Tuesday, 12 May 2026

कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी

 प्रतिथयश कवयित्री, लेखिका मिनल येवले यांनी #कायांतर कादंबरीवर लिहिलेले हे पुस्तक समीक्षण.. मिनल ताई आणि देशोन्नती मनःपूर्वक आभार

🙏🌹🌿
********
*कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी*
कायांतर ही पद्मगंधा प्रकाशनची निर्मिती असलेली आणि पुणे येथील पुस्तक महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झालेली रश्मी पदवाड मदनकर यांची दुसरी बहुचर्चित कादंबरी आहे. एका देहातून दुसरा जन्म घेतलेल्या तृतीयपंथीय आंचल वर्मा या ट्रान्सजेंडर महिलेच्या जिवंत, ज्वलंत आणि अंतर्मुख करणाऱ्या संघर्षाची ही कहाणी आहे. स्त्री-पुरुष या चौकटींपलीकडील ‘तिसरे लिंग’ आपल्या समाजाला अजूनही सहज स्वीकारता आलेले नाही. त्यांच्या अस्तित्वाकडे पाहताना समाज आजही कचरतो; बोलताना, समजून घेताना, अगदी त्यांच्या शेजारी उभे राहतानाही.
निसर्गाने निर्माण केलेल्या या जीवांना मात्र समाजाने उपेक्षेची शिक्षा दिली आहे. लाज, अवहेलना, टाळले जाणे, पावलोपावली करावा लागणारा स्वाभिमानाचा संघर्ष, पोटापाण्यासाठी शोधावे लागणारे खाचखळग्याचे मार्ग आणि केवळ अस्तित्व सिद्ध करण्यासाठीची लढाई....हे सगळे अनुभव या कादंबरीत अत्यंत दाहक आणि अस्सलपणे उलगडले आहेत. ‘कायांतर’ ही केवळ एका व्यक्तीची कथा नाही; ती संपूर्ण तृतीयपंथीय समुदायाच्या वेदनेचा, अस्मितेचा आणि मानवी अस्तित्वाच्या हक्काचा आवाज आहे.
कायांतर मध्ये एलजीबीटीक्यूएआय समुदायातील विविध गटांचा स्वतंत्र आणि गुंतागुंतीचा लढा रश्मी पदवाड मदनकर यांनी अत्यंत संवेदनशीलतेने उलगडला आहे. प्रत्येक गटाचा संघर्ष वेगळा...स्वतःला जगवताना, स्वतःची ओळख सिद्ध करताना, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्याच अंतरंगाशी सुरू असलेल्या द्वंद्वाशी दोन हात करताना. एका शरीरात दोन भिन्न लिंगांची आतल्या आत चालणारी घुसमट, आणि बाहेरच्या सामाजिक आयुष्यात सतत भोगावी लागणारी उपेक्षा ही द्विस्तरी वेदना कादंबरीत प्रखरपणे समोर येते.
समाजातील एका वर्गाच्या वाट्याला आलेल्या जीवघेण्या दुःखाची ही कहाणी ‘कादंबरी’ या साहित्यप्रकाराच्या मर्यादा आणि वैशिष्ट्ये जपत प्रभावीपणे आकाराला आली आहे. ट्रान्सजेंडर आंचल वर्मा या नायिकेचा जीवनपट सहसंवेदनेने रेखाटताना ही कथा केवळ तिची वैयक्तिक कहाणी राहत नाही; ती तिच्या संपूर्ण समुदायाचा प्रवास ठरते. त्यांच्या आयुष्यातील बारकावे, भोवतीचे वंगाळ आणि खजिल करणारे वास्तव, मृतप्राय यातना देणारी सामाजिक वागणूक, अपमान आणि नकारात्मकतेचा मारा; हे सगळं सहन करत स्वतःला उभं करण्याचा त्यांचा जीवघेणा संघर्ष वाचताना मन अक्षरशः पिळवटून निघतं. ‘कायांतर’ ही केवळ कथा नाही; ती वेदनेचा दस्तऐवज आणि अस्मितेची ठाम घोषणा आहे.
कायांतर या कादंबरीत आपल्या समाजाने स्त्री–पुरुष अशा उभारलेल्या चौकटीत तिसऱ्या पंथाला स्थान नाकारल्याचे कठोर वास्तव प्रकर्षाने समोर येते. पूर्वग्रहांच्या मनामनात उभारलेल्या भक्कम भिंती आणि त्यांच्यासाठी कायमचे बंद ठेवलेले दरवाजे, यामुळे तृतीयपंथीयांचे जगणे किती कठीण, दुःखमय आणि अवघड बनले आहे, याची जळजळीत जाणीव ही कादंबरी करून देते. 'कायांतर'ने प्रतिष्ठित समाजमनाला अंतर्मुख करीत, काही जाणीवा जागवल्या आहेत. कायांतर या कादंबरीतून एक ठाम प्रश्न उभा राहतो, समाजाने तृतीयपंथीयांच्या भोवती उभारलेल्या चौकटी, पूर्वग्रहांच्या भिंती आणि आपण देत असलेली अपमानास्पद वागणूक जर बाजूला ठेवली, आणि त्यांना समाजघटक म्हणून माणूसपणाचे समान हक्क दिले, तर त्यांच्या जगण्याचा प्रवास इतका जीवघेणा, इतका दाहक राहील का?
अतिशय संवेदनशील आणि ज्वलंत विषयाला हाताळण्याचे धाडस करणाऱ्या रश्मी पदवाड मदनकर यांनी ‘कायांतर’मधून तृतीयपंथीयांच्या वेदना, चिरडली जाणारी स्वप्ने आणि अस्तित्वासाठीचा त्यांचा संघर्ष समाजासमोर प्रभावीपणे आणला आहे. कादंबरीतील प्रत्येक व्यक्तिरेखा ठाशीव आणि जिवंत आहे. नायिका आंचल वर्माचे चित्रण इतके प्रभावी आहे की वाचकमनात तिला प्रत्यक्ष पाहण्याची, भेटण्याची उत्सुकता जागते. शांत, समंजस, प्रगल्भ आणि कणखर मनोवृत्तीची, मनाने नितळ पण तितकीच सजग असलेली आंचल तिच्या आयुष्यातील बालपणापासूनचे कष्ट, यातना, पडझड, एकटीने घेतलेले खंबीर निर्णय, उणीवांच्या दिवसांत लाभलेला आधार, सहवासातील जिव्हाळा आणि विश्वासघातानंतरची मानसिक पडझड या सगळ्यांतून सावरत नव्याने उभी राहणारी आंचलची जिद्द मनाला भिडते. सारथी ट्रस्टमुळे आयुष्याला मिळालेली नवी दिशा आणि अखेरीस सौंदर्यस्पर्धेत अव्वल येत ‘महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी’ म्हणून झालेली तिची निवड; हा तिच्या आत्मविश्वासाचा आणि अस्तित्वघोषणेचा परमोच्च बिंदू ठरतो. लेखिकेच्या संयमी, प्रवाही आणि भारदस्त लेखणीतून साकारलेला आंचल वर्माचा जीवनप्रवास वाचकांना खिळवून ठेवतो आणि अंतर्मुखही करतो. कायांतर ही कादंबरी तृतीयपंथीय समुदायाकडे पाहण्याची नवी शहाणीव निर्माण करेल, अशी आशा निर्माण करते. कादंबरीची नायिका आंचल आपल्या मनोगतात अत्यंत थेट शब्दांत सांगते ... “माझ्या आयुष्याचा आरसा असलेले हे पुस्तक माझ्यासाठी केवळ साहित्यकृती नाही; ते माझ्या अस्तित्वाला मिळालेल्या सामाजिक मान्यतेचे प्रतीक आहे.” ही ओळ केवळ तिच्या वैयक्तिक भावविश्वाची अभिव्यक्ती नाही, तर संपूर्ण समुदायाच्या स्वीकृतीच्या आकांक्षेचा आवाज आहे.
लेखिकाही आपल्या मनोगतात स्पष्ट करते; “जर या पुस्तकानं वाचकांच्या अंतःकरणात एक क्षणभर जरी ‘त्यांचंही आयुष्य आपल्या आयुष्याइतकंच महत्त्वाचं आहे’ ही जाणीव जागवली, तर मला वाटेल माझा हा लेखनप्रवास खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला पोहोचला आहे.” या शब्दांतून ‘कायांतर’चा मूळ हेतू अधोरेखित होतो.. वेदना मांडण्यापुरते नव्हे, तर संवेदना जागवण्यासाठी; कथा सांगण्यासाठी नव्हे, तर समाजमनाला अंतर्मुख करण्यासाठी ही कादंबरी लेखिकेने लिहिली आहे.
'पद्मकोश' ही रश्मी पदवाड मदनकर यांची यापूर्वी प्रकाशित झालेली पत्ररूप चरित्रात्मक कादंबरी. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करणाऱ्या नायिकेच्या वेदना, तिची अंतःकरण हेलावून टाकणारी झुंज आणि मृत्यूच्या सावटातही सकारात्मकतेने प्रत्येक क्षण जगण्याची तिची जिद्द हे सगळं लेखिकेने पत्रात्मक संवादातून अत्यंत हृदयस्पर्शीपणे साकारलं आहे. डॉक्टरांनी आयुष्याचा अवधी मोजून दिल्यानंतरही न खचता उभी राहणारी ती नायिका वाचकांच्या मनात खोलवर घर करून राहिली. कॅन्सरसारख्या ज्वलंत विषयावरची ही वेगळ्या धाटणीची पत्रोत्तररूपी कादंबरी रसिकांना भावलीच नाही, तर प्रेरणादायी ठरली. ‘पद्मकोश’ची नायिका आजही सकारात्मकतेने आयुष्य जगत आहे; हीच त्या साहित्यकृतीची खरी पावती आहे. याशिवाय त्यांचे २ काव्यसंग्रह आणि एक सामाजिक लेखसंग्रह प्रकाशित आहे.
त्यानंतर आलेली कायांतर ही त्यांची आजची दुसरी बहुचर्चित कादंबरी. आंचलची जीवनगाथा केवळ एका व्यक्तीचा प्रवास उलगडत नाही, तर आपल्या सामाजिक विचारसरणीवर आणि बंदिस्त चौकटींवर प्रकाश टाकते. आपापल्या कोशात गुरफटलेल्या जीवनप्रणालीला ती हलवते, सजग करते आणि अंतर्मुख होण्यास भाग पाडते. ‘कायांतर’ तृतीयपंथीयांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात बदल घडवावा, समाजातील प्रत्येक उपेक्षित घटकाला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा हीच आशा व्यक्त करते. या दोन्ही कादंबऱ्यांतून रश्मींच्या लेखणीचा धागा एकच जाणवतो.... तो म्हणजे 'वेदनेतून उभारीकडे, उपेक्षेतून स्वीकृतीकडे आणि संघर्षातून आत्मसन्मानाकडे नेणारा'.
'कायांतर' ही केवळ संघर्ष आणि व्यथांचीच कहाणी नाही तर धैर्य, आशा, जिद्द आणि माणुसकी याचाही अनुभव या कादंबरीतून येतो. असे लेखन लेखिका रश्मी पदवाड मदनकर यांच्या लेखणीतून पुनःपुन्हा येत राहो, त्यांच्या लेखन प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा !
प्रा. मीनल येवले
नागपूर
पुस्तक - कायांतर
प्रकार - कादंबरी
लेखिका - रश्मी पदवाड मदनकर
प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन, पुणे
संपर्क - ७७२०००११३२



नसरापूर घटनेच्या निमित्ताने...

 ज्या दिवशी ही घटना घडली, अगदी त्याच दिवशी माझी अडीच वर्षांची भाची दिवसभर राहायला घरी आली होती, सोबत दहा वर्षांची मोठी भाची. आमचा अक्खा दिवस या चिमुकल्यांचे चैतन्याने भरलेले वावरणे, त्यांचा खळाळता आनंद पाहण्यात गेला. खेळता खेळता या देवाच्या फ़ुलपाखरांना टेबलाचा कोपराही लागू नये, जरा खरचटूही नये म्हणून केवढं जपत होतो आम्ही. इतक्या नाजूक. इतक्या कोवळ्या की आयुष्यात त्यांना जराशीही इजा पोहोचू नये...त्यांचा आनंद चिमूटभरही कमी होऊ नये, त्यांच्या वाट्याला सदैव भली माणसे यावीत असं वाटत राहिलं. आणि म्हणूनच त्याच दिवशी घडलेली ती घटना फारच जिव्हारी लागली.

गेल्या महिनाभर झालेल्या घटनांनी खूप उदास, खूप अस्वस्थ वाटतं आहे… एवढं की सगळं सोडून कुठेतरी दूर पळून जावं असं मनात येतं. या कुठल्या जगात राहतो आहे आपण ? हे जग आपल्यासाठी नाहीच, किंवा आपणच इथे राहण्याच्या लायकीचे नाहीयोत.. पण प्रश्न असा की जावं तरी कुठे? जिकडे पाहावं तिकडे माणसं… आणि त्यांच्या मनातल्या विचारांची-विकारांची गुंतागुंत... जितकी माणसे तितक्या वृत्तीच नाही; तर तितक्या विकृती. त्या विचारांना, त्या मानसिकतेला बदलणं आता जणू अशक्यच वाटायला लागलं आहे. माणूसपण संपत चाललंय का…? चांगुलपणा आता फक्त शब्दात उरलाय का…? असे प्रश्न मनात वारंवार येतात. नसरापूरच्या त्या चिमुकल्या जीवावर जे अत्याचार झाले, त्याची वेदना खूप आत खोलवर जाऊन भिडली आहे. मन कळवळलं, आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटलं… चार दिवस झाले पण त्या वेदनेलाही आवाज फुटत नाहीये, असं जाणवलं.
आजकाल सगळेच “व्यक्त व्हा” म्हणतात. पण कुणासाठी व्यक्त व्हायचं…? आणि व्यक्त होऊन काय बदलणार आहे…? गेली कित्येक वर्षें सगळेच ओरडत व्यक्त होत आहेत, लिहित आहेत, बोलत आहेत… तरीही जग तसंच आहे. उलट अधिकच घसरणीला लागलं आहे. जर केवळ व्यक्त होण्यानं बदल झाला असता, तर आजपर्यंत सगळं काही वेगळं, चांगलं दिसलं असतं. आता असं वाटायला लागलं आहे की व्यक्त होणंही एक दिखावा झाला आहे. केवळ सोशल मीडियावरील मुखवट्यामागचं दिखाव्याचं व्यक्त होणं. कारण शेवटी प्रत्येक जण आपल्याला जे पटतं, तेच घेतो. कितीही सांगितलं, कितीही समजावलं… तरीही ते कुणापर्यंत पोहोचत नाही. शब्द हवेतच विरघळून जातात.
सरकार येतात, जातात… बदलाचे आश्वासन देतात. पण हे सगळं वरवरचं आहे. खरा बदल तर माणसांच्या मनात व्हायला हवा आहे. आणि तोच आता सर्वात कठीण वाटतो आहे. माणसांच्या आत साचलेली घाण… ती कुठलंही सरकार साफ करू शकत नाही. तो बदल प्रत्येकाने स्वतःच स्वतःच्या आतून करायला हवा.
आज माणूस माणसापासून दूर जातोय… काही ठिकाणी तर माणूस राक्षस होत चाललाय. सहनशक्तीचा कडेलोट होतो आहे. आणि अशा वेळी एकच वाटतं ; आता खूप झालं… आता थांबायला हवं.
आपण सतत बोलतो, व्यक्त होतो… कृतीशून्य असतं सगळं.. कोलाहल वाढत चाललाय. कुणालाच काही समजून घ्यायचे नाहीये प्रत्येकाला व्यक्त व्हायची घाई. शांतता हवी न. सहिष्णुता वाढवावी लागेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं इन्स्टंट का हवी ? मारून टाका, कापून टाका, जाळून टाका ? उद्याच्या उद्या आरोपीचा खात्मा केला पाहिजे म्हणताना उद्या एखाद्यावर खोटे आरोप झाले तर ते सिद्ध करायचा पण वेळ घ्यायला नको ? हे नाही का मनात येत. संयम बाळगायला हवा. कायद्यावर विश्वास ठेवायला हवा. संयम आणि समंजस शांतता राखली गेली पाहिजे.. सोल्युशन शोधायचे आहे. आयुष्य म्हणजे काही दोन तासांची थ्रिल देणारी फिल्म नाही.
म्हणूनच कदाचित आता सगळ्यांनी थोडं शांत होण्याची गरज आहे. गुन्हा करण्यापासून शांत होणं…
समाजात विष पसरवण्यापासून शांत होणं… जाती-धर्माच्या नावावर भिंती उभ्या करण्यापासून शांत होणं… ही शांतता पळून जाण्याची नाही… ही शांतता आत डोकावण्याची आहे. थोडं थांबण्याची, स्वतःला विचारण्याची की, “मी नेमके काय करतोय…?”
कदाचित मोठे बदल लगेच होणार नाहीत. पण प्रत्येकाने स्वतःत थोडासा चांगुलपणा जपला…थोडा समजूतदारपणा वाढवला… तरच काहीतरी बदल शक्य आहे. आपण जग बदलायचा प्रयत्न करतोय, पण कदाचित आता वेळ आली आहे, स्वतःकडे परत वळायची. कारण बदल घोषणा, आंदोलनं, चित्कार करून होत नाही; ओरडण्यापेक्षा, थोडं थांबणं गरजेचं आहे… थोडं स्वतःला ऐकणं, स्वतःला समजावणं गरजेचं आहे… जर प्रत्येकाने एक क्षण जरी थांबून स्वतःच्या मनात डोकावलं, तर कदाचित आपल्या आतलाच कुट्ट अंधार, इतकी घाण, इतका राग, इतकी हिंसा पाहता येईल, प्रयत्नपूर्वक कमी करता येईल. स्वतःपासून केलेली हीच खरी सुरुवात असेल थोडंसं तरी पुन्हा माणूस होण्याची..हे जग किमान चिमुकल्या जीवांसाठी विश्वासार्ह, जगण्यालायक, आनंदी राहण्यायोग्य बनवता येईल.

Featured post

कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी

  प्रतिथयश कवयित्री, लेखिका मिनल येवले यांनी #कायांतर कादंबरीवर लिहिलेले हे पुस्तक समीक्षण.. मिनल ताई आणि देशोन्नती मनःपूर्वक आभार ********...