Wednesday, 3 December 2025

वाईब्ज -


एक मराठी चित्रपट येऊन गेलाय ''अगंबाई, अरेच्चा'' या चित्रपटातल्या नायकाला स्त्रियांच्या मनातल्या गोष्टी ऐकायला येत असे. बरेचदा हे असे काहीतरी विचित्र माझ्याबाबत घडतं असं मला नेहमी फार स्ट्रॉन्गली वाटतं. म्हणजे माझ्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांचे वाईब्ज माझ्यापर्यंत फार थेट आणि  प्रखरपणे पोचतात आणि ते फार स्पष्ट मला जाणवतात. म्हणजे पुढला व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करतो, वरवर काहीही दाखवत असला तरी मनात काय भावना काय विचार बाळगतो.. समोर हसून बोलणारा आपल्या मागे गेल्यावर काय बरळतो ते आपोआप माझ्यापर्यंत पोचतं. याचे अनेक उदाहरण आहेत.. आश्चर्यात पाडणारे, अचंभित करून सोडणारे अनुभव आले आहेत. म्हणतात ना ''Actions can be seen, but vibes are felt; and what is felt stays longer than what is seen.'' म्हणजे एखाद्या नात्यात-मैत्रीत फार चांगलं चाललेलं असतं.. एखाद्या काळात त्या नात्यात काहीतरी जाणवायला लागतं. इथे आपल्याबाबतीत काहीतरी चांगलं नाहीये, काहीतरी चुकीचं घडत असल्याचा आभास होतो. पुढला मात्र सगळं आलबेल असल्याचा दिखावा करण्यात अधिक चांगला वागू लागतो.. काळ पुढे सरकतो तसतशा गोष्टी स्पष्ट होऊ लागतात आणि एकदिवस समोरच्या माणसाचा मुखवटा उतरतो. त्याने आपल्याबाबत काहीतरी फार वाईट करण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्यासाठी भरपूर वेळ घेतलेला असतो आणि हा तोच काळ असतो ज्यावेळी आपल्याला ते वाईब्ज जाणवले होते. संकेत मिळाले होते. बरेचदा तर मी समोरच्याला हे सांगितलेही आहे की मला तुमच्याकडून चांगले वाईब्ज येत नाहीयेत. पुढला ते गमतीत घेतो; पण मी बरोबरच होते हे काळ सिद्ध करतो. बरेचदा अनेक लोकांपासून दूर होण्याचे हे एक कारण ठरते. म्हणतात ना, ज्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत त्या गोष्टी तुमचा देव (निसर्ग, ब्रह्मांड, सुपर पावर काहीही म्हणा) पाहत असतो आणि म्हणून तो तुम्हाला तुमच्यासाठी योग्य नसणाऱ्या काही माणसांपासून दूर करतो. हे असेच अगदी या उलटही. जी माणसे खरोखर आपल्या बाबतीत प्रामाणिक भावना बाळगून असतात. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात कुठलाही भेद नसतो. जे आतबाहेरून एकसमान असतात आणि खरोखर आपल्यावर मनापासून प्रेम करत असतात त्यांचे हेतू खूप शुद्ध असतात; अश्यांचे ते शुद्ध, प्रामाणिक, प्रेमाचे वाईब्ज आपल्यापर्यंत थेट येतात आणि आतवर पोचत असतात आणि म्हणून त्या माणसांबद्दल अधिक आदर, प्रेम आणि ओढ वाढत जात असते. त्यांची मैत्री त्यांचा सहवास हवाहवा वाटत असतो. अशी मैत्री कधीच कुठल्याच कारणाने दुरावू शकत नाही.. दुरावण्याचे एकच कारण असू शकते ते म्हणजे अंर्तमनातले खरेखुरे भाव बदलेल तेव्हा, त्यात नकारात्मक भाव निर्माण होतील तेव्हा ते पुढ्ल्यापर्यंतही आपोआप पोचतील हे निश्चित. Sometimes a silent vibe reveals more truth than a thousand spoken words or actions.

शेवटी सगळं वाइब्जवरच येऊन ठरतं.
तुम्ही कितीही चांगलं बोललात, हसलात, वागलात – पण जर मनात राग, मत्सर, स्वार्थ किंवा कपट असेल, तर ते लपवताच येत नाही. शब्दांनी पडदा टाकता येतो, पण ऊर्जा आणि भावनांचं सत्य नेहमी प्रकट होतंच.म्हणून कदाचित, नाती जपताना शब्दांपेक्षा भावना शुद्ध ठेवणं महत्त्वाचं असतं. कारण माणसांच्या आठवणीत तुमचं रूप, तुमचे कपडे, तुमची आर्थिक स्थिती नाही तर तुमच्या वाइब्ज राहतात...तुम्ही त्यांना कशी जाणीव करून दिली ते. Vibes are the soul’s language; they whisper what actions cannot explain. जिथे चांगले वाइब्ज मिळतात, तिथे मन शांत होतं जिथे नकारात्मक वाइब्ज असतात, तिथे मन नकळत दूर जायला लागतं. खरं तर, हे वाइब्ज म्हणजे विश्वाचा तुमच्याशी बोलण्याचा एक मार्गच आहे. फक्त आपण त्याला ऐकायचं आणि मानायचं, कोणाला जवळ करायचं आणि कोणाला हळूच सोडून द्यायचं हे वाइब्ज हा निसर्गाचा संकेतच देत असतो..जे काळानुरूप अकळतात.. आणि जे झाले ते योग्यच होते हा विश्वास पटायला लागतो.  







No comments:

Post a Comment

Featured post

From wheels to wings ...

  From wheels to wings .... A symbol of freedom beyond limitations; the iconic wheelchair grave in Salt Lake, America. काहीतरी वाचत शोधत राह...