Saturday, 1 August 2020

तू गेल्यावर इथे सांडले गंध तुझ्या श्वासाचे
तू गेल्यावर घट्ट जाहले बंध तुझ्या ध्यासाचे

कातरवेळी तू स्वप्नांना हळुच जागर देतो
अलगद येतो ओढून ऊब घट्ट मिठीची देतो

तुझ्या भोवती फेर घालती माझ्या गंधित वेळा
तू असण्याने शितल झाल्या तप्त उन्हाच्या ज्वाळा

तव स्पर्शाची ओढ अनामिक व्याकुळ करते छळते
मखमल शेजेवर दरवळते धुंद अशी तळमळते

सहवासाच्या सुरम्यवेळी सांज सुखाची फुलते
विरहामधली ओढ घेऊनी रात्र उशाशी झुरते

तू गेल्यावर मन बावरते पापण ओले करते
आठवणींची वेडी सर मग, श्रावण होत बरसते


रश्मी पदवाड मदनकर
३०जुलै २०

'शिप ऑफ थिसीस - विरोधाभासाचा कॅलिडोस्कोप !

Ship of Theseus [2012] : A Collective Voyage - High On Films

'शिप ऑफ थिसीस' बऱ्याच दिवसांपासून पाहायचा होता.. थोडा थोडा तुटक पाहीला होता कधीतरी, पण सलग पाहायची इच्छा मात्र राहूनच जायची ती मागल्या आठवड्यात हट्टाने पूर्ण करून घेतली. ३ वेगवेगळ्या कथांचा बंच असलेला हा अत्यंत सूक्ष्म अश्या एका थेअरीवर बेतलेला सिनेमा आहे. 'शिप ऑफ थिसीस' ह्याच नावाची एक थेअरी आहे. ह्याचा गाभा असा आहे की, एखाद्या जुन्या तुटक्या पडक्या पण कामात असणाऱ्या नावेचे जुने भाग एक एक करत बदलत गेलो आणि एकदिवस एकूण एक भाग बदलले गेलेले असतील तेव्हा ती नाव पूर्वीचीच नाव उरेल का की ती पूर्णतः नव्या रंगाढंगांची जुनी वैशिष्ट्ये संपुष्टात येऊन नव्या विशेषांसह नवीच नाव बनलेली असेल ?? जुनी असेल तर कुठून जुनी असेल .. आणि नवी झालीय तर तो कोणता बिंदू कोणता भाग असेल ज्यामुळे त्याला नवी ओळख प्राप्त होईल? .... हा विरीधाभासी प्रश्न (पैराडॉक्सिकल) आणि हीच थीम ही थेअरी ३ माणसांच्या जीवन कहाणीद्वारा 'शिप ऑफ थिसीस' या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

विषय जरा कठीणच आहे.. बुद्धीवर जोर देऊन पहावा आणि समजून घ्यावा लागतो मात्र समजला तर आत्यंतिक समाधान देणारा .. हे असे चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच. भारतातल्या रसिकांची आवड आणि क्लास समजून घेऊन हा चित्रपट भारतात रिलीजच करायचा नाही असा निर्णय सिनेमाच्या निर्मिती टीमने घेतला होता... मग एकदिवस टोरांटो फेस्टिवलमध्ये या सिनेमाचा प्रीमिअर होतो.. तो प्रचंड गाजतो. त्यावर वेड्यासारख्या चर्चा घडायला लागतात. याच फेस्टिवलमध्ये अमीर खान आणि किरण खान उपस्थित असतात, ते भारावून जातात आणि अश्या हटके क्लासी सिनेमाचा रसिक मोठ्या प्रमाणात नसला तरी मूठभर रसिकांनी तरी त्याला का मुकावे म्हणून स्वखर्चावर तो भारतात घेऊन येतात आणि मोजक्याच फिल्म थिएटरला रिलीज करतात. तो मूठभर लोकांचा क्लास ती सिनेमा पाहतात आणि एक चांगली कलाकृती पदरी पडल्याचे समाधान मानून घेतात... माझ्यासारखे रसिक एका छोट्या शहरात राहत असल्याने त्यातही थिएटरमध्ये बिग बजेट फिल्म आणि अश्या क्लासी फिल्मच्या लॉबी संघर्षात फसतात आणि अनेक महिने वाट पाहूनही शेवटी मुकलेच जातात.... नंतर जवळजवळ ६-७ वर्षांनी तो ऑनलाईन धुंडाळून पाहता येतो त्यात समाधान मानतो.... तर असो. या सगळ्यात कौतुक करावे ते या सिनेमाचा निर्देशक आनंद गांधी आणि खान दाम्पत्याचं.


जवळजवळ माझ्याच वयाचा असणारा एखादा अत्यंत प्रतिभाशाली सिने निर्देशक जगावेगळ्या कलाकृती निर्मितीसाठी धडपडतो आणि तसे करूनही दाखवतो तेव्हा त्याचे कौतुक वाटणे साहजिक आहे. आपल्यासारखेच अनेक तर्काधिष्ठित विचार डोक्यात घेऊन फिरणारे बरेच आहेत पण कुठलीही तडजोड न करता कलेच्या माध्यमातूनच का होईना पण ती वाटते तशी, दिसते-जाणवते तशी कोरून बनवून जमिनीवर उतरवून प्रेक्षक रसिकांसमोर मांडणे आणि नंतर त्याच्यावर मिळणाऱ्या बऱ्या-वाईट प्रतिक्रिया, समीक्षा झेलत राहणे ..फार न मिळालेल्या रिस्पोन्सनेही खचून हलून न जाता ठरवलेल्या मार्गाने ठामपणे चालत राहणे आनंद सारख्या कलावंताची खासियत असते. ‘मला जर जादूगार, तत्त्ववेत्ता, लेखक, अभिनेता असं सगळं एकत्रितरीत्या बनायचं असेल तर माझ्यासाठी सिनेमा हे एकमेव माध्यम आहे' असे तो म्हणतो. ‘माझ्या माझ्याकडूनच असलेल्या अपेक्षा मी कला आणि चित्रपटातूनच वाढवतो. मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीतून मला जगण्याबद्दल नवं काहीतरी गवसलं पाहिजे. अशाच गोष्टींमध्ये मी रमतो,’ असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा कोण जाणे का आपल्यासारखाच भासतो.


माणूस बदलत जातो .. आयुष्याच्या अनुभवाने, बऱ्या-वाईट माणसांच्या संगतीने. तो जसा आहे तसाच्या तसा कधीच उरत नाही. आयुष्यात येणारा वाईट काळ म्हणजे आयुष्याचा वसंत जशी पानगळ होते बहर ओसरतो तसा एक दिवस हिरव्याकंच पालवीने नव्या मोहोराने जगणे फुलून बहरुनही येते .. तर असे ऋतू येत जात राहतात आणि माणूस हळूहळू नखशिखांत बदलत जातो. असे म्हणतात मानवाच्या शरीरातल्या एकूण एक कोशिका ७ वर्षांमध्ये पूर्णपणे बदलतात.. मग या बदलानंतरचा माणूस तोच पूर्वीचा असतो की बदललेला असतो ? हे जाणून घेण्याची जिज्ञासा या चित्रपटाच्या निर्मितीच्या मुळाशी आहे.
तर 'बदल' ही मनुष्याच्या हयातीपर्यंत कायम असणारी एकमेव बाब आहे. बदल घडणार हे ठामपणे सांगता येत असले तरी बदल घडण्यामागची कारणे आणि ते कसे घडतील हे कुणालाही सांगता येत नाही. 'शिप ऑफ थिसीस' चित्रपटाच्या तिन्ही कथेचा गाभाही हाच आहे.


पहिली कथा आलिया (आयदा-अल-काशेफ) हिची आहे. नेत्रहीन आलिया तिच्या सेन्सेसचा वापर करून उत्कृष्ट फोटोग्राफी करत असते. दिसत नसूनही तिच्या अत्यंत वेगळ्या धाटणीची कलात्मक फोटोग्राफी तिला सहज साधता येते..पण एक दिवस ऑपरेशन करून दिसू लागल्याने अत्यानंदाने घरी परत आलेल्या आलियाला लक्षात येते कि दृष्टी मिळवली असली तरीही तिने तिचे ते सगळे विशेष सेन्सेस मात्र गमावले आहे आणि खूप प्रयत्नानंतरही आता तिला फोटोग्राफी जमत नाहीये.


दूसरी कथा मैत्रेय(नीरज कबि) नावाच्या एक श्वेतांबर साधु/भिक्षुची आहे. ते जीव-जंतूंच्या अधिकारासाठी विज्ञानाच्या परीक्षणाच्या नावावर त्यांच्यावर
होणाऱ्या अत्याचारासाठी कोर्टपर्यंत लढा देत असतात. त्यांना पोटाचा गंभीर आजार झालाय परंतु ते औषध घ्यायला तयार नाही कारण प्रत्येक औषधीमागे जीव-जंतूंवर अत्याचार झाल्याची खंत मनात आहे. पोटाचा आजार लिव्हर सिरॉयसिस पर्यंत पोचतो आणि तो कॅन्सर पर्यंत पोचण्याचे चान्सेस वाढतात. तरीही तत्वांवर कायम राहून ते जीव त्यागण्याचा निर्णय घेतात आणि आमरण उपोषण सुरु करतात.... वेदनेच्या अत्युच्च बिंदूवर एकदिवस धैर्य खचत आणि ते ऑपरेशन करायला तयार होतात. त्यांचे लिव्हर बदलले जातात. जीवजंतूंच्या हत्येने तयार होणाऱ्या उपचारांचा उपयोग केलेला भिक्षु आता भिक्षु उरला नसतो आणि जीव-जंतूंच्या अन्यायावर लढण्याचा अधिकारही गमावून बसला असतो.


तीसरी कथा नवीन (सोहुम शाह) नावाच्या एका स्टॉकब्रोकरची आहे. कथेची सुरुवातच हॉस्पिटलमध्ये नवीनच्या किडनी प्रत्यारोपण नंतर होते. एका फ्रिडम फायटर, सामाजिक सेवेची आवड असणाऱ्या आजीचा हा नातू. आजीला मुळात ही खंत आहे कि एवढ्या समाजसेवी घराण्यात जन्मूनही नवीन निव्वळ पैशांच्या मागे धावत राहणारा अत्यंत शुल्लक आयुष्य जगणारा माणूस आहे. किडनी ट्रान्सप्लान्टस आणि आणखी एका कारणासाठी पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलेला नवीन एका घटनेला साक्षी ठरतो ... ज्या दिवशी नवीनला किडनी बसवण्यात आली असते त्याच दिवशी एका गरीब मजदुरांची किडनी त्याच हॉस्पिटलला चोरी गेली असते... त्या गरिबाला त्याबदल्यात पैसे नको असतो तर किडनीच परत हवी असते.. आणि सुरु होतो प्रवास त्याच्या किडनी शोधाचा. त्याची किडनी लावण्यात आलेल्या त्या माणसाला शोधायला नवीन स्टॉकहोम, स्वीडनपर्यंत जाऊन पोचतो. या कथेत दोन बदल घडतात .. पैशांमागे धावणाऱ्या सोहम्ला आता मनुष्याचा जीवनाची किंमत कळली असते तो बदलला असतो आणि तो गरीब मजदूर जो पैसे नको किडनीच हवी असे म्हणतो तो विदेशी माणसाने दिलेल्या मोठ्या रकमेला पाहून लालसा निर्माण होऊन पैशांसाठी राजी झालेला असतो. हे दोन्ही कायाकल्प एक विरोधाभासी संभ्रमच तर असतो.


अखेर इतकेच की बॉलिवूडच्या प्रस्थापित स्टीरियोटाइप छबी मोडणारा 'शिप ऑफ थिसीस' सिनेमा अपवादात्मक सिनेमा ठरतो. विचारांच्या खोल तळाशी असणारा एखादा बिंदुएवढाही विचार समाजातील माणसांच्या जगण्याशीच अखेर संबंधित असतो. या जगण्याचाच एक भाग कलेच्या रूपात त्यांच्यासमोर ठेवून त्यांनाच अचंभित करण्याची आनंद गांधी यांची शैली वाखाण्याजोगीच म्हणावी लागेल.


©रश्मी पदवाड मदनकर



No photo description available.



Monday, 20 July 2020

काही गोष्टींचा आनंद मानावा की दुःख हेच कळत नाही ..






संपूर्ण उन्हाळा लॉकडाऊनमध्ये पार पडला. कधी रखरखते पोळून काढणारे ऊन तापू लागले आणि कधी निवळले कळलेही नाही. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सुस्थितीतल्या चपला जमा करून ठेवल्या होत्या..त्या दरवर्षीप्रमाणे उन्हात पाय भाजत चालताना दिसणाऱ्या गरजवंतांना द्यायचे ठरले होते. तसे तळपत्या उन्हात प्रचंड संख्येने दूरदूर पायी चालत निघालेली एक नवीच जमात या काळात उदयाला आली होती पण त्या प्रत्येकापर्यंत पोचणं काही शक्य झाले नाही. लॉकडाऊन असतांना आपली घोडदौड शहराच्या आतल्या भागापर्यंतच सीमित राहिली शेवटी. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑफिसला निघताना (होय माझे ऑफिस चालूच होते) यातले २-४ जोड चपला गाडीत ठेवून घ्यायच्या आणि उन्हात भाजत पायपीट करणाऱ्या लहान मुलांना, गाडा ओढणाऱ्या, सायकलरिक्षा चालवणारे, भीक मागणारे, मजुरी करणारे किंवा गावातून शहरात येऊन भाजी दूध लोणी विकणाऱ्या गरीब मंडळींना द्यायचे हा शिरस्ता पाळायचा होता. पण या टोकापासून त्या टोकापर्यंत भयाण शांतता पसरलेल्या शहरात घरात दारात झोपडीत खोपटात पायपात ब्रिजखाली कुठेकुठे लॉकडाऊन होऊन पडलेली मंडळी दिसलीच नाही. गरजवंत दिसले नाही म्हणून आनंद मानावा की गरजवंत असूनही आपल्याला दिसू शकली नाही किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोचूच शकलो नाही याचं वाईट वाटून घ्यावं हा मोठा प्रश्न आहे ..


मागल्या आठवड्यात ऑफिसमधून घरी परतताना ५ आणि ३ वर्षांचे दोन चिमुकले दिसले चपलेविना हातात हात घेऊन रस्त्याने चालताना. पायात चपला का नाही विचारले तर म्हणाले नाही आहेत चपला. कुठे राहता तर खालच्या बस्तीत म्हणाले .. खालच्या बस्तीत म्हणजे ही मुले पारधी समाजाचा जो जत्था राहतायत ओंकार नगरच्या खुल्या मैदानावर त्यांची मुले. दुसऱ्या दिवशी चपला घेऊन पोचले बस्तीवर तर रस्त्यापासून उतारावर असणाऱ्या प्लास्टिक झाकलेल्या त्यांच्या झोपड्या पावसाच्या पाऊलभर पाण्यात तुडुंब डुंबलेल्या दिसल्या. रस्त्यापासून झोपड्यांपर्यंतचा पूर्ण रस्ता चिखल चिखल झालेला. मी दूर वर रस्त्यावरच उभी राहून पाहत राहिले .. जिथे त्यांच्या झोपडीत जमिनीवर बसता येण्याचीही शक्यता नव्हती. प्रफुल्लित वातावरण झाले म्हणून खुश होत आपण आपल्या घरी चार भिंतीत चहा भजी खात असतो तेव्हा.. जेव्हा आकाशातून धो धो पाऊस बरसत असतो, डोकं लपवायला असणाऱ्या तुटक्या झोपडीत जमिनीवरही पाऊलभर पाणी साठले असते, जेव्हा ह्यांना साधे जमिनीवर बसता झोपताही येत नसते, रात्र रात्र डोक्यावर फाटके छत आणि पाणी भरल्या जमिनीवर उभे राहून काढावी लागते , येण्याजाण्याच्या रस्त्यावर पाय रुततील इतका चिखल भरला असताना आपण आणलेले २-४ जोड चपला यांच्या काय कामाच्या असतील हा विचार मनात येऊन मी स्तंभित होऊन तिथेच उभे राहिले बराच वेळ.. यांच्यासाठी काय करता येणार होते? तुटपुंज्या मदती गाडीच्या डिक्कीत घेऊन फिरणारे आपण आपली झोळी किती तोकडी असते, किती बांधले गेलेलो असतो आपण .. अश्यावेळी ह्याची जाणीव होते आणि मग आपणच आपल्यासमोर फार खुजे दिसू लागतो... फार खुजे.

Image may contain: outdoor and nature

-रश्मी ...
गझलकार सतीश दरडी ह्यांनी दिलेल्या मिसऱ्यावरून गझल लिहिण्याचा मी केलेला प्रयत्न - 

(तुझे स्वप्न जेंव्हा पडू लागले)
कसे दुःख सारे झडू लागले 

तुझी आस जेथे मनी दाटली  
तिथे भास सारे दडू लागले 

उगी अडखळू लागली पावले  
कळेना असे का घडू लागले 

अश्या सांज समयी सुने वाटते 
तुझे दूर जाणे नडू लागले 

कुणाला पुसू काय हे दाटले 
कशाला असे भडभडू लागले

Thursday, 9 July 2020

माझा वेल्हाळ पाऊस

माझा वेल्हाळ पाऊस
असा येतो बरसतो 
जणू अंगांगात साऱ्या  
नवे चैतन्य पेरतो 

माझा वेल्हाळ पाऊस 
घर अंगण भिजवी
खोल मातीत शिरून 
नवे अंकुर फुलवी 

माझा वेल्हाळ पाऊस 
त्याची बातच वेगळी 
त्याच्या फक्त स्पर्शामुळे
फुलारते चाफेकळी

माझा वेल्हाळ पाऊस 
नदी होऊन वाहतो 
तिच्या अंगाखांद्यावर 
खुणा पेरून धावतो

माझा वेल्हाळ पाऊस 
पाझरतो आत आत 
जणू रुजवून काही 
पुन्हा उगवे कणात..

माझा वेल्हाळ पाऊस 
करे धरतीशी माया 
रस रूप गंध सारे 
आला उधळून द्याया..

माझा वेल्हाळ पाऊस 
उतरतो खोल खोल  
गात्रागात्रातून वाहे 
त्याच्या अस्तित्वाची ओल.


Monday, 6 July 2020

सुखाशी भांडतो आम्ही



सुख सुख म्हणतात म्हणजे नेमके काय … ??


या प्रश्नावर नाही तर उत्तराच्या नेपथ्यावर खेचून उभं करणारं आणि सुखाच्या सर्व काल्पनिक, बेगड्या कल्पना धुऊन काढून मन ढवळून काढून सुप्त अन खऱ्या सुखाच्या इच्छा जागृत करणारं नाटक पहिलं आज ….


'सुखाशी भांडतो आम्ही'


लेखकाच्या यथार्थ लिखाणाची , दिग्दर्शकाच्या प्रभावशाली दिग्दर्शनाची आणि कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाची … नाही खरतर व्यक्तिरेखा साकारण्याच्या त्यांच्या गुणांची अकल्पिक अनुभूती घ्यायची असेल तर एकदा तरी हे नाटक बघायलाच हवं ….


लेखक नाटककार अभिराम भडकमकर यांनी फार वेगळा विषय या नाटकातून प्रेक्षकांसमोर मांडला आहे …. भद्रकाली प्रॉडक्शनचे कुमार सोहोनी दिग्दर्शित आणि कविता कांबळी निर्मित 'सुखाशी भांडतो आम्ही' एक अप्रतिम आणि उत्कृष्ट नाटक ….


सदाशिव विठ्ठल नाशिककर (चिन्मय मांडलेकर)या शेतकी महाविद्यालयातील अतिशय हुशार कविमनाच्या प्राध्यापकाची मनोव्यथा…. मनोविकार जडलाय त्याला पण त्याच्या खुळ्या ठरलेल्या आणि समाजाने वेड्या ठरवलेल्या विचारांमध्ये प्रेक्षक कसा गुरफटत जातो हे कळतच नाही … दुसर्या बाजूने या वेड्याचा उपचार करणारा डॉक्टर श्रीधर (डॉ.गिरीश ओक) द्विधा मनःस्थितीतला, स्वतःला काय हवं ते विसरून प्रतिष्ठा, ऐश्वर्य हेच सुख समजून त्यांचाच शोध घेत मिळेल तो रस्ता पत्करत धावणारा आणि त्याची अति महात्वाकांक्षी पत्नी मिता (रेखा बडे) हिच्या सुखाच्या लग्जरिअस कल्पना …. या जुगलबंदीतून प्रेक्षक स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत राहतो ….


शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरीब माणसाच्या प्रामाणिक नौकरीतून मिळणाऱ्या पगारातही होणारे भ्रष्टाचार, अन्याय … मन म्हणेल तसे वागायची मुभा नाही, मन् मारून जगायचे लोकांच्या खोट्या प्रतिष्ठा या सर्वात हा प्रामाणिक आणि पापभिरू 'सदा' गुंतत जातो त्याच्या मनाचा कोंडमारा होतो आणि 'मन' हेच त्याचे सर्वात मोठे वैरी होऊन बसते … त्यातून त्याला वेगवेगळे भास होऊ लागतात आणि मग त्याच्या हाताने त्याच्या बायकोची अन मुलाची हत्या घडून येते स्वतः आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतांना पकडला जातो आणि ७ वर्षांची शिक्षा भोगून परत येउन मान्सोपचाराकडे उपचारार्थ दाखल होतो …


सदाचे मन सदाशी बोलत असतं … आणि आपण आपल्याच मनाचं का ऐकत नाही हा प्रश्न सदाला छळून असतो … म्हणजे मनाचच ऐकायला पाहिजे पण व्यावहारिक जगात जगतांना आपण आपल्या मनाचं ऐकत नाही किंवा त्याला दूर लोटूनच जगलं पाहिजे तरच इथे मनुष्य जगू शकतो किंवा टिकू शकतो हे सदाला कळतंय पण सदाच मन ऐकत नाहीये आणि म्हणून सदा स्वतःच्याच मनाचा वैरी झालाय….


कारण मनामुळे तो इतर लोकांसारखे व्यावहारिक जगणे जगू शकत नाही त्याला भावना सतावतात, त्याला दुख होतं,आनंद होतो पण व्यावहारिक जगात जगाला वाटेल तस जगाव लागतं, त्याला इतरांसारखे मनाला समजावता येत नाही स्वतःच्या अखत्यारीत बांधून ठेवता येत नाही ….या सगळ्या नुसत्या कल्पना बघतांना सुद्धा आपल्याकरवी राहून राहून लेखकाला नकळत दाद दिली जाते ...


शहाण्यानसारखे जगणारे डॉ श्री त्यांची पत्नी आणि मुलगा आणि मानसिक रोगी किंवा वेडा ठरलेला सदा यांच्यातले संवाद दिलखेचकच नाही तर हृदय ढवळून टाकणारे आणि सगळी वैचारिक गात्रे जागृत करणारी आहेत …


श्री आणि सदाच्या मधला ड्रिंक घेताना आणि आईची आठवण एक विनोदी सीन पण बुद्धिशाली लिखाणाचा अन सुंदर अभिनयाची परिसीमा गाठणारा नमुना आहे ….


आजच्या काळातल्या विभक्त कुटुंबाच उदाहरण दाखवलेले श्री चे कुटुंब त्यांची स्वप्न त्यांच्या महत्वाकांक्षा एका उंचीपर्यंत पोचताच मुलाने दूर विदेशात जाउन सेटल होण्याचा घेतलेला निर्णय आणि याबरोबरच सुखाच्या बेगडी कल्पना गळून पडलेली मुसमुसनारी आई आणि ........आणि आपणही आपले गाव सोडतांना आपल्या तरुणपणी असेच वागलो होतो हे आठवून हिरमुसलेला बाबा…. त्या आधी खुळ्या सदाने त्याच्या पद्धतीने सांगितलेले सुखाचे तत्वज्ञान …… काही भाग मनाला भिडणारे आणि नाटकाला उंचीवर घेऊन जाणारे आहेत …


खरा वेडा कोण आणि खरा शहाणा कोण … या प्रश्नांच्या मध्ये कोंडी झालेला प्रेक्षक या नाटकातून त्याच्या आयुष्यातले लहान लहान सुख सुद्धा किती महत्वाचे आहेत आणि ते आपण सुखामागे धावतांना, पडतांना आणि परत उठून पळतांना तसेच ताटकळत सोडून देत असतो हा हिशोब स्वतःच्याही नकळत हे नाटक बघतांना लावत असतो ….ते पूर्णपणे हिरावून जाण्या आधी बदल करता येतील का याचा शोध घेत बसतो … खरतर हीच या नाटकाची मिळवती बाजू आहे ….


या व्यतिरिक्त गुरु ठाकूर ह्यांचे वजनदार शब्द सुरेश वाडकर ह्यांच्या अप्रतिम सुराने नाटकात सुरुवातीपासूनच पोषक अशी वातावरण निर्मिती होते …. तसेच पौर्णिमा हिरे यांनी कमळाबाईंच्या भूमिकेत धमाल केली आहे… विनोद निर्माण करत गंभीर झालेली परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न या पात्राने केला आहे .…विजया महाजन यांनी प्रधान मेडम तर अभय फडके याने श्री चा मुलगा म्हणून अक्षय ची भूमिका यथार्थ पार पाडली आहे ….


एकंदरीत …. एखादी सुंदर, बुद्धीला खाद्य देणारी आणि वैचारिक भूक शमवणारी तरीही पूर्ण मनोरंजक पैसा वसूल कलाकृती पहायची असेल तर 'सुखांशी भांडतो आम्ही' एकदा बघायलाच हवा ….














रश्मी पदवाड मदनकर


6/07/2013

Thursday, 2 July 2020

घोंगावणाऱ्या वाऱ्याने नाहीच दिले विनाशाचे संकेत
एके रात्री विशालकाय आभाळाचा तुकडा
अचानक फाटला, कोसळला .. आणि
 उंबऱ्यापासून गाववेशीपर्यंत वाहून घेऊन गेला लक्तरं
जगण्यासाठीच्या सगळ्या संभावना विस्कळीत
पायाखालची जमीन आणि डोक्यावरचे आभाळही
अश्रूंच्या महापुरात तुडुंब ..

संसार उघडे पडले..हातातले हात सुटले
शिल्लक राहिलेत काही जिवंत पार्थिव ..  
पंचतत्वात विलीन व्हावे असे कितीही वाटले
तरी नियती इतकी सहज सुटका करीत नाहीच
अक्ख्या आयुष्याच्याच नाका-तोंडात पाणी जाऊन
फुगून वर आलेल्या  छिन्न विच्छिन्न,
 कुजलेल्या लिबलिबीत प्रेतासारखी
एकेकाची चित्तरकथा .. पडझड झालेल्या अर्ध्या उभ्या
भिंतींवर आदळत राहणार आहेत अनेक वर्ष ..अखंड !

माणसे गिळणारा हा लाल-काळा चिखल तुडवत
उरलेल्यांना चालत राहावे लागणार आहे.

काळ सोकावत जाईल
वाहून गेलेले मृतदेह घुसळले जातील, फसतील, रुतली जातील,
खोल आत आत चिखलात ..आणि एक दिवस विरघळून जातील.
पण
जीव न गेलेल्या देहातील आशा आकांक्षांचे
पाण्यावर तरंगणारे कलेवर मात्र येत राहतील वरवर
महापुराच्या विनाशाची चित्र रंगवत मनःपटलावर
चिरकाल ..

रश्मी -
ऑक्टो. २०

Image may contain: text

Friday, 26 June 2020

काळीजहाक ..



भवतालच्या परिघातून घुमत येते एखादी काळीजहाक
आणि ..दिगंतात दुमदुमू लागते दर्दस्त अंतर्लय
अंतर्यामातील वीणेच्या तारेवर रणकंदते एखादी झंकार
आणि वाजू लागते अम्लान वेदनेची स्निग्ध तार
प्राणाच्या समेवर राग चंद्रकंस छेडला जातो..
आणि संथागारातील मर्मतळातून ..
आकांतून बाहेर पडतात अव्यक्त आत्मप्रलय

नको असतात हाका, हाका त्रास देतात
काळजावर कोरलेल्या अनेक डोळ्यांच्या खळातून
आक्रंदत पाझरू लागतात ऋतुगर्द आठवणींचे जीवनलय..
जसे पाषाणाचे हृदय भेदत जखमांच्या भेगांतून बाहेर येऊ पाहतात
काळ्याभोर ढेकळांचे कवच फोडणारे गर्दकोवळे कोंब ...






रश्मी -
२६/०६/२०

Wednesday, 24 June 2020

नरो वा कुंजरो वा !



माणूस हा फार चक्रम प्राणी आहे.. प्रत्येक मानवी प्रवृत्ती गुणदोषांनी भरलेली असते हे तो मान्य करतो. आपल्या माणसांना गुण-दोषांसह स्वीकारावे हेही पटवून देतो,  स्वतःला मात्र कधीच जोखायला जात नाही,  किंवा स्वतःच्या बाबतीत माणूस अत्यंत सहिष्णू वगैरे असतो आणि इतरांकडूनही त्याची तशीच वागण्याची अपेक्षा असते. ..मात्र वास्तवात इतरांकडे पाहताना स्वतःचा दृष्टिकोन मात्र अत्यंत एकसुरी राखतो. दुसऱ्यांकडे पाहतांना तो प्रचंड जजमेंटल वगैरे होतो. पुढला एकतर अगदीच देव हवा असतो किंवा टोकाचा दानव. आपण कितीही प्रगल्भ झालो तरी आपण हे मान्य करायला तयारच नसतो की, माणूस चांगला का वाईट हे आपण कधीच ठरवू शकत नाही. माणूस ज्या वेळी जसा वागतो ते त्या त्यावेळी घडणाऱ्या परिस्थितीमुळे ..आणि परिस्थितीमुळे माणूस जसा वागतो तो तसा असतोच असे नाही ...ते वागणे तात्पुरते असते तेवढ्या परिस्थितीपुरते. आपण नेहमी फक्त माणसातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवावा.

आल्फ्रेड हिचकॉकच्या एका चित्रपटात एक दृश्य होतं ज्यात एक मवाली एका पादचाऱ्याच्या खिशातल्या तुटपुंज्या पैशांसाठी त्याचा निर्घृण खून करतो, त्याच्या अंगावरल्या, खिशातल्या वस्तू ओरबाडून घेऊन शांत चालू लागतो......पुढे गेल्यावर त्याला एक आंधळी म्हातारी कशी बशी रस्ता क्रॉस करण्याच्या प्रयत्नात दिसते..तर धावत जाऊन तो तिला रस्ता क्रॉस करायला मदत करतो. हे सगळं अवघ्या पाच मिनिटात घडतं आणि हे सगळं पाहणारा लांबवर उभा असलेला सिनेमातला माणूस किंवा आपण प्रेक्षकही बुचकळ्यात पडतो की यातला नेमका खरा माणूस कोणता?? खून करणारा की म्हातारीला मदत करणारा??

रॉबिनहूड नावाचं एक मिथ आहे... श्रीमंतांकडून संपत्ती लुटून ती गरीबांमध्ये वितरण करणारा एक लोकप्रिय लोकनायक म्हणजे रॉबिनहूड. या संकल्पनेवर जगभरातील सगळ्या भाषांमध्ये चित्रपट बनवले गेले. असे ऐकिवात आहे कि एकेकाळी अंडरवर्ल्डचा डॉन असणाऱ्या हाजी मस्तानीची रॉबिनहूड सारखी प्रतिमा होती. श्रीमंत, व्यावसायिक, बॉलिवूड कलावंतांमध्ये त्याची दहशत होती. अनेक असंवैधानिक अन्यायी कामे तो करीत होता म्हणून एका वर्गासाठी गुन्हेगार आणि क्रूर होता.. मात्र त्या शहरातील गरिबांसाठी मात्र तो एक देवच होता..दोन्ही बाजू नीट अभ्यासला कि हा व्यक्ती नेमका होता कोण ? ह्यास व्हिलन म्हणावे का हिरो हा मोठा प्रश्न समोर आ वासून उभा राहतो. प्रत्येक माणसांत चांगल्या आणि वाईट गोष्टी वास करून असतात. कोणत्या वेळी कोणती गोष्ट बाहेर पडेल आणि दर्शन देईल हे सांगणे मुश्कील आहे. इतरांचे राहो बाजूला ... ज्याचे त्याला देखील हे नक्की सांगता येणार नाही... त्यामुळेच फक्त एखाद्या कृतिवरून व्यक्ति जोखणे चुकीचे ठरते.. पण मानवी स्वभाव असा आहे की आपण वाईट गोष्टीवर चटकन विश्वास ठेवतो आणि एखाद्या व्यक्तिची एखादी वाईट कृति त्याच्या आधीच्या सगळ्या चांगल्या गोष्टी धुळीस मिळवते आणि आपण त्या व्यक्तिला वाईट किंवा चुकीचे संबोधू लागतो ..

खरतर परिस्थितीला दोष देऊन केलेल्या किंवा करीत असलेल्या चुकीच्या क्रियेचे समर्थन नाहीये हे. परिस्थिती म्हणजे दारू नव्हे जिच्या आहारी जाऊन माणूस विपरीत कृती करतो. दोन्ही ठिकाणी हे क्षम्य नाही. कृती माणूस करतो आणि दोष परिस्थितीला? संधी माणूस घालवतो आणि दोष नशीबाला? खरतर हे असे व्हायला नको .. वारंवार घटना घडत असतील तर ती प्रवृत्तीच आहे असे म्हणता येईल, परिस्थितीला बळी पडणारा पण माणूस आणि परिस्थिती निर्माण करणारा पण माणूसच, एक उदाहरण आठवत, महाभारताच्या युद्धात ज्या वेळी 'अश्वत्थामा' नावाचा हत्ती मारला जातो आणि द्रोणांची युधिष्ठिराला विचारणा होते की, 'अश्वत्थामा मृत्युमुखी पडलाय  हे खरे आहे का?' तेंव्हा नेहमी सत्य बोलणारा म्हणून प्रचिती असणारा धर्मराज युधिष्टिर 'हो' असेच म्हणतो, नंतर तो 'नरो वा कुंजरो वा' असे पुटपुटतो अशी कथा आहे... वास्तविक ज्यांच्या सोबत कृष्ण-सखा, सारथी आणि मार्गदर्शक होता त्यांचा विजय अटळ होता ... तरीही परिस्थितीला वश होऊन खोटे बोलण्याचा मोह त्यांना आवरला नाही, तरी ही अशी बुद्धी व्हावी हे कशाचे लक्षण आहे? ..... ... हे परिस्थितीला शरण जाणेच नव्हे का? खरतर असेही होता काम नये.

Kurukshetra War - Day 16 - Indus.heartstrings

एकाच्या परिस्थितीला दुसरा माणूस कारण ठरतो आणि हे कारण ठरण्यामागे सुद्धा कुठलीतरी परिस्थिती कारणीभूत  ठरलेली असते, प्रत्येकवेळी परिस्थितीला दोष देत बसणे बरे नसले तरी कधीतरी हातून घडून गेलेल्या भल्या-बुऱ्या गोष्टी समजून घेता येतातच.. माफही करता येतात. पण यामागे त्या व्यक्तीला झालेल्या चुकीची जाणीव असणे आणि त्यातून हेतुपुरस्सर प्रयत्नपूर्वक बाहेर पडण्याची इच्छाशक्ती मात्र असायला हवी असते. कारण परिस्थिती ही अनेक कारणांची परिणती असते. ती अचानक वरुन पडत नाही किंवा अचानक निर्माण होत नाही. माणूस आपल्या कर्माने त्यात ओढला जातो, बाहेर यायची किल्ली मात्र त्याच्याकडेच असते... ती त्याने प्रयत्नपूर्वक वापरायला मात्र हवी असते.

- रश्मी पदवाड मदनकर

Friday, 5 June 2020

जेव्हा माझ्या खिडकीशी
चंद्र सलगी करेल
तुझ्या गोड आठवांनी
आसमंतही भरेल

रात्र उशाशी येऊन
तुझे गुपीत सांगेल
चित्त बेभान होईल
मनामध्ये काहुरेल

असे आतुरेल मन
कड डोळ्यांची भिजेल
चाचपडेन मी शेज
भ्रम भोपळा फुटेल

तुझी वाट मी पाहते
मन माझं अलवार
ध्यास तुला भेटण्याचा
जीव होई हळुवार

चल लावू ये मोगरा
आपुल्या या अंगणात
गंधाळल्या सोबतीचा
गंध वाहू दे घरात

टाळीला थाळीची आस - भाग ४ (अंतिम)

लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - प्रकरण 1




आपण आपल्याच विश्वात इतके मश्गुल असतो की या दुनियेत आपल्यासारखीच दिसणारी पण फक्त नियतीनं वेगळा बेत आखला म्हणून संघर्षमय आणि नाईलाजास्तव सामान्य माणसापेक्षा वेगळं आयुष्य जगण्यास भाग असणारी अनेक माणसे आहेत याकडे आपले लक्षही नसते किंवा लक्ष असले तरी अंगाला मनाला काहीही लावून न घेता बिनदिक्कत झापडे पांघरून आपल्याला निघून जाता येतं. पण अशी झापडं सगळ्यांनाच लावता येत नाही अगदी त्यांनाही नाही ज्यांना स्वतःच मदतीची गरज असतांना.. आपलीच झोळी फाटली असतांना देखील ती उरलेली लख्तरं घेऊन इतर गरजुंच्या मदतीसाठी पुढे येतात. म्हणूनच राणीची कमाल वाटते, कामाचा अकाल पडलेल्या कोरोनाच्या काळात स्वतःचे पोट भरत नसताना, उपजीविकेचे माध्यम लॉकडाऊन होऊन बंद पडलेले असतांना दावणीला बांधून ठेवलेली तुटपुंजी सेविंग देखील काढून ती गरीबांमध्ये अन्नदान करत सुटते ....

Image may contain: 2 people, people standing


लॉक डाऊन सुरुवातीचा हा काळ होता, अचानक संकट ओढवल्याने अनेक माणसे हवालदिल झालीत. कुणाची नोकरी गेली, अनेकांचा छोटा मोठा व्यवसाय होता तो बंद पडला, रोजंदारीवर जाणाऱ्यांची मजुरी मिळणे बंद झाले, दोन वेळ खाण्याचेही वांदे व्हायला लागले. हा काळ किती लांबणार आहे हे कुणालाच माहिती नव्हते .. म्हणून खरतर अनेकजण गाठीशी बांधून ठेवलेला खडकू खडकू जपत होते. पण राणी किंग ने असा विचार न करता आता या क्षणी उपाशी असणाऱ्यांचे पॉट भरणे गरजेचे आहे हे पहिले आणि पदरात बांधून ठेवलेला बचतीचा पैसा त्यात लावला. आता तो पैसा संपलाय आणि नव्या कमाईसाठी घराबाहेर पडायचे मार्ग बंद आहेत. अश्यात त्यांनाच आता शासनाकडे मदत मागायची वेळ येऊन ठाकली आहे.

जशी परिस्थिती इतर मजुरीवर कमावत्या हातांची तशीच परिस्थिती या तृतीयपंथीयांची देखील .. कारण ही देखील हातावर कमावून खाणारीच माणसेच आहेत. मी सहज विचारले मग काय करताहात सध्या कशी चालतेय उपजीविका ? ह्या प्रश्नाचे उत्तर देतांना राणी भावुक होत सांगू लागल्या ''ताई आम्हाला कोणी नोकरीपाणी देत नाही, महत्प्रयासाने एखाद्याला मिळालीच तर लोकं टोमणे मारून, चिडवून, शारीरिक छेडछाड करत खूप छळवणूक करतात अखेर तिथून बाहेरच पडावे लागते, आम्ही टाकलेले व्यवसाय स्वतःला साळसूद समजणारी लोकं खपवून घेत नाहीत.. आमचे आशीर्वाद मिळावे म्हणून धडपडणाऱ्या कित्तेक दुतोंडी लोकांना आमच्या हातचे खाणेपिणे देखील चालत नाही. सध्या लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या घरी होणारी शुभकार्ये देखील बंद आहेत त्यामुळे उपजीविकेची सगळी दारेच बंद पडली आहेत'' त्यांचे उत्तर ऐकतांना सहज मी बोलून गेले 'होय ट्रेन बसेस मधून फिरून मिळणारे थोडेथोडके पैसे देखील बंद असतील ना गाड्याच बंद असल्याने'' त्यावर राणीचे स्पष्ट खंबीर उत्तर होते ते आपल्या सगळ्यांनीच ऐकणे गरजेचे आहे. ती म्हणाली '' ट्रेन बसेस किंवा दुकानांमध्ये अनेकदा घुसून, अंगाला हात लावून धमकीवजा वाईट शब्द वापरत, बळजबरीने पैसा मागणारा वर्ग आमचा नाही, त्यातले अनेक जण या मार्गाने मिळणाऱ्या पैशांच्या हव्यासापायी साडीचोळी नेसून हे काम करीत असतात. आमचं दुःख एवढाच आहे कि ह्यांच्या अश्या वागण्याने आम्ही बदनाम होतो आणि समाजात आमच्याबद्दल अविश्वास निर्माण होतो'' तिच्या उत्तराने मी अवाक होते कारण अशी बळजबरी करणारे अनेक तृतीयपंथी मी मुंबईच्या लोकलमध्ये, ट्रेनने प्रवास करतांना बघायचे आणि माझ्याही मनात ह्यांच्याबद्दल ही समज होतीच.

राणीसारख्या इतर अनेक समजूतदार किन्नरांच्या नेतृत्वात चालू असलेल्या आंदोलनांमुळे आताशा ह्यांच्या अनेक मागण्या हळूहळू पूर्ण होऊ लागल्या आहेत, मतदान करण्यासारखे-निवडणूक लढवता येण्यासारखे अनेक हक्क देखील प्रदान करण्यात येऊ लागले आहेत. पण तरीही ही फक्त सुरुवातच आहे आणि अजून खूप मोठा पल्डा त्यांना गाठायचा आहे. लॉकडाऊन काळात त्यांच्या उपजीविकेसाठी, किंवा तात्पुरती तरी मदत मिळावी या मागणीकरिता राणी किंगचा एक बाईट रेकॉर्ड करून ही बातमी शासनापर्यंत पोचावी आणि तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्या या शुभेच्छा देऊन आम्ही बाहेर पडलो.... पण खरतर अजूनही बाहेर पडलेलोच नाही. राणी किंगला भेटणे ही एक पर्वणी ठरली. अनेक गैरसमज दूर झाले अनेक समज कायम झाले, किती माहिती मिळाली, घटना कळल्या किस्से ऐकले हे सगळं प्रगल्भ करणारे अनुभव होते शिवाय ह्यांच्यातलया माणुसकीचा झरा वाहता ठेवणाऱ्या.. संस्कारित संवेदनशील माणसांची ओळख झाली ही जमेची बाजू.

त्यांचीही माणसे शिकून सवरून नोकरी करत सन्मानाने जगावी ही राणीची इच्छा लवकरच पूर्ण व्हावी .. 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या तिच्या रिंगटोनचे शब्द खऱ्या आयुष्यात खरे उतरावे, आणि ती करीत असलेल्या
सगळ्या चांगल्या कामांना भरभरून यश मिळावे या शुभेंच्छा या सीरिजच्या आणि तुम्हा सगळ्यांच्या अभिप्रायाच्या माध्यमातून त्यांना पोचवुया ...


रश्मी पदवाड मदनकर









Featured post

  काही गोष्टींचे, काही नात्यांचे, काही क्षणांचे, काही घटनांचे Endnote, Closure (पूर्णविराम) Epilogue मिळत नाहीत… ते फक्त थांबतात, गोठतात अचा...