Thursday 2 July 2020

घोंगावणाऱ्या वाऱ्याने नाहीच दिले विनाशाचे संकेत
एके रात्री विशालकाय आभाळाचा तुकडा
अचानक फाटला, कोसळला .. आणि
 उंबऱ्यापासून गाववेशीपर्यंत वाहून घेऊन गेला लक्तरं
जगण्यासाठीच्या सगळ्या संभावना विस्कळीत
पायाखालची जमीन आणि डोक्यावरचे आभाळही
अश्रूंच्या महापुरात तुडुंब ..

संसार उघडे पडले..हातातले हात सुटले
शिल्लक राहिलेत काही जिवंत पार्थिव ..  
पंचतत्वात विलीन व्हावे असे कितीही वाटले
तरी नियती इतकी सहज सुटका करीत नाहीच
अक्ख्या आयुष्याच्याच नाका-तोंडात पाणी जाऊन
फुगून वर आलेल्या  छिन्न विच्छिन्न,
 कुजलेल्या लिबलिबीत प्रेतासारखी
एकेकाची चित्तरकथा .. पडझड झालेल्या अर्ध्या उभ्या
भिंतींवर आदळत राहणार आहेत अनेक वर्ष ..अखंड !

माणसे गिळणारा हा लाल-काळा चिखल तुडवत
उरलेल्यांना चालत राहावे लागणार आहे.

काळ सोकावत जाईल
वाहून गेलेले मृतदेह घुसळले जातील, फसतील, रुतली जातील,
खोल आत आत चिखलात ..आणि एक दिवस विरघळून जातील.
पण
जीव न गेलेल्या देहातील आशा आकांक्षांचे
पाण्यावर तरंगणारे कलेवर मात्र येत राहतील वरवर
महापुराच्या विनाशाची चित्र रंगवत मनःपटलावर
चिरकाल ..

रश्मी -
ऑक्टो. २०

Image may contain: text

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...