Sunday 26 April 2015

कुठे नेऊन ठेवलंय माणूसपण माझं ….



 थोडा विचार करा

ज्योती सिंग वर बलात्कार होतो तिच्या मित्रासोबातही क्रौर्याच्या सर्व सीमा पार केल्या जातात. आणि त्यांना तसेच नग्न, जख्मी रस्त्यावर फेकून दिले जाते. त्यांना तातडीने मदत करावी अशी रस्त्यावरून जाणारया येणाऱ्यांना गरज वाटत नाही… त्या बळी पडलेल्या निर्दोष अबलेचा बळी गेल्यावर हीच लोकं त्याच रस्त्यावरून आंदोलनं करतात.

गुन्हेगारांना आम्ही तातडीने शिक्षा देत नाही. विदेशातून त्यांच्यावर सिनेमा बनवायला लोकं येतात ती गुन्हेगारांना हिरो ठरव्ल्यासारखे त्यांना लाखो रुपये देऊन महिनोमहिने त्यांची शुटींग करतात त्यांना हवे ते बोलण्याची मुभा देतात ते सगळं जगासमोर ठेवतात… हे सर्व होतांना आम्ही मुग गिळून गप्प असतो. मिळणारा पैसा खिश्यात कोंबून वाटेल तशी परवानगी देतो. आणि ते जगासमोर आल्यावर 'मोठ्ठा' नियम काढून आमच्या देशापुरती त्यावर बंदी ठोकून मोकळे होतो. बंदी आणण्यासारखा विषय होता तर तो अस्तित्वात येउच का दिला अन अस्तित्वात आलाय तर बघू का देत नाही ? यावर आम्हाला उत्तर द्यायचे नाहीये … आम्ही आमच्या सोयीप्रमाणे वागतो.              

हजारो लोकांच्या गर्दीत एक माणूस एक 'शेतकरी' जीव देण्याचा प्रयत्न करत असतो … हजार माणसातल्या हजार 'शेतकऱ्यातला' एकही मायकालाल त्याच्या मदतीला धावत नाही ती सर्व भाषण ऐकण्यात अन आंदोलन मोर्चेबाजी नारेबाजी करण्यात दंग आहेत. शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या अश्या कृत्याबद्दल इतके कोरडे राहावे आणि सरकार असंवेदनशील आहे हे कुठल्या तोंडाने बोलावे?

राज्याचा मुख्यमंत्री ज्याच्या हातात पावर आहे तो डोळ्यादेखत मरणाऱ्या एका शेतकऱ्याला वाचवू शकला नाही आणि तो अक्ख्या देशातील शेतकऱ्याच्या जीवना-मरणाच्या गोष्टी करतो… मरणाऱ्याला तसेच मरत सोडून भाषणबाजी कायम ठेवतो….राज्याच्या उच्च पदावर बसूनही हातभर अंतरावरच्या मरत्या माणसाला न वाचवू शकणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या संवेदनशिलतेवर अन प्रामाणिकतेवर किती विश्वास ठेवता येऊ शकतो ??

नेपाळ मध्ये भूकंप आलाय ५००० लोकं जीवाने गेली. कित्तेकांच्या डोक्यावरचा आश्रय संपला. कित्तेकांचा परिवार संपला लहान मुलं अनाथ झाली शहर च्या शहर उजाडली …इतकं सगळं होत असतांना नेपाळचे प्रसिद्ध मंदिर ऐतिहासिक इमारती कश्या क्षतिग्रस्त झाल्या हे रंगवून दाखवतांना माध्यमांचे करावे तितुके (अ)कौतुके कमीच….
 गिर्यारोहक चमू सगळ्यांची शवं मिळालीय म्हणजे आता ती जिवंत नाहीयेत, त्यांच्या परीवारासोबातच देशाचीही ती क्षति आहे. पण अजूनही हिमालयावर 'तिरंगा' कसा छान लहरावतोय हे उरभरून सांगतांना हि वेळ नाहीये हे सांगण्याची आपण कुठेतरी चुकतोय हि कल्पना कुणालाच कशी येत नसावी ??       

माणसांच्या भल्यासाठी निर्माण केलेल्या सिस्टम आज त्याच माणसांच्या मृत देहावर राजकारण खेळतंय.मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाणं ह्यालाच म्हणतात ना ? स्मशानातल्या गौऱ्यांवर आपली भाकरी भाजून घेणे याहून वेगळे नसावे…  माणूस म्हणून आपल्याला मन दिलंय बुद्धी दिलीय त्याचा उपयोग आपण कशासाठी करतोय??

किती विरोधाभासी जगणे जगतोय आम्ही माणुसकी च्या शोधत आम्हीच इतके असंवेदनशील का होत चाललोय ??

  

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...