Wednesday 15 April 2015

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या !!!!

आजच वाचण्यात आलेला एक अप्रतिम लेख...

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या …!!!!
मी २००१ च्या ३१ डिसेंबर ला पंडित हृदयनाथ मंगेशकर (बाळासाहेब) यांचा भावसरगम कार्यक्रम बघायला गेलो होतो.
तसा मी भावसरगम डोंबिवली, ठाणे, दादर येथे अनेक वेळा पहिला होता (डोम्बिविली वासी मित्र नितीन जोशी याची कृपा!!).
पण हा कार्यक्रम विशेष लक्षात राहिला कारण रात्रभर पंडितजी गायले आणि त्यांनी सुरेश भट यांच्या बद्दल एक विशेष आठवण सांगितली !!
जरी "सुन्या सुन्या" हे गाणे "उंबरठा" चित्रपटातले असले, तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच लिहिले होते.
जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबांना संगीतकार म्हणून निवडले होते.
त्यांनीच बाळासाहेबांना सांगितले की गीतकार तुम्ही निवडा. बाळासाहेबांनी सुरेश भटांना मुंबईत बोलावून घेतले (ते मुळचे नागपूरचे).
त्यांना कथा वगैरे सांगून ४-५ गाणी लिहा असे सांगितले. त्यांना हॉटेल मध्ये राहायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले.
१-२ दिवस गेले पण भट साहेबांनी एक ही गाणे लिहिले नाही.
पंडितजींनी त्यांना विचारले तर ते म्हणाले "कुछ सुंझ नही रहा है, तो क्या लिखू!!!"( ते बाळासाहेबांशी नेहमी हिंदीत बोलत असत).
४ दिवस झाले पण नो चेंज !!
जयश्री बाई थोड्या अस्वथ होवू लागल्या, कारण हॉटेलचे बिल वाढतं होतं आणि चित्रपटाचे बझेट कमी. पण भट साहेब जैसे थे !!
७ दिवस झाल्यावर जयश्री बाई म्हणाल्या "मला नको तुमचे हे भट साहेब. जावू द्या त्यांना परत नागपूरला."
बाळासाहेबांनी हे सांगितल्यावर भट साहेब थोडे नाराज झाले पण म्हणाले "ठीक है, मेरा रेल्वे का टिकट दो, मै निकलता हूँ ।"
बाळासाहेबांनी त्यांचे तिकीट काढून आणून दिले, रूम खाली केली, जयश्री बाई हॉटेलचे बिल भरू लागल्या तेव्हा ते म्हणाले "आप मत भरो ये मेरा दोस्त है न बाळ, ये भरेगा मेरा बिल".
बाळासाहेबांनी हॉटेलचे बिल भरलं आणि ट्याक्षी बोलाविली. ट्याक्षीत बसल्यावर भट साहेबांनी अचानक पणे बाळासाहेबांकडे एक कागद मागितला. ते म्हणाले, माझ्याकडे नाही. भट साहेब म्हणाले, त्या हॉटेलवाल्याकडून एक कागद आण.
बाळासाहेबांनी हॉटेलात परत जावून एक जुने बिल आणले, त्या बिलाच्या मागे भट साहेबांनी फक्त १५ सेकंदात एक गाणे लिहिले अगदी झरझर …
शब्द होते
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की
अजूनही चांद रात् आहे!!
सगळी कडवी लिहून झाल्यावर त्यांना थोडे शांत वाटले. त्यांनी तो कागद बाळासाहेबांकडे दिला.
बाळासाहेब ती कविता वाचून स्तब्ध झाले. त्यांनी ती कविता लगेच जयश्री बाईना आणि धुरी साहेबाना दाखविली. जयश्री बाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्यांनी १५००० रुपयांचा चेक्क फाडून भट साहेबांच्या हातात ठेवला, पण भट साहेबांनी त्याचा स्वीकार केला नाही.
ते म्हणाले "यह मेरी अमानत है और मै मेरी अमानत कभी बेचता नही, रखो आप इसे".
भट साहेब तसेच निघून गेले.
पुढे जयश्री बाईंचा तो चित्रपट काही बनला नाही आणि ते गाणे बाळासाहेबांकडे राहिले.
कालांतराने जब्बार पटेल यांनी "उंबरठा" हा चित्रपट बनवायला घेतला. त्याचे संगीत बाळासाहेबांकडे दिले आणि गीते दिली भटांना. बाळासाहेबांनी भटांना हे गाणे दाखवले आणि त्यांना विचारले "हे गाणे वापरू या का?" भट साहेब म्हणाले "तुम्हारी इच्छा".
ते गाणे मग जब्बार पटेलांना ऐकवले आणि त्यांना पण आवडले.
फक्त त्यांनी एका शब्दावर आक्षेप घेतला.
शब्द होते
कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
कुणीतरी आरश्यात आहे
पटेलांनी भटांना सांगितले की तो "कुणीतरी" शब्द नको मला कारण चित्रपटाची नायिका, एक विवाहित स्त्री आहे. लोक काय म्हणतील?
परत गाडी अडकली.
बाळासाहेबांनी २-३ शब्द सुचविले पण त्यावर भट साहेब रागावून म्हणाले "तुम अपना काम करो। मेरे काम मे दखल अंदाजी न करो।".
रेकॉर्डिंग ची वेळ आली.
भट साहेबाना शब्द सुचेना आणि जब्बार पटेल तयार होईनात.
चाल, सेटअप आणि लता दीदी सगळे तयार होते.
इतक्यात शांता शेळके लता दीदींना भेटायला स्टुडिओ मध्ये आल्या. त्यांनी थोडी चौकशी केल्यावर त्यांना कळले की एका शब्दाची अडचण आहे.
त्या लगेच म्हणाल्या "अरे काय कठीण आहे त्यात. "कुणीतरी " ऐंवजी "तुझे हसू" घाल.
त्या क्षणाला सुरेश भटांनी "वाह, शांता वाह" असे उदगार काढले.
शांता बाईंचे ते शब्द गझलच्या त्या ठेक्यात एकदम चपलख बसले.
कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरश्यात आहे
एका टेक मध्ये बाळासाहेबांनी आणि लता दिदींनी ते गाणे रेकॉर्ड केले आणि एका अजरामर गाण्याचा जन्म झाला .
हे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर स्मिता पाटील लता दीदींच्या पायावर धाय मोकलून रड्ल्याची आठवण सुद्धा बाळासाहेबांनी सांगितली.
अशी उत्स्फूर्त कविता करणारा कवी महान, सहज शब्द सुचविणारी ती कवयित्री महान.
अजरामर चाल आणि अजरामर आवाज.
एका शब्दासाठी गाणे अडवून ठेवणारा तो दिग्दशर्क महान आणि पडदयावरची ती नायिका आणि तो नायक केवळ महान महान आणि महानच ……….
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या !!!! (फोटो आंतरजालावरून साभार)



सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजून ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे

 सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा                                              
अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आजर्वे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे

-उंबरठा,
-सुरेश भट,

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...