Monday 20 July 2020

काही गोष्टींचा आनंद मानावा की दुःख हेच कळत नाही ..






संपूर्ण उन्हाळा लॉकडाऊनमध्ये पार पडला. कधी रखरखते पोळून काढणारे ऊन तापू लागले आणि कधी निवळले कळलेही नाही. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सुस्थितीतल्या चपला जमा करून ठेवल्या होत्या..त्या दरवर्षीप्रमाणे उन्हात पाय भाजत चालताना दिसणाऱ्या गरजवंतांना द्यायचे ठरले होते. तसे तळपत्या उन्हात प्रचंड संख्येने दूरदूर पायी चालत निघालेली एक नवीच जमात या काळात उदयाला आली होती पण त्या प्रत्येकापर्यंत पोचणं काही शक्य झाले नाही. लॉकडाऊन असतांना आपली घोडदौड शहराच्या आतल्या भागापर्यंतच सीमित राहिली शेवटी. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑफिसला निघताना (होय माझे ऑफिस चालूच होते) यातले २-४ जोड चपला गाडीत ठेवून घ्यायच्या आणि उन्हात भाजत पायपीट करणाऱ्या लहान मुलांना, गाडा ओढणाऱ्या, सायकलरिक्षा चालवणारे, भीक मागणारे, मजुरी करणारे किंवा गावातून शहरात येऊन भाजी दूध लोणी विकणाऱ्या गरीब मंडळींना द्यायचे हा शिरस्ता पाळायचा होता. पण या टोकापासून त्या टोकापर्यंत भयाण शांतता पसरलेल्या शहरात घरात दारात झोपडीत खोपटात पायपात ब्रिजखाली कुठेकुठे लॉकडाऊन होऊन पडलेली मंडळी दिसलीच नाही. गरजवंत दिसले नाही म्हणून आनंद मानावा की गरजवंत असूनही आपल्याला दिसू शकली नाही किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोचूच शकलो नाही याचं वाईट वाटून घ्यावं हा मोठा प्रश्न आहे ..


मागल्या आठवड्यात ऑफिसमधून घरी परतताना ५ आणि ३ वर्षांचे दोन चिमुकले दिसले चपलेविना हातात हात घेऊन रस्त्याने चालताना. पायात चपला का नाही विचारले तर म्हणाले नाही आहेत चपला. कुठे राहता तर खालच्या बस्तीत म्हणाले .. खालच्या बस्तीत म्हणजे ही मुले पारधी समाजाचा जो जत्था राहतायत ओंकार नगरच्या खुल्या मैदानावर त्यांची मुले. दुसऱ्या दिवशी चपला घेऊन पोचले बस्तीवर तर रस्त्यापासून उतारावर असणाऱ्या प्लास्टिक झाकलेल्या त्यांच्या झोपड्या पावसाच्या पाऊलभर पाण्यात तुडुंब डुंबलेल्या दिसल्या. रस्त्यापासून झोपड्यांपर्यंतचा पूर्ण रस्ता चिखल चिखल झालेला. मी दूर वर रस्त्यावरच उभी राहून पाहत राहिले .. जिथे त्यांच्या झोपडीत जमिनीवर बसता येण्याचीही शक्यता नव्हती. प्रफुल्लित वातावरण झाले म्हणून खुश होत आपण आपल्या घरी चार भिंतीत चहा भजी खात असतो तेव्हा.. जेव्हा आकाशातून धो धो पाऊस बरसत असतो, डोकं लपवायला असणाऱ्या तुटक्या झोपडीत जमिनीवरही पाऊलभर पाणी साठले असते, जेव्हा ह्यांना साधे जमिनीवर बसता झोपताही येत नसते, रात्र रात्र डोक्यावर फाटके छत आणि पाणी भरल्या जमिनीवर उभे राहून काढावी लागते , येण्याजाण्याच्या रस्त्यावर पाय रुततील इतका चिखल भरला असताना आपण आणलेले २-४ जोड चपला यांच्या काय कामाच्या असतील हा विचार मनात येऊन मी स्तंभित होऊन तिथेच उभे राहिले बराच वेळ.. यांच्यासाठी काय करता येणार होते? तुटपुंज्या मदती गाडीच्या डिक्कीत घेऊन फिरणारे आपण आपली झोळी किती तोकडी असते, किती बांधले गेलेलो असतो आपण .. अश्यावेळी ह्याची जाणीव होते आणि मग आपणच आपल्यासमोर फार खुजे दिसू लागतो... फार खुजे.

Image may contain: outdoor and nature

-रश्मी ...
गझलकार सतीश दरडी ह्यांनी दिलेल्या मिसऱ्यावरून गझल लिहिण्याचा मी केलेला प्रयत्न - 

(तुझे स्वप्न जेंव्हा पडू लागले)
कसे दुःख सारे झडू लागले 

तुझी आस जेथे मनी दाटली  
तिथे भास सारे दडू लागले 

उगी अडखळू लागली पावले  
कळेना असे का घडू लागले 

अश्या सांज समयी सुने वाटते 
तुझे दूर जाणे नडू लागले 

कुणाला पुसू काय हे दाटले 
कशाला असे भडभडू लागले

Thursday 9 July 2020

माझा वेल्हाळ पाऊस

माझा वेल्हाळ पाऊस
असा येतो बरसतो 
जणू अंगांगात साऱ्या  
नवे चैतन्य पेरतो 

माझा वेल्हाळ पाऊस 
घर अंगण भिजवी
खोल मातीत शिरून 
नवे अंकुर फुलवी 

माझा वेल्हाळ पाऊस 
त्याची बातच वेगळी 
त्याच्या फक्त स्पर्शामुळे
फुलारते चाफेकळी

माझा वेल्हाळ पाऊस 
नदी होऊन वाहतो 
तिच्या अंगाखांद्यावर 
खुणा पेरून धावतो

माझा वेल्हाळ पाऊस 
पाझरतो आत आत 
जणू रुजवून काही 
पुन्हा उगवे कणात..

माझा वेल्हाळ पाऊस 
करे धरतीशी माया 
रस रूप गंध सारे 
आला उधळून द्याया..

माझा वेल्हाळ पाऊस 
उतरतो खोल खोल  
गात्रागात्रातून वाहे 
त्याच्या अस्तित्वाची ओल.


Monday 6 July 2020

सुखाशी भांडतो आम्ही



सुख सुख म्हणतात म्हणजे नेमके काय … ??


या प्रश्नावर नाही तर उत्तराच्या नेपथ्यावर खेचून उभं करणारं आणि सुखाच्या सर्व काल्पनिक, बेगड्या कल्पना धुऊन काढून मन ढवळून काढून सुप्त अन खऱ्या सुखाच्या इच्छा जागृत करणारं नाटक पहिलं आज ….


'सुखाशी भांडतो आम्ही'


लेखकाच्या यथार्थ लिखाणाची , दिग्दर्शकाच्या प्रभावशाली दिग्दर्शनाची आणि कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाची … नाही खरतर व्यक्तिरेखा साकारण्याच्या त्यांच्या गुणांची अकल्पिक अनुभूती घ्यायची असेल तर एकदा तरी हे नाटक बघायलाच हवं ….


लेखक नाटककार अभिराम भडकमकर यांनी फार वेगळा विषय या नाटकातून प्रेक्षकांसमोर मांडला आहे …. भद्रकाली प्रॉडक्शनचे कुमार सोहोनी दिग्दर्शित आणि कविता कांबळी निर्मित 'सुखाशी भांडतो आम्ही' एक अप्रतिम आणि उत्कृष्ट नाटक ….


सदाशिव विठ्ठल नाशिककर (चिन्मय मांडलेकर)या शेतकी महाविद्यालयातील अतिशय हुशार कविमनाच्या प्राध्यापकाची मनोव्यथा…. मनोविकार जडलाय त्याला पण त्याच्या खुळ्या ठरलेल्या आणि समाजाने वेड्या ठरवलेल्या विचारांमध्ये प्रेक्षक कसा गुरफटत जातो हे कळतच नाही … दुसर्या बाजूने या वेड्याचा उपचार करणारा डॉक्टर श्रीधर (डॉ.गिरीश ओक) द्विधा मनःस्थितीतला, स्वतःला काय हवं ते विसरून प्रतिष्ठा, ऐश्वर्य हेच सुख समजून त्यांचाच शोध घेत मिळेल तो रस्ता पत्करत धावणारा आणि त्याची अति महात्वाकांक्षी पत्नी मिता (रेखा बडे) हिच्या सुखाच्या लग्जरिअस कल्पना …. या जुगलबंदीतून प्रेक्षक स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत राहतो ….


शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरीब माणसाच्या प्रामाणिक नौकरीतून मिळणाऱ्या पगारातही होणारे भ्रष्टाचार, अन्याय … मन म्हणेल तसे वागायची मुभा नाही, मन् मारून जगायचे लोकांच्या खोट्या प्रतिष्ठा या सर्वात हा प्रामाणिक आणि पापभिरू 'सदा' गुंतत जातो त्याच्या मनाचा कोंडमारा होतो आणि 'मन' हेच त्याचे सर्वात मोठे वैरी होऊन बसते … त्यातून त्याला वेगवेगळे भास होऊ लागतात आणि मग त्याच्या हाताने त्याच्या बायकोची अन मुलाची हत्या घडून येते स्वतः आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतांना पकडला जातो आणि ७ वर्षांची शिक्षा भोगून परत येउन मान्सोपचाराकडे उपचारार्थ दाखल होतो …


सदाचे मन सदाशी बोलत असतं … आणि आपण आपल्याच मनाचं का ऐकत नाही हा प्रश्न सदाला छळून असतो … म्हणजे मनाचच ऐकायला पाहिजे पण व्यावहारिक जगात जगतांना आपण आपल्या मनाचं ऐकत नाही किंवा त्याला दूर लोटूनच जगलं पाहिजे तरच इथे मनुष्य जगू शकतो किंवा टिकू शकतो हे सदाला कळतंय पण सदाच मन ऐकत नाहीये आणि म्हणून सदा स्वतःच्याच मनाचा वैरी झालाय….


कारण मनामुळे तो इतर लोकांसारखे व्यावहारिक जगणे जगू शकत नाही त्याला भावना सतावतात, त्याला दुख होतं,आनंद होतो पण व्यावहारिक जगात जगाला वाटेल तस जगाव लागतं, त्याला इतरांसारखे मनाला समजावता येत नाही स्वतःच्या अखत्यारीत बांधून ठेवता येत नाही ….या सगळ्या नुसत्या कल्पना बघतांना सुद्धा आपल्याकरवी राहून राहून लेखकाला नकळत दाद दिली जाते ...


शहाण्यानसारखे जगणारे डॉ श्री त्यांची पत्नी आणि मुलगा आणि मानसिक रोगी किंवा वेडा ठरलेला सदा यांच्यातले संवाद दिलखेचकच नाही तर हृदय ढवळून टाकणारे आणि सगळी वैचारिक गात्रे जागृत करणारी आहेत …


श्री आणि सदाच्या मधला ड्रिंक घेताना आणि आईची आठवण एक विनोदी सीन पण बुद्धिशाली लिखाणाचा अन सुंदर अभिनयाची परिसीमा गाठणारा नमुना आहे ….


आजच्या काळातल्या विभक्त कुटुंबाच उदाहरण दाखवलेले श्री चे कुटुंब त्यांची स्वप्न त्यांच्या महत्वाकांक्षा एका उंचीपर्यंत पोचताच मुलाने दूर विदेशात जाउन सेटल होण्याचा घेतलेला निर्णय आणि याबरोबरच सुखाच्या बेगडी कल्पना गळून पडलेली मुसमुसनारी आई आणि ........आणि आपणही आपले गाव सोडतांना आपल्या तरुणपणी असेच वागलो होतो हे आठवून हिरमुसलेला बाबा…. त्या आधी खुळ्या सदाने त्याच्या पद्धतीने सांगितलेले सुखाचे तत्वज्ञान …… काही भाग मनाला भिडणारे आणि नाटकाला उंचीवर घेऊन जाणारे आहेत …


खरा वेडा कोण आणि खरा शहाणा कोण … या प्रश्नांच्या मध्ये कोंडी झालेला प्रेक्षक या नाटकातून त्याच्या आयुष्यातले लहान लहान सुख सुद्धा किती महत्वाचे आहेत आणि ते आपण सुखामागे धावतांना, पडतांना आणि परत उठून पळतांना तसेच ताटकळत सोडून देत असतो हा हिशोब स्वतःच्याही नकळत हे नाटक बघतांना लावत असतो ….ते पूर्णपणे हिरावून जाण्या आधी बदल करता येतील का याचा शोध घेत बसतो … खरतर हीच या नाटकाची मिळवती बाजू आहे ….


या व्यतिरिक्त गुरु ठाकूर ह्यांचे वजनदार शब्द सुरेश वाडकर ह्यांच्या अप्रतिम सुराने नाटकात सुरुवातीपासूनच पोषक अशी वातावरण निर्मिती होते …. तसेच पौर्णिमा हिरे यांनी कमळाबाईंच्या भूमिकेत धमाल केली आहे… विनोद निर्माण करत गंभीर झालेली परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न या पात्राने केला आहे .…विजया महाजन यांनी प्रधान मेडम तर अभय फडके याने श्री चा मुलगा म्हणून अक्षय ची भूमिका यथार्थ पार पाडली आहे ….


एकंदरीत …. एखादी सुंदर, बुद्धीला खाद्य देणारी आणि वैचारिक भूक शमवणारी तरीही पूर्ण मनोरंजक पैसा वसूल कलाकृती पहायची असेल तर 'सुखांशी भांडतो आम्ही' एकदा बघायलाच हवा ….














रश्मी पदवाड मदनकर


6/07/2013

Thursday 2 July 2020

घोंगावणाऱ्या वाऱ्याने नाहीच दिले विनाशाचे संकेत
एके रात्री विशालकाय आभाळाचा तुकडा
अचानक फाटला, कोसळला .. आणि
 उंबऱ्यापासून गाववेशीपर्यंत वाहून घेऊन गेला लक्तरं
जगण्यासाठीच्या सगळ्या संभावना विस्कळीत
पायाखालची जमीन आणि डोक्यावरचे आभाळही
अश्रूंच्या महापुरात तुडुंब ..

संसार उघडे पडले..हातातले हात सुटले
शिल्लक राहिलेत काही जिवंत पार्थिव ..  
पंचतत्वात विलीन व्हावे असे कितीही वाटले
तरी नियती इतकी सहज सुटका करीत नाहीच
अक्ख्या आयुष्याच्याच नाका-तोंडात पाणी जाऊन
फुगून वर आलेल्या  छिन्न विच्छिन्न,
 कुजलेल्या लिबलिबीत प्रेतासारखी
एकेकाची चित्तरकथा .. पडझड झालेल्या अर्ध्या उभ्या
भिंतींवर आदळत राहणार आहेत अनेक वर्ष ..अखंड !

माणसे गिळणारा हा लाल-काळा चिखल तुडवत
उरलेल्यांना चालत राहावे लागणार आहे.

काळ सोकावत जाईल
वाहून गेलेले मृतदेह घुसळले जातील, फसतील, रुतली जातील,
खोल आत आत चिखलात ..आणि एक दिवस विरघळून जातील.
पण
जीव न गेलेल्या देहातील आशा आकांक्षांचे
पाण्यावर तरंगणारे कलेवर मात्र येत राहतील वरवर
महापुराच्या विनाशाची चित्र रंगवत मनःपटलावर
चिरकाल ..

रश्मी -
ऑक्टो. २०

Image may contain: text

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...