Posts

Showing posts from July, 2020

काही गोष्टींचा आनंद मानावा की दुःख हेच कळत नाही ..

Image
संपूर्ण उन्हाळा लॉकडाऊनमध्ये पार पडला. कधी रखरखते पोळून काढणारे ऊन तापू लागले आणि कधी निवळले कळलेही नाही. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सुस्थितीतल्या चपला जमा करून ठेवल्या होत्या..त्या दरवर्षीप्रमाणे उन्हात पाय भाजत चालताना दिसणाऱ्या गरजवंतांना द्यायचे ठरले होते. तसे तळपत्या उन्हात प्रचंड संख्येने दूरदूर पायी चालत निघालेली एक नवीच जमात या काळात उदयाला आली होती पण त्या प्रत्येकापर्यंत पोचणं काही शक्य झाले नाही. लॉकडाऊन असतांना आपली घोडदौड शहराच्या आतल्या भागापर्यंतच सीमित राहिली शेवटी. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑफिसला निघताना (होय माझे ऑफिस चालूच होते) यातले २-४ जोड चपला गाडीत ठेवून घ्यायच्या आणि उन्हात भाजत पायपीट करणाऱ्या लहान मुलांना, गाडा ओढणाऱ्या, सायकलरिक्षा चालवणारे, भीक मागणारे, मजुरी करणारे किंवा गावातून शहरात येऊन भाजी दूध लोणी विकणाऱ्या गरीब मंडळींना द्यायचे हा शिरस्ता पाळायचा होता. पण या टोकापासून त्या टोकापर्यंत भयाण शांतता पसरलेल्या शहरात घरात दारात झोपडीत खोपटात पायपात ब्रिजखाली कुठेकुठे लॉकडाऊन होऊन पडलेली मंडळी दिसलीच नाही. गरजवंत दिसले नाही म्हणून आनंद मानावा की गरजवंत असू...
गझलकार सतीश दरडी ह्यांनी दिलेल्या मिसऱ्यावरून गझल लिहिण्याचा मी केलेला प्रयत्न -  (तुझे स्वप्न जेंव्हा पडू लागले) कसे दुःख सारे झडू लागले  तुझी आस जेथे मनी दाटली   तिथे भास सारे दडू लागले  उगी अडखळू लागली पावले   कळेना असे का घडू लागले  अश्या सांज समयी सुने वाटते  तुझे दूर जाणे नडू लागले  कुणाला पुसू काय हे दाटले  कशाला असे भडभडू लागले

माझा वेल्हाळ पाऊस

Image
माझा वेल्हाळ पाऊस असा येतो बरसतो  जणू अंगांगात साऱ्या   नवे चैतन्य पेरतो  माझा वेल्हाळ पाऊस  घर अंगण भिजवी खोल मातीत शिरून  नवे अंकुर फुलवी  माझा वेल्हाळ पाऊस  त्याची बातच वेगळी  त्याच्या फक्त स्पर्शामुळे फुलारते चाफेकळी माझा वेल्हाळ पाऊस  नदी होऊन वाहतो  तिच्या अंगाखांद्यावर  खुणा पेरून धावतो माझा वेल्हाळ पाऊस  पाझरतो आत आत  जणू रुजवून काही  पुन्हा उगवे कणात.. माझा वेल्हाळ पाऊस  करे धरतीशी माया  रस रूप गंध सारे  आला उधळून द्याया.. माझा वेल्हाळ पाऊस  उतरतो खोल खोल   गात्रागात्रातून वाहे  त्याच्या अस्तित्वाची ओल.

सुखाशी भांडतो आम्ही

Image
सुख सुख म्हणतात म्हणजे नेमके काय … ?? या प्रश्नावर नाही तर उत्तराच्या नेपथ्यावर खेचून उभं करणारं आणि सुखाच्या सर्व काल्पनिक, बेगड्या कल्पना धुऊन काढून मन ढवळून काढून सुप्त अन खऱ्या सुखाच्या इच्छा जागृत करणारं नाटक पहिलं आज …. 'सुखाशी भांडतो आम्ही' लेखकाच्या यथार्थ लिखाणाची , दिग्दर्शकाच्या प्रभावशाली दिग्दर्शनाची आणि कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाची … नाही खरतर व्यक्तिरेखा साकारण्याच्या त्यांच्या गुणांची अकल्पिक अनुभूती घ्यायची असेल तर एकदा तरी हे नाटक बघायलाच हवं …. लेखक नाटककार अभिराम भडकमकर यांनी फार वेगळा विषय या नाटकातून प्रेक्षकांसमोर मांडला आहे …. भद्रकाली प्रॉडक्शनचे कुमार सोहोनी दिग्दर्शित आणि कविता कांबळी निर्मित 'सुखाशी भांडतो आम्ही' एक अप्रतिम आणि उत्कृष्ट नाटक …. सदाशिव विठ्ठल नाशिककर (चिन्मय मांडलेकर)या शेतकी महाविद्यालयातील अतिशय हुशार कविमनाच्या प्राध्यापकाची मनोव्यथा…. मनोविकार जडलाय त्याला पण त्याच्या खुळ्या ठरलेल्या आणि समाजाने वेड्या ठरवलेल्या विचारांमध्ये प्रेक्षक कसा गुरफटत जातो हे कळतच नाही … दुसर्या बाजूने या वेड्याचा उपचार करणारा डॉक्टर श्रीधर (डॉ...
Image
घोंगावणाऱ्या वाऱ्याने नाहीच दिले विनाशाचे संकेत एके रात्री विशालकाय आभाळाचा तुकडा अचानक फाटला, कोसळला .. आणि  उंबऱ्यापासून गाववेशीपर्यंत वाहून घेऊन गेला लक्तरं जगण्यासाठीच्या सगळ्या संभावना विस्कळीत पायाखालची जमीन आणि डोक्यावरचे आभाळही अश्रूंच्या महापुरात तुडुंब .. संसार उघडे पडले..हातातले हात सुटले शिल्लक राहिलेत काही जिवंत पार्थिव ..   पंचतत्वात विलीन व्हावे असे कितीही वाटले तरी नियती इतकी सहज सुटका करीत नाहीच अक्ख्या आयुष्याच्याच नाका-तोंडात पाणी जाऊन फुगून वर आलेल्या  छिन्न विच्छिन्न,  कुजलेल्या लिबलिबीत प्रेतासारखी एकेकाची चित्तरकथा .. पडझड झालेल्या अर्ध्या उभ्या भिंतींवर आदळत राहणार आहेत अनेक वर्ष ..अखंड ! माणसे गिळणारा हा लाल-काळा चिखल तुडवत उरलेल्यांना चालत राहावे लागणार आहे. काळ सोकावत जाईल वाहून गेलेले मृतदेह घुसळले जातील, फसतील, रुतली जातील, खोल आत आत चिखलात ..आणि एक दिवस विरघळून जातील. पण जीव न गेलेल्या देहातील आशा आकांक्षांचे पाण्यावर तरंगणारे कलेवर मात्र येत राहतील वरवर महापुराच्या विनाशाची चित्र रंगवत मनःपटलावर चिरकाल .. ...