Tuesday 30 May 2017

आयुष्यच एक कोडं आहे. कधीही न उलगडणारं. किंवा उलगडतांनाच अधिक गुंतत जाणारं.. आयुष्यभर चाललेली सगळी वनवन कशासाठी असते सांगू ...कशाचातरी शोध...कशाचा, कशासाठी..माहीती नाही..अस्वस्थता सतत..रात्रंदिवस.. कुठेतरी आत आत एक भिती समांतर ...जी दोरी पकडून पुढे सरकतोय त्याचं शेवटचं टोक लागलंच नाही तर...सापडलोच नाही आपणच आपल्याला..तर?? प्रश्नाला उत्तर हवंय हे शंभर टक्के माहीती आहे..पण प्रश्न काय आहे हेच कळले नाही तर....उत्तरं शोधता येतात पण प्रश्नच हरवली तर??अंधारात चाचपडतोय आपण...स्वतःला शोधतोय...आपण ओळखतो का स्वतःला..जाणतो?? होय..हा उगाचाच confidence
 

स्वतःला स्वतःचे नेमके चित्र साकारता येत नाही..हे चित्र शोधण्याचा प्रयत्न मग आतबाहेर सुरु होतो... आरश्यातल्या प्रतिमा न्याहाळत स्व चा शोध लागत नाही....आपल्या आवडीतून-निवडीतून आपणच आपल्याला उमगतो काय...कुठेतरी झळकतो काय ..हे बघण्याचा प्रयत्न चालू असतो.... बरेचदा आपल्या अस्तित्वाचे अंश अंश सापडत जातात.....पण आपल्याला हवा असलेला नेमका 'मी' सापडायची कवायत मात्र जन्मभर संपत नाही.....त्याचा कानोसा ऐकायला येतो आणि आभास तेवढे होत राहतात......हे आभास अलगद चिमटीत पकडावेे त्याचे रंग बोटांवर उतरले की ते एखाद्या कुपीत भरावे.. जपून ठेवावेत....अंश अंश जोडून आकार घडवून त्यात कुपीतले रंग भरून कधीतरी 'मी' पूर्ण झालेच तर कोणी सांगावे ??

Wednesday 10 May 2017

झेंडा...

..(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं)

2004 मध्ये काही महिने योगेशच्या(माझे पती) नोकरीनिमित्त इंग्लडमधील शेफील्डमध्ये राहत होतो तेव्हाची गोष्ट.
योगेशची बाॅस पॅट 40 वर्षाची झाली म्हणून पार्टी होती. चाळीशीचे विशेष कौतुक पहिल्यांदाच इतके पाहिले.
          आम्ही सहा जण ह्या छोट्याश्या पार्टीसाठी एकत्र आलो. पॅटचा पार्टनर एरिक(तिकडे पार्टनर असतो हे नवे ज्ञान) तिच्यासोबत होता.त्याची नव्याने ओळख झाली आणि अजून एक इंग्रज जोडी ...

      माझे वय तेव्हा साधारण 26/27 . हा एरिक त्या दिवशी माझ्या आयुष्याला मोठी कलाटणी देऊन गेला..आयुष्यात जागोजागी अनेक लोक भेटतात ,काही ना काही देऊन जातात..
पॅटने त्या दिवशी शिकवले..चाळीशीतही कसं मस्त तरुण जगायचं!आयुष्यातील प्रत्येक टप्पा स्वीकारताना बहरत लहरत जगायचं. हि जोडी आवडली मला .
   
टेबलवर  रंगलेल्या गप्पांच्या ओघात  मी एरिकला विचारले कि -तो काय काम करतो ?
ह्या प्रश्नाचे जे उत्तर मिळाले त्याने मला खडबडून शुध्दीत आणले
 तो म्हणाला, "मी स्टेशनवर झेंडा दाखवतो"....

मी आणि योगेश नि:शब्द, कारण  पॅट योगेशच्या ऑफिस मधे उच्चपदस्थ अधिकारी.
 योगेश  शांत बसला पण माझी जिज्ञासा म्हणा किंवा भोचकपणा. ..मला शांत राहू देईना. "पृच्छकेन सदा भाव्यम" अर्थात : प्रश्न विचारत रहा".

मी पुढे परत विचारले,"सुरवातीपासून तिथेच आहेस का? "

नव-याचा जळजळीत कटाक्ष...माझे दुर्लक्ष ...

पण हा पठ्ठ्या तर खूष झाला अजूनच ,ह्या प्रश्नाने.

म्हणाला, "Nope, मीही software कंपनीमध्ये अधिकारी होतो ,चाळीसाव्या वाढदिवसापर्यंत....
वयाच्या 20 ते 40  पर्यत वीस वर्षे खूप काम केले ...
पैसे साठवले फिक्स केले..
आणि आता मी माझे जुने स्वप्न जगतोय....

" स्वप्न म्हणजे?"मी

"मी लहानपणी जेव्हा जेव्हा स्टेशनवर यायचो माझ्या माॅम बरोबर तेव्हा मला  हा सिग्नलमॅन फार भुरळ घालायचा..वाटायचे किती lucky आहे हा अख्खी ट्रेन थांबवू  शकतो आणि त्याच्या हातातले दोन झेंडे मला रात्री स्वप्नातही दिसायचे. मग मोठा होताना हा सिग्नलमॅन मागे राहिला. मी ही चारचौघांसारखा खूप शिकलो. .
Executive post  वर आलो आणि routine मधे अडकलो.
पण चाळिसाव्या वाढदिवसाला शांत मनाने ठरवले..आता ह्या बिग मॅन एरिक ने small kid एरीकचे स्वप्न पूर्ण  करायचे...
आणि  दुस-या दिवसापासून स्टेशनवर रुजू झालो ते माझे आवडते लाल हिरवे झेंडे हातात घेतले.
मी त्या क्षणाच्या आजही प्रेमात आहे..."
एरीक मस्त छोट्याश्या एरीकसारखा हसला ,मग मोठ्या माणसासारखा बीअर रिचवू लागला.

   
पार्टी संपली..मी आणि योगेश घरी आलो तेव्हा दोघेही एरीकच्या प्रेमात पडलो होतो. भूतकाळात  मागे टाकलेले,हरवलेले,विसरलेले आपापले  हिरवे,लाल झेंडे आठवले...माझी डायरीत राहिलेली कविता...अर्ध्या वाटेवर राहिलेलं गाणे..योगेशची एखादे वाद्य शिकण्याची
अपूर्ण इच्छा..बरंच काही.....

          आज तो नवा गुरु प्रेरणा देऊन गेला....
*1. पुढील काही वर्षे झटून काम करण्यासाठी* ;

*2.महत्वाकांक्षा  आणि पैसा ह्यांच्या हव्यासात न हरवण्यासाठी;*

*3.हातात चाळीशीनंतर  घेण्याचा आवडत्या रंगाचा झेंडा शोधण्यासाठी...*

         मी ही माझा चाळीसाव्या वाढदिवसाला माझा आवडता झेंडा हातात घेतलाय कवितेचा..
गाण्याचा....जगण्याचा..

*तुम्ही शोधलाय का तुमचा लाडका  झेंडा??*
☄☄☄☄☄☄☄☄☄

Friday 5 May 2017

शितल तुझं चुकलंच..निषेध तुझ्या निर्णयाचा




21 वर्षाच्या तरूण मुलीनं आत्महत्या करावी आणि आपण तीला 'बिचारी' ठरवून सरकारला दोष देऊन चर्चा घडवून आणाव्या..तिची एक प्रतिमा तयार करावी मग सहानुभूती, प्रसीद्धी....आणि काय काय.. पुन्हा एकदा आत्महत्यांचे उदात्तीकरण करतोय आपण.....कोणी कितीही चुकीचं असलं तरी आत्महत्या करणं समर्थनीय कसं असू शकतं.. तरूण वयात संघर्ष न करता कल्टी मारणं कसकाय पटतं राव...तरूण वय, अंगात रग असताना गरीब बापाचा हातभार बनून मेहनत करून त्याचे पांग फेडणं जास्त यथोचीत ठरले नसते काय?? 'लग्न' हा जिवनमरणाचा प्रश्न आहे काय ?? आयुष्याच्या कसोटींना तोंड देण्याचे सोडून मरण जवळ करणं जास्त सोपा मार्ग निवडणं नाहीये का ? हा असा पळपुटेपणा आदर्श ठरवायचा का??


सरकार लाख चुकीचे असेल..समाज वाईट असेल नाहीतर रूढी चूकीच्या असतील पण यातलं काहीच 'आत्महत्या'करण्यापेक्षा चूक असू शकत नाही..आपण कशाचं समर्थन करतोय?? हे असं चुकीचं करूनही जन्मभर न मिळालेली सहानुभूती, प्रतीष्ठा..प्रसिद्धी आपल्याकडून त्यांना मिळणार असेल तर आणखी तरूण त्याकडे आकर्षित नाही होणार का??चूकीला चुक न म्हणता त्यांना 'बिचारे' पालूपद लावून सोशल मिडीया गाजवणारे आपण आणखी लोकांना हे करायला प्रवृत्तच करत नाहीयोत का??

काहीतरी चुकतंय राव....
सरकारचं चुकत आहेच पण त्यांच अन आपलंही.. काहीतरी चूकतंय खरं ..


मुलाच्या सुस्थितीतल्या केवळ तोकड्या झाल्या म्हणून कित्तेक दिवसापासून आटाळ्यावर ठेवून दिलेल्या चपला, सॅंडल, बूट वगैरे गेल्या महिन्याभरापासून बाहेर काढून, स्वच्छ करून ठेवल्या आहेत. रोज एक-दोन जोड पॉलिथिनमध्ये डिक्कीत टाकून घेऊन जायच्या आणि जाता-येता निखाऱ्यासारख्या धगधगत्या उन्हात पाय भाजत चालणारी गरजू मुलं दिसली कि त्यांना द्यायच्या असं ठरवलं होतं. गम्मत अशी कि फक्त एक जोड देता आला आतापर्यंत. तेव्हापासून म्हणजे जवळ जवळ मागल्या 12 दिवसांपासून रोज वेगवेगळ्या रस्त्याने जाऊनही गरजू मुलं दिसत नाहीत. जी दिसतात त्यांच्या पायात पायताणं असतात. पण हि मुलं शोधण्याच्या नादात रस्त्यावरून चालत जाणाऱ्या जरा हलाकीची परिस्थितीत दिसणाऱ्या सगळ्या माणसांच्या पायाकडे आपसूक लक्ष जाऊ लागले आहे. यात भरदुपारी सामानाचा भारा, भाजीच्या टोपल्या डोक्यावरून वाहून नेणाऱ्या खेड्यातल्या बायका, ढोरं चरायला घेऊन जाणारे गुराखी, रोडसाईड्ला बसलेली काही विक्षिप्त मंडळी, हमाल, रिक्षा चालक अशी मोठी (अगदी शब्दशः मोठी) माणसेच विनाचप्पल या आग ओकणाऱ्या उन्हात भरदुपारी पाय भाजत चालताना दिसतायेत.मन चरचरतं पाहून. त्यातल्या त्यात मुलं दिसत नाहीयेत हि जरा समाधानाची बाब असू शकते.

यात काही गोष्टी लक्षात येतात,

>> पालक असतील तर परिस्थिती काहीही अगदी कशीही असली, आणि त्यासाठी काहीही करावे लागले तरी ते करून मुलांच्या निदान बेसिक गरजा आई-वडील पुरवतातच.

>> पालक नसलेली मुलं अशी बेवारस फिरतांना फारशी दिसत नाही ती कुठल्याश्या संस्थेत खितपत किंवा सुस्थितीत पडलेली असतात.

>> चौकाचौकात किंवा मंदिराबाहेर भीक मागताना दिसणाऱ्या मुलांना तुम्ही काहीही दिलं तरी उपयोगाचं नाही. कारण एकतर त्या गोष्टी ते वापरतच नाहीत कारण त्यांच्या तश्या कुपोषित आणि गरीब दिसण्यावरच त्यांची कमाई असते आणि तरीही तुम्ही दिलेच आग्रहाने तर ते विकून पैसे मिळवले जातात.

इथे आपला गरजूवंतांना मदत करण्याचा उद्देश पूर्ण होत नाही.

लहान मुलांपेक्षाही मोठ्यांनाच अश्या मदतीची जास्त गरज आहे हे आपल्या लक्षातही येत नाही.कारण त्यांना गृहीतच धरण्याची रीत आहे. गेल्या काही दिवसापासून ते मला प्रकर्षानं जाणवलं आहे. प्रचंड कष्ट उपसून कुटुंबासाठी राबणारी हि मंडळी स्वतःकडून आणि इतरांकडूनही उपेक्षित राहते. म्हणूनच गाडीच्या डिक्कीत मोठ्यांच्या टाकून दिलेल्या सुस्थितीतल्या चपलांसाठी वेगळी जागा करून घेतली आहे. रखरखत्या उन्हात भाजणाऱ्या पायांना जुन्या चपलांचाही दिलासा फार असतो. देणाऱ्याला प्रचंड समाधान लाभतं. करून बघाच


Rashmi / 22.04.17

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...