Wednesday 23 December 2020

कवी महोदय, जागे व्हा !

 तुझं पहिलं आणि एकमेव प्रेम कविता असलं पाहिजे 

कवितेतच जगणं आणि कवितेतच रमणं

माणसांच्याही तू कविता करून टाकल्यात 

आणि कवितेतच माणसं शोधलीस 


माणसांची मात्र कदरच केली नाहीस सहसा .. 


इतका मग्न झालास कवितेत कि आयुष्याची अनेक सालं

कल्पनेच्या कुठल्याश्या जगात भटकत राहिलास .. 

माणसांत परत येऊनही तू माणसांत आलाच नाहीस .. 


अरे कविता अश्रू पुसत नाही

तिच्याजवळ खांदा नसतो रडायला 

ती कुशीत घेऊन जोजवत नाही 

मायेचा स्पर्श देऊन दुःख हलकं करत नाही 


कवितेला आई होता येत नाही 

तिला बहिणीची माया देता येत नाही 

प्रेयसीची प्रीती तिला होता येणार नाही 

तिला तन-मन-आत्मा शांतवता येत नाही ..


तिला हवे असतात तुझे श्वास तुझे ध्यास 

ती निर्माण करू शकते सतत नसलेले भास 

तुझ्यातलं सगळं हिरावून ती नटत मुरडत अवतरते 

आत आत हेलावून क्षणभर सुखावते 

सतत अस्वस्थता पेरत पोकळी निर्माण करत राहते.. 


तिच्याकडून घेता येत नाही रे काही 

तिला हसतंखेळतं पाहण्यासाठी

तिला सतत देत रहावं लागत असतं..


सतत घेत राहून आत-बाहेर रिक्त करणाऱ्या कवितेच्या नादात 

सतत प्रेम देऊन माया लावणाऱ्या माणसांना तू गमावतो आहेस 

हे लक्षात येत नाही का तुझ्या .. ?


अहो, कवी महोदय, उशीर होण्याआत जागे व्हा ..जागे व्हा !


रश्मी ...   


  

  


No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...