१८ व्या शतकाच्या शेवटी घडून आलेल्या औद्योगिक क्रांती, शहरी विकास आणि पुनर्जागृतीमुळे समाजात राजकीय, आर्थिक आणि सामाजिक बदल घडू लागले. त्यानंतरच्या काळात पश्चिमी देशांशी तुलना करत विकसनशील देशामध्ये जे परिवर्तन घडू लागले त्यालाच आधुनिकरण असे म्हंटले जाऊ लागले. हळूहळू तंत्रज्ञानाचा शोध, निर्मिती आणि वापर जसजसे वाढू लागले तसतसे जग अधिक जवळ येऊ लागले. सोयी-सुविधांसाठी तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जगणे अधिक सुलभ सोप्पे होऊ लागले. भारतासारख्या विकसनशील देशात ह्याचे जास्त महत्व होते कारण एकतर पारतंत्र्याचा काळ भोगल्यानंतर शेकडो वर्षांनी स्वातंत्र्य मिळाले म्हणून शून्यातून सुरुवात करून वैयक्तिक प्रगती आणि देशाचा निदान मूलभूत विकास या दोन्ही गोष्टी कमावणं काही खायचं काम नव्हतं. एका बाजूने हे प्रयत्न सुरु होते तर दुसरीकडे पाश्चात्य संस्कृतीला भुलून तरुण पिढी भौतिक सुखाकडे आकर्षिले जाण्याकडे कल वाढत होता. भारतीय समाजाच्या आणि पाश्चात्य संस्कृतीच्या एकूण सांस्कृतिक जडणघडणीतच मुळात फरक असल्याने ह्याचे परीणाम वेगवेगळ्या स्तरावर होऊ लागले. एकंदरीत सर्व बाजूने गतीने बदल होत चालले होते. शैक्षणिक टक्केवारी वाढल्याने आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक सुखसोयी आणि राहणीमानातले बदल दृष्टीस पडेल इतक्या स्पष्ट आणि सहज रीतीने झाले, परंतु मानसिकतेत मात्र आज ७० वर्षांनंतरही हवे तसे बदल घडलेले नाही. पुरुषसत्ताक रूढीवादी परंपरेने ग्रसित अनेेक घटनांतून आजही स्त्रीजीवनाचे आभाळ फाटकेच असल्याची जाणीव होत रहाते. मधल्या काळातील स्त्रियांनी वेगवेगळ्या मार्गाने बदलासाठी जोरकस प्रयत्न केले जरूर पण त्यामुळे या फाटक्या आभाळाला फक्त ठिगळच जोडता येऊ शकली.. संयुक्त राष्ट्रात १८४८ मध्ये 'सेनेका फल्स' संमेलन झाले ज्यात महिलांच्या अधिकारांसाठी पहिल्यांदाच आंदोलन झाले होते. भारतीय स्त्रीवादाची सुरुवात मात्र त्यामानाने सुदैवी होती एकतर ती स्त्रीवादापेक्षा स्त्रीमुक्तीची लढाई होती आणि त्यासाठी महिलां पुरुषांचा सहभाग होता, अनेक बुरसटलेल्या प्रथा परंपरेच्या जोखडातून इथल्या स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी मानसिकता बदलण्याचा संघर्ष तिचा अजून संपलेला नाही. संपूर्ण जगातील कहाण्या ऐकल्या तर स्त्री जीवनाची कथा फार काही वेगळी नाही. सगळ्याच देशात कुठल्यातरी कारणाने स्त्रीहक्कासाठी लढा सुरु आहे. भारतात मात्र हा लढा स्वातंत्र्यासाठी नंतर मूलभूत गरजांपासून जगण्याच्या हक्कापर्यंत आधी द्यावा लागतो ही मोठी शोकांतिका आहे हे मान्य करावेच लागेल.
मनातले खूप काही मनातच मांडतांना मनाचा तळ मात्र कधीच गाठता आला नाही म्हणूनच 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' हाच शोध मनात येणाऱ्या विचारांच्या माध्यमातून घेण्याचा हा साधासा प्रयत्न …
Tuesday 29 September 2020
'स्वभान' जपणारी ग्रामीण स्त्री !
विस्मृतीचा श्राप ...
अंधारलेल्या एखाद्या बोगद्यात शिरावे
आणि एक एक पाऊल पुढे चालतांना
घुप्प अंधार गवसत राहावा ...
आकाश, जमीन, प्रकाश
आणि सजीवांचे भास-आभास
सगळंच दूर-दूर पुसट होत,
ठिपका होत नाहीसे होण्यापर्यंत येऊन पोचावे ..
नाव, गाव ओळख मिटू लागावी,
भूत, वर्तमान भविष्याचा संदर्भच कळू नये
माणसांच्या भेटण्याच्या, त्यांच्या निघून जाण्याच्या कथा
कणकण आनंद, क्षणक्षण दुःखाच्या व्यथा
घट्ट झालेल्या नात्यांच्या, निसटलेल्या हातांच्या.. आणि
यासर्वात धडपडत तगून-जगून दाखवण्याच्या प्रथा
विघटित होऊन उडून जाव्या ..
रंग, गंध, दृष्टी, स्पर्शाच्या पलिकडे कुठेतरी
वैचारिक भूमिका, बौद्धिक- मानसिक आंदोलनं
गहिवरलेली स्पंदन विरावीत ..
इच्छा-आकांक्षा,अपेक्षांची वाफ व्हावी
अनोळखी होत जावे सारे ..
अंधाराच्या पटलावर दूर चमकताना दिसेल काहीतरी
धाव घेऊ नये मृगजळ असेल ते ..
काळा कभिन्न परिसर, फसव्या दिशा
अनिश्चित अंतरे, अनाकलनीय स्थिती
अनासक्त प्रवास ... आणि
अनवट भिवतीच्या अंधार वाटा ..
कुठे घेऊन जातील... ?
बोगदा अनादी नसतो तसा अनंतही नसतो..
अफाट असतो पण अथांगही नसतो ..
आपण चालत राहावे ...
प्रकाशाचे किरण चमकून शेवटचे टोक गाठेपर्यंत
आकाश, जमीन, वारा, गवताची हिरवी गार कुरणं
आणि सजीवांचे भास-आभास परत मिळेपर्यंत
पुन्हा गाणी स्फुरेपर्यंत, पुन्हा सूर फुटेपर्यंत
चालत राहावे .. अनिमिष ..
बोगद्यातून बाहेर पडलो की मात्र ..
मन निष्ठूर अन बुद्धी निबर होण्या आत
भावनांचा चोळामोळा अन संवेदनांचा पाचोळा होण्या आत
मागून घ्यावा बोगद्यातील भोगकाळाला विस्मृतीचा श्राप ...
रश्मी
Tuesday 22 September 2020
जन्माच्याच वेळी सटवाई लिहिते तिच्या माथी - 'बाई'
मग ती होते लेक, बहीण, बायको.. आई
गात राहते आयुष्यभर पीडेतून उठलेली जीवनगर्द अंगाई ..
गुणगुणते तटतटत्या वेदनेतून भावसमेवर आलेल्या अंतर्लयी ..
ती छेडत राहते प्राणाच्या वीणेवर अम्लान सुखाची तान
पानगळीतही शोधत बसते मनाचे लसलसते हिरवे रान
उजवते चैतन्याची कूस अन शिवून घेते उसवलेले काळीजभान
चिंब ओल्या सांजपावसातही फुलवते जाणिवांचे विवर्त विराण
ती घेते नात्यांना खोल काळजात रुजवून
प्रत्येक कणाला भावओल देऊन देते मायेने भिजवून
रात्र रात्र पाहते स्वप्न - ठेवते सगळे जागवून
आकांक्षांच्या उडत्या पाखरांना ठेवते पदरात निजवून
ती आणते रखरखत्या उन्हातून शीतल गारवा चोरून
वाटत फिरते प्रेम-जिव्हाळा ओंजळ भरभरून
फाटक्या तुटक्या मोडक्या विटक्या गोष्टी ठेवते झाकून
बोलते हसते रमते खेळते ..मुखवटा घेते ओढून.
रश्मी..
Wednesday 2 September 2020
Featured post
काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...
काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...
-
गे ल्या महिन्यात एका १७ वर्षाच्या तरुणीला आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या.. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावताना पुढे आलेली...
-
दारं खिडक्या पक्क्या बंद केलेल्या खोलीत किंवा खूप गर्दी असणाऱ्या ठिकाणी एक मिनिटही राहता न येणं, जीव गुदमरणं हा एक प्रकारचा फोबीया आहे. क्ला...