Friday 27 March 2020

तिची सागर भरारी -


स्त्री निर्मिती करते, संरक्षण करते आणि संवर्धनही करते. माता, सृष्टी आणि पृथ्वी हे सृजनशीलतेची शाश्वत, अपर्यायी अन अपरिहार्य अशी उदाहरण आहेत. स्त्रीला मातृत्वाचा आणि कुटुंब वत्सलतेचा उपजतच वारसा मिळाला असला तरी ती तिच्या कर्तृत्वात कधी कसूर करीत नाही ह्याचे वरकरणी तोंडी कौतुक करणारे तिच्या याच गुणांना तिच्या कर्तव्याआड येणाऱ्या अडचणी सांगून तिचे अधिकार नाकारत असतील तर? 'स्त्री' हा नेहेमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कधी आकर्षणाचा तर कधी वादाचा. स्त्रीचं विश्वच वेगळं असतं किंवा ''women itself a different world '' असे म्हणाले तरी वावगं ठरणार नाही. पुरातन काळापासून ते आजतागायत तिच्या जगण्याशी संबंधित तिढा सुटायचे नाव घेत नाही. कुठे स्त्री उच्च शिक्षण घेऊन दर्जेदार नौकरी करतांनाही तिचे स्त्री असणे हा तिच्या गुणवत्तेपेक्षा मोठा विषय ठरतो तर कुठे अजूनही ती अठराव्या शतकातले अठरा विश्वे वैचारिक दारिद्र्याच्या लक्ष्मण रेषेत अडकून पडली आहे. तिने कितीही मोठी झेप घेतली किंवा कितीही मोठ्ठी उडी घेतली तरी परतीची उडी काटेरी कुंपणाच्या आतच येऊन पडावी हे दुर्दैव आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या पुढे जात स्त्रीत्वाच्या कक्षा रुंदावणाऱ्या आधुनिक विश्वात आपण नेमक्या कुठे आहोत व कुठे जाण्याची गरज आहे ती आजही या प्रश्नांची उत्तरं शोधत भरकटतेच आहे.


हे सगळे आठवण्याचे महत्वाचे कारण म्हणजे नुकतंच ह्याच संज्ञेचा थोड्याफार वेगळ्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने केलेला उल्लेख.. आणि त्यातून घेतला गेलेला ऐतिहासिक निर्णय..खरतर जिथे भारतीय महिलांना अजूनही सामाजिक हक्कांसाठी सतत लढावं लागतं तिथे इतर अपेक्षा अनेकदा कुचकामी ठरतात. महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले पूर्वीपेक्षा तिच्या स्वातंत्र्यताही वाढ झाली असली तरी स्त्रीकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात-मानसिकतेत बदल झाला आहे का? हा कळीचा मुद्दा आहे; मात्र ती स्वबळावर लढते आहे. गेल्या दोन दशकात महिलांचं कर्तृत्व आणि नेतृत्व परिपक्व होत गेलंय..निदान बदलाची सुरुवात झाली आहे आणि आता समानता दूर नाही हा आशावाद फळाला येतो आहे. नुकतंच सैन्यानंतर सुप्रीम कोर्टाने आता नेव्हीमधील महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन मंजूर केले आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC)मध्ये तिला नाकारलेले अधिकार आता कायम स्वरूपी सेवेत मात्र महिलांना सेवानिवृत्त होईपर्यंत दिले जातील. हा निर्णय देतांना सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, नेव्हीमधील शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधील ज्या महिलांनी देशाची सेवा केली आहे, त्यासाठी कष्ट घेतले आहे त्यांना कायमस्वरूपी कमिशन नाकारणे हा त्यांच्यावर केलेला गंभीर अन्याय आहे. या महिला नौदल अधिकारी आता कायमस्वरूपी कमिशनसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत, नौदलाच्या निवडक शाखांमध्ये हे अधिकार नाकारण्याच्या सरकारी आदेशाला रद्दबातल ठरवले गेले आहे.




एखादी अधिकारी समान गुणवत्ता असतांना, कार्य करण्यास सक्षम असतांना, जोखीम स्वीकारण्यास समर्थ असतांनाही फक्त ती स्त्री आहे म्हणून तिच्याकडे भेदभावाच्या नजरेने पाहणे तिच्या कष्टाचे मोल किंवा तिचे न्यायिक अधिकार नाकारणे, मातृत्व आणि शारीरिक भिन्नता अशा कोणत्याही कारणांवरून घटनेत समान संधी आणि सन्मान मिळण्याचा हक्क नाकारला जाणे हे अर्ध्या लोकसंख्येच्या स्वातंत्र्य, समता आणि मानवी हक्कांवर अन्यायकारक ठरते. ह्याच आधारावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. त्यानुसार कार्यकारी, अभियांत्रिकी, विद्युत, शिक्षण, कायदा व रसदशास्त्र यासह किमान सात शाखांमधील सर्व सेवा देणारी महिला शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) अधिकारी म्हणून अर्ज करण्यास पात्र ठरवल्या गेल्या . न्यायालयाच्या या खंडपीठाला आपल्या निर्णयाचा लाभ यापूर्वीच सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांपर्यंत मात्र वाढविता आला नाही, त्याऐवजी काहींना संधी गमावल्याबद्दल त्यांना निवृत्तीवेतनाचा लाभ आणि २ लाखांची भरपाई दिली जाणार आहे . न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील कोर्टाच्या आणखी एका खंडपीठाने यापूर्वी जाहीर केले होते की निवडक सैन्य केडरमध्येही महिला कायमस्वरुपी कमिशनसाठी पात्र ठरतील. लैंगिक समानतेची लढाई ही सामाजिक मानसिकतेशी सामना करणारीच लढाई जास्त आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे महिलांना त्यांचे प्राथमिक अधिकारही नाकारले गेले, त्यांच्या कामाच्या ठिकाणी योग्य आणि समान वागणूकही देण्यात आली नाही, समाजाच्या या अन्यायाला मात्र कायद्याने चोख उत्तर दिले आणि त्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे मत वाखाणण्याजोगेच होते '' निमित्त म्हणून दिली गेलेली १०१ कारणे देखील महिलांचे घटनात्मक हक्क नाकारण्याचे समर्थन करू शकत नाही. कार्याच्या नियमानुसार लिंगभेदाकडे दुर्लक्ष करून प्रत्येक व्यक्तीला कामाची आणि कामगिरी बजावून यश प्राप्तीची समान संधी आणि त्यासाठी अनुकूल परिस्थिती मिळविण्याचा अधिकार आहे. या मिळालेल्या संधीचे सोने करून क्षमता सिद्ध करून त्यांच्याविरुद्ध येणाऱ्या प्रतिसादांना प्रतिउत्तर देण्याची या निमित्ताने महिलांना मिळालेली हि सुवर्ण संधी आहे''

स्त्रीस्वातंत्र्य आणि समानतेसाठी पुरुषप्रधान समाजाशी दोन हात करण्याची स्त्री चळवळ अनेक दशकांपासून चालूच आहे. तरीही हा निर्णय घ्यायला, असा दिवस उगवायला इतका काळ का जावा लागला ?? स्वातंत्र्याची पाऊणशे वर्ष एखाद्या देशाने सेवेतील तिच्या कार्यासाठी तिच्या हक्काचे अधिकार नाकारावे हि शोकांतिकाच आहे खरतर.आपल्या समाजातील परंपरागत धारणांमुळे पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेचा परिपोष तर होतोच पण त्यातून स्त्रीबद्दल पुरुषांच्या ठायी असूया निर्माण झाली आहे ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. स्त्री तिला लाभलेल्या कायदेशीर स्वातंत्र्यामुळे, शिक्षणामुळे व गुणवत्तेमुळे जे नेत्रदीपक यश मिळवत आहे ते पुरुषांना आपल्या वर्चस्वाला बसलेला धक्का वाटावा हे आश्चर्यजनक नाहीये का ..स्त्री मधलं स्त्रीत्व जागं झालं पण समाजातल्या जाणीवा जागृत होणे अजूनही बाकी आहे, समाजात वावरतांना येणाऱ्या मर्यादा कायम आहेत. स्त्री बदलू शकते पण विकृत आणि बुरसटलेल्या विचारांच्या लोकांसोबत काम करणे सोप्पे नाही. त्याहून कठीण आहे ते परंपरेच्या सो कॉल्ड चौकटी मोडून तर्काधिष्ठित विचारांवर ठामपणे उभे राहणे. अश्या एकनाअनेक समस्यांशी ती दोन हात करते आहे आणि रोजच्या आयुष्यातल्या अनेक आघाडींवर लढतांना स्वतःला सिद्ध करण्यास धडपडते आहे... नसलेल्या आठ हाताने चारही दिशेने येणाऱ्या या संकटांवरही वार करत पुरून उरते आहे. ती हे करते आहे यासाठी तिला कौतुक नको, सहानुभूती तर अजिब्बातच नको तिला हवंय ते तिच्या हक्काचं जिणं... तिच्या गुणवत्तेची तिच्या कार्याची खरी पावती. स्त्रीला स्त्री म्हणून नाही तर माणूस म्हणून या समाजाने बघावे वागवावे हि एवढी साधी अपेक्षा असणे रास्त नाहीये का ??


©रश्मी पदवाड मदनकर




Tuesday 17 March 2020

कहता ये पल-खुद से निकल-जीते हैं चल ....


आताशा चित्रपटातील नवऱ्याच्या प्रेमासाठी झुरणाऱ्या सासुरवाशीणी 'झुबेदा' आठवत नाही. परित्यक्ता होऊन 'अस्तित्व' शोधत फिरणाऱ्या नात्यांचा 'अर्थ' हरवलेल्या, त्यागमूर्ती अन्यायग्रस्त 'बंदिनी', नवऱ्याचा 'अभिमान' जपत स्वतःच्या आकांक्षा गमावून बसलेल्या, बलात्कार पीडित 'इन्साफ का तराजू' साठी संघर्ष करणाऱ्या, माजघराचा कोंडमारा सहन करणाऱ्या, परंपरेच्या जोखडात अडकलेल्या, विधवेचा 'प्रेमरोग' अमान्य म्हणून समाजाने छळलेल्या, आयुष्य रडत घालवणाऱ्या 'कटी पतंग' सारख्या, 'सखाराम बाईंडर' पुढे असहाय, शोशिक, परीस्थितीने पिचलेल्या 'साहेब, बीबी और गुलाम' आणि कोण कोण.... सिनेमा नाटकातली ही पात्रे फार गाजली, ह्यातल्या अभिनेत्रींनीं सशक्त अभिनय केला असला तरी त्यांनी साकारलेल्या प्रतिमा आजच्या पिढीला प्रेरित करीत नाही हल्ली .. उलट ते समाजाचं रूप ठरू नये असं वाटत राहतं... आता परित्यक्ता होण्यापेक्षा स्वखुशीने स्वबळावर 'उंबरठा' ओलांडणारी सुमित्रा (स्मिता पाटील) उगाचच आठवत राहते रात्र रात्र.. 'इंग्लिश-विंग्लिश' शिकून अपमानाला आत्मविश्वासाने, सकारात्मकतेने उत्तर देणारी शशी (श्रीदेवी) हळूच डोकावून जाते मनात. प्रियकराने ऐन लग्नाच्या दिवशी दगा दिलाय म्हणून दुखावलेली पण एकटीच हनिमूनला निघून प्रगल्भ झालेली जग जिंकणारी राणी 'क्वीन' (कंगना राणावत) 'स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिक वेडे' म्हणत कानात फुसफुसत निघून जाते. स्वतःच्याच अत्याचारी मुलाला गोळी झाडणारी 'मदर इंडिया' (नर्गिस) असुदे, मुलीला शिकून सवरून कलेक्टर बनवायला झटणारी 'निल बट्टे सन्नाटा' ची आई (स्वरा भास्कर) किंवा मुलीवर झालेल्या अत्याचाराचा सूड घेणारी 'मॉम' (श्रीदेवी), पीडितेला न्याय मिळवून द्यायला आपल्याच माणसांशी लढणारी दामिनी (मीनाक्षी शेषाद्री), मृत्युदंड (माधुरी दीक्षित), कहाणी (विद्या बालन)  ते मर्दानी (राणी मुखर्जी) पर्यंत स्त्रीशक्तीच्या किती किती प्रतिमा आणि त्यांच्या अभिनयातून येणारी प्रचिती आजच्या पिढीला प्रोत्साहित करते आहे... तेवढीच ठळकपणे आठवणीपासून इतिहास घडवेपर्यंत पुरून उरते आहे.

एक महिला म्हणून मी जेव्हा जेव्हा सिनेमाच्या जगाकडे पाहते.. अनेक प्रश्न सुम्भ बनून पुढ्यात उभे राहतात.

'तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई'
अशी प्रार्थना माय भवानीस करताना आपण स्त्रीला परिपूर्ण आदिमायेच्या स्वरुपात पाहतो तिच्यासमोर नतमस्तक होतो... आणि दुसऱ्याच क्षणाला
चिकणी चमेली, शीला कि जवानी, जलेबीबाई, झंडू बाम अश्या आयटम सॉंग मधून आपण स्त्रीकडे कुठल्या भावनेने पाहतो? आपल्याला स्त्रीला एकतर अबला पाहायला आवडते किंवा आयटम म्हणून.. प्रत्यक्ष स्पर्शाने, अश्लाघ्य शब्दाने, नाहीच काही तर नजरेने देखील उपभोगायला हवी असते ..असे तर नाही ना ? आपण स्त्रीकडे कोणत्या रूपात पाहतो यावरून समाजाची मानसिकता स्पष्ट होत असते.

'बंदिनी स्त्री हि बंदिनी
हृदयी पान्हा नयनी पाणी
जन्मो जन्मीची कहाणी ...
बंदिनी स्त्री हि बंदिनी'
या ऐवजी ...
'सत्यता शोधण्या घेऊनि लेखणी
जाहली दामिनी मूर्त सौदामिनी
दामिनी ...दामिनी'
या रुपात स्त्रीकडे पाहणे केवढे अभिमानाचे वाटते..नाही ? अनेक चित्रपटांनी महिलांना अबला, गरीब बिचारी, अन्यायाने पिचलेली दाखवली पण ह्याच माध्यमाने स्त्रीतील शक्तीचे खरे रूप देखील समोर आणले. खऱ्या आयुष्यापेक्षा त्या मानाने चित्रपटातील महिलांचे रूप खूप आश्वासक वाटते. आपल्या स्त्रीत्व व्यक्त करणा-या (फेमिनाइन) भूमिका. खऱ्या स्त्रीने कसे असावे, कसे वागावे या अपेक्षेतली स्त्री वास्तवात तशी वागू शकत असली नसली तरी अनेक चित्रपटांनी तश्या स्त्री व्यक्तिरेखा फार प्रभावीपणे साकारून दाखवल्या. त्या कधी लोकप्रिय झाल्या कधी नाही पण प्रत्येकाच्या मनावर छाप मात्र सोडून गेल्या. सिनेमा…पडद्यावर रंगणारा कधी काल्पनिक, तर कधी वास्तवरुपी जगाचा खेळ...खरं तर समाजाचा आरसाच तर असतो.. ह्या काही विशेष सिनेमात साडी-गजरा- बिंदी यापलीकडे वास्तवापेक्षाही वास्तवाला कारणीभूत ठरणारी पार्श्वभूमी आणि त्याला संघर्ष करून पुरून उरणारी स्त्री. या चित्रपटांमधली स्त्री व्यक्तिरेखा नेहमीच आधुनिक विचारसरणीची, बंडखोरीची वा एक्स्ट्रिमिटीची भाषा करणारी वाटत असली तरीही आजपर्यंतच्या परंपरेच्या जोखडातून बाहेर पडू पाहणाऱ्या, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या किंवा न्याय अन्यायासाठी संघर्ष करणाऱ्या स्त्रियांच्या प्रतिनिधी आणि प्रत्येक स्त्रीच्या कल्पनेतल्या पात्र म्हणून यशस्वी ठरल्या. मार्क ट्वेनने म्हटलंय, “Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.”

महिला दिवस जवळ यायला लागला कि का कुणास ठाऊक कालवाकालव होते मनात.  नेमक्या काय भावभावना असतात हे आजवर कळलेलंच नाही. सणवार येतात तसा आनंद तसा उत्साहही जाणवत नाही, पूर्वीपेक्षा आजच्या महिलांची स्थिती फार बरी आहे असे मनात आणले तरी आज रोजच्या होणाऱ्या घटना पहिल्या कि मन पुन्हा सुन्न होतं.. परिस्थिती बदलाची सुरुवात झालीय म्हणून ना धड समाधान मानता येत आणि विशेष दिवस म्हणून ना पूर्ण दुःखी राहता येत. आठवत राहतं काही बाही... आणि दिवसभर मनाचा लोलक दोलायमान होत राहतो. समाजानं गेल्या २ दशकात स्त्रियांना अनेक रूपानं हिम्मत देण्याचं काम केलंय..तीनंही तिची क्षमता तिची ताकद सिद्ध करून दाखवली, पृथ्वीपासून ते आकाशापर्यंत तिनं गवसणी घातली आणि आज असे कुठलेच क्षेत्र तिच्यासाठी अनवट राहिलेले नाही... हे खरे असले तरी दुसऱ्या बाजूने अजूनही तिच्या गोटात अंधार आहे..ती चाचपते आहे, उजेडाकडे येण्यासाठी धडपडते आहे. तिचा संघर्ष अजून कायम राहणार आहे.

आपण समाज म्हणून तिला तिची ओळख निर्माण करायला, तिचं वेगळेपण जपायला, स्वतंत्र-निर्णयक्षम व्हायला  आणि शारीरिक बौद्धिक गुलामगिरी सोडून मनासारखं जगण्यासाठी स्वातंत्र्य द्यायला हवे. चित्रपट आणि समाज माध्यमांचा यावर सकारात्मक नकारात्मक प्रखर परिणाम होतो हे मानले तर, त्याच्या निर्मितीपासून प्रेक्षकांनी करावयाच्या निवडीपर्यंत सगळंच अंधानुकरण न करता तिच्या दृष्टिकोनातून केलं गेलं पाहिजे ..जपलं पाहिजे .. एक निकोप समाज निर्मितीची हि गरज आहे असे समजून हि जबाबदारी स्वीकारली जाईल ह्याच अपेक्षेसह महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा ..

- रश्मी पदवाड मदनकर



Sunday 8 March 2020

सरिता कौशिक -

#महिलादिन #WomensDay
#भेटलेलीमाणसे

सरिता कौशिक

मी तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला होते. एका रिक्षाचालकाच्या मुलीला (वैशाली वानखेडे) वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज होती. मला आठवतं..तेव्हा मी पोलीस आयुक्तांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र पाठवले होते. एका अत्यंत हुशार आणि होतकरू मुलीचे भावी डॉक्टर होण्याचे स्वप्न केवळ गरिबीमुळे,पैशांअभावी दुर्लक्षित राहू नये असे मनापासून वाटत होते...वैशालीबद्दल का कुणास ठाऊक खूप जिव्हाळा निर्माण झाला होता, तिला कुठून काही मदत मिळू शकेल का आपला काही हातभार लागू शकेल का म्हणून मी धडपडत होते. तेव्हा सरिता कौशिक ह्यांचा ह्याच विषयाला घेऊन वृत्तपत्रातून चाललेला पाठपुरावा मी वाचत होते...आपल्यासारखंच कुणीतरी या विषयाला गांभीर्याने घेताय म्हणून न पाहता न भेटता सरिता कौशिकबद्दल आपसूक एक ऋणानुबंध वाटू लागले होते. दारोदार भटकणाऱ्या वैशालीची स्टोरी सरिताने ज्या ताकदीने लिहिली त्यानंतर देशभरातून हजारो मदतीचे हात वैशालीसाठी पुढे आले. लिखाणात केवढी ताकद असते हे अश्याच अनेक उदाहरणांमुळे मग मनावर कोरत गेले. त्यानंतर अनेक वर्षांनी त्या टीव्हीवर दिसू लागल्या ‘स्टार माझा’ वाहिनीची नागपूरची ब्युरो चीफ म्हणून इलेक्ट्रॉनिक मिडियात त्यांनी प्रवेश केला होता. सरिताच्या अनेक बातम्या अजूनही आठवतात. एका अभागी भिकारणीवर रस्त्यावर झालेल्या बलात्काराची खळबळजनक स्टोरी प्रकाशित करून पोलीस प्रशासनालाही हादरवून सोडणारी सरिता, अल्पवयीन मुलींची कुंटणखान्यात होणारी विक्री आणि त्यांच्याशी होणारा अमानवीय व्यवहार चव्हाट्यावर आणणारी सरिता, नक्षलवादावर प्रखरपणे प्रकाश टाकणाऱ्या बातम्या, शेतकरी, अन्यायग्रस्तांची अवस्था त्यांच्या मागण्या शासनापुढे लोकांपुढे आणणारी सरिता..तीच्या बायलाईन वाचता वाचता हळूहळू फार जवळची वाटू लागली. वार्ताहरांच्या चमूचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला पत्रकार आहेत हे किती छान आहे.. क्राईम बीट सारखी महिलांसाठी दुरापास्त असणारी बीट हाताळणारी महिला पत्रकार म्हणून त्यांना लोक ओळखतात, पण तीथवर पोचण्यासाठी त्यांनी बऱ्याच भल्या-बुऱ्या अनुभवातून प्रवास केला असेल.. तीच तावून सुलाखून निघालेली ही झळाळी आहे हे निश्चीत.



दशकांपासून पत्रकारितेतील प्रख्यात नाव असलेली सरिता स्वभावानेही तितकीच मनमिळावू आणि सालस आहे., महर्षी नारद पत्रकार सन्मान पासून ते गौरवास्पद अश्या अनेक पुरस्काराने सन्मानित, बेधडक ब्रेकिंग करणारी सरिता कौशिक सध्या 'ABP माझा' च्या संपादक आहेत.. नागपूरचे ज्येष्ठ गायक दिवं. गोपाळ कौशिक आणि प्रवीणा यांची हि कन्या पत्रकारितेत उतरली,.इंडियन एक्सप्रेस, हितवाद, हिंदुस्तान टाईम्स, टाईम्स ऑफ इंडिया सारख्या विविध वृत्तपत्रांमध्ये काम करताना राजकारण, क्राईम, कृषी, विज्ञान, क्रीडा, आणि फॅशन असे विविध बीट यशस्वीपणे कव्हर केले. ते करत असतांना सरिताने प्रिंट मिडियात ह्य़ूमन इंटरेस्ट स्टोरीजवर नेहमीच भर दिला. तिच्या लेखनातून उमटलेल्या वास्तवाची अनेक घटनांची शासनाला दखल घेणे भाग पडले, हेच तिच्या पत्रकारितेचे यश. आज मेट्रोच्या बातम्या कव्हर करण्याच्या निमित्ताने, पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सरिताच्या अनेकदा भेटी होतात , गप्पाही होतात आता आम्ही फ्रेंडली झालो असलो तरी तिची ती मनातली तेव्हाची आदरयुक्त छबी तशीच कायम आहे किंबहुना तिचे अत्यंत साधेपणाने वागणे मनास अधिक भावले आहे. आजही त्या टीव्हीवर दिसलेल्या की उर आनंदाने भरून येतो. यंदाच्या महिला दिनाच्या निमित्ताने या धडपड्या, होतकरू, स्वकष्टानं पुढे आलेल्या लोकप्रिय झालेल्या मैत्रिणीचे आजवरच्या यशासाठी हार्दिक अभिनंदन आणि पुढेही  यशाच्या अनेक पायऱ्या चढत शिखर तिने गाठावे यासाठी सदिच्छा !!

Happy Women's Day Girl ..😍🌹

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...