाद केला तरी काही गोष्टी मानायला मन तयार नसते आणि म्हणून अश्या माणसांना कितीही समजावून सांगण्याचा आपला प्रयत्न व्यर्थ ठरतो. आपली तर्कनिष्ठता आपले वाक्प्रभुत्व सपशेल फसतं. गरज असते ती अश्या नैराश्याने ग्रस्त माणसांना धीराने आधार देण्याची. मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांचे उपचार सुरु करावे पण त्या बरोबरच त्यांची मानसिक अवस्था समजून घेऊन त्यांना अतिशय सकारात्मक रीतीने त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्याची. त्यांच्या मनातील नकारात्मकता काढून घडलेल्या घटनेला विसरायलाच हवे असाही आग्रह न धरता ती स्वीकारून परिस्थितीचा सामना करत पुढले आव्हानं पेलून आगेकूच करायला त्यांना पुन्हा बोट धरून मार्गक्रमण करायला लावणाऱ्या सच्च्या मित्राची भूमिका आपल्याला बजावत येते का याचा प्रयत्न करायला हवा. नैराश्याने ग्रासले असतांना अशी साथ आणि योग्य उपचार रुग्णाला लवकर बरे होण्यास खूप बळ देतात.

(दैनिक सकाळ नागपूर आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित )

Wednesday 3 August 2016

तेजशलाका अरुंधती

कविसाव्या शतकात शांतता व शाश्वत समुदायाच्या उभारणीसाठी कराव्या लागणा-या खडतर प्रयत्नांमध्ये जागतिक पातळीवर महिलांचा सहभाग अत्यावश्यक आहे. तश्या जगभरातील विदुषीका पुढेही येत आहे.  हिलरी क्लिंटन यांनी या युगाचे वर्णन ‘सहभागाचे युग’ असे केले आहे. आपण जात, धर्म व लिंगभेद विसरून समाजामधील एक बहुमूल्य घटक बनण्याकडे व समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असे त्या म्हणतात. आज हे त्यामानाने सहज वाटत असले तरी साठाव्या दशकात राजकीय क्षेत्रात महत्वाचे स्थान मिळवून त्यासाठी काम करणं तितकसं सोप्प नव्हतं. तसं पाहता समाजातील स्वतःचे न्यायस्थान भारतातील महिलांना जगभरात कुठेही पुरुषांपेक्षा कमी मिळाले नाही. गेल्या शतकात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाच्या आणि त्यातून महिलांनी साधलेली प्रगतीचा  प्रवास आजही अचंभित करतो. परराष्ट्र धोरणाच्या कार्यात भारतातून महिलांचा सहभाग अगदीच नगण्य असला तरी, 1963 साली परराष्ट्र सेवेत रुजू झाल्यानंतर पुढले चार दशकं आपल्या बहुमूल्य कार्याचा ठसा या क्षेत्रातील प्रत्येक घडामोडीवर उमटविणाऱ्या,  'व्यापक अणुचाचणी प्रतिबंध करारावर' (सीटीबीटी) भारताची बाजू मांडण्यात महत्त्वाची व निर्णायक भूमिका बजावणाऱ्या अरुंधती घोष यांचे नाव आज अग्रस्थानी घेतले जाते. जगतिक मंचावर अण्वस्त्र प्रसारासारख्या ज्वलंत विषयावर आपल्या देशाची भूमिका शांत, संयत पण ठामपणे मांडणारी अस्सल देशी भारतीय प्रतिमा म्हणजे अरुंधती घोष.

संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेत भारताच्या राजदूत म्हणून भूमिका वठवणाऱ्या अरुंधती घोष यांचे नुकतंच निधन झाले.  नेहरू घराण्याच्या सरकारच्या काळातील प्रसिद्ध परदेश खात्यातील त्या एक अधिकारी होत्या. घोष यांचा जन्म बंगाली कुटुंबात झाला असला, तरी त्यांची जडणघडण मुंबईत झाली. कोलकात्यातील लेडी ब्रेबोर्न महाविद्यालय आणि विश्‍व-भारती विद्यापीठात शिक्षण झाल्यानंतर 1963 मध्ये त्या भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्या. भारताच्या मुत्सद्दी म्हणून त्यांनी अनेक युरोपीय देशांमध्ये काम केले. यामध्ये ऑस्ट्रिया, दक्षिण कोरिया, इजिप्त आणि नेदरलॅंड आदी देशांचा समावेश आहे. जिनिव्हातील अमेरिकेच्या कार्यालयात स्थायी प्रतिनिधी म्हणून काम पाहणाऱ्या त्या पहिल्या अधिकारी होत्या. त्या प्रथम चर्चेत आल्या ते जिनिव्हा येथे आण्विक चाचणीबंदी करारासंबंधी परिषदेत मांडलेल्या त्यांच्या भूमिकेमुळे. स्वसंरक्षणासाठी इतर देशांप्रमाणेच भारतालाही अण्वस्त्रसज्ज होण्याचा अधिकार आहे. संपूर्ण नि:शस्त्रीकरणासाठी भारत कोणाच्याही दबावाखाली शस्त्रे टाकणार नाही; तर त्याबाबत एकमत होऊन सर्व देशांनी शस्त्रत्याग केल्यावर आम्हीही स्वखुशीने आपली शस्त्रे संपवू, ही भारताची भूमिका त्यांनी अत्यंत ठामपणे महासत्तांच्या पुढ्यात मांडली होती. . दक्षिण आशियात लहान सहन शस्त्रांवर नियंत्रण आणण्यासाठी त्या आग्रही होत्या. त्यांचे पुतणे आणि सामाजिक कार्यकर्ते संजय घोष यांची आसाममधील ‘अल्फा’च्या दहशतवाद्यांनी १९९७ साली अपहरण करून हत्या केली होती. त्यामुळे त्यांनी भोगलेल्या या दुःखाची झळ पसरू नये असे त्यांना वाटे.  बांग्लादेशातही त्यांनी अज्ञातवासातील बांगलादेशी असे कोलकात्यात बंगाली नेते ताजुद्दीन अहमद सरकारचे मुख्य संपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या या कामाचा गौरव २०१२ साली देशाच्या ४१व्या स्वातंत्र्यदिनी बांगलादेशने केला.

  सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या नि:शस्त्रीकरणविषयक सल्लागार मंडळाच्या सदस्य म्हणून काम केले. रराष्ट्र खात्याच्या नि:शस्त्रीकरणविषयक कृती गटाच्या सदस्य अश्या अनेक जबाबदाऱ्या त्या निभावत राहिल्या. 

(बुधवार दि. ३/०८/२०१६ सकाळ नागपूर आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...