Posts

Showing posts from July, 2026

एका जिव्हाळ्याच्या लेखिकेबद्दल…

Image
माझ्या अत्यंत आवडत्या लेखिका अरुणा ढेरे ह्यांनी त्यांच्या ‘प्रेमातून प्रेमाकडे’ या अनोख्या मैत्रीच्या नात्यांवर आधारित पुस्तकात लिहिलेली अर्पणपत्रिका मला खूप भावली होती. त्यात त्या लिहितात.. “मैत्र जे होतं आणि आता नाही त्याला स्मरून आणि जे आहे, असण्याचं आश्वासन आहे त्याचा हात धरून...” बस्स... इतकंच. पण एवढ्याशा तीन-साडेतीन ओळी आयुष्याचं मोठं तत्त्वज्ञान सांगून जातात. काही माणसं काळाच्या ओघात मागे पडतात, काही नाती विरून जातात; पण त्यांची आठवण मनात कायम राहते. आणि त्याचवेळी, अजूनही सोबत असणाऱ्या, “आहोत” असं शांत ठामपणे सांगणाऱ्या हातांची किंमतही या ओळी शिकवतात. त्यांचं “काळोख आणि पाणी” हे आणखी एक अंतर्मुख करणारं पुस्तक; हे माझ्या अतिशय आवडत्या पुस्तकांपैकी एक. महाभारतातील व्यक्तिरेखा, त्यांच्या भावना, त्यांच्या निर्णयांमागचे कारण आणि त्यातून निर्माण झालेल्या अनेक अपरिचित कथा या पुस्तकात अतिशय सुंदर पद्धतीने मांडल्या आहेत. “जे महाभारतात नाही ते जगात नाही” असे म्हणतात, त्याची प्रचिती हे पुस्तक वाचताना येते. गंगा, भीष्म, गांधारी, कुंती, द्रौपदी अशा अनेक व्यक्तिरेखा नव्या दृष्टीने समोर येतात...