Wednesday, 24 December 2025

''कायांतर'' कादंबरीच्या निमित्ताने...

 समाजात #तृतीयपंथी व्यक्तींविषयी काळानुसार असंख्य #कथा निर्माण होत गेल्या... काही अफवा, काही अर्धसत्य तर काही पूर्वग्रहांनी ग्रसित. या कथांनी त्यांच्या भोवती एक धूसर, अंधुक वलय निर्माण केलं. परंतु त्या धुक्याच्या पलीकडे, जरा जवळून पाहिलं की कळतं; हा समुदाय अतिशय भावनाशील-संवेदनशील आणि माणुसकीच्या नात्यांना मायेने जपणारा आहे. #नव्या_येऊ_घातलेल्या_पुस्तकाच्या_निमित्ताने

भूक भागवण्याचा आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात अनेक तृतीयपंथीना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते, आयुष्यभर नरकात भोगाव्या इतक्या दुःखयातना भोगाव्या लागतात. हे सगळं फक्त एवढ्यासाठी कारण समाज त्यांना स्वीकारत नाही.. हे किती दुर्दैवी आहे. आज या बाबत दोन्ही बाजूने जागृती होत असली, बदल घडत असला तरी पूर्ण परिवर्तन घडायला अनेक युगे जावी लागणार आहेत. माझं येऊ घातलेलं हे नवं पुस्तक #कायांतर लिहीत असताना, अनेक तृतीयपंथींच्या भेटी घेतल्या आणि मनाला स्पर्शून जाणारे, हृदय पिळवटून टाकतील असे अनुभव ऐकायला मिळाले. ते ऐकताना आपण कुठल्यातरी वेगळ्याच जगाच्या कहाण्या ऐकत आहोत असे वाटू लागते; कारण आपल्या जगात, आपल्या भोवताल सगळं आलबेल असतं; किमान या स्तरावरचा संघर्ष तरी नसतो. इतकं सगळं भोगुनही, आयुष्याला झुंज देणाऱ्या या व्यक्तींच्या डोळ्यांत एक वेगळंच तेज दिसतं, तावून सुलाखून, संघर्षांनी घणाघात घालून पैलू पडलेलं. स्वतःच्या अंगांगावर घाव झेलून सोलून निघालेलं पण तरीही इतरांच्या वेदना ओळखणारं. स्वतःच्या जखमा दडवूनही इतरांच्या दुःखाना आधार देण्याची त्यांची तयारी असते, कसलाही संकोच न बाळगता ते सदैव तत्पर असतात. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून त्यांना वारंवार दूर ठेवण्यात आलं, तरीही संकटाच्या क्षणी त्याच माणसांच्या मदतीसाठी ते पुढे येताना दिसतात; कुठे वाद निर्माण झाला तर तेच शांततेचा दिवा पेटवतात; कुणी अडचणीत सापडलं तर हात धरून सांभाळून उभं करतात. त्यांचं वागणं ही केवळ मदत करण्याची कृती नसते; ती त्यांच्या मनातील खोलवर वाहणाऱ्या मानवतेची प्रकट रूपं असतात. जगाने त्यांच्याभोवती गैरसमजांच्या चौकटी उभ्या उभ्या केल्या, पण त्यांनी माणुसकीतील ऊब कधीच गमावली नाही. उलट, परिस्थिती तापली की तेच शांततेचा शिडकावा करून लोकांना एकत्र आणणारे ठरतात.
यांच्याबाबत अनेक सत्य आहेत. त्यातले काही अनुभव ''कायांतर'' कादंबरीच्या निमित्ताने तुमच्याशी शेअर करावे वाटतात, (या कथा पुस्तकात नाहीत.. पुस्तकात एक वेगळीच अधिक गहिरी सत्यकथा आहे. आता पोस्ट करत असलेल्या कथा केवळ या समुदायांना मानवंदना देण्यासाठी)
२०१५ च्या चेन्नई पुरात संपूर्ण शहर पाण्यात बुडालं होतं. हजारो लोक घरी अडकले होते. वीज खंडित झाल्याने सर्वत्र अंधार, भीती आणि अनिश्चितता वाढत होती. अशा कठीण वेळी मदतीसाठी कोण येईल याचीच शंका आणि धास्ती अनेकांच्या मनात होती.
पण समाजाकडून अनेकदा उपेक्षित ठरवलेला तृतीयपंथी समुदाय मात्र सर्वांत आधी मदतीला पुढे आला होता. प्रत्यक्ष पुराच्या पाण्यात उतरून कित्येकांचे जीव त्यांनी वाचवले होते. स्वतःंच्या छोट्या-छोट्या घरात जागा कमी असताना देखील, अनेक ट्रान्सजेंडर महिलांनी पुरग्रस्तांना आसरा दिला. पाणी, अन्न, कपडे जे काही त्यांच्या हाताशी होतं ते त्यांनी इतरांना वाटून दिलं होतं. काहीजण पावसात भिजत, गुडघाभर पाण्यातून चालत अडकलेल्या कुटुंबांपर्यंत पोहोचले. कुणाच्या हातात औषधं होती, कुणी अन्न घेऊन पोचलं होतं, तर LGBTQ+ समूहांनी एकत्र येऊन, मिळेल तसं साहित्य जमवून पुरग्रस्तांपर्यंत पोचवलं.
या समुदायाला स्वतःलाच राहत छावण्यांमध्ये अनेकदा जागा मिळत नव्हती. तरीही त्यांनी स्वतःच्या अडचणींपेक्षा इतरांच्या संकटाला प्राधान्य दिलं. त्या दिवसांत तृतीयपंथी समुदायाने खऱ्या अर्थाने मानवतेचं काम केलं. भीती आणि गोंधळाच्या काळात त्यांनी दाखवून दिलं, माणसाची ओळख, रूप किंवा नावाने नाही, तर त्याच्या माणूसपणाच्या कर्माने आणि कृतीने केली जाते. त्यांची मदत, त्यांची संवेदनशीलता आणि संकटातही धैर्याने उभं राहण्याची ताकद हे सगळं समाजाने मान्य करायलाच हवं. कारण खऱ्या मानवतेचा अर्थ मोठ्या शब्दांत नसतो, तो अशा लोकांच्या छोट्या पण मनाला भिडणाऱ्या कृतींमध्ये असतो.



तृतीयपंथी समाजाकडे वर्षानुवर्षे एकाच नजरेतून पाहण्याची आपली सवय झाली आहे. पण कधीतरी तो चष्मा बदलून पाहण्याची गरज आहे. कारण या समुदायाकडे शिकण्यासारखं, समजून घेण्यासारखं आणि मनापासून स्वीकारण्यासारखं खूप काही आहे. आपण समाज म्हणून त्यांना नाकारण्यासाठी हजार कारणं सहज शोधतो; त्यांच्या चुका मोठ्या करून पाहतो, पण त्यांच्या चांगुलपणाकडे पाहण्याइतपत थांबत नाही. उलट, त्यांच्या मनातील माणुसकी, त्यांची निस्वार्थ मदत, त्यांचं निरपेक्ष प्रेम याकडे लक्ष दिलं तर त्यांना स्वीकारण्याचीही अनेक कारणं आपल्याला सापडतील. हा दिवस आपण केव्हा मान्य करू, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून मोठे ठरू.


रश्मी पदवाड मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

एका ‘T’ची कहाणी - कायांतर

  #मुखपृष्ठ #कायांतर ही केवळ एक कादंबरी नाही; ती आहे एका ‘T’ची कहाणी...LGBTQAI++ समुदायातील ‘T’, म्हणजेच ट्रान्सजेंडरची. पण ही फक्त एका व्...