Monday 18 April 2022

गुलाबी दिलासे



गुलाबी मनाचे गुलाबी उसासे
गुलाबी क्षणांचेच सारे दिलासे
कसा गंध वारा सुटे हा गुलाबी
गुलाबी सुरांचे तराणे जरासे

तुझ्या आठवाची कथाही गुलाबी
दिशाही गुलाबी नशाही गुलाबी
असा रंग येतो भरूनी सदेही
गुलाबी पिडेची व्यथाही गुलाबी

गुलाबी सुगंधी जरा श्र्वास होतो
गुलाबी पुन्हा प्राण दाटून येतो
पहाटे पडावे तुझे स्वप्न वेडे
गुलाबी असाही जरा भास होतो

नदी वाहते त्या किनारी गुलाबी
तिच्या वाहण्याची निळाई गुलाबी
अशी धावते भेटण्या सागराशी
मुक्या पावली वेदनाही गुलाबी

गुलाबी तुला भेटण्या ओढ दाटे
गुलाबी सरेना अशी रात्र वाटे
कुठे शोध घेऊ तुझ्या संगतीचा
गुलाबी पहारा गुलाबीच काटे

मिटू लागली पापणी ही गुलाबी
गुलाबी असे काळ वेळा गुलाबी
उजाडेल आता दिशा रंग माती
पहाटे पुन्हा रागदारी गुलाबी.

- रश्मी पदवाड मदनकर

#भुजंगप्रयात 

Wednesday 13 April 2022

असमाधान आणि अतिमहत्वाकांक्षा हे सगळ्या समस्यांचे मूळ आहे..

 

सतत चांगल्यातलं वाईट शोधण्याची सवय एकदिवस स्वभाव होत जातो. एकदा हा स्वभाव बनला की आयुष्याने कितीही चांगले केले तरी त्यात वाईट शोधण्याची सवय काही जात नाही. जेव्हा आपण असमाधानकारक, तक्रारयुक्त जगणं दीर्घकाळ जगायचं चालू ठेवतो, तेव्हा काय होतं? हा आपला संपूर्ण इतिहास बनत जातो. कृतज्ञ व्यक्ती समाधानाने समृद्ध असते, आणि त्या उलट कृतघ्न मनुष्य अनंत असंतोषाच्या दारिद्र्यात यातना भोगत राहतो. महत्वाकांक्षा असावी पण ती पूर्ण होण्याचं सुख भोगता येईल इतकी असावी. स्वप्नवत वाटणाऱ्या इच्छा किंवा इतरांसाठीसुद्धा सहज साध्य नसणाऱ्या अनेक कठीण गोष्टी सहज आपल्याला मिळूनही त्याचा आनंद मानता-मनवता येत नसेल आणि ते असमाधानावर अर्धवट सोडून त्यापुढली महत्वाकांक्षा, त्यापुढलें स्वप्न आणि डोंगराएवढ्या इच्छा आपण पुढ्यात मांडून ठेवत असू, जे जे मिळालय, मिळतंय त्यातलं आणि आहे त्यातलं समाधान आनंद कधीच उपभोगता येत नसेल तर आपण या जगातले सगळ्यात दुर्दैवी, गरीब जीव आहे असे समजावे.
महात्मा गांधी म्हणतात ना ..
We notice that the mind is a restless bird; the more it gets the more it wants, and still remains unsatisfied. The more we indulge our passions the more unbridled they become. Our ancestors, therefore, set a limit to our indulgences. They saw that happiness was largely a mental condition. A man is not necessarily happy because he is rich, or unhappy because he is poor…. Millions will always remain poor.”

रंजो-ग़मसे नजात पानी हो तो
ख़्वाहिशों को ज़रासा कम कर दो !
...
ख्वाहिशों के कदम कहां किसके रुके हैं .... ?
मंजिल से बेखबर, ये ताउम्र चलते रहते हैं !!


रश्मी ...



Thursday 7 April 2022

सावध हरिणी, सावध गं !




गेल्या महिन्यात एका १७ वर्षाच्या तरुणीला आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या.. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावताना पुढे आलेली माहिती अतिशय धक्कादायक होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमजाळ्यात अडकवून विश्वासात घेऊन तिच्याकडून हेतुपुरस्सर काही आक्षेपार्ह कृत्य करून घेण्यात आले होते आणि नंतर त्याचे व्हिडीओ सार्वजनिक रीतीने प्रसारित करण्याची धमकी देऊन, ब्लॅकमेल करत तिच्याकडून पैशांची मागणी केली गेली. ही मागणी पूर्ण करणे जसजसे कठीण होऊ लागले त्या मुलीने इतरांची आर्थिक फसवणूक करणे सुरु केले आणि दुष्टचक्रात खोलवर अडकत गेली.

नागपूर जिल्ह्यातल्या दोन वेगवेगळ्या शहरातील उच्चभ्रू सोसायटीच्या, सुशिक्षित-प्रतिष्ठित कुटुंबातल्या महिला. व्यस्त कुटुंब आणि एकांताला कंटाळून सोशल माध्यमावर हेतुपुरस्सर फुसलावणाऱ्या टोळीतील वेगवेगळ्या इसमाच्या प्रेमात पडल्या आणि भावनेच्या आहारी जाऊन आक्षेपार्ह चॅटींग, फोटो पाठवणे, व्हिडीओ कॉलिंग या माध्यमातून नको त्या चुका करून बसल्या, आणि मग सुरु झाला जीवनमरणाचा खेळ. हे व्हिडीओ-फोटो कुटुंबाला पाठवावे किंवा सार्वजनिक करावे असे वाटत नसेल तर 'त्या' बायकांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीच्या इशाऱ्यांवर काम करणे गरजेचे होऊन बसले. त्या टोळीच्या मागणीनुसार लाखो रुपये दिल्यानंतरही मागणी संपेचना. त्या थकल्या-रडल्या नंतर शेवटची मागणी म्हणून ४ सिमकार्ड आणि प्रत्येकी २-२ बँक खाते काढून त्याचे एटीएम कार्ड आणि इतर माहिती त्यांना बंगलोर शहरी पाठवण्यास सांगण्यात  आले..एवढं पाठवून आपण सुटलो असे या स्त्रियांना वाटत असतानाच, वर्षभरानंतर एकदिवस पोलीस घरावर येऊन धडकले आणि महिलांना बेड्या ठोकून घेऊन गेले.. ज्या बदनामीला घाबरून एक चूक लपवायला पुढे अनेक चुका या महिलांनी केल्या होत्या त्याच ह्यांना भोवलया होत्या. ह्यांनी पाठवलेल्या सिमच्या आधारे पुढे अनेक महिलांची फसवणूक केली गेली होती आणि त्या फसवणुकीतून मागवलेला पैसा, अगदी करोडो रुपयांचा खंडणीचा व्यवहार ह्यांनी पाठवलेल्या बँक खात्यावरून करण्यात आला होता. खऱ्या गुन्हेगारांचे नाव-गाव-पत्ता काहीही, कशाच्याही माध्यमातून पुढे न येऊ दिल्याने त्यांचा पत्ता लागणे कठीण होतं.. पण या करोडो रुपयांच्या फार मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात या महिला मात्र प्रमाणासह फसल्या, ही केस कोर्टात अजूनही चालू आहे.


२०१९ साली  सोशलमिडियाच्या माध्यमातून ३०० महिलांची त्यांच्या माहिती आणि फोटोंचा उपयोग करून, ते पॉर्नसाईटवर टाकून त्यांची फसवणूक आणि नंतर ब्लॅकमेल करण्याचे प्रकरण पुढे आले होते. याप्रकरणी  हैदराबादच्या सायबर विभागाने २५ वर्षीय ठग विनोदला बेड्या ठोकल्या होत्या. विनोद मुळचा विशाखापट्टनमचा रहिवासी होता. त्याने सोशल मीडियाचा गैरवापर करत ३०० महिलांची लैंगिक आणि आर्थिक फसवणूक केली आणि त्यांचे फोटो पॉर्न साईटवर अपलोड करून त्यांना ब्लॅकमेल केले होते आणि त्यांच्याकडून पैसे उकळले होते. एका तरुण मुलाच्या सायबर फसवणुकीला इतक्या महिलांनी बळी पडण्याचे हे प्रकरणही तेव्हा खूप गाजले होते.

आजही सोशल मीडिया वापरणाऱ्या महिलांकडून दबक्या आवाजात तक्रारींचे सूर उमटत राहतात. फसवणूक करणाऱ्यांमध्ये साहित्यिक, कवी, प्राध्यापक, कलावंत असणाऱ्या नामवंत पुरुषांची नावे देखील समोर येत असतात. काही दिवस गाजावाजा होतो. त्यात स्त्रियांनाच दोषी ठरवण्याची परंपरा कायम चालत आल्याने महिला संकोचतात, गप्प बसतात किंवा सोशल माध्यमातून कंटाळून पळ काढतात. त्या पुरुषांना मात्र फारसा फरक पडत नाही, अंगावर आलीच तर महिलांना दोष देऊन त्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवून, चर्चेला पेव फोडून ते मोकळे होतात आणि पुन्हा पुन्हा गुन्हा करत राहतात. तिच्या भावुक असण्याचा फायदा उचलत एकेक पुरुष एकावेळी अनेकींचे आयुष्य उध्वस्त करत सुटतो आणि त्याबद्दल त्यांना जराही खंत वाटत नाही.  

सोशल मिडीयाचा वापर काही लोकांसाठी व्यसन होऊन बसले आहे. ह्याचाच गैरफायदा काही समाजकंटक स्वतःच्या हितासाठी करून घेताहेत आणि ह्याचे प्रमाण आता चिंता वाटावी इतके वाढले आहे. थोडा काळ मन रमवण्यासाठी, विरंगुळा म्हणून होणारा सोशलमिडीयाचा वापर आता विविध पद्धतीने फसवणुकीसाठी  केला जातो आहे आणि ह्याला अनेक बाईमाणसे बळी पडताहेत. गेल्याच महिन्यात माझी समुपदेशक मैत्रीण शुभांगी देवस्थळे हिच्याशी या विषयावर बोलणे झाले आणि सायबर गुन्ह्यांना बळी पडणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचे तिने सांगितले. आर्थिक, शारीरिक, भावनिक पद्धतीने लुबाडणूक होणाऱ्या महिला घरच्यांना न सांगता गुपचूप समुपदेशनासाठी येतात तेव्हा त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली असते, असं तिचं म्हणणं होतं. गेल्या महिन्यात सायबर क्राईमवर लेख लिहिण्यासाठी संदर्भ हवे होते म्हणून आणि खरे अनुभव लिहावे या हेतूने अनेकांशी चर्चा केली. या चर्चेतून सायबर गुन्ह्यांचे अनेक जिवंत किस्से समोर आलेच परंतु सोशल माध्यमातून होणाऱ्या बायकांचे भावनिक, लैंगिक आणि आर्थिक शोषण हा अत्यंत गंभीर गुन्हा लक्षात आला त्याबद्दल माहिती मिळवताना मी मात्र हादरून गेले.

व्यक्त होण्यासाठी, कलागुणांच्या प्रदर्शनासाठी, आवडीच्या गोष्टी शेअर करण्यासाठी, वैचारिक भूमिका बोलून दाखवण्यासाठी स्वतःचा हक्काचा एखादा प्लॅटफॉर्म असणं खरतर किती चांगली गोष्ट आहे. एकीकडे सोशल मीडियाचे स्वातंत्र्य अनुभवत असताना दुसरीकडे मात्र महिलांना याचाच उपद्रव होत असल्याने या 'व्हर्च्युअल' जगातही सावधगिरीने वागावे लागत आहे. सोशल मीडियाशी संबंधित घडणाऱ्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सायबर गुन्हेगारांकडून त्यांनाच सर्वाधिक लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. 13 मे 2021, दिवस गुरुवार. या दिवशी 'लिबरल डॉजी' नावाच्या चॅनलने यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम केले, ज्यामध्ये मुस्लिम मुलींवर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडिओ काढून अत्यंत अश्लील आणि अशोभनीय टिप्पण्या केल्या गेल्या. जेव्हा ट्विटरवर मुस्लिम मुलींनी या व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या विरोधात लिहायला सुरुवात केली आणि तक्रार करण्याची विनंती केली तेव्हा लाईव्ह व्हिडिओची सेटिंग बदलून खाजगी करण्यात आले. गेल्याच महिन्यात मुस्लिम महिलांचे फोटो एडिट करून, आक्षेपार्ह माहितीसह ते इंटरनेटवर व्हायरल करण्याचा आणि "बुल्ली बाई'' आणि ‘सुली डील’ नावाच्या अॅपवर त्यांचा लिलाव करण्याचा अत्यंत खेदजनक, निषेधार्ह आणि त्याचबरोबर चिंताजनक प्रकार उघडकीस आला होता. या द्वेषाला फक्त मुस्लिम महिलाच बळी पडत नाहीत तर हिंदू महिलांच्या चेहऱ्याचे फोटो उघड्या शरीरावर मॉर्फ केले जातात, ते कुठल्यातरी पॉर्न साईटवर किंवा डेटिंग साईटवर सार्वजनिक केले जातात आणि नंतर त्यांचाच उपयोग करून सोशल मीडियावरून छळ केला जातो. अनेकदा वैयक्तिक सूद उगवण्याच्या दृष्टीने महिलांच्या सोशलमिडीयावरच्या माहितीच्या आणि फोटोच्या आधारे फेक अकाउंट सुरु केले जाते, त्यावर बदनामीकारक मजकूर-लिंक-फोटो शेअर केले जातात, महिलांचे फोननंबर सार्वजनिक केले जातात, त्यांचा लिलाव केला जातो, बलात्काराच्या धमक्या दिल्या जातात. उच्चशिक्षित महिलांचा अपमान केला जातो, दलित महिलांची विटंबना केली जाते, राजकीय महिलांनाही टार्गेट केलं जातं, झुंड एकत्र येतो त्यांना ट्रॉल केलं जातं, पिच्छ पुरवला जातो.. कधीकधीतर माणुसकीच्या सगळ्या मर्यादा लंघून महिलांशी या सोशल प्लँटफॉर्मवर वागले-बोलले जाते.

ओळख निर्माण करण्याचा मोह, जास्तीत जास्त मित्र जमवण्याचा मोह, एकटेपणा घालवण्यासाठी संवाद वाढवण्यासाठी सगळे संपर्क शेअर करणे, त्यातून संवाद आणि विश्वास हेतुपुरस्सर वाढवला जातो.. आकर्षण-प्रभाव निर्माण केला जातो.. तो निर्माण झाला आहे ह्याची चुणूक लागताच वैयक्तिक फोटो आणि माहिती मागवली जाते. त्याचाच कधीतरी गैरवापर होतो आणि त्यातून होणाऱ्या त्रासाला तोंड द्यावे लागते. आपल्याच चुकीमुळे पुरवलेली माहिती किंवा आपली माहिती चोरून, अकाउंट हॅक करून मिळवून जाळं विणलं जातं. कुटुंबाला-समाजाला घाबरून तक्रार करण्यास महिला आणि मुली धजावत नाहीत, हे गुन्हेगारांनी बरोबर हेरलं असतं, त्यांची हिम्मत वाढत जाते आणि एकामागोमाग एक अनेक महिलांना फसवण्याचा त्यांचा धंदा निर्धोक चालू राहतो.

मग काय करावे ?
बोलते व्हावे, कोणीतरी अगदी ओळखीतला किंवा अनोळखीही मुद्दाम जवळीक साधतो आहे, नको तितके कौतुक करतो, प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे हे लक्षात येताच हुरळून न जाता कोणतेही पाऊल उचलण्याआधी इतर महिलांचा त्या इसमाच्या बाबतीतला काय अनुभव आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. किंवा अश्या येणाऱ्या अनुभवांविषयी विश्वासातल्या माणसांशी चर्चा करावी. घरी नसेल बोलता येत तर मैत्रिणींशी बोलावे. घरात कोणी लक्ष देणारं नाही, बोलणारं नाही, एकटेपणा जाणवतो, नवरा व्यसनी आहे, संकट येताहेत किंवा इतर कोणत्याही दुःखाचं प्रदर्शन कोणाहीजवळ करू नये. कुठलीच गुपितं अनोळखी किंवा फक्त फेसबुक मित्र आहे म्हणून उघड करू नये. याच गुपितांच्या भरवशांवर तुम्हाला सांत्वना देत तुमच्या मनाचा ताबा मिळवला जातो आणि एकदा मनावर ताबा आला कि मग महिलांचे शारीरिक, आर्थिक, मानसिक, भावनिक आणि लैंगिक शोषण करणे सोप्पे होऊन बसते. बरेचदा थोड्याश्या सुखाच्या अपेक्षेने सुखातला जीव दुःखात-धोक्यात घालण्यात काहीही अर्थ नसतो. कोणीतरी फेसबुक सेलिब्रिटी, एखादा कलाकार, व्यवसायी खूप मोठा माणूस असून त्याचे असंख्य चाहते असून तो आपल्याशी आपुलकीने बोलतो ह्यातच महिला हुरळून जातात आणि नको त्या चुका करून बसतात. तो करत असलेले कौतुक, प्रेमाचे दावे, शपथा वचनं, प्रेमबीम तो फक्त आपल्याशीच करतो आहे असे समज करून बसतात. त्याने पूर्वीही अनेक महिलांना गंडवले असते आणि आताही एकाचवेळी तो तुमच्यासह अनेकींचा गैरफायदा घेत असतो. दोन काळ प्रेमाच्या अपेक्षेने महिला स्वतःचे फोटो पाठवणे, नको त्या भाषेत चॅटिंग, व्हिडीओ पाठवणे अश्या चुका करून बसतात ज्या भरवशावर पुढे ब्लॅकमेल होतात आणि सगळीकडूनच लुबाडले जातात.  आपण फार मोठी चूक करून बसलो आहे आणि हे कोणाजवळ सांगितले तर आपली अब्रू जाईल या भीतीने त्या कोणाजवळच हे बोलत नाहीत.. इथेच सर्वात मोठी चूक करतात. त्या अपराध्यांना अधिक बळ मिळते. असे काही अनुभव येत असतील तर फसण्याआधी कुणाशीतरी हे अनुभव शेअर करावे, फसवणूक झाली असेल तरी संकोच न करता मैत्रिणींशी बोलावे. एकमेकींशी बोलण्यामुळे त्या अधिक फसायच्या बचावतीलच पण इतर महिलांनाही त्यातून धडा मिळेल..त्या जागरूक होतील, अनेकींचे आयुष्य खराब होण्यापासून आपल्याला थांबवता येईल. प्रत्येक महिलेने या व्यासपीठावर सावध राहावे, सुरक्षित राहावे व इतर महिलांनाही सावध करावे.


नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) दिलेल्या माहितीनुसार, 2018 ते 202१ दरम्यान भारतात महिलांवरील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, सोशल मैद्याच्या माध्यमातून लैंगिकदृष्ट्या फसवणूक झाल्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये 110% वाढ झाली आहे. लैंगिकदृष्ट्या दबाव टाकणे तशी सामग्री प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे यासाठी दोषी ठरण्याचे प्रमाण पूर्वी 47.1% होते, तर सायबर पाठलाग आणि गुंडगिरीच्या प्रकरणांमध्ये ते 27.6% इतके कमी होते. या अहवालानुसार, २०२० मध्ये यापद्धतीच्या गुन्ह्यांसाठी ६०० पुरुष आणि १९ महिलांना अटक करण्यात आली होती. तसेच केलेल्या आणि नोंदणीकृत सायबर गुन्ह्यांमागील हेतूचा तपशील देण्यात आला आहे, ज्यात "लैंगिक शोषण" हा आर्थिक फसवणुकीनंतरचा सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा हेतू असल्याचे सांगितले गेले आहे.

- रश्मी पदवाड मदनकर





Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...