Monday 22 August 2016

भय इथले संपत नाही ...

मंगला जेधे नावाच्या महिलेच्या खुनाच्या आरोपावरून संतोष पोळ नावाच्या बनावट डॉक्टरला अटक होते आणि एक दोन नाही तर तब्बल 6 खून त्याने केले असल्याचे तपासात उघडकीस येते. एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे प्रत्यक्षात उतरलेले प्रकरण, हाहा म्हणता राज्यभरात चर्चेचा विषय ठरते आणि पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेची संतापजनक प्रतिक्रिया सगळीकडे उमटू लागते. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मागल्याच आठवड्यात हा सारा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेसोबत एकंदरीतच प्रशासनावर प्रश्न उभे राहिले. हि बातमी वाचली आणि नकळत डोळ्यासमोरून भूतकाळ सरकू लागला.

मला आठवतं मी लहान असतांना अमरावतीला आजोळी गेले होते. दर उन्हाळ्यात सुट्ट्यात जायचो. एरवी सतत भटकंती करायला हौसून असणारे मामा-मावशी त्या उन्हाळ्यात मात्र कमालीचे धास्तीत होते. तरुण मुलींनी घरातून बाहेर पडायचे बंद केले होते.1991-92 सालातील ही घटना असावी. रस्त्याने जाणाऱ्या मुलींच्या घोळक्यातल्या बरोबर डाव्या बाजूच्या मुलीवर सायकलने येऊन चाकूने हल्ला करणाऱ्या सीरिअल किलरच्या दहशतीत संपूर्ण अमरावती शहर वावरत होते. पुढे तो पकडला गेला. एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे तपासात पुढे आले होते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा लक्ष वेधून घेणारी हि घटना. वयाच्या नवव्या वर्षी मला प्रश्न पडला होता 'नराधमांचे सावज महिलाच का असतात??'  हाच प्रश्न आजही सतावतो.

2010 साली असेच एक सीरिअल हत्येचे प्रकरण गाजले. मुंबईतील कुर्ल्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करणारा जावेद मोहम्मद रहमान आणि त्याचे आणखी दोन साथीदार 19-20 वर्ष अल्पवयाच्या या त्रिकुटांनी वासनेपोटी एकापाठोपाठ एक अनेक अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचे आयुष्य संपवले. या राक्षसांच्या तावडीतून पळून आलेल्या एका मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे अखेर ते पकडले गेले.  2011 साली पणजीत गाजलेले क्रमिक हत्येचे आणखी एक प्रकरण, वासंती गावडे या तरुणीच्या खूनप्रकरणी सीरिअल किलर महानंद नाईक याला अटक करण्यात आली. एका खुनाचा आरोप असणाऱ्या महानंद नाईक ने एक दोन नव्हे तर तब्बल 16 महिलांचा बलात्कार आणि हत्या केल्या असल्याचे तपासात पुढे आले होते. 2014 साली कऱ्हाड तालुक्यात काही वृद्ध महिलांच्या हत्या करण्यात आल्या. काशिनाथ काळे या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी व त्याच्याकडून निष्पन्न झालेले गुन्हे तपासात पुढे आले, प्रतिकार न करू शकणाऱ्या वृद्ध महिलांवर पैसे व दागिने लूट अश्या अत्यंत क्षुल्लक कारणासाठी त्याने हल्ले करून खून केल्याचे उघड झाले होते.

निठारी हत्याकांड  तर संपूर्ण देशालाच हादरवून गेले. 29 डिसेंबर 2006 रोजी नोयडाच्या निठारी गावातून बेपत्ता झालेल्या सुमारे दोन डझन तरुण मुली आणि लहान मुलांच्या हत्येची सनसनाटी घटना उघडकीस आली होती. नोयडाच्या सेक्टर ३१ मधील डी-५ या बंगल्याचा मालक मोनिंदरसिंग पंधेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली यांनी अनेक मुलींवर बलात्कार करून त्यांना ठार केले आणि त्यांचे मांस भक्षण केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते.

या दोघांना अटक झाली. त्याचदरम्यान रवींद्र नावाचा एक नराधम श्वापद दिल्लीत अश्याच हत्याकांडात लिप्त होता. 2008 पासून पुढे 7 वर्ष तो बलात्कार आणि हत्या करीत राहिला. दर दोन महिन्याने 1 लहान मुलगी याप्रमाणे 7 वर्षात 28 जणांशी त्याने बलात्कार करून हत्या केली होती. एकनाअनेक कित्तेक प्रकरणे.




 या समाजाला छेद देणाऱ्या घटना घडत होत्या आणि आज कित्तेक वर्षांनी तश्याच घडत आहेत.  विकासाच्या नावाने  बाविसाव्या शतकाचे अग्रगण्य राष्ट्र म्हणून भारताचे नाव गणले जात असतांना आज अजूनही आम्ही संरक्षणासाठी कळकळीची मागणीच करत असू तर त्या विकासाचे करायचे काय ? आजही उपायांवर आणि सकारात्मक बाबींवर न बोलता आमची वेळ न ऊर्जा असल्या आटोक्यात न आलेल्या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि घटना निस्तरण्यात खर्ची पडताहेत.

समाजानेही झालेल्या घटनेची  केवळ चर्चा करून किंवा चघळून चघळून चोथा करून चालणार नाही तर त्यामागची कारणे जाणून घेऊन वैचारिक सामंजस्याने सोल्युशन काढणे गरजेचे आहे. समाजात एकमेकांशी अलिप्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. प्रत्येकजण प्रॅक्टिकल होऊ बघतो आहे. त्याचा अचूक फायदा घेण्याची मनोवृत्ती गुन्हेगारांत बळावते आहे.  त्यातून विकृती फैलावत जाते आहे. विशेषतः शहरात प्रमाण वाढते आहे. समाजाच्या हिताच्या दृष्टीने प्रत्येकाने जागृत होण्याची वेळ आली आहे. शासन प्रशासनाच्या भरवशावर न बसता प्रत्येकाने हि जबाबदारी उचलली पाहिजे. सजग आणि निर्भीड समाज, जबाबदार नागरिकच असे दुष्प्रकार थांबवू शकतो. नव्या पिढीच्या जडणघडणासाठी प्रत्येकाने पाऊल उचलायला हवे. 

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...