Thursday, 22 August 2019

रूपाताई कुलकर्णी-बोधी


काही माणसांचा जन्म कुठल्यातरी कारणासाठी घडून आलेला असतो. त्यांच्या जीवितकार्यासाठी नियतीशी जन्माआधीच ठरलेला करार असावा यावर विश्वास बसावा इतके एखाद्याचे आयुष्य कार्याशी करार असल्यागत प्रामाणिक पुढे सरकत राहतं त्यांच्या हातून आयुष्याला पुरून उरणारी महत्कार्य होत जातात. आणि हे कार्य वाचतांना किंवा ऐकतांना पुढल्या पिढीचा नियतीवरचा विश्वास फिका पडतो कारण या माणसांच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीवर नियतीही भाळलेली दिसते आणि आपला त्यांच्या कर्तृत्वावरचा विश्वास अधिक प्रगाढ होत जातो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे वाईट वाटणार नाही असा माणूस विरळाच पण या घटनांसाठी संवेदनशील होत परिस्थितीशी तह करत, वंचितांच्या आयुष्याची नवी घडी बसवण्याचे मनसुबे रचवत,  अक्ख्या समाजातच मन्वंतर घडवून आणण्याच्या आर्त तळमळीने अग्निकुंडात उडी किती जण घेत असतील? 

'एखादा विचार दीर्घकाळ दुर्लक्षित राहिला म्हणून महत्वाचा नसतो असे नाही, निव्वळ बहुमताच्या जोरावर  त्याला डावलण्याची युक्ती कोणीतरी वापरते आणि मग तीच वहिवाट बनून जाते' असे रूपाताई म्हणतात पण मग अश्या या धगधगत्या जगाच्या उंबरठ्यावरून बाहेर पडत एकल वाट चोखाळणाऱ्या, नवस्त्रीवादाची संकल्पना आणि पुनर्मांडणी करणाऱ्या रूपाताई कुलकर्णी म्हणूनच तर जगावेगळ्या ठरतात. केवळ एखाद्या आयुष्याचे नाही तर एका पिढीच्या अर्ध्या लोकसंख्येची यातना त्यांनी जगासमोर करुणेने मांडली आणि ती बदलून आणण्याच्या आंतरउर्मीने संघर्ष करण्याची प्रमाथी ताकद मिळवून तळपत्या वाटेने चालत पेटते पलितेच पदरी ओढून घेत राहिल्या पण हा मार्ग मात्र कधीच बदलला नाही.  

रुपाताई जन्मभूमीने आणि कर्मभूमीनेही तश्या नागपूरच्याच, कार्यक्षेत्र मात्र विदर्भापर्यंतच्या व्याप्तीचं. ८० च्या दशकात स्त्री चळवळीतल्या मुख्य सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आजही रुपाताईंचे नाव अग्रगण्य आहे. वडील अप्पासाहेब हे त्याकाळचे डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते. आईचे नाव प्रमिला नोकरीपेशा हळव्या मनाची स्त्री, सर्व त्यांना बाई म्हणत. व्यक्ती आणि समाज यांच्यामधले नाते सूक्ष्मांतिसूक्ष्म जिवंत धाग्यांनी विणले गेलेले असते तसेच जाणीव आणि आत्मभान हे आंतरिक आणि बाह्य अशा अनेक घटकांमधून आकाराला येत असते तसेच झाले. सतत घरात होणाऱ्या चर्चा, मैत्री परीवारातली संगत, बौद्धिक, वैचारिक वातावरणात घडलेल्या जडणघडणेने फार लहान वयात त्यांची सामाजिक जाण जागृत झाली होती. आज गेल्या ४० वर्षांपासून त्या स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. विशेषतः असंघटित महिला कष्टकऱ्यांची संघटनबांधणी आणि त्यांच्या हक्कांसाठीचा लढा त्या अविश्रांत देतायेत. मोलकरणींच्या समस्यांबाबत काहीतरी करायला हवे ही ठिणगी मनात कधी अन कशी पेटली या प्रश्नांवर त्या कातर हळव्या होतात आणि या सर्व चळवळींची त्यांच्या आयुष्यातली पहीली खरी नायिका असणाऱ्या लक्ष्मीचा किस्सा सांगू लागतात ...  

तो ६६-६७ चा काळ होता रूपाताई नुकतंच हिस्लॉप महाविद्यालयात नोकरीला लागल्या होत्या वय होते २१ वर्ष. त्यांच्याघरी नियमित येणारी मोलकरीण होती तुळसाबाई पण हिच्याशिवाय पंच्याहत्तरीतली पाठीतून वाकलेली, पार थकलेली जक्ख म्हातारी लक्ष्मी खूप दुरून फुटाळावरून रवीनगरपर्यंत चालत यायची, व्हरांड्यात येऊन बसून राहायची. 'बाई पालव दे' अशी हाक घालायची, मग बाई (आई) तिला बसायला बारदान द्यायची, पोटभर खायला द्यायची, चहा-पाणी द्यायची, कपडे द्यायची. त्या साऱ्याची परतफेड म्हणून लक्ष्मी अंगण झाडून द्यायची, कधी तांदूळ निवडून द्यायची, रुपाताईंना प्रेमाने बोलावून डोक्यात तेल लावून द्यायची, काळजीनं विचारपूस करायची. लक्ष्मीशी हळूहळू ममत्वेचे, जिव्हाळ्याचे नाते होत गेले. महाविद्यालयातून परत आले कि तिचे व्हरांड्यात बसून दिसणे सवयीचे होत गेले. एक दिवस मात्र अचानक लक्ष्मी येईनाशी झाली.. खूप दिवस गेले. एकदा तिच्या शोधात तिची झोपडी असणाऱ्या वस्तीत रूपाताई गेल्यावर कळले कि म्हातारपणामुळे इतक्या दूर चालत येणे जमत नाही म्हणून नजीकच्या रस्त्यावर-देवळात ती भीक मागून उदरनिर्वाह करते .. पुढे कधीतरी कळले ती आता या जगातच राहिली नाहीये. या प्रसंगाने रूपाताईंच्या मनावर प्रखर परिणाम केला. स्वतःचा गुजराण करणंही कठीण असणाऱ्या या स्त्रियांच्या एकलकोंड्या आयुष्याचे कसे धिंडवडे उडतात हे पाहणे असह्य होऊन त्यांनी या महिलांसाठी काहीतरी करायचे ठरवले आणि हि चळवळ उभी राहिली. नंतर ग्रुप चळवळी सुरु झाल्या पण या सर्वांच्या सुरु होण्यामागे 'लक्ष्मी' ही नायिका होती असे रूपाताई निक्षून सांगत राहतात. 

मोलकरणीची संघटना बांधल्यानंतर रवीनगर सोडून टिळक नगरला राहायला आल्यानंतर रीतसर आणि जोमाने या चळवळीचे काम सुरु झाले होते. त्यावेळी त्या नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागात प्राध्यापिका होत्या. कॉलेज संपले कि कधीच सरळ घरी न जाता या कामकरी महिलांच्या वेगवेगळ्या भागातल्या वस्तीत जायच्या तिथल्या स्थितीचे, त्या महिलांच्या जगण्याचे अवलोकन करायच्या; त्यांच्या अडचणी-समस्या समजून घ्यायच्या. मग टिळक नगरच्या मैदानात बैठक व्हायच्या त्या समस्यांवर किंवा त्यांच्या गरजांवर तोडगे शोधले जायचे. या वेळपर्यंत मोलकरणींना ह्यांची ओळख पटू लागली होती. त्यांच्या गोटात रुपाताईंचा आदर वाढू लागला होता. या महिला स्वतःहून समस्या घेऊन ताईंपर्यंत पोचू लागल्या होत्या. 

हा सर्व संघर्ष चालू असताना कुठल्या मुख्य अडचणी येत असतील हा प्रश्न माझ्या मनात रुंजी घालत होता, वाटलं शासनापासून प्रशासनापर्यंत अडचणींची जंत्री लागेल. या कामामध्ये तोंड द्याव्या लागणाऱ्या माणसांच्या यादीत नामवंतांची नावे समोर येतील; पण असे झाले नाही. या सर्व प्रश्नांचे उत्तर एकंच होते 'मध्यम वर्गीय लोकांची मानसिकता'.. अरेच्छा ! हे कसे ? माझा प्रश्न ... उत्तरादाखल रूपाताई एक किस्सा सांगत्या झाल्या..

अजनीनजीकच्या झोपडपट्टी वस्तीतली एक म्हातारी मोलकरीण जवळच्याच सुखवस्तू एरियातल्या एका इमारतीत कामाला जात असे. आजीला मदत म्हणून १२ वर्षांची चिमुकली नातही सोबत जात असे. एकदा मालकिणीचा कुठलासा दागिना गहाळ झाला. मागचा पुढला कुठलाही विचार न करता मालकिणीने नातीवर आळ घेतला.. पोलिसांनीही सख्तीने विचारपूस केली. ह्याचा परिणाम त्या चिमुकलीवर असा काही झाला कि तिने झोपडीबाहेरच्या छोट्या मोरीमध्ये स्वतःला जाळून घेतले..नंतर तो दागिना मालकिणीला घरच्याच कुठल्या सदस्याजवळ सापडला... ती निष्पाप पोर मात्र जीवानिशी गेली...हा एक प्रसंग..दुसरा.. एकदा मालकिणीच्या घराबाहेर उघड्या मोरीवर काम करणाऱ्या एका मोलकरणीवर रस्त्याने जाणाऱ्या ट्रकने भिंत तोडून गाडी चढवली. तिचाही जागीच मृत्यू झाला. अश्या घटनांमध्ये विशेषतः चोरीच्या घटनांमध्ये अनेकदा पोलीस प्रशासनांमार्फतही या मोलकरणींना मदत करायची सोडून उलट त्याच लोकांना, त्यांच्या घरच्यांना जास्तीत जास्त त्रास होईल असे घडत राहते. त्यांच्या घरची झाडाझडती होते त्यांचे जगण्यासाठी महत्प्रयासाने जमवलेले सामान फेकफाक केले जाते, नासधूस होते, सगळं काही विस्कटतं. या विरुद्ध आवाज उठवला की या मध्यम वर्गाला मात्र त्रास होतो. चमडी बचाओ प्रवृत्ती बाहेर येते. या गरीब महीलांना सहकार्य करायचे सोडून विरोधासाठी मात्र हे संघटित होऊ लागतात. त्याकाळी तरुण भारतात रूपाताई विरुद्ध जवळपास शंभरेक पत्र आली असतील. त्यातले अनेक त्यांच्यावर वैयक्तिक ताशेरे ओढणारी, नको ते आरोप करणारी पत्र देखील असायची. हा काळ खूपच मानसिक त्रासाचा होता.    

या देशाचा सर्वात मोठा रोग म्हणजे गरिबी! स्वातंत्र्य, सुरक्षा आणि प्रतिष्ठा हे या देशातील प्रत्येक नागरिकाचे हक्क आहेत. फार मोठ्या प्रमाणात सामान्य भारतीय स्त्री या तिन्ही हक्कांपासून वंचित आहे. उदा. मोलकरणी, बांधकाम मजूर स्त्रिया, कचरा चिवडणाऱ्या, भंगार वेचणाऱ्या महिला ! केस गोळा करणाऱ्या महिलांच्या झोपड्यांसमोर तर माणसा माणसांच्या उंचीचे ढीग लागलेले असतात. त्या केसांच्याच ढिगावर तिथली मुलं खेळतांना दिसतात. वस्तित दूरवर घाणीचे साम्राज्य असते. रोगाचा प्रादुर्भाव सगळीकडे पसरलेला असतो. या सगळ्या महिलांना कशाचेच संरक्षण नसते. यांच्या आरोग्याची कोणी दखल घेत नाही. कुठली घटना झालीच तर कुणीच जबाबदारीही घेत नाही. सरकार दरबारी कसले धोरण यांच्या बाजूने नाही. प्रशासनाला यांच्याबद्दल कुठलीच आपुलकी नाही. ह्यांना अतिशय वाईट वागणूक दिली जाते. यांच्या कामाचे स्वरूप पाहता आरोग्याच्या अनेक समस्या ह्यांना असू शकतात याकडे कुणाचेच लक्ष नाही. ह्यांच्या मुलांना शिक्षण नाही, त्यामुळे भविष्याची काहीच तरतूद नाही. यासगळ्यांचा विचार करता या महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर, स्त्रीरोग कँसर तपासणी, आपतग्रस्त महिला सेल, भरोसा सेल सारख्या पोलीस खात्याची मदत घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या हिंसेच्या समस्या सोडवणे अश्या अनेक प्रकारची मदत रूपाताईंची संघटना आजतागायत करत राहिली. आपत्कालीन प्रसंगी हि माणसे राहत असणाऱ्या जागी मदत पुरवणे फार महत्वाचे असते. त्या सांगतात २००६ चा काळ होता त्यावेळी पूर आला होता. कुंभार टोळी वस्तीत तेथील माणसांच्या मदतीला गेले असतांना अचानक अंगात ताप भरून आला.. नंतर तपासणीत लक्षात आले चिकन गुनिया झाला होता. पुढला बराच काळ शारीरिक वेदनांचा गेला. अश्या अनेक समस्यांशी त्या झुंजत राहिल्या. पण थांबल्या कधीच नाही.. नागपूरातल्या अनेक वस्तींवर वंचीतांच्या मुलांकरीता ओसरीवरच्या शाळा सुरू केल्या..नावही तेच ठेवलं 'ओसरी'. या महिलांच्या हक्कासाठी संघटनेने अनेक आंदोलनं केलीत. अतिक्रमण विभागाविरुद्ध 'चुल्हा जलाओ आंदोलन, सर्व स्तरातील विस्कळीत कामगारांना एका छत्रछायेत आणा हे सांगणारं छत्री आंदोलन, रेल रोको/रास्ता रोको आंदोलन. २०११ ते २०१४ या काळात 'घरगुती कामगार कल्याणकारी बोर्ड' स्थापन करण्यात आले त्यात सदस्य म्हणून काम करीत असतांना अनेक धोरणं पास करवून घेऊन राबवली गेलीत. त्यानंतर मात्र तो बोर्डच सरकारने बरखास्त केला ही खंत रूपाताईंना आजही सतावते. 

या चळवळीच्या काळातच वर्ष १९९२ मध्ये रुपताईंनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. समाजात पितृसत्ताकता, वर्ग, जात, धर्म आणि भांडवली दमनयंत्रणातुन होणारे अन्याय, ज्यातून लैंगिकतेचे ढाचे प्रस्थापित झाले, आणि स्त्रियांमध्ये असमान सत्तासंबंधातल्या उतरंडी रचल्या गेल्या ..धार्मिक विद्वेषाच्या विखारी वातावरणात होरपळत घडत जाणाऱ्या बाईच्या जगण्याकडे कुणाचे लक्ष क्वचितच गेलेले दिसते. अश्यात स्वतःतील प्रतिकारी जाणीव प्रत्ययाला येऊन रुपाताईंनी त्यांचा स्वतःचा मार्गच बदलला. लोकांनी त्यांना 'बोधी' अशी पदवी बहाल केली. त्याच वर्षी 'दलितमित्र' हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. पुढे बौद्ध धम्माचा, संविधानाचा, बाबासाहेबांच्या थिअरीचा त्यांनी अभ्यास केला. स्त्री-स्वातंत्र्याची बुद्ध विचारांच्या अंगाने मांडणी करणारे थेरीगाथांचे संशोधन केले. अनेक वैचारिक पुस्तकं, समीक्षात्मक ग्रंथ प्रकाशित केले. विविध वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन केले. त्यांचे सगळे लेखनच क्रांतिकारी उर्जेने भारलेले आहे. 39 वर्ष त्यांनी संस्कृतचे अध्यापन केले. रुपाताईंना सावित्रीबाई फुले पुरस्कार, कुसुमताई चौधरी महिला कल्याणी पुरस्कार, इंडियन मर्चंट चेंबर प्लॅटिनम ज्युबिली आणि महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  

रूपाताईंचे वय आज जवळजवळ ७० वर्ष. लग्न करून स्वतःचा संसार मांडून चार माणसांचे घर चालवण्यापेक्षा या लाखो महिलांच्या कुटुंबालाच आपले मानून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणण्यास झटणाऱ्या रूपाताई आजही त्यांचे सणवार, त्यांच्या मुलांचे वाढदिवस या महिलांच्या घरी जाऊन साजरा करतात. पांढरपेशा लोकांमध्ये त्यांचे मन लागत नाही. मी सहज त्यांना विचारले ''रूपाताई एवढ्या मोठ्या संख्येच्या महिलांमध्ये तुम्ही वावरता..या अशिक्षित बायकांना जगण्याचे कायदे कदाचित माहिती नसणार.. तुमच्या लढ्याची जाणीव त्यांना असेल नसेल त्या कधी पावतीही देत नसतील, सभ्यता-दाक्षिण्य न समजणाऱ्या या गटाच्या  वागण्याचा कधी त्रास झाला नाही का??'' त्यावर रूपाताई गोड हसतात, म्हणतात ''या सगळ्या असंघटित कामगार महिला अशिक्षित असतीलही पण असभ्य कधीच नसतात. त्यांच्या सान्निध्यात आपणच अनेक गोष्टी शिकत राहतो, इतर सुखी वर्गापेक्षा या वर्गाची सोबत जास्त समाधानकारक आहे'' असे त्या सहज शैलीत सांगत राहतात.       

गेल्या तीस वर्षांच्या प्रवासात कितीतरी कार्यकर्ते, अनेक महिला जुळत गेल्या आणि १ लाख सदस्यांचे हे संघटन आजमितीस सुदृढपणे उभे झाले आहे. यातल्या अनेक महिला आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने, स्वबळावर जगतात आहेत. त्यातल्या कितीतरी व्यासपीठावरून हक्कांची मागणी करायला, आपल्या समस्या ठासून सांगायलाही शिकल्या आहेत. त्या म्हणतात हा लढा शेवटपर्यंत कायम राहणार आहे. ६० वर्षांच्या पार असलेल्या कामगार महिलांसाठी पेन्शन योजनेत तरतूद असावी, समता, स्वतंत्रता, एकोपा समाजात रुजावयास हवे. असंघटित कामगारांच्या  निदान अन्न-वस्त्र-निवारा-आरोग्य या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात. मूलगामी उपाययोजना, पॉलिसी योजना लागू व्हाव्या. मुख्यतः बजेटमध्ये यांच्यासाठी महत्वपूर्ण वाटा असावा ह्या प्रखर मागण्या आहेत. परंतु नेमके आंदोलन कोणत्या तत्वांवर आधारित आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. 

स्त्रीसशक्तीकरणाच्या ज्या नऊ सूत्रांवर प्रामाणिकपणे व्यावहारिक तत्वांवर हे आंदोलन चालवण्याचे, यशस्वी करण्याचे प्रयत्न होतायेत ते खालीलप्रमाणें 
१.पारंपरिक श्रमविभागणीला छेद देणे. स्त्रियांना समान हक्क मिळवण्यासाठी संधी देणे. 
२.गृहिणींनाही अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध करून देणे. 
३. श्रमिक महिलांसाठी उत्पादक श्रमाचा मान राखून समान कामाला समान दाम देणे. 
४. श्रमिक स्त्रियांसाठी स्वतंत्र आरोग्य धोरण आखणे 
५.मुलींची शाळागळती थांबवणे     
 ६. पुरुषप्रधान व्यवस्था व पितृसत्ताक मूल्यांचा सातत्याने विरोध करणे
७. पुरुष व आजची तरुण पिढी यांच्यात स्त्री विषयक दृष्टिकोनात वैचारिक बदल घडवून आणणे 
८. मुलींच्या वाढीसाठीचे निकष बदलणे 
९. स्त्रियांची पुरुषावलंबी मानसिकता बदलणे. आत्मविश्वास वाढवणे. 
हे व असे ग्राउंडलेव्हलवर  काम करतांना स्त्रीचळवळीला उपयुक्त असे अनेक मुद्दे एकत्र करून व्यापक पातळीवर 'नवस्त्रीवाद' घडवून आणण्याचा प्रयत्न ही संघटना रुपाताईंच्या मार्गदर्शनात गेली कित्तेक वर्ष करतेच आहे. संघटनेचे सचिव श्री विलास भोंगाडे शिवाय सुरेखा डोंगरे, छाया चवळे, सुभद्रा धकाते, छाया सोमकुंवर, कांता मडामे, वंदना फुले, ममता पाल, सुजाता भोंगाडे, सरीता,सुहास, ज्योती ही सगळी मंडळी या संघटनेची शिलेदार आहेत.  

कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणानुसार जगण्याचे येणारे आत्मभान काळाच्या त्या त्या बिंदूवर महत्वाचे होत असते. काहींचे थोडे अपुरे, अप्पलपोटे आणि काही वेळा मतलबी होते आणि काही संवेदनशील माणसांची जगण्याची तऱ्हा त्यामुळे बदलते. `जग बदल घालुनी घाव, गेले सांगून मला भीमराव’ असे म्हणत समाज बदलायला पदर बांधून उठलेल्या या रणरागिणीचा लढाऊ बाणा आंबेडकरी आणि बुद्धवादी विचारांच्या मुशीतून तयार झालेल्या रूपाताईंसारख्या लढाऊ आयुष्याचे आकलन करण्यात माझी बौद्धिक झेप कदाचित कमी पडेल. पण रुपाताईंनी मांडलेल्या या नव्या भूमिका, एक नवी विजिगीषु परंपरा आणि परिवर्तनाच्या लढयातून स्त्रियांना देऊ केलेले स्वत:च्या स्त्री पणाचे क्षमतेचे ओजस्वी भान अख्या समाजाला यापुढेही प्रेरणादायी ठरणार आहे हे निश्चित.

- मुलाखत आणि शब्दांकन - रश्मी पदवाड मदनकर 



(महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करणारे कॉफीटेबल बुक नुकतेच महिला सक्षमीकरण आणि लहान मुलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या पुण्यातील ‘ग्रॅव्हीटस फाउंडेशन’ Gravittus Foundation या सामाजिक संस्थेनं प्रकाशित केलं. आपल्याला अश्या एखाद्या गौरवास्पद उपक्रमाचा भाग होता यावे याहून मोठा आनंद काय असेल. या कॉफीटेबल पुस्तकात मला वरिष्ठ समाजसेविका 'रूपाताई कुलकर्णी-बोधी' यांच्यावर लेख लिहिण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने अनेकदा त्यांच्याशी भेटी झाल्या, समाधान देणाऱ्या चर्चा घडून आल्या. खरतर त्यांच्या कामाबद्दल बरीचशी माहिती होतीच पण त्यांच्या जवळ येण्याची, त्यांच्या कामाचे स्वरूप जाणून घेण्याची, त्यांना जवळून ओळखण्याची संधी मला या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. याकाळात रुपाताईंबद्दल भरपूर वाचन केलं .. त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांपासून ते त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत सगळं चाळून काढलं... इतकं करूनही त्यांच्या कार्याला कितपत न्याय देता आला ही माझी मला शंका आहेच. तरीही हा छोटासा प्रवास प्रगल्भ करणारा आणि अतिशय समाधान देणारा ठरला हे मात्र निश्चित.. रूपाताई तुमच्यावर लेख लिहितांना तुमच्यासोबत असतांना तुमच्यावर प्रश्नांची भडीमार करतांना, खूप किस्से ऐकावे वाटताहेत म्हणून तुम्हाला सतत बोलते ठेवतांना, माझ्या जिज्ञासा शमवतांना तुम्ही न थकता मला साथ दिलीत, मी छान लिहू शकेन म्हणून सतत प्रोत्साहन दिले.. प्रेम जिव्हाळा दिलात त्याबद्दल मी सदैव तुमच्या ऋणातच राहू इच्छिते.
या कामासाठी माझे नाव सुचवणारे, माझ्यावर विश्वास दाखवणारे मा. श्रीपाद अपराजितShripad Vinayak Aparajit सर, याकाळात मी सतत तुम्हाला त्रास दिला खूप खूप चर्चा आणि माझी बडबड पण तुम्ही ते मोठ्या मनाने समजून घेतलंत. कामाच्या व्यापात दिलेली वेळ निघून जाऊनही मला पुरेसा वेळ देत माझ्याकडून हे नोबल कार्य घडवून आणलं.. त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. नव्याने मैत्री झाली असूनही अजिबात नवीन न वाटणारी सखी मेघा शिंपी Megha Shimpi, हिने पुस्तकाच्या निर्मितीपासून प्रकाशनाच्या आयोजनापर्यंत घेतलेले कष्ट आणि त्यातून निर्माण झालेली ही सुंदर कलाकृती सगळंच वाखान्यासारखं. तुझे खूप अभिनंदन आणि धन्यवाद सखे.
एखादा लेख सरते शेवटी निव्वळ लेख उरत नाही..खूप काही पदरी पाडून जाणारा ठरतो तसाच हा ठरला. खूप दिवसापासून हे सगळं सांगायचं होतं.. सगळ्यांचे आभार मानायचे होते, उशीर झाला... पण हरकत नाही भावना कायम राहणार आहेत.)

Wednesday, 31 July 2019

चंद्रयान-२ च्या यशाच्या मानकरी महिलाशक्ती -




प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं आजवर ऐकलंय, पण स्त्री केवळ कुणाच्यातरी मागे असते असे नव्हे तर अनेक यशासाठी प्रत्यक्ष कारणीभूतही ठरते. हे लक्षात यायचे कारण म्हणजे भारताचे महत्वाकांक्षी चंद्रयान-२ या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण २३ जुलै रोजी दुपारी २:४३ वा. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून (एसडीएससी) पार पडले ही भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, आणि त्यात या मोहिमेचे नेतृत्व इस्रोच्या दोन महिला वैज्ञानिकांनी केले ही त्यातही प्रत्येकासाठीच अभिमानास्पद असलेली बाब आहे. भारताच्या इतिहासात एखाद्या महिलेने अंतराळ मोहिमेसारख्या अतिमहत्वाच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बा भ बोरकर म्हणतात ''देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे !'' या प्रमाणेच निर्मितीच्या डोहाळ्यांचे रूपांतर सुंदर सोहळ्यात करणाऱ्या या वैज्ञानिक महिलांबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

कोण आहेत या दोघी, तर मुथय्या वनिथा आणि रितू करिधल अश्या चंद्रयान-२ मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला वैज्ञानिक, ज्यांनी या मिशनमध्ये अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. भारतातल्या या दुसऱ्या आंतरग्रहीय मोहिमेच्या यशाच्या मागे असणाऱ्या अनेक वैज्ञानिकांमध्ये ३०% महिलांचा समावेश आहे त्यात वनिता या मिशनच्या प्रकल्प निर्देशक (प्रोजेक्ट डायरेक्टर) म्हणून नेतृत्व करीत होत्या तर रितू ह्यांनी मोहीम निर्देशिकेची (मिशन डायरेक्टर) धुरा उचलून धरली होती.

मूळ चेन्नई येथील असणारी प्रकल्प निर्देशक वनिथाने ३२ वर्ष इसरो येथे आपली सेवा दिली आहे. सुरुवातीला ज्युनिअर इंजिनिअरच्या पदावर भरती झालेली वनिता पुढे लॅबोरेटरी, टेस्टिंग कार्ट्स, हार्डवेयर तयार करणे, डिजाइनिंग, डेवलपिंगसारखी कामे करत व्यवस्थापनाच्या पोजीशनपर्यंत पोचली. सुरुवातीला चंद्रयान-२ मध्ये असणाऱ्या प्रकल्प निर्देशांकाच्या भूमिकेसाठी ती आनंदी नव्हती, परंतु कुठेही खंड न पडू देता दिवसाला १८ तास जबाबदारीने आणि कष्टाने आपले कार्य चालू ठेवले. या कार्यात केवळ कष्टाचं नाही तर मोठी जोखीम घेऊनही कार्य करावे लागते या सगळ्या जबाबदाऱ्या निगुतीने निभावत वनिथा या प्रकल्पाच्या यशात सहचारी ठरली.

इसरोमध्य अनेक समस्या अडचणींना विचारपूर्वक सोडवणारी रितू मूळची लखनौ येथील. इंडियन इंस्टिट्यूटमधून एरोस्पेस इंजीनियरिंग केलेली रितू 'रॉकेट वुमेन ऑफ इंडिया' या नावानेही ओळखली जाते. २००७ साली पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते इसरो यंग साइंटिस्ट अवॉर्डनेही ती सन्मानित झाली आहे. मिशन मार्स ऑर्बिटर हे तिच्या आजवर केलेल्या अनेक महत्वपूर्ण मिशनपैकी एक महत्वपूर्ण मिशन होते. ज्यात तिने डिप्टी ऑपरेशंस डायरेक्टरची भूमिका निभावली होती. चंद्रयान-२ या महत्वपूर्ण प्रकल्पातील मोहीम  निर्देशिकेची (मिशन डायरेक्टर) भूमिका देखील तिने यशस्वीपणे पार पाडली आहे.



काय आहे चंद्रयान-२ -

दोन वर्षांपूर्वी काही तांत्रिक कारणाने अयशस्वी झालेले चंद्रयान-१ लक्षात घेऊन काळजीपूर्वक चंद्रयान-२ या प्रकल्पाच्या मोहिमेचा पाय रचला गेला. हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने १५ जुलै रोजी होणारे उड्डाण ५६ मिनिटे आधी रद्द झाले होते ते २३ जुलैला अंतराळात झेपावले. या यशस्वी प्रक्षेपणानंतर ते आता ६-७ सप्टेंबरला  चंद्रावर उतरणार आहे. ऑर्बिटर, 'विक्रम' लैंडर, 'प्रज्ञान' रोवरने परिपूर्ण असणारे चंद्रयान-२ पहिल्यांदाच चंद्राच्या भूमीवर 'सॉफ़्ट लैंडिंग' करणार आहे जे अत्यंत कठीण कार्य मानलं जातं. यापूर्वी कधीही कोणतेही चंद्रयान न उतरलेल्या उपग्रह चंद्राच्या दक्षिणी भागावर उतरून तेथील नमुने गोळा करणार आहे. चंद्रयान-२ हा अत्यंत महत्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपग्रह आहे कारण यात  एक ऑर्बिटर, एक 'विक्रम' नावाचा लैंडर आणि 'प्रज्ञान' नावाचा रोव्हर आहे. जीएसएलवी मार्क-तीनच्या माध्यमाने अंतरिक्षात जाणाऱ्या या चंद्रयान-२ चे वजन ३.८ टन इतके आहे, तर सहाशे करोड रुपयांपेक्षा जास्त खर्च या मोहिमेसाठी होणार आहे.  चांद्रयान-२ मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पाडून या महिलाशक्तींनी आंतराष्ट्रीय स्तरावर देशाची मान अधिक उंचावून भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

-रश्मी पदवाड मदनकर

Monday, 29 July 2019

दुखऱ्या बाधेचा 'कृष्णकिनारा' !

दिवस समपात बिंदूवर असताना
एखाद दिवस अचानक
उन्ह हरवतं, सावली साथ सोडत जाते
अंधारून येतं सगळं..
आणि आतात मळभ दाटत जातं.
अवेळीच उगवलेली कातरवेळ ..
मी हातातले 'कृष्णकिनारा' उपडे ठेवते..
काळेभोर खांद्यावर पसरलेले कुरळे केस,
एकत्र गुंडाळून टाळूवर बांधून घेते.
चष्म्याची फ्रेम दुमडून ठेवत, खोल उसासा घेते.
जडावलेल्या देहाची बोचकी विसरून, आराम खुर्चीत पाठ टेकते...
मन शांतावण्याच्या प्रयत्नात असताना,
उरी काहूर माजतं, गम्य-अगम्याच्या लाटा उठतात
वेणूची साद रुंजी घालायला लागते ..आणि मी
मी, पुन्हा निळकांती कृष्णाच्या अथांगतेच्या लहरीत खोल खेचली जाते..
ही वेळ समर्पणाची असते
स्वीकार्य .. आहे ती स्थिती ..तशीच मनःस्थिती
समर्पण तसेच.. राधा, कुंती, द्रौपदीनं स्वतःला कृष्णार्पण केले तसे..
काही क्षण अनंत काळासारख्या रंध्रारंध्रातून ओथंबत राहतात.
अंतरंगाचा तळ ढवळून काळ निसटून जातो ..
मिटल्या डोळी काजळओलीतून कातरवेळ वाहून जाते ..
सचैल न्हाऊन निघतो दुखऱ्या बाधेचा 'कृष्णकिनारा' !
औदास्याचे ग्रहण सुटते ..हरवलेले चित्त भानावर येते.
आभाळ घनव्याकूळ ऐलतिरी अन पैलतीरी
नभांगणाच्या नक्षी खुणावू लागतात..
उसासलेला-उधाणलेला आता बरसणार असतो नभ
धरित्री तरारून येते, सृष्टीच्या नवनिर्मितीचे डोहाळे सुरु होतात..
माझ्या मनातला मोर पुन्हा फुलारून येतो ..
पुन्हा उर्मी जागी होते .. आणि मी ..
मी उपडं ठेवलेलं 'कृष्णकिनारा' पुन्हा अलगद हाती घेते ...

©रश्मी पदवाड मदनकर
27 जुलै 2019

Friday, 19 July 2019

ग्रॅव्हीटस रत्न






महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करणारे कॉफीटेबल बुक नुकतेच महिला सक्षमीकरण आणि लहान मुलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या पुण्यातील ‘ग्रॅव्हीटस फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेनं प्रकाशित केलं. आपल्याला अश्या एखाद्या गौरवास्पद उपक्रमाचा भाग होता यावे याहून मोठा आनंद काय असेल. या कॉफीटेबल पुस्तकात मला वरिष्ठ समाजसेविका 'रूपाताई कुलकर्णी-बोधी' यांच्यावर लेख लिहिण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने अनेकदा त्यांच्याशी भेटी झाल्या, समाधान देणाऱ्या चर्चा घडून आल्या. खरतर त्यांच्या कामाबद्दल बरीचशी माहिती होतीच पण त्यांच्या जवळ येण्याची, त्यांच्या कामाचे स्वरूप जाणून घेण्याची, त्यांना जवळून ओळखण्याची संधी मला या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. याकाळात रुपाताईंबद्दल भरपूर वाचन केलं .. त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांपासून ते त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत सगळं चाळून काढलं... इतकं करूनही त्यांच्या कार्याला कितपत न्याय देता आला ही माझी मला शंका आहेच. तरीही हा छोटासा प्रवास प्रगल्भ करणारा आणि अतिशय समाधान देणारा ठरला हे मात्र निश्चित.. रूपाताई तुमच्यावर लेख लिहितांना तुमच्यासोबत असतांना तुमच्यावर प्रश्नांची भडीमार करतांना, खूप किस्से ऐकावे वाटताहेत म्हणून तुम्हाला सतत बोलते ठेवतांना, माझ्या जिज्ञासा शमवतांना तुम्ही न थकता मला साथ दिलीत, मी छान लिहू शकेन म्हणून सतत प्रोत्साहन दिले.. प्रेम जिव्हाळा दिलात त्याबद्दल मी सदैव तुमच्या ऋणातच राहू इच्छिते.


या कामासाठी माझे नाव सुचवणारे, माझ्यावर विश्वास दाखवणारे मा. श्रीपाद अपराजित सर, याकाळात मी सतत तुम्हाला त्रास दिला खूप खूप चर्चा आणि माझी बडबड पण तुम्ही ते मोठ्या मनाने समजून घेतलंत. कामाच्या व्यापात दिलेली वेळ निघून जाऊनही मला पुरेसा वेळ देत माझ्याकडून हे नोबल कार्य घडवून आणलं.. त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. नव्याने मैत्री झाली असूनही अजिबात नवीन न वाटणारी सखी मेघा शिंपी हिने पुस्तकाच्या निर्मितीपासून प्रकाशनाच्या आयोजनापर्यंत घेतलेले कष्ट आणि त्यातून निर्माण झालेली ही सुंदर कलाकृती सगळंच वाखान्यासारखं. तुझे खूप अभिनंदन आणि धन्यवाद सखे.


एखादा लेख सरते शेवटी निव्वळ लेख उरत नाही..खूप काही पदरी पाडून जाणारा ठरतो तसाच हा ठरला. खूप दिवसापासून हे सगळं सांगायचं होतं.. सगळ्यांचे आभार मानायचे होते, उशीर झाला... पण हरकत नाही भावना कायम राहणार आहेत.







Friday, 12 July 2019

*उत्तर*
वीज चमकते,
जांभूळ प्रकाश पसरतो
आणि
मी डोळे मिटून घेतो..
..मी डोळे मिटून घेतो
आणि असला नसला पाऊस
तरी घडत जातात
अपेक्षितपणे अनपेक्षित
गोष्टी
मग रेंगेंचं 'सावित्री'
पत्रांतील मचकूराला
घडी न पाडता
दुमडून ठेवतो
कडेने,
अगतिक
पसरलेले
पिकासोचे न्यूडही
सरते नजरेआड
आणि
कुंडलिनीचे चवथे
चक्र स्पर्षणारे
किशोरीचे
'सहेला रे' देखील
होते पॉज..
कॉफीचा मग
बुद्धाच्या अनुयायासारखा
शांत..
मी त्याच्या
कानात अडकवलेले
घट्ट बोटही सैल करतो.
जाणीव होते क्षणभर
अधांतरी टांगलेल्या
शरीराची,
तेव्हा
खुर्चीवर उसासे रेलून
सोडवून घेतो
स्वतःला.
डोळे असतात
अजून मिटलेले;
आणि मी
भासत असतो
अस्पर्शीत
आणि
निवांत..
अशातच
अनोळखी दुरातून
धडपडत येणारे
आवाजी उत्तर
सुचवून जाते;
'सावित्री'चे उलटे वाक्य
'न्यूड' मधला गर्भितार्थ
आणि
'सहेला रे' चा मखमल ध्यास
आता असतो बाहेर मी
आणि जांभूळ प्रकाश
आत..
खोल आत!
-आदित्य दवणे

किस्सा तो है ..



एक किस्सा अतीत का ..

किस्सा है जो भुलाया नहीं जाता

भुनाया नहीं जाता

न गलता है, न मिटता है और नाही मरता है

नाही बूंदो की तरह सुख ही जाता

नाही धुवा होता ...

उसे गाड़ नहीं सकती

नाही जला पाती हूँ...




किस्सा तो है जो जहन में उतर गया है

बस सा गया है वही .. फस सा गया है !

उभर आता है रहरहकर

शांत हो चुकी भावनाओ को झकझोरता रहता है ...




किस्सा तो है ..

आधे-अधूरे लम्हो का

अधभरे जख्मों का

लम्हो को याद कर कुरेदती रहती हूँ जख्मो को ..

बहता लहू जिन्दा होने की निशानी देता रहता है

बेरंगसी जिंदगी में रंग भर देता है

रिसती हुयी यादें गर्माहट देती है

जिंदगी जिने का सहारा बन जाती है..




एक किस्सा है जो जीने नहीं देता

वही किस्सा जीने का कारन बनता रहता है

समझ नहीं आता ..

जिंदगी किस्से में समेट गयी है

या क़िस्साहि जिंदगी बन गया है ..




किस्सा ही तो है ... !


- रश्मी पदवाड मदनकर

तू आणि मी !




भिन्न ध्रुवांवरील दोन भिन्न बिंदू
या बिंदूंना जोडणारी एक ती अदृश्य रेषा
तिलाही कुठेतरी मध्यबिंदू आहेच ना
दोघांनाही सारख्याच अंतराने मिळवणारी
एकाच संंज्ञेेत बांधणारी …


भौमितीय गणितातील आपण दोघे दोन प्रमेये
संबंध जोडायचाच ठरवलं तर सिद्धांत सापडतोच

अवकाशाच्या दोन टोकांना जोडणाऱ्या
पोकळीतही पावसाच्या सरींचा
निमित्त्यमात्र आधार गवसतोच कधीतरी…

दोन विरुद्ध दिशेंनाही वाहणारा एकाच वाऱ्याचा झोत
स्पर्शून जातोच तुलाही अन मलाही

चंद्राला अन सुर्याला भेटवणारी सायंकाळ
तुला मला टाळता येत नाहीच

उन्ह अन पावसाचा लपंडाव तुझ्या अन माझ्यासाठीच
इथून तिथवर वक्राकार इंद्रधनू तुला मला जोडण्यासाठीच ….

तुला स्पर्शून येणारा कवडसा मला येउन का बिलगतो
मोगरा तिथलाही अन इथला सारखाच का गंध देतो

कितीही दूर असलो तरी कुठेतरी कश्यानेही
जुळलेले असतोच हे जाणवतं मला
तुला जाणवतं का रे ?



- रश्मी पदवाड मदनकर

Thursday, 11 July 2019

शिरस्ता !!


नीलिमा खरतर एक सुसंस्कृत, सोज्वळ सदगृहिणी. नोकरी करायला, मैत्रिणीत रमायला, समाज कार्य करायला खूप आवडायचं तिला. पण संसाराच्या जबाबदाऱ्या पेलताना सगळ्या आवडी-निवडीचे करकचून गाठोडे बांधून खुंटीला टांगले होते तिने. नवऱ्याच्या गरजा, त्याची नोकरीतली प्रगती, मुलांचं संगोपन, शिक्षण, गणगोतांचे येणेजाणे- देणेघेणे ... कुठलीही खंत न बाळगता संसाराची २० वर्ष जबाबदारया खुबीने निभावल्या होत्या तिने. दिवसभर घरात राहूनही कसलं सुख, कोणाची सोबत अशी नव्हतीच. व्यवसायाच्या नावानं नवरा दिवसरात्र बाहेर. तीन सगळं सांभाळून घेतलं होतं म्हणून तो अधिकच निष्काळजी, बेजबाबदार होत गेला. घराला लागणारा पैसा पुरवण्यापर्यंतच घराशी संबंध संपर्क असलेला. बायको म्हणजे निव्वळ गृहीत धरण्याची चीजवस्तू.. तिच्या मनाचा, भावनांचा, गरजांचा विचार तर दूर ते ध्यानीमनीही येऊ नये इतकी अलिप्तता बाळगणारा. तिच्याप्रती त्याचं काहीच देणं लागत नव्हतं जणू. तिनं मात्र असं अलिप्त-बेदरकार राहून चालणार नव्हतं. तिनं सगळं करावं, सगळ्यांचं करावं हा थोपलेला अलिखित नियम. ती सुद्धा माणूस आहे याच घरात राहते हे तो चक्क विसरून जायचा. स्त्रिया घरात घुसमटायला आणि पुरुष हा बाहेर जगण्यासाठी, बाहेरचच बघण्यासाठी जन्माला आलाय हि अव्यक्त विचारप्रणाली घेऊन जगणारा. त्याच्यालेखी घर म्हणजे फक्त जेवून आराम करण्यासाठीचं ठिकाण.

ती दिवसभर वाट बघून दमायची तो अर्ध्या रात्री अवतारायचा.

वर्षानुवर्षे हाच शिरस्ता.

हल्लीच दोन्ही मुलं शिक्षणासाठी वेगवेगळ्या शहरात राहायला गेलेत. . जरा जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि तिच्या आयुष्याला नाही म्हंटलं तरी जरा रिकामपणच आलं. मोठ्या घरात एकटपण खायला उठायचं. आता स्वतःसाठी काहीतरी करावं असं सारखं तिला वाटत असायचं. मैत्रिणीच्या संपर्कातून हळूहळू सामाजिक कार्याशी जुळली गेली आणि नीलिमा उंबरठा ओलांडून बाहेर पडू लागली. घराची फारफार काळजी न करता आवडीच्या कामात रमू लागली...छंद जोपासायचे, बाहेर अनेक मित्र-मैत्रिणींकडून त्याचे गोगोड़ कौतुक ऐकायचे; घरी आली कि खुश राहायचे...तिचं राहणीमान बदललं. बोलण्याचा ढब बदलला. संपर्क वाढू लागले.

आता त्याचं मन बाहेर लागत नाही. तिच्यातले ठळक होत चाललेले गुण त्याच्या नजरेच्या टप्प्यातून सुटत नाही. तो सतत तिचा विचार करतो. तिच्या बाहेर रमणाऱ्या छबीभोवती घुटमळत बसतो. संध्याकाळ होण्याआधीच घरी येतो .. तीची वाट बघतो. ती किती उशीर करते, कितीवेळ घराबाहेर असते, कुणाशी बोलते ह्याचं गणित मांडत बसतो ….

आता तो असतो … ती नसते.

तू नसलीस कि घर कसं खायला उठतं तो तिला समजाऊन सांगतो. तुझ्याच हातचा स्वयंपाक कसा रुचकर लागतो हे पटवून देतो… तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही हे रुजवून देतो … घराला तुझी गरज असल्याचे रंगवून रंगवून सांगतो....आणि ती पाघळते. चार महिन्यात मिळवलेल्या आवडत्या कामाच्या समाधानाचे पुन्हा एकदा अलगद गाठोडे बांधते.. खुंटीला टांगते. आणि पुन्हा घराला घरपण द्यायला उंबरठ्यावरूनच उजवा पाय आत ठेवते.


दुसरे दिवशी सकाळी तिला दारात सोडून शिळ घालत तो कामावर निघतो …व्यवसायाच्या नावानं दिवसरात्र बाहेर काढू लागतो. ती सुद्धा घरात राहते हे तो चक्क विसरून जातो... पुन्हा ती दिवस दिवस वाट बघत बसते … तो अर्ध्या रात्री अवतरतो....

रश्मी पदवाड मदनकर

29 jan. 2015

























Tuesday, 18 June 2019

आईपण कसं स्वार्थी असतं ना ..

तसंतर पुर्वीपासूनच आपल्या काही सवयी असतात त्या हळूहळू स्वभाव होत जातात. जित्याची खोड म्हणतात तशा.

रस्त्यानं जाताना मध्येच पडलेले दगड उचलून कडेनं फेकून येणं.

शाळेत जाणारी मुलं रस्ता क्राॅस करायचा प्रयत्न करताना दिसली की थांबून रस्ता क्राॅस करून देणं.

आपल्या येण्याजाण्याच्या रस्त्यात कुणी गरजू दिसलं तर वाटेत शक्य असेल तिथपर्यंत लिफ्ट देऊन सोडणं.
अपघात झालेला दिसला की थांबून मदत करणं

मी कित्तेकदा भर उन्हात माझी पाण्याची बाटली किंवा कुणी भणंग दिसलं तर डबाही देऊन देते गरजुला..

उन्हाळ्यासाठी चपला अन हीवाळ्यासाठी स्वेटर वर्षभर गोळा करत राहते.

पुर्वी हे स्वानंदासाठी असायचं.. मनात स्वार्थाचा लवलेशही नसायचा.

पण लेक जसजसा मोठा होतोय पदरा बाहेर वावरू लागला आहे  तेव्हापासूनच ह्याचा मोबदला मिळावा असं वाटू लागलंय आणि ह्याची जाणीव झाली तेव्हापासून वाईटही वाटतंय पण 'आई' असण्याची भावना जागृत होते अन स्वतःच स्वतःला माफ करून घेते.

हल्ली रस्यात मध्ये पडलेले दगड बाजुला करताना वाटतं माझा लेकही कधीतरी या रस्त्याने जाणार आहे. त्याच्या सायकलीखाली असा कुठला दगड येऊ नये. तो पोचण्याआधीच कुणी तो अडथळा दुर करावा.

परीक्षेला जाणारया एखाद्या विद्यार्थ्याला किंवा नोकरीवरून लगबगीनं घरी परत जाणारया एखाद्या आईला मुलांपर्यंत पोचवायला थांबते त्यांना लिफ्ट देताना वाटतं कधी पोरावर अशी वेळ आलीच तर आपल्यासारख्या एखाद्या मनस्वी आईनं यावं असंच मदतीला धावून. आई लेकाला भेटवून द्यावं.

शिक्षण नोकरीसाठी बाहेर पडेल कधीतरी. माझ्यापासून दुर असताना उपाशी राहण्याची तहानेनं व्याकुळ होण्याची वेळ त्याच्यावर येऊ नये म्हणून वाटतं..भुक-तृष्णेनं तृप्त करावे गरजुवंतांना माझ्या बाळासाठी त्याच्या सुख समृद्धीसाठी द्यावे त्याने अनंत आशिर्वाद.

 प्रत्येक अडल्या नडल्या क्षणी काळजात मायेचा सागर घेऊन कुणीतरी माझ्यासारखीच आई भेटावी त्याला  आयुष्याच्या टप्प्या टप्प्यावर. आज आपण केलेली गुंतवणूक त्याला कुठल्याही कठीण प्रसंगात संकटात तारूण नेणारी ठरावी.

लेकाला क्षणाक्षणाला टप्याटप्प्यावर आई भेटत राहावी म्हणून  मी हल्ली प्रत्येक क्षणावर पावलापावलावर आईपणाच्या खुणा पेरत जगते आहे.

आईपण कसं स्वार्थी असतं नाही ??  ...

© रश्मी मदनकर

Tuesday, 4 June 2019

ऑफिस दारातलं झाड ..



काही गोष्टी फार साध्या असतात पण का कुणास ठाऊक फार फार जिवापासच्या वाटतात. ओंजळीत साठवून ठेवाव्या कायमच्या इतक्या भावल्या असतात... भावल्या म्हंटल्यापेक्षा जीव गुंतलेल्या असतात. असे का व्हावे ह्याला मात्र उत्तरं नसत. असाच माझ्या मनातला एक हळवा कोपरा आहे, ऑफिस दारातलं झाड. फार चमत्कारिक वगैरे नसलं तरी विशेष मात्र आहे. त्याला सहसा पानं नसतातच, फक्त फांद्यांचा पसारा दिसतो.. पसारा कसला काळोख वारीत आकाशाकडे पसारलेला पिसाराच असतो जणू. त्याला सावली देता येत नाही.. उन्हाच्या काहिलीची वर्णी देणाऱ्या अगणित बाहू पसरून तो सताड उभा असतो.  त्याच्या आसपासची झाडं बहरून उमलून, पुन्हा कात टाकून, पुन्हा धारण केलेलं रूप मिरवीत डोलताना दिसतात. पण ऑफिस दारातलं झाड मात्र वर्षानुवर्ष सारखंच... पाना फुलांनी लगडलेली इतकी झाडे सोडून मलाही ह्याच झाडाची ओढ का लागावी हे एक गूढच आहे; आणि त्याहून अधिक ह्या वेड्या झाडाने सुद्धा माझ्यासारख्या वेगळ्या वेडपट वागण्याचे अनेकदा साक्षीदार होत राहावे हि कुठल्या ऋणानुबंधाची अंतःस्त अवस्था असेल हा प्रश्नच आहे. 

मग रोजरोज हे असं होतं.. ऑफीसमधून रोज अंधार पडल्यावर बाहेर पडताना एकच दृष्य दिसतं; ऑफीसदारातलं झाड अंधार लपेटून झाकोळून घेत असतं स्वतःला. काळ्या, करड्या, वाळक्या फांद्यांचं अंधार लपेटलेलं काळकभीन्न झाड.. कधी फार लक्ष जात नाही त्याकडे.. कधी गेलंच तर अंधाराचं झाड स्वतःला गडद करून घेतं अधिक... अंधाराचं काय ते अपृप ना ?.. आजूबाजूला पेटलेले दिवे अंधाराच्या झाडाला उजळवू शकत नाही. पण अंधार प्रकाशाच्या उघडमीटीचा हा काजवखेळ फारफार लोभस वाटत राहतो. हा पाहिलेला नजारा परतीच्या प्रवासभर साथ करतो. पोचता पोचता दिसू लागलेले वर रात्रीचे नक्षत्रांकित आभाळ लकलक करताना शुद्ध शुभ्र चांदनेही त्या नजाऱ्यासमोर फिके वाटायला लागतात. 

कलता दिवस पाहणं नसतच नशिबी..पण कधीतरी उतरणीचं ऊन पाहायची, अनुभवायची उर्मी होते.. नाहीच जमत..पण एखाद्यावेळी अंधार दाटण्याआधी निश्चयानं बाहेर पडावंच तर ऊन भलतंच खोडसाळ होत राहतं, ऑफीसदारातल्या झाडाचा आडोसा घेत लपंडाव मांडतं.. झाडही खुळावून वाकोल्या दाखवत अंगभर उन्ह पांघरून घेतं अन स्वर्णरंगानं तेजाळून निघतं...काळोखाच्या आधी उजळून आलेल्या संधीप्रकाशात मंद, मजेदार स्वप्नांसारख्या भासणाऱ्या नवख्या रंगीत जाणिवा, बदलत जाणारे आकार त्या अनुषंगाने गहिवरून आलेले नवे अनुभव आणि हे सगळं एकमेकांत मिसळत जाऊन अंतरात दाटून आलेली अनुभूती.. अश्या स्वप्नील स्वर्ण सायंकाळचा फारसा अनुभव नसणारया मला मग ते उन्हाचंच झाड वाटू लागतं.. आत कालवाकालव होते.. माझ्या आतली सायंकाळ गहीवरून येते, अचानक जोम चढतो, आतला आजवर साठवलेला अंधार मी ओढून काढते, घडी घालते अन गाडीच्या डीक्कीत टाकून देते...मनातल्या पेरलेल्या आशांना मग पालवी फुटू लागते.. मी झाडाजवळ येते तांबडं पिवळं उन उन तोडून गोळा करते..एकात एक घालून मोठी लांब शाल विणते अन आतबाहेर पांघरून घेते..गाडी सुरू करून रस्त्याला लागते तोवर मनातल्या झाडाला स्वर्णरंग चढत जातो..बहर येतो. पोचेपर्यंत सुर्य मावळला असतो..मनातले ऊन्हाचे झाड अजून तांबड फुटून डोलत असतं..डोलणार असतं. उद्या अंधाराचं झाड नजरेस पडेपर्यंत तरी दिलासा असतो..रात्र झाली तरी उन्ह झडणार नसतं...

मन पुन्हा कासावीस होतं ऑफिसदारातल्या अंधाराच्या झाडाच्या आठवणीनं अस्वस्थ होत राहतं. भोवतालचे आकार स्पष्ट होऊ लागतात. प्रकाशात पडणाऱ्या आपल्याच सावल्यांचे आकार पसरत जाऊन फुटतील हि भीती मनी दाटते आणि .. आणि काळोखात दिसणारे, मनाला भावले होते ते या दिवस उजेडी पुसले जाऊ नये म्हणून मी डोळे मिटून घेते... 



डोळे मिटून घेते...

रश्मी पदवाड मदनकर 

Saturday, 1 June 2019

निघून गेलेली माणसे

सदर- नाद-अनाहद


ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता !

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ... 




कवी ग्रेसच्या या मार्मिक कवितेचं गाणं झालं नसतं तर कदाचित ती कित्येकांपर्यंत पोचलीच नसती. आपल्या जवळच्या कुणाचेतरी आयुष्यातून असं अचानक नाहीसं होणं...या वेदनेच्या तळाशी नेणारी ही कविता आहे. आपल्या माणसाच्या जाण्याचे ग्रेसांना जाणवले तसे दुःख सगळ्यांनाच जाणवतं खरतर, पण त्या भावना  ग्रेसांसारख्या उत्कटतेने प्रत्येकाला मांडता येतातच असे नाही. अशीच काही नाती असतात, रक्ताने जुळलेली, जवळची दिसणारी या नात्यांनी तशी लेबलं लावून घेतलेली असतात पण त्या नात्यांना जन्मतःच चिकटून आलेली कर्तव्य किंवा हक्क ते निभावू शकलेले नसतात, आयुष्यभर हवं असलेलं न देऊ केलेलं प्रेम, बालपणात घ्यावयाची.. न घेतलेली काळजी, गरजेच्या वेळी भासलेली त्यांची उणीव, संकटात न मिळालेला सहारा  ...एकटेपणात न मिळालेली आधाराची साथ आणि आशीर्वादासाठी डोक्यावर कधीच न ठेवलेला हात या गोष्टी मनात रुतून बसलेल्या असतात, या अपेक्षा असणाऱ्या नात्यातली माणसंं नाहीशी झाली की खूप आठवू लागतात. ही माणसे असतात तोवर सगळं आलबेल वाटत असलं तरी निघून गेली की नात्यातली धग अधिकच गडद होत जाते...खूप त्रास देतात 'न' लाभलेली हक्काची नाती. तशीच ती लाभलेली असतील तर खूप खोलवर जाऊन बसतात त्यांचा चांगुलपणा जीवाला घोर लावत राहतो. आठवणी त्यांच्यावरून पार झालेल्या वर्षांची, ऋतूंची, तमा न बाळगता तश्याच ताज्या, टवटवीत राहतात. आपल्याला कधीतरी सहवास घडलेली माणसे त्यांच्याशी झालेले संभाषण, काही वाद-विवादातून, काही घटना, त्यांचे स्वभाव-लकब, भावभावनांच्या देवाणघेणीत शिल्लक राहिलेल्या संवेदनेतून जागत राहतात आपल्या दिवसरात्रीत. आठवणी सलतात फार चिवट असतात त्यातून डोकं वर काढत निघून गेलेली माणसं पिच्छा पुरवत राहतात अखंड. काही माणसांचं आपल्या आयुष्यात फार गहिरं स्थान असतं, आपल्याला घडवण्यात, जगायला-तगायला लागणाऱ्या गोष्टीत त्यांचा फार मोठा वाटा असतो.. अशांचं आयुष्यातून निघून जाणं बरेचदा कोलमडून टाकणारं असतं. त्या धक्क्यातून सावरायला मग बराच काळ जातो .. त्यातून बाहेर पडलेले आपण मात्र पुन्हा पहिल्यासारखे उरत नाही पार बदललेले असतो, आणि काही माणसे अशी असतात की, आपल्या अस्तित्वाच्या लहानमोठ्या आठवणी गोळा करून मनांत छोटी छोटी पक्की घरं बांधून जातात.

शाळेतली मैत्रीण होती एक मृणाल.. खूप जिवाभावाची. माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी. शिक्षणात फार रस नव्हता म्हणून शाळेनंतर दोनचार वर्ष अधिक शिकवून लग्न करून दिले होते आई-वडिलांनी. दूरच्या गावी होती कुठल्याशा. तीचं सगळं छान चाललंय असंच कळत राहिलं बरीच वर्ष. दरम्यानच्या काळात आम्हीही मुंबईला शिफ्ट झालो. सातेक वर्षांनी परत आलो. एकदा तिची आई भेटलेली रस्त्यात.. बाकी सगळं बोलणं झालं पण मृणाल कशीये विचारल्यावर फक्तच डोळ्यात पाणी आणून गप्प राहिल्या. माझ्या जिवात कालवाकालव झाली पण ह्या गप्प राहण्याचा अर्थ कळला नव्हता. काही दिवसांनी दुसऱ्या एका मैत्रिणीकडून कळले ती निघून गेलीये आमच्यातून... त्याक्षणी आलेला आवंढा मला अजूनही गिळता येत नाही. तो तसाच अडकलाय असा भास होतो. खूप आठवते मृणाल.. छानदार, गोरीपान, खळीदार अशी तिची प्रसन्न छबी माझ्या मनात कायम घर करून असणार आहे. असाच माध्यमिक शाळेत सोबतीने शिकणारा, खळखळत राहणारं चैतन्य असणारा, अतिशय हुशार वर्गमित्र एके संध्याकाळी क्षणाच्या अपघातानंं हिरावुन घेतला होता... तेव्हाचा तो अजूनही डोळ्यासमोर दिसतो जसाचा तसा. शाळेजवळच्या बसस्टँडवर शेजारी किराण्याच्या दुकानात काहीबाही निवडून देणारी, सामान नीटनेटकी करत राहणारी, आपुलकीनंं चौकशी करणारी, कधीतरी साडीच्या घोळात थोडे मुरमुरे नि कांदा खात बसलेली म्हातारी दिसायची येताजाता. अनेक वर्ष जशीच्या तशीच त्याच अवस्थेत, शाळा संपली, कॉलेज शिकून झाले, नोकरी देखील सुरु झाली पण त्या रस्त्याने जाताना वाकून तिला पाहण्याची सवय काही सुटेना.. ती दिसत राहिली की आपण अजूनही शाळेच्याच दिवसात वावरतो असा भास होत राहायचा.. ती मायमाऊली दिसली की आपल्याही नकळत आपल्याला हायसं का वाटतं ह्या प्रश्नाला उत्तर नव्हते. त्यानंतर एकेदिवशी ती अचानक नाहीशी झाली. कुठे कशी माहीती नाही.. का कुणास ठाऊक आता तो रस्ता फार ओळखीचा वाटतच नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आजोळी जायचो राहायला जशी अनेक जिव्हाळ्याची माणसे तिथे भेटायची तशीच एक वेडी बेबी भेटायची. वय पस्तिशीच्या घरात. नवऱ्यानं दुसरी बाई केली म्हणून मानसिक संतुलन हळूहळू बिघडत नंतर नंतर वेड वाढत गेलेली. असंबंध बडबडणारी, कपड्यांचं भान नसलेली, केस कातरल्यासारखे विस्कटलेले.. पण आम्ही गेलो की आम्हाला आवर्जून भेटायला येणारी.. हातात एखादा आंबा किंवा चार भुईमुगाच्या शेंगा खाऊ म्हणून आणणारी. आम्ही शेवटपर्यंत तिला नावानिशी लक्षात होतो. असेच एकेवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात गेलो तेव्हा बेबी कुठे दिसलीच नाही. ती सुटली होती जाचातून, पण त्या वर्षी दरवर्षीप्रमाणे आजोळ मात्र रम्य वाटलंच नाही. आजही बेबी आठवणीत तिच्या दुखाचं गा-हाणं सांगत जगतेच आहे. माझ्या लहानपणी आम्ही राहायचो त्या भागात आसपासच्या परिसरात कधीही कोणत्याही गल्लीत दिसणारा, रस्ता फुंकर घालून स्वच्छ करून, चौकट आखून वेगवेगळ्या रंगीत खडूने देवी-देवतांचे सुंदर रेखाचित्र आखणारा बंडू दिसायचा. आमच्याच मोहोल्ल्यात त्याचे चांगले घर होते. हा घरी का जात नाही हा प्रश्न मला पडायचा. फाटका पॅन्ट, त्यावर मळलेली लक्तर झालेली बनियान, बाजूला ठेवलेली गरजेच्या वस्तूंपुरतं भरलेली कळकटली पिशवी. इतर वस्तूंपेक्षा त्यात रंगीत खडूच भरलेली असतील असा माझा ठाम विश्वास होता. प्रॉपर्टीच्या वादातून आणि मानसिक संतुलन गमावल्यानं त्याला घरातून बाहेर काढलंय असं लोकं बोलायचे. तो कुणाला काहीच मागायचा नाही मात्र ओळखणारी लोकं त्याला येताजाता हाका मारून काहीबाही देत राहायची. त्याच्या हातात कला होती. रेखा-रंगात तो मग्न राहायचा. वेडा दिसायचा पण त्याने कधीच कुणाला त्रास दिला नव्हता. बंडू कधी कसा नाहीसा झाला हे कळले देखील नाही. त्याला शोधून आणणारं कोणीच नव्हतं पण बंडू पूर्णपणे विस्मृतीत जाणंही शक्य नव्हतं. आपलेपणाचं पाथेय दिमतीला देऊन बंडू त्याच्या चित्रांसह अनेकांच्या अंतर्यामी आपल्या अस्तित्वाच्या खुणा आठवणींच्या रूपाने कोरून निघून गेला होता.

कधी कधी असे वाटते की, कुणाच्या असण्या-नसण्याने समाजाच्या दैनंदिन व्यवहारात कोणताही फरक पडत नसला तरी एखाद्या विशिष्ट क्षणी, एखाद्याच जागी गेलेल्यांच्या आठवणी का ताज्या होत असतील ? ही नसणारी माणसे आपल्याही स्मृतीतून पूर्णतः नाहीशी का होत नाहीत ..काळाच्या ओघात सगळ्याच गोष्टींना संपण्याचा शाप असतो पण ही परिस्थितीच्या वादळवाऱ्याशी धडका देत आठवणीत टिकून कशी राहतात? निघून गेलेल्या माणसांच्या रूपरेषा, स्वर-सुगंधाची द्रव्ये धरून ठेवण्याची किमया त्या त्या वातावरणात कायम साठवली जात असावी, त्यांच्याशी संबंधित माणसे त्याच जागेवर तश्याच समान परिस्थितीत एकत्र आली की ती द्रव्ये उधळून आठवणींचे वातावरण निर्माण होत असावे का? कुणीतरी निघून गेलंय म्हणून त्याचे संपूर्ण अस्तित्वच पुसून कसे काढावे ? त्यांच्या अस्तित्वाचे, जगण्या-वागण्याच्या कणाकणांचे क्षणक्षणांचे इथे शिंपण झाले असते ते दरवळत राहतात तोपर्यंत जोपर्यंत त्याच्या भोवतालच्या माणसांचे आणि त्यांच्याही भोवतालचे अस्तित्व संपूर्णतः संपणार नाही. अश्या पद्धतीने विरत चाललेल्या आकृत्यांना जतन करून ठेवण्याचे, स्मृतीत का असेना त्यांची जाणीव जिवंत ठेवण्याचे प्रामाणिक प्रयत्न ही नियती करीत असली पाहिजे असं वाटतं..  पण हेही जाणवतं की गेलेली सगळीच माणसं अंशाने उरतातच असेही नाही.. काही राहतात, सापडतात, काही विस्मरणाच्या धूसर पडद्याआड हरवतात...कायमची ! अश्यावेळी संदीप खरेंच्या ओळी प्रकर्षाने आठवतात..


तू जो समझा अपना था, वो लम्होका सपना था,
हमने दिलको समझाया, अब हमको समझाए कौन ।
दिवानों की बातें हैं, इनको लबपर लाए कौन,
इतना गहेरा जाए कौन, खुदको यूं उलझाए कौन ।



- रश्मी पदवाड मदनकर

(हिंगोली येथील 'दैनिक गाववाला' वृत्तपत्रातील 'नाद-अनाहत' सदरात प्रकाशित)

Featured post

  काही गोष्टींचे, काही नात्यांचे, काही क्षणांचे, काही घटनांचे Endnote, Closure (पूर्णविराम) Epilogue मिळत नाहीत… ते फक्त थांबतात, गोठतात अचा...