Wednesday, 10 March 2021

मिट्टी

 तुम्हारे प्रेम से उठी हर दर्द की आहह

मैनै काली मिट्टी में गाड दी थी, 

पिडाओं से उठे आसुओं की लहरों को भी रहरहकर वही बहां आयी थी ! 

फिर कुछ दिन बितें.. 


सुना है वहां कुछ पौधे और फूल उग आये है ..  


तुम घंटो बैठकर मुझें ढुंढा करते हो उन पत्तो में फ़ूलों मे .. 

कहेते हो मेरी खुशबू आती है वहां की मिटटी से 


और मै 

मै न जाने कब मिट्टी हो गयी पता ही नहीं चला ..


रश्मि ..

Saturday, 6 March 2021

#भेटलेलीमाणसे - ८ -वेड्या माणसांच्या गोष्टी

#भेटलेलीमाणसे - ८

खरेतर या निर्मात्याचे आभारच मानायला हवेत कि ही दुनिया अनेक प्रकारच्या वेड्यांनी भरून आहे .. या वेड्यांच्या असण्यानेच तर शहाण्यांच्या जगण्यात रस आहे. शहाण्यांमुळे दुनियेचा व्यवहार नीटनेटका चालतही असेल पण वेड्यांमुळे दुनियेत जिवंतपणा आणि जगण्याची उर्मी सतत पेरली जाते. मी स्वतःला अत्यंत सुदैवी समजते मला सदैव अशी वेडी माणसे वळणावळणावर भेटत राहतात .. आणि माझ्या जगण्याला नवे बळ नवा आनंद देत राहतात.
हा फोटोत दिसतोय तोही असाच एक ध्यासवेडा आहे - नाव आहे Santosh Balgir
संतोष लातूरचा आहे, एक हुशार मॅथेमॅटिशिअन आहे पण त्याहून अधिक सायकलिस्ट आहे. लातूरहून सायकलने निघून त्याला आज ७३ दिवस झाले आहेत. १४० दिवसांचा ११,००० किमीचा प्रवास तो करणार आहे....त्याला १५ राज्य कव्हर करायचे आहेत त्यापैकी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगनासारखे ७ राज्य आणि ५००० किमीचा सायकलवरून प्रवास पूर्ण करून तो काल १ मार्चला नागपुरात दाखल झाला. हे २-३ दिवस तो नागपूर एक्सप्लोअर करणार आहे म्हणजे नागपूरच्या पुरातन गोष्टी पाहून त्याच्या मेमरीत साठवून घेऊन जाणार आहे. संतोष मला भेटला तेव्हा माझ्या अख्त्यारीतल्या गोष्टी दाखवायच्या म्हणून दीक्षा भूमी पाहून झाल्यावर नागपूर मेट्रोचे ऑफिस, नंतर एक मस्त मेट्रो राईड आणि लिटिल वूड पाहायचे आमंत्रण दिले. त्यानंतर आम्ही रात्री घरी डिनरला भेटलो... या प्रवासातले संतोषचे अनुभव ऐकून मज्जा आली, ते जेवढे अचंभित करणारे होते तेवढेच प्रेरित करणारे देखील होते. एकंदरीत देशातील ऐतिहासिक, पुरातन धरोहर जपल्या गेल्या पाहिजेत, सांभाळल्या पाहिजेत या उदात्त हेतूने निघालेला हा २४ वर्षांचा तरुण ऊन-थंडी-पाऊस, लॉकडाऊन-अनलॉक, कोरोना कशाकशाचा धाक न बाळगता ज्या धाडसानं भारत भ्रमंतीला निघालेला आहे त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. या वेड्या मुलाचा सहवास माझ्या कुटुंबाला लाभला आणि त्याच्या पोतडीभर वेचून आणलेल्या गोष्टींचे रसिक होता आले ह्याचा खूप आनंद वाटला.




संतोषची ओळख करून देणारा आपल्याच शहरातला Vishal Tekade हा आणखी एक सायकलवर भारत पालथा घालायला निघालेला वेडा सायकलिस्ट - (ह्याची कथा घेऊन येतेय लवकरच). तोवर विशाल तुझे धन्यवाद... संतोष आणि विशाल काळजी घ्या आणि तुम्ही ज्या उदात्त हेतूने सायकलवर स्वार होऊन भटकत आहात ते तुमचे उद्देश सफल होऊ देत ह्याच भरभरून शुभेच्छा !!
रश्मी ..


















#बच्चेबचाओ
#SaveChildBeggars #StreetChildrens

हे दोघे भाऊ आहेत. नागपूरच्या सुभाष नगरला आजीसोबत झोपडपट्टीत राहतात. आई-वडील नाहीत. आज्जी खूप म्हातारी आहे. मुलांना २ वेळ पोट भरायला भीक मागावी लागते, दुसरा पर्याय नाही.
भीक मागायचे ठिकाण : सीताबर्डी मार्केट.
वेळ : सकाळी ११ ते संध्याकाळी ७.३० पर्यंत.
प्रवास : सुभाष नगर ते सीताबर्डी येणे जाणे.
प्रवास खर्च - प्रत्येकी १० रुपये (५ रुपये येणे ५ रु जाणे). एकूण - २० रु.
कमाई - प्रत्येकी १००-१५० रु.


मग बाळांनो या आधी काय करायचे ??
उत्तर - पैदल यायचो
पैदल ... ८-१० किमी पैदल
सहज मनात आले - मेट्रोने गरिबांचे आयुष्य जरा सुखकर केलंय हे मात्र नक्की. म्हणून तर तिला #माझीमेट्रो म्हणतात. दिवसभर रखरखत्या उन्हात रापल्यानंतर १५ मिनीटांचं एसीत बसण्याचं सुख अनुभवलंय कधी ?
भीक मागायचे अजिबात समर्थन करत नाहीये मी .. उलट अत्यंत विरोधात आहे. परंतु त्यांनी भीक मागू नये यासाठी दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे. #बालमजुरी बंदी कायदा असल्याने कुठल्या तोंडाने त्यांना काम करा हे सांगायचे ?? कामही नाही करायचे भीकही नाही मागायची मग खायचे काय आणि कसे ?असो...शोकांतिका आहे पण सत्य हेच आहे.
- रश्मी पदवाड मदनकर


बातमीची दखल वृत्तपत्रांतून घेतली जाते तेव्हा -














मिंत्राच्या निमित्ताने ..


का तक्रारीवरून ट्रॉल झालेल्या नाझ कपूर एका प्रचंड वायरल झालेल्या ट्विटने अत्यंत दुखावल्या गेल्या.. त्यात लिहिले होते ''छोट्या केसांच्या स्त्रिया एकनिष्ठ नसतात'' ती म्हणाली मी ट्रॉलर्सना सांगू इच्छिते की, 'लॉकडाउनच्या काळात मी एका स्त्रीला मरणाच्या दारातून वाचवलं होतं आणि नंतर तिच्यासोबत मलाही क्वारंटाईन व्हावे लागले या काळात डोक्यात उवा झाल्या होत्या म्हणून मला माझे केस पूर्ण काढून टाकावे लागले होते''


मिंत्राच्या लोगोवरून झालेल्या वादानंतर लोक सोशल मीडियावर अत्यंत हिंसकपणे वागू लागले आहेत. त्यांनी नाझ पटेल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. कोणी त्यांच्या केसांच्या लांबीवरून त्यांच्या चरित्राची परिभाषा मांडतंय तर कोणी त्यांना स्त्रीवादी भूमिकेबद्दल दूषणं लावतायेत. त्या काम करीत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचीही यातून सुटका झालेली नाही. त्यांच्याविरुद्ध फेमिनिझम असण्यावरून टोकाच्या टिप्पणी अविरत चालू आहेत. तिच्या संस्थेच्या वेबसाइटवरून तिचा फोटो घेऊन तो वेगवेगळ्या मिम्स करत वायरल करण्यात आला. जणू काही मिंत्राच्या निमित्ताने नाझच्या रूपात लोकांना स्त्रीवादाविरुद्ध जाण्याची संधीच चालून आली आहे. महिलांच्या हक्कासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी आवाज उठविणे इतके वाईट होऊन बसले कि आवाज उठवणाऱ्या महिलेच्या विरुद्धच संपूर्ण नेटकरी ट्रॉलिंग-रोस्टिंगच्या माध्यमाने तिच्यावर तुटून पडलेत. तिला स्वतःला घरात कोंडून घ्यावे लागते आहे.. घरातून बाहेर पडली तरी 'हीच ती मिंत्रा वाली बाई' किंवा 'बाई असून हिलाच असे कसे दिसले' म्हणत लोकं टोमणे मारतायत. काही खरेदी करायला गेले कि दुकानदार म्हणतात 'आमचा लोगो नका बदलू हं मॅडम !' .. हे अत्यंत मानसिक त्रासाचे होत जात असल्याचे नाज सांगताहेत. यापुढे जाऊन या सगळ्या विकृत वागण्यावर आणि त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांविरुद्ध कायदेशीर कारवाही करायचे आता तिने ठरवले आहे.


कोण आहेत नाझ  :
नाझ पटेल गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करताहेत. त्याचं पूर्ण नाव नाझ एकता कपूर आहे. नाझ  ''अवेस्ता फाउंडेशन'' नावाची स्वयंसेवी संस्था चालवतात. ही स्वयंसेवी संस्था कुटुंबाकडून नाकारल्या गेलेल्या वृद्धांची काळजी घेते. या ज्येष्ठ मंडळींच्या सेवेसाठी नाज अनेक उपक्रम अनेक कार्य करीत असते. ३१ वर्षीय नाझ पटेल ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नसेवा देखील चालवतात.


गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नाझ ह्यांनी ई-कॉमर्स फॅशन कंपनी मिंत्राच्या लोगो संदर्भात तक्रार दाखल केली होती. मिंत्राचा लोगो हा नग्न महिलेच्या पायांसारखा दिसत असून तो महिलांसाठी अपमानजनक आणि आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. मुंबई सायबर पोलिसांनी मिंत्रा या कंपनीला ही तक्रार पाठवली आणि महिन्याभरातच मिंत्राने त्यांचा जुना लोगो बदलून नवा लोगो बाजारात लॉन्च केला.


 
खरतर एखाद्या संवेदनशील माणसाने सामाजिक जबाबदारीचे भान राखत आपण करीत असलेल्या सामाजिक कार्याच्या बाबतीत प्रामाणिक राहून एखाद्या आक्षेपार्ह बाबीवर तक्रार नोंदविणे आणि पुढ्ल्याने ती तक्रार स्वीकारून, चूक सुधारून सामाजिक जबाबदारीचे भान राखून त्यावर लगेच कारवाही करून बदल घडवणे हि घटनाच किती कौतुकास्पद होती... दोन्ही बाजू आपापल्या कार्याला, कर्तृत्वाला जागलेल्या. व्हायचेच होते तर चारही बाजूने स्तुतीसुमने देखील उधळता आली असती परंतु नेटकरांनी हाती आलेल्या फुकटच्या कोलिताने सगळीकडे आग फुंकायला सुरु केले .. स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबत प्रचंड जागृत असलेले आपण इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जागृत असणे सोडाच सहिष्णूदेखील होऊ शकत नाही हे एकत्र एक समाज म्हणून जगतांना किती घातक आहे ह्याची कल्पना आपल्याला का येत नाही ? असभ्य लोगोबद्दल तक्रार करणाऱ्या महिलेविरुद्ध अखंड असभ्य वागणाऱ्या नेटकरींचे काय करावे ? लोगो सहज बदलला गेला, तसे हि मानसिकता बदलता येऊ शकेल का ?

भारतात महिलांची सुरक्षा हा अनेक महत्वाच्या मुद्द्यांसारखाच एक महत्वपूर्ण मुद्दा आहे. महिला कुठे सुरक्षित असतात ?? असा प्रश्न विचारला तर काय उत्तर आहे आपल्याकडे ? महिलांविरुद्ध हिंसाचार किंवा असभ्य वागणूक जणू सार्वजनिकपणे सहज वागण्याची गोष्ट असल्यासारखी घडत राहते. कार्यालय, महाविद्यालय, प्रवासात किंवा सार्वजनिक ठिकाणी महिलेशी असभ्य वागणूक होणार नाही ह्याची हमी देता येतच नाही पण आता तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसुद्धा यातून अलाहिदा राहिलेले नाहीत. त्या व्हर्च्युअल पडद्यामागेही एक जिवंत व्यक्ती बसली आहे हे का विसरतो आपण? एखाद्याविषयी इतका विखार इतका वाईटपणा पसरवायचा अधिकार कुणी दिला आपल्याला ?? इंटरनेटने सोय करून दिली आहे म्हणून, संधी प्राप्त झाली म्हणून शाब्दिक मार हाणणारे..अपमानास्पद शब्द शस्त्रांनी वार करून गर्दीपुढे एकट्या पडलेल्या पुढल्याच्या मनोबलाचे चीरहरण करून त्याला पूर्णतः नेस्तनाबुत करण्याचे व्यूहच नाहीये का हे ? आणि आपण काहीतरी चुकीचे करतो आहे असे हजारोच्या संख्येतल्या एकालाही वाटू नये हि केवढी शोकांतिका. कुठे जातोय आपला समाज ? मिंत्रा लोगोवर चाललेल्या गदारोळाच्या निमित्ताने नाझ पटेल हिला ज्या पद्धतीने ट्रॉल केले जात आहे त्यावरून महिलांच्या सुरक्षेबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या ट्रेंडिंग-ट्रॉलिंग-रोस्टिंग सारख्या अत्यंत हिणकस पद्धतींसाठी आता वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनांची गरज आहे का हा प्रश्न देखील ऐरणीवर उभा राहिला आहे.


भारतातील महिला चळवळीचा इतिहास फार मोठा आहे. महिलांविरुद्ध होणारे गुन्हे, गुन्ह्यांसाठी तयार केली जाणारी परिस्थिती, केवळ महिला आहे म्हणून भेदभावातून होणारे अत्याचार-मानापमान आणि डोकं उंचावून सन्मानाने जगण्यासाठी पिढ्यानपिढ्या दिला जाणारा लढा .. केला जाणारा संघर्ष नवा नाही. हे जितकं सवयीचं तितकच तिच्या हालचालींवर, निर्णय क्षमतेवर, आवड-निवडीवर एकंदरीत स्वातंत्र्यावरच मर्यादा लादण्याचा इतिहासही फार फार जुना आहे.. जुना म्हणण्यापेक्षा या सगळ्यांचे 'मूळ'च तर ते आहे. स्त्री जिथे जाईल तिथे तिच्या कार्यक्षमतेवर, अभिव्यक्तीवर, तिच्या विचारांवर आणि त्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या निर्णयांवर अंकुश लावण्याची मानसिकता सोशल मीडियाच्या माध्यमाने अधिक ठळकपणे पुढे येऊ लागल्याचे लक्षात येत आहे.


मिंत्राच्या लोगोबद्दल तक्रार नोंदवण्याचे आणि हा लेख लिहितांना माझ्या विचारांची दिशा एकच, कि महिलांना ती असेल तिथे खऱ्या जगात किंवा अगदी व्हर्च्यूवल जगात तिला स्वातंत्र्याने आणि सन्मानाने जगण्यासाठी पोषक आणि सुरक्षित वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे.. समाजातील कुठल्याही घटकांमुळे आपण असुरक्षित असल्याची भावना तिच्या मनात निर्माण होणे, आपल्यावर हल्ला होईल किंवा आपला शारीरिक मानसिक छळ केला जाईल अशी भीती सतत तिच्या मनात असणे हे एक समाज म्हणून जगतांना आपल्यासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे. सामाजिक किंवा सांस्कृतिक जीवनात आपण पूर्ण स्वतंत्र आणि हक्काचे भागीदार आहोत, आपले निर्णय आपल्याला घेता येतात आणि त्यावर अंमलबजावणी देखील करता येते..हे करतांना कुठेही गेलो तरी पूर्ण सुरक्षित असू हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होऊ शकेल इतकी विश्वासार्हता मिळवणे आपला उद्देश असायला हवा. त्यासाठी प्रत्यक्ष जगतांना असेल किंवा तिचा वावर असणाऱ्या सोशल मीडियासारखे माध्यम अश्या प्रत्येक ठिकाणी समाजातील प्रत्येकाने त्यांना पाठबळ देणारे सामाजिक वातावरण निर्माण करण्यात सक्रिय सहभाग घ्यायला हवा.


मिंत्रा आणि नाझच्या निमित्ताने पुन्हा एवढेच कि, तरुणांमध्ये एखाद्या घटनेकडे पाहण्याचा सार्वजनिक दृष्टिकोन सकारात्मक होण्याकडे कल वाढावा, झुंडीने नकारात्मक गोष्टींसाठी एकत्र होण्यापेक्षा सहिष्णुता वाढून वैचारिक प्रगल्भता, समजूतदारी, इतरांच्याबाबतीत अधिक सहिष्णू होण्याची आणि काहीतरी समाजहिताचे करण्याची इच्छा व क्षमता वाढीस लागावी ह्याच सदिच्छेसह ...

 UN-HABITAT ने जगातील प्रमुख शहरातील विद्यमान स्थितीवर प्रकाश टाकणारा एक अहवाल सादर केला होता, त्यात म्हंटले आहे कि संपूर्ण जगात विशेषतः विकासनशीलदेशात स्त्रियांबरोबर होणाऱ्या असभ्य वागणुकीच्या व हिंसाचाराच्या घटनेचा आकडा चिंता वाटावी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे.. असे वागणाऱ्या मानसिकतेत पुरुषांचा सहभाग महिलांपेक्षा दुप्पटीने जास्त आहे. याबाबत योग्य ते धोरण, उपाययोजना आखून ह्याचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. गेल्या वर्षात पुणे पोलिस आयुक्तालयातील सायबर सेलकडे सोशल मीडियावरून होणाऱ्या गुन्ह्याच्या तब्बल तीन हजार तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींमध्ये ९० टक्के तक्रारी महिलांबाबतच्या आहेत. त्यामध्ये बनावट प्रोफाइल, बदनामीकारक मजकूर टाकणे, अपमान करणे, टोळीने पाठलाग करीत राहणे असे सर्वाधिक प्रकार आहेत. सोशल मीडियावरून महिलांसंदर्भात होणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण प्रचंड गतीने वाढत असल्याचे लक्षात आले आहे. यासाठी योग्य उपाययोजना वेळेत झाल्या नाही तर ह्याचे दूरगामी परिणाम अत्यंत वाईट होतील हे निश्चित. 


(६ फेब्रुवारी २०२१ च्या ऑल एडिशन महाराष्ट्र टाइम्सला प्रकाशित)


 रश्मी पदवाड मदनकर

Thursday, 28 January 2021

दहा मिनिटे ..

 सतत तुझा पाठलाग.... 

सतत वाट पाहणं 

तू कधी येणार आहेस?

दहा मिनिटानंतर....पण कोणत्या?

अनेक शतकं लोटून जातात तुझी वाट पाहण्यात

तरीही तू येत नाहीस पुढल्या कुठल्याच दहा मिनिटात

तुझ्यासाठी मी फक्त एक 'आठवण' चौकटीसारखी 

तू आतल्या प्रतिमा बदलत राहतोस वेगवेगळ्या अस्तित्वाच्या.. 


दहा मिनिटे ही अशी युगप्रवर्तक परिवर्तीत होऊ शकली असती....

दहा मिनिटांसाठी तू 'मी' आणि मी 'तू' झाले असते

केवळ दहाच मिनिटे तू बघितली असती माझी वाट

आणि अनेक युग जगला असतास माझ्या विरहात

आणि इतके करून तू निव्वळ  'आठवण' म्हणूनच उरला असता.. 


तुझ्या या बेपर्वाह प्रतिभाशाली वागण्याची मी ही झाले असते साक्षी 

आणि वेदना माझ्या मनीच्या तुलाही भोगता आल्या असत्या  

....

देशील का तू ही दहा मिनिटं ......दोघेच जगूया ही दहा मिनिटं

अशी अनेक युगाच्या गर्भात दडलेली सगळी दहा मिनिटं येऊ शकतील

आपल्या वाट्याला..... एकमेकांच्या जगण्याला .. कुणाच्याही पाठ्लागाशिवाय.....

देशील का?.........

सांग दहाच मिनिटांसाठी येशील का??


 आभाळाशी नाते माझे

धरतीशी बंध सारे

मेघ होते बरसते

गार ओले होते वारे


वाऱ्यावर झुलते मी

ऊन घेते लपेटून

माती अंगी लिंपुनीया

घेते गंध समेटून


बोरी बाभळीची लेक

काट्या फुलात फिरते

रानीवनी जीव वसे 

झाडावेलीत डोलते


डोळी तळा साठवते 

धुंद धुक्याशी बोलते 

अंगोपांगी पानोपानी 

दव होते पाझरते 


संध्याकाळी क्षितिजाशी

मत्त होते तेजाळते

पाश सारे सोडवून

मौन होते मावळते.


रश्मी प म ..




Wednesday, 20 January 2021

 खुप गहिवरून हाक दिली तरी 

चंद्राला नसतं देणंघेणं..

तो मग्न असतो त्याच्या दुनियेत 

काळ्या सावळ्या ढगात 

अनंत चांदण्यांच्या गराड्यात.. 

कधी पौर्णिमा होण्यात, कधी अमावस होण्यात

सहज चमकून येण्यात, बरंच गहाळ होण्यात. 

ती टिकून असते तीथेच, थिजून असते जागीच 

वर्षानुवर्षे वाट पाहत.. एका कटाक्षासाठी..

एकेका हाकेसाठी..

न ढळणारी‌ धृव बनून ...

Wednesday, 13 January 2021

जयवंत काकडे ‌- व्यंगचित्रकार

 #भेटलेलीमाणसे -७


हे आहेत जयवंत काकडे ‌- अनेक वर्षांपासून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यंगचित्रकार, लेखक  असलेल्या जयवंतजींचे व्यंगचित्र यंदाच्या आपल्या 'अनलाॅक' दिवाळीअंकात प्रकाशित केले होते, म्हणून जेव्हा वरोराला जाणं झालं आणि त्यांना प्रत्यक्ष भेटायचा विषय निघाला तेव्हा रात्री उशिर होत असतानाही दहा मिनीटं भेटायचच ठरलं.. दहा मिनीटांचा तासभर कसा झाला ते मात्र कळलंच नाही, पण त्यांना भेटून-बोलून जे समाधान मिळालं त्याला तोडच नाही... त्यांच्याबद्दल जे काही ऐकून वाचून होते त्यावरून माझ्या मनातली त्यांची छबी फार वेगळी होती.. त्यांना प्रत्यक्ष पाहीलं तेव्हा कितीतरी दशकं रसिकांचे मनोरंजन करणारे..एका एका कार्टुनमधुन मोठा आशय मांडत, वैचारिक खाद्य पुरवणारे. महाराष्ट्रभर स्वतःचे लाखो-करोडो चाहते निर्माण केलेला एखादा कलावंत इतका साधा इतका जमिनीवरचा असेल असं वाटलंच नाही. आजवर फक्त ऐकून होते पण 'साधी राहणी उच्च विचार' मी त्या दिवशी ह्याची देही ह्याची डोळा अनुभवले. 



एखाद्या जुन्या आधारवडासारखा जुना-जर्जर पण खंबीर ठाम उभा असलेला वाडा. आजी-आजोबांनी गोष्टी सांगताना कल्पनेत दिसतो तसाच अगदी..जुन्या काळातील स्थापत्याच्या खाणाखुणा अजुनही अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या भिंती-खांबं. जुनाट फर्निचर त्यात भरलेली पन्नासच्याही पुर्वीच्या दशकातली दुर्मिळ अशी चित्र-पुस्तके आणि काय काय..हावरटासारखं पाहतच राहावं असं. 


आजच्या घडीला जयवंतजींचं वय आहे ८०. वयाच्या ७८ वर्षांपर्यंत म्हणजे २०१८ पर्यंत फोटोत दिसतेय त्या लुनावर शहर भ्रमंती करत त्यांनी वकिली केली. ते वकील पण आहेत हे नव्यानेच कळाले. दोन वर्षांपासून वकिली आणि लुना दोन्ही चालवणे बंद केले. १९५२ साली त्यांच्या वयाच्या १२-१३ व्या वर्षी त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं होतं... नंतर विविध वृत्तपत्रांमधून  व्यंगचित्र प्रकाशित होऊ लागले आणि त्यांचा एक काळ त्यांनी प्रचंड गाजवला. जयवंत काकडे यांच्या व्यंगचित्रांसाठी वृत्तपत्रांना मागणी यायची. ते विदर्भाच्या मातीतले असले तरी मुंबई पुण्यासारख्या संस्कृतीच्या माहेरी त्यांच्या नावाचा गवगवा होता, तो आजही आहे.. 





त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली गाजली.. विशेष सांगायचे म्हणजे ते आजही प्रचंड उर्जामय आहेत सक्रिय आहेत. अनेक वार्षिकांकाच्या कामासाठी ते वर्षभर तयारी करत असतात. त्याहून मला त्यांची आवडलेली गोष्ट म्हणजे ते आजही सोशल मिडियावर सक्रिय आहेत. आजच्या पिढीला काय आवडतं, आपल्या अवतीभवती काय सुरू आहे..कुठल्या घटना घडतात त्यांचे वैचारिक प्रतिबिंब आजच्या समाजावर काय उमटतात ..असे अपटूडेट राहण्यासाठी त्यांची सतत धडपड असते. आजच्या काळातल्या गोष्टी आपल्या चित्रात लेखनात उतराव्या म्हणून ते आजही त्यांच्या वाड्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या जुनाट खोलीत सगळे संदर्भ गोळा करून ठेवतात, अभ्यास करतात. ते एक वाक्य वारंवार सांगतात 'मी पैशांसाठी कधीच काम केले नाही जगण्यापुरते कमावले' याची प्रचीती त्यांच्या एकंदरीतच जगण्यातून आपल्याला येत राहते. 


एक पिढी त्यांच्या वागण्यातून कृत्यातून त्यांच्या पुढल्या पिढीला संस्काराचं, अनुभवाचं, जगण्याच्या पद्धतीचं आंदण देत असते. जयवंतजींना भेटून मला काय वाटलं काय मिळालं हे एवढ्या कमी शब्दात सांगण्यासारखं नाहीच. खुप काही सांगता येण्यासारखं आहे पण तुर्तास इतकंच ... पुढे कधीतरी त्यांची प्रत्यक्ष मुलाखतच घ्यायचं मानस आहे .. पाहू कसं जमतं .. 




जयवंतजींना लिहीतं राहण्यासाठी आरोग्यमयी शुभेच्छा 💐🌷


@रश्मी पदवाड मदनकर 

 मौन म्हणजे उणीव, उणीव शब्दांची 

जशी उजेडाची उणीव अंधार म्हणजे 

अंधारात नसतात पण 'सावल्या' दिसतात उजेडात 

उजेडात दिसणारी सावली अंधारासारखीच...काळीकभिन्न 

तश्या सावल्या असतील का शब्दांना ?

शब्दांना मौनाच्या सावल्या … शांतसुन्न !!


 रश्मी..

Wednesday, 23 December 2020

कवी महोदय, जागे व्हा !

 तुझं पहिलं आणि एकमेव प्रेम कविता असलं पाहिजे 

कवितेतच जगणं आणि कवितेतच रमणं

माणसांच्याही तू कविता करून टाकल्यात 

आणि कवितेतच माणसं शोधलीस 


माणसांची मात्र कदरच केली नाहीस सहसा .. 


इतका मग्न झालास कवितेत कि आयुष्याची अनेक सालं

कल्पनेच्या कुठल्याश्या जगात भटकत राहिलास .. 

माणसांत परत येऊनही तू माणसांत आलाच नाहीस .. 


अरे कविता अश्रू पुसत नाही

तिच्याजवळ खांदा नसतो रडायला 

ती कुशीत घेऊन जोजवत नाही 

मायेचा स्पर्श देऊन दुःख हलकं करत नाही 


कवितेला आई होता येत नाही 

तिला बहिणीची माया देता येत नाही 

प्रेयसीची प्रीती तिला होता येणार नाही 

तिला तन-मन-आत्मा शांतवता येत नाही ..


तिला हवे असतात तुझे श्वास तुझे ध्यास 

ती निर्माण करू शकते सतत नसलेले भास 

तुझ्यातलं सगळं हिरावून ती नटत मुरडत अवतरते 

आत आत हेलावून क्षणभर सुखावते 

सतत अस्वस्थता पेरत पोकळी निर्माण करत राहते.. 


तिच्याकडून घेता येत नाही रे काही 

तिला हसतंखेळतं पाहण्यासाठी

तिला सतत देत रहावं लागत असतं..


सतत घेत राहून आत-बाहेर रिक्त करणाऱ्या कवितेच्या नादात 

सतत प्रेम देऊन माया लावणाऱ्या माणसांना तू गमावतो आहेस 

हे लक्षात येत नाही का तुझ्या .. ?


अहो, कवी महोदय, उशीर होण्याआत जागे व्हा ..जागे व्हा !


रश्मी ...   


  

  


Monday, 7 December 2020

 आला आला रे डोंबारी

त्याच्या हाती काठी दोरी

पोरीसंगे तो दाखवतो

फुटक्या जगण्याची लाचारी


दोर टांगतो आकाशाला  

तालावर पोरं नाचवतो

टिचकीभर या पोटासाठी

जीव दावणीला आंथरतो


एकाएका पैशासाठी

हात पसरतो दारोदारी 

चिंध्यांचा संसार मांडतो

उघड्यावरती भर बाजारी


किती यातना सोसत जातो

भोग कशाचे मोजत जातो

सोस कशाचा नसे बापुडा

बिनबोभाटा भोगत जातो


रश्मी पदवाड 

२३.११.२०

Featured post

  काही गोष्टींचे, काही नात्यांचे, काही क्षणांचे, काही घटनांचे Endnote, Closure (पूर्णविराम) Epilogue मिळत नाहीत… ते फक्त थांबतात, गोठतात अचा...