Monday 8 August 2016

नैराश्यातून आशेकडे (मनाचिये गुंती)


आयुष्यात अनेक घटना घडतात, काही प्रसंग अत्यंत कडवट अनुभव देणारे असतात. ते कुठेतरी मनाच्या तळाशी साठून राहतात. विसरता विसरले जात नाहीत. कधीतरी मध्येच एखाद्या धक्क्याने ते सगळं स्मृती पटलावर येतात असे वारंवार घडत राहते अन आयुष्य त्या घटनेच्याच अवती भवती घुटमळत राहते. हि नैराश्याची स्थिती फार गंभीर असते. यातनामयी भूतकाळात गुरफटला गेलेला माणूस वर्तमान आयुष्यही मातीमोल करतो आणि साऱ्या जगण्याचीच राखरांगोळी होत जाते. कुठलीही दुःखद घटना पचवणे-विसरणे सोपे नसते. काही काळ ती मनात ठाण मांडून बसते हे जरी खरे असले तरी जीवन जगतांना येणारे नवनवीन आव्हान झेलताना, नवीन अनुभव घेतांना ते क्षण त्या आठवणी पुसट होत असतात किंबहुना व्हायलाच हव्या असतात. असे जेव्हा घडत नाही, त्याच त्याच आठवणी उगाळून तेच ते दुःख तो रवंथ करीत राहतो तेव्हा माणूस नैराश्येने ग्रासला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पण असे होत नाही, त्याच्या वागण्याचा वैताग येऊन त्रासलेली लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्याच्याशी बोलायचे टाळतात किंवा चिडचिड करतात. त्याचे उलट परिणाम होतात. नैराश्यग्रस्त माणूस अधिकाधिक गुरफटत जातो. मन मोकळं न करता आल्याने आतल्या आत घुसमट होते आणि समस्या अधिकच गंभीर रूप धारण करते.

हा सारा संबंध असतो तो मनाशी. बुद्धीने कितीही युक्तिवाद केला तरी काही गोष्टी मानायला मन तयार नसते आणि म्हणून अश्या माणसांना कितीही समजावून सांगण्याचा आपला प्रयत्न व्यर्थ ठरतो. आपली तर्कनिष्ठता आपले वाक्प्रभुत्व सपशेल फसतं. गरज असते ती अश्या नैराश्याने ग्रस्त माणसांना धीराने आधार देण्याची. मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांचे उपचार सुरु करावे पण त्या बरोबरच त्यांची मानसिक अवस्था समजून घेऊन त्यांना अतिशय सकारात्मक रीतीने त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्याची. त्यांच्या मनातील नकारात्मकता काढून घडलेल्या घटनेला विसरायलाच हवे असाही आग्रह न धरता ती स्वीकारून परिस्थितीचा सामना करत पुढले आव्हानं पेलून आगेकूच करायला त्यांना पुन्हा बोट धरून मार्गक्रमण करायला लावणाऱ्या सच्च्या मित्राची भूमिका आपल्याला बजावत येते का याचा प्रयत्न करायला हवा. नैराश्याने ग्रासले असतांना अशी साथ आणि योग्य उपचार रुग्णाला लवकर बरे होण्यास खूप बळ देतात.

(दैनिक सकाळ नागपूर आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित )

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...